*निसर्गवारी*
*याचसाठी केला होता अट्टहास*
*शेवटचा दीनु गोड व्हावा!*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
२० जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
नमस्कार माऊलींनो,
आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा!
आज आम्ही पंढरीत पोहोचलो, निसर्ग वारी पूर्ण झाली.ज्या उद्देशाने आम्ही ही वारी सुरू केली होती तो उद्देश आणि 221 वृक्षलागवडीचा संकल्प माऊलींच्या कृपेने पूर्ण झाला. आजच्या दिवसाचे एका वाक्यात वर्णन करायचं म्हणलं तर, 'याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा'
गेली दोन वर्षे पंढरीची वारी होऊ न शकल्यामुळे वारी चुकते की काय अशी भावना मनामध्ये आली होती. याचाच विचार करून गेल्या वर्षी आम्ही पंढरीच्या दिशेने चालत आहोत असा मनात विचार आणून मनमंदिर वारी केली होती. या वर्षी निसर्गवारी करण्याचा निश्चय केला, ही वारी करताना यामध्ये काय असावं यावर आम्ही चर्चा केली. झाडे लावावीत, वृक्ष लागवडीचे महत्व लोकांना समजून द्यावे असा विचार आला आणि तो फलद्रुप झाला.
गेल्या 19 दिवसांमध्ये आमची सव्वाशे झाडे लावून पूर्ण झालेली आहेत. आज एका दिवसात डिचोली धोंडेवाडी येथे 104 झाडे लावली आणि 221 झाडे लावण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला. या कार्यक्रमास सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आणि माझे गेल्या वर्षभरात कोरोणाच्या अपडेट वरून अतिशय जवळचे संबंध झालेले आहेत. हरिष पाटणे यांनी जिल्हाधिकारी यांची ओळख करून दिली आणि तेथून पुढे फक्त मोबाईल मेसेज वरुन आम्ही संवाद साधत आहोत. एक दोन वेळा ओझरती भेट झाली आमची. या भेटीनंतर झालेल्या ओळखीतून परवा मी त्यांना आमच्या निसर्ग वारीच्या समारोपाला येण्याचं निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण त्यांनी एका सेकंदात स्वीकारलं.फक्त सामाजिक डिस्टन्स ठेवून 25 ते 30 लोकांचा कार्यक्रम व्हावा कमीत कमी लोकांचा कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आम्ही आज सकाळी धोंडेवाडी डिचोली येथे वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास आमच्या निसर्ग वारीतील सात सदस्य, वीस ग्रामस्थ एवढेच लोक उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांचे वेळेनुसार म्हणजे बरोबर नऊ वाजता त्यांचे डिचोली येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही डिचोली ग्रामपंचायत समोरील जागेत आज एकादशी असल्यामुळे 11 वड वृक्ष लावले. ही झाडे लावल्यानंतर त्या ठिकाणी उभे राहूनच ग्रामस्थ समवेत एक बैठक संपन्न झाली.
तीन ठिकाणी पुनर्वसन झालेल्या डिचोली गावातील ग्रामस्थांनी सुविधा,समस्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मागणी केली.या सर्व मागण्या काळजीपूर्वक ऐकून मला जे शक्य आहे तेवढेच मी बोलतो आणि ते मी नक्की तुम्हाला देईन, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात डिचोली गावाचे पुनर्वसन या एकाच विषयावर आपण बैठक आयोजित असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपस्थितांना दिले.
खरंतर डिचोली या छोट्या पुनर्वसित गावात जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येणार आहे हेच या गावकऱ्यांसाठी फार मोठं अपूर्व होतं. काल दुपारनंतर या गावात ही तयारी सुरू झाली होती. आज प्रत्यक्ष जिल्हाधिकारी गावात आल्यामुळे या या लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि पुनर्वसन प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे लोक खूप खुश झाले. ग्रामस्थांनी निसर्ग वारी ग्रुपमधील सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. माऊलींच्या कृपेमुळेच आम्हाला डिचोली गावात झाडे लावायची इच्छा झाली आणि त्यामुळे येथे जिल्हाधिकारी आले,माऊलींची इच्छा आहे म्हणूनच हे सर्व शक्य झाले आहे, अशी कृतज्ञता आम्ही सर्वांनी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केली.
या कार्यक्रमाची सविस्तर बातमी, प्रेस नोट या खाली मी आपणास देत आहे.
निसर्गवारीचे वृक्षलागवडीचे काम सर्वश्रेष्ठ :जिल्हाधिकारी शेखर सिंह;
निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण
संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे. निसर्गवारी ग्रुप वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
पुनर्वसीत डिचोली (धोंडेवाडी) (ता. कराड) येथे निसर्गवारी 2021 अंतर्गत आयोजित 'संकल्प 221 वृक्ष लागवडीचा' या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील. सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, डॉ. अमित खाडे तसेच जि.प. सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर सिंह म्हणाले, निसर्ग वारीच्या माध्यमातून हाती घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. झाडे म्हणजे देवआहहेत. झाडांमधील देवाला ओळखून निसर्ग वारीच्या माध्यमातून काम झाले आहे. निसर्गवारी ग्रुप जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे.
जर्मनीमध्ये अतिवृष्टी होऊन पूर आला. त्यामध्ये 180 ते 200 लोकांचे मृत्यू झाले. अरबी समुद्रात कधी सायक्लॉन येत नव्हते परंतु 2001 पासून ते येऊ लागले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये 50 डिग्री सेल्सीअस होते. याला कुठे न कुठे माणूसच जबाबदार आहे. वृक्षतोड कारणीभूत आहे. या परिस्थितीत निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल.
पहिला पाऊस जून-जुलै, ऑगस्ट मध्ये पडत होता. मात्र गेली 10 ते 15 वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे. यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे लावण्यामध्ये मोठा वाटा शेतकरी बांधवांचा वाटा असला पाहिजे. आपण आषाढी वारी निमित्त झाडे लावतो आहे. आपण विठ्ठलाचे रुप म्हणून त्याचे संगोपन करा. डिचोली ग्रामस्थ झाडांची काळजी घेतील. सयाजी शिंदे सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना राबवित असतात. सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीबाबत चळवळ उभी रहात आहे, याचे समाधान आहे.
सतीश मोरे म्हणाले, 2015 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे. मागील वर्षी मनमंदिर वारी केली. यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता. ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून 221 वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला. आळंदी ते पंढरपूर अंतर 221 कि.मी.असल्यामुळे येवढी झाडे लावली. प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे. डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला. येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे. आज वारी सार्थकी लागली आहे. 'याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा', याची प्रतिची आली.
बाळासाहेब कोळेकर म्हणाले, तीन ठिकाणी पुनर्वसीत झालेल्या डिचोली गावाच्या काही अडचणी आहेत. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत. निसर्ग वारीमुळे येथील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले.आभार सुरेश चौघुले यांनी मानले.यावेळी डिचोली येथे 104 वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारु परिवाराच्या वतीने करण्यात आले.
पुनर्वसीत डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी परिवाराने घेतला आहे. आज येथे 104 झाडे लावण्यात आली आहेत. यातील 75 झाडे वडाची आहेत. येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल,असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आमच्या समवेत फराळ केला. गेल्या अनेक दिवसांपासून वारी सुरू असताना आमच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला या असा आग्रह धरणारे संतोष शेट्टी यांच्या गंधर्व हॉटेलच्या वतीने आज सर्व पाहुणे आणि ग्रामस्थांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रजत शेट्टी यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार केला आणि कृतज्ञता व्यक्त केले. दरम्यान आम्हाला कमी दरामध्ये वडाची व इतर रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल नर्सरीचे शैलेश पाटील यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार केला.
तत्पूर्वी या कार्यक्रमात डिचोली ग्रामस्थांच्या वतीने
सर्व निसर्गवारी सदस्यांचा तुळशीचे वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला तर आमच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना वडाचे एक झाड देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी सातारा येथे महत्त्वाची बैठक असल्यामुळे तिकडे रवाना झाले.
त्यानंतर डिचोली ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे चार तास श्रमदान करून आम्ही सर्व सदस्यांनी या गावाच्या परिसरात 104 झाडे लावली. माउलीनीं कोणतीही अडचण येऊ दिली नाही. गावातील सुमारे २० ग्रामस्थ, युवक या कामी शेवटपर्यंत आमच्यासोबत झटत होते. या सर्व माऊलींच्या कष्टाला, चिकाटीला खरंच सलाम! लागवडीनंतर बाळासाहेब कोळेकर यांच्या निवासस्थानासमोर दुपारी दोन वाजता आम्ही चहा पाणी केले. सर्व माऊलींना धन्यवाद दिले आणि फुल रिचार्ज होऊन होऊन आम्ही कराडला परत आलो.
*कृतज्ञता*
गेल्या वीस दिवसात मी पाठवलेले सर्व मेसेज आपण वाचले, आम्हाला प्रतिक्रिया दिल्या,आशीर्वाद दिले,आमच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तुमच्या सहकार्यामुळेच,तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच आमची ही निसर्गवारी अतिशय आनंदात संपन्न झाली.आपले मार्गदर्शन आशीर्वाद आणि कृपादृष्टी अशीच राहू द्या ओ माऊली!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
२०.०७.२०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा