यशवंतराव चव्हाण साहेब एक आदर्श नेतृत्व ! ज्यांची उंची आजपर्यंत कोणीही मराठी नेता गाठू शकला नाही.
आज जे काही राजकारणी आहेत, त्या राजकारण्यांमध्ये चव्हाण साहेबांचा एक ही गुण नाही, हे मी जबाबदारीने बोलतोय. मला चव्हाण साहेब का आवडतात खूप कारणे आहेत. दिल्लीमध्ये मंत्रिपदावर असताना यशवंतराव चव्हाण यांनी अनुभवलेला एक प्रसंग ,एक पत्र मी कराडच्या वेणूताई चव्हाण पत्रामध्ये पाहिले आहे, वाचला आहे.
प्रसंग असा आहे, यशवंतराव चव्हाण दिल्लीमध्ये मोठ्या मंत्री पदावर कार्य करत होते. त्याच वेळी त्यांची पत्नी सौ वेणुताई कराडमध्ये शुक्रवार पेठेत एकट्या रहात होत्या. सौ वेणूताई चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांना म्हणजे आपल्या पतीला एक पत्र लिहिले, घरात पैशाची खूप चणचण आहे . थोडे पैसे पाठवून देऊ शकाल का?
यावर केंद्रीय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पत्नीला उलटे एक पत्र लिहिले, बटाणे यांच्या घरी जा, त्यांच्याकडून थोडे पैसे उसने घ्या. मी आल्यानंतर त्यांचे पैसे परत देईन.
एक मंत्री आपल्या बायकोला काय सांगतोय ,तू अमक्याच्या कडून पैसे उसने घे .खरं सांगा आजच्या काळातील मंत्र्याने असे केले असते का? त्याने सरळ कलेक्टर, तहसीलदार, प्रांताला फोन केला असता आणि सांगितले असते माझ्या घरी रेशनिंग भरा माझ्या बायकोला एक पेटी पोहच करा.
यशवंतराव चव्हाण हे मंत्री असूनही ही त्यांनी आपल्या पदाचा मंत्री पदाचा कधी गैरवापर केला नाही. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या चव्हाण साहेबांच्या बँक खात्यात शेवटच्या काळात केवळ काही हजार रुपये होते.
जे बोलेल तेच करणार म्हणजे करतो तेच बोलणार असा नेता महाराष्ट्राने पाहिला आहे आणि त्याचे नाव यशवंतराव चव्हाण !
आज त्यांच्या नावाने मी त्यांचा .... आहे. मी त्यांचा वारसदार आहे ,असे म्हणणाऱ्या राजकारण्यांनी चव्हाण साहेबांचा एक तरी गुण घेतला आहे का?
जाऊदे हा जरा राजकीय विषय!
चव्हाण साहेबांचे वारसदार, चव्हाण साहेबांचे टिंब टिंब टिंब, चव्हाण साहेबांचा अमका, असे म्हणून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनी चव्हाण साहेबांचा एक तरी गुण घेतला आहे का? आणि घेतला तर ते राजकारणात मोठ्या पदावर पोहोचतील.
आज हे सांगायचा प्रसंग येण्याचे कारण यशवंतरावजी चव्हाण यांच्या जन्मगावी म्हणजेच कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या त्यांच्या गावी आज त्यांच्या घरी जाण्याचा पहिल्यांदा योग आला. या अगोदर सोनसळ, चिंचणीला जाताना-येताना देवराष्ट्रे या गावात मी अनेकदा गेलो आहे .मात्र चव्हाण साहेबांच्या घरी भेट कधीही दिली नव्हती.
माझे मित्र विजय वाटेगावकर, आनंदा लादे, जाँन्टी थोरात यांच्या सोबतीने मी चव्हाण साहेबांच्या घरी गेलो. सहा खणी प्रशस्त असे हे घर पाहून खूप आनंद झाला. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात ही वास्तू आहे. शासनाने चव्हाण साहेबांचे घर संरंक्षित वास्तू म्हणून जतन केले आहे. जशी आहे त्या स्वरूपात, जसे होते तसे हे घर देवराष्ट्रे मध्ये आहे. या घरांमध्ये गेल्यानंतर चव्हाण साहेबांनी किती सामान्य घरांमध्ये जन्म घेतला होता हे पहायला मिळाले.
सामान्य घरात सामान्य कुटुंबात, दारिद्र्यात खचलेल्या घरात यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा व्यक्ती जन्म घेतो, मात्र गरिबीचे भांडवल न करता कराडला येतो, शिकतो. पुढे पुणे मुंबई पुणे नाशिक येथे शिकायला जातो. मोठ्या पदावर जातो, एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, भारताचा उपपंतप्रधान होतो ! ही अफाट अशी कामगिरी चव्हाण साहेब करू शकले कारण त्यांच्यामध्ये असणारी जिद्द आणि बुद्धिमत्ता, काहीतरी नवे शिकण्याची उत्सुकता !
चव्हाण साहेब सतत नवीन नवीन शिकत गेले. एका ठिकाणी कोणत्याही गोष्टी मध्ये ते अडकून राहिले नाहीत. महाराष्ट्रातल्या राजकारणात अडकून न राहता आलेली संधी स्वीकारून त्यांनी देशाच्या राजकारणात उडी घेतली. भारताचे तडफदार संरक्षणमंत्री म्हणून भारत चीन युद्धात त्यांनी दमदार भूमिका घेतली. या सर्व आठवणी आणि त्या बाबतचे सर्व फोटोग्राफ्स मला देवराष्ट्रे येथील त्यांच्या घरी पहावयास मिळाले.
यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई यांच्या ताब्यात देवराष्ट्रे येथील चव्हाण साहेबांच्या जुने घर ही वास्तू आहे. या ठिकाणी त्यांनी छोटेसे ग्रंथालय उभारले आहे. घरांमध्ये प्रत्येक खोलीत चव्हाण साहेबांच्या फोटोचे प्रदर्शन गँलरी आहे. चव्हाण साहेबांनी यशवंतराव होण्याअगोदर गावात जे चटके सोसले ते छोटेसे गाव असलेल्या देवराष्ट्रे जाऊन मला माझ्या सहकाऱ्यांना खूप आनंद झाला.
इतके दिवस आपण या गावात का आलो नाही याची खंत वाटली. मात्र आज 12 मार्च चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी त्यांच्या घरी जाण्याचा फार मोठा योग विजयी वाटेगावकर यांच्यामुळे आला, याबाबत मी त्यांना फार धन्यवाद देतो !
चव्हाण साहेबांच्या घरी भेट दिल्यानंतर आम्ही या खोऱ्यातील दुसऱ्या एका गावात पोचलो, ते म्हणजे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या सोनसळ गावात .या गावाच्या शेजारी चौरंगीनाथ नावाचे एक पर्यटन स्थळ डॉ. कदम यांनी विकसित केले आहे.
चौरंगीनाथ डोंगरावरून एका बाजूला कृष्णाकाठ आणि दुसऱ्या बाजूला सोनहिरा खोरे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. कृष्णाकाठावर असलेली समृद्धी आणि आणि कृष्णा साखर कारखान्याचे धुराडे पाहून कोणे एके काळी पतंगराव कदम साहेबांनी सोनहिरा खोऱ्यातही साखर कारखाना सुरू करण्याचे, हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहिले असेल.
ते स्वप्न पतंगराव कदम साहेबांनी सत्यात उतरवले .हा सर्व हिरवागार भाग पाहून खूप खूप आनंद झाला !
लेखन मर्यादा
सतीश वसंतराव मोरे.
12/03/2019