*अंतरंग*
आपण कोणाशी सोबत केली पाहिजे याबाबत लहानपणी माझ्या वडिलांनी दादांनी मला दिलेला सल्ला मला चांगलाच आठवतोय. 1982 मध्ये कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात मला माझ्या वडिलांनी मुद्दामहून प्रवेश घेतला. हा प्रवेश घेताना सहकार्य केलेल्या एका क्लर्कना आमच्या घरी जेवायला आणलेलं पण मला आठवतंय. खरंतर करवडी गावात सातवीपर्यंत प्राथमिक शाळा होती, ओगलेवाडीला पण हायस्कूल होते. करवडी गावातून कराडला शाळेला पाठवायचे म्हणजे खर्चिक होते, मात्र *शिक्षणासाठी पैसे घालणे म्हणजे योग्य ठिकाणी भांडवल गुंतवणे अशा विचाराचे माझे दादा होते.*
टिळक हायस्कूलमध्ये अनेक मोठे विद्यार्थी घडले आहेत, तेथे प्रवेश घेतला तर माझा मुलगा हुशार मुलांच्या संगतीत राहील आणि तो यशस्वी होईल असा माझ्या वडलांना विश्वास होता.
मला कराडला शाळेला घातल्यानंतर सुरुवातीपासूनच त्यांनी मला सांगितले होते, तु करवडी गावात हुशार असशील, तुझा करवडीत पहिला नंबर आला आहे मात्र तिथे कराडात तुझ्यापेक्षाही खुप बुद्धीमान मुले आहेत. *तिथे तुझ्यापेक्षा जास्त मार्कस असणाऱ्या मित्रांच्या बरोबरच तु संगत केली पाहिजेस.* तुझे मित्र ब्राह्मणाचे असले पाहिजेत, व्यापारी समाजातील असले पाहिजेत, राजकीय संबंधित असले पाहिजेत.
माझ्या दादांना हे सांगताना कोणताही जातीभेद व्यक्त करायचा नव्हता तर समाजात कोणत्याही जातीपातीच्या घटकांकडे जे चांगले गुण आहेत त्यांच्याकडून ते गुण तु घेतले पाहिजेत, असे त्यांना मला सांगायचे होते. सर्वोत्कृष्ट निकालाची, यशाची परंपरा असणार्या टिळकमध्ये राहून तू हुशार झाला पाहिजे, असा मला त्यांचा सल्ला असायचा.
*व्यापारी वर्गातील मुलांच्या कुटुंबातील मुलांच्या मैत्रीमुळे व्यापार करणे किती आणि कसे योग्य असते हे तुझ्या लक्षात येईल. हुशार मुलांच्या सोबत राहून तुला त्यांच्या इतके गुण मिळवण्याची प्रेरणा मिळेल असे माझे माझ्या दादा मला नेहमी सांगायचे .*
माणसाच्या जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. Man is known by the company he keeps असा एक इंग्रजी सुविचार आहे. *मला तुमच्या मुलाचे मित्र सांगा मी तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य सांगतो, या आशयाचेही एक सुवचन आहे.*
टिळक हायस्कूल मध्ये मला मिळालेले दिपक तडक,नितिन कुलकर्णी, चिंतामणी कुलकर्णी, दिपक काकडे, विनायक गरुड, विनायक जुगे,मनोज विजापुरे, मिलिंद नवाळे, हिरा भंडारी, डायालाल खंडेलवाल, सागर जोशी, हिदुंराव यादव, शहाजी यादव, फारूक शेख, इनामदार, जयंत जोशी, प्रशांत पाटील, सुभाष पाटील, दिपक पाटील, उमेश देशपांडे हे सर्व जातीधर्माचे मित्र म्हणजे माझे सल्लागार ,आधार होते. टिळक मुळेच मी जो काय आज आहे तो आहे. मित्रांनी मला खूप छान साथ सोबत दिली. अगदी दुपारचा डबा शेअर करण्यापासून सायकलवर टीबल सीट बसवून बस स्टँडवर सोडण्यापर्यंत,अभ्यासात मदत करण्यापासून कराडातील बोळ न् बोळ दाखविण्यापर्यंत, सरांचा मार कसा आणि गणिताचा तास कसा चुकवायचा , याचे ज्ञान मला मिळालेल्या मित्रांमुळेच प्राप्त झाले आहे.
(पूर्वार्ध)
©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*
११.०१.२०१९
karawadikarad.blogspot.com