फॉलोअर

१९ डिसेंबर २०२३

जीवन शिक्षण विद्या मंदिर @ करवडी'


*जीवन शिक्षण विद्या मंदिर @करवडी* 

करवडी गावातील दिवस खुप रम्य होते. बालपणीचे, शालेय जीवनातील दिवस तर त्याहून वेगळे होते. एसटी स्टँड पाठीमागे माझी प्राथमिक शाळा होती,आहे. *शाळेला 'जीवन शिक्षण विद्या मंदिर, करवडी' असे नाव होते. खरंच जीवन शिक्षण विद्यामंदिर हे नाव किती सार्थ आहे हे त्या सरकारी शाळेत शिकलेले आहे त्यांनाच कळू शकेल*. या चारही शब्दाची आपण जर फोड केली तर आज शाळेत काय काय शिकलं, शिकले पाहिजे आणि काय शिकवलं जातं शिकवायला हवं, हे उमगेल.

जीवन शिक्षण...जीवन जगण्याचं शिक्षण देणारं केंद्र म्हणजे ही शाळा. शिक्षण म्हणजे काय.क्षणाक्षणाला शिकले पाहिजे, काहीतरी नवीन आत्मसात केले पाहिजे, हे शिकवणारे केंद्र म्हणजे माझी शाळा. विद्या मंदिर.. विद्या एखाद्या क्षेत्रात, विषयात पारंगत होणे आणि ती विद्या देणारी ही शाळा. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, सतत अभ्यास करत राहणं आणि हे देणारं केंद्र म्हणजे शाळा. शेवटचा शब्द आहे मंदिर. खरंच हे शाळा एक मंदिर असतं. जिथे ज्ञानाची पूजा केली जाते, ज्ञान हा देव असतो.शिक्षक गुरु असतात. शाळेची इमारत सुधारणा मंदिर असते. आपण देवाच्या मंदिरात कशासाठी जातो शांतता मिळवण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी. शाळा रुपी मंदिरात आपण ज्ञानार्जन करण्यासाठी जातो आणि हे मिळवलेले ज्ञान पुढच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडते. देवाच्या मंदिरात शांतता मिळते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो आणि आपण देवाला काहीतरी मागतो. शाळा रुपी मंदिरात जे ज्ञान मिळते हे ज्ञान मिळून आपण शहाणे होतो, पुढे पारंगत होतो, नोकरीला लागून पैसे मिळवतो, सुखी होतो आणि पुढच्या पिढीला हे ज्ञान देतो. 

*२००० सालच्या दरम्यान कुणा अतिहुशार अधिकाऱ्याच्या कि शिक्षण मंत्र्यांच्या डोक्यात काय आलं कुणास ठाउक! त्यानं जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव बदलून प्राथमिक शाळा असं केलं. कदाचित काही पुरोगामी लोकांच्या लोकांना 'मंदिर' हे नाव नको असेल म्हणून त्यांनी हे नाव बदलून टाकलं. असो..कालाय तस्मै नमः* 

"जीवन शिक्षण विद्या मंदिर करवडी" ही माझी शाळा खरंच संस्काराचं केंद्र होती, एक मंदिर होतं, आनंददायी ठिकाण होतं. माझं पहिली ते चौथी शिक्षण या शाळेत झालं. सुहास पिसाळ, रमेश पिसाळ, अरविंद पिसाळ, अनिल बनसोडे, रवि सुतार हे माझे वर्गमित्र. मला आठवतंय या शाळेत जाताना आम्हाला खूप आनंद व्हायचा. शाळा दहा वाजता असली तरी आम्ही मित्र साडेनऊ वाजता शाळेत जाऊन बसायचो. दप्तर कोपऱ्यात ठेवून मग आमचे खेळ सुरू व्हायचे. गुरुजी आल्यानंतर वर्ग उघडायचे. *माझ्यासहित सर्व विद्यार्थ्यांना पहीलं एकच काम असायचं शाळेचा परिसर स्वच्छ करणे*. शाळा स्वच्छ करण्यासारखी मजा खरंच कुठे नसेल.खराटे तिथे नसायचे मग आसपासच परिसरातील निरगुडी शोधायची. निरगुडी तोडायची आणि खराटा तयार करायचा. काही जणांकडे वर्ग स्वच्छ करण्याचे काम असायचे. कोपऱ्यात केरसुणी ठेवलेली असायची, ती घेऊन काही मुले मुली वर्ग स्वच्छ करायचे. त्याकाळी वर्गामध्ये थोड्याच फरश्या होत्या? साधी शेणाने सारवलेली खडबडीत जमीन. प्रत्येक शनिवारी आम्हाला वर्ग सारवायचे वेगळं काम असायचं. आसपास रस्त्यावर पडलेलं शेण गोळा करायचं आणि शाळा सारवायची. आपली शाळा आणि वर्ग स्वच्छ ठेवणे, सारवणे हे शिक्षण एवढ्या छोट्या वयात मिळालं होतं. म्हणून तर म्हणलं ना ही शाळा म्हणजे जीवन कसं जगायचं हे शिकवणारे एक मंदिर आहे. हे सारं करून मग प्रार्थनेसाठी उन्हात उभं रहायचं.  

सुर्यवंशी बाईंचा मी लाडका विद्यार्थी. मधल्या सुट्टीत मी घरी जेवायला गेलो की भाजलेले शेंगदाणे घेऊन यायचो आणि बाईना द्यायचो. बाईंनी माझ्या कडून पाढे छडी लागेने पाठ करवून होते.माझ्या शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग मला आजही आठवतात. आता ती शाळा काही अंशी पाडली आहे, जुन्या शाळेचा काही भाग अजून शिल्लक आहे. या शाळेने आम्हाला खूप काही दिलें आहे. आजही या शाळेत जायला मला फार आवडते. घरासमोरच शाळा असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर शाळेचे पटांगण म्हणजे आमच्यासाठी सारं काही असायचे. क्रिकेट हा तसा त्याकाळी थोडा महागडा खेळ होता. मग या शाळेच्या पटांगणावर सुरपाट्या, कबड्डीचे ग्राउंड आखले जायचे. रात्रीच्या अकरा बारा पर्यंत इथे खेळ चालायचे. विट्टी दांडू आणि गट्टया तर आवडते खेळ. या खेळात आम्ही इतकं रमायचे की घरची आठवण येत नसे. काही मित्रांची आई टिकारणं घेऊन यायची तेव्हा आमचा खेळ संपायचा. 

शाळेच्या परिसरात अनेक झाडे होती.आमच्या घरासमोरच शाळेच्या कंपाऊंड लगत एक वड आणि दोन बाभळीची झाडं होती. ही तिन्ही झाडे आता अस्तित्वात नाहीत. पण या झाडाखाली आम्ही खेळलेले खेळ, दुपारच्या सुट्टीत मारलेल्या गप्पा आजही आठवतात. या झाडाखाली बसून उन्हाच्या सुट्टीत खाल्लेले गारीगार आणि त्याची चव आजही जिभेवर रेगाळत आहे. कधी कधी माकडवाला यायचा, मग माकडाचे खेळ या झाडाखालीच व्हायचे. चौथीला मला या शाळेत 74 टक्के मार्क मिळाले माझा वर्गात दुसरा नंबर आला होता. पहिला नंबर अनिल बनसोडे किंवा रवी सुतारचा आला असेल. एवढे चांगले मार्क मिळाल्यानंतर माझ्या वडिलांच्या तीव्र इच्छेनुसार पाचवीला मला १९८२ साली कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. टिळक हायस्कूलचा प्रवास खूप सुंदर आहे, त्यावर लिहीनच पुढे कधी तरी. मात्र करवडी येथील प्राथमिक शाळेतील या आठवणी हृदयावर कोरलेल्या आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी आपली पहिली शाळा विसरू शकत नाही. जीवन शिक्षण विद्या देणारी माझी शाळा आणि त्या शाळेतील सर्व शिक्षकांना वंदन !

लेखन @कृष्णा विद्यापीठ कॅम्पस सेन्ट्रल गार्डन 

*सतीश वसंतराव मोरे*
सतिताभ 
9881191302

१८ डिसेंबर २०२३

Save me I am the Oldest Tree here



Save me I am the Oldest Tree here
धन्यवाद डॉ. सुरेश बाबा, Dr.Suresh Bhosale  एक झाड वाचवल्याबद्धल !

पत्रकार परिषद असो वा एखाद्या नातेवाईकांना रुग्णालयात भेटण्यासाठी जाण्याच्या कारणासाठी असो, कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि कृष्णा विद्यापीठ परिसरात जाण्याचा योग मला अनेकदा येतो. या परिसरात गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ हे केवळ कराडचेच नव्हे तर जिल्ह्याचे, अवघ्या महाराष्ट्राचे वैभव आहे याचा पदोपदी अनुभव येतो. परवा कोल्हापूरला एका पाहुण्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्या पाहुण्यांनी मला सहज एक गोष्ट बोलून दाखवली, "पुण्यानंतर शैक्षणिक आणि आरोग्याचे माहेरघर आणि सर्वात मोठे केंद्र कोणतं असेल तर तुमचं कराड ! " छाती एवढ्या अभिमानाने फुलून आली होती काय सांगू !आपल्याला हा एवढा मोठा बहुमान मिळण्याचे कारण म्हणजे कराडचं मोठं कृष्ण हॉस्पिटल आहे. 

कृष्णा हॉस्पिटलच्या इतर उपक्रमाबाबत मला आता बोलायचे नाही.आज मला सांगायचे आहे कृष्णा विद्यापीठ परिसरात राबवलेल्या एका वेगळ्या उपक्रमाविषयी. देवयानीला आगाशिवनगर मध्ये क्लासला सोडल्यानंतर आज जिमला सुट्टी असल्यामुळे काय करायचे असा विचार करून मी कृष्णा विद्यापीठ कॅम्पस मध्ये प्रवेश केला. आज संपूर्ण कृष्णा विद्यापीठ कॅम्पस परिसर फेरफटका घालायचा असा विचार करून मी कृष्णा सरिता बाजारच्या बाजूने आत प्रवेश केला.

आदरणीय स्व.जयंतराव भोसले आप्पा यांच्या समाधीस्थळला अभिवादन करून पुढे वळसा घालून आलो .रस्त्याच्या बाजूला भव्य जिमनॅसीयम, महिला होस्टेल्स, नर्सिंग स्कूलच्या इमारती तसेच निवासी इमारती डोळे दिपून घेत होत्या. आपण कराडमध्ये आहोत की परदेशात आहोत असं वाटत होतं. या इमारतीच्या चारी बाजूला, सभोवताली शेजारी, अलीकडे, पलीकडे जाणीवपूर्वक निर्माण केलेली हिरवाई आणि वृक्षलागवड पाहून मन प्रसन्न होत होते. एवढी सुंदर आणि मोहक झाडे या ठिकाणी लावलेली आहेत की आपण या झाडांच्याच प्रेमात पडतो. ही झाडे पाहून मनाला आनंद तर मिळतोच तर शिवाय आपणही झाडांच्या इतकं उंच व्हावं, सतत हिरवगार राहावं आणि ऊन वारा पाऊसरूपी कसलंली संकट आली तर खचू नये, एवढं मात्र नक्की शिकायला मिळतं.


तसाच पुढे गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ परिसरातील फार्मसी कॉलेजच्या समोर रस्त्यावर येऊन माझी पावले थांबली. रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा वृक्ष उभा होता, या वृक्षाला वळसा घालून रस्ता पुढे गेला होत. हा वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी येऊन सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कृष्णा विद्यापीठाने तथा डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांनी केल्याचे पाहून खूप आनंद झाला. मध्यभागी असलेल्या या वृक्षाला संरक्षित करून 'मी सर्वात जुना वृक्ष आहे आय एम द ओल्डेस्ट हिअर ' अशी सोनेरी पाटी या झाडावर लावलेली पाहायला मिळाली. येथून रस्ता जात असताना मध्यभागी आलेला हा महाकाय वृक्ष तोडणे खरंतर फार अवघड नव्हते. हा वृक्ष तोडून आणखीन शंभर झाडे कृष्णा विद्यापीठात डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांना लावता आली असती .मात्र सर्वात जुना हा वृक्ष वाचवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला खरंच दाद दिली पाहिजे, सलाम केला पाहिजे. 

रस्त्याच्या मध्यभागी  असे महाकाय वृक्ष आणि आणि उंच डेरेदार वृक्ष आपण या अगोदर पाहिले असतील. पण ही दृश्यं अमेरिका ,इंग्लंड, फ्रान्स  अशा पाश्चात्त्य देशात पाहायला मिळतात. काळाच्या ओघात रस्ते रुंदीकरण आलेच, रस्ते मोठे झाले पाहिजेत. मात्र रस्ता जिथून जातो तिथे जर जुने वृक्ष येत असतील तर ते वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. रस्ते कुठेही बांधता येतील मात्र जुने वृक्ष पुन्हा तिथे उभं करणे अवघड असते. हाच दृष्टिकोन डोळया ठेवून समोर ठेवून डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या कल्पकतेतून कृष्णा विद्यापीठ परिसरातील हा उंच वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याबद्दल खरंच कृष्णा विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. सुरेश बाबा भोसले यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. हा वृक्ष पाहून त्यानंतर मी पुढे असलेल्या लायब्ररी समोरील सेंटर पार्क मध्ये गेलो. तिथेही अशाच प्रकारचा उंच असा एक पिंपळ वृक्ष जपला आहे. या झाडाशेजारी बसूनच हे सर्व लिहिण्याचा आनंद मला लुटला.


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..!

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२

ता.क.
हा ब्लॉग लिहून झाल्यानंतर त्या वृक्षसंवर्धन डॉ. विनायक भोसले यांना फोन केला.  यावेळी त्यांनी  एक इंटरेस्टिंग माहिती सांगितली. कृष्णा विद्यापीठ परिसरात जे वृक्ष, झाडी आणि हिरवाई फुलली आहे, या सर्व झाडांना पाणी कुठून येते ? कृष्णा रुग्णालयात बाथरूम ,वॉश बेसिन मध्ये वापर करून जे सांडपाणी गोळा होते, ते सर्व पाणी एका ठिकाणी गोळा केले जाते. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एटीपी प्लांटमध्ये हे सर्व पाणी आणून ते स्वच्छ केले जाते आणि हे स्वच्छ केलेले पाणी पाईप लाईन मधून या सर्व झाडांना घातले जाते, असे विनायक भोसले यांनी मला सांगितले. पर्यावरणप्रेमी डॉ. सुरेश बाबा भोसले यांच्या या कल्पनेला दाद दिली पाहिजे.

#Vinayak Bhosale  #savetrees #oldesttrees

०७ नोव्हेंबर २०२३

अमिताभ बच्चन यांच्या सोबत वाढदिवस

*कराडचे ३० जण आज केबीसीमध्ये  सोनी टीव्हीवर*

🆎 *बच्चन सरांसोबत वाढदिवस आणि एबीपी ग्रुपचे बच्चन सरांनी केले कौतुक* 🆎

अमिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणारे सर्वात जास्त लोक कोण आहेत, कुठे आहेत असं जर कुणी विचारलं तर सातारा जिल्ह्यात एकच नाव घेतलं जातं ते म्हणजे *अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराड,अर्थात ABP.* 

*अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर, गाण्यावर, चित्रपटावर प्रेम करणारा नव्हे तर अमिताभ बच्चन यांच्या लाईफस्टाईलवर आणि एकूण त्यांच्या लाईफ स्टोरी वर प्रेम करणारा ग्रुप म्हणून अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप सर्वज्ञात आहे. बच्चन प्रेमी ग्रुपच्या पुढाकाराने आणि प्रयत्नामुळे आज अखेर कराड तसेच सातारा, पुणे, मुंबई येथील कराड स्थित तीनशे पन्नास हून अधिक लोकांना अमिताभ बच्चन सरांचे दर्शन झाले आहे,भेट झाली आहे.* 

याही वर्षी अमिताभ बच्चन यांना "कौन बनेगा करोडपती" सेटवर भेटण्याचा योग एबीपी ग्रुपमुळे कराडकरांना आला. दिनांक ६ नोव्हेंबर रोजी केबीसी सेटवर कराड येथील आम्ही ३० जण  गेलो होतो. 
'केबीसी चिल्ड्रन स्पेशल' या वेगळ्या भागाचा साक्षीदार होण्याचा आम्हा सर्वांना योग आला. केबीसीच्या हॉट सीटवर किशोरवयीन मुले बसली होती. या लहान मुलासोबत त्याहून अधिक लहान झालेल्या अमिताभ बच्चन यांनी केलेली मजा आम्ही अनुभवली. या मुलांनी खेळ तर चांगला केलाच, पण अशा काही गंमतीशीर गोष्टी सांगितल्या की अमिताभ बच्चन आणि सेटवरील सर्वजण हास्याच्या सागरात बुडाले. अमिताभ बच्चन यांना समोर पाहून आम्ही केलेला दंगा, शिट्ट्या आणि घेतलेला आनंद आपण आज सोनी टीव्हीवर पाहणार आहोत.*आज 27 तारखेला रात्री नऊ वाजता* केबीसीच्या भागात आम्ही 30 जण कराडकर असणार आहे.

आजपर्यंत केबीसीला कराड मधील साडेतीनशे लोक जाऊन आलेले आहेत, ते केबीसी मध्ये दिसले आहेत. मात्र यावेळी आम्ही तीस सर्वजण एकाच ठिकाणी बसलेले आहोत. सेटचा  एक भाग कराडकरांनी व्यापलेला आहे. माझी स्वतःची ही आठवी बच्चन भेट आहे, पण या भेटीत सुद्धा पहिल्या भेटीची उत्कंठता होती.

आम्ही खूप मजा केली, दंगा केला. अमिताभ बच्चन यांच्या सोबत गप्पा मारल्या.आम्हा सर्वांना आज केबीसीमध्ये पहा,आम्ही दिसल्यानंतर स्क्रीनचे फोटो काढा, टाळ्या वाजवा आणि आम्हाला पाठवून द्या.

केबीसीची शूटिंग संपल्यानंतर अमिताभ बच्चन सर आम्हा सर्वांना भेटले, बोलले, आमच्या सोबत फोटो काढले. (हे फोटो नंतर उपलब्ध होणार आहेत) *अमिताभ बच्चन सर यांनी माझ्या 51 व्या वाढदिवसानिमित्त सेटवर मला शुभेच्छा दिल्या. सेटवर वाढदिवस साजरा झाला.* अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने राबवलेल्या विविध कामाची, उपक्रमाची माहिती मी आणि दिपक प्रभावळकर यांनी अमिताभ बच्चन यांना दिली. 

एबीपी ग्रुपने अमिताभ बच्चन यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त 11 आक्टोबर रोजी *'एक बच्चन प्रेमी एक सोनचाफा झाड'* हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमांतर्गत 81 सोनचाफा झाडे कराड व परिसरात लावलेली आहेत. या सर्व झाडांचे एकत्रित फोटो कोलाज अमिताभ बच्चन यांना भेट देण्यात आले, यावर अमिताभ बच्चन यांनी सही करून दिली.

अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित मी एक सुंदर कविता तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. *'बच्चन होणे तर सोपं असतं अमिताभ व्हायला मात्र रातंदिन झगडावं लागतं '* असे शीर्षक असलेल्या या कवितेच्या चारोळी अमिताभ बच्चन यांना ऐकवल्या. ही कविता सुलेखनकार प्रशांत लाड यांनी देखण्या अक्षरात रेखाटली आहे तर प्रा. सतीश उपळवीकर यांनी अमिताभ बच्चन यांचे अतिशय सुंदर चित्रं काढले आहे. (लवकरच कॅलेंडर स्वरूपात प्रसिद्ध होणार आहे तसेच माझ्या सतिताभ या यु ट्युब चॅनलवर ती प्रसारित होणार आहे )

रचना मी स्वतः सतिताभ, सुलेखन प्रशांत लाड आणि चित्र प्रा. सतिश उपळावीकर असा त्रिवेणी संगम असलेल्या लखोटा आकारातील कविता अमिताभ बच्चन यांना भेट दिली. *अमिताभ बच्चन यांनी ही भेट आनंदाने स्वीकारली. बच्चन सरांनी केबीसी सेटवर त्यांच्या केबिनमध्ये ही कविता उंच ठिकाणी लावलेली आहे (सोबत तो फोटो दिला आहे). हा माझ्यासारख्या बच्चन प्रेमीचा बच्चन सरांनी केलेला बहुमान आहे, असं मी मानतो आणि बच्चन सरांना धन्यवाद देतो. लव यु 🆎* 


*तर मग आज पहा आम्हाला सोनी टीव्हीवर रात्री ९ वाजता* 


*सतीश मोरे सतिताभ*.
🆎🆎🆎🆎🆎🆎

२७ ऑक्टोबर २०२३

तुम अतीत़ हों...


तुम अतीत़ हों...

गेलेला काळ, बीता हुआ कल किंवा अतीत म्हणा.. एक सुखद किंवा दुःखद आठवणीने भरलेला असतो. या काळात आपल्याला अनेक सुखद आठवणीने भरून ठेवलेलं असतं. जुन्या आठवणी आपल्याला ताज्यातव्याना करतात, आनंद देतात.. तर कधी कधी दुःखही देतात. 

लहानपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात,पण 'बिता हुआ कल' म्हणजे फक्त लहानपणीचा काळ नव्हे तर तुमच्या गत आयुष्यात घडलेल्या सुखद घटना किंवा तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट देणाऱ्या काही प्रेरणादायी घटना तसेच तुम्हाला उध्वस्त करणाऱ्या काही दुःखद घटनाही असतील. या घटना तुम्ही आयुष्यभर कधी विसरत नाही, तो क्षण देणारी ती व्यक्तीही कधी विसरू शकत नाही.

हा 'अती़त'' आपल्याला काही गोष्टी शिकवून जात असतो, परिणाम देत असतो. 'त्या' सोबत राहायला माणसाला खूप आवडतं. असं म्हणतात आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करायचा नसतो,सतत पुढे जायचं असतं. 'सिलसिला' मध्ये संजीव कुमार पत्नी रेखाला एक गोष्ट बोलून जातो, 'अती़त को एक मिठी याद समझ़कर भूल जाना चाहिए'... पण हा 'अती़त' विसरणं अशक्य असतं जर तो अती़त एखादी व्यक्ती असेल तर. कारण त्या व्यक्ती सोबतच्या आठवणी तसेच घडलेल्या काही गोष्टी आपल्या मनावर अतिशय खोलवर बिंबलेल्या,कोरलेल्या असतात. त्या गोष्टी किंवा ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही. 

'बिता हुआ कल' प्रेरणादायी असतो, वेदनादायी असतो, सतत जवळ असतो त्रासदायक पण असतो. मात्र अनेकदा आपल्याला जेव्हा पुन्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा तो जुना काळ आठवला की तो कल, ती आठवण 'औषध' म्हणूनही काम करत असतो. अशा या 'अतीत' विषयी सहज चार ओळी बाहेर पडल्या...

तुम अतीत़ हो...
पर सबसे करीब हों !

तुम अतीत़ हों...
पर सबसे खुब़सुरत हों !

तुम अतीत़ हों...
पर तकलिफें खुब़ देते़ हों !

तुम अतीत़ हों...
पर दवा़ भी तुम ही़ हों !

सतीश मोरे सतिताभ
२७.१०.२०२३

१३ ऑक्टोबर २०२३

बेमिसाल अमिताभ आणि अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप

*बेमिसाल अमिताभ ...!*
*बेमिसाल अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप !*
*होय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं !*

अमिताभ बच्चन यांच्यावर नितांत प्रेम करणारा एक ग्रुप म्हणून अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची सातारा जिल्ह्यात ख्याती आहे. सिनेमा कलाकारांसाठी काहीही करणारे जगभरात भरपूर आहेत पण एखाद्या कलाकारावर , त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारे अमिताभ बच्चन प्रेमी खूप कमी आहेत.

पडद्यावरचा अमिताभ बच्चन आमच्या बच्चन प्रेमींना आवडतोच.मात्र पडद्या बाहेरचा, 58 व्या वर्षीही संघर्ष करणारा, कर्जबाजारी असूनही न डगमगणारा, कुणाच्याही दारात काम मागण्यासाठी जायला न कचरणारा, 'तुमचे सर्व कर्ज किती आहे या चेकवर लिहा , मी सारं फेडतो' अशी अंबानी यांची ऑफर न स्वीकारता काम मागणारा अमिताभ. स्वाभिमानी आणि अभिमानी अमिताभला पुढे मोहब्बते चित्रपट मिळतो, पुढे केबीसी मिळतं आणि पुन्हा 'डॉन' ' महा डॉन' होतो. ही कोणत्या चित्रपटाची स्टोरी नाही तर ही सत्य घटना आहे. आणि हाच अमिताभ बच्चन आम्हाला खुप आवडतो.

बेमिसाल अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या बच्चन प्रेमी ग्रुपने अमिताभ बच्चन यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त "बेमिसाल अमिताभ" हा दृकश्राव्य गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. टाऊन हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला कराड आणि तालुक्यातील अमिताभ बच्चन प्रेमी आणि प्रेक्षकांचा अतिशय लाजबाब प्रतिसाद मिळाला. बच्चन प्रेमी ग्रुपने घेतलेले आज अखेरचे सर्व कार्यक्रम हाउसफुल झालेलेच आहेत,हाही कार्यक्रम तितकाच हाऊसफुल झाला.

 समोर दृकश्राव्य माध्यमातून अमिताभ बच्चन यांना पाहणे, त्यांचे डायलॉग ऐकणे, त्यांची गाणी पाहत पाहत ऐकणे, हे कराडकरांचं नव्हे अवघ्या बच्चन प्रेमींचं स्वप्न होतं.  ते प्रत्यक्षात उतरलं कोल्हापूर,इस्लामपूर येथील  'स्वराभिषेक' प्रसुत आणि कराड येथील ABP कलाकारांनी अतिशय उंची आणि सुश्राव्य आवाजात गायलेली गाणी आणि त्याच वेळेला समोर अमिताभ बच्चन यांना पाहणे हे फार मोठे दिव्य स्वप्न होतं आणि ते स्वप्न सर्वांच साकार झालं. 

एका मागे मागे गाणी होत होती, मधूनच अमिताभ बच्चन यांचे दमदार संवाद पण ऐकायला मिळत होते. कोणीच जागेवरून पण हलत नव्हतं. आता कुठलं गाणं ?आता कुठला डायलॉग पाहायला मिळणार ? याची उत्सुकता लागत होती. प्रेक्षकांच्या मधील उत्सुकता वाढवण्यासाठी ,"कौन बनेगा सबसे बडा अमिताभ बच्चन प्रेमी"  प्रश्नमंजुषा क्विझ  वाढवत होती आणि कार्यक्रम एका उंचीवर नेत होती.

 कोल्हापूर येथील प्रशांत सालियन, इस्लामपूर येथील शेखर गायकवाड आणि त्यांची कन्या राजेश्वरी गायकवाड यांनी हा कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुरेश वाडकर यांची शिष्या असलेल्या राजेश्वरीने 'दो लब्जो की है दिल की कहानी' आणि 'तेरे मेरे मिलन की ये रैना' हे गीत सादर करताना  उपस्थितांच्या अंगावर 'रोमटे खडे केले'. तेरे मेरे मिलन की रैना ऐकताना पाहताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आले. प्रशांत सालियन यांनी 'कभी कभी' आणि 'हर किसी बात का मै तरफदार हुं' या गाण्यातून मुकेशला साक्षात समोर उभे केले. संजय बदीयानी यांच्या 'मंजिले अपनी जगह है' या गझलने सर्वांना वेगळ्या विश्वात नेवून ठेवले. सुधाकर बेडके यांच्या 'मै हुं डॉन' आणि डॉक्टर नितीन जाधव यांनी सादर केलेल्या 'देखा ना.. सोचा ना ..हाय रे रख दी  निशाने पे जा' या गाण्याने उपस्थितना डोलायला लावले, नाचायला लावले. मंगेश हिरवे यांनी सादर केलेल्या 'दिल भर मेरे कब तक मेरे' या गाण्याने कार्यक्रमाची उंची आणखीनच वाढवली.


शेखर गायकवाड आणि प्रशांत सालियन यांच्या 'हम प्रेमी प्रेम करना जाने ' या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पुर्वी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे थीम सॉंग असलेल्या 'हम' मधील 'एक दुसरे से, करते है प्यार हम', या गाण्याने ग्रुपमध्ये 'जान' आणली. सर्व बच्चन प्रेमी यात सहभागी झाले . त्यानंतर सर्वांनी आनंद  साजरा करताना 'मै हु डॉन', 'दे दे प्यार दे' आणि 'अपनी तो जैसे तैसे' या गाण्यावर उपस्थितांसह सर्वांनीच ठेका धरला. कार्यक्रम इतका सुंदर आणि उंचीवर नेऊन ठेवला तो अतिशय उत्कृष्ट अशा नियोजनाने, दृकश्राव्य माध्यमाने आणि सर्व कलाकारांच्या अतिशय सुंदर अशा आवाजाने !

अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमातून 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने' पुन्हा एकदा सिद्ध केले की कार्यक्रम घेण्यात आणि तो यशस्वी करण्यात 'बच्चन प्रेमी' नेहमीच अग्रेसर असतात.


'बेमिसाल अमिताभ' कार्यक्रमाचे प्रायोजक अर्बन ट्रेंडचे संतोष पवार, हॉटेल प्यासाचे बंडा शिंदे आणि गोल्ड पार्टनर गांधी ज्वेलर्सचे धीरज गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 'कौन बनेगा सबसे बडा अमिताभ बच्चन प्रेमी' या प्रश्नमंजुषा क्विझचि बक्षीस वितरण समारंभ या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मध्यंतरात सातारा येथील आमच्या ग्रुप मधील बच्चन प्रेमींनी अमिताभ बच्चन यांची प्रेममय आरती करून बच्चन ग्रुपचे संस्थापक या नात्याने मला 'सातारी कंदी' पेढ्याचा हार घातला .पेढ्याचा हार घालण्याची आयुष्यातील ही पहिली वेळ आणि ही संधी मला मिळाली फक्त अमिताभ बच्चन यांच्या प्रेमामुळे, वेडामुळे !

*बच्चन प्रेमीच्या कडून दिलगिरी* 

हा कार्यक्रम पाहण्यासाठी कराडातून अनेक रसिक आले होते. तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम अर्धा तास उशिरा सुरू झाला. काहीना जागा मिळाली, काहीना उभे राहावे लागले. काहीना बाल्कनी जाऊन बसायला लागले किंवा काही जणांना जागा मिळाली नाही म्हणून परत जावं लागलं. याबद्दल आम्ही बच्चन प्रेमी ग्रुप दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्व रसिकांच्या ऋणामध्ये आम्ही कायम राहू.


*सेल्फी पॉइंट आकर्षण*

टाऊन हॉलच्या प्रवेशद्वारावर व्हाईट ब्लेझरमधील देखणा अमिताभ आणि मुख्य प्रायोजक असलेल्या अर्बन ब्रँडचा राणा यांचे एक फ्लेक्स लावण्यात आलेले होते. हा उपस्थित बच्चन प्रेमींसाठी हा सेल्फी पॉइंट झालेला होता. या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. बच्चन ब्रँड किती मोठा आहे याची आम्हाला वेळोवेळी जाणीव होतेच. अमिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप ABP यांच्या नावावर कराडातील अनेक कार्यक्रम यशस्वी झालेले आहेत. फार मोठे कार्यक्रम आम्ही घडवू शकलो आहे. या पुढील काळातही अमिताभ बच्चन यांचा प्रत्येक वाढदिवसाला 'अमिताभ बच्चन प्रेमी' कराडकरांसाठी संगीतमय किंवा ज्ञानमय मेजवानी घेऊन येणार आहे. 

*जय अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप!*

*धन्यवाद कराडकर* 

*धन्यवाद बच्चन* 

*धन्यवाद टीम ABP*

जय बच्चन ! जय बच्चन !जय बच्चन !

*सतीश मोरे सतिताभ*


११ ऑक्टोबर २०२३

My Amitabh Bachchan at 82 today


🆎 *महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८२ वा वाढदिवस..!*🆎

✅अमिताभ बच्चन आणि माझं बच्चन प्रेम याबद्दल मी काय सांगू ?

✅अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत काय लिहू आणि किती लिहू?

✅अमिताभ बच्चन या विषयावर पारायणे करावी लागतील ऐवढा मोठ्ठा बिग बी आहे !

✅पडद्यावरचा अमिताभ तर माझा जीव की प्राण पण पडद्याबाहेरचा अमिताभ माझा आदर्श आहे.

✅५८ व्या वर्षी कर्जबाजारी होऊन सारं संपलेला अमिताभ पुढं पुन्हा धडाडीनं उभा राहिला, म्हणून तो माझा आयडाॅल आहे.

✅मला अमिताभ बच्चन का आवडतो, त्याचं काय भावतं यावर खूप लिहीलं आहे. माझ्या ब्लॉगवर. त्यापैकी काही लिंक्स आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सोबत पाठवत आहे. वेळ मिळेल तेव्हा वाचा.

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ* 
 🆎🆎🆎🆎🆎🆎

*11 ऑक्टोबर निमित्ताने 11 ब्लॉग '' माझ्या बच्चन ''वर* 

▶️ https://karawadikarad.blogspot.com/2021/10/blog-post.html?m=1 अमिताभ बच्चन यांच्या पाच भेटी पाच अनुभव 

▶️https://karawadikarad.blogspot.com/search/label/amitabh%20deewar?m=1
आज खुश तो बहोत होंगे तुम दिवार

▶️https://karawadikarad.blogspot.com/2018/11/blog-post.html?m=1 व्हेन सतिताभ मिट अमिताभ 


▶️https://karawadikarad.blogspot.com/search/label/first%20meet%20with%20amitabh?m=1 अमिताभ भेटीची स्वप्नपुर्ती

▶️https://karawadikarad.blogspot.com/2016/10/blog-post_11.html?m=1 अमिताभ बच्चन यांचे जुने फोटो 

▶️https://karawadikarad.blogspot.com/2019/01/blog-post_17.html?m=1 ना बोलना बहोत जरूरी है अग्निपथ

▶️https://karawadikarad.blogspot.com/2016/03/blog-post_24.html?m=1 सिलसिला.. रंग बरसे

▶️https://karawadikarad.blogspot.com/2016/03/blog-post_25.html?m=1 बेमिसाल अमिताभ बेमिसाल सखी

▶️https://karawadikarad.blogspot.com/search/label/shakti%20amitabh?m=1 अमिताभ शक्ति

▶️https://karawadikarad.blogspot.com/2022/11/blog-post_13.html?m=1 अमिताभ उंचाई

▶️https://karawadikarad.blogspot.com/2023/10/blog-post_1.html?m=1 पहिलं अमिताभ पाठमोरं दर्शन १९९६

*अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*

०८ ऑक्टोबर २०२३

कृतज्ञतापूर्वक धन्यवाद


कृतज्ञतापूर्वक धन्यवाद !* 

पितृऋणातून मुक्त होणे कधी शक्य नाही. मातृऋण तर त्याहून अधिक असते. तरीही आई-वडिलांसाठी जेवढे काही करता येणं शक्य आहे ते करायचं असतं.आईबरोबरच माझ्यावर संस्कार करून शिस्त आणि स्वावलंबनाचा धडा देत मला उभं करणारे माझे वडील,माझी शाळा, माझे विद्यापीठ, जीवनविद्येचे महा 'तारे' वसंतराव सखाराम मोरे यांच्या '९१' व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा काल संपन्न झाला.

तळेगाव दाभाडे होऊन आलेले खास पाहुणे 'थंडा मामला' हॉटेल समूहाचे अविनाश गीते आणि पुण्याचे शैलेश जोशी वडेवाले यांनी उपस्थितांना व्यवसाय उभारणीत आलेल्या रोमांचक आठवणी सांगून उद्योग व्यवसाय वृद्धिसाठी काय आणि कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. मी या दोघांचाही खूप आभारी आहे.

गेल्या दहा वर्षापासून मी या कार्यक्रमाचे मी स्वप्न पाहत होतो. ते काल सत्यात उतरले. माझ्या विनंतीला मान देऊन कराड, कोरेगाव,पाटण,खटाव,सातारा, इस्लामपूर तालुक्यातील माझा मित्र परिवार,पै पाहुणे,अमिताभ बच्चन प्रेमी समुह, लायन्स क्लब परिवार,जीवनविद्या मिशनचे पदाधिकारी आणि नामधारक, कराड शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार, शासकीय अधिकारी, करवडी आणि परिसरातील ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित राहिले. दादांना शुभेच्छा दिल्या. *तुमच्या उपस्थितीमुळे दादांना नवे बळ मिळाले,मी आपला कायम ऋणी राहील* 

@सतीश वसंतराव मोरे आणि कुटुंबीय.

०८.१०.२०२३

०१ ऑक्टोबर २०२३

पहिलं अमिताभ दर्शन

आठवण पहिल्या अमिताभ दर्शनाची 
आणि 'मन का हो तो अच्छा' या संवादाची!

१९९८ साली सन्माननीय राज ठाकरे यांच्या शिवउद्योग सेनेच्या वतीने अमिताभ बच्चन यांचा पुणे येथील गणेश कला क्रीडा मंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित केला असल्याची बातमी पेपरमध्ये माझ्या वाचण्यात आली. या कार्यक्रमाला जायचंच असा निश्चय करून माझे मित्र आणि आमच्या यादव- मोरे क्लासेसचे माझे सहकारी अजित यादव यांना गाडीवर बसवलं आणि माझ्या , पहिल्या कमाईवर मी स्वतः विकत घेतलेल्या नव्या बॉक्सर सिटी हंड्रेड MH११ N २७२९ वरून आम्ही पुणे गाठले. 

तो दिवस होता ११ नोव्हेंबर १९९८. सायंकाळी सहाच्या दरम्यान कार्यक्रम होता. तिथं माझा बालमित्र हणमंत काशिद अगोदरच पोहचला होता.आम्ही तिथे पोहोचेपर्यंत सर्व हॉल गच्च भरून वाहत होता. बाहेरही खूप गर्दी झाली होती. आत जायला जागाच उरली नव्हती. साडेपाच सहाच्या दरम्यान आमचे लाडके अमिताभ बच्चन आलिशान गाडीतून  उतरले आणि थेट हॉलमध्ये गेले. मी त्यांना  पाठमोरे पाहू शकलो. त्यांची ती पाठमोरी छबी आजही माझ्या नजरेत साठवली आहे. 

कार्यक्रम सुरू झाला. अमिताभ बच्चन यांनी 'मै ओर मेरी तनहाई' सादर केली. तसेच आयुष्यात घडलेले काही प्रसंग सांगताना सदैव पुढे चालत रहा असा संदेश देऊन उपस्थित युवकांना उर्जा दिली. बाहेर उभा राहून स्पिकरवरुन आम्ही कार्यक्रम ऐकला. त्या दिवशी पुण्यात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची बातमी पेपरमध्ये येणारच याची खात्री होती. त्यामुळे स्वारगेट स्टँडवर जाऊन पुढारी घेतला,तो अंक आजही माझ्या संग्रही आहे. पुढारीमध्ये अमिताभ बच्चन यांचे भाषण आले होते, जे मी ऐकले होते . काय होते त्या भाषणात? 

"मन का हो तो अच्छा, नहीं हो तो और भी अच्छा" अमिताभ बच्चन यांनी  त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन अमिताभजी तोंडून ऐकलेला हा दिव्य विचार मला खूप भावला. ''जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर ते खरंच चांगलं असतं पण दुर्दैवानं आपल्या मनासारखे झालं नाही तर ते त्याहुन अधिक चांगलं असतं. कारण जे आपल्या मनासारखं होत नाही, ते ईश्वराच्या मनासारखं असतं आणि ईश्वर कधीही कुणाचं वाईट करुच शकत नाही" 

बच्चन यांच्या वडिलांचा हा दिव्य विचार खुद्द बच्चन यांच्या तोंडून मी ऐकलेला आहे. हा विचार माझ्या मनावर त्या दिवसापासूनच इतका भिनला आहे की कधीही मला कोणत्याही अडचणी आल्या, कार्यालयीन, सामाजिक, वैयक्तिक असो किंवा कौटुंबिक असो मी हे वाक्य डोळ्यासमोर घेतो आणि मला प्रश्नांची उत्तरे मिळतात. 

१९९८ साली पाठमोरा पाहिलेला तो अमिताभ बच्चन माझ्या आजही आठवणीत आहे मात्र त्या कार्यक्रमात दिलेल्या तो संदेश माझ्या मनावर खूप बिंबलेला आहे.

सतीश वसंतराव मोरे
९८८११९१३०२
मी अमिताभ बच्चन प्रेमी.
११.१०.२०२०

अज्ञात शेठ


सलाम अज्ञात शेठ यांच्या दातृत्वाला !

*"स्वतः साठी कधी कुणाच्या दारात हात पसरायला जाऊ नका. समाजातील दीन दुबळे आणि गरीबांसाठी, अनाथांसाठी, होतकरू लोकांसाठी कुणाच्याही दारात कधीही जा. दुसऱ्यांसाठी मागायला गेला तर देणारा पण विचार करतो, हा समाजासाठी मागायला आला आहे आणि तुम्हाला भरभरून मिळतं "* असं माझ्या मुलीला मी हे नेहमी सांगत असतो.‌ याच निसर्गाच्या नियमानुसार मी चालायचा प्रयत्न करतो आणि मला नेहमी मदतीला अनेक हात धावून येतात. याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.

आज आपल्या ३६५ मानवतेचे सेवेकरी या समुहावर एक मेसेज पडला. जिजाऊ अनाथ आश्रमाचे समीर नदाफ यांनी हा मेसेज टाकला. आश्रमातील ३५ मुलांचे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनची गरज आहे असा आशयाचा हा मेसेज होता. आमच्या ग्रुप वरील सर्व सेवेकरी मंडळींनी याबाबत काय करावे असा विचार सुरू केला. मी पण याबाबत विचार केला की कुणाला वॉशिंग मशीन मागू शकतो. सहज कराडातील अज्ञात शेठना फोन केला आणि त्यांना ही अडचण सांगितली . 

अज्ञात शेठ यांच्या दुकानात सर्व कंपन्यांचे वॉशिंग मशीन आहेत .एखाद्या कंपनीकडून सामाजिक उतराई निधीतून अशा प्रकारे वॉशिंग मशीन देता येईल का? असे मी त्यांना विचारले.यावर त्यांनी एक मिनिटात कसलाही विचार न करता कंपनीकडून काय देता येईल मला माहित नाही पण मी माझ्या वतीने ही वॉशिंग मशीन देऊ इच्छितो असे सांगितले. 

जगात असे लोक आहेत यावर विश्वास बसत नाही पण जगात अज्ञात शेठ यांच्या सारखे चांगले लोक खुप आहेत, हे पटलं. एक दोन दिवसात आम्ही दोघे स्वतः जाऊन जिजाऊ अनाथ आश्रमाला वाॅशिंग मशीन देणार आहोत. 

 *महत्त्वाचे.* .. वाशिंग मशिन दिल्याबद्दल माझे कुठेही नाव घेऊ  नका, अशी विनंती त्यांनी मला केली. अचंबित होऊन मी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले, *मी जे दिलं आहे ते मला आणि माझ्या देवाला माहीत आहे,काय गरज आहे जगाला हे सगळं सांगायची ?*

मी निशब्द झालो. डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि सहज एक वाक्य बाहेर पडलं, 'देवा, परमेश्वरा,अल्लाह या अज्ञात शेठचं भलं कर, कल्याण कर ! '

*@ सतीश मोरे सतिताभ*
 9881191302

०७ ऑगस्ट २०२३

डोक्यावर कितीही ओझं असू दे मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे




डोक्यावर कितीही ओझं असू दे, 
फक्त मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे. 
सारं ओझं हलकं होतं. 
समस्या पुर्ण कधीच संपत नाहीत 
पण मित्र भेटला की मार्ग मात्र नक्की निघतो.

तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल. मी तर अनेकदा या अनुभवातून जातो. सोबत दिलेला फोटो पहा दोघी मैत्रिणी भेटल्या आहेत, दोघींच्याही डोक्यावर ओझं आहे मात्र यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत. ओझं असुनही गप्पा काही संपत नाहीत. कारण मैत्रीण भेटल्यानंतर आपल्या डोक्यावर असलेले वजन ओझं वाटतच नाही.

परवा माझा शिकवणीमधला मित्र भगवान भेटला होता. दोघांनी करवडीजवळ मावळा धाबा येथे जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. दरम्यान दुसरा एक मित्र श्रीधरला फोन लावला, स्पीकर लावून जवळजवळ आम्ही दिड तास बोललो .दोघे समोरासमोर होतो तर तिसरा सातारा मध्ये होता. मात्र ज्या गप्पा झाल्या त्यातून आनंद तर मिळालाच, उर्जाही मिळाली.

आम्ही तिघांनी आता पन्नासी गाठली आहे, तिघांचं कामाचं स्वरूप क्षेत्र वेगवेगळे आहे. तिघांच्या अडचणी आणि समस्याही वेगवेगळ्या आहेत. माझ्या व्यवसायातील समस्या ते सोडवू शकत नाहीत, त्यांच्या मी सोडवू शकत नाही. मात्र आम्ही भेटल्यानंतर या समस्यावर, मुला मुलींच्या शिक्षणावर चर्चा करतो आणि काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो. 

मित्रासोबत बोलल्यानंतर आनंद मिळतो, मन मोकळं होतं. मित्र असतातच रिलीज होण्यासाठी ! ज्याला चांगले मित्र आहेत तो कधीही डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही, वाईट काम करू शकत नाही, संकटाला खचून जाऊन आत्महत्या करू शकत नाही. किंबहुना तशी वेळ येऊ नये म्हणून सतत मित्रांच्या सोबत राहत जा. मित्र भेटले की त्याच्याजवळ रिलीज व्हा. जे चाललंय ते सांगा, जे हवं आहे ते सांगा. काय मार्ग निघतोय का बघा. मित्र नक्की मार्ग काढतात. आपल्या डोक्यावरचे ओझं हलकं झालं की खूप बरं वाटतं. आणि हो फक्त अडचणी आणि कामाचीच चर्चा करू नका. जरा आठवणीच्या हिंदोळ्यावर जा. शाळा कॉलेजमधल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचा विषय काढा, लहानपणी केलेल्या खोड्यांना उजाळा द्या, शाळा बुडवून केलेल्या करामतीचा विषय काढा. बालपणीचा काळ अजूनही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे,असतो. मित्र सोबत असला की सारं काही मिळवता येतो, गेलेलं सुद्धा पुन्हा मिळवता येते. 

आज मैत्री दिनाच्या निमित्ताने मिरज, वडूज, सातारा येथून तिघेजण एकत्र आलो आहे. चौघांनी मिळून घरात स्वयंपाक केला आहे, आता जेवायला बसणार आहे. जेवण झाल्यावर भांडीही चौघेच घासणार आहे. ऐसी खुशी और कहा ! मेरी दोस्ती मेरा प्यार!

जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

सतीश वसंतराव मोरे सतिताभ
०६.०८.२०२३

२६ जुलै २०२३

पाऊस आणि ती दोघं


*मनात असलेलं प्रेम आणि ओठांवर आलेलं हास्य लपवून ठेवता येत नाही. ते व्यक्त केलं नाही तरी ते प्रकट हौतंच. तुम्ही जरी ते दाबून ठेवले तरी ते डोळ्यात उतरतंच.* डोळे कधी खोटं बोलत नाहीत. मग डोळे खुप सांगून जातात. अशा वेळी जर पाऊस आला आणि दोघांमध्ये एकच छत्री असेल तर ! एकाच छत्रीत ती दोघ एकत्र चालतात, पाऊस बरसत राहतो. काय बोलायचं हे ओठांवर येत नाही. चालता चालता मग हळूवार स्पर्श होतो. ती लाजरीबोजरी होतं. तो बावरा होतो. प्रेमाची भावनाच खूप काही सुखावून जाते. 

काला पत्थर या चित्रपटातील गाण्याचा हा सीन. साहीर लुधीयानवी यांचं गाणंपण तितकेच दमदार. 'इश्क और मिश्क छुप ना पाये' आणि महेंद्र कपूर यांचा पहाडी आवाज.  हे ऐकताना जे सुचलं ते असं....

अबोला संपेना 
अन् पाऊसही थांबेना,
हृदयातील प्रीती ओठावर येईना !
ओल्याचिंब भावनांना,
डोळ्यात साठवताना,
जलधारा बरसत राहील्या ,
जलधारा बरसत राहील्या !

 *सतिताभ* 
२६.०७.२०२३

१८ जून २०२३

आज खुश तो बहोत होंगे तुम ? देवाशी भांडण नव्हे... स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !

आज खुश तो बहोत होंगे तुम ?

देवाशी भांडण नव्हे... 
स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !


आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा सारं काही संपल्यासारखं वाटतं. कोणीही मदतीला येत नाही किंवा आलं तरी त्यांचे प्रयत्न, मदत तोकडी असते. मनुष्य हतबल होऊन जातो. काय करावं सुचत नाही. सर्व पर्याय संपतात. सर्व वाटा बंद होतात. कुणाकडं जावं हेच कळतं नाही. ज्यांना आपण जवळचं मानलेलं असतं त्यांनीच आपल्याला संकटात आणून आपल्याकडं तोंड फिरवलेलं असतं. अशा वेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे देव, देव्हारा, देऊळ !

देव कुठं असतो, तो तर आपल्यातंच असतो. पण तो दिसत नाही. आपल्यात असलेल्या देवाशी भांडायच तर मग आपणच स्वतः आरशासमोर उभे राहून बोलत बसलं पाहिजे किंवा देवळात तरी जायला पाहिजे. आरशासमोर उभे राहून बोलत बसलो तर पाहणारे लोक वेडं म्हणतील. असा विचार करून मग तो देवळात जातो. खरं तर देवळाबाहेर असणाऱ्या काही मनुष्यरूपी देवानींच त्याला फसवलेलं असतं, तोंड फिरवलेलं असतं. मग देवळातील देवाशी तो संवाद साधण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी गाभाऱ्यात प्रवेश करतो . खरं तर देवाशी त्याचं भांडण असतं, देवानं कुठे माझं चांगलं केलं आहे असा विचार करून म्हणून तो याअगोदर कधीच तिकडं फिरकलेला नसतो. देवाशिवाय सारं काही शक्य होईल, असा त्यांचा भ्रम झालेला असतो. पण वेळंच अशी येते त्याला देवळात जावं लागतं.

देवळात गेल्यावर इतक्या दिवस त्याच्या मनात साचलेलं सारं काही बाहेर पडतं. सगळं काही चांगलं करूनही देवांनं माझ्याशी असं का केलं? माझ्या भावनांशी खेळ का केला? असं का केलं, असा प्रश्न त्याच्या मनात आल्यामुळे तो देवाशी थेट भांडायला सुरुवात करतो. 

देवाला अरं तुरं करतो, जणू काही देव त्याचा जवळचा खास मित्र आहे, घरगडीच आहे. खरं तर त्या देवाला त्यांनं कधी मानलेलं नसतं. मात्र यावेळी तो लाडाने नव्हे रागाने देवाशी भांडतो आणि सुरुवात होतो देवाशी संवाद, 'आज खुश तो बहुत होगे तुम ?' माझ्या आयुष्यात एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्या तरीही मी तुझ्या मंदिरात आलो नाही, तुझी पायरी चढलो नाही. पण आज तू तशी वेळ आणलीस. मला तुझ्या मंदिरात यावं लागलं. तुला बरं वाटत असेल ना ? तुला उकळ्या फुटत असतील ना? कसं झुकवलं याला!कसा नांगा जिरवला यांचा, कशी खोडी मोडली यांची ! अशा द्वेषपूर्ण शब्दांत तो भांडायला सुरुवात करतो.

देवाशी एकेरी बोलण्यात त्याला काही वाटत नाही. अनेक संतांनी देवाशी अशाच प्रकारे एकेरी भाषेत संवाद साधला आहे. देव ही गोष्ट अशी आहे जी आपल्यातंच असते, त्यामुळे तो आपल्या जवळचाच असतो. त्यामुळे त्याच्याशी आपण आपल्या जवळची व्यक्ती म्हणून,आपला धाकटा भाऊ, आपला मित्र म्हणून आपला सखा म्हणून भांडू शकतो आणि तोही हेच करतो. आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना देवासमोर मांडतो. खरंतर देवाला हे सारं माहीत असतं. मात्र तरीही तो रागाने, मोठ्या आवाजात देवाला सगळं सांगत राहतो, सांगत राहतो, सांगत राहतो! हे देवाशी भांडण नव्हे स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् एक संवाद आहे !

'दीवार' चित्रपटातील हा प्रसंग आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी आला असेल, येत राहील. असा प्रसंग आल्यानंतर आपण स्वतःची भांडतो म्हणजेच देवाची भांडतो. आपण केलेल्या चुका आपल्याला कळू लागतात. आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला फसवलेलं आपल्याला उमगायला लागतं. आपण हे असं करायला पाहिजे होतं, तसं नको करायला पाहिजे होतं, याचीही आपणाला जाणीव होती. स्वतःने, स्वतःशी, स्वइच्छेने देवासमोर साधलेला संवाद 'दीवार' चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तो संवाद होण्याची गरज आहे. 

खरंच स्वतःशी बोलल्यानंतर अनेक प्रश्नांना उत्तर मिळतात. आपलं अंतर्मन हाच आपल्यात वसलेला देव असतो. तो कधीही आपल्याला वाईट करू देत नाही. तो देव आपल्याला चांगल्या वाटा दाखवत असतो. फक्त आपल्याला त्या देवाशी, अंतर्मनाशी संवाद साधायला हवा. देवळात जाऊन जाऊन देवाची भांडण करणं, त्याला आपल्या तक्रारी सांगणे, त्याला नवस करून लाच देणे कधीही चांगलं, मात्र कधीतरी आपण आपल्या स्वतःची भांडलो तरीसुद्धा आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळू शकतात.. उत्तर मिळू शकतात.. !

जय बच्चन..जय बच्चन !

#Deewar  
#amitabhbachchanpremi 

Amitabh Bachchan 
Amitabh Bachchan Fans Club India 
AMITABH BACHCHAN FAN$ CLUB 
Bachchanvede Kolhapuri 
Amitabh Bachchan = The Great

३० मे २०२३

नाती आणि नोटा


नोटा असत्या तर बदलल्या असत्या ,
इथं नातीच बदलली आहेत !
मग आम्ही काय बदलायचं ?
स्वतःला सावरायचं की आपणही बदलायचं ?
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

नोटांना 'मर्यादा' असते,
नात्यांमध्ये 'अमर्याद' प्रेम असते,
नात्यांना 'किंमत' असते,
तर नोटांना 'भाव' असतो..
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

नात्यांच्या याचिकेत अनेकदा नोटा जिंकतात.. 
गुळगुळीत नाण्याप्रमाणे नातीही बदलतात ,
नात्यांतील गोडव्यापुढं नोटा भारी पडतात..  
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

सतिताभ
३०.०५.२०२३. सुप्रभात 🌹

११ मे २०२३

न्यायालयावर सामाजिक दबाव येतो....


गेल्या पंचवीस वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात काम करत आहे. यापैकी सुरुवातीची दोन वर्षे लोकमत मध्ये आणि त्यानंतर सलग 22 वर्षे दैनिक पुढारी मध्ये काम करत आहे. येणाऱ्या जुलै महिन्यात माझ्या पत्रकारीतेची 25 वर्षे पूर्ण होत आहेत. याबाबत मी सविस्तर नंतर लिहिणारच आहे. मात्र आज हे सांगण्याचे कारण सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर झालेला निकाल हा संदर्भ आहे. 

2001 साली जेव्हा दैनिक पुढारी मध्ये कामाला लागलो. त्यानंतर पुढच्या दहा वर्षात कोणत्या बीटमध्ये काम केलं नाही असा एकही बीट शिल्लक राहिलेला नाही. यापैकी अतिशय आवडता आणि ज्ञानात भर घालणारा बीट म्हणजे कोर्ट बीट. पंचायत समिती,एसटी स्टँड,सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,पोलीस स्टेशन, एक्साईज, तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यासह राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक कुठलाही बीट असो दिवसभर या बीटचं काम एकाच वार्ताहराला करायला लागायचं. यातच भर पडायची ती म्हणजे कोर्ट बीटची. त्यावेळी कराडला जिल्हा सत्र न्यायालयाची मान्यता मिळाली आणि ते न्यायालय मार्केट यार्ड मधील नगरपालिकेच्या सुपर मार्केट सुरू झाले.

या न्यायालयात आठवड्यात एखादा निकाल लागायचा. बलात्कार किंवा खून प्रकरणात निकालाची प्रतिक्षा आणि उत्कंठा असायची. कराड उपजिल्हा सत्र न्यायालयात एम.जी .कागणे नावाचे कोर्ट होतं. अतिशय कडक आणि न्यायप्रिय असे हे कोर्ट होतं. या कोर्टामध्ये एखादी केस केली तर हमखास शिक्षा लागायची अशी या कोर्टाची एक वेगळी खासियत होती. याच न्यायालयात 2002 च्या दरम्यान अतिशय गाजलेल्या असा एक खटला सुरू झाला. तो होता अतिरेकी पलायन खटला. खलिस्तानवादी सहा अतिरेकी मालखेड जवळ पोलिसांच्या गाडीतून पळून गेले होते. ते कराड तालुका पोलिसांनी पकडले होते. त्यांना पकडून त्यांच्यावर कराड न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले आणि या खटल्याचे काम एम .जी. कागणे यांच्या समोर सुरू झाले. यानिमित्ताने आम्ही कराड शहरातील सर्व प्रमुख पत्रकार रोज या खटल्याचे वार्तांकन करण्यासाठी न्यायालयात जात असू. न्यायाधीश एम.जी कागणे आणि पत्रकारांचे अतिशय प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. ते अतिशय कडक न्यायाधीश होतं मात्र कोर्टात पत्रकार नसतील तर आज पत्रकार का आले नाहीत असे ते आपुलकीने चौकशी करायचे. यांच्या न्यायालयाने अतिरेकी पलायन खटल्यातील सर्व आरोपींना शिक्षा दिली होती. या अतिरेकी आरोपींच्याकडे बघण्याची पण आम्हाला भीती वाटायची.

याच न्यायालयास कराडचे लोकप्रिय नगराध्यक्ष जयवंतराव जाधव यांच्या खून खटल्याची सुनावणी झाली. जयवंतराव जाधव खुन खटल्याबाबत केवळ कराड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता होती. या खून खटल्यातील रोजची सुनावणी जशीच्या तशी दैनिक पुढारीमध्ये आम्ही प्रसिद्ध करत होतो. सुमारे सहा महिने या खटल्याचे कामकाज सुरू होते. या निमित्ताने जिल्हा सरकारी वकील, आरोपीचे वकील, साक्षीदार एवढेच काय आरोपींचीही आमची ओळख झालेली होती. सातारचे प्रसिद्ध डि. व्ही. पाटील , मुल्ला साहेब, श्यामाप्रसाद बेगमपुरे, पवार वकील या सर्वांची न्यायालयातील जुगलबंदी आम्हाला अजूनही आठवते. त्यानंतर नरेश मस्के अपहरण आणि खून प्रकरण खटला येथेच चालले. तसेच पैलवान संजय पाटील खून खटल्याचे सुनावणीचे कामकाज काही काळ या न्यायालयात झालं. नरेश मस्के खून खटला प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यावेळी प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची नेमणूक सरकारने केली होती. उज्वल निकम सर न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर पत्रकारांना बोलवून सर्व मुद्दे आम्हाला समजावून सांगायचे. या सर्व खटल्याचे सुनावणीचे वार्तांकन माझ्या काळातील आणि आता सीनियर वार्ताहरांनी त्यावेळी केले होते. 

हे सर्व सांगण्याचे कारण न्यायालयाचे कामकाज कशाप्रकारे चालते, न्यायालय कशाप्रकारे निकाल देते, याचा मला आलेला अनुभव, मी केलेली निरीक्षणं तुम्हाला सांगणे तेवढाच आहे. कोणताही खटला जेव्हा कोर्टासमोर येतो तेव्हा न्यायालय समोर आलेले पुरावे पाहून निर्णय देते, ही झाली एक बाजू. मात्र अनेकदा हे पुरावे खरे खोटे असू शकतात. हे पुरावे सरकारी वकील मांडतात तर आरोपीचे वकील दुसरे पुरावे सादर करू शकतात. अशा परिस्थितीत निकाल देताना अनुभव आणि दीर्घ अभ्यासाच्या जोरावर न्यायाधीश निकाल देत असतात. मात्र या मी अभ्यासलेल्या वरील खटल्याचा अभ्यास करता किंवा संदर्भ देऊन मला एक गोष्ट सांगावी वाटते, ती म्हणजे न्यायालय फक्त पुरावे पाहून निकाल देत असतात असे नव्हे तर एखाद्या खटल्या विषयी, गुन्ह्याविषयी समाजात निर्माण झालेली अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती याचाही न्यायालय अभ्यास करत असतं. पुरावे खरे असले किंवा नसले, हे पुरावे कोर्टात टिकले किंवा नाही टिकले तरी एखाद्या खटल्या विषयी जनतेमध्ये उठाव झाला असेल तर न्यायालय समाजाचा विचार नक्की करते. एखाद्या प्रकरणाविषयी समाजात विरुद्ध वातावरण तयार झालेले असेल तर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम न्यायालयावर किंबहुना निकालावर होतो. याचा अर्थ न्यायालय समाज काहीही बोलतोय म्हणून निकाल देते असा नव्हे. मात्र सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक दबाव या दोन्ही गोष्टीचा न्यायालय नक्की विचार करते.

महाराष्ट्र शासनाच्या सत्ता संघर्षाबाबत लागलेल्या निकालावरून वरील माझे मत शंभर टक्के खरे आहे असे मला वाटते. महाराष्ट्र शासन सत्ता बदलाबाबत सुप्रीम कोर्टात गेल्या सहा महिन्यापासून युक्तिवाद सुरू आहे. 16 आमदार अपात्र आहेत का ? बहुमत चाचणी प्रक्रिया योग्य होती का? हे सरकार घटनाबाह्य आहे की ती कायदेशीर मार्गाने निर्माण झालेले आहे? याबाबत न्यायालयासमोर सुनावणी झाली. मात्र या दरम्यान जी सामाजिक परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाली, जे वातावरण निर्माण झाले, याचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर नक्कीच परिणाम आणि दबाव निर्माण झाला असावा. त्यामुळे हा निकाल देताना समतोल साधण्याचा न्यायालयाने प्रयत्न केला आहे असे एकूण दिसते. या निकालावरून सर्वांना खुश करून समाजालाही न्याय देवता किती खंबीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे असे मी धाडसाने म्हणेन. सामाजिक परिस्थिती आणि दबावामुळे किती परिणाम होतो याचे, हा निकाल उत्कृष्ट उदाहरण आहे.

०६ मार्च २०२३

बच्चन होणं इथं सोपं असतं!

बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

अमिताभ व्हायला,
सामोरे जावे लागते ..
संघर्षाला,संकटाला
अपयशाला,अपमानाला 
आजार आणि अपघाताला सुद्धा !
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

सातत्य, समग्र, समरस होऊन
नवीन काही तरी द्यावं लागतं,
अभिनय करता करता,
व्यक्तीमत्व होऊनच जगावं लागतं.
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

प्रसिद्धी,यश आणि वलयाचं
अमृत जिरवावं लागतं,
बदनामी, तिरस्कार आणि अपयशाचं
जहर तितकंच पचवायला लागतं !
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र 
रातंदीन झगडावं लागतं !

बच्चन होणं 
तर सहज असतं ,
मिरवायला थोडंच कष्ट लागतं?
बापझाद्याचं नाव घेऊन
सन्मानाचं दान इथं
सहज पदरी पडतं !
नाव कमवायला मात्र 
पदोपदी झगडावं लागतं !
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र 
रातंदीन झगडावं लागतं !

हुरळून जाऊन एका यशानं
प्रसिद्ध होणं सोपं असतं,
कौतुक अन् पुरस्काराने भाराऊन
एका रात्रीचा स्टार होणं 
फार अवघड नसतं,
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

@सतीश वसंतराव मोरे 
 सतिताभ
०६.०३.२०२३


१५ फेब्रुवारी २०२३

कमी मध्ये समाधान


'कमीमध्ये समाधान असतं'

बसमधून प्रवासाला निघालो आहे .खचाखच भरलेल्या एसटी बसमध्ये आपणास कसातरी प्रवेश मिळतो. 'ओ जरा पुढे सरका की' म्हणत कशीबशी उभे रहायला जागा मिळते. लोखंडी पाईपला टेकायला मिळतं,थोडा आराम मिळतो. प्रवास सुरू होतो. शेजारच्या बाकड्यावर तिघेजण बसलेले असतात. कडेच्या व्यक्तीला आपण विनंती करतो 'पाव्हणं जरा सरा की '. आपण जणू त्याची प्रॉपर्टी लिहून मागितली आहे असे वाटून तो थोडं तोंड वाकड करतो, जरा सरतो. त्या कोपऱ्यावरील जागेवर आपण अंग चोरुन कसंबसं बसतो. त्या छोट्याशा जागेतही शरीराला आणि मनाला हायसं वाटतं. बस पुढे धावत असते. दुपारची वेळ असल्यामुळे थोडी डुलकी लागते. कमी जागा असूनही आपण त्या जागेत ऍडजेस्ट होऊन आरामात प्रवास करतो. पुढे हळूहळू एसटीतील गर्दी कमी होत जाते. एक एक करून प्रवासी उतरू लागतात.आता त्या बाकड्यावर आपण फक्त एकटेच राहतो. संपूर्ण बाकडं आपल्यासाठी रिकामं असते, प्रवास पण अजून बाकी असतो. मात्र त्या बाकडयावर आपल्याला पडावं वाटत नाही, पडलो तरी झोप लागत नाही. याचं कारण शोधलं तर एक लक्षात येईल की ' उपलब्धता कमी असते तेव्हा त्यामध्येही समाधान असतं '. आपल्या गरजा जेव्हा मर्यादित असतात तेव्हा आपल्या आपण आहे त्यात ऍडजेस्ट करून घेत असतो. जेव्हा त्या गरजा पुऱ्या होतात तेव्हा आपण ऍडजेस्ट न करता 'कुछ और' च्या नशेत आणखी सुख शोधायला लागतो आणि ते तिथं मिळत नाही. कमी मध्ये समाधान असतं, हा मंत्र कायम लक्षात ठेवा. अनेक अनुभव आले आहेत, तुम्हालाही आले असतील!

सतीश वसंतराव मोरे सतिताभ
१५.०२.२०२३..शिर्डी प्रवासात

२८ जानेवारी २०२३

साद देत नाही

मी सर्वांच्या मदतीला धावून जातो, 
मात्र माझ्या कामाला कोणी येत नाही,
अशी भावना अनेकदा प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. 
मग आपण त्रागा करून घेतो. 
मी त्यांच्याकडे अपेक्षाच का धरली असं वाटू लागतं.
पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्यावर येते. 
आणि मग सहज जी प्रतिक्रिया उमटते ती अशी असते... ..सतिताभ 

११ जानेवारी २०२३

यात भिती कसली?


यात भिती कसली* ?

आयुष्यात अनेक चुका होतात, काही चुका सहज होतात तर काही चुका जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने होतात. काही चुका नकळत होतात तर काही कळत. कधीकधी पुढे काय होणार आहे याची जाणीव असूनही चुक केली जाते. ती चुक होत नसते तर केलेली असते. अशा चुकांमुळे शेवट निराशाजनक किंवा दुर्दैवी होतो. अशा वेळी निराश नाही व्हायचं कारण आपण स्वतः ते संकट ओढवून घेतलेलं असतं, आपण स्वतःच खड्डा खोदलेला असतो. मग स्वतःच खोदलेल्या खड्डयात पडायची कसली भिती? पडलो आहे तर पडलो, ते स्वीकारुया आणि यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग पण आपणच शोधू असा विचार करता करता आणि मग हे सुचलं. ⬆️⬇️

 *सतीश मोरे सतिताभ* 
    ११.०१.२०२२

०४ जानेवारी २०२३

आवडते त्याच ट्रेनमध्ये बसा !



तुम्हाला एखादं काम आवडतं नसेल तर ते तुम्ही करता कामा नये. ज्या विषयात रस आहे तेच काम केलं तर ते मनापासून होतं. तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची, नोकरी करण्याची संधी मिळाली. 

आपले इंटरेस्ट कशात आहेत ते तुमचं तुम्ही ओळखा. नोकरी करायची इच्छा असलेला माणुस व्यवसाय करू लागला तर तो आठ तासच करतो. याउलट व्यवसायात रस असलेला व्यक्ती चुकून नोकरीत पडला तर तो तिथेही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करतो, सर्वांची मने जिंकतो मात्र तो तिथे फार काळ रमत नाही. 

सदगुरु वामनराव पै म्हणतात, तुम्हाला पुण्याला जायचं आहे आणि तुम्ही कोल्हापूरला जाणाऱ्या गाडीत बसला तर तुम्ही पुण्याला पोहोचू शकणार नाही किंवा लांब मार्गाने खूप उशिरा पोहोचणार. त्यासाठी पुण्याला जायचं असेल तर पुण्याला जाणाऱ्या एसटीतच बसले पाहिजे, ती एसटी तुम्हाला थेट पुण्याला नेऊ शकते. तुम्हाला हवं त्या मार्गाला जायचं असेल तर त्यादिशेकडेच पाहिलं पाहिजे आणि त्यावरच आपल्या लक्ष केंद्रित केले पाहिजे

म्हणून शक्यतो आवडीचे काम निवडा, शाखा निवडा. त्यातच करीयर करा. ज्या गावाला जायचं नाही त्या गाडीत बसायचं नाही या आशयाचं मेरीमी विलिंमसन यांचं एक इंग्रजी सुवचन आहे, If a train doesn't stop at your station, it is not your train. त्यामुळे तुम्हाला आवडते त्याच ट्रेनमध्ये बसा. 

सतीश मोरे सतिताभ
०४.०१.२०२३

०३ जानेवारी २०२३

व्यक्त व्हा पण कुठेही नको !


आपल्या अडचणी किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी कोणीतरी एक हवा असतो, त्याचा आपण शोधही घेत असतो. आजच्या काळात आपलं मन मोकळं करण्यासाठी असा एखादा व्यक्ती शोधताना मात्र काळजी घ्यायला हवी. 

जो कोणी आपल्या अडचणी सोडवू शकतो, ज्याला आपल्या समस्यांवर उपाय माहित आहे किंवा जो कोणी आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो आणि आपण त्याला शेअर केलेलं त्यांच्या पुरतेच ठेवेल, अशाच व्यक्ती समोर व्यक्त व्हा. अन्यथा कुठेही मन मोकळं करू नका. कारण अनेक जण तुमच्या दुःखाचा बाजार करायला बसले आहेत. 

दुःख आणि समस्या व्यक्त करण्यासाठी एक तात्पुरता पण रामबाण उपाय आहे, तो म्हणजे स्वतःला छंदाच्या 'वेडा'त बांधून ठेवणं. मस्त पैकी गाणी ऐकणं, गाणी म्हणणं,सिनेमा पाहणं किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन एकटं राहणं. दोन तीन तासांच्या चित्रपटात तुम्ही जग पाहून तर येताच, दुःखही विसरता, काही क्षण हसताही. चित्रपटातील 'जब तक जिंदगी है, तब तक मरना नहीं ' या सारखा एखादा संवाद तुम्हाला मार्गही दाखवेल. निसर्ग तर तुम्हाला खुप काही शिकवतो. फुले हसायला शिकवतील, झाडं द्यायला, नद्या सतत प्रवाही रहायला तर डोंगर उंच स्वप्न पहायला. प्राणी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला. तर मग करा एकदा प्रयत्न ! 

सतीश वसंतराव मोरे
०३.०१.२०२३

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...