फॉलोअर

१० जुलै २०२१

सुपनेला जाण्यासाठी

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१० जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारीला जाण्यासाठी पावणेसहा वाजता कृष्णा नाक्यावर जमलो,या ठिकाणी सायकलवरून अकरा मारुती पैकी सात मारुती करण्यासाठी निघालेले आमचे गावचे फौजी (निवृत्त) शशिकांत कुंभार भेटले. कराड अर्बन बॅंकेचे मुख्य टेलिफोन ऑपरेटर शशिकांत कुंभार यांच्याविषयी एक दिवस स्वतंत्र लिहीणार आहे. आज एक गोष्ट सांगतो, मिलिटरीमध्ये असताना बॉम्बचा स्फोट होऊन त्यांना एक पाय गमवावा लागला होता. मात्र त्यानंतर कृत्रिम पाय बसवून गेल्या अनेक वर्षापासून ते आनंदी जीवन जगत आहेत. एका पायात कृत्रिम पाय असूनही ते पुराच्या पाण्यात पोहतात. कृत्रिम पाय लावून ते रोज सुमारे 15 ते 20 किमी सायकल प्रवास करतात.अशा या फौजीला आणि त्याच्या जिद्दीला सलाम. आज ते आणि त्याचे सहकारी कराड ,शहापूर,मसूर,उंब्रज, माझगाव,चाफळ ते शिंगणवाडी असे सात मारुती सायकलवरून करणार होते, त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देऊन आज आमचा प्रवास सुरु केला.
सुपनेला जाण्यासाठी आरटीओ ऑफिस समोर जमलो. या ठिकाणी सुपनेचे प्रकाश आकाराम पाटील आम्हाला येऊन मिळाले आणि त्यांच्यासोबत आम्ही जायला निघालो. सुपने हे गाव गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कराड पासून जवळच आहे, हरिपाठ करत आम्ही दहाच मिनिटात सुपने फाट्यावर पोहोचलो.१९७६ साली आलेला पूर आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती याचा विचार करून वारुंजी प्रमाणे सुपने हे गाव सुद्धा नदीपासून वर रस्त्याकडेला पुनर्वसित केले आहे. जुनं आणि नवीन सुपने असे दोन भाग आहेत.नवीन सुपने मध्ये आम्ही प्रवेश केला. भव्य ६० फुटी रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय नियोजनबद्ध प्लॉटिंग, सुंदर घरे, बंगले तसेच रस्त्याच्या मध्यभागी असणारे डिव्हायडर या मधून आम्ही पुढे जात होतो. गाव पार करून आम्ही गावाच्या बाहेर आलो आणि जुन्या सुपने दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. हा रस्ता ऊस शेतीतून जातो. हाच रस्ता पुढे किरपे गावाला जाऊन मिळतो आणि आणि पुढे घारेवाडीला जाऊन ढेबेवाडी रस्त्याला मिळतो. सुपने ते किरपे दरम्यान कोयना नदीवर अतिशय भव्यदिव्य असा पूल बांधण्यात आला आहे, हा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
या रस्त्यावर आम्हाला ग्रामस्थ आणि वारकरी माळकरी भेटले. या लोकांचा सकाळचा नित्यक्रम आणि चालणे सुरू होते. राम कृष्ण हरी म्हणून आम्ही सर्वांना नमस्कार केला, त्यांनीही तितक्याच प्रेमभावनेने आम्हाला राम कृष्ण हरी नमस्कार केला. राम कृष्ण हरी या शब्दाची जादूच वेगळी आहे. हाय-हॅलो पेक्षा राम कृष्ण हरी, राम राम, नमस्कार या शब्दांत जो आदर आपुलकी आणि जिव्हाळा आहे तो जगातल्या कुठल्याही भाषेत असेल असे वाटत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच शिवारात हिरवीगार शेती पाहून 'शेतात उन नसतं' हे ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांचे वाक्य आठवलं.
सुपने तसेच केसे पाडळी, खोडशी,येरवळे या गावात एके काळी सुमारे शंभर गुऱ्हाळे होती. एकट्या सुपने गावात एकवीस गुऱ्हाळे होती. आता यापैकी 16 गुऱ्हाळे सुरू आहेत. गुऱ्हाळाचे गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल पण या गावात गुळाचा कारखाना आहे. आपण साखर कारखाना पहिला असेल. पण व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात चालविण्यात येणारा गुळाचा कारखाना रस्त्याकडेला आम्हाला पाहायला मिळाला. सध्या गुळाचा सिजन नसल्यामुळे सर्व गुऱ्हाळे बंद होती. या गावातून एके काळी कोकणात गुळ जात असे. चिपळूण पर्यंत बैलगाड्यातून गुळ जात असे, पंधरा-वीस बैलगाड्या एकत्रितपणे कोयना नगर मार्गे पुढे चिपळूणचा घाटातून खाली उतरायच्या. येताना तेथून आंबे, किराणा किंवा इतर माल घेऊन यायचा,अशी पद्धत होती.
सुपने गाव राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असे गाव आहे. या गावात अनेक मोठे नेते होऊन गेले. दिवंगत माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत आकाराम पाटील याच गावचे. पूर्वी हे गाव उंब्रज जिल्हा परिषदेला जोडलेले होते. अनेक राजकीय घडामोडी आणि राजकीय स्थित्यंतराचे हे गाव साक्षीदार आहे.
सुपने हे नाव कसे पडले याबाबत आख्यायिका प्रसिद्ध आहेत. लक्ष्मणाने शुपर्णका राक्षक्षिणीचे नाक कापले, तिचा वध केला. या राक्षसीनीने सुपने जवळच्या एका डोहात जाऊन रक्ताने माखलेले नाक आणि तोंड धुतले. हा परिसर जोमलिंग मंदीर जवळ आहे. येथे नाक धुतले म्हणून अजूनही या भागात नकटे मासे सापडतात.शुपर्णिकीचे नाक कापल्याने रक्त आल्यामुळे याच परिसरात तिच्या अंगावर सगळे रक्त शिंपले होते. शिंपलेचे पुढे अपभ्रंश होऊन सुपने असे नाव पडले आहे, असे या ठिकाणचे लोक सांगतात. महाकाय रासक्षिणीला मारून टाकल्यानंतर तिचे दोन स्तन दूर पडले,स्तनाच्या आकाराचे दोन डोंगर या गावापासून जवळच आहेत.
आम्ही पुढे अगदी जुन्या सुपने गावात पोहोचलो. गावात प्रवेश करताच अनेक पडलेले वाडे पाहून या गावाची भव्यता लक्षात आली. या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे,त्याचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी श्री रामप्रभूच्या मांडीवर बसलेली सीतामाई अशी एक मूर्ती आहे. रामाच्या मांडीवर बसलेली सीता अशी मूर्ती कुठेही पाहायला मिळत नाही. फक्त येथेच आहे, असे प्रकाश पाटील यांनी आम्हाला सांगितले. या मंदिराच्या जिर्णोद्धारावेळी या मूर्तीच्या जवळ हनुमानाच्या रूपात अनेक माकडे येऊन बसली होती अशी आठवण आम्हाला त्यांनी सांगितली.
पुढे गावातील प्राचीन सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहचलो, मंदिरामधील महादेवाचे लिंग खुप मोठ्ठे, आकर्षक आहे. या मंदिराचे अवशेष पाहिल्यानंतर हे गाव किती प्राचीन आहे याची जाणीव झाली. मंदिरासमोरची दीपमाळ अतिशय सुंदर आहे. मंदिरासमोर एक पार आणि उंच पिंपळाचे झाड आहे. पारावर ,1832 (सन 1920) असा उल्लेख आहे. या पाराला १९७६ च्या पुराचे पाणी लागले होते.जिथे पाणी लागले होते तिथे एक खिळा मारून ठेवला होता मात्र तो आता खाली पडला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पारा शेजारीच पालखी ठेवण्यासाठी एक विसावा दगडी कट्टा आहे. हा कट्टा खूप जुना आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार 1972 साली झाला होता, या वेळी ग्रामस्थांनी देणगी दिल्याचा एक फलक या ठिकाणी अजूनही आहे. 2 रुपये पासून 201 रुपये पर्यंत देणगी दिल्याचा याठिकाणी उल्लेख आहे.
महादेव मंदिरा शेजारीच ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. या दोन्ही मंदिरात दर्शन घेऊन आम्ही मधल्या रस्त्याने नावजी महाराज मठाकडे निघालो. या मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. हे वृक्ष संभाळण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे. या रस्त्याला आम्हाला एक जुने पेव पाहायला मिळाले. तेथून पुढे आम्ही नावजी नाथाच्या मठामध्ये आलो. मठाच्या परिसरात सुद्धा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. येथे आम्ही वडाची 2 झाडे वारकरी माऊलीच्या हस्ते लावली. या वारकऱ्यांनी ही झाडे आम्ही जगवणार, तुम्ही कधीपण झाडे पहायला या, असे सांगून आमच्या निसर्ग वारीचे कौतुक केले. वृक्षारोपण झाल्यानंतर आम्ही नावजी महाराज मठामध्ये आलो. नावजी महाराज हे फार मोठे संत होऊन गेले.महाराजांची याठिकाणी संजीवन समाधी आहे. लोकांची या महाराजांवर फार मोठी श्रद्धा आहे. ही नावजी महाराजांच्या कृपेने गावावर मोठे संकट कधी येत नाही ,अशी ग्रामस्थांची धारणा आहे. या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो.
समोर सायकलवरून तालुकाभर निसर्ग भटकंती करणारे उद्योजक विजय चव्हाण, प्राणजित पाटील आणि अमोल सुतार हे तिघे जण भेटले. कराडमध्ये अनेक सायकल ग्रुप आहेत. हे हौशी सायकलपटू रोज तालुकाभर सायकलवरून प्रवास करतात, आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटले. या सर्वांसोबत आम्ही प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी आलो. पाटील त्यांच्या घरातील भगीनींनी आमच्यासाठी स्वीट कॉर्न भजी चटणी तयार केली होती, हा माऊलीचा प्रसाद खाऊन आम्ही तृप्त झालो.परिसरातील उद्योगाची, गावाची माहिती घेतली आणि आम्ही परत निघालो.
वैयक्तिक आणि घरगुती कारणामुळे वेळ न मिळाल्यामुळे आज ब्लॉग लिहायला उशीर झाला. माऊलींच्या कृपेने आमची निसर्गवारी अत्यंत सुंदर पद्धतीने सुरू आहे,आपली कृपा आमच्यावर अशीच राहू देत ओ माऊली !
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...