फॉलोअर

२८ जून २०२६

गाणे फक्त ऐकायचे नसते... ते गायकाच्या हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे फक्त ऐकायचे नसते... 
ते हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे ऐकणे म्हणजे केवळ सुरांचा आनंद घेणे नव्हे. त्या गाण्यामागचा संगीतकार कोण, गीतकार कोण, गायक-गायिका कोण, ते कोणत्या चित्रपटातील आहे, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा माझ्यामध्ये अगदी लहानपणापासून होती. याच इच्छेतून गाण्यांचे रसग्रहण करण्याचा छंद जडला.

महाविद्यालयीन काळात, अकरावी-बारावीमध्ये आम्ही मित्रमंडळी चित्रपट पाहायला जात असू. चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर चर्चा केवळ कथानकावर नसायची. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण, निर्माता कोण, संगीतकार कोण, गीतकार कोण, संपादक कोण, गायक-गायिका कोण, यावर आमच्या गप्पा रंगायच्या. चित्रपटातील सर्व गाणी पाठ करणे, त्यांच्या कॅसेट्स विकत आणणे आणि त्यावरील प्रत्येक माहिती वाचून काढणे हा आमचा छंदच बनला होता.
आमच्या पाच-सहा मित्रांच्या ग्रुपमध्ये गाण्यांच्या अशा मैफिली रंगायच्या. एकजण निर्माता सांगायचा, दुसरा संगीतकार, तिसरा गायक, चौथा गीतकार... अशा खेळकर पद्धतीने आमचे चित्रपट आणि संगीताविषयीचे ज्ञान वाढत गेले. गाण्यांतील भाव, वेदना, आनंद, चाली आणि शब्द यांचा नकळत अभ्यास होत गेला.

गाण्याची आवड वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षापासून मनात रुजत गेली आणि कालांतराने ती अधिक प्रगल्भ होत गेली. मात्र, गाणे नेमके कसे ऐकावे? प्रत्येक शब्दाचा भाव गायक कसा पोहोचवतो? संगीतकार त्या शब्दांना सूरांचे कोंदण कसे चढवतो? एखादा शब्द फेकताना त्यामागील भावना कशा जिवंत होतात? एखादा कणस्वर हृदयातून उमटून श्रोत्यांच्या मनापर्यंत कसा पोहोचतो? याची खरी जाणीव मात्र मला नव्हती.ही उणीव भरून काढण्याचे काम प्रसिद्ध गायिका आणि गीतविश्लेषक मृदुला दाढे यांनी केले. त्यांच्या 'अमर लता' या कार्यक्रमाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास तीन तास चाललेला हा कार्यक्रम म्हणजे स्वर, शब्द आणि भावनांचा अद्भुत संगम होता. यापूर्वी अनेक उत्कृष्ट गायक, वादक आणि संगीतकारांचे कार्यक्रम ऐकले होते. पण गाण्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून सांगत, त्या शब्दातील भाव स्वतःच्या आवाजातून जिवंत करण्याची कला प्रथमच इतक्या जवळून अनुभवायला मिळाली.
लता मंगेशकर या केवळ महान गायिका नव्हत्या, तर प्रत्येक शब्दाला आत्मा देणाऱ्या कलाकार होत्या. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर यांसारख्या महान गायकांनी शब्दांना जी उंची दिली, ती कशी निर्माण होते, हे मृदुला दाढे यांनी अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले.

माझा आवडता कलाकार अमिताभ बच्चन यांच्या 'त्रिशूल' चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले "मेरी बर्बादियों का अगर तू ज़िम्मेदार न हो..." हे गीत मी यापूर्वी अनेकदा ऐकले होते. त्याचा अर्थही माहिती होता. पण हेच गीत सादर करताना लतादीदींच्या कोमल आवाजात दडलेली आर्तता, संताप आणि वेदना मृदुला दाढे यांनी ज्या पद्धतीने उलगडून दाखवली, त्यामुळे त्या गाण्याचा नवा अर्थ माझ्यासमोर उभा राहिला.

आर. डी. बर्मन, मदन मोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या संगीतकारांनी आणि शैलेंद्र, आनंद बक्षी, साहिर लुधियानवी यांसारख्या गीतकारांनी शब्दांना दिलेले संगीत आणि त्या शब्दांना लता मंगेशकर यांनी दिलेला आत्मा याचा अप्रतिम प्रवास या कार्यक्रमातून अनुभवता आला.

मृदुला दाढे यांचा आवाज ही ईश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व जितके आकर्षक, त्याहून अधिक सुंदर त्यांचा स्वर आहे. सौंदर्य आणि स्वरसौंदर्य यांचा विलक्षण संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. त्यांच्या गायकीत केवळ सूर नाहीत, तर अभ्यास, संवेदनशीलता आणि गीताविषयीची अपार श्रद्धा आहे.

तीन तासांचा हा कार्यक्रम कधी संपला हेच कळले नाही. उलट, स्वरांचा हा प्रवास आणखी काही काळ सुरू राहावा, अशीच मनापासून इच्छा होत होती. कार्यक्रमातील एकही क्षण असा नव्हता की, मन दुसरीकडे भटकले. प्रत्येक गाणे, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विश्लेषण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडत होते.

कराडमध्ये गेली काही वर्षे अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी हे दाम्पत्य गीत स्वर संस्कार या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार संगीत कार्यक्रमांची अखंड परंपरा जपत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक भव्य आणि उत्कृष्ट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र यंदाचा अमृता दाढे यांचा 'अमर लता' हा कार्यक्रम सर्वार्थाने सर्वोत्तम ठरला.

हा कार्यक्रम केवळ गाण्यांचा नव्हता; तो संगीत समजून घेण्याचा, शब्दांच्या भावविश्वात डोकावण्याचा आणि लता मंगेशकर यांच्या गायकीचा आत्मा अनुभवण्याचा एक अद्वितीय प्रवास होता. या कार्यक्रमाने कराडच्या संगीतप्रेमींना एका वेगळ्याच सांगीतिक उंचीवर नेऊन ठेवले.

आजच्या धकाधकीच्या काळात अशी दर्जेदार सांगीतिक पर्वणी रसिकांसाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरते. कराडमध्ये अशा दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा जपणाऱ्या अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी या दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांनी उभारलेली स्वर संस्कार ही संस्था केवळ कार्यक्रमांचे आयोजन करत नाही, तर संगीत समजून घेणारे आणि त्यावर प्रेम करणारे रसिक घडवत आहे. अशीच स्वरांची अविस्मरणीय मैफल भविष्यातही कराडकरांना अनुभवायला मिळो, हीच मनापासून इच्छा.

सतीश मोरे सतिताभ 

१९ जून २०२६

एक स्वप्न निघालंय प्रवासाला

एक स्वप्न निघालंय प्रवासाला !

"बचपन से मुझे शादी का बहुत शौक है..."
‘जब वी मेट’ चित्रपटातील गीतचा हा संवाद अनेकांना आवडतो. माझी मुलगी देवयानी हीचा हा आवडता चित्रपट .पण तीने हाच संवाद 'बचपन से मुझे घूमने का बहुत शौक है' असा वेगळा केला आहे.

लहानपणापासूनच तिला जग पाहण्याची, नवीन ठिकाणे अनुभवण्याची, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्या कथा जाणून घेण्याची प्रचंड आवड आहे. एखादा डोंगर, एखादं छोटंसं गाव, एखादा निसर्गरम्य रस्ता किंवा अनोळखी माणूस – तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी असते.

प्रवास करताना तिची एक सवय मला नेहमी आश्चर्यचकित करते. कराड, सातारा, कोल्हापूर किंवा कुठेही बसने जात असताना ती शेजारी बसलेल्या व्यक्तीशी ओळख करून घेते. विशेषतः वयस्कर लोकांशी गप्पा मारते, त्यांच्या अनुभवांमधून शिकते आणि परत आल्यानंतर त्या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा मला सांगते. तिच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसून, तो माणसांना समजून घेण्याचा आणि जग जाणून घेण्याचा मार्ग आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी पुढारी कस्तुरी क्लबच्या महिलांची जम्मू-काश्मीर सहल आयोजित करण्यात आली होती. तेव्हा दहावीत असलेल्या देवयानीला मी त्या सहलीला एकटीला पाठवले होते. तिच्या ओळखीच्या महिला त्यात होत्या, त्यामुळे तिला पूर्णपणे सोलो ट्रिप म्हणता येणार नाही. पण त्या प्रवासातही तिचा वेगळेपणा जाणवला. इतर महिला बसमध्ये मागे बसल्या असताना ती ड्रायव्हरच्या शेजारी बसून काश्मीरची माहिती विचारायची, स्थानिक संस्कृती जाणून घ्यायची आणि नवीन गोष्टी शिकायची. परत आल्यानंतर तिने सांगितलेल्या कथा ऐकून मला तिच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक वाटले.
तेव्हाच तिने मला एक वचन घ्यायला लावले होते – "पप्पा, बारावी झाल्यानंतर मला एक खरी सोलो ट्रिप करायची आहे."

आज तो दिवस आला आहे.
बारावीचा निकाल लागला. सीईटीची प्रक्रिया पूर्ण झाली. आणि तिच्या स्वप्नातील पहिल्या खऱ्या सोलो ट्रिपसाठी ती आज निघाली आहे.

स्वतः मोबाईलवर माहिती शोधून तिने हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील Hampta Pass Trek निवडला. साधारण २२ किलोमीटरचा हा ट्रेक. जंगल, डोंगर, नद्या, बर्फाच्छादित परिसर, निसर्गाच्या कुशीत सहा दिवसांचा प्रवास आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी.

आज तिला रेल्वेत बसवण्यासाठी मी पुणे रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. तिला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर शुभेच्छा देताना मनात अनेक भावना दाटून आल्या. ट्रेन दिल्लीला जाईल, तिथून पुढे मनालीला. मनालीत एक दिवस मुक्काम करून तिच्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या सोलो अॅडव्हेंचरची सुरुवात होईल.

या प्रवासाला निघण्यापूर्वी तिने आजी-आजोबा, काका-काकू आणि घरातील सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. मला सर्वांत जास्त आनंद याचा वाटतो की तिच्यातील धाडसाला आम्ही बळ दिले. पालक म्हणून भीती वाटतेच, पण त्याहून मोठा विश्वास तिच्यावर आहे.

खरं तर प्रवासाची आवड माझ्याकडेही आहे. महाविद्यालयीन काळात मी मित्रांसोबत सायकलवर आणि टू विलर वरून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे फिरलो आहे. जोतिबा, पन्हाळा, शिर्डी, शनीशिंगणापूर, नाशिक, मुंबई, पुणे, कोकण, बेळगाव, तुळजापूर, सोलापूर आणि असंख्य गावं पाहिली आहेत. त्या प्रवासांनी मला खूप काही शिकवलं. मात्र त्या सोलो ट्रिप नव्हत्या.

आज देवयानी जे अनुभवण्यासाठी निघाली आहे, तो अनुभव वेगळाच आहे. स्वतःच्या बळावर जग पाहण्याचा, निर्णय घेण्याचा, नवीन मित्र जोडण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा.
मला खात्री आहे की या प्रवासातून ती फक्त २२ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करून परत येणार नाही, तर अनुभवांचे, आठवणींचे आणि आत्मविश्वासाचे एक मोठे भांडार घेऊन परत येईल.

देवयानी, तुझ्या या पहिल्या खऱ्या सोलो ट्रिपसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जग पाहा, माणसं जोडा, अनुभव गोळा करा आणि सुरक्षितपणे परत या.

तुझ्या पुढच्या प्रवासकथेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत...

सतीश मोरे (पप्पा)

०७ जून २०२६

अक्षरांचा जादूगार : अक्षरगुरू राहुल (जगन) पुरोहित

अक्षरांचा जादूगार : अक्षरगुरू राहुल (जगन) पुरोहित

"अक्षर म्हणजे विचारांना मिळालेले अमरत्व." या एका वाक्यात अक्षराचे संपूर्ण महत्त्व सामावलेले आहे. अक्षराविषयी आपण कितीही बोललो तरी ते कमीच आहे. अक्षर हा केवळ शब्द लिहिण्याचा मार्ग नाही, तर तो व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. सुंदर, सुवाच्य आणि रेखीव अक्षर माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची प्रदान करते. अक्षर हा खरोखरच आयुष्याला लाभलेला एक अनमोल दागिना आहे.

संस्कृतमध्ये म्हटले आहे, "अक्षरं न क्षरति इति अक्षरम्" — जे कधी नष्ट होत नाही ते अक्षर. माणूस नश्वर असला तरी त्याचे विचार, त्याचे ज्ञान आणि त्याची ओळख अक्षरांच्या रूपाने कायम जिवंत राहते.

परंतु या अनमोल दागिन्याची जपणूक करण्यासाठी, अक्षर अधिक सुंदर आणि प्रभावी करण्यासाठी आपल्यापैकी किती जण प्रयत्न करतात? अक्षर सुधारण्यासाठी किती जणांनी सातत्याने मेहनत घेतली आहे? आणि अशा प्रयत्नांना योग्य दिशा देणारा एखादा शिक्षक, मार्गदर्शक किंवा गुरू आपल्याला भेटला आहे का?

याचे उत्तर आहे – होय! असे एक व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य अक्षराच्या साधनेसाठी अर्पण केले. ते म्हणजे कराड येथील अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित.

साधारण  १३ वर्षांपूर्वी १९ एप्रिल २०१३ वर्षांपूर्वी त्यांनी "अक्षरसंस्कार" या नावाने एक संस्था सुरू केली. सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटले. "अक्षर सुधारण्याचाही क्लास असतो?" असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. परंतु राहुल पुरोहित यांनी केवळ अक्षर सुधारण्याचे प्रशिक्षण दिले नाही, तर अक्षराच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, अभ्यासातील प्रगती आणि यशाचा मार्ग विद्यार्थ्यांसमोर उघडून दाखवला.

"तलवारीपेक्षा अक्षराची ताकद अधिक असते," असे म्हटले जाते. कारण तलवार शरीर जिंकू शकते, पण अक्षर मन जिंकते. राहुल पुरोहित यांनी हीच ताकद विद्यार्थ्यांच्या हातात देण्याचा संकल्प केला.
अक्षरातील वेलांट्या, उभ्या-आडव्या रेषा, अनुस्वार, मात्रांचे सौंदर्य आणि अक्षरातील शिस्त यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी स्वतःची एक वेगळी लेखनशैली विकसित केली. त्यांचा उद्देश केवळ स्वतःचे अक्षर सुंदर बनवणे नव्हता, तर प्रत्येक विद्यार्थ्याला सुंदर अक्षराचा हा दागिना मिळवून देणे हा होता.

आज "अक्षरसंस्कार" ही संस्था कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कार्यरत आहे. सातारा, सांगली, पुणे यांसारख्या शहरांत तिचा विस्तार झाला असून लवकरच मुंबईतही तिची वाटचाल सुरू होत आहे.

राहुल पुरोहित हे माझे 2001 पासूनचे मित्र. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांचे वडील कराड येथील रॉयल चित्रपटगृहात व्यवस्थापक होते.
वयाच्या १५ वर्षांपासून राॅयल थिएटर मध्ये सहायक लिपीक ते थिएटर मॅनेजर म्हणून काम केले. मात्र त्यांच्या मनातील शिक्षक, संशोधक आणि अक्षरप्रेमी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.अखेरीस त्यांनी नोकरीचा मार्ग सोडून शिक्षण आणि अक्षरसंवर्धनाचा मार्ग निवडला. 

सोमवार पेठ, कराड येथे त्यांनी स्वतःचा क्लास सुरू केला. त्या काळात अक्षर सुधारणा या विषयाबाबत फारशी जागृती नव्हती. तरीही त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांमध्ये सुंदर अक्षराचे महत्त्व रुजवले.

कोरोना काळात त्यांनी ऑनलाइन प्रशिक्षणाची अभिनव संकल्पना राबवली. अक्षर सुधारण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करून त्यांनी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. आजवर दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. ९० हजार + हून अधिक देशातील,परदेशातील विद्यार्थींना offline आणि online माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.

या विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारले, त्यांचा आत्मविश्वास वाढला, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शिक्षक आणि मित्रांमध्ये त्यांचा सन्मान वाढला. काही विद्यार्थी शाळेच्या फळ्यावर सुविचार लिहू लागले, तर काहींना परीक्षांमध्ये अधिक चांगले गुण मिळू लागले.

याच संदर्भात संत तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात —
"आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने."

शब्द आणि अक्षरांचे हे रत्न विद्यार्थ्यांच्या जीवनात झळकू लागले की त्यांचे व्यक्तिमत्त्वही उजळून निघते. राहुल पुरोहित यांनी हजारो विद्यार्थ्यांना हेच रत्न प्राप्त करून दिले आहे.सुंदर अक्षराचा प्रभाव केवळ लेखनापुरता मर्यादित राहत नाही. स्वच्छ, सुवाच्य उत्तरपत्रिका परीक्षकावर सकारात्मक छाप पाडते. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये अक्षराचाही मोठा वाटा असतो, हे राहुल पुरोहित यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या अनुभवातून सिद्ध केले आहे.

संस्कृत सुभाषितात म्हटले आहे —
"विद्याधनं सर्वधनप्रधानम्"
विद्येचे धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. परंतु त्या विद्येला आकार देणारे माध्यम म्हणजे अक्षर. म्हणूनच "अक्षर हे संस्कृतीचे जिवंत स्मारक आहे" असे म्हणतात.

अक्षरासोबतच राहुल पुरोहित सरांनी  सुंदर आणि प्रभावी स्वाक्षरी यावर प्रशिक्षणही सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येत आहे.


आज गावोगावी, शाळाशाळांत जाऊन ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या कार्यात पत्नी आणि मुलाचीही मोलाची साथ लाभत आहे. भविष्यात "अक्षरसंस्कार" ही संकल्पना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.


कॅलिग्राफी (Calligraphy) म्हणजे अक्षरलेखनाची एक सुंदर आणि कलात्मक पद्धत. साध्या अक्षरांना आकर्षक, देखणे आणि कलात्मक स्वरूप देण्याच्या कलेला कॅलिग्राफी असे म्हणतात. अक्षरांचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध प्रकारचे पेन, ब्रश, शाई आणि लेखनसाधनांचा वापर केला जातो. शुभेच्छापत्रे, निमंत्रणपत्रिका, पोस्टर्स, लोगो, सुविचार, धार्मिक ग्रंथ तसेच कलात्मक सजावटीसाठी कॅलिग्राफीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या कलेमध्ये प्रत्येक अक्षराला स्वतंत्र आणि आकर्षक आकार दिला जातो.

अक्षरगुरू राहुल पुरोहित यांनी कॅलिग्राफीचा विषय अतिशय प्रभावीपणे विकसित केला आहे. त्यांनी आपल्या कलात्मक अक्षरलेखनाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून अक्षरांची सौंदर्यदृष्टी आणि लेखनकलेचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थी कॅलिग्राफीच्या क्षेत्रात प्रगल्भ झाले आहेत.

विशेष म्हणजे, अक्षरगुरू राहुल पुरोहित यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांसाठी स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण फॉन्ट शैली विकसित केल्या आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अक्षरकलेला नवी दिशा मिळाली असून कॅलिग्राफीच्या विश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षरांची सौंदर्यपर परंपरा जपत नव्या पिढीला प्रेरणा देणारे त्यांचे कार्य ही अक्षरप्रेमींसाठी एक अनमोल देणगी ठरली आहे.

अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित यांनी केवळ अक्षरे सुधारली नाहीत; त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडवले आहे. त्यामुळे भविष्यात "अक्षरगुरू" हे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराने घेतले जाईल, याबद्दल कोणतीही शंका नाही.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते —
"अक्षरांची पूजा म्हणजे ज्ञानाची साधना."
ही साधना आयुष्यभर करणाऱ्या, अक्षरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन घडवणाऱ्या अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !





सतीश मोरे सतिताभ 
९८८११९१३०२

०५ जून २०२६

घामाचा सुगंध

घामाचा सुगंध

मुलांना त्यांच्या आवडीचं काम करू द्यावं, त्यांचे छंद जोपासू द्यावेत, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांना मोकळं आकाश द्यावं, अशी आजच्या काळातील प्रत्येक बापाची इच्छा असते.

पूर्वीचा काळ वेगळा होता. वडिलांनी ठरवलं की मुलगा डॉक्टर व्हायचा, इंजिनिअर व्हायचा किंवा शिक्षक व्हायचा, तर मुलंही त्याच मार्गाने चालायची. त्या मुलाची स्वतःची इच्छा काय आहे, त्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे, याचा फारसा विचार होत नसे. मुलं वडिलांची स्वप्नं पूर्ण करायची.
पण काळ बदलला आहे. आता प्रत्येक पालकाला वाटतं की मुलांनी स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडावं आणि त्यात यशस्वी व्हावं.

माझ्याबाबतीत मात्र तसं झालं नाही. मी आर्ट्सचा विद्यार्थी होतो. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मला उत्तम गुण मिळायचे. भाषेवर माझं चांगलं प्रभुत्व होतं. पण नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या सल्ल्यामुळे मी सायन्सला गेलो. बी.एस्सी. बॉटनी पूर्ण केलं. आज मागे वळून पाहताना वाटतं, त्या शिक्षणाचा माझ्या आयुष्यात फारसा उपयोग झाला नाही. मी जे क्षेत्र मनापासून निवडलं असतं, कदाचित त्यात अधिक समाधान मिळालं असतं.
म्हणूनच माझ्या मुलाबाबत मी वेगळा निर्णय घेतला.

पियुषला जगभर फिरायचं होतं. वेगवेगळे देश पाहायचे होते. त्यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र निवडलं. बारावीनंतर तो पुण्यात हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी गेला. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुट्टीत कराडला आला.

मी त्याला सांगितलं, "पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभवही महत्त्वाचा असतो. एखाद्या हॉटेलमध्ये काम कर."माझे मित्र आशीष पाटील यांच्या ग्रीनलँड हॉटेलमध्ये तो कामाला जाऊ लागला.

एक दिवस घरी आल्यावर त्याने मला एक प्रसंग सांगितला.हॉटेलमध्ये काही तरुण जेवायला आले होते. ऑर्डर देण्यात थोडा उशीर झाला आणि त्यांनी पियुषवर राग काढला. त्याला सुनावलं. पण हॉटेल व्यवसायाचं एक तत्त्व असतं – ग्राहकावर रागवायचं नाही.पियुष शांतपणे सगळं ऐकत राहिला.

रात्री हॉटेल बंद झाल्यावर तो बाहेर आला. त्याच्या बुलेटजवळ गेला. त्या तरुणांनी त्याला ओळखलं."अरे, ही तर सतीश मोरेंची गाडी आहे!"पियुष म्हणाला, "हो, सतीश मोरे माझे पप्पा आहेत."हे ऐकताच त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी पियुषची माफी मागितली.

त्यावर पियुषचं उत्तर मला आजही आठवतं –"माझे पप्पा मोठे असतील, पण हॉटेलमध्ये मी एक वेटर होतो. तुम्ही ग्राहक होतात. तुमचं बोलणं ऐकणं हे माझं काम होतं."त्या दिवशी मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटला.


आज पियुष न्यूझीलंडमध्ये आहे. तो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पुढील शिक्षण घेत आहे आणि त्याचबरोबर नोकरीही करतो आहे.

न्यूझीलंडला जाताना मी त्याला एकच गोष्ट सांगितली होती –"तू कोणतंही काम कर. पण कामाची कधी लाज बाळगू नकोस. कारण कोणतंच काम छोटं नसतं."

आज दुपारी मी त्याला फोन केला.
तो म्हणाला, "पप्पा, आज मी तीन ठिकाणी काम केलं. त्यापैकी एका ठिकाणी इतकं कष्टाचं काम होतं की मी खूप कंटाळलो आहे."हे ऐकताना माझ्या डोळ्यांत पाणी आलं.
मी त्याला फक्त एवढंच म्हणालो "बाळा, तू न्यूझीलंडमध्ये घाम गाळतोयस, पण त्या घामाचा सुगंध मला इथं कराडात बसूनही जाणवतो आहे. तुझ्या कष्टांचा मला अभिमान आहे."

मित्रांनो,
मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात, स्वतःच्या मेहनतीने आयुष्य घडवतात, तेव्हा बापाच्या आनंदाला पारावार राहत नाही.माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून स्वावलंबनाचे धडे दिले. स्वतःचं काम स्वतः करण्याची सवय लावली. आज पियुषही त्याच मार्गाने चालतो आहे.

वेलिंग्टनमध्ये गाळलेला त्याचा घाम आज हजारो किलोमीटर दूर माझ्या मनाला सुगंध देतो आहे.

पियुष, तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.कष्ट करत राहा. संघर्ष करत राहा.कारण कोणतंच काम वाईट नसतं.वाईट असतो तो फक्त संघर्षाला घाबरणारा दृष्टिकोन आणि लक्षात ठेव ,"कष्टाच्या घामाला नेहमी यशाचा सुगंध असतो."

@पप्पा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...