राजकीय संघर्षातून घडलेल्या सत्तरीतील ‘तरुण’ डॉक्टरांनी उलगडले आयुष्यातील आनंदाचे रहस्य
संयमी व अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असणारे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉ. सुरेश भोसले यांचा आज वाढदिवस. सत्तराव्या वर्षीही पंचवीशीतील तरुणाइतका उत्साह असलेले डॉ.सुरेशबाबा हे मितभाषी, संयमी आणि सदाहरित नेतृत्व आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दैनिक ‘पुढारी’चे न्यूज ब्युरो चीफ सतीश मोरे यांच्याशी बोलताना त्यांनी आयुष्याचा प्रवास उलगडला. कृष्णा विद्यापीठ, कृष्णा कारखाना यांच्या निर्मितीपासून मुलगा डॉ.अतुल भोसले आमदार होण्यासाठी केलेले प्रयत्न यावर बोलत असतानाच संषर्घाशिवाय जीवन नाही असे सांगून शेवटच्या क्षणापर्यंत वैद्यकिय सेवेसह समाजकारणात कार्यरत राहणार, असा इरादा त्यांनी बोलून दाखविला....
प्रश्न ..70 वर्षांपासून आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले, संघर्ष आले याबाबत आपण काय सांगू शकाल....
उत्तर- 70 वर्षांचा प्रवास फार मोठा आहे. हा प्रवास फार संघर्षातून झाला. सर्व राजकारणी, समाजकारणी आणि सर्वसामान्यांना संघर्षातून जावं लागतं. सुरुवातीच्या काळात जो घरातील संघर्ष झाला, तो व्हायला नको होता. मात्र आम्ही त्याच्यातूनही पुढे आलो. एक वेळ अशी येते की, सर्व मागे ठेवावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आपण त्याच्यापासून बाजूला जावं लागतं. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यापासून आपला फोकस बाजुला करून चालत नाही. राजकीय सत्ता आपल्या हातात आली किंवा नाही याचा आपण कधीच विचार केला नाही. राजकारणामध्ये सुद्धा जेव्हा अतुलने ठरवलं की, आपल्याला राजकारणामध्ये काहीतरी करायचं आहे. दोनदा अपयश आलं. तरी तो खचून गेला नाही. तिसर्यांदा तो यशस्वी झाला. भाजपाची विचारधारा स्विकारायला वेळ गेल्याने यश मिळायलाही वेळ गेला. आपल्या येथे राष्ट्रीय काँग्रेसचा प्रवाह आहे, या प्रवाहाविरोधात तो निघालेला होता. आज रोजी भाजपचा प्रवाह लोकांनी स्विकारला आहे. आज त्याला यश मिळाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी आलेली आहे.
प्रश्न ..आज तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहात, मात्र तुम्ही पन्नाशीतील तरुणासारखे उत्साही दिसता. प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळता. तुमच्या या तारुण्याचे रहस्य काय.....
उत्तर ...रहस्य वगैरे काही नाही. हा स्वभावाचा भाग आहे. आपल्या आयुष्यात समज-गैरसमज होतात ते शब्दाने. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर ती कशी मांडायची आणि कशी मांडायची नाही, हे शब्दच ठरवतात. कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. कोणाचा अपमान होणार नाही किंवा कोणाला कमीपणा येईल असे वागायचे नाही. विरोधक असे तरीही करायचं नाही. जो-तो त्याच्या मार्गाने चालत असतो आपण आपल्या मार्गाने चालायचे असते. असं केलं तरच राजकारणात बदल होत असतो. निवडणुकीच्या काळात मला भेटायला येणारे इतरांच्या तक्रारी करतात. तो तुमचा कार्यकर्ता तुमच्याविषयी विरोधात बोलतो. तुम्हाला शिव्या देतो, तुम्ही हे कसे सहन करता? यावर मी म्हणतो, तो जर इतका आपल्याला शिव्या देत असेल तर प्रेम सुद्धा तितकंच करत असेल. हा एटीट्यूडचा प्रश्न आहे. तुम्हाला मी तरुण वाटतोय याचं आणखी एक कारण म्हणजे लाइफस्टाइल आहे. मी सर्वांना नेहमीच सांगतो, या जगामध्ये तुमचं काही नाही. प्रॉपर्टी आहे पण तुम्हाला ती सोडून जावी लागणार आहे. घर, मित्र-मंडळी, आई-वडील हे ही तुमचे नाहीत. कारण जाताना तुम्हाला ते ही सोडून जावं लागणार आहे. देवाने तुम्हाला अशी एकच गोष्ट दिलेली आहे ते म्हणजे तुमचे शरीर. त्यामुळे खर्या अर्थाने शरीराची काळजी करणं, हे तुमचं कर्तव्य आहे. ही जबाबदारी तुमची आहे. शरीर चांगलं ठेवण्यासाठी कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. ही जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. मी माझ्या शरीराची काळजी घेतो. म्हणून मी सद़ृढ आहे. दुसरा विषय काही गोष्टी जेनेटेकली येतात. आप्पांच्याकडून मला ते मिळालेले वरदान आहे.
प्रश्न...तुम्ही एवढ्या मोठ्या गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला आला आहात, मात्र तरीही तुमच्याकडील संयम, नम्रता, मितभाषीपणा हे गुण आहेत. हे तुम्ही कसे शक्य करु शकता..........
उत्तर- आप्पा नेहमी म्हणायचे, तुम्ही किती श्रीमंत आहात हे पैशाने कधीच ठरत नाही. तुम्ही दुसर्यासाठी काय केलं हीच खरी श्रीमंती आहे. तुमच्याकडे असलेल्या पैशांचा लोकांसाठी योग्य उपयोग करत नसाल तर त्या पैशाला काय अर्थ नाही. आम्हाला सत्ता आली किंवा गेली, याचं कधीच अप्रूप वाटत नाही. चेअरमन असलो किंवा नाही याचं काहीच वाटत नाही. लोकांनी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडायची, हे मी माझं कर्तव्य समजतो. लोकांनी भेटावं, नमस्कार करावा असं मला कधीच वाटंत नाही. आपल्याला सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे. मला स्तुतीपाठक लोक अजिबात आवडत नाहीत. चापलुसी करणारे लोक मी कधीच जवळ करीत नाही. माझ्याजवळ असे लोक तुम्हाला कधीही दिसणार नाहीत. जवळीक सुद्धा कुणाशी किती करायची हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे. आपल्याला सगळे सारखे धरले पाहिजेत. जवळच्या लोकांना सुद्धा आपण त्यांच्या कामावरुन तोललं पाहिजे. आमच्या संस्थेमध्ये चांगला अधिकारी असेल तर त्याला योग्य न्याय मिळतो, मात्र वाईट असेल तर कसलाही विचार न करता दुसर्या दिवशी त्याला कमी करायला मला काहीच वाटत नाही. कारण मी कशामध्येही आणि कुणामध्येही गुंतलेलो नाही. कारखान्यातील संचालकांनाही मी नेहमी सांगतो, ही खुर्ची सांभाळण्यासाठी, टिकवण्यासाठी मी काहीही चुकीचे करणार नाही. मला इथे या पदावर राहायलाच पाहिजे असं काही नाही. माझ्या या स्वभावाचा संचालकावरही चांगला परिणाम होतो.
प्रश्न ..तुमचे राजकीय गुरू कोण? तुमचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत..?
उत्तर- माझे कोणीही राजकीय गुरु नाहीत मात्र सर्व पक्षातील राज्यकत्यांशी माझे चांगले संबंध राहिले आहेत. स्व.विलासराव पाटील-उंडाळकर (काका) तसे फटकळ होते. मात्र माझ्याशी त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. माझा त्यांच्याशी संवाद होत होता. शेवटच्या क्षणी रुग्णालयात असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा तिथे असलेल्या सर्वांना त्यांनी बाहेर काढून माझ्याशी संवाद साधला. राजकारण कसं चालतं..., राजकारणात कसं वागलं पाहिजे..., या विषयावर त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. जे त्यांना त्यांच्या मुलाशी बोलायला पाहिजे होतं ते माझ्याशी बोलले. वाळवा तालुक्यातील जयंतराव पाटील यांच्याशीही माझे सलोख्याचे संबंध आहेत. इथं बाळासाहेब पाटील यांच्याशी जयवंत शुगर आणि विधानसभा निवडणुकीमुळे संबंध ताणले होते. मात्र झालेल्या चुका मान्य करुन आम्ही पुढे गेलो. आज आम्ही एकत्र काम करीत आहोत.
प्रश्न ..कृष्णा विद्यापीठ आणि कृष्णा कारखान्याची एवढी मोठी जबाबदारी स्वीकारताना भविष्यातील बदलांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता...
उत्तर ...जगभरात काय चालले आहे, त्याचा अभ्यास आम्ही सातत्याने करत असतो. सर्व व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये फास्ट चेंजेस होत आहेत. त्यामुळे अडपटेशन तुम्हाला सातत्याने करावे लागतील. कारखान्याबाबत मी नेहमी म्हणतो, आजची जी कारखान्यात टेक्नॉलॉजी आहे. ती पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला नव्या बदलांसाठी सतत दक्ष राहावे लागेल, अभ्यास करावा लागेल. आरोग्यसेवेत सध्या काय नवीन ट्रेंड आहे, हे पहावे लागते. वैद्यकीय सेवेमध्ये डिसिजन मेकिंग अत्यंत महत्वाचा असतो. पेशंटला ट्रीट करताना योग्य डिसिजन घ्यावा लागतो, आणि तो डिसीजन विथ रिझन हवा. भविष्यात कुठे पोटेन्शिअल आहे याचा आम्ही विचार करतो. आम्ही मोठे निर्णय घेतो. मात्र त्याची अंमलबजावनी टप्प्याटप्प्याने करतो. मध्यंतरी कृष्णा कारखाना वीस वर्षे आमच्याकडे नव्हता. मात्र अन्य सर्व संस्था स्थिर आहेत, प्रगतीपथावर आहेत. एग्रीकल्चर कॉलेज असो किंवा मेडिकल कॉलेज यांच्या ब्रांचेस असो. फार्मसी कॉलेज असो नर्सिंगसह सर्व कॉलेजेस राज्यामध्ये नावाजलेले आहेत. आमच्या सर्व संस्थांचा पुढील पाच वर्षाचा प्लॅन तयार आहे. कारखाना आणि विद्यापीठात आजचे चॅलेंजेस आणि भविष्यात उद्भवणारे चॅलेंजेस याचा विचार करून आमचे प्लॅन तयार आहेत. जे आपल्याला चॅलेंज वाटते, आणि ज्याची आपल्याला भीती वाटते, त्याचं रूपांतर तुम्ही संधीमध्ये केलं पाहिजे.
प्रश्न ..आपल्या वाढदिवसानिमित्त सभासद, शेतकरी आणि कराड तालुक्यातील जनतेला काय सांगाल.....
उत्तर ...आपला शेतकरी समाज शेतीवर अवलंबून आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये इतके बदल झाले आहेत. हे सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. शेतकर्यांचे राहणीमान सुधारलं असलं तरी फक्त शेतीवर त्यांचं चालणार नाही. शेतकर्यांच्या घरातील मुले शिकली पाहिजेत. नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग त्यांनी स्विकारला पाहिजे. भविष्यात सामुदायिक शेतीची कन्सेप्ट राबवावी लागणार आहे. कराड दक्षिणमध्ये कृष्णा साखर कारखान्याशिवाय एकही मोठी इंडस्ट्री नाही, म्हणून मी अतुलला सुद्धा भविष्यात या मतदारसंघात नव्या इंडस्ट्रीज आणाव्या लागतील, याबाबत सुचविले आहे. कृष्णा कारखान्याच्या संघर्षामध्ये जयवंत शुगर उभा राहिला. संघर्षच झाला नसता तर कृष्णेचे चार कारखाने झाले असते. ‘कृष्णा’ कारखान्याबाबत भविष्यात काही योजना आहेत, याबाबत आता सांगणे योग्य नाही.
प्रश्न ...तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखद अशी घटना कोणती..? अतुल आता आमदार झाला आहे. त्याविषयी काय सांगाल..?
उत्तर...मुले सेटल झाली. राजकारणात हे करिअर अतुलने स्वीकारलं. संषर्घातून तो आमदार झाला. हा एक आनंदाचा क्षण होता. अतुलकडे पोटेन्शिअल आहे म्हणून ते होऊ शकलं. याशिवाय छोटे-छोटे आनंदाचे प्रसंग माझ्या आयुष्यात रोज घडतात. एखादा कॅन्सरचा पेशंट बरा होऊन घरी जातो तेव्हा त्याच्या चेहर्यावर जो आनंद असतो, तो आनंद पाहण्यात वेगळा आनंद असतो. या विभागात काम करणारांना तुम्ही भाग्यवान आहात, असे मी म्हणतो. एवढ्या वेगवेगळ्या कामांत बिझी असूनही रोज सकाळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. कारण यामध्येच आनंद आहे. आज स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण फार मोठे आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट करणं फार गरजेचे आहे हा विचार करूनच कृष्णा रूग्णालयाचे कोबाल्ट युनिटमध्ये सुरू आहे. कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचे आमचे प्रयत्न असतात. कोबाल्ट युनिटमधून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही 30 हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. अतुलसुद्धा माझ्यासारखा थोडा संयमी व्हायला लागला आहे. 2006 सालापासून अतुलने सक्रिय राजकारण सुरु केले. तेव्हापासून त्याच्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर हे या उक्तीप्रमाणे प्रयत्न करून अतुलने आमदारकी खेचून आणली आहे. त्यांने केलेल्या कामामुळे पक्षानेही अतुलला चांगला न्याय दिला आहे. भविष्यात तो अजून चांगले काम करेल. शिवाजी स्टेडियमसाठी 100 कोटी रुपये आणले आहेत. आपल्या जाण्यानंतर आपल्या पाऊलखुणा मागे राहिल्या पाहिजेत असं काम व्हायला पाहिजे. आरोग्य सेवा, आरोग्य विद्यापीठ हे नाव कायमस्वरूपी राहणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राबविलेल्या योजनांमुळे आपण आजही त्यांचे नाव घेतो. कृष्णा रुग्णालय उभं राहण्यामध्ये चव्हाण साहेबांबरोबरच वसंतदादा पाटील यांचे फार मोठे योगदान आहे.
प्रश्न ..जयवंतराव आप्पा यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, मला चांगले लोक मिळाले म्हणून मी एवढे मोठे काम करू शकलो. हे खरं आहे का...........
उत्तर... हो, हे बरोबर आहे. हे टीमवर्क आहे. इतक्या विविध अडचणी असतात, कुठलेही काम करताना लोक तुमच्यासोबत असतील तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त लोकांची साथ पाहिजे. एखादी वस्तू विकायची म्हणलं तरी सुद्धा लोकांची गरज लागतेच. लोकं बरोबर नसतील तर आपण काही करू शकलो नसतो. संस्थेत किती इक्विपमेंट आहेत..... किती इमारती आहे...... याच्यावर त्या संस्थेचे मूल्यमापन होत नाही. तर संस्थेत काम करणारी माणसं किती मोठी आहेत, त्यावर त्या संस्थेची किंमत ठरते. आज आमच्या दवाखान्यात जेवढा आमच्या वॉर्ड बॉयला किंमत दिली जाते सन्मान दिला जातो, तेवढाच सन्मान मोठ्या पदावरील डॉक्टरांना दिला जातो. अजून दुसरा कॅम्पस आम्ही निर्माण करत आहोत. काम अजून वाढवायचे आहे, जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत काम करीतच राहणार आहे. राजकारणातून निवृत्तीचा एक भाग असतो. मुळातच रिटायरमेंटचा कन्सेप्ट वेगळा असतो. मनापासून रिटायर होणे एक आणि कामापासून वेगळं होणं असे रिटायरमेंटचे प्रकार आहेत. आयुष्यभर जे काम केलं आहे, त्याच्यापासून आपण बाजूला राहू शकत नाही.