फॉलोअर

१४ जुलै २०२१

आमचा वारीचा प्रवास उंडाळे विभागात

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१४ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.आज आमचा वारीचा प्रवास उंडाळे विभागात सुरू झाला आहे.गेल्या वर्षी आम्ही मनमंदिर वारी केली होती, त्यातील गावे आम्ही टाळली आहेत.गाववातून प्रवास रिपीट झाला असेल पण संपूर्ण नवीन वारी मार्गावरून आम्ही निसर्गाचा आनंद घेत आहोत.
आम्ही पाचवड फाट्यापासून चालायला सुरुवात केली. काल सांगीतल्या प्रमाणे वारी आणि पावसाचा खूप जवळचा संबंध असतो,आहे.आज सकाळी पावणे सहा वाजता घरातून बाहेर पडलो तेव्हा धो धो पाऊस सुरू होता. छत्री जॅकेट तयारी करून असे सर्वजण सव्वा सहाच्या दरम्यान पाचवड फाट्यावर पोहचलो. तिथे एका पेट्रोल पंपासमोर गाडी पार्क केली आणि भर पावसात आम्ही धोंडेवाडी गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आज पावसाने आमची परीक्षा घ्यायची ठरवले होते. एक सारखा पाऊस सुरू होता मात्र तरीही ब्ल्यूटूथवर मोठ्या आवाजात हरिपाठ लावून आम्ही चालू लागलो. रस्त्यावर गर्दी कमी होती मात्र भर पावसात चालणे एक अवघड काम होते. माऊलींचा आशीर्वाद आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला काही अडचण नव्हती.डोक्यावर छत्री धरून सुद्धा आमच्यातील काहीजण भिजले होते,बुटांमध्ये पाणी शिरले होते. एव्हाना कालेटेक येथे पोहोचलो होतो.या दरम्यान मला पंढरीच्या वारीतील एका पावसातील प्रवासाची आठवण झाली. २०१५/१६ ची वारी असेल.सासवड येथे मुक्काम करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो.त्या दिवशी मी मुख्य पालखी सोहळ्यातुन चालणार होतो. सकाळी सात वाजता सासवड गाव सोडल्यानंतर अचानक इतका जोरदार पाऊस सुरू झाला. वारकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र माऊली पालखी सोहळ्याची शिस्त कोणी सोडली नाही.भर पावसात सर्वजण चालत होते, पावसाला कुणीही जुमानले नाही. उलट पावसात वारकऱ्यांचा उत्साह अजून वाढला होता. सासवड दिवे घाटामध्ये एकदा पावसातील पंढरीच्या वारीचा आनंद घेतला होता. भरपावसात सासवड ते जेजुरी केलेला प्रवास मी कधी विसरू शकणार नाही आणि आज त्या प्रवासाची मला आठवण झाली.
कालेटेकच्या दरम्यान आल्यानंतर थोडा पाऊस कमी झाला, पूर्ण पाऊस थांबला आणि निसर्गाचे दुसरे रूप आम्हाला पाहायला मिळाले. मुनावळे गावाच्या बाजूला असणाऱ्या पावसाचे ढग जमिनीवरून डोंगरावर वाहत होते, हे निसर्गरम्य चित्र पाहत असताना या डोंगरदऱ्यातून मोरांचा जोरात आवाज ऐकू येत होता. पाऊस थांबला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा झपाझपा पावले टाकत धोंडेवाडी फाट्यावर पोहोचलो. आणि गावाकडे जायला निघालो.
धोंडेवाडी फाटा ते धोंडेवाडी गावा दरम्यान दीड किलोमीटरच्या अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला खचाखच पाण्याने भरलेल्या विहीरी आणि उसाच्या जोमाने वाढलेल्या लागणी पहायला मिळाल्या. या भागातील शेतकरी प्रयोगशील आहेत.गावात पोहोचेपर्यंत या गावातील माझे मित्र आणि पुढारी चे जुने सहकारी प्रभाकर पवार आमचे वाहन घेवून गावात यायला लागले होते. धोंडेवाडी गावातून आम्ही पुढे जायला निघालो. धोंडेवाडी गाव पार करून पुढे गेल्यानंतर उजवीकडे पुनर्वसित डिचोली गावाकडे जायला एक फाटा आहे तिकडे आम्ही वळालो.
कोयनानगर भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बाधित झालेले डिचोली गाव कराड तालुक्यात धोंडेवाडी आणि बाबरमाची येथे वसले आहे. बाबरमाची येथे यापूर्वी अनेकदा जायचा प्रसंग आला आहे, मात्र धोंडेवाडी डिचोलीला आज पहिल्यांदाच गेलो होतो. साधारण अर्धा किलो चालल्यानंतर डिचोली गावाचे प्रवेशद्वार दिसू लागले. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे डिचोली धोंडेवाडी गाव पंचवीस-तीस घराचे आहे, या गावाची लोकसंख्या चारपाचशेच्या आसपास आहे. सध्या हे गाव धोंडेवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर शिस्तबद्ध प्लॉटिंग केलेली घरे, मोठे बंगले पाहायला मिळाले. काही साधी घरे पण होती. गावात एसटी बस निवारा उभारण्यात आले आहे, मात्र हा निवारा मुख्य रस्त्यापासून आत अडगळीच्या जागी का उभे केले आहे याचे कोडे आम्हाला कळले नाही.
पुढे गावातील मुख्य चौकात पोहोचल्यानंतर ग्रामपंचायत समोर चौकात आम्ही थांबलो. वृक्षारोपण करण्यासाठी आमचे साहित्य येणाऱ्या गाडीमध्ये मागे असल्यामुळे आम्ही एका घरात टिकाव मागण्यासाठी गेलो. तो एक टुमदार बंगला होता. त्या घरातून दोन माऊली बाहेर आल्या आणि त्यांनी आमची आस्थेने चौकशी केली.आम्ही आमचा संकल्प व वारीची माहिती दिल्यानंतर ते लोक आमच्याशी एकरुप झाले आणि लगेच त्यांनी शेजारच्या लोकांकडून टिकाव आमच्याजवळ दिले. झाड कुठे लावायचे याबाबतची माहिती घेताना सदर व्यक्ती बाळासाहेब कोळेकर आहेत असे आम्हाला समजले. बाळासाहेब कोळेकर हे या गावचे मोठे प्रस्थ आहे. अतिशय मनमिळाऊ असे हे व्यक्तिमत्त्व आहे. डिचोली गावात यांना मोठा सन्मान आहे. बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला ग्रामपंचायत समोरील खुल्या जागेत झाड लावण्यासाठी जागा दाखवली. दरम्यान प्रभाकर पवार आमची गाडी घेऊन तिथे दाखल झाले. आम्ही खड्डा काढायला सुरुवात केली, दहाच मिनिटात गावातील आणखीन तीन चार लोक त्याठिकाणी आले. त्यांनी आम्हाला खड्डा काढायला मदत केली. या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले. या झाडाला बाजूला लावण्यासाठी विटा बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. उपस्थित दगडू बावधाने, राजाराम मिरजेत, जगनाथ कोळेकर लक्षमण शेळके या ग्रामस्थांनी त्याच झाडाच्या आसपास एक काट्यांचे कंपाउंड तयार केले. दरम्यान कोळेकर यांच्या घरातून आलेला चहा आम्ही घेतला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल च्या जयघोष केला, झाडाला पाणी घातले. पुनर्वसित हे गाव अतिशय सुंदर आहे आणि गावातील ग्रामस्थ अतिशय मनमिळावू आहेत. अजूनही त्यांच्या भाषेत एक वेगळेपण जाणवते. डिचोली गाव आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसित झाले आहे. या गावातून गडावर जाण्यासाठी अतिशय चांगला मार्ग आहे.या परिसरातील अनेक ग्रामस्थ याच मार्गे गडावर जातात. गावातील खुल्या जागेत मैदानावर वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला जागा द्याल का अशी विनंती रणजीत पाटील यांनी केल्यानंतर बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या सर्व मंडळी सोबत फोटो काढून अतिशय गोड आठवणी साठवत आम्ही परत धोंडेवाडी गावात आलो.
धोंडेवाडी हे अतिशय जुने गाव आहे. गावाची लोकसंख्या ४५००च्या सुमारास आहे. या अगोदर मला मला मिळालेल्या माहितीनुसार हे छोटे गाव असावे असा मी समज केला होता. १९८४ सालापर्यंत या गावात पाण्याचे फार मोठे दुर्भिक्ष्य होते. मात्र कृष्णा साखर कारखान्याची पाणी योजना आल्यानंतर हे गाव सुजलाम सुफलाम झाले आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती पूरक उद्योग हाच आहे. या गावात प्रामुख्याने धनगर समाजातील लोक जास्त आहेत, त्यांच्या जमिनीही जास्त आहेत. गावात अतिशय जुने बिरोबा देवस्थान आहे. या हे मंदिर अतिशय प्रसिद्ध असून काले, काले टेक, मुनावळे नारायणवाडी या गावांचे श्रद्धास्थान आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर प्राथमिक शाळेसमोर आम्ही झाडे लावण्यासाठी थांबलो. या ठिकाणी अगोदरच गावचे सरपंच सुरेखा काकडे यांचे पती सचिन काकडे ,श्री सुरेश जाखले, श्री माणिक गंगावणे, माजी पोलीस पाटील, ग्रामपंचायत सेवक श्री सुहास गडाळे, दीपक काकडे, शिवाजी मोटे आले होते. त्यांनी अतिशय आदराने आमचे स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात एका बाजूला आम्हीच वडाचं एक झाड लावले. पुंडलिक वरदेव असा जयघोष केला आणि आम्ही प्राथमिक शाळेच्या इमारतीत जाऊन थांबलो.
या शाळेची अतिशय रंजक माहिती बोलताना आम्हाला मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली पहिल्यांदा या गावात शाळेची स्थापना केली आहे. काले या गावात रयत ची पहिली शाळा स्थापना केली गेली असे सांगितले जाते मात्र येथील ग्रामस्थांच्या मते काले गावाच्या अगोदरच धोंडेवाडी गावात कर्मवीरांनी ही पहिली प्राथमिक शाळा काढली. या शाळेच्या उद्घाटनासाठी कर्मवीर भाऊराव पाटील स्वतः गावात आले होते. यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा या गावास भेट दिली होती.गावात आनंदराव पाटील विद्यालय आहे.आनंदराव पाटील हे स्वातंत्र सैनिक होते. काले येथै हायस्कूल असतानाही या गावापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर धोंडेवाडी येथे रयत शिक्षण संस्थेने आणखी दुसरे हायस्कूल सुरू केले यामागे या गावाची कर्मवीर भाऊराव पाटलांवर असणारी श्रद्धा हे कारण आहे,असे आम्हाला ग्रामस्थांनी सांगितले.
सुनील काकडे यांनी यादरम्यान बोलताना गावातील रूढी परंपरा विषयी खूप चांगली माहिती दिली. या गावात लोक अतिशय सहकारी वृत्तीचे आहेत. बिरोबा मोठे देवस्थान आहे. या गावात असणारा वेताळबा परिसरातील चार गावांचं श्रद्धास्थान आहे. बिरोबाचे यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. नवसाला पावणारा बिरोबा देव आहे. बिरोबा देवाला केलेले नवस फेडण्याची एक वेगळी पद्धत या गावात आहे. त्याला गुगळ असे म्हणतात. ज्याने देवाला नवस केले आहे तो डोक्यावर एक मडके घेतो, त्याच्यामध्ये वातीचा दिवटा ठेवून पेटवला जातो. हे गुगळ डोक्यावर घेऊन ती व्यक्ती अनवाणी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून बिरोबा मंदिरासमोर जाते आणि त्यानंतर ते नवस फिटते, प्रत्येक वर्षी पाडव्याला या देवाची फार मोठी यात्रा असते. पाडव्यादिवशी नवस फेडण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात .
सुनील काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यां समवेत गप्पा मारताना या गावा विषयी माहिती मिळालीच शिवाय आणि परंपराही कळाल्या. चहापाणी करून आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला.
आजची वारी भर पावसात झाली खरी पण आम्हाला खूप आनंदाची वाटली. चालण्याचा कुठलाही त्रास आला वाटला नाही. जिवाभावाची नवीन माणसं भेटली, डिचोली गावाची माहिती मिळाली, आगाशिवगडला जाण्यासाठी नवीन रस्ता पाहायला मिळाला. अतिशय आनंदात वारी संपन्न झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...