फॉलोअर

२४ मार्च २०२६

माझं साहित्य प्रेम

साहित्यप्रेमाची माझी वाटचाल

माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम बाबा पाटणकर यांच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षांपासून पाटण येथे भडक बाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी या संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रित करण्यात आले, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसतो, तर तो एक साहित्यिकही असतो. पुढारीचे पत्रकार आणि विक्रम बाबा पाटणकर यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद वाटतो.

मी स्वतःला एक साहित्यप्रेमी मानतो. माझ्या साहित्यप्रेमाची सुरुवात लहानपणीच झाली. टिळक हायस्कूलमध्ये असताना ग्रंथपाल पोतदार सर आम्हाला छोटी-छोटी पुस्तके वाचायला देत असत. घरातही वाचनाची परंपरा होती. माझी थोरली बहीण ग्रंथपाल असल्यामुळे पुस्तकांचा सहवास अधिक मिळाला.
याच काळात हिमांशू जोशी यांच्या ‘तेरे लिये’ या हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद वाचला आणि साहित्याशी एक वेगळे नाते निर्माण झाले.

पुढे कराड तालुक्यातील शिवाजीराव भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानांनी साहित्याची आवड अधिक वृद्धिंगत केली.

महाविद्यालयीन जीवनात वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’ ही कादंबरी माझ्या हाती लागली. या कादंबरीने माझ्या विचारविश्वावर खोल परिणाम केला. इतकेच नव्हे तर मी या कादंबरीच्या सखोल नोट्सही तयार केल्या.

त्यानंतर व. पु. काळे यांच्या लेखनाच्या प्रेमात पडलो. त्यांची ‘पार्टनर’ ही कादंबरी मी पाच-सहा वेळा वाचली आहे. त्यांच्या लेखनातील साधेपणा आणि जीवनाशी असलेली नाळ मनाला भिडणारी आहे.

१९९६ साली सद्गुरु वामनराव पै यांचे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे पुस्तक वाचले. या पुस्तकाने आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांची दिशा दिली. तसेच डॉ. जोसेफ मर्फी यांचे ‘पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड’ आणि ‘सक्सेस थ्रू पॉझिटिव्ह मेंटल अ‍ॅटिट्यूड’ या पुस्तकांनीही माझ्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकला. या पुस्तकांच्या नोट्सही मी तयार केल्या.

महाविद्यालयीन काळात हरिवंश राय बच्चन यांच्या कविता तसेच मराठीतील अनेक कवींच्या साहित्याचे वाचन केले. या सर्व वाचनातून माझे विचारविश्व समृद्ध होत गेले.

थांबता आलं पाहिजे


थांबता आलं पाहिजे,
योग्य वेळी, योग्य ठिकाणी,
कारण प्रत्येक धावणं जिंकण्यासाठी नसतं,
कधी थांबणंही जिंकण्यासारखंच असतं.

नाही म्हणायला शिकलं पाहिजे,
योग्य क्षणी, अयोग्य व्यक्तीला,
कारण आपल्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्यांना
मर्यादा दाखवणंही गरजेचं असतं.

बोलता आलं पाहिजे,
योग्य ठिकाणी अन्यायाविरोधात,
कारण मौन कधी कधी सहमती ठरते,
आणि आवाजच बदलाची सुरुवात असते.

शांत राहता आलं पाहिजे,
योग्य क्षणी, संयमाच्या वेळी,
कारण प्रत्येक उत्तर शब्दांत नसतं,
कधी शांततेतही ताकद असते.

सोडता आलं पाहिजे,
कधी कधी आपल्यानाही,
कारण नात्यांपेक्षा स्वतःची शांती
जास्त महत्त्वाची असते.

विसरायला हवं,
जे आपले नाहीत त्यांना,
कारण आठवणींमध्ये अडकून राहणं
हीही एक वेदना असते.

@सतिताभ

१८ मार्च २०२६

प्रायव्हसी एक गुपीत



अंतरंग @सतिताभ

*प्रायव्हसी — यशाची खरी ताकद*

काही गोष्टी आपण आपल्यापुरत्याच ठेवायला हव्यात.आपली स्वप्नं, योजना, प्रयत्न आणि पुढचं नियोजन — या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी जगासमोर मांडणं आवश्यक नसतं. उलट, अनेक वेळा त्या गुप्त ठेवणंच आपल्या यशाचं खरं गुपित ठरतं.

आजच्या काळात प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय झाली आहे. आपण कुठे जातो, काय करतो, काय मिळवणार आहोत — सगळं लगेच सोशल मीडियावर टाकतो. पण एक गोष्ट आपण विसरतो…
जगात सगळेच आपल्या आनंदात आनंदी नसतात.

“Privacy is power. What people don't know, they can't ruin.”हा विचार खूप काही सांगून जातो.

जोपर्यंत तुमचं काम, तुमची योजना इतरांना माहिती नसते, तोपर्यंत त्यावर कोणीही परिणाम करू शकत नाही. पण जसं ते बाहेर येतं, तसं त्यावर चर्चा, मत्सर, टीका आणि अडथळे सुरू होतात.

याचं एक साधं पण प्रभावी उदाहरण म्हणजे — चॉकलेट.
जेव्हा चॉकलेट पूर्णपणे पॅक केलेलं असतं, तेव्हा ते सुरक्षित असतं. कुणाचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. पण जसं ते उघडलं जातं, तसं लगेच माशा त्यावर जमा होतात.

आपल्या आयुष्याचंही तसंच आहे —
👉 गुप्त ठेवलेली गोष्ट सुरक्षित राहते
👉 उघड केलेली गोष्ट आकर्षण आणि अडथळे दोन्ही निर्माण करते.

तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला गेलात, एखादी मोठी योजना आखली, किंवा काहीतरी खास साध्य करणार असाल — ते लगेच सगळ्यांना सांगणं गरजेचं नाही.कारण त्या क्षणाचा खरा आनंद आणि त्या कामाची खरी ऊर्जा ही शांततेत आणि गोपनीयतेत वाढते.
अनेक वेळा आपण स्वतःच आपलं नुकसान करून घेतो —
जास्त बोलून, जास्त दाखवून, जास्त शेअर करून.

म्हणूनच लक्षात ठेवा —

✔ शांतपणे काम करा.
✔ योजना पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवा.
✔ यश मिळाल्यावरच जगाला दाखवा.

कारण…
👉 जे लोकांना माहिती नाही, ते ते बिघडवू शकत नाहीत.
👉 आणि जे शांतपणे घडतं, तेच मोठं आणि टिकाऊ यश देतं.

✅*सतीश मोरे सतिताभ*
९८८११९१३०२

०३ मार्च २०२६

ग्रहण लागलं आहे चंद्राला आणि नात्याला

चंद्रग्रहण विशेष 🌙 

सखी...

इथं 
धरतीवर ग्रहण लागलं आहे
बुद्धीला आणि नात्यालाही...
शब्द जिवंत आहेत पण
भावना मात्र हरवल्यात...

आतमध्ये कुठंतरी
खोलवर खंडग्रास ,
प्रकाश दिसतो बाहेरून
आत मात्र खोल अंधार..

तिथं,
नभात ग्रहण लागलंय चंद्राला,
तो चंद्र खुप सोसतोय—
त्यालाही त्रास होतोय...

क्षणभर काळी सावली येते,
प्रकाश त्याचा झाकून टाकते;
पण चंद्र हार मानत नाही,
तो पुन्हा तेजानं उजळतो रात्रीला...!

आपल्या मनालाही कधीतरी
अशाच सावल्या कवेत घेतात,
संशयांचे ढग दाटून येतात
आणि नात्यांवर काळी रेष ओढतात.

सखी,
पण लक्षात ठेव—
ग्रहण कायमचं नसतं,
ते फक्त थोडा काळ असतं;
सावली सरली की
प्रकाश पुन्हा उमलतो.

चंद्रासारखंच आपणही
थोडं सहन करायचं, 
थोडं समजून घ्यायचं;
कारण प्रत्येक अंधारानंतर
उजेड तिथं वाट पाहत असतो..
उजेड तिथं वाट पाहत असतो....!

@सतिताभ
०२.०२.२०२६
चंद्रग्रहण विशेष 
हॉटेल निवांत सातारा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...