फॉलोअर

१२ जुलै २०२१

विंग गाव

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१२ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आजच्या आमच्या निसर्ग वारीला सुरुवात झाली ढेबेवाडी खोऱ्यातील विंग येथून. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने सुरली घाट,शामगाव घाट, मसूर परिसर,उंब्रज परिसर ,तळबीड परिसर तसेच विजयनगर तांबवे परिसर करत आम्ही आज कराड-ढेबेवाडी रस्ता परिसरात आलो होतो. विंग फाट्यापासून ६.३० वाजता चालायला सुरुवात केली. या ठिकाणी आमच्या स्वागतासाठी नवीन ओळख झालेले अमोल खबाले पाटील आले होते. त्यांच्यासोबत आम्ही गावात निघालो.
विंग गाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. कराड दक्षिणमधील सर्व निवडणुकीचा शुभारंभ विंगच्या मारुती समोर नारळ फोडून केला जातो. मारुती मंदिरासमोर ७ वाजता पोहचलो. या चौकात वडाचा वृक्ष आहे, त्या समोर अनेक सभा झाल्या आहेत संपूर्ण नवीन गावाला प्रदक्षिणा घातली अन पूढे निघालो.
विंग गावातील अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत मात्र पंढरीच्या वारीच्या निमित्ताने माझ्या आणि रणजित पाटलांच्या ओळखीचे झालेले बारा नंबर दिंडीतील अनेक वारकरी आमचे जीवाभावाचे आहेत. वर्षभर त्यांच्याशी आमचा संपर्क असतो. आळंदी ते पंढरपूर माझी जेव्हा पहिली वारी झाली निवास खबाले पाटील यांचा एम एस 94 95 नंबरचा एक ट्रक माझा वारीतील सोबती होता. निवास खबाले हे अनेक वर्षापासून बारा नंबर दिंडीसाठी आपला ट्रक घेऊन वीस दिवस सहभागी असतात. या ट्रक मधून वारकऱ्यांचे सर्व साहित्य नेले जाते. विंग मध्ये आल्यानंतर निवास खबाले यांची आठवण झाली आणि तेवढ्यातच निवास खबाले आमच्यासमोर आले. याला योगायोग म्हणायचा की माऊलीची कृपा हेच मला कळले नाही.राम कृष्ण हरी म्हणून त्यांची चौकशी करून आम्ही पुढे निघालो.
मघाशी सांगितल्याप्रमाणे या पालखी सोहळ्यात मिळालेले विंग गावातील आणखीन 3 सहकारी म्हणजे बाळासाहेब कुराडे आणि पांडुरंग होगले,संजय खबाले. या वारकऱ्यांसोबत माऊलीच्या सोहळ्यातील अनेक आठवणी आहेत. गावातून आम्ही पुढे जात असताना टप्प्याटप्प्याने आम्हाला हे तिन्ही सहकारी येऊन मिळाले.
अमोल खबाले सुरुवातीपासून आमच्यासोबत दिंडीमध्ये सहभागी झाले होते, गावातून बाहेर आल्यानंतर विंग खिंड येथे वृक्षारोपण करण्याचे आमचे नियोजन होते, त्यानुसार आम्ही हरिपाठ करत पुढे चालत राहिलो.
खिंडीच्या जवळ आल्यानंतर डावीकडे वळून आम्ही कानिफनाथ मंदिराकडे जायला निघालो. या मंदिराकडे जाणारा रस्ता कच्चा, चिखलाचा होता. विंग फाटा ते खिंड तीन किलोमीटर अंतर आम्ही डांबरी रस्त्यावरून आलो होतो,आता चिखलातून जायचे होते. पाऊस पडून गेला होता .या रस्त्यातून शेतकरी येताना आम्ही पाहिले. अशा चिखलातून सुद्धा एक शेतकरी सायकलवरून उसाचे ओझे कसेबसे घेऊन निघाला होता, त्याचे हे कष्ट पाहून आम्हाला या रस्त्याचे काहीच वाटले नाही. त्या शेतकऱ्याला भेटल्यानंतर त्याने 'हे आमचं रोजचंच काम आहे असे सांगून सगळे दर वाढतात मात्र दुधाचे दर का वाढत नाहीत आणि दुधाचे दर वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात तेवढे पैसे का मिळत नाहीत' असा सवाल करून तो तिथून निघून गेला. शेतकऱ्यांच्या समस्या बाबत बोलावं तेवढं कमी आहे. यावर चर्चा करत आम्ही पुढे आलो.
एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर पुढे डांबरी रस्ता आला आणि तिथे श्रीकृष्ण सिटी हा बोर्ड पाहिला. तेथून पुन्हा डावीकडे कानिफनाथ मंदिराकडे जाण्याचा रस्ता ओढ्यातून होता. ओढ्यात संथ पाणी वाहत होते आणि अतिशय सुंदर असा तो नजराणा होता.ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यात माशासारखी बेडकांची पिल्ले विहार करत होती. बेडकांच्या जीवनक्रमामध्ये पाण्यात पोहणारी छोटीची पिल्ले माशासारखे असतात, त्यानंतर त्यांचे शेपूट निघून जाते व ती पिल्ले मोठी होऊन जमिनीवर येतात, असे आम्हाला उपस्थित अमोलनी सांगितले. पाण्याच्या प्रवाहात अनेक छोटे छोटे जलचर होते. त्यापैकी सर्वांच्या ओळखीचा एक जलचर म्हणजे निवळी. निवळी हा जलचर पाण्याच्या पृष्ठभागावर झिगझँग सारखा पोहत असतो. अस्वच्छ झालेले पाणी पाच मिनिटात तो स्वच्छ करतो. अशा ओढ्याच्या ओघळीच्या रस्त्यावरून चालताना आम्हाला खूप मजा येत होती.
निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद शेतकरी दररोज घेतात मात्र आज आम्ही घेत होतो. तेवढ्यात डोक्यावर मक्याचे ओझे घेऊन येणारा एक शेतकरी आम्हाला भेटला, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही कुणीतरी अधिकारी आहे अशा भीतीने तो आमच्याशी न बोलता तिथून निघून गेला. पुढे आलो उजव्या बाजूला कानिफनाथ मंदिराकडे जायला रस्ता होता. मंदिरासमोर पोहचलो. हे एक छोटेसे मंदीर आहे. या कानिफनाथांच्या नावानेच विंगातून प्रत्येक वर्षी पंढरपूरला दिंडी जाते, ही दिंडी फक्त कार्तिकी एकादशीला असते. नाथांना नमस्कार करून आम्ही परत आलो. येताना नाथपंथातील गुरुशिष्य परंपरेविषयी माहिती घेतली. नाथपंथातील शेवटचा अनुग्रह निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिला आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्व जगाला ज्ञानरूपी अनुग्रह दिला,असा नाथपंथाचा इतिहास आहे.
पुन्हा त्याच रस्त्याने विंग खिंडीत पोहोचलो. या खिंडी जवळ गावचे श्रद्धास्थान असणारे म्हसोबाचे मंदिर आहे. खूप जुने छोटेखानी हे मंदिर आहे. या मंदिरासमोर आम्ही सर्व मान्यवर वारकऱ्यांच्या उपस्थित खड्डा काढला आणि वडाचे झाड लावले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला.
दरम्यान पांडुरंग होगले माऊलींनी सर्वांच्या डोक्यावर गंध अबीर लावला. खूप दिवसातून हा गंध डोक्यावर लावायचा संधी मिळाली. दोन वर्षापूर्वी पंढरीच्या वारीत डोक्यावर गंध लावला होता. वारकरी संप्रदायाची ती परंपराच आहे. गंध बुक्का टिकली लावण्याचे सर्व साहित्य माळकरी, वारकऱ्यांच्या बॅगेत असते. तो सकाळची नित्य पूजा करून डोक्यावर गंध लावतोच. आमच्यासारख्या वारकऱ्यांच्या डोक्यावर गंध लावण्यासाठी संपूर्ण वारीत अनेक जण भेटतात. गंध लावणारे छोटे व्यावसायिक आहेत,या माध्यमातून वारीत मोठा व्यवसाय होतो. विंगच्या खिंडीत झाड लावून झाल्यानंतर आम्ही गावात येऊन बाळासाहेब कुराडे यांच्या घरात चहा पाणी घेतले. आणि विंग खिंडीतून धोंडेवाडी मार्गे कराडला परत आलो. येताना काले टेक नर्सरीत वडाचे व इतर झाडांची चौकशी केली. या नर्सरीमध्ये एक खूप मोठी गोगलगाय पहिली. एवढी मोठी गोगलगाय मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.
निसर्ग वारीमध्ये आम्ही आज निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटला. डांबरी रस्ता,चिखलाचा रस्ता आणि ओढ्याचा रस्ता या तिन्ही मार्गावरून आम्ही चाललो. अतिशय सुंदर असा अनुभव होता.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...