फॉलोअर

नैतिक अधःपतन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नैतिक अधःपतन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१६ जानेवारी २०२६

नैतिक अधःपतन @९९


नैतिक अधःपतन @299

'पुढारी' प्रतिसंमावरून 

परवा एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त सुर्ली घाटातून जाण्याचा योग आला. कडेगाव–विटा–सोलापूरला जाताना हा घाट लागतो. यापूर्वीही या घाटातून अनेकदा प्रवास केलेला आहे. या घाटाच्या पायथ्याशी सदाशिवगड पंचक्रोशीतील अनेक गावांचे ग्रामदैवत असलेले जानाई देवीचे मंदिर आहे. येथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते.मात्र त्या दिवशी या मंदिर परिसरातून जाताना जे दृश्य पाहायला मिळाले, त्यामुळे अक्षरशः डोकं सुन्न झालं.

खरं तर मंदिराच्या आसपास खेळण्यांची दुकाने, छोटी हॉटेल्स, चहाचे टपरे, प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असायला हव्या होत्या. हा परिसर विकासाच्या दृष्टीने पुढे जायला हवा होता. येथे चांगले रेस्टॉरंट, हॉटेल किंवा चहाचा गाडा सहज चालू शकला असता. पण प्रत्यक्षात तसं काहीच दिसलं नाही.

उलट मंदिराच्या अगदी समोरच एक  पंचतारांकित लॉज उभा राहिलेला दिसला. त्याचे नुकतेच उद्घाटन झाले होते. त्याच्या थोडे पुढे गेल्यावर आणखी एक लॉज दिसला. एवढ्या दुर्गम घाटरस्त्यावर दोन लॉजची गरज आहे का? मी कार चालवत होतो. शेजारी माझे दोन पत्रकार मित्र बसले होते. जसा सुर्ली घाट चढायला सुरुवात केली, तसा पुन्हा एकदा धक्का बसला. संपूर्ण घाटात चक्क आठ-दहा ठिकाणी मोठमोठे फलक झळकत होते — “फक्त २९९ रुपयांत लॉज उपलब्ध”. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिशादर्शक फलक कमी होते पण “२९९ मध्ये लॉज उपलब्ध, खाली मोबाईल नंबर, पाण्याची बाटली फ्री” अशा जाहिरात फलक प्रत्येक वळणावर होते.

२९९ रुपयांत लॉज भाड्याने मिळतो, म्हणजे तिथे नेमकं काय चालतं? त्या लॉजमध्ये असं काय आहे की अशा पद्धतीने जाहिरात करावी लागते? जनमानसाचा कानोसा घेतला, परिसराचा अभ्यास केला आणि या प्रश्नांची उत्तरे शोधू लागलो, तसं मन अधिकच अस्वस्थ झालं.

मसूर परिसरात ५०० ते ८०० रुपयांत लॉज उपलब्ध आहेत. त्याचेही फलक शामगाव घाटात लावलेले आहेत. काही लॉजमध्ये तासावर सेवा दिली जाते. काही ठिकाणी तर ओळखपत्रही घेतली जात नाहीत. या लॉजमध्ये नक्की काय चालतं? कराड तालुक्यात खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय वाढलेला आहे का?  या लॉजची गरज कुणासाठी आणि कशासाठी आहे?

२९९ रुपयांत मिळणाऱ्या खोल्यांचा वापर नैतिक अधःपतनासाठी होत असल्याची चर्चा उघडपणे ऐकू येते. महाविद्यालयीन युवकांमध्ये या लॉजची मोठ्या प्रमाणावर क्रेझ (?)आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचं, मोठं होण्याची स्वप्नं पाहायची आणि करियरचा बेस पक्का कयायचा, त्या वयातच गर्लफ्रेंड–बॉयफ्रेंडच्या नावाखाली ही मुलं कोणताही विचार न करता चुकीच्या मार्गावर जात आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलामुलींची संख्या खुप आहे.हे चित्र केवळ सुर्ली शामगाव घाटापुरते मर्यादित नाही. कराड शहर व मलकापूर  परिसरात एका  पैलवानाचे तसेच एका नामवंत उद्योगपतीचे अनेक लॉजेस आहेत. या लॉजमध्ये कराड शहरातील पर्यटकांची मोठी गर्दी असते, असे मात्र दिसत नाही. दिवसभर लॉज सुरू असतात; परंतु संध्याकाळी चौकशी केली तर बहुतेक ठिकाणी मुक्कामी कोणीच नसते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर लॉज उभे राहण्यामागचं कारण नेमकं काय?

उंब्रज परिसर तर जणू काही लॉज गैरप्रकारांचं माहेरघरच बनलं आहे. कराड–मसूर रस्त्यावर, तासवडे टोलनाका परिसरात ‘लॉज’ नावाखाली एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या कृपेने गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. संबंधित लॉज चालक सर्वांना ‘मॅनेज’ करतो, अशीही माहिती आहे. काही नवीन युवकांना तर या धंद्याचं प्रशिक्षण दिलं जातं — “लॉजचा धंदा काढा, सगळं व्यवस्थित चालतं, दिवसाला एवढे मिळतात, वर्षभरात गुंतवलेले पैसे निघतात” — अशी शिकवण दिली जाते.

परवा सह्याद्री साखर कारखान्यावर साखर आणण्यासाठी गेलो होतो. रेल्वे गेट ओलांडून थोडं पुढे गेल्यावर एक साधं घर दिसलं. त्या घराबाहेर ‘लॉज’ असा फलक लावलेला होता. इतक्या छोट्या घरात लॉज चालवण्याची परवानगी कोणी दिली? त्याचे नियम काय आहेत? त्या लॉजमध्ये नेमकं काय चालतं? या प्रश्नांची उत्तरे शोधली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं.

साधारणपणे कराड तालुक्यातील उंडाळे परिसर, रेठरे कारखाना, शिवनगर, मसूर, कोपर्डे, उंब्रज किंवा जिथे शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्या आहेत, अशा भागांत लॉजची संख्या प्रचंड आहे. गेल्या दहा वर्षांत हे लॉज मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेले आहेत. या लॉजची नोंदणी कुठे आहे, याचा अभ्यास पोलिसांनी करायला हवा. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार हे लॉज परगावातील लोकांचे असून, त्यांनी गावागावांत इमारती बांधून किंवा जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे.

सुर्ली घाटावर जाताना “२९९ रुपयांत लॉज उपलब्ध” असा फलक पाहिल्यानंतर या लॉजमध्ये सुरू असलेली स्पर्धा किती टोकाला गेलेली आहे, याची प्रचिती येते. कराड तालुक्याची आर्थिक परिस्थिती पाहता शहरातील चांगल्या हॉटेलमध्ये साधारण २ हजार रुपयांच्या आसपास खोली मिळते. मग शहराबाहेरील किंवा मलकापूर परिसरातील लॉजमध्ये हजार ते बाराशे रुपयांत खोली कशी मिळते? स्पर्धेमुळे हे दर ८००–९०० रुपयांपर्यंत खाली येतात. त्याही पुढे जाऊन काही लॉज चालकांनी “तासावर लॉज उपलब्ध” असे फलक सरळ बाहेर लावले आहेत.ग्राहक मिळवण्यासाठी सुर्ली घाटात “२९९ रुपयांत लॉज उपलब्ध” असा फलक लावला जातो. या जाहिरातींमुळे एक संपूर्ण पिढी बर्बाद होत आहे, याची जाणीव या लॉज मालकांना का होत नाही?

जर २९९ रुपयांत नैतिक अधःपतन घडत असेल, तर पुढे काय होणार? पुणे–मुंबईत जे घडतं, तेच आज कराड, उंब्रज, मसूरसारख्या छोट्या गावांत घडत असेल, तर पुणे–मुंबईला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे?कराड शहर हे शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळखलं जातं. शासकीय व खासगी महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नैतिक अधःपतनासाठी अशा प्रकारचे लॉज उपलब्ध असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लॉज चालक फक्त दिवसभरात किती पैसे मिळतील, किती गल्ला जमेल, याचाच विचार करत आहेत, त्यांना समाजाचं कसलेही घेणे-देणे नाही.

वाढत चाललेली तथाकथित लॉज संस्कृती ही केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक आणि प्रशासकीय अपयशाची स्पष्ट खूण आहे. या लॉजमुळे युवकांचे भविष्य, शैक्षणिक वातावरण आणि समाजाची मूल्यव्यवस्था धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ टीका करून थांबणे पुरेसे नाही; ठोस आणि तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत.

तालुक्यातील सर्व लॉज, विश्रांतीगृहे व खासगी मुक्काम सुविधा यांची नवीन तपासणी मोहीम राबवली पाहिजे. कोणतीही लॉज परवाना, नोंदणी, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, आरोग्य विभागाची मान्यता याशिवाय चालू राहू नये. नियमबाह्य लॉज तात्काळ बंद करण्यात यावीत.

प्रत्येक लॉजमध्ये दोन्ही व्यक्तींचे वैध ओळखपत्र घेणे बंधनकारक करावे. प्रवेशद्वार, रिसेप्शन आणि पार्किंग परिसरात सीसीटीव्ही सक्तीचे करावेत. तासावर खोल्या देण्यास स्पष्ट बंदी घालावी.

पोलीस, नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे अचानक तपासण्या (Surprise Raids) कराव्यात. “मॅनेजमेंट” संस्कृती मोडीत काढण्यासाठी कारवाई केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसली पाहिजे.

महाविद्यालये, शाळा, वसतिगृहे यांच्यापासून ठराविक अंतरात लॉज चालवण्यास बंदी घालावी. शिक्षणनगरी म्हणून ओळख असलेल्या कराडसारख्या शहरात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

या विषयाकडे केवळ प्रशासनाची जबाबदारी म्हणून पाहून चालणार नाही. पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, ग्रामसभा यांनी युवकांशी संवाद साधला पाहिजे. नैतिक शिक्षण, समुपदेशन आणि मार्गदर्शनाची गरज आज अधिक तीव्र आहे.

“२९९ रुपयांत लॉज”, “तासावर रूम” अशा फलकांवर कायदेशीर बंदी घालावी. सार्वजनिक ठिकाणी, घाटरस्त्यांवर अशा जाहिराती लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.

लॉज संस्कृतीऐवजी खरे पर्यटन, स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स, चहाचे टपरे, हस्तकला, ग्रामीण पर्यटन यांना प्रोत्साहन देण्यात यावे. युवकांना रोजगाराच्या सकारात्मक संधी उपलब्ध झाल्या, तर चुकीच्या मार्गाकडे जाण्याचे प्रमाण आपोआप कमी होईल.

आज २९९ रुपयांत मिळणारी खोली उद्या समाजासाठी फार मोठी किंमत वसूल करू शकते. एक पिढी बर्बाद होण्याआधीच प्रशासन, समाज आणि लोकप्रतिनिधींनी जागं होणं गरजेचं आहे. अन्यथा आपण उद्या केवळ प्रश्न विचारणारे नव्हे, तर त्याला जबाबदार ठरणारे ठरू.

सतीश मोरे पुढारी कराड 
९८८११९१३०२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...