आठवण पहिल्या अमिताभ दर्शनाची
आणि 'मन का हो तो अच्छा' या संवादाची!
१९९८ साली सन्माननीय राज ठाकरे यांच्या शिवउद्योग सेनेच्या वतीने अमिताभ बच्चन यांचा पुणे येथील गणेश कला क्रीडा मंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित केला असल्याची बातमी पेपरमध्ये माझ्या वाचण्यात आली. या कार्यक्रमाला जायचंच असा निश्चय करून माझे मित्र आणि आमच्या यादव- मोरे क्लासेसचे माझे सहकारी अजित यादव यांना गाडीवर बसवलं आणि माझ्या , पहिल्या कमाईवर मी स्वतः विकत घेतलेल्या नव्या बॉक्सर सिटी हंड्रेड MH११ N २७२९ वरून आम्ही पुणे गाठले.
तो दिवस होता ११ नोव्हेंबर १९९८. सायंकाळी सहाच्या दरम्यान कार्यक्रम होता. तिथं माझा बालमित्र हणमंत काशिद अगोदरच पोहचला होता.आम्ही तिथे पोहोचेपर्यंत सर्व हॉल गच्च भरून वाहत होता. बाहेरही खूप गर्दी झाली होती. आत जायला जागाच उरली नव्हती. साडेपाच सहाच्या दरम्यान आमचे लाडके अमिताभ बच्चन आलिशान गाडीतून उतरले आणि थेट हॉलमध्ये गेले. मी त्यांना पाठमोरे पाहू शकलो. त्यांची ती पाठमोरी छबी आजही माझ्या नजरेत साठवली आहे.
कार्यक्रम सुरू झाला. अमिताभ बच्चन यांनी 'मै ओर मेरी तनहाई' सादर केली. तसेच आयुष्यात घडलेले काही प्रसंग सांगताना सदैव पुढे चालत रहा असा संदेश देऊन उपस्थित युवकांना उर्जा दिली. बाहेर उभा राहून स्पिकरवरुन आम्ही कार्यक्रम ऐकला. त्या दिवशी पुण्यात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची बातमी पेपरमध्ये येणारच याची खात्री होती. त्यामुळे स्वारगेट स्टँडवर जाऊन पुढारी घेतला,तो अंक आजही माझ्या संग्रही आहे. पुढारीमध्ये अमिताभ बच्चन यांचे भाषण आले होते, जे मी ऐकले होते . काय होते त्या भाषणात?
"मन का हो तो अच्छा, नहीं हो तो और भी अच्छा" अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन अमिताभजी तोंडून ऐकलेला हा दिव्य विचार मला खूप भावला. ''जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर ते खरंच चांगलं असतं पण दुर्दैवानं आपल्या मनासारखे झालं नाही तर ते त्याहुन अधिक चांगलं असतं. कारण जे आपल्या मनासारखं होत नाही, ते ईश्वराच्या मनासारखं असतं आणि ईश्वर कधीही कुणाचं वाईट करुच शकत नाही"
बच्चन यांच्या वडिलांचा हा दिव्य विचार खुद्द बच्चन यांच्या तोंडून मी ऐकलेला आहे. हा विचार माझ्या मनावर त्या दिवसापासूनच इतका भिनला आहे की कधीही मला कोणत्याही अडचणी आल्या, कार्यालयीन, सामाजिक, वैयक्तिक असो किंवा कौटुंबिक असो मी हे वाक्य डोळ्यासमोर घेतो आणि मला प्रश्नांची उत्तरे मिळतात.
१९९८ साली पाठमोरा पाहिलेला तो अमिताभ बच्चन माझ्या आजही आठवणीत आहे मात्र त्या कार्यक्रमात दिलेल्या तो संदेश माझ्या मनावर खूप बिंबलेला आहे.
सतीश वसंतराव मोरे
९८८११९१३०२
मी अमिताभ बच्चन प्रेमी.