फॉलोअर

manohar shinde birthday लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
manohar shinde birthday लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०९ जानेवारी २०२६

उद्दीष्ट हट्टी मनोहर शिंदे

उद्दिष्ट ‌‘हट्टी‌’ राजकारणी..

मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे, ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं खरं करणाऱ्या ‌‘हट्टी मनोहर शिंदे भाऊ‌’ यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस,त्यानिमित्ताने...

मलकापूरसारख्या छोट्या गावातील एक युवा कार्यकर्ता ते प्रगल्भ राजकारणी असा मनोहर शिंदे यांचा प्रवास मी गेल्या चोवीस वर्षांपासून अनुभवला आहे. माजी आमदार भास्करराव शिंदे यांचा मुलगा, केवळ अशी ओळख असणारे मनोहर शिंदे, ज्यावेळी ते काहीच नव्हते तेंव्हापासून मनोहर शिंदे यांना मी पाहत आलो आहे. आता मात्र ‌‘मनोहर शिंदे भाऊ‌’ या नावाचा ब्रँड कराड, मलकापूरसह जिल्ह्यात तयार झाला आहे. परंतु हा प्रवास छोटा नाही, सोपा तर अजिबातच नाही. या प्रवासात मनोहर शिंदे यांना जे यश, कीर्ती आणि नाव मिळालं आहे, याची माझ्या अभ्यासातून किंवा माझ्या मते केवळ दोन कारणे आहेत. ती म्हणजे विशिष्ट कामासाठी स्वतःला झोकून देणे आणि ते काम होत नाही तोपर्यंत सतत पाठपुरावा करत राहणे.

सुरुवातीला मलकापूर ग्रामपंचायत होती, आता मलकापूर नगरपालिका झाली आहे. यामध्ये मलकापूर नगरपंचायत नावाचा एक टप्पा येऊन गेला. हा टप्पा फार महत्त्वाचा होता. ग्रामपंचायतीची मलकापूर नगरपंचायत करणे म्हणजे अंगावर अनेक शत्रू ओढवून घेण्यासारखे होते. कर वाढणार, शासनाचे नियम वाढणार, घरपट्टी वाढणार, पाणीपट्टी वाढणार अशा काही गोष्टी नकोशा असणारे सामान्य नागरिक आणि त्यांना चिथावणी देणारे राजकीय नेते यामुळे शक्यतो कोणी नगरपंचायत करायच्या नादाला लागत नाही. मनोहर शिंदे यांनी हे अग्निदिव्य स्वीकारले आणि खा. पृथ्वीराज बाबा यांच्या पाठीमागे लागून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून मलकापूरची नगरपंचायत करून आणली. नगरपंचायत झाल्यामुळे मिळणारा भरघोस विकास निधी आणि त्यामुळे गावाचा होऊ शकणारा विकास याची जाण शिंदे यांच्याकडे होती. सुदैवाने मनोहर शिंदे यांच्याकडे मलकापूरची सत्ता आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. आणखी दुधात साखर पडली, 2010 साली पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. मग मलकापूरला भरभरून विकासाची गंगाच वाहू लागली. विकासकामे ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. एक विकास झाला की दुसरी विकासकामे पुढे उभी असतात. त्यामुळे कमी-जास्त होत असलं तरी मलकापूरमध्ये एके काळी काहीच नव्हतं, मात्र ते सगळं आणण्यासाठी मनोहर शिंदे यांनी केलेली धडपड, केलेले प्रयत्न मी स्वतः पाहिलेले आहेत. कराड शहरालगत मोठ्या वेगाने विकसित होत असलेले मलकापूर शहर म्हणजे नागरिकांसाठी राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, तर व्यापाऱ्यांसाठी सोन्याची खाणच. सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी कृष्णा अभिमत विद्यापिठ व हॉस्पिटलच्या माध्यमातून मलकापूरच्या विकासाची कक्षा उंचावली. मलकापूर शहर वाढलं, विकसित झालं ते फक्त कृष्णा हॉस्पिटलमुळे. सर्व बाजूंनी विकसित झालेल्या मलकापूरमध्ये महामार्गालगत राहायला मिळणे, त्याबरोबरच कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळणे, सर्व प्रकारचे शिक्षण मिळणे आणि हे सगळे कमी खर्चात उपभोगायला मिळणे, ही संधी कोण कशी बरे घालवेल? आणि याच गोष्टीमुळे मलकापूरचा विकास झपाट्याने होत गेला, लोकसंख्या वाढत गेली. भौतिक सुविधा कमी पडू लागल्या. मग डोळ्यासमोर विकासाची ब्ल्यू प्रिंट ठेवून मनोहर शिंदे यांनी शहर विकासाचे नियोजन केले.
उत्तम, भव्य आणि सुंदर रस्ते हा तर प्रत्येकाचा अधिकार आहेच. रस्ते मोठे झाले तरच शहराचा विकास होतो हे खरे असले तरी विकसित होत असलेल्या मलकापूरमध्ये सुरुवातीला घरोघरी शुद्ध आणि मुबलक पाणी गेले पाहिजे, हा विचार डोळ्यासमोर ठेवून मनोहर शिंदे यांनी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना आखली. या योजनेच्या मंजुरीपासूनच ही योजना सुरू होणार का? चालणार का? टिकणार का? 24 तास पाणी कोणी देऊ शकतं का? 24 तास पाणी देऊन काय उपयोग होणार? मनोहर शिंदेंना यश मिळणार नाही? मलकापूर ग्रामपंचायत तोट्यात जाणार-अशा नकारात्मक आणि उलटसुलट चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र मनोहर शिंदे यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. देशभरात जिथे ही योजना सुरू आहे तिथे जाऊन माहिती घेतली, अभ्यास केला. 24 तास शुद्ध आणि मुबलक पाणी देणे शक्य आहे. हे पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय कमी होईल, लोकांना शुद्ध पाणी मिळालं की मलकापूरमध्ये लोक राहायला येतील, मलकापूरचा विकास होईल, लोकांना आरोग्य मिळेल-हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना उभी केली, चालवली. देशात आदर्शवत ठरवत या योजनेच्या माध्यमातून मलकापूरचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं. मनोहर शिंदे होते म्हणूनच ही योजना चालू शकली आणि यशस्वी झाली, यात काही शंका नाही. मनोहर शिंदे यांचा स्वभाव थोडासा हट्टी आहे, ते स्वतःचं खरं करतात. मात्र ते शहराच्या विकासासाठी हट्ट करतात, हे मी अनेकदा पाहिलं आहे. 24 बाय 7 योजना राबवताना त्यांनी हा हट्टच केला आणि या हट्टीपणामुळेच ही योजना यशस्वी झाली, हे त्रिवार सत्य आहे.

पालिकेत सलग दोन टर्म काँग्रेसच्या चिन्हावर बहुमत मिळणं हे सोपं काम नाही. मात्र मनोहर शिंदे यांना हे शक्य झालं कारण त्या काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तयार केलेलं नेटवर्क. मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे अतिशय जवळचे होते, आजही आहेत. कराड दक्षिणेत काँग्रेस पक्ष वाढीसाठी मनोहर शिंदे यांचं योगदान फार मोठं आहे. एकनिष्ठ असलेल्या मनोहर शिंदे यांनी जे जे मागितलं, ते तेे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत मलकापूरला दिलं.

शहराच्या विकासकामांबाबत किंवा डोळ्यासमोर ठेवलेलं उद्दिष्ट पार पाडण्यासाठी राजकारणात काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात. मनोहर भाऊंनाही त्यांच्या अलीकडच्या काळात एक राजकीय तडजोड करावी लागली. काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागलं. त्यांनी हा निर्णय मलकापूर शहराचा विकास, प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी राज्यात व केंद्रात असलेलं सरकार पाहून घेतला होता आणि त्यानुसार ते निवडणुकीला सामोरे गेले. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मनोहर शिंदे मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे, ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं खरं करणाऱ्या ‌‘हट्टी मनोहर शिंदे भाऊ‌’ यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस, त्यानिमित्ताने...यांच्यासारखा अभ्यासू नेता भारतीय जनता पक्षामध्ये घेताना मलकापूर शहरातील विविध घटकांचा नक्कीच विचार केलेला असावा. आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मनोहर शिंदे यांच्या सोबतीने नुकत्याच झालेल्या मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेलं यश निश्चितच उल्लेखनीय आहे. मनोहर शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे अनेक वार्डातील गणितं बदलली आहेत, हे प्रभागनिहाय मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व बाजूंनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, त्यांना खाली खेचण्यासाठी मलकापूरात येऊन अनेकांनी प्रयत्न केले, मात्र धुरंधर भाऊ त्यांना पुरून उरले. ते निवडणूक लढवत असलेल्या प्रभागासह मलकापूरातील घराघरातील माणसांचा त्यांना असलेला अभ्यास आणि थेट संबंध त्यांच्या उपयोगी आले. अनेक वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते म्हणून काम पाहिल्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांना भविष्यकाळात फार मोठी संधी देऊन जाणार आहे. असं म्हणतात, कोणताही निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो; घेतलेला निर्णय जो बरोबर करून दाखवतो, तोच खरा यशस्वी, तोच खरा खिलाडी. भविष्यात मनोहर शिंदे यांच्याकडून काय काम होणार, किती होणार आहे, हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. मनोहर शिंदे यांच्या माध्यमातून अभ्यासू नेता सभागृहात मिळाल्यामुळे त्यांनाच पुन्हा उपनगराध्यक्ष करण्याचा निर्णय आ. अतुल भोसले यांनी घेतला. मलकापूरात अपूर्ण राहिलेली कामे आता आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होणार आहेत. मलकापूर शहराला जे हवं ते मिळण्यासाठी मनोहर शिंदे हे कार्य करत राहणार आहेत, यात ते यशस्वी होतील अशी खात्री वाटते. 
मनोहर भाऊंना तुम्ही कधीही मुंबईत, पुण्यात किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये भेटलात, तर त्यांच्या हातात भलीमोठी फाईल असते. नगरविकास खात्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुठल्या खात्यातून निधी कसा आणायचा, प्रस्ताव कसा दाखल केला की निधी मिळतो, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. फाईल घेऊन कलेक्टरकडे जाऊन पाठपुरावा करणे, ती फाईल परत विभागीय आयुक्तांकडे गेली आहे का हे पाहण्यासाठी तिथे पोहोचणे आणि शेवटी मंत्रालयात ती फाईल कुठे पोहोचली आहे याचा पाठपुरावा करत त्या मंत्र्यापर्यंत पोहोचणे आणि ते काम करून घेणे, हे त्यांना चांगलं जमतं. परफेक्शन अर्थात परिपूर्णता हा शब्द मनोहर शिंदे यांना तंतोतंत लागू पडतो. राहणीमान असो, समाजात वावरण्याची किंवा बोलण्याची पद्धत असो किंवा पत्रव्यवहाराचा विषय असो-या सर्व ठिकाणी मनोहर शिंदे यांचा अचूकपणा ठळकपणे दिसून येतो. मंत्रालय स्तरावर द्यावयाची पत्रे, राज्य व केंद्रस्तरावर पाठवायची पत्रे मनोहर शिंदे अतिशय अचूकपणे तयार करतात. मुख्याधिकाऱ्यांना जी माहिती नसते, ती भाऊंना माहीत असते.
अनेक गोष्टींवर मनोहर शिंदे भाऊ आणि माझं एकमत असतं, मात्र कधी कधी आमचे तात्त्विक वाद होतात. त्यांच्या जवळच्या काही विघ्नसंतोषी लोकांनी अनेकदा आमच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला, मात्र भाऊंनी त्यांना वेळोवेळी अलगद फेकून दिलं. त्यामुळे आमच्या दोघांमधील वैयक्तिक संबंध कधीही दुरावले नाहीत. ‌‘पुढारी‌’च्या माध्यमातून अनेकदा मलकापूरच्या समस्यांबाबत वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्या लागतात. मात्र हे छापून आल्यानंतर मनोहर शिंदे यांनी कधीही ‌‘ही बातमी का छापली?‌’ म्हणून मला फोन केला नाही. उलट, ‌‘ही बातमी छापून आल्यामुळे आमचा फायदा झाला. या बातमीचे कटिंग दाखवून मी मंत्रालयात गेलो आणि मलकापूर स्मशानभूमीसाठी निधी आणला,‌’ असं मनोहर शिंदे मला आनंदाने सांगतात. हा त्यांचा गुण खरंच उल्लेखनीय आहे आणि सर्व सत्ताधाऱ्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. विरोधात छापून आलेल्या बातम्यांनाही जो सकारात्मकपणे घेतो, त्याचा फायदा उठवतो, असा राजकारणी मी क्वचितच पाहिलेला आहे. 
या पुढील काळातही मनोहर शिंदे यांच्या हातून मलकापूरवासीयांसाठी चांगली कामं होवोत, त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशा त्यांना शुभेच्छा!
- सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...