फॉलोअर

१९ डिसेंबर २०२३

जीवन शिक्षण विद्या मंदिर @ करवडी'


*जीवन शिक्षण विद्या मंदिर @करवडी* 

करवडी गावातील दिवस खुप रम्य होते. बालपणीचे, शालेय जीवनातील दिवस तर त्याहून वेगळे होते. एसटी स्टँड पाठीमागे माझी प्राथमिक शाळा होती,आहे. *शाळेला 'जीवन शिक्षण विद्या मंदिर, करवडी' असे नाव होते. खरंच जीवन शिक्षण विद्यामंदिर हे नाव किती सार्थ आहे हे त्या सरकारी शाळेत शिकलेले आहे त्यांनाच कळू शकेल*. या चारही शब्दाची आपण जर फोड केली तर आज शाळेत काय काय शिकलं, शिकले पाहिजे आणि काय शिकवलं जातं शिकवायला हवं, हे उमगेल.

जीवन शिक्षण...जीवन जगण्याचं शिक्षण देणारं केंद्र म्हणजे ही शाळा. शिक्षण म्हणजे काय.क्षणाक्षणाला शिकले पाहिजे, काहीतरी नवीन आत्मसात केले पाहिजे, हे शिकवणारे केंद्र म्हणजे माझी शाळा. विद्या मंदिर.. विद्या एखाद्या क्षेत्रात, विषयात पारंगत होणे आणि ती विद्या देणारी ही शाळा. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, सतत अभ्यास करत राहणं आणि हे देणारं केंद्र म्हणजे शाळा. शेवटचा शब्द आहे मंदिर. खरंच हे शाळा एक मंदिर असतं. जिथे ज्ञानाची पूजा केली जाते, ज्ञान हा देव असतो.शिक्षक गुरु असतात. शाळेची इमारत सुधारणा मंदिर असते. आपण देवाच्या मंदिरात कशासाठी जातो शांतता मिळवण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी. शाळा रुपी मंदिरात आपण ज्ञानार्जन करण्यासाठी जातो आणि हे मिळवलेले ज्ञान पुढच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडते. देवाच्या मंदिरात शांतता मिळते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो आणि आपण देवाला काहीतरी मागतो. शाळा रुपी मंदिरात जे ज्ञान मिळते हे ज्ञान मिळून आपण शहाणे होतो, पुढे पारंगत होतो, नोकरीला लागून पैसे मिळवतो, सुखी होतो आणि पुढच्या पिढीला हे ज्ञान देतो. 

*२००० सालच्या दरम्यान कुणा अतिहुशार अधिकाऱ्याच्या कि शिक्षण मंत्र्यांच्या डोक्यात काय आलं कुणास ठाउक! त्यानं जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव बदलून प्राथमिक शाळा असं केलं. कदाचित काही पुरोगामी लोकांच्या लोकांना 'मंदिर' हे नाव नको असेल म्हणून त्यांनी हे नाव बदलून टाकलं. असो..कालाय तस्मै नमः* 

"जीवन शिक्षण विद्या मंदिर करवडी" ही माझी शाळा खरंच संस्काराचं केंद्र होती, एक मंदिर होतं, आनंददायी ठिकाण होतं. माझं पहिली ते चौथी शिक्षण या शाळेत झालं. सुहास पिसाळ, रमेश पिसाळ, अरविंद पिसाळ, अनिल बनसोडे, रवि सुतार हे माझे वर्गमित्र. मला आठवतंय या शाळेत जाताना आम्हाला खूप आनंद व्हायचा. शाळा दहा वाजता असली तरी आम्ही मित्र साडेनऊ वाजता शाळेत जाऊन बसायचो. दप्तर कोपऱ्यात ठेवून मग आमचे खेळ सुरू व्हायचे. गुरुजी आल्यानंतर वर्ग उघडायचे. *माझ्यासहित सर्व विद्यार्थ्यांना पहीलं एकच काम असायचं शाळेचा परिसर स्वच्छ करणे*. शाळा स्वच्छ करण्यासारखी मजा खरंच कुठे नसेल.खराटे तिथे नसायचे मग आसपासच परिसरातील निरगुडी शोधायची. निरगुडी तोडायची आणि खराटा तयार करायचा. काही जणांकडे वर्ग स्वच्छ करण्याचे काम असायचे. कोपऱ्यात केरसुणी ठेवलेली असायची, ती घेऊन काही मुले मुली वर्ग स्वच्छ करायचे. त्याकाळी वर्गामध्ये थोड्याच फरश्या होत्या? साधी शेणाने सारवलेली खडबडीत जमीन. प्रत्येक शनिवारी आम्हाला वर्ग सारवायचे वेगळं काम असायचं. आसपास रस्त्यावर पडलेलं शेण गोळा करायचं आणि शाळा सारवायची. आपली शाळा आणि वर्ग स्वच्छ ठेवणे, सारवणे हे शिक्षण एवढ्या छोट्या वयात मिळालं होतं. म्हणून तर म्हणलं ना ही शाळा म्हणजे जीवन कसं जगायचं हे शिकवणारे एक मंदिर आहे. हे सारं करून मग प्रार्थनेसाठी उन्हात उभं रहायचं.  

सुर्यवंशी बाईंचा मी लाडका विद्यार्थी. मधल्या सुट्टीत मी घरी जेवायला गेलो की भाजलेले शेंगदाणे घेऊन यायचो आणि बाईना द्यायचो. बाईंनी माझ्या कडून पाढे छडी लागेने पाठ करवून होते.माझ्या शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग मला आजही आठवतात. आता ती शाळा काही अंशी पाडली आहे, जुन्या शाळेचा काही भाग अजून शिल्लक आहे. या शाळेने आम्हाला खूप काही दिलें आहे. आजही या शाळेत जायला मला फार आवडते. घरासमोरच शाळा असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर शाळेचे पटांगण म्हणजे आमच्यासाठी सारं काही असायचे. क्रिकेट हा तसा त्याकाळी थोडा महागडा खेळ होता. मग या शाळेच्या पटांगणावर सुरपाट्या, कबड्डीचे ग्राउंड आखले जायचे. रात्रीच्या अकरा बारा पर्यंत इथे खेळ चालायचे. विट्टी दांडू आणि गट्टया तर आवडते खेळ. या खेळात आम्ही इतकं रमायचे की घरची आठवण येत नसे. काही मित्रांची आई टिकारणं घेऊन यायची तेव्हा आमचा खेळ संपायचा. 

शाळेच्या परिसरात अनेक झाडे होती.आमच्या घरासमोरच शाळेच्या कंपाऊंड लगत एक वड आणि दोन बाभळीची झाडं होती. ही तिन्ही झाडे आता अस्तित्वात नाहीत. पण या झाडाखाली आम्ही खेळलेले खेळ, दुपारच्या सुट्टीत मारलेल्या गप्पा आजही आठवतात. या झाडाखाली बसून उन्हाच्या सुट्टीत खाल्लेले गारीगार आणि त्याची चव आजही जिभेवर रेगाळत आहे. कधी कधी माकडवाला यायचा, मग माकडाचे खेळ या झाडाखालीच व्हायचे. चौथीला मला या शाळेत 74 टक्के मार्क मिळाले माझा वर्गात दुसरा नंबर आला होता. पहिला नंबर अनिल बनसोडे किंवा रवी सुतारचा आला असेल. एवढे चांगले मार्क मिळाल्यानंतर माझ्या वडिलांच्या तीव्र इच्छेनुसार पाचवीला मला १९८२ साली कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. टिळक हायस्कूलचा प्रवास खूप सुंदर आहे, त्यावर लिहीनच पुढे कधी तरी. मात्र करवडी येथील प्राथमिक शाळेतील या आठवणी हृदयावर कोरलेल्या आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी आपली पहिली शाळा विसरू शकत नाही. जीवन शिक्षण विद्या देणारी माझी शाळा आणि त्या शाळेतील सर्व शिक्षकांना वंदन !

लेखन @कृष्णा विद्यापीठ कॅम्पस सेन्ट्रल गार्डन 

*सतीश वसंतराव मोरे*
सतिताभ 
9881191302

१८ डिसेंबर २०२३

Save me I am the Oldest Tree here



Save me I am the Oldest Tree here
धन्यवाद डॉ. सुरेश बाबा, Dr.Suresh Bhosale  एक झाड वाचवल्याबद्धल !

पत्रकार परिषद असो वा एखाद्या नातेवाईकांना रुग्णालयात भेटण्यासाठी जाण्याच्या कारणासाठी असो, कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि कृष्णा विद्यापीठ परिसरात जाण्याचा योग मला अनेकदा येतो. या परिसरात गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ हे केवळ कराडचेच नव्हे तर जिल्ह्याचे, अवघ्या महाराष्ट्राचे वैभव आहे याचा पदोपदी अनुभव येतो. परवा कोल्हापूरला एका पाहुण्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्या पाहुण्यांनी मला सहज एक गोष्ट बोलून दाखवली, "पुण्यानंतर शैक्षणिक आणि आरोग्याचे माहेरघर आणि सर्वात मोठे केंद्र कोणतं असेल तर तुमचं कराड ! " छाती एवढ्या अभिमानाने फुलून आली होती काय सांगू !आपल्याला हा एवढा मोठा बहुमान मिळण्याचे कारण म्हणजे कराडचं मोठं कृष्ण हॉस्पिटल आहे. 

कृष्णा हॉस्पिटलच्या इतर उपक्रमाबाबत मला आता बोलायचे नाही.आज मला सांगायचे आहे कृष्णा विद्यापीठ परिसरात राबवलेल्या एका वेगळ्या उपक्रमाविषयी. देवयानीला आगाशिवनगर मध्ये क्लासला सोडल्यानंतर आज जिमला सुट्टी असल्यामुळे काय करायचे असा विचार करून मी कृष्णा विद्यापीठ कॅम्पस मध्ये प्रवेश केला. आज संपूर्ण कृष्णा विद्यापीठ कॅम्पस परिसर फेरफटका घालायचा असा विचार करून मी कृष्णा सरिता बाजारच्या बाजूने आत प्रवेश केला.

आदरणीय स्व.जयंतराव भोसले आप्पा यांच्या समाधीस्थळला अभिवादन करून पुढे वळसा घालून आलो .रस्त्याच्या बाजूला भव्य जिमनॅसीयम, महिला होस्टेल्स, नर्सिंग स्कूलच्या इमारती तसेच निवासी इमारती डोळे दिपून घेत होत्या. आपण कराडमध्ये आहोत की परदेशात आहोत असं वाटत होतं. या इमारतीच्या चारी बाजूला, सभोवताली शेजारी, अलीकडे, पलीकडे जाणीवपूर्वक निर्माण केलेली हिरवाई आणि वृक्षलागवड पाहून मन प्रसन्न होत होते. एवढी सुंदर आणि मोहक झाडे या ठिकाणी लावलेली आहेत की आपण या झाडांच्याच प्रेमात पडतो. ही झाडे पाहून मनाला आनंद तर मिळतोच तर शिवाय आपणही झाडांच्या इतकं उंच व्हावं, सतत हिरवगार राहावं आणि ऊन वारा पाऊसरूपी कसलंली संकट आली तर खचू नये, एवढं मात्र नक्की शिकायला मिळतं.


तसाच पुढे गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ परिसरातील फार्मसी कॉलेजच्या समोर रस्त्यावर येऊन माझी पावले थांबली. रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा वृक्ष उभा होता, या वृक्षाला वळसा घालून रस्ता पुढे गेला होत. हा वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी येऊन सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कृष्णा विद्यापीठाने तथा डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांनी केल्याचे पाहून खूप आनंद झाला. मध्यभागी असलेल्या या वृक्षाला संरक्षित करून 'मी सर्वात जुना वृक्ष आहे आय एम द ओल्डेस्ट हिअर ' अशी सोनेरी पाटी या झाडावर लावलेली पाहायला मिळाली. येथून रस्ता जात असताना मध्यभागी आलेला हा महाकाय वृक्ष तोडणे खरंतर फार अवघड नव्हते. हा वृक्ष तोडून आणखीन शंभर झाडे कृष्णा विद्यापीठात डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांना लावता आली असती .मात्र सर्वात जुना हा वृक्ष वाचवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला खरंच दाद दिली पाहिजे, सलाम केला पाहिजे. 

रस्त्याच्या मध्यभागी  असे महाकाय वृक्ष आणि आणि उंच डेरेदार वृक्ष आपण या अगोदर पाहिले असतील. पण ही दृश्यं अमेरिका ,इंग्लंड, फ्रान्स  अशा पाश्चात्त्य देशात पाहायला मिळतात. काळाच्या ओघात रस्ते रुंदीकरण आलेच, रस्ते मोठे झाले पाहिजेत. मात्र रस्ता जिथून जातो तिथे जर जुने वृक्ष येत असतील तर ते वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. रस्ते कुठेही बांधता येतील मात्र जुने वृक्ष पुन्हा तिथे उभं करणे अवघड असते. हाच दृष्टिकोन डोळया ठेवून समोर ठेवून डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या कल्पकतेतून कृष्णा विद्यापीठ परिसरातील हा उंच वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याबद्दल खरंच कृष्णा विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. सुरेश बाबा भोसले यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. हा वृक्ष पाहून त्यानंतर मी पुढे असलेल्या लायब्ररी समोरील सेंटर पार्क मध्ये गेलो. तिथेही अशाच प्रकारचा उंच असा एक पिंपळ वृक्ष जपला आहे. या झाडाशेजारी बसूनच हे सर्व लिहिण्याचा आनंद मला लुटला.


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..!

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२

ता.क.
हा ब्लॉग लिहून झाल्यानंतर त्या वृक्षसंवर्धन डॉ. विनायक भोसले यांना फोन केला.  यावेळी त्यांनी  एक इंटरेस्टिंग माहिती सांगितली. कृष्णा विद्यापीठ परिसरात जे वृक्ष, झाडी आणि हिरवाई फुलली आहे, या सर्व झाडांना पाणी कुठून येते ? कृष्णा रुग्णालयात बाथरूम ,वॉश बेसिन मध्ये वापर करून जे सांडपाणी गोळा होते, ते सर्व पाणी एका ठिकाणी गोळा केले जाते. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एटीपी प्लांटमध्ये हे सर्व पाणी आणून ते स्वच्छ केले जाते आणि हे स्वच्छ केलेले पाणी पाईप लाईन मधून या सर्व झाडांना घातले जाते, असे विनायक भोसले यांनी मला सांगितले. पर्यावरणप्रेमी डॉ. सुरेश बाबा भोसले यांच्या या कल्पनेला दाद दिली पाहिजे.

#Vinayak Bhosale  #savetrees #oldesttrees

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...