फॉलोअर

१४ जुलै २०२६

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​सतीश मोरे 
संपादक,दैनिक पुढारी कराड 

​सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा काही नावे सुवर्णाक्षरांनी रेखाटावी लागतील. त्यामध्ये स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर (विलास काका) यांचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर माणसे जिंकली; सत्ता केवळ उपभोगली नाही, तर तिचा उपयोग समाजाच्या तळागाळातील विकासासाठी केला. आजच्या राजकारणात पक्ष बदलणे आणि तत्त्वांशी तडजोड करणे सामान्य झाले असताना, आयुष्यभर निष्ठा, शब्द आणि विचार यांवर ठाम राहणारे विलास काका त्या दुर्मिळ परंपरेतील शेवटच्या पिढीतील नेते होते.

​उंडाळे ते विधानभवन : एका लोकनेत्याचा जन्म

​उंडाळे या छोट्याशा गावात स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पोटी विलास काकांचा जन्म झाला. घरातूनच लाभलेले स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार, समाजकारणाची प्रेरणा आणि जनतेसाठी झटण्याची वृत्ती यामुळे राजकारण हे त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचे साधन नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे माध्यम होते. लहानपणापासूनच गावागावातील लोकांशी मिसळण्याची आणि प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची वृत्ती पुढे त्यांच्या राजकीय यशाचा सर्वात मोठा पाया ठरली.

​सार्वजनिक जीवनाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून करणाऱ्या काकांना आबासाहेब वीर यांचे राजकीय मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या बदलामुळे काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. एखाद्या लाटेत एकदा-दोनदा निवडून येणे सोपे असते, पण सलग सात वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येणे ही केवळ राजकीय कामगिरी नसते; ती जनतेने त्यांच्या विकासाभिमुख राजकारणाला दिलेली सर्वोच्च मान्यता असते. यामागे कोणताही पैशाचा खेळ किंवा जातीय समीकरणे नव्हती, तर होता त्यांचा प्रचंड लोकसंपर्क!

​कराड दक्षिणचा विकास आणि सहकारातील आदर्श

​विलास काका आमदार झाले, तेव्हा कराड दक्षिण मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे होता. काकांनी हा प्रश्न केवळ निवडणुकीचा मुद्दा न बनवता आयुष्याचे ध्येय बनवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गावागावांत डांबरी रस्ते, समाजमंदिरे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सिंचनासाठी पाझर तलाव, बंधारे उभे राहिले. उंडाळे परिसर आणि डोंगरपट्टीतील एकेकाळी दुष्काळी असलेला भाग शेतकऱ्यांच्या कष्टाने आणि काकांच्या प्रयत्नाने हिरवागार झाला.

​मंत्रालयात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा वापर त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कधीच केला नाही, तर मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणण्यासाठी केला. राजकारणासोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग अनेक वर्षे नेतृत्व करताना त्यांनी आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा एक आदर्श निर्माण केला. सहकार क्षेत्रावर अनेकदा आरोप होतात, पण काकांच्या कारकीर्दीवर असा डाग कधीच लागला नाही.

​स्मरणातील विलासकाका : माणूस म्हणून अधिक मोठे

​विलास काकांच्या राजकीय कारकिर्दीचे विश्लेषण अनेकांनी केले असेल, पण मला लाभलेले त्यांचे सान्निध्य हे एका पत्रकाराच्या नात्याने नव्हे, तर एका माणसाच्या नात्याने अधिक समृद्ध करणारे ठरले. खरे सांगायचे तर, आमच्या संबंधांची सुरुवात फारशी गोड नव्हती. काही गैरसमजांमुळे सुरुवातीला माझ्यात आणि काकांमध्ये एक अंतर होते. पण काळ पुढे सरकला, गैरसमज विरघळले आणि त्यातून निर्माण झालेले नाते आयुष्यभर स्मरणात राहील असे बनले.

​"मोरेना बोलवा..."
एकदा अलंकार हॉटेलमधील एका गर्दीच्या कार्यक्रमात काकांनी सहज विचारले, "मोरे आले नाहीत का? मोरेना बोलवा..." तो क्षण माझ्यासाठी अनपेक्षित होता. त्यानंतर आमच्यातील अंतर पूर्णपणे संपले. कराडच्या बंगल्यावर ते आले की अनेकदा निरोप यायचा आणि मग चहाच्या कपावर राजकारण, सहकार, पत्रकारिता ते दिल्लीतील घडामोडींपर्यंत मनमोकळ्या गप्पा रंगायच्या.
​"मायलेज वाढवा..." – पत्रकारांसाठी गुरुमंत्र

काका पत्रकारांना केवळ बातमी देणारे लोक मानत नसत, तर समाजाचे अभ्यासक मानत. मला त्यांनी दिलेला सल्ला आजही तंतोतंत आठवतो:
​"मोरे, फक्त कराडमध्ये अडकून राहू नका. मायलेज वाढवा, पुस्तके वाचा, अभ्यास करा. पत्रकाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आल्या पाहिजेत. उद्या राहुल गांधी किंवा इतर राज्याचे मोठे नेते आले, तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधणार? अभ्यासाशिवाय दर्जेदार पत्रकारिता होत नाही." असे त्यांचे मत होते. मला प्रत्येक महिन्याला चांगली पेन्शन येते.‌ कराडचे पत्रकार येऊन जर अभ्यासासाठी ग्रंथालय काढणार असतील तर या पेन्शन मधून पत्रकारांसाठी वाटेल तेवढी पुस्तके मी तुम्हाला द्यायला तयार आहे, असं त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं.

​कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि पियूषचा प्रसंग

काकांच्या भाषेत राग असायचा, पण मनात अपार माया होती. कार्यकर्ता सामने आला की "अरे मूर्ख... कशाला आलास?" अशी प्रेमाची शिवी हासडण्याची त्यांची वेगळीच शैली होती. एकदा मी माझा मुलगा पियूषला त्यांना भेटायला घेऊन गेलो. त्याची कृश तब्येत पाहून काका मला हक्काने रागावले, "हा तुमचा मुलगा एवढा बारीक का? मोरे हे अजिबात बरोबर नाही.मुलाच्या तब्येतीकडेही लक्ष द्या." त्यांच्या या प्रेमळ रागामुळे पियूषने व्यायाम सुरू केला. वर्ष-दीड वर्षाने जेव्हा आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा त्याच्या सुधारलेल्या तब्येतीवर काकांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप त्यांच्यातील संवेदनशील पालकाची साक्ष देणारी होती.


​कोरोनाचा काळ आणि 'वडीलकीचा' फोन

कोरोनाचा तो भीषण कालखंड आपल्या सर्वांसाठीच अत्यंत वाईट होता. अहोरात्र जनतेच्या गराड्यात राहणाऱ्या विलास काकांसाठी हा काळ सर्वात मोठा आघात होता. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क तुटला आणि त्यांना घरात राहावे लागले. लोकांना भेटता न आल्यामुळे त्यांचे जणू 'टॉनिक' किंवा 'ऑक्सिजनच' कमी झाला होता. मीही त्या काळात त्यांना भेटू शकलो नाही.
​मात्र, या विलगतेच्या काळात मला काकांचा एक थक्क करणारा अनुभव आला. त्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात काकांचे मला जवळजवळ ६ ते ७ वेळा फोन आले! फोन आला की त्यांचा पहिला प्रश्न असायचा— "मोरे, कुठे आहात? तब्येतीची काळजी घ्या. कुठेही विनाकारण फिरू नका. पत्रकारिता नक्की करा, पण कोरोनाची काळजी घ्या, आजारी पडू नका."

​त्या संकटाच्या काळात कदाचित माझ्या सख्ख्या नातेवाईकांनीही मला इतक्या वेळा फोन करून माझी चौकशी केली नसेल, जेवढी काळजी काकांनी घेतली. काकांना घरात बसून जगातील सर्व बातम्या मिळत होत्या; पण या बातम्या गोळा करण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या पत्रकाराला कोणाची तरी साथ हवी, त्याची काळजी घेणारे कोणीतरी हवे, या भावनेतून एका हक्काच्या 'वडीलकीच्या नात्याने' ते मला फोन करायचे. हा प्रसंग माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा आहे.

​'भगीरथ' आणि शेवटची मुलाखत

​विलास काकांचे आयुष्य लोकांसमोर आणणाऱ्या 'भगीरथ' या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने मला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलाखती घेण्याची आणि काकांचा राज्यव्यापी प्रभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. यादरम्यान काका किती मोठे आहेत हे मोठ्या विभूतींच्या तोंडून ऐकावयास मिळाले.

​मी सातारा येथे त्यांच्या निवासस्थानी घेतलेली त्यांची सविस्तर मुलाखत 'दैनिक पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाली आणि ती प्रचंड गाजली. दुर्दैवाने, त्यानंतर काहीच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि ते आपल्यातून निघून गेले. ती मुलाखत त्यांच्या आयुष्यातील शेवटची प्रमुख मुलाखत ठरेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. ही जाणीव आजही मनाला अस्वस्थ करते.

​आजच्या राजकारणासाठी एक आदर्श
​२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपसह अनेक पक्षांनी त्यांना ऑफर्स दिल्या. पण काकांनी स्पष्ट सांगितले, "ज्या काँग्रेसमुळे मी मोठा झालो, तो पक्ष सोडणार नाही." त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण निष्ठा ढळू दिली नाही.

​आज सत्ता, पैसा आणि पदे असणारे अनेक नेते मिळतील; पण प्रत्येक गावात स्वतःचे हक्काचे माणूस उभे करणारा, कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा आणि पक्षापेक्षा तत्त्वांना मोठे मानणारा विलासराव पाटील उंडाळकर  यांच्यासारखा अजातशत्रू नेता पुन्हा होणे कठीण आहे. ते केवळ एक राजकारणी नव्हते, तर सातारा जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचे एक पर्व होते.

विलासकाकांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाची धुरा त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सांभाळली आहे. आज ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेची सेवा करत आहेत, काकांनी स्थापन केलेल्या, वाढवलेल्या संस्था सांभाळत आहेत. आजचे राजकारण हे विलास काकांच्या काळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, स्पर्धात्मक आणि बदलत्या समीकरणांचे झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीत आपल्या वडिलांचा आणि स्वातंत्र्यसैनिक आजोबा दादासाहेब उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा जपणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही.तरीही उदयसिंह पाटील-उंडाळकर हे आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या लोकसंपर्क, विकासाभिमुखता, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि पक्षनिष्ठेच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. 

काळ बदलला, राजकारण बदलले, काम करण्याच्या पद्धती बदलल्या; तरीही आपल्या घराण्याचा सामाजिक आणि राजकीय वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विलास काकांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे कठीण असले, तरी त्यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे,हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.


१० जुलै २०२६

दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज आणि "दुःखको अपने गले लगा ले"

"दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज 
आणि "दुःखको अपने गले लगा ले"

पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेला पाऊस,पूर आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीवर मात करून पुढे जाणारा वारकरी आणि अशाच वेळी पुण्यातील काही नोकरदार आयटीचे लोक या पावसाला कंटाळलेले दिसले. यावर कार्टूनिस्ट आलोक यांनी आज सुंदर कार्टून काढले आहे. ते आज फेसबुक वर पाहायला मिळाले. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा खालील अभंग आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,
"कष्ट करितां नाम घेतां ।
सुख होते अंतरी ।।
तुका म्हणे विठ्ठला ।
दुःख हे सुखरूप ।।"

हा अभंग वाचल्यानंतर त्याचा अर्थ जाणून घ्यायचा, समजावून घेण्याचा आणि तो त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला.

या अभंगातील "दुःख हे सुखरूप" ही ओळ प्रथमदर्शनी विरोधाभासी वाटते. दुःख आणि सुख हे एकमेकांच्या विरुद्ध असताना संत तुकाराम महाराज दुःखाला सुखरूप का म्हणतात?

याचे उत्तर त्यांच्या जीवनदृष्टीत आहे. माणसाच्या आयुष्यात दुःख, संकटे, अपयश आणि वेदना अपरिहार्य आहेत. त्यापासून कोणीही पळू शकत नाही. पण या दुःखाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, यावर आपले जीवन ठरते. जेव्हा मन विठ्ठलाच्या नामस्मरणात स्थिर होते, तेव्हा दुःखाचा भार कमी वाटू लागतो. दुःख नाहीसे होत नाही, पण ते सहन करण्याची शक्ती वाढते. त्या क्षणी दुःख हेच माणसाला घडवणारे साधन बनते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात—"दुःख हे सुखरूप."

याच विचाराची आठवण अमिताभ बच्चन यांच्या मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील एक संवाद करून देतो.

"दुःख को गले लगा ले... तक़दीर तेरे कदमों में होगी, और तू मुकद्दर का बादशाह बनेगा."

या एका वाक्यात जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान दडले आहे. दुःखापासून पळत राहिलो, त्याच्यावर रडत बसलो, तर ते आपल्याला कमकुवत करते. पण दुःखाचा स्वीकार केला, त्याला मिठी मारली, संकटांशी दोन हात केले, तर तेच दुःख आपली सर्वात मोठी ताकद बनते.

याच चित्रपटातील प्रसिद्ध ओळीही हेच सांगतात—
"रोते हुए आते हैं सब, हँसता हुआ जो जाएगा, वही मुकद्दर का सिकंदर कहलाएगा."

जन्मताना प्रत्येकजण रडत या जगात येतो. पण आयुष्यभर आलेल्या संकटांवर मात करत, चेहऱ्यावर हास्य ठेवून जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने जीवनाचा सिकंदर ठरतो.

संत तुकाराम महाराजांचा अध्यात्म आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील जीवनदर्शन या दोन्हींचा गाभा एकच आहे. दुःख हे शाप नाही; ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारे विद्यापीठ आहे. जो दुःखाचा स्वीकार करतो, तो त्यातून अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक शांत बनतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण सुखाच्या शोधात धावत आहे; पण खरी गोष्ट अशी आहे की सुखाचा मार्ग अनेकदा दुःखातूनच जातो. दुःखाला शत्रू न मानता त्याचा स्वीकार केला, त्यातून शिकत राहिलो, तर एक दिवस तेच दुःख आपल्या यशाचा पाया बनते.

म्हणूनच संत तुकाराम महाराजांचे "दुःख हे सुखरूप" आणि अमिताभ बच्चन यांचे "दुःख को गले लगा ले" हे दोन वेगवेगळ्या काळातील संदेश नसून, एकाच शाश्वत जीवनसत्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत. 

एक अध्यात्माच्या भाषेत सांगतो, तर दुसरा चित्रपटाच्या माध्यमातून; पण दोघेही आपल्याला एकच शिकवण देतात—

दुःखापासून पळू नका. त्याचा स्वीकार करा. कारण दुःखच माणसाला मजबूत बनवते, आणि त्याच दुःखातून जीवन घडते.


०९ जुलै २०२६

कराडपासून अवघ्या ११ किलोमीटरवर... 'X' आकाराचा स्वर्ग! Ex आठवणीसाठी

कराडपासून अवघ्या ११ किलोमीटरवर... 
'X' आकाराचा स्वर्ग! Ex आठवणीसाठी!

मेरवेवाडी पाझर तलाव आणि पाचुंदचा घाट – प्रति महाबळेश्वराचा अविस्मरणीय अनुभव

सौंदर्य पाहण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे नाही. अनेकदा निसर्गाचे सर्वात सुंदर रूप आपल्या अगदी जवळच असते. फक्त ते पाहण्याची दृष्टी आणि अनुभवण्याची संवेदनशीलता आपल्याकडे असावी लागते.

आपण महाबळेश्वर, कास पठार, कुंभरली घाट किंवा इतर पर्यटनस्थळांच्या शोधात भटकत असतो; पण कराडपासून अवघ्या बारा किलोमीटरवर निसर्गाने जपून ठेवलेला एक असा अद्भुत खजिना आहे, ज्याला "प्रति महाबळेश्वर" म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील डोंगररांगांमध्ये वसलेला मेरवेवाडी पाझर तलाव आणि पाचुंदचा घाट हा परिसर प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात एकदा तरी अनुभवावाच.

मी या भागातील असल्याने हे ठिकाण माझ्यासाठी नवीन नाही. मात्र गेल्या काही वर्षांत या ठिकाणाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि पर्यटकांची पावलेही या दिशेने वळू लागली. जे एकेकाळी स्थानिकांपुरते मर्यादित होते, ते आज कराड परिसरातील एक आकर्षक पर्यटनस्थळ बनत आहे.

कराडहून ओगलेवाडी, करवडी, वाघेरी मार्गे पुढे गेल्यावर मेरवेवाडी गाव लागते. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाजवळ जिल्हा परिषदेने १९७२ च्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव उभारला. मेरवेवाडी, वाघेरी, पाचुंद, सुरली आणि परिसरातील गावांना जीवनदायी ठरलेला हा तलाव आज निसर्गप्रेमींसाठी आनंदाचा झरा बनला आहे. आजही त्या काळातील पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन या तलावाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसतात.


तलावाच्या पायथ्याशी असलेले दत्त मंदिर वातावरणाला अधिकच पावित्र्य देते. तलावाच्या काठाने फेरफटका मारणे, पाण्यात पाय सोडून निवांत बसणे, मासेमारीचा आनंद घेणे किंवा सांडव्याच्या भिंतीवर बसून शांतपणे निसर्ग न्याहाळणे... प्रत्येक क्षण मनाला वेगळाच आनंद देऊन जातो.

पण या तलावाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल, 
तर पाचुंदच्या घाटात जायलाच हवे.

मेरवेवाडी गावाच्या डावीकडून सुरू होणारा नागमोडी घाट चढत असताना प्रत्येक वळणावर निसर्गाचे रूप अधिक खुलत जाते. घाटाच्या माथ्यावर एका ठिकाणी वाहन थांबवून खाली नजर टाकली की हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत विसावलेला हा तलाव इंग्रजी अक्षर 'X' च्या आकारात दिसतो. त्या क्षणी आपण कराडजवळ नसून एखाद्या प्रसिद्ध हिल स्टेशनवर उभे असल्याचा भास होतो.

मी गंमतीने एकदा म्हटले होते, "आपल्या 'Ex' आठवणींना उजाळा द्यायचा असेल, तर या 'X' आकाराच्या तलावाला एकदा नक्की भेट द्या." पण खरं सांगायचं तर हा तलाव फक्त जुन्या आठवणी जागवण्यासाठी नाही, तर नव्या उमेदीने जगायला शिकवण्यासाठी आहे.

दोन दिवसांपूर्वी शेताकडे जाताना सहज या ठिकाणी जाण्याचा योग आला. मुसळधार पावसात घाट चढत वर गेलो. खाली तलाव, समोर हिरव्यागार दऱ्या, डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि पावसाच्या सरींनी भारावलेला परिसर... निसर्गाने त्या दिवशी अक्षरशः मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली होती.

थोड्याच वेळात पाऊस थांबला. संध्याकाळचे सावट दाटू लागले आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर दाट धुक्याच्या शुभ्र दुलईत हरवून गेला. इतके धुके पडले की समोरचे काहीच दिसेनासे झाले. त्या निसर्गरम्य क्षणांना डोळ्यांत साठवत मी आणि माझा मित्र संजय शिंदे बराच वेळ तिथे निवांत बसून राहिलो.

त्या क्षणी एकच विचार मनात आला—अशा शांततेचा अनुभव घेण्यासाठी आपण महाबळेश्वर, कास किंवा कुंभरली घाट गाठतो; पण हाच अनुभव कराडपासून अवघ्या बारा किलोमीटरवर मिळू शकतो.

मात्र त्यासाठी एक छोटीशी अट आहे. संध्याकाळची वेळ असावी... आणि तुमच्या नशिबाने नुकताच पाऊस पडलेला असावा. पावसानंतर पाचुंदच्या घाटातून दिसणारा मेरवेवाडीचा पाझर तलाव म्हणजे निसर्गाने रंगवलेले एक जिवंत चित्रच वाटते.

आठवणी सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या... मन थकलेले असो किंवा नव्या ऊर्जेच्या शोधात असो... स्वतःशी काही क्षण संवाद साधण्यासाठी, निसर्गाचा निखळ आनंद लुटण्यासाठी आणि मनाला नवसंजीवनी देण्यासाठी मेरवेवाडीचा हा 'X' आकाराचा पाझर तलाव सर्वोत्तम ठिकाण आहे.

#कसे जाल?

✓कराड – ओगलेवाडी – करवडी – वाघेरी – मेरवेवाडी असा मार्ग या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वात सोयीचा आहे.

#खाण्यापिण्याची व्यवस्था

✓या परिसरात हॉटेल्स नाहीत. त्यामुळे आवश्यक खाण्यापिण्याचे साहित्य सोबत घेऊन जाणे उत्तम. ओगलेवाडी किंवा करवडी येथे आवश्यक वस्तू, खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होतात.

#भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

✓वर्षभर येथे जाता येते. मात्र पावसाळा आणि हिवाळा हा या परिसराचा सुवर्णकाळ आहे. पावसाळ्यात धुके, हिरवाई आणि धबधबे या ठिकाणाला स्वर्गीय रूप देतात.

कराडच्या आसपास अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. त्यांना अधिक प्रसिद्धी आणि विकास मिळायला हवा. मेरवेवाडीचा पाझर तलाव हे त्यातीलच एक अनमोल रत्न आहे.

मग... कधी निघताय?
कराडपासून अवघ्या १२ किलोमीटरवर असलेल्या या निसर्गस्वर्गाकडे...

'X' आकाराच्या तलावाकडे...

स्वतःला पुन्हा एकदा भेटण्यासाठी...

आठवणींना उजाळा देण्यासाठी...

आणि निसर्गाच्या कुशीत काही क्षण मनःशांती अनुभवण्यासाठी.

*सतीश मोरे सतिताभ*
९८८११९१३०२ 

#मेरवेवाडी
#पाचुंद
#निसर्ग
#सतिताभ

०६ जुलै २०२६

कोयना घाटमाथा पावसातल्या साम्राज्यातील अविस्मरणीय प्रवास


कराड ते घाटमाथा... पावसाच्या साम्राज्यातला एक अविस्मरणीय प्रवास
पावसाळा सुरू झाला की माझे पाय आपसूकच कोयनानगरकडे वळतात. प्रत्येक वर्षी किमान एक-दोन वेळा तरी कोयनानगरला जाणे हा माझ्यासाठी एक आनंदसोहळाच असतो. कधी पुढारीच्या बातमीच्या निमित्ताने, कधी निसर्ग अनुभवण्यासाठी, तर कधी मनावरील ताण झटकण्यासाठी. कारण कोयना धरण आणि त्याचा परिसर म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण. येथे घालवलेला एक दिवस मनाला नवसंजीवनी देऊन जातो.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला होता. रविवारी सकाळी अचानक मित्रांसोबत कोयनानगरला जाण्याचा बेत ठरला. माझे मित्र सतीश पाटील, जितेंद्र डुबल आणि मी असा आमचा छोटासा प्रवासाचा चमू तयार झाला. मात्र सगळ्यांच्या वेळा जुळवता जुळवता कराडमधून निघायला दुपारचा एक वाजला.

गाडी चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. कराड सोडताना पाऊस हलकासा होता; पण तांबव्याच्या पुढे गेल्यावर त्याने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. मुसळधार पाऊस, कारच्या काचांवरून झरझर वाहणारे थेंब आणि आवडीची गाणी... अशा वातावरणात गाडी चालवण्याचा आनंद शब्दांत मांडता येत नाही. मला पावसात ड्राइव्ह करायला नेहमीच आवडते. बाहेर कोसळणारा पाऊस आणि आत सुरू असलेली गाणी... यापेक्षा सुंदर संगत दुसरी कोणती असू शकते?

विहेघाट, मळ्हारपेठ, नव्या रस्त्याने आम्ही पाटणला पोहोचलो. पाटणची बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती. नव्या सिमेंट रस्त्यामुळे पूर्वीसारखी वाहतूक कोंडी जाणवत नव्हती. तेथे गाडी बाजूला लावून आम्ही मंडईत गेलो आणि ताजे मासे विकत घेतले. हे मासे कोयनानगरमध्ये एका हॉटेलमध्ये शिजवण्यासाठी देण्याचा आमचा आधीच बेत होता.

पाटण ते कोयनानगरचा रस्ता आता अतिशय चांगला झाला आहे. मध्ये दोन-तीन ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने थोडा वेळ लागतो; पण जेसीबी, सुरक्षा कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी सतत कार्यरत असल्याने फारशी अडचण जाणवत नाही. हा कालचा अनुभव होता.

कोयनानगरमध्ये पोहोचल्यावर एसटी स्टँडजवळील एका हॉटेलमध्ये मासे शिजवण्यासाठी दिले आणि आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. कोयना एसटी स्टँड परिसरात प्रचंड गर्दी होती. धुवांधार पावसात पुलावर उभे राहून धरणातून बाहेर पडणाऱ्या कोयना नदीचे विशाल पात्र पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन बराच वेळ आम्ही त्या दृश्यात हरवून गेलो.

यावेळी नेहमीप्रमाणे नवजा धबधबा किंवा कोयना गार्डनला न जाता घाटमाथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोयनानगर ते घाटमाथा हा पूर्वी खराब असलेला रस्ता आता अतिशय उत्तम झाला आहे. नागमोडी वळणे, धुक्याची चादर आणि मुसळधार पाऊस... प्रत्येक वळण नवा निसर्गदृश्यांचा देखावा उलगडत होते.

घाटमाथ्याच्या अलीकडे असलेल्या छोट्या धबधब्यांजवळ आम्ही थांबलो. गरमागरम कणीस खात धबधब्यांचा आवाज ऐकण्यातही एक वेगळीच मजा असते. पुढे घाटमाथ्यावर पोहोचलो. सातारा जिल्हा संपून रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते त्या ठिकाणी पूर्वी असलेले हॉटेल आता बंद झाले आहे. तेथे तैनात असलेल्या पोलिसांशी काही गप्पा मारल्या आणि मग कुंभारली घाटाच्या दिशेने पुढे निघालो.

हा निर्णय त्या दिवसातील सर्वात सुंदर निर्णय ठरला. घाट उतरताना अवघ्या दोन-तीन किलोमीटरच्या अंतरात असंख्य धबधबे रस्त्याच्या कडेला कोसळताना दिसत होते. काही धबधबे तर इतके जवळ होते की हात पुढे केला तरी त्यांचे पाणी अंगावर उडत होते. सुरक्षित जागी गाडी थांबवून आम्ही एका धबधब्याजवळ गेलो. मनसोक्त भिजलो, त्या निर्मळ पाण्याचा आस्वाद घेतला, भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. त्या क्षणी वेळ, काम, जबाबदाऱ्या... सगळे काही विसरून गेलो होतो.

परत घाटमाथ्यावर येऊन 'हनुमान हॉटेल'मध्ये थांबलो. एका मावशींना गरमागरम कांद्याच्या भजींची ऑर्डर दिली. बाहेर मुसळधार पाऊस, समोर धुक्यात हरवलेला कुंभारली घाट आणि हातात गरमागरम चहा व भजी... अशा क्षणांसाठीच माणूस पुन्हा पुन्हा निसर्गाकडे धावत असतो.

त्या धुक्यात हरवलेल्या घाटाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. काही क्षण मन इतके भरून आले की नकळत काही कविता जन्माला आल्या. काही भावना शब्दांत उतरल्या.

सायंकाळी पुन्हा कोयनानगरला परतलो. हॉटेलमध्ये आमचे मासे आणि जेवण तयार होते. दिवसभराच्या भटकंतीनंतर त्या ताज्या माशांच्या जेवणाची चव अविस्मरणीय होती. रात्री आठच्या सुमारास कोयनानगरमधून परतीचा प्रवास सुरू केला आणि सावधपणे, पावसातून मार्ग काढत साडेनऊच्या सुमारास कराडला पोहोचलो.

कोयना धरण, नवजा धबधबा, कोयना गार्डन आणि विश्रामगृह या ठिकाणी मी अनेकदा गेलो आहे. पण यावेळी कराड ते घाटमाथा हा अवघा सत्तर किलोमीटरचा प्रवास मनात कायमचा घर करून गेला. घाटमाथ्यावरून पाहिलेला मुसळधार पाऊस, धुक्यात हरवलेले डोंगर, धबधब्यांची अखंड गाणी आणि मित्रांसोबत घालवलेले काही तास... आयुष्यभर आठवणीत राहतील.

या संपूर्ण प्रवासात निसर्गाइतकाच आनंद आमच्या गप्पांमध्येही होता. आमच्या तिघांच्या सहलीचा एक अलिखित नियम आहे. आम्ही तिघेही करवडी गावचे असल्यामुळे गावातील विषय काढायचा नाही, राजकारणावर बोलायचे नाही, कोणाची टीका-टिप्पणी करायची नाही. प्रवास हा केवळ आनंदासाठी असतो, हीच आमची भूमिका.
म्हणून आमच्या गप्पांचा विषय असतो तो आयुष्य, मैत्री, जुन्या आठवणी, आवडती गाणी, चित्रपट, नवीन पाहिलेली ठिकाणे, वाचलेली पुस्तके, कधी एखादा विनोद, तर कधी एखादा जीवनानुभव. या गप्पांमधून मन मोकळं होतं, हसू उमलतं आणि प्रवास आणखी सुंदर बनतो.

खरं तर प्रत्येक सहलीत आम्ही निसर्गाइतकाच आनंद एकमेकांच्या सहवासात शोधत असतो. मोबाईल, राजकारण आणि दैनंदिन ताणतणाव यापासून काही तास दूर राहून फक्त त्या क्षणात जगायचं... हीच आमच्या मैत्रीची खरी ताकद आहे. म्हणूनच प्रत्येक कोयनानगरची सहल आमच्यासाठी केवळ पर्यटन राहत नाही, तर ती आयुष्याला नव्याने जगण्याची ऊर्जा देणारी एक सुंदर आठवण बनून जाते.

काही प्रवास हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात; ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी असतात. कराड ते घाटमाथा हा प्रवास माझ्यासाठी तसाच ठरला.

सतीश मोरे सतिताभ 

०३ जुलै २०२६

ज्याचा सखा हरी...


ज्याचा सखा हरी... त्यावरी विश्व कृपा करी!

वारीत अनुभवलेला अभंग, श्रद्धा 
आणि ईश्वराच्या अदृश्य सहवासाची जाणीव..!

पंढरपूरची वारी हा केवळ पायी चालण्याचा प्रवास नसतो. तो आत्मशोधाचा, श्रद्धेचा आणि ईश्वराशी नातं अधिक दृढ करणारा अनुभव असतो. लाखो वारकऱ्यांसोबत चालताना प्रत्येकाच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम असतं आणि मनात एकच विश्वास—"तो आहे... तो आपल्या पाठीशी आहे."

वारीत मलाही हा अनुभव अनेकदा आला. चालताना आम्ही मोबाईलवर सतत अभंग ऐकत होतो. त्यामध्ये एक अभंग वारंवार लावला जायचा आणि प्रत्येक वेळी तो मनाला नव्याने स्पर्श करून जायचा. तो म्हणजे संत जनाबाईंचा—

ज्याचा सखा हरी ।
त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें ।
वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी ।
कदा आपण पत्नी दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी ।
त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ते अंकित भक्तांसी ।
म्हणे नामाची दासी ॥५॥

हा अभंग आकाराने छोटा आहे; पण त्याचा आशय अफाट आहे. विशेष म्हणजे, पंडित भीमसेन जोशी यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजात हा अभंग ऐकताना त्यातील गहराई अधिकाधिक जाणवत जाते. त्यांच्या गायकीने या अभंगाला केवळ सूर दिले नाहीत, तर एक विलक्षण आध्यात्मिक उंची दिली आहे. प्रत्येक ओळीतून भक्ती, करुणा, विश्वास आणि ईश्वराशी असलेलं सख्य जिवंत होतं.

वारीत चालताना हा अभंग कानावर पडला की पायातील थकवा नकळत कमी व्हायचा. उन्हाची तमा राहायची नाही. पुढचा रस्ता किती आहे, याचाही विचार मनात यायचा नाही. फक्त विठ्ठलाच्या नामात चालत राहावंसं वाटायचं. त्या क्षणी जाणवायचं—वारी फक्त पायांनी होत नाही; ती मनाने आणि श्रद्धेने होते.

या अभंगातील "हरी" हा केवळ श्रीकृष्ण  नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेतील परमेश्वर आहे. तो विठ्ठल असो, राम असो, शंकर असो, देवी असो,दत्तगुरू असोत किंवा कोणत्याही रूपातील ईश्वर असो. ज्याच्या जीवनाचा तो सखा असतो, त्याला जगात कधीच एकटं वाटत नाही.
"उणें पडों नेदी त्याचें..." ही ओळ जीवनाचं मोठं सत्य सांगते. आपल्या आयुष्यात अनेकदा अशी माणसं भेटतात, जी अगदी योग्य वेळी मदतीला धावून येतात. एखादा शब्द, एखादा सल्ला, एखादी छोटी मदतही आयुष्याला नवी दिशा देऊन जाते. आपण त्याला योगायोग म्हणतो; पण श्रद्धाळू मनाला वाटतं—ही व्यक्ती देवानेच पाठवली आहे. देव प्रत्यक्ष येत नाही; तो माणसांच्या रूपाने आपल्याला आधार देतो.

वारीतही हे वारंवार दिसतं. एखाद्या वारकऱ्याला पाणी लागतं आणि दुसरा वारकरी न बोलता बाटली पुढे करतो. कोणाच्या पायाला गोळा येतो, तर अनोळखी माणूस थांबून त्याला उभं करतो. कोणाची चप्पल तुटते, तर दुसरा त्याची व्यवस्था करतो. कुणी कुणाला ओळखत नसतं, पण सगळे एकमेकांचे असतात. त्या क्षणी जाणवतं की ही फक्त माणसांची मदत नसते; ती विठ्ठलाचीच कृपा असते.

या अभंगातील "वारें सोसी आघाताचें" ही ओळ मनाला विशेष स्पर्शून जाते. भक्तावर येणाऱ्या संकटांचे आघात देव स्वतः झेलतो, अशी जनाबाईंची श्रद्धा आहे. कदाचित म्हणूनच संकटातून बाहेर पडल्यावर अनेक जण सहज म्हणतात—"देवाने वाचवलं."

वारी संपते पण हा अभंग अजूनही मनात घुमतो आहे. आजही पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात तो ऐकला की पंढरीचा रस्ता, दिंडी, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठलाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांमध्ये चालत असलेला तो क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहतो.

संत जनाबाईंचा हा छोटासा अभंग आपल्याला एक मोठा संदेश देऊन जातो—जीवनात श्रद्धा असेल, ईश्वरावर नितांत विश्वास असेल, तर संकटं संपणार नाहीत; पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद नक्की मिळेल. कारण...

"ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्व कृपा करी."

२८ जून २०२६

गाणे फक्त ऐकायचे नसते... ते गायकाच्या हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे फक्त ऐकायचे नसते... 
ते हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे ऐकणे म्हणजे केवळ सुरांचा आनंद घेणे नव्हे. त्या गाण्यामागचा संगीतकार कोण, गीतकार कोण, गायक-गायिका कोण, ते कोणत्या चित्रपटातील आहे, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा माझ्यामध्ये अगदी लहानपणापासून होती. याच इच्छेतून गाण्यांचे रसग्रहण करण्याचा छंद जडला.

महाविद्यालयीन काळात, अकरावी-बारावीमध्ये आम्ही मित्रमंडळी चित्रपट पाहायला जात असू. चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर चर्चा केवळ कथानकावर नसायची. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण, निर्माता कोण, संगीतकार कोण, गीतकार कोण, संपादक कोण, गायक-गायिका कोण, यावर आमच्या गप्पा रंगायच्या. चित्रपटातील सर्व गाणी पाठ करणे, त्यांच्या कॅसेट्स विकत आणणे आणि त्यावरील प्रत्येक माहिती वाचून काढणे हा आमचा छंदच बनला होता.
आमच्या पाच-सहा मित्रांच्या ग्रुपमध्ये गाण्यांच्या अशा मैफिली रंगायच्या. एकजण निर्माता सांगायचा, दुसरा संगीतकार, तिसरा गायक, चौथा गीतकार... अशा खेळकर पद्धतीने आमचे चित्रपट आणि संगीताविषयीचे ज्ञान वाढत गेले. गाण्यांतील भाव, वेदना, आनंद, चाली आणि शब्द यांचा नकळत अभ्यास होत गेला.

गाण्याची आवड वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षापासून मनात रुजत गेली आणि कालांतराने ती अधिक प्रगल्भ होत गेली. मात्र, गाणे नेमके कसे ऐकावे? प्रत्येक शब्दाचा भाव गायक कसा पोहोचवतो? संगीतकार त्या शब्दांना सूरांचे कोंदण कसे चढवतो? एखादा शब्द फेकताना त्यामागील भावना कशा जिवंत होतात? एखादा कणस्वर हृदयातून उमटून श्रोत्यांच्या मनापर्यंत कसा पोहोचतो? याची खरी जाणीव मात्र मला नव्हती.ही उणीव भरून काढण्याचे काम प्रसिद्ध गायिका आणि गीतविश्लेषक मृदुला दाढे यांनी केले. त्यांच्या 'अमर लता' या कार्यक्रमाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास तीन तास चाललेला हा कार्यक्रम म्हणजे स्वर, शब्द आणि भावनांचा अद्भुत संगम होता. यापूर्वी अनेक उत्कृष्ट गायक, वादक आणि संगीतकारांचे कार्यक्रम ऐकले होते. पण गाण्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून सांगत, त्या शब्दातील भाव स्वतःच्या आवाजातून जिवंत करण्याची कला प्रथमच इतक्या जवळून अनुभवायला मिळाली.
लता मंगेशकर या केवळ महान गायिका नव्हत्या, तर प्रत्येक शब्दाला आत्मा देणाऱ्या कलाकार होत्या. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर यांसारख्या महान गायकांनी शब्दांना जी उंची दिली, ती कशी निर्माण होते, हे मृदुला दाढे यांनी अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले.

माझा आवडता कलाकार अमिताभ बच्चन यांच्या 'त्रिशूल' चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले "मेरी बर्बादियों का अगर तू ज़िम्मेदार न हो..." हे गीत मी यापूर्वी अनेकदा ऐकले होते. त्याचा अर्थही माहिती होता. पण हेच गीत सादर करताना लतादीदींच्या कोमल आवाजात दडलेली आर्तता, संताप आणि वेदना मृदुला दाढे यांनी ज्या पद्धतीने उलगडून दाखवली, त्यामुळे त्या गाण्याचा नवा अर्थ माझ्यासमोर उभा राहिला.

आर. डी. बर्मन, मदन मोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या संगीतकारांनी आणि शैलेंद्र, आनंद बक्षी, साहिर लुधियानवी यांसारख्या गीतकारांनी शब्दांना दिलेले संगीत आणि त्या शब्दांना लता मंगेशकर यांनी दिलेला आत्मा याचा अप्रतिम प्रवास या कार्यक्रमातून अनुभवता आला.

मृदुला दाढे यांचा आवाज ही ईश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व जितके आकर्षक, त्याहून अधिक सुंदर त्यांचा स्वर आहे. सौंदर्य आणि स्वरसौंदर्य यांचा विलक्षण संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. त्यांच्या गायकीत केवळ सूर नाहीत, तर अभ्यास, संवेदनशीलता आणि गीताविषयीची अपार श्रद्धा आहे.

तीन तासांचा हा कार्यक्रम कधी संपला हेच कळले नाही. उलट, स्वरांचा हा प्रवास आणखी काही काळ सुरू राहावा, अशीच मनापासून इच्छा होत होती. कार्यक्रमातील एकही क्षण असा नव्हता की, मन दुसरीकडे भटकले. प्रत्येक गाणे, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विश्लेषण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडत होते.

कराडमध्ये गेली काही वर्षे अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी हे दाम्पत्य गीत स्वर संस्कार या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार संगीत कार्यक्रमांची अखंड परंपरा जपत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक भव्य आणि उत्कृष्ट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र यंदाचा अमृता दाढे यांचा 'अमर लता' हा कार्यक्रम सर्वार्थाने सर्वोत्तम ठरला.

हा कार्यक्रम केवळ गाण्यांचा नव्हता; तो संगीत समजून घेण्याचा, शब्दांच्या भावविश्वात डोकावण्याचा आणि लता मंगेशकर यांच्या गायकीचा आत्मा अनुभवण्याचा एक अद्वितीय प्रवास होता. या कार्यक्रमाने कराडच्या संगीतप्रेमींना एका वेगळ्याच सांगीतिक उंचीवर नेऊन ठेवले.

आजच्या धकाधकीच्या काळात अशी दर्जेदार सांगीतिक पर्वणी रसिकांसाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरते. कराडमध्ये अशा दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा जपणाऱ्या अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी या दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांनी उभारलेली स्वर संस्कार ही संस्था केवळ कार्यक्रमांचे आयोजन करत नाही, तर संगीत समजून घेणारे आणि त्यावर प्रेम करणारे रसिक घडवत आहे. अशीच स्वरांची अविस्मरणीय मैफल भविष्यातही कराडकरांना अनुभवायला मिळो, हीच मनापासून इच्छा.

सतीश मोरे सतिताभ 

१९ जून २०२६

एक स्वप्न निघालंय प्रवासाला

एक स्वप्न निघालंय प्रवासाला !

"बचपन से मुझे शादी का बहुत शौक है..."
‘जब वी मेट’ चित्रपटातील गीतचा हा संवाद अनेकांना आवडतो. माझी मुलगी देवयानी हीचा हा आवडता चित्रपट .पण तीने हाच संवाद 'बचपन से मुझे घूमने का बहुत शौक है' असा वेगळा केला आहे.

लहानपणापासूनच तिला जग पाहण्याची, नवीन ठिकाणे अनुभवण्याची, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्या कथा जाणून घेण्याची प्रचंड आवड आहे. एखादा डोंगर, एखादं छोटंसं गाव, एखादा निसर्गरम्य रस्ता किंवा अनोळखी माणूस – तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी असते.

प्रवास करताना तिची एक सवय मला नेहमी आश्चर्यचकित करते. कराड, सातारा, कोल्हापूर किंवा कुठेही बसने जात असताना ती शेजारी बसलेल्या व्यक्तीशी ओळख करून घेते. विशेषतः वयस्कर लोकांशी गप्पा मारते, त्यांच्या अनुभवांमधून शिकते आणि परत आल्यानंतर त्या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा मला सांगते. तिच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसून, तो माणसांना समजून घेण्याचा आणि जग जाणून घेण्याचा मार्ग आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी पुढारी कस्तुरी क्लबच्या महिलांची जम्मू-काश्मीर सहल आयोजित करण्यात आली होती. तेव्हा दहावीत असलेल्या देवयानीला मी त्या सहलीला एकटीला पाठवले होते. तिच्या ओळखीच्या महिला त्यात होत्या, त्यामुळे तिला पूर्णपणे सोलो ट्रिप म्हणता येणार नाही. पण त्या प्रवासातही तिचा वेगळेपणा जाणवला. इतर महिला बसमध्ये मागे बसल्या असताना ती ड्रायव्हरच्या शेजारी बसून काश्मीरची माहिती विचारायची, स्थानिक संस्कृती जाणून घ्यायची आणि नवीन गोष्टी शिकायची. परत आल्यानंतर तिने सांगितलेल्या कथा ऐकून मला तिच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक वाटले.
तेव्हाच तिने मला एक वचन घ्यायला लावले होते – "पप्पा, बारावी झाल्यानंतर मला एक खरी सोलो ट्रिप करायची आहे."

आज तो दिवस आला आहे.
बारावीचा निकाल लागला. सीईटीची प्रक्रिया पूर्ण झाली. आणि तिच्या स्वप्नातील पहिल्या खऱ्या सोलो ट्रिपसाठी ती आज निघाली आहे.

स्वतः मोबाईलवर माहिती शोधून तिने हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील Hampta Pass Trek निवडला. साधारण २२ किलोमीटरचा हा ट्रेक. जंगल, डोंगर, नद्या, बर्फाच्छादित परिसर, निसर्गाच्या कुशीत सहा दिवसांचा प्रवास आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी.

आज तिला रेल्वेत बसवण्यासाठी मी पुणे रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. तिला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर शुभेच्छा देताना मनात अनेक भावना दाटून आल्या. ट्रेन दिल्लीला जाईल, तिथून पुढे मनालीला. मनालीत एक दिवस मुक्काम करून तिच्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या सोलो अॅडव्हेंचरची सुरुवात होईल.

या प्रवासाला निघण्यापूर्वी तिने आजी-आजोबा, काका-काकू आणि घरातील सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. मला सर्वांत जास्त आनंद याचा वाटतो की तिच्यातील धाडसाला आम्ही बळ दिले. पालक म्हणून भीती वाटतेच, पण त्याहून मोठा विश्वास तिच्यावर आहे.

खरं तर प्रवासाची आवड माझ्याकडेही आहे. महाविद्यालयीन काळात मी मित्रांसोबत सायकलवर आणि टू विलर वरून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे फिरलो आहे. जोतिबा, पन्हाळा, शिर्डी, शनीशिंगणापूर, नाशिक, मुंबई, पुणे, कोकण, बेळगाव, तुळजापूर, सोलापूर आणि असंख्य गावं पाहिली आहेत. त्या प्रवासांनी मला खूप काही शिकवलं. मात्र त्या सोलो ट्रिप नव्हत्या.

आज देवयानी जे अनुभवण्यासाठी निघाली आहे, तो अनुभव वेगळाच आहे. स्वतःच्या बळावर जग पाहण्याचा, निर्णय घेण्याचा, नवीन मित्र जोडण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा.
मला खात्री आहे की या प्रवासातून ती फक्त २२ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करून परत येणार नाही, तर अनुभवांचे, आठवणींचे आणि आत्मविश्वासाचे एक मोठे भांडार घेऊन परत येईल.

देवयानी, तुझ्या या पहिल्या खऱ्या सोलो ट्रिपसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जग पाहा, माणसं जोडा, अनुभव गोळा करा आणि सुरक्षितपणे परत या.

तुझ्या पुढच्या प्रवासकथेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत...

सतीश मोरे (पप्पा)

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...