फॉलोअर

३१ ऑगस्ट २०२६

वारीची ओढ... आणि बाजीराव विहीर येथील अविस्मरणीय गोल रिंगण

वारीची ओढ... आणि बाजीराव विहीर येथील अविस्मरणीय गोल रिंगण


– सतीश मोरे

सन २०१४ मध्ये प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला आणि तेव्हापासून पंढरीच्या वारीची लागलेली ओढ आजही तितकीच कायम आहे. २०१४ नंतर सलग आठ वर्षे आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करण्याचे भाग्य लाभले. कोरोनाकाळात प्रत्यक्ष वारी शक्य नव्हती. त्या काळात कराड परिसरात आम्ही स्वतंत्र "निसर्ग वारी" काढली, तर दुसऱ्या वर्षी "व्हर्च्युअल वारी"चा अनोखा उपक्रम राबविला. त्यानंतरही वारीला जाता आले नाही, तरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला किंवा शेवटच्या टप्प्यात बंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर येथे जाऊन माऊलींचे दर्शन घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला.


यंदा अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे आळंदीला जाणे शक्य झाले नाही. आळंदीतील वारकरी मित्रांनीही परिस्थिती गंभीर असल्याने येऊ नकोस, असा सल्ला दिला. त्यामुळे यंदा थेट वाखरी येथे माऊलींच्या दर्शनाचा संकल्प केला.

माऊलींचा पालखी सोहळा सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, बरड, माळशिरस, वेळापूर असा प्रवास करत भंडीशेगाव येथे मुक्कामी आला होता. दुसऱ्या दिवशी वाखरीकडे प्रस्थान होणार असल्याने मी आणि माझे पाहुणे माझे मार्गदर्शक सुभाष होसले सावकार व त्यांच्या मंडळीसमवेत सकाळी नऊ वाजता पंढरपूरकडे निघालो.


महुदपर्यंत प्रवास सुरळीत झाला. मात्र पुढे लहान  पालख्यांची आणि वाहनांची गर्दी वाढू लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जवळपास दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पंढरपूरला पोहोचलो. खोडशीकर मठात सामान ठेवून वाहन पार्क केले आणि रिक्षाने वाखरीकडे प्रयाण केले.


वाखरीत पाऊल ठेवताच वातावरण भक्तिमय झाले होते. "संत ज्ञानेश्वर महाराज की जय", "संत तुकाराम महाराज की जय", "माऊली... माऊली..." या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने चालत होते. दुपारचे ऊन असले तरी भक्तांच्या उत्साहावर त्याचा किंचितही परिणाम नव्हता.


वाखरीपासून पुढे बाजीराव विहीर येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वात मोठे आणि भव्य गोल रिंगण होणार होते. त्यामुळे आम्ही उलट्या दिशेने चालत त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. कराड नाका, सातारा फाटा ओलांडत पुढे जात असताना रस्त्यांवर वारकऱ्यांची अखंड मानवसाखळी दिसत होती. सर्वत्र वाहतूक कोंडी होती; मात्र कोणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नव्हती. प्रत्येकाच्या ओठांवर नाम आणि मनात माऊली होती.


बाजीराव विहीर परिसरात पोहोचलो तेव्हा जणू भक्तीचा महासागरच लोटला होता. पुणे–सोलापूर महामार्गावर वारकऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पुलावर, रस्त्याच्या दुतर्फा आणि विशाल मैदानात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या, पालख्या आणि वारकऱ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.


याच ठिकाणी एक अनपेक्षित आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण सुरू होणार होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वारकरी उभे राहिले होते. महिलांच्या फुगड्या, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "माऊली... माऊली..."चा अखंड जयघोष वातावरण भारावून टाकत होता. पोलिस कर्मचारीही या भक्तिमय वातावरणात रममाण झाले होते.क्षणभरात उभे रिंगण सुरू झाले. माऊलींचे अश्व वेगाने पुढे धावले आणि उपस्थित लाखो वारकऱ्यांनी एकाच स्वरात "माऊली... माऊली..."चा गजर केला. तो क्षण शब्दांत मांडणे अशक्य आहे.


त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात भव्य गोल रिंगणाची तयारी सुरू झाली. पालखी मैदानात आणण्यात आली. रथातून माऊलींच्या पादुका अत्यंत भक्तिभावाने खाली उतरविण्यात आल्या. नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी रिंगणाच्या मध्यभागी विराजमान झाली. "संत ज्ञानेश्वर महाराज की जय", "संत तुकाराम महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


आणि मग टाळकऱ्यांनी गोल रिंगणाभोवती फेर धरला. 


माऊली धावा... माऊली धावा...! आणि भक्तीच्या महासागरात हरवलेला क्षण


"धावा... धावा... धावा..." या आरोळ्यांनी संपूर्ण बाजीराव भीर परिसर दणाणून गेला. हजारो टाळकरी एकाच लयीत गोल रिंगणाभोवती धावत होते. टाळांचा निनाद, मृदंगाचा गजर, वीणेचे सूर आणि लाखो कंठातून उमटणारा "माऊली... माऊली..."चा अखंड जयघोष वातावरणाला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन गेला.


रिंगणाच्या मध्यभागी माऊलींच्या पादुका विराजमान होत्या. प्रत्येक वारकऱ्याच्या नजरेत भक्तिभाव, चेहऱ्यावर आनंद आणि मनात माऊलींच्या चरणी पोहोचल्याचे समाधान दिसत होते. या क्षणी जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, पद-प्रतिष्ठा यांचा लवलेशही नव्हता. लाखो लोक असूनही सर्वत्र शिस्त, संयम आणि एकमेकांबद्दलचा आदर अनुभवायला मिळत होता.


क्षणात चोपदारांनी संकेत दिला आणि माऊलींचे अश्व रिंगणात उतरले. काही क्षणांतच ते भरधाव वेगाने रिंगण पूर्ण करू लागले. अश्वांच्या टापांचा आवाज आणि त्याचवेळी उसळलेला "ज्ञानोबा-तुकोबा"चा जयघोष अंगावर अक्षरशः रोमांच उभे करणारा होता. वारकरी नम्रपणे मस्तक झुकवून त्या पवित्र क्षणाचा आशीर्वाद घेत होते.


रिंगण पूर्ण झाल्यानंतर अनेक वारकरी त्या पवित्र मातीचा स्पर्श करून कपाळी लावत होते. काही जण ती माती ओंजळीत भरून जपून ठेवत होते. त्यांच्यासाठी ती साधी माती नव्हती; ती माऊलींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली प्रसादरूपी धूळ होती.


मीही काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. अनेक वर्षे वारी केली, असंख्य सोहळे पाहिले; पण प्रत्येक वेळी हा अनुभव नवा वाटतो. रिंगणातील भक्ती, वारकऱ्यांची शिस्त, निःस्वार्थ सेवा आणि माऊलींवरील अपार श्रद्धा मनाला पुन्हा पुन्हा पंढरीकडे खेचत राहते.


यंदा संपूर्ण वारी करता आली नाही, याची खंत मनात होती. मात्र वाखरी बाजीराव विहीर येथे अनुभवलेले हे अविस्मरणीय क्षण त्या खंतीवर फुंकर घालणारे ठरले. माऊलींच्या दर्शनाने मन तृप्त झाले आणि पुन्हा एकदा जाणवले—वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही; ती मन शुद्ध करणारी, माणसाला माणसाशी जोडणारी आणि भक्ती, समता, सेवा व प्रेम यांचे जीवनमूल्य शिकवणारी जीवनशाळा आहे.


भव्य गोल रिंगणाचा सोहळा अनुभवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पुढचा टप्पा होता वाखरी येथील पालखी तळ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक पालख्या वाखरीत मुक्कामी येतात. मात्र प्रमुख आठ-दहा पालख्यांना पालखी तळावर मानाचे स्थान असते.


रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही पालखी तळावर पोहोचलो. आमचे लक्ष्य होते कराडकरांच्या बारा नंबर दिंडीचा तंबू. पालखीसमोरच पाण्याच्या टाकीजवळ या दिंडीचा मुक्काम असतो. अनेक तंबूंच्या गर्दीतही आपल्या दिंडीचा तंबू क्षणात सापडला आणि मन भरून आले.


गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सोबत असलेले माझे सहकारी तेथे भेटले. रणजित नाना पाटील,खरात माऊली, सावकार माऊली, बाजीराव माऊली आणि इतर अनेक वारकरी मित्रांना भेटलो. एकमेकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. अनेक वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळाला. क्षणभर तंबूत निवांत बसलो आणि दिवसभराचा सर्व शीण कुठल्या कुठे पळून गेला.


दिवसभरात जवळपास नऊ किलोमीटर चालल्यामुळे पाय दुखत होते, अंग थकले होते. पण मित्रांच्या सहवासात, माऊलीच्या दिंडीत बसल्यानंतर शरीराचा थकवा आणि मनाचा कंटाळा क्षणात नाहीसा झाला. हीच तर वारीची खरी ताकद आहे.


दरम्यान, माऊलींचा पालखी सोहळा वाखरीतील पालखी तळावर दाखल झाला. सायंआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आरतीनंतर बारा नंबर दिंडीतील टाळकरी आणि वारकरी परतले आणि रात्री दहाच्या सुमारास भव्य पंगत बसली.


वारकऱ्यांसोबत एका पंगतीत बसून प्रसादाचे भोजन करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सर्वांना वाढप सुरू होईपर्यंत "श्रीराम जय राम जय जय राम" या मंत्राचा अखंड जप सुरू होता. सर्वांना भोजन वाढून झाल्यानंतर "बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!" असा जयघोष झाला आणि मग प्रसाद ग्रहण करण्यास सुरुवात झाली.


त्या साध्या पण प्रेमाने वाढलेल्या भोजनात समाधानाचा अमृतरस होता. तिथे श्रीमंत-गरीब असा भेद नव्हता; सर्वजण माऊलीची लेकरं म्हणून एका पंगतीत बसले होते. हीच वारीची समतेची शिकवण आहे.


रात्री जवळपास बारा वाजता सर्व वारकरी मित्रांचा निरोप घेऊन आम्ही पंढरपूरकडे निघालो. दिवसभराचा प्रवास, गोल रिंगणाचा अलौकिक अनुभव, वारकरी मित्रांची भेट, दिंडीतील मुक्काम आणि पंगतीतील प्रसाद… या प्रत्येक क्षणाने मन समृद्ध केलं.


"ज्ञानोबा... तुकाराम...! माऊली... माऊली...!"


माऊली सतीश वसंतराव मोरे 

९८८११९१३०२

पियुषच्या स्वप्नासाठी



*पियुषच्या स्वप्नासाठी… आणि माझ्या जगण्याच्या गणितासाठी*

पियुषला न्यूझीलंडला उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचं जेव्हा अंतिम ठरलं, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न होता तो आर्थिक नियोजनाचा.

जुलै २०२५ची ही गोष्ट. न्यूझीलंडमधील उच्च शिक्षणाची फी साधारण २१ लाख रुपये होती. त्याशिवाय एका वर्षाच्या राहण्याच्या खर्चासाठी सुमारे १० लाख रुपये अॅडव्हान्स स्वरूपात द्यावे लागणार होते. इतर आवश्यक खर्च धरला तर हा आकडा ३२-३३ लाखांवर आणि पुढे जवळपास ३५ लाखांपर्यंत जाणार होता.

एवढी मोठी रक्कम हाताशी असणं शक्यच नव्हतं. त्यामुळे बँकेच्या कर्जाचा पर्याय निवडला. सुरुवातीला बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर युनियन बँकेचा विचार केला. मात्र पूर्वीच्या एका कर्जाच्या OTS मुळे माझ्या CIBIL रेकॉर्डवर परिणाम झाला होता. कर्ज शेतीचं किंवा तुलनेने छोटं असलं तरी त्या तांत्रिक कारणामुळे युनियन बँकेकडून कर्ज मिळू शकलं नाही.

शेवटी माझ्या जवळची आणि जिथे माझा पगार जमा होतो, त्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचा विचार केला. माझं पूर्वीचं सुमारे नऊ लाखांचं कार कर्ज आणि माझं उत्पन्न यांचा विचार करून बँकेने १५ लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घर तारण ठेवावं लागलं.

१५ लाख रुपये खात्यावर जमा झाले. न्यूझीलंडमधील प्रवेश प्रक्रिया पुढे असल्यामुळे ते काही काळ सारस्वत बँकेतच ठेवले. नंतरच्या प्रक्रियेनुसार ते IDBI बँकेत ठेवण्यात आले.

याच काळात जमीन विक्रीतून आणि इतर सर्व खर्च, कर्जे, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, कार्यक्रम आणि देणी वजा केल्यानंतर माझ्याकडे सुमारे १० लाख रुपये शिल्लक होते. तेही FDमध्ये ठेवले होते.

१५ लाख बँकेचे आणि १० लाख स्वतःचे—असे २५ लाख रुपये उभे राहिले.

पण अजून सहा लाख रुपये कमी पडत होते.

PFचा विचार केला. LICमधील काही गुंतवणूक काढण्याचाही विचार केला. पण त्यातून सहा लाख रुपये उभे राहणं शक्य नव्हतं.

शेवटी माझे थोरले बंधू हनुमंतराव—आमचे अण्णा—यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडेही आमच्या सामायिक जमिनीच्या विक्रीतून आलेली काही रक्कम शिल्लक होती. त्यांनी कोणताही विलंब न करता मला सहा लाख रुपये दिले.

अशा प्रकारे ३१ लाखांची व्यवस्था झाली.

तो फेब्रुवारी २०२६चा काळ होता. पियुषच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली होती. पैसे न्यूझीलंडला पाठवले गेले आणि पियुष मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाणार हे निश्चित झालं.

तिकीट आणि इतर सुरुवातीच्या खर्चासाठी अजून दोन-तीन लाख रुपयांची गरज होती. माझ्या छोट्या बचतीतून काही रक्कम उभी केली आणि माझ्या एका जवळच्या राजकीय मित्राने, राजकीय सल्लागाराने, मला दोन लाख रुपये आणून दिले.

अशा प्रकारे जवळपास ३३-३४ लाखांची व्यवस्था झाली.

आणि अखेर ८ मार्च २०२६ रोजी पियुष न्यूझीलंडला रवाना झाला.

एका वडिलांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी केलेल्या धडपडीचा तो एक सुंदर टप्पा होता.

पियुष तिथे शिक्षण घेत असतानाच काम करेल, स्वतःला हळूहळू स्थिर करेल आणि त्यातून काही पैसे वाचवून मला पाठवेल, असा एक साधा ठोकताळा मनात होता. त्या पैशातून कर्जाचे हप्ते फेडता येतील, असा विश्वास होता.

पण आयुष्याचं गणित कागदावरच्या गणितासारखं नसतं.

पियुषला तिथे स्वतःला स्थिर करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे. शिक्षण घेतानाच त्याला कष्टाची छोटी-मोठी कामं करावी लागत आहेत. नंतर त्याची नियोजित पत्नी पूनम हिलाही डिपेंडंट व्हिसावर न्यूझीलंडला पाठवण्याचा निर्णय झाला. तीही तिथे गेली आणि आता दोघेही तिथे आपापल्या पद्धतीने संघर्ष करत, हळूहळू स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहेत.

माझ्या मनात मात्र भारतात एक वेगळंच गणित सुरू आहे.

सारस्वत बँकेकडून घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या कर्जाचा महिन्याला सुमारे २५ हजार रुपयांचा हप्ता आहे. त्याचबरोबर कार कर्जाचा १५ हजार रुपयांचा हप्ता.

म्हणजे दर महिन्याला ४० हजार रुपये केवळ कर्जाच्या हप्त्यांमध्ये जातात.

माझा पगार सुमारे ५० हजार रुपये.

म्हणजे पगारातील जवळपास सगळे पैसे कर्ज फेडण्यात जातात.

पण जगण्यासाठी घरभाडं आहे, घरखर्च आहे, इतर वैयक्तिक खर्च आहेत. माझा साधारण मासिक खर्च ७० हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे दर महिन्याला किमान २०-२५ हजार रुपयांची अतिरिक्त व्यवस्था करावी लागते.

गेल्या वर्षभरात काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही माध्यमांतून दर महिन्याला दहा-पंधरा, कधी वीस हजार रुपयांची अतिरिक्त व्यवस्था होत गेली आणि हप्ते वेळेवर भरत राहिलो.

पण आता पुढचं नवीन गणित समोर उभं आहे.

पुढच्या महिन्यात माझी मुलगी लॉमध्ये प्रवेश घेणार आहे. तिची फी फार मोठी नसली तरी तिला पुण्यात ठेवायचं म्हणजे दर महिन्याला आणखी दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च वाढणार आहे.

म्हणजे माझा एकूण मासिक खर्च आता साधारण ७५ ते ८० हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

आणि नियमित उत्पन्न?

सुमारे ५० हजार.

त्यातच अण्णांकडून घेतलेले सहा लाख रुपये अजून परत करता आलेले नाहीत. त्यांना त्यांच्या पैशाचा तोटा होऊ नये म्हणून सहा टक्के व्याजाने दर महिन्याला तीन हजार रुपये देतो.

गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांच्याकडून पैसे घेतले. या सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होईल. त्या एका वर्षाचे ३६ हजार रुपये व्याज त्यांना दिले आहे.

पण मूळ सहा लाखांचा प्रश्न अजूनही डोक्यावर आहे.

आणि म्हणूनच आता मी वाड्यातील माझी पावणे दोन एकर जमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे.

जमीन विक्रीतून पैसे मिळाले की सर्वप्रथम अण्णांचे सहा लाख रुपये परत करायचे. कारण कोणाचेही पैसे असोत—बँकेचे, मित्रांचे, नातेवाईकांचे किंवा कोणत्याही संस्थेचे—घेतलेले पैसे शेवटी परत करावेच लागतात.

कर्जाचा बोजा कमी करायचा आहे.

मनावरचं ओझं कमी करायचं आहे.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही परिस्थिती कायमची नाही, यावर माझा विश्वास आहे.

माझ्याभोवती काही माणसं आहेत. काही मित्र आहेत. काही जोडलेली नाती आहेत. अजून हा सगळा आर्थिक संघर्ष मी प्रत्येकासमोर मांडलेला नाही. पण सरिता रासो आणि माझे आणखी दोन जवळचे मित्र यांना मी हा विषय सांगितला आहे. त्यांचं सहकार्य आहे.

आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मानसिक पाठिंबा आहे.

कधी कधी पैशांपेक्षा हा मानसिक आधारच जास्त महत्त्वाचा असतो.

एखादा माणूस अडचणीत असताना त्याच्या पाठीवर हात ठेवून, “काळजी करू नकोस, आपण यातून बाहेर पडू,” एवढं सांगणारं कुणीतरी असणं फार मोठी गोष्ट असते.

माझ्याकडे ती माणसं आहेत.

म्हणूनच मला विश्वास आहे की पुढचे काही महिने कठीण असतील, पण तेही निघून जातील.

पियुषला तिथे स्थिर व्हायला वेळ लागेल. तो शिक्षण पूर्ण करेल, चांगली नोकरी मिळवेल आणि एक दिवस महिन्याला ५०-६० हजार किंवा त्याहून अधिक रक्कम मला पाठवू शकेल, अशी आशा आहे.

आज सारस्वत बँकेचं १५ लाखांचं कर्ज वर्षभराच्या हप्त्यांनंतर सुमारे १३ लाखांवर आलं आहे.

म्हणजे थोडी का होईना, पण प्रगती झाली आहे.

आता माझ्यासमोरचं नवीन लक्ष्य आहे—

पुढील सहा महिने ते एक वर्ष दर महिन्याला किमान ३०-३५ हजार रुपये अतिरिक्त कमवायचे.

त्यासाठी जे करावं लागेल ते करायचं.

मेहनत करायची.

नवीन मार्ग शोधायचे.

पडायचं नाही.

थांबायचं नाही.

कारण ही केवळ माझी आर्थिक लढाई नाही. ही माझ्या मुलांच्या भविष्यासाठीची लढाई आहे.

पियुषच्या न्यूझीलंडच्या स्वप्नासाठी मी जे केलं, ते करताना किती आर्थिक गणितं मांडली, किती लोकांकडे मदत मागितली, किती कर्ज घेतलं, किती चिंता केल्या—हे कदाचित आज माझ्या मुलांना पूर्णपणे माहिती नसेल.

पण त्यांना हे माहिती असावं, एवढाच या सगळ्या लिखाणामागचा उद्देश आहे.

आई-वडील मुलांसाठी किती काही करतात, याची जाणीव मुलांना कधीतरी व्हावी.

आणि काही माणसांना हेही कळावं की बाहेरून एखादं आयुष्य व्यवस्थित दिसत असलं, तरी आतमध्ये प्रत्येक माणूस आपापली काही ना काही लढाई लढत असतो.

मीही लढतोय.

कधी पैशांशी.

कधी परिस्थितीशी.

कधी स्वतःच्या मनाशी.

पण हार मानलेली नाही.

कारण मनात एक ठाम विश्वास आहे—

काहीतरी मार्ग नक्की निघेल.

माणसं सोबत उभी राहतील.

देवाची साथ राहील.

आणि आजचं हे आर्थिक ओझं उद्या कमी होईल.

एक दिवस पियुष स्वतःच्या पायावर उभा राहील. कर्जाचे हप्ते कमी होतील. अण्णांचे पैसे पूर्ण परत होतील. मुलीचं शिक्षणही व्यवस्थित होईल.

आणि मागे वळून पाहताना कदाचित आपणच स्वतःला म्हणू—

“त्या काळात परिस्थिती कठीण होती; पण आपण टिकून राहिलो… आणि शेवटी जिंकलो.”

रामकृष्ण हरी.

२१ जुलै २०२६

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी  

– सतीश मोरे
सौंदर्य अनुभवण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे नाही. कराडपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर पाटण तालुक्यात निसर्गाने असा एक स्वर्ग निर्माण केला आहे की, तो पाहिल्यानंतर आपण नकळत त्याच्या प्रेमात पडतो. या ठिकाणाचे नाव आहे – काठी टेक.

जुलै महिना सुरू झाला की काठी टेकचे रूपच पालटते. डोंगररांगा दाट धुक्याच्या चादरीत हरवून जातात. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पाऊस... त्यात अंगाला सुखावणारी गुलाबी थंडी... आणि चहूबाजूंनी पसरलेला हिरवागार निसर्ग. या सगळ्याचा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे; तो प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच अनुभवता येतो.
काठी टेकवर उभे राहिल्यावर निसर्गाने जणू हिरवाईचा गालिचाच अंथरला आहे, असे वाटते. डोंगरांच्या कुशीतून वाहणारे धुक्याचे लोट, पावसाच्या सरींनी नटलेली झाडे, वाऱ्याच्या झुळुकीबरोबर नाचणारे गवत आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट... प्रत्येक क्षण मनाला शांत करणारा असतो

निसर्गाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यावर अक्षरशः सौंदर्याची उधळण केली आहे. या तालुक्यातील प्रत्येक डोंगर, प्रत्येक दरी, प्रत्येक घाट आणि प्रत्येक जलाशय एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारल्यासारखा भासतो. मात्र हे सौंदर्य अनुभवण्यासाठी त्याचा शोध घेण्याची दृष्टी आणि मनाची ओढ असावी लागते. ज्याला हा शोध घेता येतो, तोच खऱ्या अर्थाने नशीबवान.
पाटण तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणांची अक्षरशः खाण आहे. यापैकी अनेक ठिकाणे पाहण्याचे भाग्य मला लाभले, तर अजूनही अनेक ठिकाणे मला खुणावत आहेत. घाटमाथा, ढेबेवाडी, तारळे, कोयनानगर, नवजा, दिवशी घाट, तारळे, विहे घाट, सडा वाघापूर घाट, वाल्मिकी पठार, मराठवाडी धरण... कुठेही जा, निसर्ग आपले रूप नव्याने उलगडत राहतो.

या सर्व ठिकाणांमध्ये जर एखाद्या ठिकाणाला 'निसर्गाचा मुकुटमणी' म्हणायचे असेल, तर तो म्हणजे कोयनानगर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे विशाल कोयना धरण, त्याचा तब्बल १०५ टीएमसी क्षमतेचा शिवसागर जलाशय आणि चारही बाजूंनी हिरवाईने नटलेले डोंगर – हे दृश्य शब्दांत मांडणे कठीण आहे. कोयनानगरपासून तापोळ्यापर्यंत पसरलेला हा जलाशय जणू निसर्गाने रंगवलेले एक भव्य चित्रच.

या जलाशयाच्या काठावर अनेक छोटी-छोटी गावे वसली आहेत. प्रत्येक गावाचे स्वतःचे वेगळे सौंदर्य आहे. त्यापैकी माझ्या मनात कायमचे घर करून राहिलेले गाव म्हणजे काठी-अवसरी.

काठी-अवसरी हे केवळ एक गाव नाही; तो निसर्गाने घडवलेला स्वर्गाचा एक कोपरा आहे. कोयनानगरचे उद्यान, धबधबे किंवा घाटमाथा अनेकांनी पाहिला असेल; पण शिवसागर जलाशयाच्या कुशीत विसावलेल्या काठी-अवसरीचे अप्रतिम सौंदर्य अनुभवण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते.

पाटणहून काठीकडे जाणारा रस्ता सुरू झाला की प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंद देऊ लागतो. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भव्य पवनचक्क्या, हिरवाईने नटलेले डोंगर आणि वळणावळणाचा रस्ता मनाला भुरळ घालतो. गावात पोहोचून डोंगर उतरताना समोर अचानक उलगडणारा शिवसागर जलाशयाचा निळाशार विस्तार पाहून क्षणभर आपण स्वर्गात आल्याचा भास होतो.
मी यापूर्वी अनेकदा काठीला गेलो होतो; धैर्यशील पाटणकर यांच्या काठी हिल्स मध्ये उतरलो होतो. मात्र तो अनुभव प्रामुख्याने उन्हाळ्यातला होता. यंदा प्रथमच पावसाळ्यात तेथील निसर्ग अनुभवण्याचा योग आला आणि काठीचे खरे रूप माझ्यासमोर उलगडले. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा – कोणताही ऋतू असो, काठीचे सौंदर्य प्रत्येक वेळी वेगळ्या रंगात खुलत राहते.

डोंगराच्या कड्यावर उभे राहून खाली दिसणारा अथांग जलाशय, त्यामध्ये तयार झालेली असंख्य छोटी बेटे आणि हिरव्या पर्वतरांगांच्या सान्निध्यात पसरलेले शांत पाणी... हे दृश्य डोळ्यांत साठवत राहावे असेच वाटते. कॅमेरा कितीही फोटो काढो, तरी त्या सौंदर्याचा पूर्ण आविष्कार त्यात टिपता येत नाही.
काठी-अवसरीच्या पर्यटन विकासामागे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली. 'नवीन महाबळेश्वर' ही संकल्पना मांडताना त्यांनी या परिसरातील निसर्गसंपदेची क्षमता ओळखली. दुर्गम गावांपर्यंत रस्ते पोहोचवण्याचे प्रयत्न केले आणि या भागाकडे पर्यटकांचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांमुळे काठी-अवसरी आज अनेक निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

काठीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त. विशेषतः संध्याकाळी मावळणारा सूर्य शिवसागराच्या पाण्यावर सोनेरी रंगांची उधळण करतो. त्या क्षणी जणू सूर्य स्वतः आपल्या भेटीला आला आहे, अशी भावना मनात दाटून येते.

महाबळेश्वरचे सौंदर्य जगप्रसिद्ध आहे; मात्र निसर्गाच्या अस्सल रूपाचा अनुभव घ्यायचा असेल, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरीला एकदा तरी जरूर भेट द्या. तिथे पोहोचल्यानंतर निसर्ग म्हणजे काय, शांतता म्हणजे काय आणि स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय याचा खरा अर्थ उमगतो.

काठी-अवसरी... हा केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाच्या कुशीत स्वतःला हरवून पुन्हा नव्याने सापडण्याचा एक अविस्मरणीय अनुभव आहे.

हिवाळ्यातील काठी... धुक्याच्या दुलईतील स्वर्ग

मध्यंतरी हिवाळ्यात  एकदा काठी-उसरीला जाण्याचा योग आला होता. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला हा परिसर पाहिला होता; पण हिवाळ्यातील काठी म्हणजे निसर्गाने धुक्याची शुभ्र शाल पांघरलेला एक वेगळाच स्वर्ग.

पहाटेच्या वेळी संपूर्ण परिसर दाट धुक्याने वेढलेला होता. डोंगरांची शिखरे धुक्याआड लपाछपी खेळत होती. सूर्य उगवू लागला आणि त्याची कोवळी किरणे धुक्याला भेदून बाहेर पडू लागली, तसा संपूर्ण परिसर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. त्या क्षणी शब्द हरवून जातात आणि डोळे फक्त ते सौंदर्य साठवत राहतात.

डोंगरकड्यावर उभे राहून खाली दिसणारा शिवसागर जलाशय आरशासारखा शांत होता. त्यात पडलेले डोंगरांचे प्रतिबिंब इतके सुंदर दिसत होते की, क्षणभर वास्तव आणि प्रतिबिंब यातील फरकच कळेनासा झाला. जलाशयातील छोटी-छोटी बेटे धुक्यातून हळूहळू समोर येत होती. प्रत्येक क्षण नवा आणि प्रत्येक दृश्य वेगळे.

काठीमध्ये वेळ कसा जातो हे कळतही नाही. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी आणि जीवनातील धावपळीपासून काही क्षण दूर जाण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. येथे आल्यावर मोबाईलपेक्षा डोळ्यांनी आणि कॅमेऱ्यापेक्षा मनाने निसर्ग टिपण्याचा मोह होतो.

आज पर्यटनासाठी अनेक जण दूरवरच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र आपल्या सातारा जिल्ह्यात, पाटण तालुक्यात असा हा स्वर्ग दडलेला आहे. त्याचे सौंदर्य एकदा अनुभवले की पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटते.

काठी-अवसरी म्हणजे फक्त एक गाव नाही; ती निसर्गाची जपून ठेवलेली एक अमूल्य भेट आहे. ती प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवायलाच हवी

पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती¢

✓काठी-अवसरीला जायचे कसे?

कराडहून :
कराड–पाटण मार्गाने पाटण शहरात पोहोचावे. पाटण एसटी स्थानक ओलांडल्यानंतर लगेच उजवीकडे वळा . पाटण चाळकेवाडी रोड वरून सरळ पुढे जा. पुढे दातेगडाकडे जाणारा फाटा येतो. तिकडे न जाता सरळ पुढे जावे. हा परिसर पार केल्यानंतर वळणावळणाचा घाट सुरू होतो. पुढे विशाल पवनचक्क्यांचे साम्राज्य दिसू लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या शेकडो पवनचक्क्या पाहताना जणू एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. पुढे 'काठी टेक' या फाट्यावर डावीकडे वळल्यानंतर काही अंतरावर काठी गाव गाठता येते.

https://maps.app.goo.gl/RRaWQ6A1xPRE7nNE6

साताराहून :
साताराहून येणाऱ्या पर्यटकांनी ठोसेघर धबधबा परिसर पार करून चाळकेवाडी कडे यावे. सातारा ते काठी हे अंतर सुमारे ५० किलोमीटर असून, कराडहूनही जवळपास तेवढेच अंतर आहे. दोन्ही बाजूंनी चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध आहेत.

https://maps.app.goo.gl/V76ncKktktSWTVg96?g_st=ac

✓राहण्याची सोय

गेल्या काही वर्षांत काठी मध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक सुंदर रिसॉर्ट आणि होमस्टे सुरू झाले आहेत. धैर्यशील पाटणकर यांचे काठी हिल्स रिसॉर्ट सर्वात जुने आणि प्रसिद्ध आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे बॅक वाॅटर केबिन रिसॉर्ट, तसेच स्थानिकांनी सुरू केलेली अनेक घरगुती निवासस्थाने पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. पर्यटन हंगामात गर्दी असल्याने आगाऊ ऑनलाइन किंवा फोनद्वारे बुकिंग करणे अधिक सोयीचे ठरते.

Windy Hill's agro tourism 
दिलीप जोगळेकर 9421252222

Kathi Hill's 
Dhairyashil Patankar 
8975764243

Nature Next
Satish Pawar 
7798933940

Back Water Cabin
विक्रम जाधवराव
9822110141

मानस agri tourism 
अमर जाधवराव
901152742

✓खाण्याची सोय

येथे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र अचानक पोहोचण्यापेक्षा आगाऊ फोन करून आपल्या जेवणाची ऑर्डर दिल्यास आपल्या आवडीप्रमाणे ताजे जेवण तयार करून ठेवले जाते.

✓भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

काठीला वर्षातील कोणत्याही ऋतूत भेट देता येते. मात्र पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू या परिसराचे खरे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. पावसाळ्यात धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईचा गालिचा आणि कोसळणारा पाऊस, तर हिवाळ्यातील बोचरी थंडी, स्वच्छ हवा आणि मन मोहून टाकणारे सूर्योदय-सूर्यास्त हे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात.

वाहतुकीची सुविधा

काठी-अवसरीपर्यंत नियमित एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतःची दुचाकी, चारचाकी किंवा मित्र-परिवारासोबत खासगी वाहनाने जाणे अधिक सोयीचे ठरते. संपूर्ण मार्गावर चांगल्या दर्जाचे रस्ते असल्याने प्रवास सुखकर आणि आनंददायी होतो.

निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरी हा नक्कीच एकदा अनुभवावा असा स्वर्गीय पर्यटनस्थळ आहे.

महत्त्वाच्या सूचना

काठी टेकला जाण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करूनच निघा. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होईल.

- रेनकोट किंवा पावसाळी कपडे सोबत अवश्य ठेवा. काठी टेक परिसरात पावसाचा जोर कधीही वाढू शकतो. फक्त छत्रीवर अवलंबून राहू नका. छोटी छत्री सोबत असली तरी उत्तम; मात्र रेनकोट अधिक उपयोगी ठरतो.

- उबदार कपडे सोबत घ्या. जुलै असो, हिवाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू, काठी टेकवर नेहमीच गारवा जाणवतो. कोयना धरणाच्या परिसरातून येणारे थंड वारे अंगावर काटा आणतात. त्यामुळे स्वेटर, जॅकेट किंवा उबदार शाल सोबत ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.

- चांगली पकड असलेले बूट किंवा शूज वापरा. पावसामुळे रस्ते व माती घसरडी होऊ शकते.

- निसर्गाचा आनंद घ्या, पण त्याचे जतनही करा. प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या किंवा इतर कचरा परिसरात टाकू नका. स्वच्छता राखणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे.

काठी टेक हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाने मनमुराद उधळलेले सौंदर्य आहे. त्याचा आनंद घ्या आणि ते सौंदर्य पुढील पिढ्यांसाठीही जपून ठेवा.

सतीश मोरे सतिताभ 
9881191302

#kathihills
#koynanagar  
#naturelovers

१८ जुलै २०२६

रोज रोज आँखो तले

रोज़ रोज़ आँखों तले… प्यार के मीठे ख़्वाबों की सुरमयी दास्तान


आशा भोसले, अमित कुमार और आर. डी. बर्मन का नाम आते ही जीवा फ़िल्म का अमर गीत "रोज़ रोज़ आँखों तले, एक ही सपना चले..." बरबस याद आ जाता है। प्रेम, विरह, इंतज़ार और यादों को जितनी ख़ूबसूरती से इस गीत में शब्दों और सुरों के माध्यम से व्यक्त किया गया है, वैसी मिसाल हिंदी फ़िल्म संगीत में बहुत कम मिलती है।

"रोज़ रोज़ आँखों तले, एक ही सपना चले…
रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले…"

इस मुखड़े का भाव बहुत गहरा है। हर इंसान की आँखों में अनेक सपने होते हैं, लेकिन उनमें एक सपना ऐसा भी होता है जो सिर्फ़ एक ही व्यक्ति के इर्द-गिर्द घूमता है। जब वह व्यक्ति हमारे जीवन में आता है, तो दिनभर उसी का ख़याल मन में रहता है और रातभर उसी की यादें आँखों में जागती रहती हैं। "रात भर काजल जले" का अर्थ है कि आँखों में नींद नहीं है, क्योंकि वहाँ तो प्रिय के ख़्वाबों का दीपक जल रहा है।

आगे गीत कहता है—

"जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ से लगायी है…"

'मिसरी' यानी मिठास। जिस दिन से प्रिय का नाम होंठों पर आया, उसी दिन से जीवन में एक अनोखी मिठास घुल गई। लेकिन उसी मिठास के साथ एक मीठा-सा ग़म और एक मीठी-सी तन्हाई भी आ गई। मिलने की ख़ुशी और बिछड़ने की कसक—दोनों ही प्रेम की सबसे सुंदर अनुभूतियाँ बन जाती हैं। इसलिए गीत में "मीठा सा ग़म" और "मीठी सी तन्हाई" जैसे शब्द प्रेम की गहराई को बेहद ख़ूबसूरती से व्यक्त करते हैं।

फिर गीत की अगली पंक्ति आती है—

"छोटी सी दिल की उलझन है, ये सुलझा दो तुम…"

प्रेम में पड़े हर दिल में कुछ सवाल होते हैं। भविष्य की उम्मीदें, रिश्ते की चिंता और साथ निभाने का विश्वास—इन सबकी एक छोटी-सी उलझन मन में रहती है। इसलिए वह अपने प्रिय से कहती है, "मेरे दिल की यह छोटी-सी उलझन तुम ही सुलझा दो।"

और फिर यह पंक्ति—

"जीना तो सीखा है मरके, मरना सिखा दो तुम."

इसका अर्थ यह है कि तुम्हारे प्रेम में मैंने अपने अहंकार को भुलाकर जीना सीख लिया है। अब जीवन का हर पल तुम्हारे साथ बिताना ही मेरी सबसे बड़ी इच्छा है।

इसके बाद नायक अपनी भावनाएँ व्यक्त करता है—

"आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है, बेचारे से कुछ ख़्वाबों की नींद उड़ा दी है."

तुम्हारी एक अदा, तुम्हारी ज़ुल्फ़ों की एक लट और तुम्हारी एक नज़र ने मेरे सारे ख़्वाबों को जगा दिया है। अब हर सपना तुम्हीं से जुड़ गया है और तुम्हारे ख़यालों ने मेरी नींद ही उड़ा दी है।

इस गीत के बोल जितने सुंदर हैं, उतना ही अद्भुत इसका संगीत है। आर. डी. बर्मन ने इसकी धुन इस तरह रची है कि पहला सुर सुनते ही मन उसी लय में बहने लगता है और गीत समाप्त होने तक श्रोता उस जादू से बाहर नहीं निकल पाता।

आशा भोसले ने हर शब्द को जिस नज़ाकत, मिठास और भावपूर्ण अंदाज़ में गाया है, वह इस गीत की सबसे बड़ी ताक़त है। उनकी आवाज़ में प्रेम की कोमलता, विरह की टीस और भावनाओं की गहराई एक साथ सुनाई देती है।

और फिर आते हैं अमित कुमार। उनकी सहज गायकी, मासूमियत और भावनाओं की सच्चाई इस गीत को एक अलग ही ऊँचाई पर ले जाती है। व्यक्तिगत रूप से मुझे लगता है कि यह उनके करियर के सबसे मधुर और यादगार गीतों में से एक है।

इस गीत का फ़िल्मांकन भी उतना ही मनमोहक है। संजय दत्त और मंदाकिनी की जोड़ी, हल्की रोशनी का इस्तेमाल, चेहरों पर पड़ती प्रकाश की किरणें, आँखों की ख़ामोश बातें और प्राकृतिक पृष्ठभूमि—ये सब मिलकर इस गीत को एक दृश्यात्मक कविता बना देते हैं।

यह गीत चाहे रेडियो पर सुनिए या यूट्यूब पर देखिए, दोनों अनुभव अलग हैं लेकिन दोनों ही समान रूप से मोहक हैं। संगीत कानों को सुकून देता है और चित्रांकन आँखों को बाँध लेता है।

मेरे लिए "रोज़ रोज़ आँखों तले…" केवल एक प्रेमगीत नहीं, बल्कि प्रेम की मिठास, विरह की कसक और यादों के दीप से रोशन एक अनमोल एहसास है। यही वजह है कि यह गीत आज भी मेरे सबसे प्रिय हिंदी फ़िल्मी गीतों में शामिल है।

.....................

रोज रोज आँखों तले... प्रेमाच्या गोड स्वप्नांची सुरेल कहाणी

आशा भोसले, अमित कुमार आणि आर. डी. बर्मन यांचे सुरेल कॉम्बिनेशन म्हटले की, जीवा चित्रपटातील "रोज रोज आँखों तले, एक ही सपना चले..." हे गीत हमखास आठवते. प्रेम, विरह, ओढ आणि आठवणी यांना इतक्या सुरेख शब्दांत आणि सुरांत व्यक्त करणारी गाणी हिंदी चित्रपटसृष्टीत फारच मोजकी आहेत.

"रोज रोज आँखों तले, एक ही सपना चले... रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले..."
या मुखड्याचा अर्थ खूप सुंदर आहे. 

प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने असतात; पण त्यापैकी एक स्वप्न असे असते, जे फक्त एका व्यक्तीभोवती फिरत असते. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की, दिवसभर तिचाच विचार मनात असतो आणि रात्री तिच्याच आठवणी डोळ्यांत जागत राहतात. "रातभर काजळ जळत राहते" ही उपमा म्हणजे डोळ्यांत झोप नसते, कारण तिथे प्रिय व्यक्तीच्या स्वप्नांचा दिवा तेवत असतो.

पुढे गीतात येते—
"जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ से लगायी है..."
'मिसरी' म्हणजे गोडवा. प्रिय व्यक्तीचे नाव ओठांवर आले आणि आयुष्यालाच गोडवा लाभला. त्या गोडव्याबरोबरच एक गोड विरह, एक हळवी तन्हाईही आली. भेटीचा आनंद आणि न भेटण्याची हुरहूर—या दोन्ही भावना प्रेमात सारख्याच गोड वाटतात. म्हणूनच गीतात "मीठा सा ग़म" आणि "मीठी सी तन्हाई" असे विलक्षण सुंदर शब्द आले आहेत.

त्यानंतरची ओळ—
"छोटी सी दिल की उलझन है, ये सुलझा दो तुम..."
प्रेमात पडलेल्या प्रत्येक मनात काही प्रश्न असतात. भविष्याबद्दलची स्वप्ने, नात्याबद्दलच्या अपेक्षा आणि एकमेकांना समजून घेण्याची धडपड असते. म्हणूनच ती आपल्या प्रियकराला म्हणते, "माझ्या मनातील ही छोटीशी गुंतागुंत तूच सोडव." आणि पुढची ओळ तर प्रेमाचा कळसच आहे—
"जीना तो सीखा है मरके, मरना सिखा दो तुम."
तुझ्या प्रेमात स्वतःला विसरून जगायला शिकले आहे; आता आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुझीच साथ हवी आहे, अशी ती भावना व्यक्त करते.

यानंतर प्रियकराच्या भावना व्यक्त होतात—
"आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है, बेचारे से कुछ ख़्वाबों की नींद उड़ा दी है."
तुझ्या एका कटाक्षाने, केसांच्या एका झुळुकीने माझी सारी स्वप्ने जागी झाली आहेत. आता तुझ्या विचारांशिवाय झोप लागत नाही. प्रत्येक स्वप्नात तूच आहेस, प्रत्येक श्वासात तूच आहेस.

या गीताचा अर्थ जितका सुंदर आहे, तितकेच त्याचे संगीत अप्रतिम आहे. आर. डी. बर्मन यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशी धून बांधली आहे की, गाणे संपेपर्यंत मन त्या तालात हरवून जाते.

आशा भोसले यांनी प्रत्येक शब्द इतक्या नजाकतीने आणि भावपूर्ण पद्धतीने गायला आहे की, त्या शब्दांमधून नायिकेचे मन अक्षरशः जिवंत होते. त्यांच्या आवाजातील कोमलता, हुरहूर आणि प्रेमाची मिठास या गाण्याला अजरामर बनवते.
आणि मग येतो अमित कुमार यांचा आवाज. त्यांच्या गायकीतली सहजता, प्रेमातील व्याकुळता आणि भावनांची खोली मनाला स्पर्शून जाते. माझ्या मते, अमितकुमार यांच्या कारकिर्दीतील हे सर्वांत गोड आणि प्रभावी गीतांपैकी एक आहे.

या गाण्याचे चित्रिकरणही तितकेच सुंदर आहे. मंदाकिनी आणि संजय दत्त यांची जोडी, मंद प्रकाशाचा वापर, चेहऱ्यांवरील प्रकाशछटा, डोळ्यांतील भाव, केसांवर पडणारा प्रकाश आणि शांत पार्श्वभूमी—हे सर्व मिळून या गाण्याला एक वेगळीच दृश्यात्मक उंची देतात.

हे गाणे तुम्ही फक्त रेडिओवर ऐका किंवा यूट्यूबवर पाहा—दोन्ही अनुभव वेगळे आहेत; पण दोन्ही तितकेच मोहक आहेत. संगीत कानाला भुरळ घालते, तर चित्रिकरण डोळ्यांना मंत्रमुग्ध करते.
माझ्यासाठी "रोज रोज आँखों तले..." हे केवळ एक प्रेमगीत नाही; तर प्रेमातील गोड वेदना, विरहातील मिठास आणि आठवणींच्या दिव्याने उजळलेल्या मनाचा एक अविस्मरणीय प्रवास आहे.

 म्हणूनच हे गीत माझ्या सर्वाधिक आवडत्या हिंदी चित्रपटगीतांपैकी एक आहे.

https://youtu.be/0mZjBBQ3Dnc?si=t7ACPr8diMEoyoUd

या गाण्याची youtube लिंक

सतीश मोरे सतिताभ 
९८८११९१३०२

#rojrojankho #jeeva 
#rdburmanmusic #ashabhosle #amitkumar

१६ जुलै २०२६

संयम, निष्ठा आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास

संयम, निष्ठा आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास
आपल्याला हवं तेव्हा आपला आवडता माणूस आपल्या मनासारखंच वागेल, हा एक मोठा गैरसमज आहे. आपण एखाद्याच्या अपेक्षा सतत पूर्ण करत राहिलो की, त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. आणि जेव्हा एखाद्या क्षणी आपण "नाही" म्हणतो किंवा त्याच्या मनाविरुद्ध निर्णय घेतो, तेव्हा त्याच व्यक्तीच्या वागण्यात बदल होऊ शकतो.

जशी पक्षनिष्ठा महत्त्वाची असते, तशीच व्यक्तीनिष्ठाही तितकीच महत्त्वाची असते. पण या दोन्ही निष्ठांमध्ये एक समान धागा असतो—अपेक्षा. एखादी व्यक्ती दिवसभर तुमच्याशी गोड बोलत असेल, तुमच्या प्रत्येक मताला दुजोरा देत असेल, तरीही एक दिवस तुम्ही तिच्या मनासारखं वागला नाहीत, तर तीच व्यक्ती तुमच्याविरोधात उभी राहू शकते. आयुष्यभर ज्याच्यासाठी आपण वेळ दिला, कष्ट घेतले, त्याच्या सुख-दुःखात सहभागी झालो, त्याच व्यक्तीच्या तोंडून एक दिवस हा प्रश्न ऐकावा लागू शकतो—"तुम्ही माझ्यासाठी काय केलं?" ही आयुष्याची कटू, पण वास्तव शिकवण आहे.

म्हणूनच आयुष्यात तडजोड करणे, वेळप्रसंगी माघार घेणे, चार पावले मागे येणे आणि परिस्थिती ओळखून योग्य निर्णय घेणे या गोष्टी आवश्यक असतात. ज्याला हे जमते, त्यालाच खऱ्या अर्थाने समाधानाची भेट मिळते.

आज दिवसभरात अनेक व्यक्तींना भेटण्याचा योग आला. त्यांच्या चर्चांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—कोणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे, तर कोणी नवीन राजकीय समीकरणे मांडत आहे. कोणी कोणाला सोडून जात आहे तर कोणी आर्थिक विश्वासघात करत आहे.अशा वातावरणात तत्त्वनिष्ठ राहणे, तत्त्वांवर बोलणे आणि तत्त्वांनुसार वागणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

तरीही माझा अनुभव सांगतो की, संयम आणि प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही. कदाचित यश उशिरा मिळेल, पण ते नक्की मिळते. मात्र संयमाचा अर्थ कमजोरी नसतो. अनेकदा समोरचा माणूस तुमच्या शांततेला भीती, अकार्यक्षमता किंवा दुबळेपणा समजू लागतो. अशा वेळी त्याला योग्य वेळी योग्य मर्यादा दाखवणंही आवश्यक असतं. कारण वेळेवर घेतलेला ठाम निर्णय भविष्यातील मोठे संघर्ष टाळू शकतो.

आजच्या काळात पक्षनिष्ठा, व्यक्तीनिष्ठा आणि बदलत्या परिस्थितीतून खूप काही शिकायला मिळत आहे. प्रत्येक अनुभव माणसाला अधिक सक्षम आणि परिपक्व बनवत असतो. स्वतःला मजबूत करणं आणि जगाला आत्मविश्वासाने सामोरं जाणं, यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही.

या सर्व धावपळीत मात्र एक गोष्ट कधीही विसरू नये—स्वतःचं शरीर. "शरीर हाच परमेश्वर" असं आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे. म्हणून दिवसातील किमान एक तास आपल्या शरीरासाठी राखून ठेवला पाहिजे. व्यायाम, चालणे, योग किंवा कोणताही शारीरिक व्यायाम शरीरात नवी ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा केवळ शरीरालाच नाही, तर मनालाही बळ देते आणि प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद देते.

शेवटी, आयुष्य आपल्याला एकच धडा शिकवतं—निष्ठा ठेवा, पण स्वतःला हरवू नका. संयम ठेवा, पण स्वाभिमान गमावू नका. तडजोड करा, पण तत्त्वांशी तडजोड करू नका. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्यांना जिंकण्यापेक्षा आधी स्वतःला जिंका. कारण खरा विजय हा बाहेरच्या जगावर नसतो, तर स्वतःच्या मनावर, विचारांवर आणि कृतीवर असतो.

@सतीश मोरे सतिताभ

१४ जुलै २०२६

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​सतीश मोरे 
संपादक,दैनिक पुढारी कराड 

​सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा काही नावे सुवर्णाक्षरांनी रेखाटावी लागतील. त्यामध्ये स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर (विलास काका) यांचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर माणसे जिंकली; सत्ता केवळ उपभोगली नाही, तर तिचा उपयोग समाजाच्या तळागाळातील विकासासाठी केला. आजच्या राजकारणात पक्ष बदलणे आणि तत्त्वांशी तडजोड करणे सामान्य झाले असताना, आयुष्यभर निष्ठा, शब्द आणि विचार यांवर ठाम राहणारे विलास काका त्या दुर्मिळ परंपरेतील शेवटच्या पिढीतील नेते होते.

​उंडाळे ते विधानभवन : एका लोकनेत्याचा जन्म

​उंडाळे या छोट्याशा गावात स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पोटी विलास काकांचा जन्म झाला. घरातूनच लाभलेले स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार, समाजकारणाची प्रेरणा आणि जनतेसाठी झटण्याची वृत्ती यामुळे राजकारण हे त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचे साधन नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे माध्यम होते. लहानपणापासूनच गावागावातील लोकांशी मिसळण्याची आणि प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची वृत्ती पुढे त्यांच्या राजकीय यशाचा सर्वात मोठा पाया ठरली.

​सार्वजनिक जीवनाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून करणाऱ्या काकांना आबासाहेब वीर यांचे राजकीय मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या बदलामुळे काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. एखाद्या लाटेत एकदा-दोनदा निवडून येणे सोपे असते, पण सलग सात वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येणे ही केवळ राजकीय कामगिरी नसते; ती जनतेने त्यांच्या विकासाभिमुख राजकारणाला दिलेली सर्वोच्च मान्यता असते. यामागे कोणताही पैशाचा खेळ किंवा जातीय समीकरणे नव्हती, तर होता त्यांचा प्रचंड लोकसंपर्क!

​कराड दक्षिणचा विकास आणि सहकारातील आदर्श

​विलास काका आमदार झाले, तेव्हा कराड दक्षिण मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे होता. काकांनी हा प्रश्न केवळ निवडणुकीचा मुद्दा न बनवता आयुष्याचे ध्येय बनवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गावागावांत डांबरी रस्ते, समाजमंदिरे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सिंचनासाठी पाझर तलाव, बंधारे उभे राहिले. उंडाळे परिसर आणि डोंगरपट्टीतील एकेकाळी दुष्काळी असलेला भाग शेतकऱ्यांच्या कष्टाने आणि काकांच्या प्रयत्नाने हिरवागार झाला.

​मंत्रालयात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा वापर त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कधीच केला नाही, तर मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणण्यासाठी केला. राजकारणासोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग अनेक वर्षे नेतृत्व करताना त्यांनी आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा एक आदर्श निर्माण केला. सहकार क्षेत्रावर अनेकदा आरोप होतात, पण काकांच्या कारकीर्दीवर असा डाग कधीच लागला नाही.

​स्मरणातील विलासकाका : माणूस म्हणून अधिक मोठे

​विलास काकांच्या राजकीय कारकिर्दीचे विश्लेषण अनेकांनी केले असेल, पण मला लाभलेले त्यांचे सान्निध्य हे एका पत्रकाराच्या नात्याने नव्हे, तर एका माणसाच्या नात्याने अधिक समृद्ध करणारे ठरले. खरे सांगायचे तर, आमच्या संबंधांची सुरुवात फारशी गोड नव्हती. काही गैरसमजांमुळे सुरुवातीला माझ्यात आणि काकांमध्ये एक अंतर होते. पण काळ पुढे सरकला, गैरसमज विरघळले आणि त्यातून निर्माण झालेले नाते आयुष्यभर स्मरणात राहील असे बनले.

​"मोरेना बोलवा..."
एकदा अलंकार हॉटेलमधील एका गर्दीच्या कार्यक्रमात काकांनी सहज विचारले, "मोरे आले नाहीत का? मोरेना बोलवा..." तो क्षण माझ्यासाठी अनपेक्षित होता. त्यानंतर आमच्यातील अंतर पूर्णपणे संपले. कराडच्या बंगल्यावर ते आले की अनेकदा निरोप यायचा आणि मग चहाच्या कपावर राजकारण, सहकार, पत्रकारिता ते दिल्लीतील घडामोडींपर्यंत मनमोकळ्या गप्पा रंगायच्या.
​"मायलेज वाढवा..." – पत्रकारांसाठी गुरुमंत्र

काका पत्रकारांना केवळ बातमी देणारे लोक मानत नसत, तर समाजाचे अभ्यासक मानत. मला त्यांनी दिलेला सल्ला आजही तंतोतंत आठवतो:
​"मोरे, फक्त कराडमध्ये अडकून राहू नका. मायलेज वाढवा, पुस्तके वाचा, अभ्यास करा. पत्रकाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आल्या पाहिजेत. उद्या राहुल गांधी किंवा इतर राज्याचे मोठे नेते आले, तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधणार? अभ्यासाशिवाय दर्जेदार पत्रकारिता होत नाही." असे त्यांचे मत होते. मला प्रत्येक महिन्याला चांगली पेन्शन येते.‌ कराडचे पत्रकार येऊन जर अभ्यासासाठी ग्रंथालय काढणार असतील तर या पेन्शन मधून पत्रकारांसाठी वाटेल तेवढी पुस्तके मी तुम्हाला द्यायला तयार आहे, असं त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं.

​कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि पियूषचा प्रसंग

काकांच्या भाषेत राग असायचा, पण मनात अपार माया होती. कार्यकर्ता सामने आला की "अरे मूर्ख... कशाला आलास?" अशी प्रेमाची शिवी हासडण्याची त्यांची वेगळीच शैली होती. एकदा मी माझा मुलगा पियूषला त्यांना भेटायला घेऊन गेलो. त्याची कृश तब्येत पाहून काका मला हक्काने रागावले, "हा तुमचा मुलगा एवढा बारीक का? मोरे हे अजिबात बरोबर नाही.मुलाच्या तब्येतीकडेही लक्ष द्या." त्यांच्या या प्रेमळ रागामुळे पियूषने व्यायाम सुरू केला. वर्ष-दीड वर्षाने जेव्हा आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा त्याच्या सुधारलेल्या तब्येतीवर काकांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप त्यांच्यातील संवेदनशील पालकाची साक्ष देणारी होती.


​कोरोनाचा काळ आणि 'वडीलकीचा' फोन

कोरोनाचा तो भीषण कालखंड आपल्या सर्वांसाठीच अत्यंत वाईट होता. अहोरात्र जनतेच्या गराड्यात राहणाऱ्या विलास काकांसाठी हा काळ सर्वात मोठा आघात होता. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क तुटला आणि त्यांना घरात राहावे लागले. लोकांना भेटता न आल्यामुळे त्यांचे जणू 'टॉनिक' किंवा 'ऑक्सिजनच' कमी झाला होता. मीही त्या काळात त्यांना भेटू शकलो नाही.
​मात्र, या विलगतेच्या काळात मला काकांचा एक थक्क करणारा अनुभव आला. त्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात काकांचे मला जवळजवळ ६ ते ७ वेळा फोन आले! फोन आला की त्यांचा पहिला प्रश्न असायचा— "मोरे, कुठे आहात? तब्येतीची काळजी घ्या. कुठेही विनाकारण फिरू नका. पत्रकारिता नक्की करा, पण कोरोनाची काळजी घ्या, आजारी पडू नका."

​त्या संकटाच्या काळात कदाचित माझ्या सख्ख्या नातेवाईकांनीही मला इतक्या वेळा फोन करून माझी चौकशी केली नसेल, जेवढी काळजी काकांनी घेतली. काकांना घरात बसून जगातील सर्व बातम्या मिळत होत्या; पण या बातम्या गोळा करण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या पत्रकाराला कोणाची तरी साथ हवी, त्याची काळजी घेणारे कोणीतरी हवे, या भावनेतून एका हक्काच्या 'वडीलकीच्या नात्याने' ते मला फोन करायचे. हा प्रसंग माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा आहे.

​'भगीरथ' आणि शेवटची मुलाखत

​विलास काकांचे आयुष्य लोकांसमोर आणणाऱ्या 'भगीरथ' या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने मला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलाखती घेण्याची आणि काकांचा राज्यव्यापी प्रभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. यादरम्यान काका किती मोठे आहेत हे मोठ्या विभूतींच्या तोंडून ऐकावयास मिळाले.

​मी सातारा येथे त्यांच्या निवासस्थानी घेतलेली त्यांची सविस्तर मुलाखत 'दैनिक पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाली आणि ती प्रचंड गाजली. दुर्दैवाने, त्यानंतर काहीच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि ते आपल्यातून निघून गेले. ती मुलाखत त्यांच्या आयुष्यातील शेवटची प्रमुख मुलाखत ठरेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. ही जाणीव आजही मनाला अस्वस्थ करते.

​आजच्या राजकारणासाठी एक आदर्श
​२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपसह अनेक पक्षांनी त्यांना ऑफर्स दिल्या. पण काकांनी स्पष्ट सांगितले, "ज्या काँग्रेसमुळे मी मोठा झालो, तो पक्ष सोडणार नाही." त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण निष्ठा ढळू दिली नाही.

​आज सत्ता, पैसा आणि पदे असणारे अनेक नेते मिळतील; पण प्रत्येक गावात स्वतःचे हक्काचे माणूस उभे करणारा, कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा आणि पक्षापेक्षा तत्त्वांना मोठे मानणारा विलासराव पाटील उंडाळकर  यांच्यासारखा अजातशत्रू नेता पुन्हा होणे कठीण आहे. ते केवळ एक राजकारणी नव्हते, तर सातारा जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचे एक पर्व होते.

विलासकाकांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाची धुरा त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सांभाळली आहे. आज ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेची सेवा करत आहेत, काकांनी स्थापन केलेल्या, वाढवलेल्या संस्था सांभाळत आहेत. आजचे राजकारण हे विलास काकांच्या काळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, स्पर्धात्मक आणि बदलत्या समीकरणांचे झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीत आपल्या वडिलांचा आणि स्वातंत्र्यसैनिक आजोबा दादासाहेब उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा जपणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही.तरीही उदयसिंह पाटील-उंडाळकर हे आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या लोकसंपर्क, विकासाभिमुखता, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि पक्षनिष्ठेच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. 

काळ बदलला, राजकारण बदलले, काम करण्याच्या पद्धती बदलल्या; तरीही आपल्या घराण्याचा सामाजिक आणि राजकीय वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विलास काकांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे कठीण असले, तरी त्यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे,हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.


१० जुलै २०२६

दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज आणि "दुःखको अपने गले लगा ले"

"दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज 
आणि "दुःखको अपने गले लगा ले"

पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेला पाऊस,पूर आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीवर मात करून पुढे जाणारा वारकरी आणि अशाच वेळी पुण्यातील काही नोकरदार आयटीचे लोक या पावसाला कंटाळलेले दिसले. यावर कार्टूनिस्ट आलोक यांनी आज सुंदर कार्टून काढले आहे. ते आज फेसबुक वर पाहायला मिळाले. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा खालील अभंग आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,
"कष्ट करितां नाम घेतां ।
सुख होते अंतरी ।।
तुका म्हणे विठ्ठला ।
दुःख हे सुखरूप ।।"

हा अभंग वाचल्यानंतर त्याचा अर्थ जाणून घ्यायचा, समजावून घेण्याचा आणि तो त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला.

या अभंगातील "दुःख हे सुखरूप" ही ओळ प्रथमदर्शनी विरोधाभासी वाटते. दुःख आणि सुख हे एकमेकांच्या विरुद्ध असताना संत तुकाराम महाराज दुःखाला सुखरूप का म्हणतात?

याचे उत्तर त्यांच्या जीवनदृष्टीत आहे. माणसाच्या आयुष्यात दुःख, संकटे, अपयश आणि वेदना अपरिहार्य आहेत. त्यापासून कोणीही पळू शकत नाही. पण या दुःखाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, यावर आपले जीवन ठरते. जेव्हा मन विठ्ठलाच्या नामस्मरणात स्थिर होते, तेव्हा दुःखाचा भार कमी वाटू लागतो. दुःख नाहीसे होत नाही, पण ते सहन करण्याची शक्ती वाढते. त्या क्षणी दुःख हेच माणसाला घडवणारे साधन बनते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात—"दुःख हे सुखरूप."

याच विचाराची आठवण अमिताभ बच्चन यांच्या मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील एक संवाद करून देतो.

"दुःख को गले लगा ले... तक़दीर तेरे कदमों में होगी, और तू मुकद्दर का बादशाह बनेगा."

या एका वाक्यात जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान दडले आहे. दुःखापासून पळत राहिलो, त्याच्यावर रडत बसलो, तर ते आपल्याला कमकुवत करते. पण दुःखाचा स्वीकार केला, त्याला मिठी मारली, संकटांशी दोन हात केले, तर तेच दुःख आपली सर्वात मोठी ताकद बनते.

याच चित्रपटातील प्रसिद्ध ओळीही हेच सांगतात—
"रोते हुए आते हैं सब, हँसता हुआ जो जाएगा, वही मुकद्दर का सिकंदर कहलाएगा."

जन्मताना प्रत्येकजण रडत या जगात येतो. पण आयुष्यभर आलेल्या संकटांवर मात करत, चेहऱ्यावर हास्य ठेवून जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने जीवनाचा सिकंदर ठरतो.

संत तुकाराम महाराजांचा अध्यात्म आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील जीवनदर्शन या दोन्हींचा गाभा एकच आहे. दुःख हे शाप नाही; ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारे विद्यापीठ आहे. जो दुःखाचा स्वीकार करतो, तो त्यातून अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक शांत बनतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण सुखाच्या शोधात धावत आहे; पण खरी गोष्ट अशी आहे की सुखाचा मार्ग अनेकदा दुःखातूनच जातो. दुःखाला शत्रू न मानता त्याचा स्वीकार केला, त्यातून शिकत राहिलो, तर एक दिवस तेच दुःख आपल्या यशाचा पाया बनते.

म्हणूनच संत तुकाराम महाराजांचे "दुःख हे सुखरूप" आणि अमिताभ बच्चन यांचे "दुःख को गले लगा ले" हे दोन वेगवेगळ्या काळातील संदेश नसून, एकाच शाश्वत जीवनसत्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत. 

एक अध्यात्माच्या भाषेत सांगतो, तर दुसरा चित्रपटाच्या माध्यमातून; पण दोघेही आपल्याला एकच शिकवण देतात—

दुःखापासून पळू नका. त्याचा स्वीकार करा. कारण दुःखच माणसाला मजबूत बनवते, आणि त्याच दुःखातून जीवन घडते.


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...