फॉलोअर

२१ जुलै २०२६

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी  

– सतीश मोरे
सौंदर्य अनुभवण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे नाही. कराडपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर पाटण तालुक्यात निसर्गाने असा एक स्वर्ग निर्माण केला आहे की, तो पाहिल्यानंतर आपण नकळत त्याच्या प्रेमात पडतो. या ठिकाणाचे नाव आहे – काठी टेक.

जुलै महिना सुरू झाला की काठी टेकचे रूपच पालटते. डोंगररांगा दाट धुक्याच्या चादरीत हरवून जातात. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पाऊस... त्यात अंगाला सुखावणारी गुलाबी थंडी... आणि चहूबाजूंनी पसरलेला हिरवागार निसर्ग. या सगळ्याचा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे; तो प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच अनुभवता येतो.
काठी टेकवर उभे राहिल्यावर निसर्गाने जणू हिरवाईचा गालिचाच अंथरला आहे, असे वाटते. डोंगरांच्या कुशीतून वाहणारे धुक्याचे लोट, पावसाच्या सरींनी नटलेली झाडे, वाऱ्याच्या झुळुकीबरोबर नाचणारे गवत आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट... प्रत्येक क्षण मनाला शांत करणारा असतो

निसर्गाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यावर अक्षरशः सौंदर्याची उधळण केली आहे. या तालुक्यातील प्रत्येक डोंगर, प्रत्येक दरी, प्रत्येक घाट आणि प्रत्येक जलाशय एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारल्यासारखा भासतो. मात्र हे सौंदर्य अनुभवण्यासाठी त्याचा शोध घेण्याची दृष्टी आणि मनाची ओढ असावी लागते. ज्याला हा शोध घेता येतो, तोच खऱ्या अर्थाने नशीबवान.
पाटण तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणांची अक्षरशः खाण आहे. यापैकी अनेक ठिकाणे पाहण्याचे भाग्य मला लाभले, तर अजूनही अनेक ठिकाणे मला खुणावत आहेत. घाटमाथा, ढेबेवाडी, तारळे, कोयनानगर, नवजा, दिवशी घाट, तारळे, विहे घाट, सडा वाघापूर घाट, वाल्मिकी पठार, मराठवाडी धरण... कुठेही जा, निसर्ग आपले रूप नव्याने उलगडत राहतो.

या सर्व ठिकाणांमध्ये जर एखाद्या ठिकाणाला 'निसर्गाचा मुकुटमणी' म्हणायचे असेल, तर तो म्हणजे कोयनानगर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे विशाल कोयना धरण, त्याचा तब्बल १०५ टीएमसी क्षमतेचा शिवसागर जलाशय आणि चारही बाजूंनी हिरवाईने नटलेले डोंगर – हे दृश्य शब्दांत मांडणे कठीण आहे. कोयनानगरपासून तापोळ्यापर्यंत पसरलेला हा जलाशय जणू निसर्गाने रंगवलेले एक भव्य चित्रच.

या जलाशयाच्या काठावर अनेक छोटी-छोटी गावे वसली आहेत. प्रत्येक गावाचे स्वतःचे वेगळे सौंदर्य आहे. त्यापैकी माझ्या मनात कायमचे घर करून राहिलेले गाव म्हणजे काठी-अवसरी.

काठी-अवसरी हे केवळ एक गाव नाही; तो निसर्गाने घडवलेला स्वर्गाचा एक कोपरा आहे. कोयनानगरचे उद्यान, धबधबे किंवा घाटमाथा अनेकांनी पाहिला असेल; पण शिवसागर जलाशयाच्या कुशीत विसावलेल्या काठी-अवसरीचे अप्रतिम सौंदर्य अनुभवण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते.

पाटणहून काठीकडे जाणारा रस्ता सुरू झाला की प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंद देऊ लागतो. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भव्य पवनचक्क्या, हिरवाईने नटलेले डोंगर आणि वळणावळणाचा रस्ता मनाला भुरळ घालतो. गावात पोहोचून डोंगर उतरताना समोर अचानक उलगडणारा शिवसागर जलाशयाचा निळाशार विस्तार पाहून क्षणभर आपण स्वर्गात आल्याचा भास होतो.
मी यापूर्वी अनेकदा काठीला गेलो होतो; धैर्यशील पाटणकर यांच्या काठी हिल्स मध्ये उतरलो होतो. मात्र तो अनुभव प्रामुख्याने उन्हाळ्यातला होता. यंदा प्रथमच पावसाळ्यात तेथील निसर्ग अनुभवण्याचा योग आला आणि काठीचे खरे रूप माझ्यासमोर उलगडले. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा – कोणताही ऋतू असो, काठीचे सौंदर्य प्रत्येक वेळी वेगळ्या रंगात खुलत राहते.

डोंगराच्या कड्यावर उभे राहून खाली दिसणारा अथांग जलाशय, त्यामध्ये तयार झालेली असंख्य छोटी बेटे आणि हिरव्या पर्वतरांगांच्या सान्निध्यात पसरलेले शांत पाणी... हे दृश्य डोळ्यांत साठवत राहावे असेच वाटते. कॅमेरा कितीही फोटो काढो, तरी त्या सौंदर्याचा पूर्ण आविष्कार त्यात टिपता येत नाही.
काठी-अवसरीच्या पर्यटन विकासामागे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली. 'नवीन महाबळेश्वर' ही संकल्पना मांडताना त्यांनी या परिसरातील निसर्गसंपदेची क्षमता ओळखली. दुर्गम गावांपर्यंत रस्ते पोहोचवण्याचे प्रयत्न केले आणि या भागाकडे पर्यटकांचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांमुळे काठी-अवसरी आज अनेक निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

काठीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त. विशेषतः संध्याकाळी मावळणारा सूर्य शिवसागराच्या पाण्यावर सोनेरी रंगांची उधळण करतो. त्या क्षणी जणू सूर्य स्वतः आपल्या भेटीला आला आहे, अशी भावना मनात दाटून येते.

महाबळेश्वरचे सौंदर्य जगप्रसिद्ध आहे; मात्र निसर्गाच्या अस्सल रूपाचा अनुभव घ्यायचा असेल, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरीला एकदा तरी जरूर भेट द्या. तिथे पोहोचल्यानंतर निसर्ग म्हणजे काय, शांतता म्हणजे काय आणि स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय याचा खरा अर्थ उमगतो.

काठी-अवसरी... हा केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाच्या कुशीत स्वतःला हरवून पुन्हा नव्याने सापडण्याचा एक अविस्मरणीय अनुभव आहे.

हिवाळ्यातील काठी... धुक्याच्या दुलईतील स्वर्ग

मध्यंतरी हिवाळ्यात  एकदा काठी-उसरीला जाण्याचा योग आला होता. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला हा परिसर पाहिला होता; पण हिवाळ्यातील काठी म्हणजे निसर्गाने धुक्याची शुभ्र शाल पांघरलेला एक वेगळाच स्वर्ग.

पहाटेच्या वेळी संपूर्ण परिसर दाट धुक्याने वेढलेला होता. डोंगरांची शिखरे धुक्याआड लपाछपी खेळत होती. सूर्य उगवू लागला आणि त्याची कोवळी किरणे धुक्याला भेदून बाहेर पडू लागली, तसा संपूर्ण परिसर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. त्या क्षणी शब्द हरवून जातात आणि डोळे फक्त ते सौंदर्य साठवत राहतात.

डोंगरकड्यावर उभे राहून खाली दिसणारा शिवसागर जलाशय आरशासारखा शांत होता. त्यात पडलेले डोंगरांचे प्रतिबिंब इतके सुंदर दिसत होते की, क्षणभर वास्तव आणि प्रतिबिंब यातील फरकच कळेनासा झाला. जलाशयातील छोटी-छोटी बेटे धुक्यातून हळूहळू समोर येत होती. प्रत्येक क्षण नवा आणि प्रत्येक दृश्य वेगळे.

काठीमध्ये वेळ कसा जातो हे कळतही नाही. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी आणि जीवनातील धावपळीपासून काही क्षण दूर जाण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. येथे आल्यावर मोबाईलपेक्षा डोळ्यांनी आणि कॅमेऱ्यापेक्षा मनाने निसर्ग टिपण्याचा मोह होतो.

आज पर्यटनासाठी अनेक जण दूरवरच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र आपल्या सातारा जिल्ह्यात, पाटण तालुक्यात असा हा स्वर्ग दडलेला आहे. त्याचे सौंदर्य एकदा अनुभवले की पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटते.

काठी-अवसरी म्हणजे फक्त एक गाव नाही; ती निसर्गाची जपून ठेवलेली एक अमूल्य भेट आहे. ती प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवायलाच हवी

पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती¢

✓काठी-अवसरीला जायचे कसे?

कराडहून :
कराड–पाटण मार्गाने पाटण शहरात पोहोचावे. पाटण एसटी स्थानक ओलांडल्यानंतर लगेच उजवीकडे वळा . पाटण चाळकेवाडी रोड वरून सरळ पुढे जा. पुढे दातेगडाकडे जाणारा फाटा येतो. तिकडे न जाता सरळ पुढे जावे. हा परिसर पार केल्यानंतर वळणावळणाचा घाट सुरू होतो. पुढे विशाल पवनचक्क्यांचे साम्राज्य दिसू लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या शेकडो पवनचक्क्या पाहताना जणू एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. पुढे 'काठी टेक' या फाट्यावर डावीकडे वळल्यानंतर काही अंतरावर काठी गाव गाठता येते.

https://maps.app.goo.gl/RRaWQ6A1xPRE7nNE6

साताराहून :
साताराहून येणाऱ्या पर्यटकांनी ठोसेघर धबधबा परिसर पार करून चाळकेवाडी कडे यावे. सातारा ते काठी हे अंतर सुमारे ५० किलोमीटर असून, कराडहूनही जवळपास तेवढेच अंतर आहे. दोन्ही बाजूंनी चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध आहेत.

https://maps.app.goo.gl/V76ncKktktSWTVg96?g_st=ac

✓राहण्याची सोय

गेल्या काही वर्षांत काठी मध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक सुंदर रिसॉर्ट आणि होमस्टे सुरू झाले आहेत. धैर्यशील पाटणकर यांचे काठी हिल्स रिसॉर्ट सर्वात जुने आणि प्रसिद्ध आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे बॅक वाॅटर केबिन रिसॉर्ट, तसेच स्थानिकांनी सुरू केलेली अनेक घरगुती निवासस्थाने पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. पर्यटन हंगामात गर्दी असल्याने आगाऊ ऑनलाइन किंवा फोनद्वारे बुकिंग करणे अधिक सोयीचे ठरते.

Windy Hill's agro tourism 
दिलीप जोगळेकर 9421252222

Kathi Hill's 
Dhairyashil Patankar 
8975764243

Nature Next
Satish Pawar 
7798933940

Back Water Cabin
विक्रम जाधवराव
9822110141

मानस agri tourism 
अमर जाधवराव
901152742

✓खाण्याची सोय

येथे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र अचानक पोहोचण्यापेक्षा आगाऊ फोन करून आपल्या जेवणाची ऑर्डर दिल्यास आपल्या आवडीप्रमाणे ताजे जेवण तयार करून ठेवले जाते.

✓भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

काठीला वर्षातील कोणत्याही ऋतूत भेट देता येते. मात्र पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू या परिसराचे खरे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. पावसाळ्यात धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईचा गालिचा आणि कोसळणारा पाऊस, तर हिवाळ्यातील बोचरी थंडी, स्वच्छ हवा आणि मन मोहून टाकणारे सूर्योदय-सूर्यास्त हे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात.

वाहतुकीची सुविधा

काठी-अवसरीपर्यंत नियमित एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतःची दुचाकी, चारचाकी किंवा मित्र-परिवारासोबत खासगी वाहनाने जाणे अधिक सोयीचे ठरते. संपूर्ण मार्गावर चांगल्या दर्जाचे रस्ते असल्याने प्रवास सुखकर आणि आनंददायी होतो.

निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरी हा नक्कीच एकदा अनुभवावा असा स्वर्गीय पर्यटनस्थळ आहे.

महत्त्वाच्या सूचना

काठी टेकला जाण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करूनच निघा. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होईल.

- रेनकोट किंवा पावसाळी कपडे सोबत अवश्य ठेवा. काठी टेक परिसरात पावसाचा जोर कधीही वाढू शकतो. फक्त छत्रीवर अवलंबून राहू नका. छोटी छत्री सोबत असली तरी उत्तम; मात्र रेनकोट अधिक उपयोगी ठरतो.

- उबदार कपडे सोबत घ्या. जुलै असो, हिवाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू, काठी टेकवर नेहमीच गारवा जाणवतो. कोयना धरणाच्या परिसरातून येणारे थंड वारे अंगावर काटा आणतात. त्यामुळे स्वेटर, जॅकेट किंवा उबदार शाल सोबत ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.

- चांगली पकड असलेले बूट किंवा शूज वापरा. पावसामुळे रस्ते व माती घसरडी होऊ शकते.

- निसर्गाचा आनंद घ्या, पण त्याचे जतनही करा. प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या किंवा इतर कचरा परिसरात टाकू नका. स्वच्छता राखणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे.

काठी टेक हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाने मनमुराद उधळलेले सौंदर्य आहे. त्याचा आनंद घ्या आणि ते सौंदर्य पुढील पिढ्यांसाठीही जपून ठेवा.

सतीश मोरे सतिताभ 
9881191302

#kathihills
#koynanagar  
#naturelovers

१८ जुलै २०२६

रोज रोज आँखो तले

रोज़ रोज़ आँखों तले… प्यार के मीठे ख़्वाबों की सुरमयी दास्तान


आशा भोसले, अमित कुमार और आर. डी. बर्मन का नाम आते ही जीवा फ़िल्म का अमर गीत "रोज़ रोज़ आँखों तले, एक ही सपना चले..." बरबस याद आ जाता है। प्रेम, विरह, इंतज़ार और यादों को जितनी ख़ूबसूरती से इस गीत में शब्दों और सुरों के माध्यम से व्यक्त किया गया है, वैसी मिसाल हिंदी फ़िल्म संगीत में बहुत कम मिलती है।

"रोज़ रोज़ आँखों तले, एक ही सपना चले…
रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले…"

इस मुखड़े का भाव बहुत गहरा है। हर इंसान की आँखों में अनेक सपने होते हैं, लेकिन उनमें एक सपना ऐसा भी होता है जो सिर्फ़ एक ही व्यक्ति के इर्द-गिर्द घूमता है। जब वह व्यक्ति हमारे जीवन में आता है, तो दिनभर उसी का ख़याल मन में रहता है और रातभर उसी की यादें आँखों में जागती रहती हैं। "रात भर काजल जले" का अर्थ है कि आँखों में नींद नहीं है, क्योंकि वहाँ तो प्रिय के ख़्वाबों का दीपक जल रहा है।

आगे गीत कहता है—

"जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ से लगायी है…"

'मिसरी' यानी मिठास। जिस दिन से प्रिय का नाम होंठों पर आया, उसी दिन से जीवन में एक अनोखी मिठास घुल गई। लेकिन उसी मिठास के साथ एक मीठा-सा ग़म और एक मीठी-सी तन्हाई भी आ गई। मिलने की ख़ुशी और बिछड़ने की कसक—दोनों ही प्रेम की सबसे सुंदर अनुभूतियाँ बन जाती हैं। इसलिए गीत में "मीठा सा ग़म" और "मीठी सी तन्हाई" जैसे शब्द प्रेम की गहराई को बेहद ख़ूबसूरती से व्यक्त करते हैं।

फिर गीत की अगली पंक्ति आती है—

"छोटी सी दिल की उलझन है, ये सुलझा दो तुम…"

प्रेम में पड़े हर दिल में कुछ सवाल होते हैं। भविष्य की उम्मीदें, रिश्ते की चिंता और साथ निभाने का विश्वास—इन सबकी एक छोटी-सी उलझन मन में रहती है। इसलिए वह अपने प्रिय से कहती है, "मेरे दिल की यह छोटी-सी उलझन तुम ही सुलझा दो।"

और फिर यह पंक्ति—

"जीना तो सीखा है मरके, मरना सिखा दो तुम."

इसका अर्थ यह है कि तुम्हारे प्रेम में मैंने अपने अहंकार को भुलाकर जीना सीख लिया है। अब जीवन का हर पल तुम्हारे साथ बिताना ही मेरी सबसे बड़ी इच्छा है।

इसके बाद नायक अपनी भावनाएँ व्यक्त करता है—

"आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है, बेचारे से कुछ ख़्वाबों की नींद उड़ा दी है."

तुम्हारी एक अदा, तुम्हारी ज़ुल्फ़ों की एक लट और तुम्हारी एक नज़र ने मेरे सारे ख़्वाबों को जगा दिया है। अब हर सपना तुम्हीं से जुड़ गया है और तुम्हारे ख़यालों ने मेरी नींद ही उड़ा दी है।

इस गीत के बोल जितने सुंदर हैं, उतना ही अद्भुत इसका संगीत है। आर. डी. बर्मन ने इसकी धुन इस तरह रची है कि पहला सुर सुनते ही मन उसी लय में बहने लगता है और गीत समाप्त होने तक श्रोता उस जादू से बाहर नहीं निकल पाता।

आशा भोसले ने हर शब्द को जिस नज़ाकत, मिठास और भावपूर्ण अंदाज़ में गाया है, वह इस गीत की सबसे बड़ी ताक़त है। उनकी आवाज़ में प्रेम की कोमलता, विरह की टीस और भावनाओं की गहराई एक साथ सुनाई देती है।

और फिर आते हैं अमित कुमार। उनकी सहज गायकी, मासूमियत और भावनाओं की सच्चाई इस गीत को एक अलग ही ऊँचाई पर ले जाती है। व्यक्तिगत रूप से मुझे लगता है कि यह उनके करियर के सबसे मधुर और यादगार गीतों में से एक है।

इस गीत का फ़िल्मांकन भी उतना ही मनमोहक है। संजय दत्त और मंदाकिनी की जोड़ी, हल्की रोशनी का इस्तेमाल, चेहरों पर पड़ती प्रकाश की किरणें, आँखों की ख़ामोश बातें और प्राकृतिक पृष्ठभूमि—ये सब मिलकर इस गीत को एक दृश्यात्मक कविता बना देते हैं।

यह गीत चाहे रेडियो पर सुनिए या यूट्यूब पर देखिए, दोनों अनुभव अलग हैं लेकिन दोनों ही समान रूप से मोहक हैं। संगीत कानों को सुकून देता है और चित्रांकन आँखों को बाँध लेता है।

मेरे लिए "रोज़ रोज़ आँखों तले…" केवल एक प्रेमगीत नहीं, बल्कि प्रेम की मिठास, विरह की कसक और यादों के दीप से रोशन एक अनमोल एहसास है। यही वजह है कि यह गीत आज भी मेरे सबसे प्रिय हिंदी फ़िल्मी गीतों में शामिल है।

.....................

रोज रोज आँखों तले... प्रेमाच्या गोड स्वप्नांची सुरेल कहाणी

आशा भोसले, अमित कुमार आणि आर. डी. बर्मन यांचे सुरेल कॉम्बिनेशन म्हटले की, जीवा चित्रपटातील "रोज रोज आँखों तले, एक ही सपना चले..." हे गीत हमखास आठवते. प्रेम, विरह, ओढ आणि आठवणी यांना इतक्या सुरेख शब्दांत आणि सुरांत व्यक्त करणारी गाणी हिंदी चित्रपटसृष्टीत फारच मोजकी आहेत.

"रोज रोज आँखों तले, एक ही सपना चले... रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले..."
या मुखड्याचा अर्थ खूप सुंदर आहे. 

प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने असतात; पण त्यापैकी एक स्वप्न असे असते, जे फक्त एका व्यक्तीभोवती फिरत असते. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की, दिवसभर तिचाच विचार मनात असतो आणि रात्री तिच्याच आठवणी डोळ्यांत जागत राहतात. "रातभर काजळ जळत राहते" ही उपमा म्हणजे डोळ्यांत झोप नसते, कारण तिथे प्रिय व्यक्तीच्या स्वप्नांचा दिवा तेवत असतो.

पुढे गीतात येते—
"जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ से लगायी है..."
'मिसरी' म्हणजे गोडवा. प्रिय व्यक्तीचे नाव ओठांवर आले आणि आयुष्यालाच गोडवा लाभला. त्या गोडव्याबरोबरच एक गोड विरह, एक हळवी तन्हाईही आली. भेटीचा आनंद आणि न भेटण्याची हुरहूर—या दोन्ही भावना प्रेमात सारख्याच गोड वाटतात. म्हणूनच गीतात "मीठा सा ग़म" आणि "मीठी सी तन्हाई" असे विलक्षण सुंदर शब्द आले आहेत.

त्यानंतरची ओळ—
"छोटी सी दिल की उलझन है, ये सुलझा दो तुम..."
प्रेमात पडलेल्या प्रत्येक मनात काही प्रश्न असतात. भविष्याबद्दलची स्वप्ने, नात्याबद्दलच्या अपेक्षा आणि एकमेकांना समजून घेण्याची धडपड असते. म्हणूनच ती आपल्या प्रियकराला म्हणते, "माझ्या मनातील ही छोटीशी गुंतागुंत तूच सोडव." आणि पुढची ओळ तर प्रेमाचा कळसच आहे—
"जीना तो सीखा है मरके, मरना सिखा दो तुम."
तुझ्या प्रेमात स्वतःला विसरून जगायला शिकले आहे; आता आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुझीच साथ हवी आहे, अशी ती भावना व्यक्त करते.

यानंतर प्रियकराच्या भावना व्यक्त होतात—
"आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है, बेचारे से कुछ ख़्वाबों की नींद उड़ा दी है."
तुझ्या एका कटाक्षाने, केसांच्या एका झुळुकीने माझी सारी स्वप्ने जागी झाली आहेत. आता तुझ्या विचारांशिवाय झोप लागत नाही. प्रत्येक स्वप्नात तूच आहेस, प्रत्येक श्वासात तूच आहेस.

या गीताचा अर्थ जितका सुंदर आहे, तितकेच त्याचे संगीत अप्रतिम आहे. आर. डी. बर्मन यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशी धून बांधली आहे की, गाणे संपेपर्यंत मन त्या तालात हरवून जाते.

आशा भोसले यांनी प्रत्येक शब्द इतक्या नजाकतीने आणि भावपूर्ण पद्धतीने गायला आहे की, त्या शब्दांमधून नायिकेचे मन अक्षरशः जिवंत होते. त्यांच्या आवाजातील कोमलता, हुरहूर आणि प्रेमाची मिठास या गाण्याला अजरामर बनवते.
आणि मग येतो अमित कुमार यांचा आवाज. त्यांच्या गायकीतली सहजता, प्रेमातील व्याकुळता आणि भावनांची खोली मनाला स्पर्शून जाते. माझ्या मते, अमितकुमार यांच्या कारकिर्दीतील हे सर्वांत गोड आणि प्रभावी गीतांपैकी एक आहे.

या गाण्याचे चित्रिकरणही तितकेच सुंदर आहे. मंदाकिनी आणि संजय दत्त यांची जोडी, मंद प्रकाशाचा वापर, चेहऱ्यांवरील प्रकाशछटा, डोळ्यांतील भाव, केसांवर पडणारा प्रकाश आणि शांत पार्श्वभूमी—हे सर्व मिळून या गाण्याला एक वेगळीच दृश्यात्मक उंची देतात.

हे गाणे तुम्ही फक्त रेडिओवर ऐका किंवा यूट्यूबवर पाहा—दोन्ही अनुभव वेगळे आहेत; पण दोन्ही तितकेच मोहक आहेत. संगीत कानाला भुरळ घालते, तर चित्रिकरण डोळ्यांना मंत्रमुग्ध करते.
माझ्यासाठी "रोज रोज आँखों तले..." हे केवळ एक प्रेमगीत नाही; तर प्रेमातील गोड वेदना, विरहातील मिठास आणि आठवणींच्या दिव्याने उजळलेल्या मनाचा एक अविस्मरणीय प्रवास आहे.

 म्हणूनच हे गीत माझ्या सर्वाधिक आवडत्या हिंदी चित्रपटगीतांपैकी एक आहे.

https://youtu.be/0mZjBBQ3Dnc?si=t7ACPr8diMEoyoUd

या गाण्याची youtube लिंक

सतीश मोरे सतिताभ 
९८८११९१३०२

#rojrojankho #jeeva 
#rdburmanmusic #ashabhosle #amitkumar

१६ जुलै २०२६

संयम, निष्ठा आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास

संयम, निष्ठा आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास
आपल्याला हवं तेव्हा आपला आवडता माणूस आपल्या मनासारखंच वागेल, हा एक मोठा गैरसमज आहे. आपण एखाद्याच्या अपेक्षा सतत पूर्ण करत राहिलो की, त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. आणि जेव्हा एखाद्या क्षणी आपण "नाही" म्हणतो किंवा त्याच्या मनाविरुद्ध निर्णय घेतो, तेव्हा त्याच व्यक्तीच्या वागण्यात बदल होऊ शकतो.

जशी पक्षनिष्ठा महत्त्वाची असते, तशीच व्यक्तीनिष्ठाही तितकीच महत्त्वाची असते. पण या दोन्ही निष्ठांमध्ये एक समान धागा असतो—अपेक्षा. एखादी व्यक्ती दिवसभर तुमच्याशी गोड बोलत असेल, तुमच्या प्रत्येक मताला दुजोरा देत असेल, तरीही एक दिवस तुम्ही तिच्या मनासारखं वागला नाहीत, तर तीच व्यक्ती तुमच्याविरोधात उभी राहू शकते. आयुष्यभर ज्याच्यासाठी आपण वेळ दिला, कष्ट घेतले, त्याच्या सुख-दुःखात सहभागी झालो, त्याच व्यक्तीच्या तोंडून एक दिवस हा प्रश्न ऐकावा लागू शकतो—"तुम्ही माझ्यासाठी काय केलं?" ही आयुष्याची कटू, पण वास्तव शिकवण आहे.

म्हणूनच आयुष्यात तडजोड करणे, वेळप्रसंगी माघार घेणे, चार पावले मागे येणे आणि परिस्थिती ओळखून योग्य निर्णय घेणे या गोष्टी आवश्यक असतात. ज्याला हे जमते, त्यालाच खऱ्या अर्थाने समाधानाची भेट मिळते.

आज दिवसभरात अनेक व्यक्तींना भेटण्याचा योग आला. त्यांच्या चर्चांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—कोणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे, तर कोणी नवीन राजकीय समीकरणे मांडत आहे. कोणी कोणाला सोडून जात आहे तर कोणी आर्थिक विश्वासघात करत आहे.अशा वातावरणात तत्त्वनिष्ठ राहणे, तत्त्वांवर बोलणे आणि तत्त्वांनुसार वागणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

तरीही माझा अनुभव सांगतो की, संयम आणि प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही. कदाचित यश उशिरा मिळेल, पण ते नक्की मिळते. मात्र संयमाचा अर्थ कमजोरी नसतो. अनेकदा समोरचा माणूस तुमच्या शांततेला भीती, अकार्यक्षमता किंवा दुबळेपणा समजू लागतो. अशा वेळी त्याला योग्य वेळी योग्य मर्यादा दाखवणंही आवश्यक असतं. कारण वेळेवर घेतलेला ठाम निर्णय भविष्यातील मोठे संघर्ष टाळू शकतो.

आजच्या काळात पक्षनिष्ठा, व्यक्तीनिष्ठा आणि बदलत्या परिस्थितीतून खूप काही शिकायला मिळत आहे. प्रत्येक अनुभव माणसाला अधिक सक्षम आणि परिपक्व बनवत असतो. स्वतःला मजबूत करणं आणि जगाला आत्मविश्वासाने सामोरं जाणं, यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही.

या सर्व धावपळीत मात्र एक गोष्ट कधीही विसरू नये—स्वतःचं शरीर. "शरीर हाच परमेश्वर" असं आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे. म्हणून दिवसातील किमान एक तास आपल्या शरीरासाठी राखून ठेवला पाहिजे. व्यायाम, चालणे, योग किंवा कोणताही शारीरिक व्यायाम शरीरात नवी ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा केवळ शरीरालाच नाही, तर मनालाही बळ देते आणि प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद देते.

शेवटी, आयुष्य आपल्याला एकच धडा शिकवतं—निष्ठा ठेवा, पण स्वतःला हरवू नका. संयम ठेवा, पण स्वाभिमान गमावू नका. तडजोड करा, पण तत्त्वांशी तडजोड करू नका. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्यांना जिंकण्यापेक्षा आधी स्वतःला जिंका. कारण खरा विजय हा बाहेरच्या जगावर नसतो, तर स्वतःच्या मनावर, विचारांवर आणि कृतीवर असतो.

@सतीश मोरे सतिताभ

१४ जुलै २०२६

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​सतीश मोरे 
संपादक,दैनिक पुढारी कराड 

​सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा काही नावे सुवर्णाक्षरांनी रेखाटावी लागतील. त्यामध्ये स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर (विलास काका) यांचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर माणसे जिंकली; सत्ता केवळ उपभोगली नाही, तर तिचा उपयोग समाजाच्या तळागाळातील विकासासाठी केला. आजच्या राजकारणात पक्ष बदलणे आणि तत्त्वांशी तडजोड करणे सामान्य झाले असताना, आयुष्यभर निष्ठा, शब्द आणि विचार यांवर ठाम राहणारे विलास काका त्या दुर्मिळ परंपरेतील शेवटच्या पिढीतील नेते होते.

​उंडाळे ते विधानभवन : एका लोकनेत्याचा जन्म

​उंडाळे या छोट्याशा गावात स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पोटी विलास काकांचा जन्म झाला. घरातूनच लाभलेले स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार, समाजकारणाची प्रेरणा आणि जनतेसाठी झटण्याची वृत्ती यामुळे राजकारण हे त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचे साधन नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे माध्यम होते. लहानपणापासूनच गावागावातील लोकांशी मिसळण्याची आणि प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची वृत्ती पुढे त्यांच्या राजकीय यशाचा सर्वात मोठा पाया ठरली.

​सार्वजनिक जीवनाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून करणाऱ्या काकांना आबासाहेब वीर यांचे राजकीय मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या बदलामुळे काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. एखाद्या लाटेत एकदा-दोनदा निवडून येणे सोपे असते, पण सलग सात वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येणे ही केवळ राजकीय कामगिरी नसते; ती जनतेने त्यांच्या विकासाभिमुख राजकारणाला दिलेली सर्वोच्च मान्यता असते. यामागे कोणताही पैशाचा खेळ किंवा जातीय समीकरणे नव्हती, तर होता त्यांचा प्रचंड लोकसंपर्क!

​कराड दक्षिणचा विकास आणि सहकारातील आदर्श

​विलास काका आमदार झाले, तेव्हा कराड दक्षिण मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे होता. काकांनी हा प्रश्न केवळ निवडणुकीचा मुद्दा न बनवता आयुष्याचे ध्येय बनवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गावागावांत डांबरी रस्ते, समाजमंदिरे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सिंचनासाठी पाझर तलाव, बंधारे उभे राहिले. उंडाळे परिसर आणि डोंगरपट्टीतील एकेकाळी दुष्काळी असलेला भाग शेतकऱ्यांच्या कष्टाने आणि काकांच्या प्रयत्नाने हिरवागार झाला.

​मंत्रालयात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा वापर त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कधीच केला नाही, तर मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणण्यासाठी केला. राजकारणासोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग अनेक वर्षे नेतृत्व करताना त्यांनी आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा एक आदर्श निर्माण केला. सहकार क्षेत्रावर अनेकदा आरोप होतात, पण काकांच्या कारकीर्दीवर असा डाग कधीच लागला नाही.

​स्मरणातील विलासकाका : माणूस म्हणून अधिक मोठे

​विलास काकांच्या राजकीय कारकिर्दीचे विश्लेषण अनेकांनी केले असेल, पण मला लाभलेले त्यांचे सान्निध्य हे एका पत्रकाराच्या नात्याने नव्हे, तर एका माणसाच्या नात्याने अधिक समृद्ध करणारे ठरले. खरे सांगायचे तर, आमच्या संबंधांची सुरुवात फारशी गोड नव्हती. काही गैरसमजांमुळे सुरुवातीला माझ्यात आणि काकांमध्ये एक अंतर होते. पण काळ पुढे सरकला, गैरसमज विरघळले आणि त्यातून निर्माण झालेले नाते आयुष्यभर स्मरणात राहील असे बनले.

​"मोरेना बोलवा..."
एकदा अलंकार हॉटेलमधील एका गर्दीच्या कार्यक्रमात काकांनी सहज विचारले, "मोरे आले नाहीत का? मोरेना बोलवा..." तो क्षण माझ्यासाठी अनपेक्षित होता. त्यानंतर आमच्यातील अंतर पूर्णपणे संपले. कराडच्या बंगल्यावर ते आले की अनेकदा निरोप यायचा आणि मग चहाच्या कपावर राजकारण, सहकार, पत्रकारिता ते दिल्लीतील घडामोडींपर्यंत मनमोकळ्या गप्पा रंगायच्या.
​"मायलेज वाढवा..." – पत्रकारांसाठी गुरुमंत्र

काका पत्रकारांना केवळ बातमी देणारे लोक मानत नसत, तर समाजाचे अभ्यासक मानत. मला त्यांनी दिलेला सल्ला आजही तंतोतंत आठवतो:
​"मोरे, फक्त कराडमध्ये अडकून राहू नका. मायलेज वाढवा, पुस्तके वाचा, अभ्यास करा. पत्रकाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आल्या पाहिजेत. उद्या राहुल गांधी किंवा इतर राज्याचे मोठे नेते आले, तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधणार? अभ्यासाशिवाय दर्जेदार पत्रकारिता होत नाही." असे त्यांचे मत होते. मला प्रत्येक महिन्याला चांगली पेन्शन येते.‌ कराडचे पत्रकार येऊन जर अभ्यासासाठी ग्रंथालय काढणार असतील तर या पेन्शन मधून पत्रकारांसाठी वाटेल तेवढी पुस्तके मी तुम्हाला द्यायला तयार आहे, असं त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं.

​कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि पियूषचा प्रसंग

काकांच्या भाषेत राग असायचा, पण मनात अपार माया होती. कार्यकर्ता सामने आला की "अरे मूर्ख... कशाला आलास?" अशी प्रेमाची शिवी हासडण्याची त्यांची वेगळीच शैली होती. एकदा मी माझा मुलगा पियूषला त्यांना भेटायला घेऊन गेलो. त्याची कृश तब्येत पाहून काका मला हक्काने रागावले, "हा तुमचा मुलगा एवढा बारीक का? मोरे हे अजिबात बरोबर नाही.मुलाच्या तब्येतीकडेही लक्ष द्या." त्यांच्या या प्रेमळ रागामुळे पियूषने व्यायाम सुरू केला. वर्ष-दीड वर्षाने जेव्हा आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा त्याच्या सुधारलेल्या तब्येतीवर काकांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप त्यांच्यातील संवेदनशील पालकाची साक्ष देणारी होती.


​कोरोनाचा काळ आणि 'वडीलकीचा' फोन

कोरोनाचा तो भीषण कालखंड आपल्या सर्वांसाठीच अत्यंत वाईट होता. अहोरात्र जनतेच्या गराड्यात राहणाऱ्या विलास काकांसाठी हा काळ सर्वात मोठा आघात होता. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क तुटला आणि त्यांना घरात राहावे लागले. लोकांना भेटता न आल्यामुळे त्यांचे जणू 'टॉनिक' किंवा 'ऑक्सिजनच' कमी झाला होता. मीही त्या काळात त्यांना भेटू शकलो नाही.
​मात्र, या विलगतेच्या काळात मला काकांचा एक थक्क करणारा अनुभव आला. त्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात काकांचे मला जवळजवळ ६ ते ७ वेळा फोन आले! फोन आला की त्यांचा पहिला प्रश्न असायचा— "मोरे, कुठे आहात? तब्येतीची काळजी घ्या. कुठेही विनाकारण फिरू नका. पत्रकारिता नक्की करा, पण कोरोनाची काळजी घ्या, आजारी पडू नका."

​त्या संकटाच्या काळात कदाचित माझ्या सख्ख्या नातेवाईकांनीही मला इतक्या वेळा फोन करून माझी चौकशी केली नसेल, जेवढी काळजी काकांनी घेतली. काकांना घरात बसून जगातील सर्व बातम्या मिळत होत्या; पण या बातम्या गोळा करण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या पत्रकाराला कोणाची तरी साथ हवी, त्याची काळजी घेणारे कोणीतरी हवे, या भावनेतून एका हक्काच्या 'वडीलकीच्या नात्याने' ते मला फोन करायचे. हा प्रसंग माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा आहे.

​'भगीरथ' आणि शेवटची मुलाखत

​विलास काकांचे आयुष्य लोकांसमोर आणणाऱ्या 'भगीरथ' या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने मला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलाखती घेण्याची आणि काकांचा राज्यव्यापी प्रभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. यादरम्यान काका किती मोठे आहेत हे मोठ्या विभूतींच्या तोंडून ऐकावयास मिळाले.

​मी सातारा येथे त्यांच्या निवासस्थानी घेतलेली त्यांची सविस्तर मुलाखत 'दैनिक पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाली आणि ती प्रचंड गाजली. दुर्दैवाने, त्यानंतर काहीच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि ते आपल्यातून निघून गेले. ती मुलाखत त्यांच्या आयुष्यातील शेवटची प्रमुख मुलाखत ठरेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. ही जाणीव आजही मनाला अस्वस्थ करते.

​आजच्या राजकारणासाठी एक आदर्श
​२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपसह अनेक पक्षांनी त्यांना ऑफर्स दिल्या. पण काकांनी स्पष्ट सांगितले, "ज्या काँग्रेसमुळे मी मोठा झालो, तो पक्ष सोडणार नाही." त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण निष्ठा ढळू दिली नाही.

​आज सत्ता, पैसा आणि पदे असणारे अनेक नेते मिळतील; पण प्रत्येक गावात स्वतःचे हक्काचे माणूस उभे करणारा, कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा आणि पक्षापेक्षा तत्त्वांना मोठे मानणारा विलासराव पाटील उंडाळकर  यांच्यासारखा अजातशत्रू नेता पुन्हा होणे कठीण आहे. ते केवळ एक राजकारणी नव्हते, तर सातारा जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचे एक पर्व होते.

विलासकाकांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाची धुरा त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सांभाळली आहे. आज ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेची सेवा करत आहेत, काकांनी स्थापन केलेल्या, वाढवलेल्या संस्था सांभाळत आहेत. आजचे राजकारण हे विलास काकांच्या काळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, स्पर्धात्मक आणि बदलत्या समीकरणांचे झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीत आपल्या वडिलांचा आणि स्वातंत्र्यसैनिक आजोबा दादासाहेब उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा जपणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही.तरीही उदयसिंह पाटील-उंडाळकर हे आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या लोकसंपर्क, विकासाभिमुखता, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि पक्षनिष्ठेच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. 

काळ बदलला, राजकारण बदलले, काम करण्याच्या पद्धती बदलल्या; तरीही आपल्या घराण्याचा सामाजिक आणि राजकीय वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विलास काकांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे कठीण असले, तरी त्यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे,हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.


१० जुलै २०२६

दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज आणि "दुःखको अपने गले लगा ले"

"दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज 
आणि "दुःखको अपने गले लगा ले"

पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेला पाऊस,पूर आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीवर मात करून पुढे जाणारा वारकरी आणि अशाच वेळी पुण्यातील काही नोकरदार आयटीचे लोक या पावसाला कंटाळलेले दिसले. यावर कार्टूनिस्ट आलोक यांनी आज सुंदर कार्टून काढले आहे. ते आज फेसबुक वर पाहायला मिळाले. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा खालील अभंग आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,
"कष्ट करितां नाम घेतां ।
सुख होते अंतरी ।।
तुका म्हणे विठ्ठला ।
दुःख हे सुखरूप ।।"

हा अभंग वाचल्यानंतर त्याचा अर्थ जाणून घ्यायचा, समजावून घेण्याचा आणि तो त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला.

या अभंगातील "दुःख हे सुखरूप" ही ओळ प्रथमदर्शनी विरोधाभासी वाटते. दुःख आणि सुख हे एकमेकांच्या विरुद्ध असताना संत तुकाराम महाराज दुःखाला सुखरूप का म्हणतात?

याचे उत्तर त्यांच्या जीवनदृष्टीत आहे. माणसाच्या आयुष्यात दुःख, संकटे, अपयश आणि वेदना अपरिहार्य आहेत. त्यापासून कोणीही पळू शकत नाही. पण या दुःखाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, यावर आपले जीवन ठरते. जेव्हा मन विठ्ठलाच्या नामस्मरणात स्थिर होते, तेव्हा दुःखाचा भार कमी वाटू लागतो. दुःख नाहीसे होत नाही, पण ते सहन करण्याची शक्ती वाढते. त्या क्षणी दुःख हेच माणसाला घडवणारे साधन बनते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात—"दुःख हे सुखरूप."

याच विचाराची आठवण अमिताभ बच्चन यांच्या मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील एक संवाद करून देतो.

"दुःख को गले लगा ले... तक़दीर तेरे कदमों में होगी, और तू मुकद्दर का बादशाह बनेगा."

या एका वाक्यात जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान दडले आहे. दुःखापासून पळत राहिलो, त्याच्यावर रडत बसलो, तर ते आपल्याला कमकुवत करते. पण दुःखाचा स्वीकार केला, त्याला मिठी मारली, संकटांशी दोन हात केले, तर तेच दुःख आपली सर्वात मोठी ताकद बनते.

याच चित्रपटातील प्रसिद्ध ओळीही हेच सांगतात—
"रोते हुए आते हैं सब, हँसता हुआ जो जाएगा, वही मुकद्दर का सिकंदर कहलाएगा."

जन्मताना प्रत्येकजण रडत या जगात येतो. पण आयुष्यभर आलेल्या संकटांवर मात करत, चेहऱ्यावर हास्य ठेवून जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने जीवनाचा सिकंदर ठरतो.

संत तुकाराम महाराजांचा अध्यात्म आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील जीवनदर्शन या दोन्हींचा गाभा एकच आहे. दुःख हे शाप नाही; ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारे विद्यापीठ आहे. जो दुःखाचा स्वीकार करतो, तो त्यातून अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक शांत बनतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण सुखाच्या शोधात धावत आहे; पण खरी गोष्ट अशी आहे की सुखाचा मार्ग अनेकदा दुःखातूनच जातो. दुःखाला शत्रू न मानता त्याचा स्वीकार केला, त्यातून शिकत राहिलो, तर एक दिवस तेच दुःख आपल्या यशाचा पाया बनते.

म्हणूनच संत तुकाराम महाराजांचे "दुःख हे सुखरूप" आणि अमिताभ बच्चन यांचे "दुःख को गले लगा ले" हे दोन वेगवेगळ्या काळातील संदेश नसून, एकाच शाश्वत जीवनसत्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत. 

एक अध्यात्माच्या भाषेत सांगतो, तर दुसरा चित्रपटाच्या माध्यमातून; पण दोघेही आपल्याला एकच शिकवण देतात—

दुःखापासून पळू नका. त्याचा स्वीकार करा. कारण दुःखच माणसाला मजबूत बनवते, आणि त्याच दुःखातून जीवन घडते.


०९ जुलै २०२६

कराडपासून अवघ्या ११ किलोमीटरवर... 'X' आकाराचा स्वर्ग! Ex आठवणीसाठी

कराडपासून अवघ्या ११ किलोमीटरवर... 
'X' आकाराचा स्वर्ग! Ex आठवणीसाठी!

मेरवेवाडी पाझर तलाव आणि पाचुंदचा घाट – प्रति महाबळेश्वराचा अविस्मरणीय अनुभव

सौंदर्य पाहण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे नाही. अनेकदा निसर्गाचे सर्वात सुंदर रूप आपल्या अगदी जवळच असते. फक्त ते पाहण्याची दृष्टी आणि अनुभवण्याची संवेदनशीलता आपल्याकडे असावी लागते.

आपण महाबळेश्वर, कास पठार, कुंभरली घाट किंवा इतर पर्यटनस्थळांच्या शोधात भटकत असतो; पण कराडपासून अवघ्या बारा किलोमीटरवर निसर्गाने जपून ठेवलेला एक असा अद्भुत खजिना आहे, ज्याला "प्रति महाबळेश्वर" म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील डोंगररांगांमध्ये वसलेला मेरवेवाडी पाझर तलाव आणि पाचुंदचा घाट हा परिसर प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात एकदा तरी अनुभवावाच.

मी या भागातील असल्याने हे ठिकाण माझ्यासाठी नवीन नाही. मात्र गेल्या काही वर्षांत या ठिकाणाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि पर्यटकांची पावलेही या दिशेने वळू लागली. जे एकेकाळी स्थानिकांपुरते मर्यादित होते, ते आज कराड परिसरातील एक आकर्षक पर्यटनस्थळ बनत आहे.

कराडहून ओगलेवाडी, करवडी, वाघेरी मार्गे पुढे गेल्यावर मेरवेवाडी गाव लागते. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाजवळ जिल्हा परिषदेने १९७२ च्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव उभारला. मेरवेवाडी, वाघेरी, पाचुंद, सुरली आणि परिसरातील गावांना जीवनदायी ठरलेला हा तलाव आज निसर्गप्रेमींसाठी आनंदाचा झरा बनला आहे. आजही त्या काळातील पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन या तलावाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसतात.


तलावाच्या पायथ्याशी असलेले दत्त मंदिर वातावरणाला अधिकच पावित्र्य देते. तलावाच्या काठाने फेरफटका मारणे, पाण्यात पाय सोडून निवांत बसणे, मासेमारीचा आनंद घेणे किंवा सांडव्याच्या भिंतीवर बसून शांतपणे निसर्ग न्याहाळणे... प्रत्येक क्षण मनाला वेगळाच आनंद देऊन जातो.

पण या तलावाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल, 
तर पाचुंदच्या घाटात जायलाच हवे.

मेरवेवाडी गावाच्या डावीकडून सुरू होणारा नागमोडी घाट चढत असताना प्रत्येक वळणावर निसर्गाचे रूप अधिक खुलत जाते. घाटाच्या माथ्यावर एका ठिकाणी वाहन थांबवून खाली नजर टाकली की हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत विसावलेला हा तलाव इंग्रजी अक्षर 'X' च्या आकारात दिसतो. त्या क्षणी आपण कराडजवळ नसून एखाद्या प्रसिद्ध हिल स्टेशनवर उभे असल्याचा भास होतो.

मी गंमतीने एकदा म्हटले होते, "आपल्या 'Ex' आठवणींना उजाळा द्यायचा असेल, तर या 'X' आकाराच्या तलावाला एकदा नक्की भेट द्या." पण खरं सांगायचं तर हा तलाव फक्त जुन्या आठवणी जागवण्यासाठी नाही, तर नव्या उमेदीने जगायला शिकवण्यासाठी आहे.

दोन दिवसांपूर्वी शेताकडे जाताना सहज या ठिकाणी जाण्याचा योग आला. मुसळधार पावसात घाट चढत वर गेलो. खाली तलाव, समोर हिरव्यागार दऱ्या, डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि पावसाच्या सरींनी भारावलेला परिसर... निसर्गाने त्या दिवशी अक्षरशः मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली होती.

थोड्याच वेळात पाऊस थांबला. संध्याकाळचे सावट दाटू लागले आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर दाट धुक्याच्या शुभ्र दुलईत हरवून गेला. इतके धुके पडले की समोरचे काहीच दिसेनासे झाले. त्या निसर्गरम्य क्षणांना डोळ्यांत साठवत मी आणि माझा मित्र संजय शिंदे बराच वेळ तिथे निवांत बसून राहिलो.

त्या क्षणी एकच विचार मनात आला—अशा शांततेचा अनुभव घेण्यासाठी आपण महाबळेश्वर, कास किंवा कुंभरली घाट गाठतो; पण हाच अनुभव कराडपासून अवघ्या बारा किलोमीटरवर मिळू शकतो.

मात्र त्यासाठी एक छोटीशी अट आहे. संध्याकाळची वेळ असावी... आणि तुमच्या नशिबाने नुकताच पाऊस पडलेला असावा. पावसानंतर पाचुंदच्या घाटातून दिसणारा मेरवेवाडीचा पाझर तलाव म्हणजे निसर्गाने रंगवलेले एक जिवंत चित्रच वाटते.

आठवणी सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या... मन थकलेले असो किंवा नव्या ऊर्जेच्या शोधात असो... स्वतःशी काही क्षण संवाद साधण्यासाठी, निसर्गाचा निखळ आनंद लुटण्यासाठी आणि मनाला नवसंजीवनी देण्यासाठी मेरवेवाडीचा हा 'X' आकाराचा पाझर तलाव सर्वोत्तम ठिकाण आहे.

#कसे जाल?

✓कराड – ओगलेवाडी – करवडी – वाघेरी – मेरवेवाडी असा मार्ग या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वात सोयीचा आहे.

#खाण्यापिण्याची व्यवस्था

✓या परिसरात हॉटेल्स नाहीत. त्यामुळे आवश्यक खाण्यापिण्याचे साहित्य सोबत घेऊन जाणे उत्तम. ओगलेवाडी किंवा करवडी येथे आवश्यक वस्तू, खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होतात.

#भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

✓वर्षभर येथे जाता येते. मात्र पावसाळा आणि हिवाळा हा या परिसराचा सुवर्णकाळ आहे. पावसाळ्यात धुके, हिरवाई आणि धबधबे या ठिकाणाला स्वर्गीय रूप देतात.

कराडच्या आसपास अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. त्यांना अधिक प्रसिद्धी आणि विकास मिळायला हवा. मेरवेवाडीचा पाझर तलाव हे त्यातीलच एक अनमोल रत्न आहे.

मग... कधी निघताय?
कराडपासून अवघ्या १२ किलोमीटरवर असलेल्या या निसर्गस्वर्गाकडे...

'X' आकाराच्या तलावाकडे...

स्वतःला पुन्हा एकदा भेटण्यासाठी...

आठवणींना उजाळा देण्यासाठी...

आणि निसर्गाच्या कुशीत काही क्षण मनःशांती अनुभवण्यासाठी.

*सतीश मोरे सतिताभ*
९८८११९१३०२ 

#मेरवेवाडी
#पाचुंद
#निसर्ग
#सतिताभ

०६ जुलै २०२६

कोयना घाटमाथा पावसातल्या साम्राज्यातील अविस्मरणीय प्रवास


कराड ते घाटमाथा... पावसाच्या साम्राज्यातला एक अविस्मरणीय प्रवास
पावसाळा सुरू झाला की माझे पाय आपसूकच कोयनानगरकडे वळतात. प्रत्येक वर्षी किमान एक-दोन वेळा तरी कोयनानगरला जाणे हा माझ्यासाठी एक आनंदसोहळाच असतो. कधी पुढारीच्या बातमीच्या निमित्ताने, कधी निसर्ग अनुभवण्यासाठी, तर कधी मनावरील ताण झटकण्यासाठी. कारण कोयना धरण आणि त्याचा परिसर म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण. येथे घालवलेला एक दिवस मनाला नवसंजीवनी देऊन जातो.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला होता. रविवारी सकाळी अचानक मित्रांसोबत कोयनानगरला जाण्याचा बेत ठरला. माझे मित्र सतीश पाटील, जितेंद्र डुबल आणि मी असा आमचा छोटासा प्रवासाचा चमू तयार झाला. मात्र सगळ्यांच्या वेळा जुळवता जुळवता कराडमधून निघायला दुपारचा एक वाजला.

गाडी चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. कराड सोडताना पाऊस हलकासा होता; पण तांबव्याच्या पुढे गेल्यावर त्याने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. मुसळधार पाऊस, कारच्या काचांवरून झरझर वाहणारे थेंब आणि आवडीची गाणी... अशा वातावरणात गाडी चालवण्याचा आनंद शब्दांत मांडता येत नाही. मला पावसात ड्राइव्ह करायला नेहमीच आवडते. बाहेर कोसळणारा पाऊस आणि आत सुरू असलेली गाणी... यापेक्षा सुंदर संगत दुसरी कोणती असू शकते?

विहेघाट, मळ्हारपेठ, नव्या रस्त्याने आम्ही पाटणला पोहोचलो. पाटणची बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती. नव्या सिमेंट रस्त्यामुळे पूर्वीसारखी वाहतूक कोंडी जाणवत नव्हती. तेथे गाडी बाजूला लावून आम्ही मंडईत गेलो आणि ताजे मासे विकत घेतले. हे मासे कोयनानगरमध्ये एका हॉटेलमध्ये शिजवण्यासाठी देण्याचा आमचा आधीच बेत होता.

पाटण ते कोयनानगरचा रस्ता आता अतिशय चांगला झाला आहे. मध्ये दोन-तीन ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने थोडा वेळ लागतो; पण जेसीबी, सुरक्षा कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी सतत कार्यरत असल्याने फारशी अडचण जाणवत नाही. हा कालचा अनुभव होता.

कोयनानगरमध्ये पोहोचल्यावर एसटी स्टँडजवळील एका हॉटेलमध्ये मासे शिजवण्यासाठी दिले आणि आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. कोयना एसटी स्टँड परिसरात प्रचंड गर्दी होती. धुवांधार पावसात पुलावर उभे राहून धरणातून बाहेर पडणाऱ्या कोयना नदीचे विशाल पात्र पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन बराच वेळ आम्ही त्या दृश्यात हरवून गेलो.

यावेळी नेहमीप्रमाणे नवजा धबधबा किंवा कोयना गार्डनला न जाता घाटमाथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोयनानगर ते घाटमाथा हा पूर्वी खराब असलेला रस्ता आता अतिशय उत्तम झाला आहे. नागमोडी वळणे, धुक्याची चादर आणि मुसळधार पाऊस... प्रत्येक वळण नवा निसर्गदृश्यांचा देखावा उलगडत होते.

घाटमाथ्याच्या अलीकडे असलेल्या छोट्या धबधब्यांजवळ आम्ही थांबलो. गरमागरम कणीस खात धबधब्यांचा आवाज ऐकण्यातही एक वेगळीच मजा असते. पुढे घाटमाथ्यावर पोहोचलो. सातारा जिल्हा संपून रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते त्या ठिकाणी पूर्वी असलेले हॉटेल आता बंद झाले आहे. तेथे तैनात असलेल्या पोलिसांशी काही गप्पा मारल्या आणि मग कुंभारली घाटाच्या दिशेने पुढे निघालो.

हा निर्णय त्या दिवसातील सर्वात सुंदर निर्णय ठरला. घाट उतरताना अवघ्या दोन-तीन किलोमीटरच्या अंतरात असंख्य धबधबे रस्त्याच्या कडेला कोसळताना दिसत होते. काही धबधबे तर इतके जवळ होते की हात पुढे केला तरी त्यांचे पाणी अंगावर उडत होते. सुरक्षित जागी गाडी थांबवून आम्ही एका धबधब्याजवळ गेलो. मनसोक्त भिजलो, त्या निर्मळ पाण्याचा आस्वाद घेतला, भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. त्या क्षणी वेळ, काम, जबाबदाऱ्या... सगळे काही विसरून गेलो होतो.

परत घाटमाथ्यावर येऊन 'हनुमान हॉटेल'मध्ये थांबलो. एका मावशींना गरमागरम कांद्याच्या भजींची ऑर्डर दिली. बाहेर मुसळधार पाऊस, समोर धुक्यात हरवलेला कुंभारली घाट आणि हातात गरमागरम चहा व भजी... अशा क्षणांसाठीच माणूस पुन्हा पुन्हा निसर्गाकडे धावत असतो.

त्या धुक्यात हरवलेल्या घाटाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. काही क्षण मन इतके भरून आले की नकळत काही कविता जन्माला आल्या. काही भावना शब्दांत उतरल्या.

सायंकाळी पुन्हा कोयनानगरला परतलो. हॉटेलमध्ये आमचे मासे आणि जेवण तयार होते. दिवसभराच्या भटकंतीनंतर त्या ताज्या माशांच्या जेवणाची चव अविस्मरणीय होती. रात्री आठच्या सुमारास कोयनानगरमधून परतीचा प्रवास सुरू केला आणि सावधपणे, पावसातून मार्ग काढत साडेनऊच्या सुमारास कराडला पोहोचलो.

कोयना धरण, नवजा धबधबा, कोयना गार्डन आणि विश्रामगृह या ठिकाणी मी अनेकदा गेलो आहे. पण यावेळी कराड ते घाटमाथा हा अवघा सत्तर किलोमीटरचा प्रवास मनात कायमचा घर करून गेला. घाटमाथ्यावरून पाहिलेला मुसळधार पाऊस, धुक्यात हरवलेले डोंगर, धबधब्यांची अखंड गाणी आणि मित्रांसोबत घालवलेले काही तास... आयुष्यभर आठवणीत राहतील.

या संपूर्ण प्रवासात निसर्गाइतकाच आनंद आमच्या गप्पांमध्येही होता. आमच्या तिघांच्या सहलीचा एक अलिखित नियम आहे. आम्ही तिघेही करवडी गावचे असल्यामुळे गावातील विषय काढायचा नाही, राजकारणावर बोलायचे नाही, कोणाची टीका-टिप्पणी करायची नाही. प्रवास हा केवळ आनंदासाठी असतो, हीच आमची भूमिका.
म्हणून आमच्या गप्पांचा विषय असतो तो आयुष्य, मैत्री, जुन्या आठवणी, आवडती गाणी, चित्रपट, नवीन पाहिलेली ठिकाणे, वाचलेली पुस्तके, कधी एखादा विनोद, तर कधी एखादा जीवनानुभव. या गप्पांमधून मन मोकळं होतं, हसू उमलतं आणि प्रवास आणखी सुंदर बनतो.

खरं तर प्रत्येक सहलीत आम्ही निसर्गाइतकाच आनंद एकमेकांच्या सहवासात शोधत असतो. मोबाईल, राजकारण आणि दैनंदिन ताणतणाव यापासून काही तास दूर राहून फक्त त्या क्षणात जगायचं... हीच आमच्या मैत्रीची खरी ताकद आहे. म्हणूनच प्रत्येक कोयनानगरची सहल आमच्यासाठी केवळ पर्यटन राहत नाही, तर ती आयुष्याला नव्याने जगण्याची ऊर्जा देणारी एक सुंदर आठवण बनून जाते.

काही प्रवास हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात; ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी असतात. कराड ते घाटमाथा हा प्रवास माझ्यासाठी तसाच ठरला.

सतीश मोरे सतिताभ 

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...