फॉलोअर

३० मे २०२६

सहकारातील दिग्गजांचे वारसदार... नेमके कसे चुकले?

पुढारी 
प्रितीसंगमावरून 

सहकारातील दिग्गजांचे वारसदार... नेमके कसे चुकले?

कराड तालुका हा विचारवंतांचा, सहकारमहर्षिंचा आणि राज्याला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. कराडच्या भूमीने राज्याला आणि देशाला अनेक दिग्गज नेते दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, विलासराव पाटील उंडाळकर, जयवंतराव भोसले यासारख्या नेतृत्वाने कराडचे नाव राज्याच्या राजकारणात, सहकारात आणि शिक्षण क्षेत्रात उंचावले. मात्र काळ बदलला, पिढ्या बदलल्या आणि या दिग्गजांच्या वारसदारांसमोरच आता स्वतःची ओळख निर्माण करण्याचे किंबहुना टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

यशवंतराव मोहिते यांचे योगदान महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. विधानसभेतील त्यांची अभ्यासू भूमिका, सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी मांडलेली, राबवलेली अनेक धोरणे अशी होती की ज्यांचा प्रभाव पुढे केंद्र सरकारच्या निर्णयांवरही दिसून आला. मात्र आज त्यांच्या वारशाकडे पाहताना एक वेगळीच परिस्थिती दिसते. त्यांचे वारसदार डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याकडे बुद्धिमत्ता, अभ्यास आणि राजकीय जाण यांची कमतरता नाही. परंतु व्यवहारातील राजकारण, संघटन उभारणी आणि सहकार क्षेत्रातील बदलत्या समीकरणांमध्ये ते अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत, अशी चर्चा सहकार क्षेत्रात होताना दिसते.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले. यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात एक मजबूत संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. एके काळी ही संस्था कृष्णा कारखान्याशी जोडली गेल्यामुळे भक्कमपणे उभी राहिली. मात्र कारखान्यातील सत्तांतरानंतर परिस्थिती बदलत गेली. गेल्या काही वर्षांत पतसंस्थेची स्थिती गंभीर बनत गेली. ठेवीदारांचे प्रश्न वाढले, लोकांचा विश्वास डळमळीत झाला आणि “ज्यांच्या घराण्याने राज्याला दिशा दिली, त्यांच्याच वारसांना संस्था सावरणे कठीण गेले,” अशी टीका सुरू झाली. या परिस्थितीत डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यावर राजकीय आणि मानसिक दबाव वाढत गेला, हेही वास्तव नाकारता येणार नाही.

अलीकडील पत्रकार परिषदेत त्यांनी सहकार पॅनेलला दिलेला पाठिंबा हा केवळ राजकीय निर्णय नव्हता, तर त्यामागे एक प्रकारची विवशता जाणवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण, शब्दांमधील संयम आणि परिस्थितीशी केलेली तडजोड स्पष्ट दिसत होती. त्यांनी हा पाठिंबा “सशर्त” असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या स्वभावातील बंडखोरपणा कुठेतरी मवाळ झाल्याचे जाणवत होते. त्यांच्यातील आत्मविश्वास ढळल्याचे जाणवले. 

सहकार, बँकिंग, दूध संघ, साखर कारखाने आणि जिल्हा बँक राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये विलासराव पाटील- उंडाळकर यांनी उभा केलेला प्रभाव आजही अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर काकांचा मजबूत होल्ड होता. निर्णय क्षमता, संघटन कौशल्य आणि व्यवहारातील पकड यामुळे त्यांनी सहकारात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र आज त्यांच्या वारशाकडे पाहताना परिस्थिती बदललेली दिसते. त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील यांनी सहकार आणि राजकारणात सक्रिय भूमिका घेतली असली, तरी वडिलांप्रमाणे व्यापक प्रभाव निर्माण करण्यात त्यांना आजवर अपेक्षित यश मिळालं नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. रयत सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून खासगी पद्धतीने चालवला जात आहे. त्याचबरोबर ॲड. उदयसिंह पाटील यांनी स्वतःचा खासगी कारखाना उभारला. सध्या त्यांच्या नियंत्रणाखाली कोयना संघ, कोयना बॅंक, कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघ या संस्था आहेत. मात्र सहकारातील बदलती राजकीय समीकरणे आणि नेतृत्वातील बदल याचा परिणाम त्यांच्या राजकीय ताकदीवर झालेला दिसतो.
राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातातील निधन, जिल्हा परिषदेतील संघर्ष आणि सातारा जिल्ह्यात अजित पवार गटाला सक्षम नेतृत्वाची कमतरता यामुळे ॲड. उदयसिंह पाटील यांची राजकीय पकड थोडी कमजोर झाल्याचे चित्र दिसते. 

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली माघार अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली. विशेषतः त्यांनी कोणत्या राजकीय, सहकारी किंवा ‌‘इतर‌’ गणितातून डॉक्टर सुरेश भोसले यांना पाठिंबा दिला, हा प्रश्न अद्याप चर्चेचा विषय आहे. हा पाठिंबा “बिनशर्त” असल्याच्या चर्चा रंगत असल्या तरी त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि सहकारातील नवीन आघाड्या यांचे गणित असू शकते, असे जाणकारांचे मत आहे. तथापि, या निवडणुकीत घेतलेली सपशेल माघार ही सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरल्याचे बोलले जात आहे. 
सहकार क्षेत्रातील एका मोठ्या घराण्याच्या वारसदाराला निवडणुकीत माघार घ्यावी लागणे किंवा तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागणे, हे केवळ वैयक्तिक अपयश नाही, तर बदलत्या सहकार राजकारणाचेही प्रतिबिंब आहे.कराडच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आजही मोठी परंपरा आहे, मोठी नावे आहेत. मात्र त्या परंपरेचा वारसा टिकवण्यासाठी केवळ नाव पुरेसे नसते. त्यासाठी संघटन, जनसंपर्क, व्यवहार कौशल्य आणि काळानुसार बदल स्वीकारण्याची क्षमता आवश्यक असते आणि कदाचित याच ठिकाणी जुन्या व नव्या पिढीतील फरक अधोरेखित होताना दिसतो.

डॉ. इंद्रजीत मोहिते आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेली भूमिका ही त्यांच्या राजकीय सोयीची, भविष्यातील समीकरणांची किंवा काही राजकीय तडजोडींचा भाग असू शकते. प्रत्येक निर्णयामागे काही ना काही गणित असते, हे वास्तव जरी मान्य केले तरी या भूमिकांना सर्वसामान्य सभासद आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांची अपेक्षित मान्यता मिळालेली दिसत नाही. विशेषतः सहकाराच्या विचारातून घडलेल्या आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्वाचा वारसा लाभलेल्या घराण्यांकडून सभासदांच्या अपेक्षा अधिक मोठ्या असतात. त्यामुळे या वारसदारांनी घेतलेल्या भूमिकांबाबत जनतेमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. “सहकाराच्या तत्त्वांपेक्षा राजकीय सोयी महत्त्वाच्या ठरत आहेत का?” असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करत आहेत.

तिसरा विषय कृष्णा कारखाना संदर्भात नसला तरी सहकारात भव्य कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या सह्याद्री कारखान्याचा आहे.

सह्याद्री साखर कारखाना हा केवळ एक उद्योग नाही, तर कराड परिसराच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार चळवळीच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातून आणि सहकाराच्या तत्त्वातून उभ्या राहिलेल्या या चळवळीने ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना आधार दिला. आबासाहेब पार्लेकर यांचा अल्पकाळ, कालावधी सोडला तर पी. डी. साहेब सह्याद्रीचे तहयात चेअरमन होते. त्यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर कारखान्याची धुरा बाळासाहेब पाटील यांच्या हातात आली. अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पंधरा महिन्यापूर्वी कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब पाटील यांनी सभासदांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीतील भव्य यशानंतर गेल्या वर्षभरात सह्याद्री कारखान्याने सभासदांना मोफत साखर दिलीही. मात्र अचानकपणे 1 एप्रिलपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोफत साखर बंद तर केलीच पण पूर्वी सात रुपये किलो दराने मिळणारी साखर आता पंधरा रुपये किलो दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सभासदांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.

प्रश्न केवळ मोफत साखरेचा नाही, प्रश्न आहे तो निर्णय प्रक्रियेचा. सभासदांनी त्यांच्यावर मोफत साखर द्यावा असा दबाव आणलेला होता का किंवा मागणी केली होती का? मोफत साखर देण्याचा निर्णय घेताना पुढील आर्थिक परिणामांचा विचार झाला होता का? साखर उद्योगातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते, मग त्यांनी मोफत साखरेचा निर्णय घेतलाच कसा? आणि आता जर परिस्थिती बदलली असेल, तर सभासदांना विश्वासात घेऊन निर्णय का सांगितला गेला नाही? सहकार म्हणजे केवळ कारखाना चालवणे नाही, तर सभासदांच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाकडून सभासदांना अधिक स्पष्टता आणि संवादाची अपेक्षा होती. मोफत साखर योजना सुरू करताना ज्या पद्धतीने तिचं स्वागत झालं, त्याच पद्धतीने ती अचानक बंद झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 

कारखान्याच्या भविष्यासाठी आर्थिक शिस्त आणि व्यवहार्य निर्णय आवश्यक असतात, हे जरी खरे असले तरी सभासदांचा विश्वास टिकवणे त्याहून अधिक महत्त्वाचे असते. आज सह्याद्री कारखान्यासमोर केवळ आर्थिक नव्हे, तर विश्वासार्हतेचेही मोठे आव्हान उभे आहे. आगामी काळात कारखाना सक्षमपणे चालवणे, सभासदांचा विश्वास परत मिळवणे आणि सहकाराची परंपरा जपणे हे मोठे शिवधनुष्य बाळासाहेब पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे.

सतीश मोरे 
9881191302

२६ मे २०२६

शिस्त लावण्यासाठी संस्कार


आजची पिढी खूप वेगळी आहे. त्यांचे विचार, त्यांची जगण्याची पद्धत आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळाच आहे. म्हणूनच अनेकदा मोठ्यांनी सांगितलेल्या साध्या गोष्टीही त्यांना लगेच पटत नाहीत.

घरातील लाईट चालू ठेवू नयेत, झोपताना सर्व बटणे बंद करावीत, घर स्वच्छ ठेवावं, जेवल्यानंतर ताट बेसिनमध्ये ठेवताना त्यातील उरलेले अन्न आधी बाजूला काढावं, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात… अशा छोट्या-छोट्या सवयी घराला संस्कार देतात. पण अलीकडच्या पिढीत या गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसतं आणि ते पाहून मन नकळत खिन्न होतं.

किती वेळा सांगायचं, किती वेळा समजवायचं हा प्रश्न पडतो. आपण केवळ नियम शिकवत नसतो, तर आयुष्य जगण्याची शिस्त आणि संवेदनशीलता शिकवत असतो.


कधी कधी मनात निराशा येते, आपले शब्द वाया जात आहेत असं वाटतं. पण तरीही एक विश्वास कायम असतो — आपले विचार प्रामाणिक आणि सकारात्मक असतील, तर त्याचा परिणाम कधीतरी नक्की होतो.

ही “Gen Z” पिढी आहे… त्यांना आदेश नको असतात, संवाद हवा असतो. त्यांना फक्त सांगून चालत नाही, तर समजून घेत जवळ करावं लागतं. काळ बदलला आहे, पद्धती बदलल्या आहेत; पण संस्कारांची किंमत आजही तितकीच मोठी आहे.

@पप्पा🥹

शिस्त लावण्यासाठी संस्कार


आजची पिढी खूप वेगळी आहे. त्यांचे विचार, त्यांची जगण्याची पद्धत आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळाच आहे. म्हणूनच अनेकदा मोठ्यांनी सांगितलेल्या साध्या गोष्टीही त्यांना लगेच पटत नाहीत.

घरातील लाईट चालू ठेवू नयेत, झोपताना सर्व बटणे बंद करावीत, घर स्वच्छ ठेवावं, जेवल्यानंतर ताट बेसिनमध्ये ठेवताना त्यातील उरलेले अन्न आधी बाजूला काढावं, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात… अशा छोट्या-छोट्या सवयी घराला संस्कार देतात. पण अलीकडच्या पिढीत या गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसतं आणि ते पाहून मन नकळत खिन्न होतं.

किती वेळा सांगायचं, किती वेळा समजवायचं हा प्रश्न पडतो. आपण केवळ नियम शिकवत नसतो, तर आयुष्य जगण्याची शिस्त आणि संवेदनशीलता शिकवत असतो.


कधी कधी मनात निराशा येते, आपले शब्द वाया जात आहेत असं वाटतं. पण तरीही एक विश्वास कायम असतो — आपले विचार प्रामाणिक आणि सकारात्मक असतील, तर त्याचा परिणाम कधीतरी नक्की होतो.

ही “Gen Z” पिढी आहे… त्यांना आदेश नको असतात, संवाद हवा असतो. त्यांना फक्त सांगून चालत नाही, तर समजून घेत जवळ करावं लागतं. काळ बदलला आहे, पद्धती बदलल्या आहेत; पण संस्कारांची किंमत आजही तितकीच मोठी आहे.

@पप्पा🥹

१९ मे २०२६

भेटी लागे जीवा लागलीसे आस


भेटी लागे जीवा… विठ्ठल भेटीची तळमळ 

संत तुकाराम यांचे अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते जीवनाचे अनुभव आहेत. संसारातील दुःख, संकट, उपासमार, अपमान, संघर्ष आणि त्यातून मिळालेली परमेश्वराची अनुभूती या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगातून व्यक्त होतात. म्हणूनच तुकोबांचे शब्द हे थेट मनाला भिडतात.

मी दहावीला असताना कुमारभारती अर्थात मराठीच्या पुस्तकात शिकवला जाणारा “भेटी लागे जीवा लागलीसे आस…” हा अभंग माझ्या मनाला लहानपणापासून स्पर्श करून गेला. काळ बदलला, आयुष्य पुढे सरकलं, अनेक गोष्टी बदलल्या; पण हा अभंग ऐकला की मन पुन्हा भक्तीच्या त्या शांत विश्वात जाऊन पोहोचतं. अनेकदा हा अभंग मी टीव्हीवर किंवा मोबाईलवर लावतो आणि डोळे बंद करून या अभंगाचे प्रत्येक शब्दाचे अर्थ जाणून घेतो 

खरंचदेव असो, एखादी व्यक्ती असो किंवा आपलं एखादं ध्येय असो त्याची आपण वाट ज्या पद्धतीने पाहतो ती वाट किती कष्टदायी असते याची मला या अभंगातून अनुभूती येते.

अभंग

भेटी लागे जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥

पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन ।

तैसे माझे मन वाट पाहे ॥

दिवाळीच्या मूळा लेकी आसावली ।

पाहतसे वाटुली पंढरीची ॥

भुकेलिया बाळ अति शोक करी ।

वाट पाहे परी माउलीची ॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धावूनि श्रीमुख दावी देवा ॥


अभंगातील भक्तीची तळमळ

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या भक्ताच्या मनाचा आवाज आहे.

“भेटी लागे जीवा लागलीसे आस…” या पहिल्याच ओळीत तुकोबा सांगतात की, माझ्या जीवाला आता तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी दिवस-रात्र फक्त तुझीच वाट पाहतो आहे.ही केवळ भक्ती नाही; ही भक्ताच्या अंतःकरणातून निघालेली हाक आहे.

चकोर आणि पावसाची प्रतीक्षा

तुकाराम महाराजांनी चकोर पक्ष्याचे उदाहरण दिले आहे. लोकमान्य समजुतीनुसार चकोर हा पक्षी पावसाच्या थेंबांची वाट पाहतो. त्याच्यासाठी तो पाऊस म्हणजे जीवन असतं.

त्याचप्रमाणे तुकोबांचं मन विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलं आहे.ज्याप्रमाणे चकोराला पावसाशिवाय चैन पडत नाही, त्याचप्रमाणे भक्ताला देवाशिवाय समाधान मिळत नाही.

माहेराची वाट पाहणारी लेक

“दिवाळीच्या मूळा लेकी आसावली…” ही ओळ मनाला फार स्पर्शून जाते. लग्न झालेली मुलगी दिवाळीत माहेरी जाण्यासाठी जशी आपल्या वडिलांची वाट पाहते, तशीच अवस्था भक्ताची असते.“माझे बाबा मला न्यायला येतील…” या आशेवर ती दिवस मोजत असते.तुकाराम महाराज म्हणतात —देवा, मीही तुझी तितक्याच आतुरतेने वाट पाहतो आहे.

आईची वाट पाहणारं भुकेलेलं बाळ

भुकेलेलं लहान मूल आईशिवाय शांत होत नाही. बाकी कुणीही काही समजावून सांगितलं तरी ते बाळ गप्प बसत नाही.आई येईपर्यंत त्याचं रडणं थांबत नाही. कारण त्याला माहीत असतं की, माझं समाधान फक्त आईजवळच आहे.तुकाराम महाराजांनी हाच भाव देवासाठी व्यक्त केला आहे.“देवा, तुझ्या दर्शनाशिवाय माझं मन शांत होणार नाही.”

संत तुकारामांचे जीवन आणि भक्ती

संत तुकाराम यांनी आयुष्यात अनेक संकटं पाहिली. दुष्काळ, कर्ज, संसारातील दुःख, समाजाचा विरोध — या सर्व गोष्टी त्यांनी अनुभवल्या. पण या संकटांमध्येही त्यांनी विठ्ठलाचं नाम सोडलं नाही.त्यांच्यासाठी विठ्ठल ही केवळ देवाची मूर्ती नव्हती; तर तो त्यांचा मित्र, आधार, आई-वडील आणि सर्वस्व होता.त्यामुळे त्यांच्या अभंगात कृत्रिमता नाही.जे अनुभवलं, जे जगलं, तेच त्यांनी शब्दांत उतरवलं.


हा अभंग आजही का भावतो?

आजच्या धावपळीच्या जगात माणूस खूप काही मिळवतो; पण मनःशांती हरवतो. अशा वेळी तुकोबांचे अभंग मनाला शांत करतात.“भेटी लागे जीवा…” हा अभंग आपल्याला सांगतो की —ज्याप्रमाणे माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीची आतुरतेने वाट पाहतो, त्याचप्रमाणे भक्ताने देवावर प्रेम करावं.ही भक्ती भीतीची नाही, तर प्रेमाची आहे.

तुकाराम महाराजांचा हा अभंग मी जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा मन भक्तीने भरून येतं. लतादीदींच्या आवाजात हा अभंग ऐकताना हृदय दाटून  येतं. डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहू लागतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विरहात आपण जेव्हा हा अभंग ऐकत राहतो तेव्हा त्या अभंगाची खरी खोली आणि उंची आपल्याला जाणवते. हा अभंग केवळ शब्दांचा नाही; तर भक्ताच्या हृदयातील तळमळीचा आहे.देव भेटावा, त्याचं दर्शन व्हावं, त्याच्याशी मन मोकळं करावं — ही जी ओढ आहे, तीच या अभंगात प्रत्येक ओळीतून प्रकट होते.

आणि म्हणूनच —“भेटी लागे जीवा लागलीसे आस…”

हा अभंग काळ बदलला तरी मनातून कधीही जात नाही.



सतीश मोरे सतिताभ 

9881191302

१८ मे २०२६

नवसाला पावणारी जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगल ताई


*नवसाला पावणारी करवडीची जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगल ताई*_ 

 _करवडीत उद्या सिझन मधील शेवटचा शो_ 

महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासात काही नावं ही केवळ कलाकार म्हणून नाही, तर एक परंपरा म्हणून ओळखली जातात. मंगला बनसोडे हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव. कितीही संकटं आली, कितीही अडचणी आल्या, तरी मंगला बनसोडे कधी खचल्या नाहीत. संघर्षाशी दोन हात करत त्यांनी उभा केलेला तमाशाचा हा प्रवास म्हणजे जिद्दीचा, कष्टाचा आणि श्रद्धेचा जिवंत इतिहास आहे.

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या असलेल्या मंगलताईनी करवडी तालुका कराड येथील रामचंद्र बनसोडे यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिल, सुनील, नितीन अशी तीन मुले आणि लक्ष्मीताई ही मोठी कन्या अशी चार अपत्ये झाली. पुढे हे संपूर्ण कुटुंबच तमाशा कलेसाठी वाहून घेत गेलं.

सुमारे १९८२-८३ च्या काळात “मंगला बनसोडे तमाशा मंडळ” या नावाने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. विठाबाई नारायणगावकर यांच्या फडातून स्वतंत्र होत मंगला बनसोडे आणि त्यांचे पती रामचंद्र बनसोडे यांनी स्वतःचा तमाशा फड उभा केला. सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षमय होता. आर्थिक परिस्थिती कठीण होती. अनेकदा संकटं समोर उभी राहत होती. पण करवडी गाव नेहमी त्यांच्या पाठीशी राहिलं. रामचंद्र बनसोडे आणि मंगल ताईंनी हा तमाशा टिकण्यासाठी अनेक कष्ट सोसले. वडलार्जित संपत्ती त्यांना विकावी लागली. खूप खूप प्रयत्नातून आणि कष्टातून हा फड हळूहळू उभारी घेत गेला.


या तमाशा मंडळाने सुरुवातीपासूनच वेगळे प्रयोग केले. लावणी, गण-गवळण, वगनाट्य, विनोदी बतावणी अशा सर्व प्रकारांत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. संगीत बारी आणि वगनाट्य हे तर या तमाशा मंडळाचा खास वैशिष्ट्य होतं आहे. पुढे हे मंडळ महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा मंडळांपैकी एक बनले. राज्यातील प्रमुख पाच तमाशा फडांची नावे घेतली तर “मंगला बनसोडे तमाशा मंडळ” हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

सुरुवातीच्या काळात संपूर्ण तमाशा सांभाळण्याची जबाबदारी मंगला बनसोडे यांच्यावर होती. त्यावेळी त्यांच्यासोबत लहानगा नितीनही फडात काम करत होता. आठ-नऊ वर्षांचा तो मुलगा पुढे महाराष्ट्राचा लोकप्रिय कलाकार “विनोदाचा सम्राट नितीनकुमार बनसोडे” म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसरीकडे अनिल बनसोडे यांनी तमाशा मंडळाची टेक्निकल बाजू सांभाळली.  वर्गात हुशार असलेला अनिल पुढे घरच्या तमाशा मंडळासाठी पूर्णवेळ काम करू लागला.
रामचंद्र बनसोडे यांचे योगदानही तितकेच मोठे आहे. त्यांनी अनेक गाजलेले वग लिहिले. तमाशा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्याला साहित्यिक आणि सामाजिक बाजू देण्याचं काम त्यांनी केलं.

माझं स्वतःचं गाव करवडी असल्यामुळे या तमाशा मंडळाशी माझं बालपणापासूनच नातं जोडलेलं आहे. पावसाळा संपत आला की करवडी गावात आमच्या घरासमोर एका बंद पडलेल्या पोल्ट्रीमध्ये रंगीत तालमी व्हायच्या. त्या पाहण्यासाठी आम्ही उत्साहाने जात असू. अनिल बनसोडे हा माझा वर्गमित्र. आम्ही चौथीपर्यंत एकत्र शिकलो. पुढे त्याने शिक्षण सोडून तमाशा मंडळासाठी स्वतःला वाहून घेतलं.

मंगला बनसोडे आणि करवडी गाव यांचं नातं अत्यंत भावनिक आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जीवनातील श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे करवडीची जानूबाई देवी. दरवर्षी दसरा-दिवाळीनंतर तमाशा दौरा सुरू करण्यापूर्वी मंगला बनसोडे जानूबाईच्या मंदिरात जातात. “आई जानूबाई, मी तमाशा दौऱ्यावर निघत आहे. संपूर्ण दौरा सुखरूप पार पडू दे. शेवटचा खेळ मी तुझ्या दारात मोफत करेन,” असा नवस त्या बोलतात.

१९८८ पासून सुरू झालेला हा नवस आजतागायत अखंड सुरू आहे. मे महिन्यात तमाशाचे दौरे संपल्यानंतर शेवटचा मोफत खेळ करवडी गावात जानूबाई देवीच्या साक्षीने होतो. गेली पस्तीस वर्षे हा शब्द त्यांनी कधी मोडला नाही. गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे तमाशाचा खेळ दोनदा रद्द झाला, पण तरीही मंगला बनसोडे आणि काही कलाकारांनी मंदिरात जाऊन देवीसमोर छोटासा गण-गवळण सादर करून नवस पूर्ण केला.

उद्या दिनांक १९ मे रोजी करवडी गावात या सिझनमधील त्यांचा शेवटचा तमाशा रंगणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला परिसरातील हजारो रसिक उपस्थित राहतात. मध्यंतरात गावातील सरपंच, सोसायटीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या वतीने मंगला बनसोडे यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला जातो. तो क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानाचा आणि भावनिक असतो.

मंगला बनसोडे यांच्या कुटुंबाशी माझे गेली चाळीस वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या प्रत्येक संकटाच्या काळात मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, आणि त्यांनीही मला कुटुंबातील सदस्यासारखंच प्रेम दिलं. मंगलताई तर मला त्यांचा चौथा मुलगाच मानतात.

आजही करवडी गाव, संपूर्ण परिसर आणि महाराष्ट्रातील तमाशा रसिकांच्या मनात मंगला बनसोडे यांच्याबद्दल अपार प्रेम आणि आदर आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा तमाशा फड भविष्यातही असाच यशाच्या शिखरावर जावो, आणि महाराष्ट्राची ही लोककला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो, हीच मनापासून शुभेच्छा.


सतीश मोरे सतिताभ
पत्रकार दैनिक पुढारी कराड 
9881191302

१७ मे २०२६

इस्त्रीवाले गुरू... शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार

माझे इस्त्रीवाले गुरु – शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार


गुरू म्हणजे केवळ आध्यात्मिक मार्ग दाखवणारा प्रकाश नसतो. विश्वसंत विचारवंत सदगुरू वामनराव पै यांनी म्हटल्याप्रमाणे —"जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्यात जो जो तुम्हाला काही तरी शिकवतो, तो प्रत्येक जण तुमचा गुरू असतो."

खरंच, जीवन ही एक अखंड शाळा आहे. कोणी आपल्याला धडपडत सायकल चालवायला शिकवतं, कोणी इंग्रजी शब्दांची ओळख करून देतं, तर कोणी सुरांचा लयीत गाणं म्हणायला शिकवतं. कोणी शेतातल्या मातीशी नातं सांगत पाण्याचे पाट (दारं) धरायला शिकवतं, तर कोणी पंक्चर काढण्याचं कसब शिकवतं. सुंदर अक्षराचा वळणदार वळसा असो, टीव्ही-मोबाईलचे गुंतागुंतीचे सर्किट्स असोत, विहिरीत मारलेली पहिली पोहण्याची उडी असो, की एखाद्या नवीन ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान... अगदी डोंगर चढण्याचा थरारही आपल्याला कोणीतरी शिकवतच असतं.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी आपल्याला समृद्ध करणारा एक माणूस भेटत असतो. तो श्रीमंत असो वा गरीब, वयाने लहान असो वा मोठा — ज्याच्याकडून आपल्याला जगण्याची एक नवी दृष्टी मिळाली, तो आपला गुरूच! आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या पाठीवर अनुभवांचे, ज्ञानाचे आणि संस्कारांचे कप्पे सोडून जाते. म्हणूनच, हे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक महा-गुरुकुल आहे आणि इथे भेटणारा प्रत्येक जीव आपला आचार्य आहे.

आज मला माझ्या अशा दोन गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ज्यांनी मला कधी वर्गात बसवून पाटी-पेन्सिल दिली नाही, की माझा हात धरून अक्षरे गिरवली नाहीत; पण त्यांच्या हातांच्या जादू कडे पाहता पाहता मी आयुष्याचं एक मोठं कौशल्य शिकून गेलो. ती दोन नावं म्हणजे करवडी गावचे इस्त्रीवाले शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार.

पाचवी ते दहावीच्या त्या सोनेरी दिवसांची ही गोष्ट. करवडी गावातून कराडच्या शाळेत जाण्यासाठी माझा रोजचा प्रवास एसटी बसने व्हायचा. सकाळी दहा वाजता मी करवडीच्या एसटी स्टँडवर येऊन थांबायचो. सव्वादहाची 'वाघेरी-कराड' बस कधी गर्दीमुळे थांबायची, तर कधी तशीच सुसाट निघून जायची. मग आमचा आसरा असायची साडेदहाची 'करवडी-कराड' बस. ही बस आधी आरफळ कॉलनीत जाऊन परतायची आणि मग आम्हाला घेऊन कराडकडे निघायची.

बसने ओगलेवाडी सोडली की विरवडे हद्दीत रेल्वेचं एक फाटक लागायचं. पावणे अकराच्या सुमारास तिथून 'कोयना एक्सप्रेस' धावायची, त्यामुळे ते फाटक हमखास बंद असायचं. बसच्या खिडकीतून डोकावत, तोंडात बोट घालून ती झुक-झुक आगीनगाडी पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. ते रेल्वे फाटक, ती धावणारी कोयना एक्सप्रेस, मालगाड्या आणि तो एसटीचा धुरळा... हे सगळं माझ्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होतं.

"प्रसाद" आणि "जानाई" मधील ते दोन जादूगार

करवडी स्टँडच्या समोर एक छोटंसं खोकेवजा इस्त्रीचं दुकान होतं — “प्रसाद पावर लॉन्ड्री”. त्याचे मालक होते शशिकांत चन्ने.  कराडला जाणारी एसटी बस येईपर्यंत मी शशिकांत चन्ने यांच्या खोके वजा दुकानात बसत होतो. पुढे काही वर्षांनी गावातच आमच्या घराजवळ स्टँड परिसरातच संजय कुंभार यांनी आपले “जानाई पावर लॉन्ड्री” सुरू केले. हा कालावधी १९८५ चा आहे. बसची वाट पाहत असताना किंवा फावल्या वेळात, माझी पाऊले नकळत त्या दुकानांकडे वळायचं आणि मी तिथे तासन्तास बसून राहायचो.

माझे डोळे त्यांच्या हातांच्या हालचालींवर असायचे.
शर्ट किंवा पॅन्टची इस्त्री सुरू करताना पहिल्यांदा कोणत्या भागाला इस्त्री करायची ?
शर्टची कॉलर कशी परफेक्ट बसवायची...?
घडी घालताना कापडाची नजाकत कशी जपायची...?
पॅंटला तलवार सारखी धारदार इस्त्री कशी करायची...?
भट्टीचे पांढरे कपडे इस्त्री करताना काय काळजी घ्यायची.?
रेशमी साडी जळू नये म्हणून कोळशाच्या किंवा विजेच्या इस्त्रीचं तापमान कसं राखायचं...?
जाड आणि पातळ कपड्यांमधील तो सुळसुळीत फरक कसा हाताळायचा...?

हे सगळं मी कोणत्याही पुस्तकाशिवाय, केवळ डोळ्यांनी आत्मसात करत होतो. त्यांनी मला कधी “ये, शिक” असं आवर्जून म्हटलं नाही. पण त्यांच्या त्या गरम इस्त्रीच्या वाफेसोबत माझं कल्पकतेचं प्रशिक्षण नकळत सुरू होतं. त्या काळात कोळशावरील इस्त्री होती. इस्त्री थंड झाली की त्यात पुन्हा कोळसा टाकला जायचा. नवीन कोळसा भरताना कधी कधी हाताला चटके बसायचे मात्र हे चटके त्यांच्या आयुष्याचा एक भाग झाला होता.

पाचवी ते सातवीतला तो हाफ चड्डीतला मी... ती माझी छोटीशी मूर्ती मला आजही स्पष्ट आठवते. गावातली माणसं त्या दुकानात बसलेल्या मला पाहून कधी कधी चेष्टा करायची, "शाळा शिकून काय  करणार आहेस ?" असं विचारायची. पण त्या कोवळ्या वयात ते इस्त्रीचं दुकान म्हणजे माझ्यासाठी फक्त एक दुकान नव्हतं, तर ते माझं हक्काचं विसाव्याचं आणि संवादाचं केंद्र होतं.

जगण्याचा वळणदार मंत्र

काही वर्षांनी आमच्या घरी स्वतःची इस्त्री आली. जेव्हा मी पहिल्यांदा कपडे इस्त्री करायला हातात घेतले, तेव्हा माझे हात जराही अडखळले नाहीत. आज मी अतिशय अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगू शकतो की, मी कोणत्याही कपड्याला अतिशय नीटनेटकी आणि आकर्षक इस्त्री करू शकतो. माझ्या इतकी सुंदर इस्त्री माझ्या मित्रमंडळीत कुणालाही करता येणार नाही असे मी माझ्या मित्रांना कायम सांगतो आणि तेही ते मान्य करतात... आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या त्या दोन अवलिया गुरूंना — शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार यांना जातं.

त्यांनी मला फक्त कपड्यांच्या सुरकुत्या मिटवायला शिकवलं नाही, तर आयुष्यातील बारकावे कसे टिपायचे, संयम कसा राखायचा आणि कोणतंही काम अगदी मनापासून केलं की त्यात 'कौशल्य' कसं उतरतं, हा जगण्याचा मोठा मंत्र दिला.

त्यामुळेच आज मागे वळून पाहताना मनापासून वाटतं — रस्त्यात गाडी बंद पडल्यावर ज्याने कार्ब्युरेटर साफ करायला शिकवलं, तोही गुरूच! पंक्चर काढणारा, पोहायला शिकवणारा, मातीत घाम गाळून शेती शिकवणारा... हे सगळेच गुरू आहेत. आणि कपड्यांना आपल्या कलेने सुंदर रूप देणारे शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार हे तर माझ्या आयुष्यातील 'खरे कलाकार' आणि आदरणीय गुरू आहेत.

शशिकांत चन्ने यांच्या दुकानात आणखीन एक गोष्ट मला खूप आकर्षित करत होती ती म्हणजे त्यांच्या दुकानात लावलेले अमिताभ बच्चन यांचे दोन मोठे पोस्टर. त्यावेळी पोस्टर आणल्यानंतर ते काचेच्या फ्रेम मध्ये लावले जायचे. कुली चित्रपटातील एक फोटो आणि लावारिस चित्रपटातील उभा राहिलेला तो बच्चन असे दोन फोटो या दुकानात लावलेले होते. (आजही ते फोटो त्या दुकानांमध्ये आहेत.) हे फोटो पाहत असताना मला माझ्यातील अमिताभ बच्चन प्रेम नकळत बहरले जात होते. नवीन चित्रपट किंवा गाण्याची कॅसेट आली की या दुकानात चर्चा व्हायची.

संजय कुंभार यांच्या दुकानात यांचे दुकान म्हणजे फक्त इस्त्री दुकान नव्हते तर करवडीतील एक छोटं ग्रंथालय होते. या दुकानात प्रत्येक दिवशी सातारचा ऐक्य पेपर आणि प्रत्येक रविवारी कोल्हापूरचा सत्यवादी पेपर यायचा. ऐक्य त्या काळी जिल्ह्याचे मुखपत्र होता. तो पेपर आला की पेपर वाचण्यासाठी आमच्या उड्या पडायच्या. जिल्ह्यात काय घडलं आहे याची संपूर्ण माहिती या पेपरमधून आम्हाला मिळायची. प्रत्येक रविवारी येणारा सत्यवादी म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा खजिना होता. फुलबाग पत्रमैत्री हा सत्यवादी मधील बालगोपाळांसाठीचा एक कॉलम होता, त्यामध्ये मी लहानपणी काही विनोद गोष्टी बोधकथा पाठविल्या होत्या, त्या सत्यवादीमध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या. सत्यवादी पुरवणीमध्ये पहिल्या पानावर क्राईम स्टोरी असायची. ती वाचण्यासाठी तर पेपरला नंबर लागायचे. 

इस्त्रीच्या दुकानात मिळालेले मला दोन गुरु आणि त्या ठिकाणी मला मिळालेले ज्ञान हे आजही मला अनेक ठिकाणी उपयोगी पडतं. म्हणून मला सांगावासं वाटतं
आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर करा, कारण कोण, कधी आणि कोणत्या रूपात आपल्याला जगण्याचं गाणं शिकवून जाईल, हे सांगता येत नाही.

"गुरू हा फक्त छापील पुस्तकात नसतो...
तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
माणसाच्या रूपात भेटत असतो."

महत्वाचं... संजय कुंभार यांनी या इस्त्रीच्या दुकानाच्या जोरावर अतिशय कष्टाने आपला संसार चालवला आहे त्यांची दोन्ही मुलं आज उच्चशिक्षित आहेत. त्यांचा एक मुलगा आता पुण्यामध्ये मोठ्या आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहे ज्याला 25 लाखाचं पॅकेज आहे. तर मुलीचेही लग्न झाला आहे. कुंभार यांनी या दुकानाच्या जोरावरच छोटसं टुमदार घर बांधलं आहे. संजय कुंभार हे करवडीतील प्रसिद्ध गोंधळी आहेत अतिशय चांगला गोंधळ घालतात. ते जन्माने जातीने कुंभार आहेत अतिशय सुंदर गणपतीच्या मुर्त्या ह तयार करतात.

*सतीश मोरे सतिताभ* 
९८८११९१३०२

१६ मे २०२६

आक्रमक नेतृत्वातून अध्यात्माच्या वाटेवर…भीमराव डांगे यांचा प्रेरणादायी प्रवास


*आक्रमक नेतृत्वातून अध्यात्माच्या वाटेवर…* 
*भीमराव डांगे यांचा प्रेरणादायी प्रवास*

कराड पंचायत समितीचे माजी सदस्य भीमराव डांगे आणि माझी मैत्री ही २००२ सालापासूनची. २००१ ते २००५ हा पंचायत समितीच्या राजकारणातील एक वेगळाच काळ होता. त्या काळातील सदस्य हे अभ्यासू, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे होते. भीमराव धोंडी पाटील, अशोकराव थोरात, कोर्टीचे थोरात आणि भीमराव डांगे यांसारख्या अनेक मान्यवरांनी त्या काळात पंचायत समितीच्या सभागृहात सामान्य माणसाचे प्रश्न ताकदीने मांडले. पत्रकार म्हणून त्या काळात जुळलेली मैत्री आजही कायम आहे.

परवा भीमराव डांगे यांची त्यांच्या शेतात भेट झाली आणि अनेक जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. खरं तर शामगावचा एक आक्रमक चेहरा म्हणून भीमराव डांगे यांच्याकडे पाहिले जाते. कऱ्हाड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले हे गाव… कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेलं गाव. आंतवडी, सुर्ली, कामथीसह हा संपूर्ण परिसर डोंगरी आणि पाणीटंचाईग्रस्त. मात्र शासनाच्या नोंदीत या गावांचा डोंगरी भागात समावेश नव्हता. या गावांना न्याय मिळावा म्हणून भीमराव डांगे यांनी मोठा संघर्ष उभारला.
पाणीटंचाईचा प्रश्न असो, दुष्काळी छावण्यांचा विषय असो किंवा शामगावच्या पाणी योजनेचा मुद्दा असो, डांगे नेहमीच आक्रमकपणे लढत राहिले. गेली वीस वर्षे त्यांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष शामगावकरांच्या कायम स्मरणात राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांच्याशी असलेली मैत्री अनेक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. नंतरच्या काळात ते भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या संपर्कात आले आणि शामगावच्या पाणी प्रश्नासाठी त्यांनी नव्या पातळीवर प्रयत्न सुरू ठेवले. त्या लढ्याला लवकरच यश मिळेल, अशी आशा आजही आहे.

मात्र आजच्या भेटीत मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते बदललेल्या भीमराव डांगे यांचं.गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी सक्रिय राजकारण आणि समाजकारणातून जवळपास संन्यास घेतला आहे. आता ते वारकरी आणि माळकरी बनले आहेत. आयुष्याचा उर्वरित काळ अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीमार्गासाठी वाहून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे.

शामगाव येथील त्यांच्या वस्तीवर गेल्यावर हा अनुभव अधिक गहिरा झाला. त्यांच्या घरामागील शेतात त्यांनी जवळपास दोनशे आंब्याची झाडे लावलेली आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी, माझे मित्र किशोर पाटील आणि देवयानी सोबत आंबे आणण्यासाठी तिथे गेलो होतो. बागेत फेरफटका मारला, आंबे घेतले आणि नंतर सुरू झाली अध्यात्मावर चर्चा.

मला अक्षरशः धक्का बसला.सभागृहात प्रश्नांवर आक्रमकपणे बोलणारे भीमराव डांगे आता ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि वारकरी संप्रदायावर इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने बोलत होते की मी भारावून गेलो. पंधरा-वीस मिनिटे आमच्यात ज्ञानेश्वरी, पंढरीची वारी, भक्ती, समाधान आणि आयुष्याच्या अंतिम सत्यावर मनमोकळी चर्चा झाली.बदललेले भीमराव डांगे पाहून मनापासून आनंद झाला.

राजकारणातील संघर्ष अनुभवलेला हा माणूस आता अध्यात्माच्या शांत वाटेवरून चालत आहे. सक्रिय राजकारणातून बाजूला होत त्यांनी थेट भक्तीमार्ग स्वीकारला आहे. दरवर्षी गावात एक महिना ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित करण्याचा त्यांनी निश्चय व्यक्त केला. हा निर्णय म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर नव्या पिढीला संस्कार आणि अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

आक्रमक नेतृत्वातून अध्यात्माकडे झालेला भीमराव डांगे यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.

त्यांच्या या आध्यात्मिक कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...