फॉलोअर

०४ मे २०२६

विजय पांडुरंग वाटेगावकर


विजय पांडुरंग वाटेगावकर* 
*कराडचे स्वच्छतादुत बच्चन*

_विजय पांडुरंग वाटेगावकर..कराडचे स्वच्छतादुत बच्चन_ 

कराडच्या राजकारणात अनेक चेहरे आले, अनेक गेले; पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होते. नाव घेताच डोळ्यासमोर एक दमदार, जनतेत मिसळणारा आणि कामाच्या जोरावर स्वतःची छाप निर्माण करणारा चेहरा उभा राहतो. जसं अग्निपथ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचं “विजय दीनानाथ चौहान” हे नाव दमदार वाटतं, तसंच कराड शहरात स्वच्छतेचं प्रतीक म्हणून “विजय पांडुरंग वाटेगावकर” हे नाव घेतलं जातं. 

अनेक जण त्यांना प्रेमाने “गुंड्या भाऊ” म्हणून ओळखतात.नगरसेवक म्हणून त्यांचा दरारा आहेच; पण कराड शहराचं नाव राज्य आणि देशपातळीवर पोहोचवणारा लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा, मैत्रीचा आणि प्रवासाचा हा विशेष उल्लेख.

माझी आणि विजय वाटेगावकर यांची मैत्री ही जवळपास वीस वर्षांची आहे. 2001 मध्ये मी ‘पुढारी’मध्ये वार्ताहर म्हणून काम सुरू केलं. त्यानंतरच्या 2006 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शुक्रवार पेठ आणि सोमवार पेठ परिसरातून विजय वाटेगावकर प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्या काळात मी पत्रकार म्हणून त्या प्रभागाचा कानोसा घेत होतो. लोकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण जाणवत होतं. निवडणुकीपूर्वीच मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं — “तुमचा विजय निश्चित आहे.”

मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम विजयाची बातमी मीच त्यांना दिली. त्या दिवसापासून आमच्या मैत्रीचं नातं अधिक घट्ट होत गेलं. गेल्या दोन दशकांत आम्ही अनेक दौरे केले, अनेक सहली अनुभवल्या, असंख्य गाठीभेटी झाल्या; पण या काळात त्यांच्यातील एक गोष्ट कायम जाणवत राहिली — जनतेवर असलेलं नितांत प्रेम आणि कराड शहरासाठी काहीतरी वेगळं करण्याची तळमळ.


२०१७ सारी कराड नगरपालिकेत आरोग्य सभापतीपद त्यांच्याकडे आलं, तो काळ वेगळा होता. त्या पदाकडे फारसं महत्त्वाचं म्हणून पाहिलं जात नव्हतं. अनेकांना वाटत होतं की विजय वाटेगावकर बांधकाम सभापती होतील; पण राजकीय समीकरणांमुळे त्यांच्याकडे आरोग्य सभापतीपद आलं. त्यावेळी मी सहजच त्यांना म्हटलं होतं, “भाऊ, हे पद कशाला घेतलंत?” त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर आजही लक्षात आहे —
“मोरे साहेब, कोणतंही पद छोटं नसतं… त्या पदाची उंची आपण वाढवायची असते.”आणि त्यांनी ते शब्द अक्षरशः खरे करून दाखवले.


त्या काळात कराड शहर म्हणजे कचराकुंड्यांचं शहर अशी ओळख निर्माण झाली होती. प्रत्येक चौकात, गल्लीत, बाजारात कचऱ्याचे ढीग दिसत होते. विजय वाटेगावकर यांनी शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा ध्यास घेतला. “कराडमध्ये एकही कचराकुंडी ठेवायची नाही,” असा निर्धार त्यांनी केला. सुरुवातीला अनेकांनी टीका केली. “कचराकुंडी नाही तर कचरा कुठे टाकायचा?” असे प्रश्न उपस्थित झाले. पण त्यांनी नियोजन केलं होतं.
घराघरातून कचरा संकलन करण्याची “घंटागाडी” संकल्पना त्यांनी पुढे आणली. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा उपक्रम सुरू झाला आणि हळूहळू कराड शहर स्वच्छतेच्या दिशेने पुढे जाऊ लागलं. लोकांनाही त्याची सवय लागली. पुढे नागरी स्वच्छता अभियानात कराडने देशपातळीवर मोठं यश मिळवलं. त्या यशामागे विजय वाटेगावकर यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा होता. म्हणूनच जनतेने त्यांना “कराडचे आधुनिक संत गाडगेबाबा” ही उपाधी दिली.



शुक्रवार पेठ आणि सोमवार पेठ हा त्यांचा मतदारसंघ. पण प्रत्यक्षात संपूर्ण कराड शहरच त्यांचं कुटुंब आहे. एखाद्याच्या घरात पाणी नाही, कचरागाडी आली नाही, नाले तुंबले आहेत, कुणाला फी भरण्यासाठी मदत हवी, कुणाच्या मुलाच्या प्रवेशाचा प्रश्न आहे, कुठे कचरा साचला आहे — अशा प्रत्येक समस्येसाठी विजय वाटेगावकर तत्पर असतात.


त्यांची निवडणूक लढवण्याची पद्धतही वेगळी आहे. अनेक जण निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पाडतात; पण विजय वाटेगावकर पाच वर्षे जनतेत राहून काम करतात आणि निवडणुकीच्या वेळी फक्त मत मागतात. कारण जनतेला माहिती असतं — हा माणूस आपल्या सुखदुःखात कायम सोबत उभा राहतो. म्हणूनच जनता त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देते.

कोणतीही नवी कल्पना असो, सामाजिक उपक्रम असो किंवा कराड शहराच्या विकासासाठी एखादं वेगळं काम उभं करायचं असो — विजय वाटेगावकर हे नेहमी पहिल्यांदा पुढे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. “हे शक्य आहे का?” यापेक्षा “हे कसं शक्य करता येईल?” यावर त्यांचा कायम भर असतो. कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या मनात असंख्य योजना आहेत. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक कसं होईल यासाठी ते सतत विचारमग्न असतात. नगरपालिकेतील प्रत्येक विभागाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, बांधकाम, प्रशासन किंवा नागरिकांच्या मूलभूत समस्या — प्रत्येक विषयावर त्यांची पकड आणि अनुभव जाणवतो.

विजय वाटेगावकर यांच्यासोबत मला अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. त्या प्रवासांमध्ये त्यांच्यातील एक वेगळी बाजू अनुभवायला मिळाली — ती म्हणजे त्यांच्यातील रसिकता आणि अध्यात्मिक ओढ. फक्त राजकारण किंवा समाजकारण यापुरतं त्यांचं व्यक्तिमत्त्व मर्यादित नाही, तर संस्कृती, परंपरा आणि श्रद्धास्थानांविषयीही त्यांना विशेष आकर्षण आहे. त्यांच्या सहवासामुळे मला मायाक्का चिंचणी, बाळूमामा यांच्यासह धनगर समाजातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळाली. या यात्रांमधून त्यांच्या मनातील श्रद्धा, साधेपणा आणि समाजाशी असलेलं नातं अधिक जवळून अनुभवता आलं.

विजय वाटेगावकर यांच्यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा मैत्रीपूर्ण आणि दिलखुलास स्वभाव. ते आमच्या “अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप”चे अत्यंत सक्रिय सदस्य आहेत. अमिताभ बच्चन यांच्याविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, शैली आणि जनसंपर्काची छाप विजय वाटेगावकर यांच्या स्वभावातही अनेकदा जाणवते. मित्रांमध्ये रमणारा, गप्पांमध्ये रंगणारा आणि प्रत्येक क्षण उत्साहाने जगणारा हा माणूस म्हणूनच सर्वांना आपलासा वाटतो.

सध्या ते कराड नगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहेत आणि तेही अत्यंत प्रभावीपणे. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासू स्वभावाचा प्रत्यय पालिकेच्या सभांमध्ये वारंवार येतो. पुढील काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांना जिल्हा किंवा राज्य स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कारण विजय वाटेगावकर हे केवळ राजकारणी नाहीत, तर कामातून स्वतःची ओळख निर्माण करणारे जनसेवक आहेत.

अशा या कराडच्या स्वच्छता दूताला, जनतेच्या माणसाला, माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

*सतीश मोरे सतिताभ*

२४ मार्च २०२६

माझं साहित्य प्रेम

साहित्यप्रेमाची माझी वाटचाल

माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम बाबा पाटणकर यांच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षांपासून पाटण येथे भडक बाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी या संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रित करण्यात आले, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसतो, तर तो एक साहित्यिकही असतो. पुढारीचे पत्रकार आणि विक्रम बाबा पाटणकर यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद वाटतो.

मी स्वतःला एक साहित्यप्रेमी मानतो. माझ्या साहित्यप्रेमाची सुरुवात लहानपणीच झाली. टिळक हायस्कूलमध्ये असताना ग्रंथपाल पोतदार सर आम्हाला छोटी-छोटी पुस्तके वाचायला देत असत. घरातही वाचनाची परंपरा होती. माझी थोरली बहीण ग्रंथपाल असल्यामुळे पुस्तकांचा सहवास अधिक मिळाला.
याच काळात हिमांशू जोशी यांच्या ‘तेरे लिये’ या हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद वाचला आणि साहित्याशी एक वेगळे नाते निर्माण झाले.

पुढे कराड तालुक्यातील शिवाजीराव भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानांनी साहित्याची आवड अधिक वृद्धिंगत केली.

महाविद्यालयीन जीवनात वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’ ही कादंबरी माझ्या हाती लागली. या कादंबरीने माझ्या विचारविश्वावर खोल परिणाम केला. इतकेच नव्हे तर मी या कादंबरीच्या सखोल नोट्सही तयार केल्या.

त्यानंतर व. पु. काळे यांच्या लेखनाच्या प्रेमात पडलो. त्यांची ‘पार्टनर’ ही कादंबरी मी पाच-सहा वेळा वाचली आहे. त्यांच्या लेखनातील साधेपणा आणि जीवनाशी असलेली नाळ मनाला भिडणारी आहे.

१९९६ साली सद्गुरु वामनराव पै यांचे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे पुस्तक वाचले. या पुस्तकाने आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांची दिशा दिली. तसेच डॉ. जोसेफ मर्फी यांचे ‘पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड’ आणि ‘सक्सेस थ्रू पॉझिटिव्ह मेंटल अ‍ॅटिट्यूड’ या पुस्तकांनीही माझ्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकला. या पुस्तकांच्या नोट्सही मी तयार केल्या.

महाविद्यालयीन काळात हरिवंश राय बच्चन यांच्या कविता तसेच मराठीतील अनेक कवींच्या साहित्याचे वाचन केले. या सर्व वाचनातून माझे विचारविश्व समृद्ध होत गेले.

थांबता आलं पाहिजे


थांबता आलं पाहिजे,
योग्य वेळी, योग्य ठिकाणी,
कारण प्रत्येक धावणं जिंकण्यासाठी नसतं,
कधी थांबणंही जिंकण्यासारखंच असतं.

नाही म्हणायला शिकलं पाहिजे,
योग्य क्षणी, अयोग्य व्यक्तीला,
कारण आपल्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्यांना
मर्यादा दाखवणंही गरजेचं असतं.

बोलता आलं पाहिजे,
योग्य ठिकाणी अन्यायाविरोधात,
कारण मौन कधी कधी सहमती ठरते,
आणि आवाजच बदलाची सुरुवात असते.

शांत राहता आलं पाहिजे,
योग्य क्षणी, संयमाच्या वेळी,
कारण प्रत्येक उत्तर शब्दांत नसतं,
कधी शांततेतही ताकद असते.

सोडता आलं पाहिजे,
कधी कधी आपल्यानाही,
कारण नात्यांपेक्षा स्वतःची शांती
जास्त महत्त्वाची असते.

विसरायला हवं,
जे आपले नाहीत त्यांना,
कारण आठवणींमध्ये अडकून राहणं
हीही एक वेदना असते.

@सतिताभ

१८ मार्च २०२६

प्रायव्हसी एक गुपीत



अंतरंग @सतिताभ

*प्रायव्हसी — यशाची खरी ताकद*

काही गोष्टी आपण आपल्यापुरत्याच ठेवायला हव्यात.आपली स्वप्नं, योजना, प्रयत्न आणि पुढचं नियोजन — या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी जगासमोर मांडणं आवश्यक नसतं. उलट, अनेक वेळा त्या गुप्त ठेवणंच आपल्या यशाचं खरं गुपित ठरतं.

आजच्या काळात प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय झाली आहे. आपण कुठे जातो, काय करतो, काय मिळवणार आहोत — सगळं लगेच सोशल मीडियावर टाकतो. पण एक गोष्ट आपण विसरतो…
जगात सगळेच आपल्या आनंदात आनंदी नसतात.

“Privacy is power. What people don't know, they can't ruin.”हा विचार खूप काही सांगून जातो.

जोपर्यंत तुमचं काम, तुमची योजना इतरांना माहिती नसते, तोपर्यंत त्यावर कोणीही परिणाम करू शकत नाही. पण जसं ते बाहेर येतं, तसं त्यावर चर्चा, मत्सर, टीका आणि अडथळे सुरू होतात.

याचं एक साधं पण प्रभावी उदाहरण म्हणजे — चॉकलेट.
जेव्हा चॉकलेट पूर्णपणे पॅक केलेलं असतं, तेव्हा ते सुरक्षित असतं. कुणाचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. पण जसं ते उघडलं जातं, तसं लगेच माशा त्यावर जमा होतात.

आपल्या आयुष्याचंही तसंच आहे —
👉 गुप्त ठेवलेली गोष्ट सुरक्षित राहते
👉 उघड केलेली गोष्ट आकर्षण आणि अडथळे दोन्ही निर्माण करते.

तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला गेलात, एखादी मोठी योजना आखली, किंवा काहीतरी खास साध्य करणार असाल — ते लगेच सगळ्यांना सांगणं गरजेचं नाही.कारण त्या क्षणाचा खरा आनंद आणि त्या कामाची खरी ऊर्जा ही शांततेत आणि गोपनीयतेत वाढते.
अनेक वेळा आपण स्वतःच आपलं नुकसान करून घेतो —
जास्त बोलून, जास्त दाखवून, जास्त शेअर करून.

म्हणूनच लक्षात ठेवा —

✔ शांतपणे काम करा.
✔ योजना पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवा.
✔ यश मिळाल्यावरच जगाला दाखवा.

कारण…
👉 जे लोकांना माहिती नाही, ते ते बिघडवू शकत नाहीत.
👉 आणि जे शांतपणे घडतं, तेच मोठं आणि टिकाऊ यश देतं.

✅*सतीश मोरे सतिताभ*
९८८११९१३०२

०३ मार्च २०२६

ग्रहण लागलं आहे चंद्राला आणि नात्याला

चंद्रग्रहण विशेष 🌙 

सखी...

इथं 
धरतीवर ग्रहण लागलं आहे
बुद्धीला आणि नात्यालाही...
शब्द जिवंत आहेत पण
भावना मात्र हरवल्यात...

आतमध्ये कुठंतरी
खोलवर खंडग्रास ,
प्रकाश दिसतो बाहेरून
आत मात्र खोल अंधार..

तिथं,
नभात ग्रहण लागलंय चंद्राला,
तो चंद्र खुप सोसतोय—
त्यालाही त्रास होतोय...

क्षणभर काळी सावली येते,
प्रकाश त्याचा झाकून टाकते;
पण चंद्र हार मानत नाही,
तो पुन्हा तेजानं उजळतो रात्रीला...!

आपल्या मनालाही कधीतरी
अशाच सावल्या कवेत घेतात,
संशयांचे ढग दाटून येतात
आणि नात्यांवर काळी रेष ओढतात.

सखी,
पण लक्षात ठेव—
ग्रहण कायमचं नसतं,
ते फक्त थोडा काळ असतं;
सावली सरली की
प्रकाश पुन्हा उमलतो.

चंद्रासारखंच आपणही
थोडं सहन करायचं, 
थोडं समजून घ्यायचं;
कारण प्रत्येक अंधारानंतर
उजेड तिथं वाट पाहत असतो..
उजेड तिथं वाट पाहत असतो....!

@सतिताभ
०२.०२.२०२६
चंद्रग्रहण विशेष 
हॉटेल निवांत सातारा

२४ फेब्रुवारी २०२६

गोव्यातील अध्यात्मिक महोत्सव... दोन दिवस


अध्यात्माच्या सागरात दोन दिवस — गोव्यातील माझा अविस्मरणीय अनुभव..

_सतीश मोरे पुढारी कराड पत्रकार_

जगभरात समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले Goa यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी उजळून निघाले होते. दोन दिवस चाललेल्या गोवा अध्यात्मिक महोत्सवात माझे मित्र जितेंद्र डुबल यांच्या सोबत सहभागी होताना मला जाणवले—हा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता; तो आत्मजागृतीचा, आत्मविश्वासाचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा महासंगम होता.Calangute Beachच्या समुद्रालगत उभारलेल्या भव्य व्यासपीठावर देश-विदेशातील संत, स्वामी, मताधिपती आणि धर्मगुरू एकत्र आले होते. समुद्राच्या लाटांमध्ये मंत्रोच्चार गुंजत होते आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने झालेली आरती मनाला विलक्षण शांतता देणारी होती.

🛕 संतांचा दिव्य संगम
या महोत्सवात अनेक पूज्य संत आणि धर्मगुरूंची उपस्थिती लाभली.
यामध्ये—
पूज्य स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती जी
अनंत विभूषित जगद्गुरु रामानुजाचार्य
महंत रविंद्रपुरी स्वामीजी
महामंडलेश्वर स्वामी धर्मदेव महाराज जी
जगद्गुरु सत्यानंदाचार्य श्री ज्ञानेश्वराचार्यजी महाराज
महामंडलेश्वर श्री जनार्दन हरे स्वामीजी
अनंत श्री विभूषित श्री श्री 108 तपोनिधि जितेंद्रिय पूज्य स्वामी रामभद्राचार्यजी आचार्यजी – मैनपुरी
गोस्वामी सुशील महाराजजी – नई दिल्ली
अनंत श्री विभूषित महामंडलेश्वर स्वामी चिदानन्द सरस्वती जी – ऋषिकेश
महादलेश्वर नारायणानंद गिरि महाराज – उदयपुर
सनातन धर्मरक्षक डॉ. राजराजेश्वर गुरुजी – लंदन (UK)
श्री अनंतनाथ चेतन्य स्वामीजी – पुणे
महामंडलेश्वर यति यज्ञेश्वरानंद महाराज – इंदौर
अनन्त श्री विभूषित भैय्याजी स्वामीजी – हरिद्वार
महंत श्री नरेश पुरीजी – राजस्थान
संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज – महाराष्ट्र
मोहनदास रामजीजी – राजस्थान
स्वामी श्री अमृतानंद जी – जामनगर
महामंडलेश्वर श्री निर्गुण स्वामीजी – हरिद्वार या सर्व संतांच्या सान्निध्यात दोन दिवस घालवणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. विविध पंथ, परंपरा आणि विचारधारा असूनही सर्वांचे एकच ध्येय होते—सनातन संस्कृतीचे जतन आणि अध्यात्मिक जागृती.


✨ माझ्यासाठी प्रेरणेचा केंद्रबिंदू

या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री चिराग पासवान होते. त्यांचे भाषण माझ्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचा आत्मा ठरले.त्यांनी सांगितले की, “अध्यात्मिक ताकद हीच जीवनातील संकटांवर मात करण्याची खरी शक्ती आहे.”त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा उल्लेख केला. चार वर्षांपूर्वी मला माझ्याच पक्षातील लोकांनी पक्षातून बाहेर काढले. अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली होती माझ्यासोबत कोणी नव्हतं मात्र माझी शंभू महादेवावर श्रद्धा होती. श्रद्धा आणि शंभू महादेवावरील विश्वासामुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो,असे नमूद केले. त्यांच्या शब्दांत केवळ राजकीय भाषणाची औपचारिकता नव्हती; तर जीवनानुभवातून आलेली प्रामाणिकता होती. त्या क्षणी मला जाणवले—अध्यात्म म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नाही; ती अंतर्मनाला बळ देणारी ऊर्जा आहे.

गोव्याची नव्याने उमटलेली ओळख या दोन दिवसांत मला गोव्याची नवी ओळख दिसली. Shri Mangeshi Temple, Shantadurga Temple, Mahalasa Narayani Temple यांसारख्या मंदिरांची परंपरा, समुद्रकिनाऱ्यावरची आरती आणि संतांचा संदेश—हे सर्व मिळून गोवा केवळ पर्यटनस्थळ नसून अध्यात्मिक केंद्र आहे, याची जाणीव झाली.


गोवा अध्यात्मिक महोत्सव हा माझ्यासाठी केवळ कार्यक्रम नव्हता; तो आत्मविश्वास देणारा प्रवास होता. संतांचा आशीर्वाद, समुद्राची साक्ष आणि Chirag Paswan यांचे प्रेरणादायी शब्द—या सर्वांनी माझ्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला.आता जीवनात कितीही आव्हाने आली, तरी त्या व्यासपीठावरील एक वाक्य मला आठवत राहील—
“अध्यात्मिक ताकद हीच खरी ताकद आहे.”

_सतीश मोरे दैनिक पुढारी कराड _

9881191302


०३ फेब्रुवारी २०२६

सुनेत्राताईनी जपली परंपरा


सुनेत्राताईंनी निभावली सत्तेपलीकडची परंपरा

 _प्रीतिसंगमावरून_ 
सतीश मोरे 
दैनिक पुढारी 

कराडचा प्रीतिसंगम हा महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरील एक साधा भूभाग नाही. तो एक विचारकेंद्र आहे. तो एक संस्कारस्थळ आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो एक राजकीय आत्मा आहे.स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर उभं राहणं म्हणजे केवळ श्रद्धांजली अर्पण करणं नाही, तर एका संपूर्ण वैचारिक परंपरेसमोर नतमस्तक होणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले, अनेक गेले; पण काही स्थळं अशी असतात, जी व्यक्तींपेक्षा मोठी असतात. प्रीतिसंगम हे त्यातलं एक आहे.

अजित पवार यांचं प्रीतिसंगमाशी असलेलं नातं हे औपचारिक नव्हतं. ते राजकीय नव्हतं. ते भावनिक आणि वैचारिक होतं.ते चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी येऊन केवळ अभिवादन करत नसत, तर तिथे बसत असत. मौनात. चिंतनात. आत्मसंवादात.त्या शांततेतूनच ते प्रेरणा घेत असत, दिशा घेत असत, आणि कर्तव्याची जाणीव नव्याने जागी करत असत.

राजकारणात प्रेरणास्थानं असतात, पण त्यांच्याशी नातं फार काळ टिकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ प्रीतीसंगमाचे आणि अजित पवारांचं नातं हे सातत्याचं होतं — परंपरेचं होतं — संस्कारांचं होतं. अजित दादांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या पश्चात सुनिता ताईनी पण तेच केलं. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतिसंगमाला दिलेली भेट, ही केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता. तो एक राजकीय संदेश होता — शांत, सौम्य, पण अर्थपूर्ण. 

अतिशय विपरीत, अनाकलनीय आणि दुःखद घटना घडून गेली. अशा परिस्थितीत सत्ता हाती आल्यानंतर पहिलं पाऊल कुठे टाकायचं, यावर नेतृत्वाची दिशा ठरते. मंचावर की स्मृतीस्थळी? प्रचारात की प्रेरणास्थानी? प्रसिद्धीत की परंपरेत? सुनेत्रा पवार यांनी प्रेरणास्थानाची निवड केली. ही निवड राजकीय गणिताची नव्हती,ती राजकीय संस्कृतीची होती.महाराष्ट्राच्या राजकारणात आज सत्तासंघर्ष,आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद आणि गदारोळ यांचा काळ आहे.या पार्श्वभूमीवर प्रीतिसंगमावरची शांतता अधिक बोलकी ठरते.

प्रीतिसंगमावर सुनेत्रा ताई पवार येण्यापासून ते परत गाडीतबसून निघेपर्यंतचा काळ,हा राजकीय कार्यक्रमाचा वेळ नव्हता.तो एका स्त्रीच्या अंतर्मनाचा अवकाश होता.डोळ्यांत साचलेलं पाणी स्पष्ट दिसत होतं.ते वाहत नव्हतं…ते दाबून धरलेलं होतं.दुःख, जबाबदारी आणि संवेदनशीलता —या तिन्ही गोष्टींचं मिश्रण त्या डोळ्यांत उतरलेलं होतं.त्या प्रीतिसंगमावर आल्या होत्या प्रेरणेसाठी. सत्तेच्या प्रदर्शनासाठी नव्हे. प्रतिमानिर्मितीसाठी नव्हे. राजकीय संदेशासाठी नव्हे —तर दिशा शोधण्यासाठी.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीआणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठीचं आव्हान —हे दोन्ही ओझं त्या मनात घेऊन आल्या होत्या.या क्षणी त्या उपमुख्यमंत्री नव्हत्या.त्या एक स्त्री होत्या.एक आई होत्या. त्या अनेक महिलांना भेटल्या.हात धरले.संवाद साधला.पण त्या डोळ्यांत एक वेगळंच मौन होतं.ते मौन म्हणत होतं —“मी उपमुख्यमंत्री झाले असेन,पण मी आधी एक स्त्री आहे.”प्रीतिसंगमावर येणं ही एक औपचारिक भेट नव्हती.
ती एक अंतर्मनाची यात्रा होती. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा,कराडकरांची माती आणि प्रीतिसंगमाची शांतता —या तिन्ही गोष्टी त्या शोधत होत्या.त्या समाधीसमोर नतमस्तक झाल्या,पण खरं नमन त्यांनी जबाबदारीसमोर केलं. 

कारण इथे शब्द नाहीत — विचार आहेत.इथे घोषणा नाहीत — मूल्य आहेत.इथे राजकारण नाही — संस्कार आहेत. अजित पवार यांना जिथे प्रेरणा मिळायची,तिथेच सुनेत्रा पवार यांनी नतमस्तक होणं,ही केवळ श्रद्धांजली नाही —ती एक परंपरेची सातत्यपूर्ण साक्ष आहे. सत्ता ही बदलत राहते.पदं येतात-जातात.नेते बदलतात.पण परंपरा टिकली पाहिजे.विचार टिकले पाहिजेत. संस्कार टिकले पाहिजेत.प्रीतिसंगम याचाच साक्षीदार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आलेल्या सुनेत्रा ताईंचीची कराड भेट ही एक बातमी नाही,ती एक संपादकीय अर्थ असलेली घटना आहे.कारण ती सांगते —सत्तेचा वारसा नव्हे,तर संस्कारांचा वारसा पुढे जात आहे.आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आज सर्वाधिक गरज आहे —ती याच वारशाची.

सतीश मोरे, 
दै.पुढारी कराड 
9881191302

Sunetra Ajit Pawar 
Ajit Pawar

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...