*अंतरंग*
*तिळगुळ घ्या आणि आदराने बोला*
आज मकर संक्रांतीदिनी आपणास गोड शुभेच्छा !
karawadikarad.blogspot.com
खरंतरं तिळगुळ देऊन गोड बोलणे हा फक्त एकाच दिवशी करण्याचा सण नाही, रोजचाच दिवस गोड बोलण्याचा दिवस आहे. या जगात सर्व काही गोष्टी ज्या शक्य आहेत त्या गोड बोलण्याने होऊ शकतात. मग एकच दिवस का गोड बोलायचे ?
*तुम्ही कुठेही जाल तिथे सभ्यतेने, तेथील नियमाप्रमाणे,शिस्तीप्रमाणे राहिला,वागलात आणि गोड बोलला तर तुमची कामे सहज होतात.*(याला काही शासकीय किंवा सार्वजनिक कार्यालये अपवाद असू शकतील).मात्र कुठल्याही ठिकाणी वावरताना आपली भाषा जर योग्य, सभ्य आणि आदराची असेल तर समोरच्यांची भाषा आपोआप सभ्य आणि मृदू होते हा माझा अनुभव आहे.
1990 च्या दरम्यान बारावीपास झाल्यानंतर मी करवडीत दहावीचे क्लासेस सुरू केले. तेव्हा अजित यादव सर यांचे ओगलेवाडी येथे गणित विषयाचे क्लासेस सुरू होते. त्यांना इंग्लिश विषयासाठी पार्टनर हवा असल्याने आणि माझ्याकडे शिकणाऱ्या मुलांनी त्यांना माझ्याविषयी कल्पना दिल्यानंतर आम्ही ओगलेवाडीला एकत्र क्लासेस सुरू केले. करवडीमधील मोरे क्लासेस ओगलेवाडीला गेल्यानंतर यादव मोरे क्लासेस असे नामांतर झाले. अजित यादव हे कडेपूरचे. खानदानी कुटुंबातील यादव हे सनातन पद्धतीचे,परंपरा मानणारे होते. यादव सरांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्यांच्या सोबतीने क्लास सुरू केल्यानंतर त्यांच्यातला एक गुण मला खूप आवडला,तो म्हणजे इतरांना आदर द्यायचा !
कितीही छोटा,कितीही मोठा मनुष्य समोर आला तर ते त्याच्याशी आदराने,प्रेमाने आणि अहो जावो बोलवायचे. कोणाशीही एकेरी भाषेत बोलायचे नाहीत.त्यांच्या या सवयीची मी कॉपी केली आणि त्याचे अनेक फायदे होत गेले.
इयत्ता पाचवीमधील दहा वर्षाच्या मुलापासून अगदी बारावीमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलांना मी 'आहो जाहो' बोलायला लागलो.ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हायस्कूलमधील शिक्षक एकेरी ,गावरान आणि शिवराळ भाषेत बोलत होते, त्यांचा अपमान करत होते त्या विद्यार्थ्यांना आम्ही आदराने बोलवतो, हे विद्यार्थ्यांना पटत नव्हते.
अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला तुम्ही आम्हाला एकेरी बोलवत जा,अशी विनंती केली. मात्र आम्ही आमची सवय सोडली नाही आणि त्याचा फायदा आम्हाला होत गेला. जे विद्यार्थी शाळेतील शिक्षकाविषयी बाहेर वाईट बोलायचे,आमचे सर वर्गात काही शिकवत नाहीत फक्त टाईमपास करतात असे सांगायचे, तेच विद्यार्थी कधीही आमच्या विषयी किंवा क्लासेस विषयी वाईट बोलले नाहीत.आमचा निकालही चांगला होता, शिकवण्याची पद्धत सोपी आणि सहज होती आणि आमची इतरांसोबत बोलण्याची सवय आदराची होती.त्यामुळे आमचा क्लास ओगलेवाडी पंचक्रोशीत खूप लोकप्रिय झाला. दहावीच्या परिक्षेत वनिता रामुगडे ही मुलगी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आली, पुढे आम्ही बनवडी कॉलनीमध्ये तशाखा काढली.
हे सर्व सांगण्याचे कारण समोरच्या आलेल्या कोणत्याही व्यक्तीला 'एकेरी' बोलवायचे नाही याचा मला खूप फायदा झाला आहे. *व्यक्ती भले मोठा असो लहान असो किंवा पदाने तुमच्या पेक्षा खुप लहान असो,समोरच्या माणसाला आदराने बोलावले तर तो आपोआप तुमच्याशी आदराने बोलतो.* तुम्ही त्याचे आडनाव घ्या किंवा त्याला नावाने बोलवा मात्र कधीही एकेरी भाषेत बोलू नका.बघा काय परिणाम होतो त्याचा !
माझ्यापेक्षा वयाने लहान असो वा मोठ्ठया पत्रकारांना, व्यक्तिंना मी एकेरी भाषेत बोलायचे मी टाळतोच.आदर दिल्याशिवाय आदर मिळत नाही. गोड बोलले की आपोआप पुढचा माणूस तुमच्याशी गोडंच बोलतो आणि आपले काम पूर्ण होते.
परवा एका ठिकाणी एक पाटी वाचली.
*'कृपया आत येताना आपल्या चपला आणि इगो बाहेर ठेवून या'*
खरं आहे हे. *आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा जाताना आपल्या मनात आपल्या पदाचा, बुद्धीमत्तेचा इगो झालेला असतो. मी मोठा पत्रकार ! मी शाळेचा मुख्याध्यापक ! मी बँकेचा मॅनेजर, चेअरमन ! जिल्हा परिषद सदस्य ! अमुक कंपनीचा मालक, बिल्डर ! मी मोठा राजकारणी ! मी कराडचा मोठा मेहरबान ! स्वतःसोबत घातलेले इगोचे असे मोठे आवरण घालून आपण समाजात वावरत असतो.*
समोरच्या व्यक्तीला तुम्ही मला ओळखले नाही का? मी कोण आहे तुला माहिती आहे का? असे मोठ्या ताठरपणाने विचारतो. *खरं तर समोरच्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याला आपली ओळख सांगणे हे आपले कर्तव्य असते*.कारण तुमच्या चेहऱ्यावर, शर्टावर कुठेही तुम्ही मोठे नगरसेवक आहात,मोठे राजकारणी किंवा पत्रकार आहात असे लेबल लावलेले नसते. नवख्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपली ओळख सांगताना समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या खुर्चीला मान देऊन जर त्याला आपले काम सांगितले तर ते नक्की पूर्ण होऊ शकते, नव्हे होतेच हा माझा अनुभव आहे !
गोड बोलण्याची आपणास सवय लागली पाहिजे. मला आयुष्यात कोणत्याही ठिकाणी कसलीही अडचण आलेली नाही. *कोठेही गेल्यानंतर आपली ओळख सांगण्याबरोबरच आपला स्वभाव , समोरच्यांशी बोलण्याची आपली पद्धत ,त्याच्याकडून माहिती काढण्याची कौशल्य, आपण दाखवलेली नम्रता महत्त्वाची भूमिका निभावते. या गुणावरून समोरचि तोच माणूस शेवटी तुम्हाला मी तुमच्या साठी काय करतो असे नम्रपणे विचारतो.*
टेलिफोन एक्सचेंज असो बँक असो अथवा शासकीय कार्यालय असो,आपण एखाद्या व्यक्तीसमोर गेल्यानंतर त्याच्याशी गोड आणि आदराने बोलले पाहिजे.आपले काम थोडक्यात सांगितले पाहिजे, हे काम सांगितल्यानंतर त्याच्याकडून नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळतोच !
माझे एक मुंबईचे जवळचे पत्रकार गुरू आहेत,उदय तानपाठक. मुंबईला गेल्यानंतर त्यांच्यासोबत मी अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आहे. उदय तानपाठक हे मुंबईतील नव्हे तर राज्यभर पत्रकारिता क्षेत्रातील फार मोठे नाव आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाचा हा माणूस कुठेही गेल्यानंतर पुढच्या व्यक्तीला जिंकतोच. प्रेस क्लब आँफ मुंबईच्या बिल्डींग मधील एका हॉटेलमध्ये मी त्यांच्यासोबत अनेकदा जेवायला गेलेलो आहे. तिथे गेल्यानंतर तानपाठक हे हॉटेलमधील वेटरशी कसे प्रेमाने बोलतात हे मी पाहिले आहे . अनेकदा तिथे गेल्यामुळे त्यांना तेथील वेटरची नावेही पाठ आहेत. त्यांना नावानिशी बोलल्यानंतर ते पहिल्यांदा त्या वेटरच्या खिशामध्ये पन्नास शंभर रुपयाची नोट ठेवतात आणि आज काय चांगलं आहे, काय फ्रेश आहे हे तूच सांग आणि तूच घेऊन ये,असा प्रेमळ आदेश त्याला देतात. (वेटरला जेवणाअगोदर बक्षीस देणारी मी पाहिलेली ही पहिली व्यक्ती) खरंतर वेटरला ए बारक्या, ए पिंट्या, ए पोरा इकडे ये,असे एकेरी नावाने हाक मारणे आपण सगळी कडे पाहिले आहे. पण *हॉटेलमधील वेटरची ओळख करून ,त्याचे नाव गाव विचारून आणि त्यापुढे जाऊन त्याला नावाने हाक मारली तर तो तुमच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागतोच शिवाय तुम्हाला चांगली सेवाही देतो.* कारण त्याला त्याच्या नावाने हाक मारणारे फक्त त्याचे काही जवळचे मित्र, घरचे लोक असतात. तुम्हीही त्याला नावाने हाक मारली, त्याच्याशी थोडेसे प्रेमाने बोलला तर तुमची अनेक कामे चांगली होतील, तुम्हाला चांगली सेवा होईल आणि तुम्ही जेव्हा त्या हॉटेलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला तो लक्षात ठेवेल ,आदर देईल.
जगातील प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान आहे.प्रत्येक व्यक्ती ही अप्रतिम,वेगळी,असामान्य आहे, असाधारणआहे.त्याच्यामध्ये असणारे गुण तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही, इतर कोणामध्येही मिळणार नाहीत.म्हणून प्रत्येक व्यक्तीशी आपण सन्मानाने बोलले पाहिजे आणि यातच आपले खरे सुख आणि सौख्य सामावले आहे.
आजपासून आपण सर्वांशी आदराने बोलूया. तुमच्या समोर आलेल्या कोणाही व्यक्तीला एकेरी नावाने बोलवू नका.अहो जाहो म्हणजेच आदराने बोलवा. बघा काय चमत्कार घडतात ! समोरचा माणूस तुमच्यामध्ये झालेला बदल पाहून तुमच्या प्रेमात पडेल आणि तुमची कामे होत जातील !
घरातील, काही जवळचे नातेवाईक, शाळेतील मित्र मैत्रिणी यांना एकेरी बोलणं हा झाला प्रेमाचा भाग. मात्र तोच मित्र, ती मैत्रीण, नातेवाईक मोठ्या पदावर असतील तर त्याच्याशी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आदरानेच बोलले पाहिजे. अमकातमका माझा क्लासमेट आहे, मामेभाऊ आहे, तो किती ... आहे मला माहिती आहे ! त्याचे पराक्रम मला माहित आहेत, त्याला साधी पॅन्टही नीट बांधता येत नव्हती,अशाप्रकारे बोलून ओळख दाखवण्याच्या नादात त्याचा अपमान करू नका. तुम्ही दोघेच जेव्हा एकत्र येता तेव्हा तुम्ही त्याच्याशी एकेरी बोला मात्र *आपल्या उच्चपदस्थ मित्रांशी पब्लिक ठिकाणी आदरानेच बोलले पाहिजे.*
मकर संक्रांती दिनी आजपासून सर्वांशी गोड बोलण्याबरोबरच आदराने ही बोलायला शिकूया ! बघूया पुढच्या मकर संक्रातीपर्यंत तुम्ही किती लोकप्रिय होता ते !
©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*
१५.०१.२०१९
karawadikarad.blogspot.com
Click here to visit my blog👆