फॉलोअर

११ जुलै २०२१

तांबवे फाटा

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
११ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आमच्या निसर्ग वारीचा आजचा प्रवास सकाळी सहा वाजता तांबवे फाटा येथून सुरू झाला. तांबवे फाटा येथे माझे पुढारीमधील सहकारी विकास पाटील त्यांच्या दोन मित्रा सोबत तिथे आमच्या स्वागतासाठी आले होते.'राम कृष्ण हरी' करुन आम्ही आमच्या वारीला सुरुवात केली.
तांबवे फाट्यावरून चालत जाण्याचा अनुभव एक वेगळाच होता. मोबाईल वरती हरिपाठ सुरू केल्यानंतर त्या निसर्गरम्य वातावरणात एक वेगळाच फिल तयार झाला. नुकताच पाऊस होऊन गेलेला होता. थंड हवा वाहत होती,उंच डोंगरावर सभोवताली धुके अच्छादले होते आणि आज निसर्गाची एक वेगळीच जादू आम्ही अनुभवत होतो. आम्ही तांबव्याच्या नवीन पुलावर पोहचलो.
तांबव्याच्या जुन्या पूलाबाबत आपण या अगोदर अनेकदा ऐकले आहे, माहिती घेतली आहे. या पुलावरून पावसाळ्यात पाणी हमखास जायचेच. तांबबव्याचा जुना पूल आणि संगमनगर धक्कापुल या दोन्ही पुलावरून पाणी गेल्याच्या बातम्या वाचल्याशिवाय कोणालाच पावसाळा सुरू झाला असं वाटत नाही. तो जुना पूल काही दिवसापूर्वी जमीनदोस्त करण्यात आलला आहे. या पुलाविषयी माझे मित्र एडवोकेट विजय पाटील तांबवेकर यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट केली होती. या पुलाच्या तसेच गावातील विविध विकास कामाच्या मुलगा उद्घाटनासाठी आलेल्या मुख्यमंत्री बॅरिस्टर अ. र. अंतुले अशी ती पोस्ट होती. हा पुल बांधण्यासाठी त्याकाळी पंधरा लाख रुपये खर्च आला होता, आणि तो जमीनदोस्त करण्यासाठी २०२१ मध्ये पंधरा लाख रुपयांचे टेंडर निघाले होते. हा एक विरोधाभास म्हणा किंवा बदलता काळ म्हणा,त्या पोस्टमध्ये नमुद होता. आता तांबवेला जाण्यासाठी नवीन पूल झाला आहे ,या नवीन पुलावरून सुद्धा श्रेयवाद राजकारणाचे वारे वाहिलेले आहे.अखेर हा पूल पूर्ण झाला आणि जनतेसाठी काही महिन्यापूर्वी खुला करण्यात आलेला आहे.
नवीन पुलावर पोहोचल्यानंतर कोयना नदीचे सुंदर पात्र पाहून त्या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह होणार नाही असा कोणी सापडणार नाही. या पुलावरून दिसणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि तिथून या वाहत येणारे संथ पाणी पाहणे आल्हाददायी असते. आम्ही त्या पुलावर काही काळ थांबलो आणि पुढे चालायला सुरुवात केली. तांबवे गाव माहित नाही असा जुन्या काळातला क्वचितच व्यक्ती सापडेल. तांबव्याचा विष्णूबाळा किंवा विष्णू बाळांचे तांबवे म्हणा,या गावाची माहिती, इतिहास कृष्णा आणि वारणा काठाला अजूनही ताजा वाटतो. स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेला विष्णु बाळा पाटील आणि त्यानंतर घडलेले सत्र याविषयी चित्रपटही निघाला होता.मंगला बनसोडे तमाशा मंडळाने या सत्यघटनेवर आधारित वगनाट्य सादर केले होते. चित्रपट आणि वगनाट्याला रसिकांनी उचलून घेतले होते. अशा ह्या गावात आम्ही प्रवेश केला.
खरंतर हे गाव स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. स्वातंत्र्यसैनिकांना भूमीगत होण्यासाठी हा परिसर सुरक्षित ठिकाण समजले जायचे. अनेक राजकीय चढ-उताराचे, राजकीय क्रांतीचे हे गाव केंद्र आहे.कोयना काठावर वसलेले हे गाव सधन आहे. कोयना नदीला पूर आल्यानंतर या गावात पाणी येते. गेल्या दोन दशकांत आलेल्या महापुरात या गावात पाणी घुसल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. अशा या गावात प्रवेश केल्यानंतर आम्हाला ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडले. आम्हाला एका जुन्या माऊली मंदिरात पोहोचलो. येथील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहून माऊलींचे डोळे भरून दर्शन घेतले. अतिशय सुंदर देहभान विसरून जाण्यारे चित्र होते.
तिथून पुढे आम्ही पारा जवळच्या दुसऱ्या विठ्ठल मंदिरात गेलो. या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे निस्सीम भक्त ह. भ. प. कृष्णत बुवा तांबवेकर यांची समाधी आहे. या समाधीचे दर्शन घेतले. कृष्णतबुवा यांची दिंडी प्रत्येक वर्षे पंढरपूरला जाते. या दिंडीचा पहिला मुक्काम आमच्या करवडी गावात असतो.अनेक वर्षापासून ही दिंडी मी आमच्या गावात पाहिलेली आहे.आमच्या घरासमोरच ही दिंडी उतरत असल्यामुळे दिंडी मधील वारकरी आणि या गावाबाबत एक वेगळा आदरभाव आणि प्रेम आहे. यावर्षी ही दिंडी निघणार नसल्यामुळे दिंडी चालक चार दिवसापूर्वी माऊली पादुका घेऊन पंढरपूरला गेले होते. या ठिकाणी माऊलींच्या दर्शनानंतर या पादुका पुन्हा तांबवेत आणून मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या आहेत. आषाढी एकादशीपर्यंत या पादुका या मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असून येथे रोज नित्य हरिपाठ, किर्तन होतात. या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढे गावाला प्रदक्षिणा घातली. मुख्य चौकात आल्यानंतर अण्णा बाळा पाटील हायस्कूलच्या जवळून आम्ही गावाबाहेर पडलो, दक्षिण तांबवेकडे निघालो.
विष्णु बाळा पाटील यांचे चिरंजीवाचे घर या रस्त्याला आहे, ते आम्हाला भेटले त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि आम्ही पुढे निघालो. 1976 चा पूर आल्यानंतर गावामधील अनेक घरे स्थलांतरित झाली ती दक्षिण तांबवेमध्ये. या दक्षिण तांबवे गावातून पुढे निघालो. तांबवे गावात तामजाई देवीचे मंदिर आहे आणि या देवीच्या नावावरूनच या गावाला तांबवे असे नाव पडले आहे.
या गावाचे ग्रामदेवत असणार्या पेरूच्या बागेतील भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतले. या मंदीरासमोर असणाऱ्या महाकाय पिंपळ वृक्षाच्या समोर उभे राहिलो. पिंपळाच्या झाडाचे आयुष्य फार मोठे असते. पिंपळ सर्वांना सावली आणि आधार तर देतोच शिवाय मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही देतो. पूर्वी गावागावात एक पिंपळपार असायचा. या पारावर गावातील अनेक छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडायचे. झाडाखालचा तमाशा आपल्यापैकी खूप लोकांनी पहिला असेल. नाटके पाहिली असतील. अशा या पिंपळवृक्षांनी अनेक अशी उन्हाळे-पावसाळे, पूर, अनेक पिढ्या, स्थित्यंतरे पाहिली असतील.पिंपळवृक्षाला नमस्कार करून आम्ही पुढे आरेवाडीचा दिशेने अधिक कुच केली.
आजचा संपूर्ण प्रवास हिरव्यागार झाडीतून असल्यामुळे अंतर कसे पार पडत होते हेच कळत नव्हते. आमच्यासोबत गावातील काही वारकरी सहकारी होते. त्यांच्याकडून पाठरवाडीचा डोंगर आणि भैरवनाथ देवाची माहिती घेत घेत 'राम कृष्ण हरी' म्हणत आम्ही आरेवाडीच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. तिथे आम्हाला एक
जुना आड पाहायला मिळाला,आडाच्या भिंतीवर मोडी भाषेतील एक शिलालेख होता. येथे काही काळ थांबावे अशा आम्हास सुचना आल्यामुळे आम्ही थांबलो.
पाच दहा मिनिटात एका वेगळ्या आवाजाकडे आमचे लक्ष वेधले. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा, तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, टाळ पखवाजचा आवाज ऐकून आम्ही तिकडे पाहिले. या गावातील वारकरी आमच्या दिशेने येत होते. ह.भ.प. रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखालील वारकरी दिंडी पाहून आमच्या आनंदाला उधाण आले. आमच्या निसर्ग वारीच्या स्वागतासाठी आज माऊलींनी ही दिंडी पाठवून दिली होती.खुप दिवसानंतर अशी दिंडी पाहायला मिळाली. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत सोशल डिस्टंसिंग ठेवत पंधरा वीस लोकांची ही दिंडी आमच्या स्वागताला आली. त्या ठिकाणी असणाऱ्या विहिरीला प्रदक्षिणा मारून आम्ही या दिंडीमध्ये सहभागी झालो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या तालावर आम्ही पुढे निघालो.
आज खरंच आमच्या निसर्ग वारीतला अत्यंत आनंदाचा क्षण होता. आम्ही आज वारीचा फील घेत होतो. आम्हाला दोन वर्षे वारी करता आली नव्हती मात्र आरेवाडी येथील वारकरी संप्रदायातील लोकांनी आमच्यासाठी,आमच्या स्वागतासाठी एक छोटीशी दिंडी काढली होती. दिंडी आरेवाडी येथील स्मशानभूमी मध्ये दाखल झाली. या ठिकाणी अगोदरच खड्डा काढण्यात आलेला होता.
सरपंच सौ. रेशमा यादव
उपसरपंच अविनाश देसाई,
लक्ष्मण देसाई, अधिक महाराज, निवृत्ती महाराज, रामचंद्र यादव, वारकरी संप्रदायीक भजनी मंडळ
विणेकरी पार्थ महाराज,
मृदंगवादक तुषार महाराज,
पताका धारक दिलीप देसाई आदी सहभागी झाले होते. रामदास महाराज यांनी दरम्यान त्यांच्या अतिशय गोड अशा आवाजात 'मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला' हा अभंग सुरू केला.
मोगरा फुलला हा अभंग गेल्या अनेक वर्षांपासून वर्षापासून माझी मोबाईल डायलर टोन आहे ,मला हा अभंग खूप आवडतो. इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला. ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानेश्वरीमधील गोड असा हा अभंग, सुंदर अशी ही रचना लतादीदींनी तितक्याच सुंदर व गोड आवाजात गायली आहे. आज अभंग ह.भ.प रामदास महाराजांच्या आवाजात ऐकताना एक वेगळीच चाल होती, मात्र फील तोच होता.वारकरी संप्रदायातील कीर्तनकार वेगवेगळे अभंग त्यांच्या वेगळ्या चालीमध्ये म्हणतात आणि त्याला टाळ आणि पखवाजची जोड मिळते, त्यानंतर निर्माण होणारा नाद आणि संगीत मनाला तृप्त करते. विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई हा शब्द जरी घेतला आणि त्यासोबत टाळ-मृदंगाचा आवाज ऐकला तरी वारकरी नाचायला लागतो.आज मोगरा फुलला अभंग ऐकताना खूप खूप आनंद झाला. आरेवाडी स्मशानभूमीत सर्वांच्या उपस्थितीत आम्ही वडाचे एक मोठे झाड लावले.
या दिंडीमध्ये वीणा घेऊन सहभागी झालेला एक छोटा वारकरी पार्थ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार लहान मुलावर असले तर ती मुले वाया जाणार नाहीत. १९८५ ते ९० मध्ये करवडी गावात ज्ञानेश्वरी पारायण व्हायचे तेव्हा हा विणा अखंड ठेवला जायचा. हा विणा सप्ताहाच्या कालावधीमध्ये खाली ठेवला जात नसे, तो विणा घेऊन उभे राहण्यासाठी दिवसातील 24 तासाचे एक वेळापत्रक केले जायचे, त्या वेळापत्रकानुसार गावातील चार किंवा पाच लोक तो वीणा घेऊन उभे राहत.आम्ही जेव्हा संध्याकाळी प्रवचन ऐकायला जात होतो तेव्हा तो विणा घेत असू. वीणा घेऊन उभा राहण्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळत होता, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विणा देताना दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या पाया पडायचे आणि त्यानंतर वीणा दुसऱ्याला द्यायचा, ही वारकरी संप्रदायातील पद्धत आहे. आज तो छोटा विणेकरी पाहून माझ्या आठवणी जाग्या झाल्या.
आरेवाडी स्मशानभूमीमध्ये महिलांना बसण्यासाठी सावली नव्हती आणि त्यांना सावली मिळावी म्हणून एका योग्य जागी माऊलीं वडाचे झाड लावले, याबाबत ग्रामस्थांनी आम्हाला धन्यवाद दिले. त्यानंतर आमची दिंडी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आली. या मंदिरामध्ये आम्हा सर्व निसर्ग वारीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. दिंडीचालक ह भ प रामदास महाराज यांनी श्रीश्रेत्र आरेवाडी ते पंढरपूर जाणाऱ्या दिंडी बाबत माहिती दिली. यावर्षी पंढरपूरला दिंडी जाणार नसल्यामुळे गावाने या मंदिरातच विठ्ठल रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली आणि पादुकाची प्रतिष्ठापना केली आहे. विठ्ठल रुक्मिणी आणि समोर बसलेले ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्ती पाहून डोळे भरून आले. गावाला असणारा वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आजही जपला जात आहे, याची खूप आनंद झाला. सर्व वारकरी मंडळींना नमस्कार करुन आणि धन्यवाद देऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
दरम्यान रामदास महाराज यांच्या घरी जाऊन आम्ही चहा पाणी घेतले आणि याच गावातील यांच्या यादव यांच्या निवासस्थानी कांदेपोहे घेऊन आम्ही परत आलो.
आजच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे आरेवाडीमध्ये आज वारकऱ्यांच्या सोबतीत टाळ आणि माऊली नामाच्या गजराच्या काही काळ चाललो. आळंदी ते पंढरपूर दिंडी चालत आहे असा काही अनुभव आला. हा आनंद आम्ही हृदयात जपून ठेवणार आहोत. माउली माउली!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...