फॉलोअर

०९ डिसेंबर २०२२

पियुष ... क्षितिज तुझी वाट पाहत आहे.!

# *पियुष* ...

हे सारं लिहीत असताना डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत. अश्रू खारट असतात खरं, पण दुःखाचे अश्रू आणि आनंदाचे अश्रू यात एक फरक असतो. दुःखाचे अश्रू वाहतात, आनंदाचे अश्रू टपकतात, एक एक करून हळूच बाहेर पडतात. मन भरून आनंदाला उधाण आणतात, हर्षवायूला वाट मोकळी करून देतात. आज हेच आनंदाश्रू तरळले आहेत माझ्या डोळ्यात !

तु अमेरिकेला निघाला आहेस, शिकायला, शिकत शिकत कमवायला. हा आमच्या समस्त मोरे कुटुंबियासाठी, करवडी गावातील मोरे भावकीसाठी गर्वाचा क्षण आहे. अमेरिकेत जाऊन तु खुप शिकावं, तुझ्या क्षेत्रातील नवीन कला हस्तगत करून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करावीस, अशा तुला खुप खुप शुभेच्छा !

पत्रकारांचा मुलगा पत्रकार व्हावा असं खुप कमी लोकांना वाटते. सुरूवातीला मलाही तसंच वाटलं होते. पुढे इतरांप्रमाणे मलाही तु डाक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ व्हावंसं वाटलं. पण अकरावी वेळी माझ्या बाबतीत जी चुक झाली होती ती तुझी होऊ नये असं वाटलं. *"ज्या क्षेत्रात ज्याला रस आहे तिथेच त्याला नोकरी किंवा काम मिळाले, तेच त्यांचे करियर झाले तर त्यासारखा सुखी या जगात कोणीही नसतो,"* या आशयाचे एक सुवचन मी बारावीच्या पुस्तकात शिकले,वाचले होते. तु तुझा मार्ग स्वतः निवडावा, त्या क्षेत्रात तु शिकावं,असा सल्ला मी दिल्यानंतर तु तुझी वेगळी वाट निवडली. हाँटेल मॅनेजमेंटच करायचे ठरवून पुण्यात ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्षे डिग्री पुर्ण करुन तु आता पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला निघाला आहेस, हा अतिशय सुंदर असा क्षण आहे.

 *तुझ्या सोबत मी कायम आहे,असणार आहे* जसे माझ्यासोबत माझे दादा आहेत. बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही असे म्हणतात, पण बापाच्या हृदयात मुलांसाठी फार मोठी जागा असते, कदाचित आईपेक्षाही अधिक, हे तितकेच खरं. भावनेच्या बांधात बांधून मी तुला गुंतवून ठेवणार नाही पण एवढंच सांगेन *तु निवडलेलं क्षितीज फार मोठ्ठं आहे. तुला त्या कक्षेत तुझी जागा निर्माण करायची आहे.* अशक्य असं काहीच नाही कारण तुझी आवड तुला खुणावत राहणार आहे, गप्प बसू देणार नाही.

नव्या देशात,नव्या प्रांतात तु निघाला आहेस. तिथं नवीन शिकताना तुला अनेकदा अपमानाला, रागाला, नावडत्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल, सामोरं जावं लागेल. पण ती एक परिक्षा असणार आहे आणि त्यात तु नक्किच यशस्वी होशील.

मला सर्व काही समजते, मी सर्वश्रेष्ठ आहे असं न म्हणता आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहीलं की नवीन शिकताना त्रास होत नाही. महानायक अमिताभ बच्चन अजूनही त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या दिग्दर्शकांचं ऐकतात. ते म्हणतात, 'मला काहीतरी नवीन करायचं आहे, मला काम द्या.' तुलाही शिकायला खुप संधी मिळणार आहेत. तु शिकत रहा. तुझ्या क्षेत्रात पुर्ण रस घेऊन त्यात प्राविण्य मिळवं. 

बाप्पा मोरया, कुलस्वामी शिखर शिंगणापूर, ग्रामदैवत जानुबाई आणि अखंड कृष्णामाई यांची कृपा तुझ्यावर आहेच,राहील.‌ सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांची शिदोरी तुला प्रेरणा देत राहील.

आणि हो.. *महत्वाचे माझ्या कडून अपेक्षांचं कसलंही ओझं तुझ्यावर असणार नाही.* एक चांगला माणूस म्हणून तु यशस्वी होशील, ही खात्री आहे . लव यु बेटा !

Success is achieved and maintained by thse who try and keep on trying with The Positive Mental Attitude.  Best of luck 👍

@..... *पप्पा* 

२.३० मध्यरात्री.
१०.१२.२०२२ मुंबई.

०७ डिसेंबर २०२२

लोहार माझा गुरू

_लोहार...माझा गुरू !_ 

गुरुदेव श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले असे म्हणतात. त्यातील एक गुरु लोहार होता. श्री दत्तात्रयानां एकदा एक विलक्षण दृष्य दिसले. लोहाराचे काम करणारा एक माणूस अत्यंत तल्लीन होऊन काम करण्यात इतका रंगून गेला होता की, त्याच्या जवळून एक मिरवणूक वाजत गाजत गेली तरीसुद्धा त्या लोहाराचे लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलेच नाही किंवा त्या आवाजाने त्यामुळे लोहाराचे चित्त जरा सुद्धा विचलित झाली नाही. लोहाराची ती एकाग्रता व काम करण्यातील तल्लीनता पाहून तो लोहार गुरु करण्यास योग्य आहे, असे श्री दत्तात्रयांना वाटले.

तल्लीन होऊन काम करणाऱ्या त्या लोहाराची लागलेली कर्मसमाधी ही गुहेत बसून किंवा जंगलात बसून योगसमाधी लावणाऱ्या योग्यापेक्षा सहस्त्रपटीने श्रेष्ठ होय, असा *सद्गुरू वामनराव पै* आणि जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. 

 *श्री दत्तात्रय जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !*

२१ नोव्हेंबर २०२२

आवाहन

*आता फक्त 100 अन्नदात्यांची गरज आहे !* 

माऊलीनो नमस्कार,

आपणास माहीत आहेच की 23 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या आदल्या दिवशी कोळे येथील अनाथ आश्रमाला भेट दिल्यानंतर या अनाथाश्रमाला 365 अन्नदाते मिळवून देण्याचा अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने मी संकल्प केला होता. 

कोळे येथील जिजाऊ अनाथ आश्रम हे समीर नदाफ चालवतात. *महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे नोंदणीकृत* असलेल्या या आश्रमामध्ये तीन ते चौदा वयोगटातील 32 मुले मुली आहेत.नदाफ दांपत्य या मुलांचा सांभाळ करतात. त्यांचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू होतो ते रात्री अकरा पर्यंत हे दांपत्य या मुलांच्या सेवेत असतात. अतिशय कष्टाने व जिद्दीने उभारलेल्या या अनाथाश्रमासाठी समाजातील अनेक घटक मदत करत असतात.

 *या 32 मुलांचा रोजचा दोन वेळच्या जेवणाचा तसेच चहापाणी नाश्त्याचा खर्च सुमारे पंधराशे रुपये आहे.* हा खर्च त्यांना मिळाला तर या दांपत्याला पैशासाठी भटकत राहावे लागणार नाही, असा विचार आल्यानंतर 365 अन्नदाते शोधण्याचा मी प्रयत्न केला. समाजामध्ये असलेल्या तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या प्रेमामुळे मला अतिशय चांगले यश आले आहे. समाजातील अनेक घटकांनी, अगदी मुंबई पुणे येथील कराडवासीयांनी मला फोन करून या उपक्रमात सहभागी नोंदणी होण्याची इच्छा व्यक्त केली. *265 एवढे सदस्य आता या दानशूर अन्नदात्यांच्या यादीमध्ये सहभागी झाले* आहेत. 

आपणही या योजनेत सहभाग घेऊ शकता. सहभागी होण्यासाठी मला फोन करा. मी आपलं नाव या संबंधी तयार केलेल्या एका ग्रुपमध्ये घेईन. आपण पंधराशे रुपयेची मदत समीर नदाफ यांच्या गुगल पे नंबर 8459883401 वर पाठवून द्यावी.

आपणही मदतीसाठी आपला हात पुढे करावा, ही विनंती.

 धन्यवाद

सतीश वसंतराव मोरे
9881191302

१८ नोव्हेंबर २०२२

समजुन घेताना कमी पडशील का?




तुझ पाहताना तुझ पहावस वाटतं.!!
हे वेड मनातल थोडसंच, जपाव वाटतं 

नजर शोधीशी मज, तुझ भोवती.!
हुरहुर हि मनीची,नाजूक वळणावरती.!

तुझिया नजरेत, जपावे कि लपवावे ?
अबोल मनाचे संकेत, न सांगताच का तुला कळावे?

असे ही हुरहुर, मनाची नात्याची.!!
नात तुझं माझं अनोख ते नवं.!

वाटत तु अवखळ वादळी पाऊस..
तर, मी वाऱ्याची  मंद  झुळूक ,
तु पावसाचा बसणारा थेंब ,
तर, मी बंद पेटतील मोती !

जाणीव होते जेव्हा सत्याची, 
मग वाटतं
निखळ मैत्रीसारखं नातं आपलं असावं !
दूरपर्यंत जपता येत असेल, तर आणि तरच पुढे जावं!!

न सांगताही काही गोष्टीं तुला उमगतील का.??
समजुन घेताना तुही 
कुठे कमी पडशील का?? पडशील का ?

CMYK म्हणजे काय...तल्लख बुद्धीचा जिज्ञासू विद्यार्थी !


राष्ट्रीय पत्रकारदिनी भेटला 
तल्लख बुद्धीचा जिज्ञासू विद्यार्थी !

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त परवा १६ नोव्हेंबर रोजी जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्या मंदिर येथे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. सोबत माझे सहकारी उपसंपादक चंद्रजीत पाटील आणि छायाचित्रकार सुरेश पवार उपस्थित होते. आज पहिल्यांदाच या शाळेत गेलो. या शाळेविषयी खुप ऐकून होतो.

बातमी म्हणजे काय? पत्रकार म्हणजे काय? दैनिकाचे कामकाज कसे चालते? संपादक, उपसंपादक, वार्ताहर यांची जबाबदारी काय असते? यासह प्रिंट मिडीयामधील बदल यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

वृत्तपत्र वाचनाचे फायदे काय ? कराड शहरातून प्रसिद्ध होणारी दैनिके कोणती? दैनिकातील नेमकं काय वाचन करावे? भविष्यात यांचा कुठे आणि कसा फायदा होईल? याबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे पण दिली. अतिशय आनंददायी स्फुर्तीदायी अनुभव होता. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली हा खरंच आनंददायी अनुभव होता. मुख्याध्यापक विजय कुलकर्णी सर आणि संस्थेचे अध्यक्ष शिरीष गोडबोले साहेब यांना धन्यवाद.

विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्याची, जाणून घण्याची किती उत्सुकता असते, याचा प्रत्यय मला या कार्यक्रमात आला. इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या नचिकेत पाठक या विद्यार्थ्यांने मला वेगळा प्रश्न विचारला. मला हा प्रश्न खुप आवडला. तो प्रश्न म्हणजे दैनिकांच्या शेवटच्या पानावरती जे चार ठिपके असतात त्याचा अर्थ काय? मी खरंच चाट पडलो. मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी सुद्धा हा अतिशय सुंदर प्रश्न आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवायला लावल्या. मी या चार ठिपक्यांचा अर्थ त्या विद्यार्थ्याना समजावून सांगीतला.

काय आहेत हे चार ठिपके !


खरे तर वेगवेगळ्या रंगांचे हे चार ठिपके वर्तमानपत्राच्या छपाईबद्दल सांगतात, ज्याद्वारे वर्तमानपत्र छापले गेले आहे. ही एक विशेष प्रकारची छपाई आहे, ज्याला CMYK मुद्रण म्हणतात. या छपाईमध्ये चार रंग असतात.

वास्तविक, या विशिष्ट छपाईमध्ये निळसर (हलके आकाशी), गुलाबी, पिवळा आणि काळा रंग आहे. CMYK प्रिंटिंगमधील चार गोष्टींचे हे चार ठिपके प्रतिनिधित्व करतात, ज्यात निळसर, गुलाबी, पिवळा आणि काळा यांचा समावेश होतो.

The CMYK acronym stands for Cyan निळसर, Magenta गुलाबी, Yellow पिवळा , and Key काळा 

मुळात या चार रंगांचा योग्य प्रमाणात वापर करून कोणताही रंग बनवता येतो. या सर्व रंगांच्या प्लेट्स एका पानावर स्वतंत्रपणे मांडल्या जातात आणि मुद्रित करताना त्याच ठिकाणी रंग येतो. कोणत्याही रंगीत छपाईसाठी हे चार रंग आवश्यक असतात.

टोनर-आधारित किंवा मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रिंटिंगसाठी ही पद्धत खूप स्वस्त आहे. म्हणजेच या चार रंगांचा या छपाईमध्ये वापर केला जातो. अशा परिस्थितीत वृत्तपत्राची छपाईही याच पद्धतीने केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हे वृत्तपत्र कसे छापले गेले हे सांगितले जाते.

तांत्रिकदृष्ट्या जर तुम्ही निळसर, किरमिजी रंग आणि पिवळे समान आणि मोठ्या प्रमाणात एकत्र केले तर ते काळा होईल. तथापि, शाईच्या अशुद्धतेमुळे, खरा काळा पुन्हा तयार करणे कठीण आहे – म्हणूनच प्रिंटरमध्ये इतर रंगांसह काळी शाई (K) समाविष्ट असते. CMYK रंग हे RGB पेक्षा जास्त गडद असतात कारण ते कमी विस्तृत स्पेक्ट्रम आहे.

जेव्हा तुमच्याकडे सर्व रंगांपैकी 100% (C 100%, M 100%, Y 100% आणि K 100%) असतात, तेव्हा हा एक घन काळा असतो. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही सर्व रंग 0% वर सेट केले असतील, तेव्हा तुमची प्रिंट पूर्णपणे रिक्त होईल.

व्यावसायिक प्रिंटर बहुतेक वेळा CMYK वापरतात, कारण ते प्रिंट रन आणि मशीनवर रंगाची सुसंगतता सुनिश्चित करण्यास मदत करते.

*CMYK detail References Google.

धन्यवाद..


सतीश वसंतराव मोरे
9881191302








१३ नोव्हेंबर २०२२

मैत्रीची उंची वाढवणारा उंचाई


*मैत्रीची उंची वाढवणारा उंचाई*

आज उंचाई चित्रपट पाहिला...

फक्त दोस्ती ही त्यांची प्रेरणा होती,अशी टॅग लाईन असलेला हा चित्रपट आपण पाहिलाच पाहीजे असा आहे.

आपण हा चित्रपट पाहताना एक तरी सीन आपल्या आयुष्यात येऊन गेला आहे, असं वाटतं.

जे प्रश्न कोणीच सोडवू शकत नाही तो सोडविण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे दोस्त..हे सांगणारा..उंचाई

मित्राला काय हवं आहे ते ओळखतो तोच खरा मित्र. असा मित्र पहायलाच हवा असा ... उंचाई

राजश्री प्राडक्शनचा अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा सर्वांग सुंदर चित्रपट आहे .. उचांई

खुमासदार,आनंददायी, स्फुर्तीदायी, राजश्री प्राडक्शन च्या स्टाईलचा.. उंचाई

पत्नीचे स्थान आयुष्यात सर्वोच्च आहे पण मित्राला टाळणं कधीच शक्य नसते हे सांगणारा.. उंचाई

मित्रांसाठी स्वतःची दुःखे दाबून ठेवणारा मित्र आणि मित्रांसह, मित्रांसाठी, मित्राची तीव्र इच्छा पुर्ण करणारा खरा मित्र..

अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटात मित्राची भुमिका निभावली आहे. याराना, दोस्तांना, आनंद मध्ये आपण मैत्री आणि मित्र हेच पहिले प्रेम पाहीलं आहे.मात्र याहून वेगळी मैत्री असलेला उत्कृष्ट चित्रपट म्हणजे.. उंचाई.

पंचाहत्तरी मध्ये सुद्धा एवरेस्ट बेस शिखर पार करणे अशक्य नाही , फक्त सोबत मित्र असला पाहिजे. मित्र आहे तर सारं काही शक्य आहे हे सांगणारा...उंचाई

म्हणूनच पाहीलाच पाहीजे..

अमिताभ बच्चन
डॅनी डॅनझोप्पा
अनुपम खेर
बोम्मी इराणी
निना गुप्ता आणि
सारिका यांचा.....उंचाई..!


* ऊंचाई जो दोस्ती की ऊंचाई बढ़ाती है *

आज ऊंची फिल्म देखी...

इस टैग लाइन के साथ कि केवल दोस्ती ही उनकी प्रेरणा थी, यह फिल्म अवश्य देखी जानी चाहिए।


इस फिल्म को देखते हुए ऐसा लगता है कि हमारी जिंदगी में कम से कम एक सीन तो आया और चला गया।


किसी समस्या को हल करने या उससे बाहर निकलने का केवल एक ही तरीका है जिसे कोई हल नहीं कर सकता है, वह है मित्र..टेलर..ऊंचाई।


एक सच्चा दोस्त जानता है कि दोस्त क्या चाहता है। ऐसा दोस्त जरूर देखा होगा... कद


अमिताभ बच्चन के साथ राजश्री प्रोडक्शन की सर्वंग सुंदर फिल्म है..उचाई


सुस्वादु, हर्षित, जीवंत, राजश्री प्रोडक्शंस की शैली में.. उत्थान


यह कहना कि जीवन में पत्नी का स्थान सबसे ऊंचा है लेकिन दोस्त को कभी टाला नहीं जा सकता..ऊंचाई


दोस्तों के लिए एक दोस्त जो अपने दुखों को दबाता है और दोस्तों के साथ, एक सच्चा दोस्त जो एक दोस्त की लालसा पूरी करता है।


अमिताभ बच्चन अब तक कई फिल्मों में मित्रा का किरदार निभा चुके हैं। याराना, दोस्ताना, आनंद में हमने दोस्ती और दोस्तों को पहले प्यार के रूप में देखा है, लेकिन एक अलग तरह की दोस्ती के साथ सबसे अच्छी फिल्म है.. उंचाई।


पचहत्तर में भी एवरेस्ट बेस पीक को पार करना असंभव नहीं है, बस आपके साथ एक दोस्त होना चाहिए। एक दोस्त जो कहता है कि कुछ भी संभव है...ऊंचाई


इसलिए देखना होगा..


अमिताभ बच्चन

डैनी डैनज़ोप्पा

अनुपम खेर

बोम्मी ईरानी

नीना गुप्ता और

सारिका की ..... ऊँचाई ..!







*Uunchai.. The Height That Raises The Height Of Friendship*


Today Watched Unchai movie in Inox kolhapur.


With the tag line that only friendship was their inspiration, this movie is a must see.


While watching this movie, it seems that at least one scene has come and gone in our life.


There is only one way to solve or get out of a problem that no one can solve, that is a friend..the film Uunchai.


A true friend knows what a friend wants. Such a friend must be seen ...Unnchai.


Rajshree Production's Sarvang Sundar film with Amitabh Bachchan is ..Uunchai.


Luscious, joyful, lively, in the style of Rajshree Productions.. Uunchai


Saying that wife's position is highest in life but friend can never be avoided.. Uunchai.


For friends a friend who suppresses his own sorrows and with friends, for friends, a true friend who fulfills a longing for a friend.. Uunchai.


Amitabh Bachchan has played the role of Mitra in many films till date. In Yaraana, Dostana, Anand we have seen friendship and friends as the first love. But the best film with a different kind of friendship is.. Uunchai.


Even in seventy-five it is not impossible to cross Everest Base Peak, you just have to have a friend with you. A friend who says anything is possible... Uunchai.


That's why you have to watch..


Amitabh Bachchan

Danny Danzoppa

Anupam Kher

Bommi Irani

Nina Gupta and

Sarika's.....Uunchai.!


Satish More Satitabh

9881191302

०८ नोव्हेंबर २०२२

शांती सागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता


सतीश मोरे

शांतीसागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता

कुणी पण यावं आणि टिकली (ढपली) मारून जावं’ अशी अवस्था कराडची झाली आहे. कराड शहर दिसतंय छोटं, वाटतंय छोटंस पण या शहराचा आर्थिक आवाका फार मोठा आहे, ही जाणीव आपल्यातल्या खूप कमी जणांना असेल, मात्र बाहेरच्या संस्थांना आहे. आर्थिक सुबत्त्याने नटलेल्या कराडला लुटण्यासाठी जणू काही वित्तीय संस्था, बँका पतसंस्था यांची चढाओढच लागलेली आहे. नुकतंच शहरातील सुमारे २५ कोटी रुपये ठेवी असणार्‍या शिवशंकर पतसंस्थेला टाळा लागला. गेल्या १५ वर्षात कराड शहरातील नावाजलेल्या दोन बँका, सुमारे २५ हून अधिक पतसंस्था बंद पडल्या आहेत, अनेक खाजगी वित्तीय संस्थांनी कराडकरांना गंडा घालून गाशा गुंडाळला आहे. काही संस्था इतर संस्थामध्ये विलिन करण्यात आल्यात. मात्र बंद पडलेल्या बँका आणि पतसंस्था मधील ठेवीदारांचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. बँका पतसंस्था स्थापन करून या माध्यमातून स्वतःची राजकीय दुकानदारी उभी करणे, दोन नंबरचे पैसे एक नंबर करणे, हे पैसे बांधकाम व्यवसायामध्ये लावणे याची जणू कराडमध्ये स्पर्धाच लागलेली आहे. एकावर एक संस्था डुबल्यामूळे या पुढील काळात कुठल्या बँकेत पैसे ठेवायचे असा प्रश्न सामान्य नागरिकाना पडला आहे.

कराडमध्ये पंधरा वर्षांपूर्वी शांतीसागर नावाचे एक मोठी पतसंस्था आली होती. मुळात ही पतसंस्था राजकीय हेतूने स्थापन झालेली होती, हे सर्वांनाच माहित आहे. त्यानंतरच्या काळात कडेगांवची दत्त नागरी, डॉ. पतंगराव कदम पतसंस्था, भुदरगड यासारख्या पर जिल्ह्यातील अनेक संस्था या ठिकाणी आल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या. या ठेवी गोळा करताना मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतरच्या काळात पतसंस्थांच्या माध्यमातून राजकारण या हेतूने कराड तालुक्यातील काही राजकीय मंडळींनी पतसंस्था काढल्या. त्या पण बुडीत निघाल्या. पार्ले येथील यशवंत संस्था अशाच कारणामुळे रसातळाला गेली आहे. पुढील काळात कराड मधील देव देवतांच्या नावाने काढलेल्या अनेक पतसंस्था बंद पडत गेल्या. घर, लग्न, भविष्य निर्वाह कारणासाठी ठेवलेले पैसे बुडायला लागले तर दाद कुणाला मागायची असा प्रश्न सामान्य ठेवीदारांना पडला. सरकारने पाच लाखापर्यंत ठेवीला संरक्षण दिले. मात्र एवढ्याच एका कारणामुळे बँका पतसंस्थांवरचा विश्वास वृद्धिंगत झाला, असे नाही. पाच लाखापर्यंत ठेवीला संरक्षण देण्याचे आमिष दाखवून अनेक संस्थांनी ठेवी गोळा केल्या. पैसे गोळा केले.
निनावी नावाने बँकेमध्ये पैसे जमा केले मात्र पुढील काळात या दोन बँकाही बंद पडल्या. आपणास कळले असेल मी कराड जनता सहकारी बँक आणि जिजामाता बँकेविषयी बोलत आहे.
कराड जनता सहकारी बँक रसातळाला जाणार आहे, याची जाणीव बँकेच्या संचालक मंडळांना किंबहुना अध्यक्षांना होती. त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र संस्थेमध्ये असणार्‍या निनावी ठेवी, बुडीत कारखानदारांना भरमसाठ प्रमाणात देण्यात आलेली न वसूल होणारी कर्जे अशी अनेक कारणे असल्यामुळे जनता बँकेला वाचवायला कोणी पुढे आलं नाही. शेवटी कराड जनता बँक बुडली. या बँकेवर बंधने आल्यानंतर पुढील काळात संचालक मंडळाने कर्ज वसुलीसाठी मनापासून प्रयत्न केला नाही किंवा फक्त प्रयत्न केला आहे, असे दाखवले. वास्तविक कराड जनता बँकेमध्ये काय झाले आहे, याचे सविस्तर विवेचन या बँकेविरोधात तक्रारदार राजेंद्र पाटील यांनी अनेकदा प्रसारमाध्यमासमोर दिलेले होते. मात्र जनता बँकेच्या संचालक मंडळांनी सुधारणा न करता अनेक गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ही बँक संपली.
कराड शहरातील किंबहुना तालुक्यातील जनतेचे खरंच आश्चर्य वाटतं, कराड जनता बँक बुडाल्यानंतर या बँकेविरोधात एकही मोठ्ठं आंदोलन झालं नाही किंवा जे झालं ते गाव पातळीचं होतं. बँकेत पैसे बुडून सुद्धा कराडचे लोक शांत कसे बसतात, याचं आश्चर्य वाटतं. यापूर्वी भुदरगड, शांतीसागर, दत्त, यशवंत पतसंस्था, डॉ. पतंगराव कदम पतसंस्था अशा अनेक संस्थांकडून ठेवीचे पैसे न मिळालेले कर्जदार अशाच प्रकारे शांत बसले होते.
कराड जनता बँकेच्या विरोधात काही प्रमाणात आंदोलन झाली. त्यानंतर या बँकेवर प्रशासक पूढे अवसायक आला. त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून सुमारे ३७५ कोटी रुपयांच्या ठेवी परत दिल्या. मात्र, पाच लाखापर्यंतचीच रक्कम परत मिळू शकली. ज्यांनी पाच लाख रुपयेच्या ठेवी ठेवलेले आहेत आणि ज्याची दाम दुप्पट दहा लाख किंवा त्याहून अधिक झालेली आहे, अशा लोकांना सुद्धा पाच लाखच मिळाले. ज्यांनी दहा लाख किंवा पाच लाखाहून अधिक रक्कम भरलेली आहे, त्यांनाही पाच लाख मिळाले. अशाप्रकारे कराड जनता बँकेमध्ये ठेवीच्या माध्यमातून जे पैसे बुडालेले आहेत, तो आकडा १०० कोटीच्या दरम्यान नक्कीच असेल. या जनता बँके विरोधात कराड शहरातील कोणाही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनतेला किंबहुना ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. कराड शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी कोठून ना कोठून जनता बँकेच्या संचालक मंडळाचे जवळचे नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या राजकीय मित्र होते, आहेत. कराड, मलकापूर शहरात आज रोजी पर जिल्ह्यातील, राज्यातील आणि देशातील सुमारे ६० बँकांचे कामकाज चालते. तसेच ५० पतसंस्थांचे काम चालते. या बँकांमध्ये कराड शहरातील, तालुक्यातील लोकांनी गुंतवलेल्या ठेवीची आकडेवारी अधिकृत उपलब्ध नसली तरी हा आकडा सुमारे ५००० कोटीच्या दरम्यान आहे. यावरून आपणास कळले असेल कराड शहरात किती पैसे आहेत. २००२ साली कराडला एचडीएफसी बँकेची एक शाखा उघडली. ही बँक कराड शहरात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मलाही आश्चर्य वाटले होते. या बँकेच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आपण एवढ्या छोट्या शहरात बँकेची शाखा का काढली, असे विचारले होते. त्यावर त्या अधिकार्‍याने ‘तुम्हाला कराड शहराविषयी काय माहिती आहे? आणि कराड शहरात किती पैसे बँकेत पडून आहेत? असा उलटा सवाल केला होता. त्या काळात कराड मधील वेगवेगळ्या बँका पतसंस्थांमध्ये ५०० कोटी रुपये पडून होते. एचडीएफसी सारख्या बँकने कराडमध्ये येताना शहराचा, तालुक्याचा अभ्यास केला होता. सहकार चळवळीच्या माध्यमातून तसेच अनेक शैक्षणिक संस्था कराड शहरांमध्ये असल्यामुळे इथे फार मोठी आर्थिक सुबत्ता आहे. कृष्णा-कोयना नदी काठावर असलेल्या समृद्धीमुळे लोकांच्या खिशात अनेक वर्षापासून पैसा आलेला आहे. कोल्हापूरनंतर आर्थिक राजधानी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात कराडचे नाव घेतले जाते. म्हणूनच परजिल्ह्यातील संस्थानी कराडला अग्रक्रम दिला आहे. मात्र अशा लुटणार्‍या बँका, पतसंस्थांना कराडमध्ये येऊ न देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करण्याची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी कराड अर्बन बँक नावाची मोठी बँक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या बँकेवर लोकांचा विश्वास आहे. कारण त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ पूर्ण व्यावसायिक आहे. या उलट कराड जनता बँक आणि जिजामाता बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ पक्के राजकारणी होते आणि या राजकारणानेच जनता बँकेची वाट लावली, असे लोक आता उघड उघड बोलतात. ‘जिथे सर्वाधिक व्याजदराची लालच तिथे सर्वाधिक मोठा धोका’ असे एक छोटेसे समीकरण आर्थिकसंस्थाविषयी बोललं जातं. मात्र जास्त व्याजदरच्या मोहात पडलेल्या ठेवीदारांना त्याचा फटका बसला आहे.
 आर्थिक संस्था मजबूत होण्यासाठी त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ कोण आहेत, बँकेचा कारभार कसा चालतो, बँकेचे खरे ऑडिट रिपोर्ट कुठे पाहायला मिळतील, याचा अभ्यास करण्याची आज गरज आहे. मात्र सामान्य ठेवीदारांना हे माहीत नसते. कराडातील सुदृढ पतसंस्था किंवा बँका कोणत्या? बाहेरून आलेल्या कोणत्या आहेत? कोणत्या बँका फसव्या आहेत? कोणत्या पतपेढ्या किंवा मल्टीस्टेट संस्था धोक्यात आहेत? याची माहिती यापुढील काळात कराडकारांना झाली पाहिजे, नव्हे कराडकरांनी ती घेतलीच पाहिजे. असे झाले नाही तर लुटण्यासाठी उत्कृष्ट सिटी कराड हा आर्थिक संस्थांचा फंडा या पुढील काळातही यशस्वी होत राहील आणि कराडकरांचे पैसे बुडत राहतील. शिवशंकर नागरी पतसंस्थेचे उदाहरण घेतले तर या पतसंस्थेत काय घोटाळा झाला आहे, याची गावभर चर्चा आहे. सहकार उपनिबंधक यांच्याकडून फक्त तपास सुरू आहे. पुढील काही महिन्यात या पतसंस्थेत नक्की काय झाले आहे? हे सत्य बाहेर येईल. परंतु आज रोजी या बँकेत, पतसंस्थेत पैसे ठेवलेल्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.
अशाच प्रकारच्या कराडमध्ये अनेक पतसंस्था आहेत, की ज्या पतसंस्थांचे मालक-चालक पतसंस्थेमध्ये ठेवलेला सर्व पैसे स्वतःच्या वैयक्तिक प्रकल्पावर, मोठ्या साईटवर लावून बसलेले आहेत. मध्यंतरी कोविडच्या संकटामुळे अशा काही पतसंस्थांचे आर्थिक गणित बिघडले होते. काही पतसंस्था डबघाईला आल्या. तर काही बंद पडल्या. मात्र या पतसंस्थांचे गेल्या चार वर्षातील ऑडिट रिपोर्ट पाहिले तर हे रिपोर्ट अतिशय सुंदर आहेत. अनेक पतसंस्थांना ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. आता हे ऑडिट करणारे खाजगी व शासकीय ऑडिटर यांना सुद्धा आरोपी करण्याची गरज आहे. पैसे खाऊन खोटी कागदं रंगवणारे ऑडिटर आणि पैसा चारणारे टोणगे संचालक मंडळ यांना आता यापुढील काळात सहकार खात्याने काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. बँका, पतसंस्थांचे ऑडिट करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेण्याची जबाबदारी ऑडिटरची असते. मात्र हे अधिकारी नक्की काय करतात? कागद पाहताना त्यांच्या चष्म्यावर, डोळ्यावर झापड आलेली असते की काय? असाही प्रश्न पडतो. कराडकरांनो या पुढील काळात बँका, पतसंस्थांमध्ये पैसे ठेवताना सावध राहा, रात्र वैर्‍याची आहे, असे नाही तर दिवस सुद्धा वैर्‍याचाच आहे. नाहीतर रात्रभर तमाशात नाचून मिळवलेले मंगला बनसोडे यांचे एका संस्थेने बुडवले तसे तुमचेही कष्टाचे पैसे बुडत राहतील. तुमच्याही मुला-मुलींची लग्नं पैशाअभावी मोडतील.आजारपणासाठी, म्हातारपणासाठी तुम्ही आर्थिक संस्थेत ठेवलेला पैसा तुम्हाला उपयोगी पडणार नाही. तुमचं घराचं स्वप्न स्वप्नच राहील.

सतीश मोरे

२८ ऑक्टोबर २०२२

मुकंद्दर का सिकंदर


याचं तिच्यावर, तिचं दुसऱ्यावर

आपला सर्वांना माहित आहे मुकद्दर का सिकंदर रहा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा कळस म्हणला तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटासारखा प्रेमाचा पंचकोन या अगोदर कुठल्या चित्रपटांमध्ये दाखवलेला नाही, यापुढेही असा चित्रपट होणार नाही.

समाजाने ठोकरलेल्या छोट्या सिकंदरला लहानपणापासून मेमसाबनं प्रेम दिले, मायेच्या शालीची उब दिली, अशा मेमसाबवर प्रेम करणारा सिकंदर. उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला आणि खोटा आरोप लागल्यामुळे बदनाम झालेल्या सिकंदरने फक्त मेमसाबवरच प्रेम केले. 

मात्र या मेमसाबचे नंतरच्या काळात प्रेम जडले वकिल विशाल उर्फ विनोद खन्ना याच्यावर. दुसरीकडे जोहराबाई होती. ती तर पहिल्या भेटीतच सिकंदरवर फिदा झाली होती, सिकंदर शिवाय ती कुणाचाच विचार करत नव्हती. मात्र जोहरावर प्रेम होतं दिलावर अर्थात अमजद खानचं .

अमजदखानचा जीव रेखावर, रेखाचं प्रेम अमिताभवर,
अमिताभचा जीव राखीवर आणि राखी तर फिदा होती विनोद खन्नावर. एक वेगळे प्रेमाचं रसायन प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटात अतिशय सुंदर पद्धतीने हाताळलं. या चित्रपटाविषयी आणखीन काय बोलाल तेवढं आहे !

🆎 प्रेमी सतीश मोरे सतिताभ

१७ ऑक्टोबर २०२२

अमिताभ बच्चनची सातवी भेट

मराठीत अमिताभजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
62 कराडचे बच्चन प्रेमी !
बच्चनजींनी बालपणी दिलेलं चाॅकलेट !
 *एबी एबी जल्लोष !*
*आज 9 वाजता सोनी टीव्हीवर !* 

कराड येथील आम्ही 62 बच्चन प्रेमी सोनी टीव्हीवर "कौन बनेगा करोडपती"च्या आजच्या सोमवारच्या शोमध्ये दिसणार आहोत. कराडच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपमुळे ही संधी साधून आली आहे.

आजचा शो अतिशय महत्त्वाचा आहे. या शोसाठी या वर्षी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची आतापर्यंतची सहावी बॅच 7 आक्टोबर 2022 रोजी मुंबईला गेली होती. गेल्या तीन वर्षात 300 जणांना *अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या* पुढाकाराने, प्रयत्नाने महानायक अमिताभ बच्चन यांचे केबीसी मध्ये *विनामुल्य* दर्शन घडवले आहे. 

आम्ही सर्वजण 8 तारखेला सकाळी 8 वाजता सेटवर पोहोचलो. भेटीची एक्साइटमेंट फार मोठी होती. आत गेल्यानंतरचे सेटवरचे विद्युलोशित वातावरण पाहून आम्हाला खूप आनंद झाला. 10 ते 2 असे चार तास आमच्या समोर साक्षात अभिनयाचे देव अमिताभ बच्चन साहेब होते. 

काय तो आवाज, काय ते चालणं, काय ते बोलणं, काय तो रुबाब, काय ती नम्रता,काय त्या टाळ्या, काय तो दंगा, काय तुझा झगमगाट... काय काय बोलू अमिताभ बच्चन यांच्या बाबत! चार तास बाहेर धो धो पाऊस पडत होता. शूटिंगला अडचणी येत होत्या. मात्र या कालावधीत आम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडे एकटक नजर लावून त्यांच्यातील एकेक रूबरू पाहत, होतो, बेधुंद होऊन जात होतो.
 *शो दरम्यान 150 दर्शक सेटवर होते त्यापैकी तब्बल 62 जण कराड सातारचे होते.* आम्ही खूप दंगामस्ती केली. अमिताभ बच्चन यांच्या समवेत गप्पा मारल्या. 

शो संपल्यानंतर अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे *खजिनदार सतीश भोंगाळे यांनी अमिताभ बच्चन यांना अतिशय वेगळ्या शैलीत मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा* दिल्या. या शुभेच्छा देत असताना अमिताभ बच्चन यांनी शांतपणे दोन मिनिटे मराठीमधील शुभेच्छा ऐकूण घेतल्या. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष सतीश मोरे यांनीही अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना कराड भेटीचे निमंत्रण दिले. कराडचे *दिलबहार सलूनचे मालक कैलास काशीद यांनी* दिवार मधील अमिताभ बच्चन यांचं पोर्टेट तसेच सध्या पुण्याच्या डि वाय पाटील आर्ट काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेले कराडचे *दिग्विजय हेमंत पाटील यांनी काढलेले अतिशय सुंदर स्केच* आम्ही अमिताभ बच्चन यांना दाखवलं. या दोन्ही कलाकारीचे अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले, माहीती घेतली आणि त्यावर स्वाक्षरी पण दिली. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी ग्रुपने 11 तारखेला कराडात नमक हलाल चित्रपटाचे आयोजन केल्याचे सतीश मोरे यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले. यानिमित्त तयार केलेल्या खास पोस्टरवर सुद्धा अमिताभ बच्चन यांनी सही केली.

कराडचा उभारता युवक वेदांत *अभय नांगरे यांनी 'स्वित्झर्लंड आयर्न मॅन'* स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या एका फोटोवरही स्वाक्षरी दिली, वेदांतसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. दरम्यान कराडचे चित्रपट अभिनेते *जुगलकिशोर ओझा* यांनी त्यांच्या अदाकार या संस्थेच्या वतीने अमिताभ बच्चन यांना 'जीवन गौरव' पुरस्काराची ट्रॉफी बहाल केली. अमिताभजी यांनी ती अतिशय विनम्रपणे स्वीकारली. 

आम्ही दिलेल्या प्रत्येक फोटोवर अमिताभ बच्चन यांची मिळालेली स्वाक्षरी हा आमच्यासाठी मोलाचा असा ठेवा होता,आहे.

बच्चन प्रेमी ग्रुपचे उपाध्यक्ष *संजय बदीयानी यांच्या मिसेस शिल्पा* सेटवर उपस्थित होत्या. सौ. शिल्पा या मुळ मुंबईच्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक आठवण शेअर केली. *1976 साली तेव्हा मुंबईमध्ये डॉन चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळेला शिल्पा मॅडम दुसरीला होत्या.* त्या सेंट ट्रिझा कॉन्व्हेंट हायस्कूल सांताक्रुज येथे शिकत होत्या. या हायस्कूल मध्ये डॉन चित्रपटाचे शूटिंग झालेले होते. चित्रपटातील कलाकार प्राण (जेडी) यांची दोन मुले (इ है बम्बई नगरीया वाली) अमिताभ (विजय) बच्चन यांच्यासोबत असतात. ही दोन्ही मुलं ट्रिझा कॉन्व्हेंट हायस्कूल शाळेत शिकत असल्याचे सिनेमात दाखवले होते. या मुलांना भेटायला अमिताभ बच्चन (विजय) पिक्चर मध्ये आलेला होता. तेव्हा आठ वर्षांच्या शिल्पा बदीयानी त्या शाळेत शिकत होत्या. या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन हे शाळेतील सर्व मुलांना भेटलेले होते आणि त्यांनी सर्व मुलांना *स्टार डबल डेकर चॉकलेट* दिलेले होते. ही आठवण सौ. बदीयानी यांनी अमिताभ बच्चन यांना सेटवर सांगितली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी 'हा ये बहुत पुराना पिक्चर है, मुझे याद है' असे म्हणून आठवणींना उजाळा दिला. 

अमिताभ यांनी अनेकदा अनेकांकडे पाहून केलेला नमस्कार, विनम्रपणे स्वीकारलेल्या शुभेच्छा, एबी एबी असा सेटवर केलेला जल्लोष हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. हा आनंदाचा क्षण आज आपण केबीसीत पाहणार आहोत. 

शूटिंग दरम्यान व शूटिंग संपल्यानंतर घडलेल्या या सर्व गोष्टी जरी केबीसीत दिसणार नसल्या तरी या निमित्ताने 8 ऑक्टोबर रोजीचा दिवस आयुष्यभर आमच्या हृदयाच्या कप्प्यात राहणार आहे.

केबीसीची शूटिंग झाल्यानंतर आम्ही अमिताभ बच्चन यांच्या सोबत अनेक फोटो काढले. हे फोटो आम्हाला नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहेत. आज तुम्ही आम्हाला केबीसीमध्ये अमिताभ बच्चन पाठीमागे, पुढे कुठे तरी दिसणार आहोत. तर मग आपण आजचा केबीसी भाग नक्की पहा. आम्ही दिसलो की टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. टिव्हीचा फोटो काढून आम्हाला पाठवा.

 *सतीश वसंतराव मोरे.* 
सतिताभ

17 ऑक्टोबर 2022

#kbc
#kaunbanegacrorepati
#amitabhbachchanpremikarad
#abpk
#sonytv
#kbc14

१४ ऑक्टोबर २०२२

सावर मला...


एकदा ती म्हणाली,
ऐ वेड्या,
बस की आता, 
आवरू दे मला !

मग मी सहज बोललो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

न्हाहून प्रेमरसात नीव,
तुझ्यात गुंतलाय जीव 
बेफाम भावनेचा गुंत्ता , 
तो अगोदर सोडवं , 
मग तुझं आवरं !

न झालेल्या भेटीची उत्कंठा , 
साक्षात भेटीपेक्षा झालीय उत्कंठ,
प्रेमरसात डुबलेल्या 
माझ्या मनाला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

वार्‍याहून वेगवान विजेहून जलद, 
तुझ्यापर्यंत पोहचणाऱ्या 
माझ्या प्रेमलहरीला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

कवेत तुझ्या विरघळून जाण्याची , 
ओढ अजुनच वाढलीय मिलनाची, 
ओढीने त्या व्याकुळ 
या जीवाला अगोदर सावरं,
मग तुझं आवरं !

भावनिक गुंफण अन् कोमलता  
नात्यात बहरली आहे आता मणभर, 
हळव्या मनाला 
तु अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

तुझे भास होताना, 
घड्याळाचे काटेही थांबतात क्षणभर , 
मग मात्र मीही होतो स्वैरभर,
अगं वेडे 
म्हणून तर म्हणतो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

 *सतिताभ* 
२७.०४.२०२२

१३ सप्टेंबर २०२२

आठवण येते का माझी ?



आठवण माझी येते का माझी माझ्याकडे काम नसतानाही?

आठवण माझी येते का माझी काहीतरी वेगळं खाताना ?

आठवण माझी येते का माझी काहीतरी नवीन वाचताना?

आठवण माझी येते का माझी थंड झुळूक आल्यावर ?

आठवण येते का माझी अवकाशात काळे नभ आल्यावर?

आठवण येते का माझी रिमझिम पाऊस पडून गेल्यावर?

आठवण येते का माझी काही तरी भास झाल्यावर ?

आठवण येते का माझी दूर कुठेतरी ते गाणं ऐकल्यावर ?

०८ सप्टेंबर २०२२

पाट्या नसलेला वेगळा बावर्ची ! लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी !


पाट्या नसलेला वेगळा बावर्ची !
लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी  !

खरंतर शालेय जीवनापासून मी अमिताभ बच्चन यांचा डाईंग फॅन आहे. मात्र त्या काळात मिथुन चक्रवती, धर्मेंद्र, जितेंद्र आणि राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट मी पाहिलेले आहेत. राजेश खन्ना हा हिंदी चित्रपट सृष्टीतला पहिला सुपरस्टार. राजेश खन्नाने सलग रोप्य महोत्सवी चित्रपट दिलेले आहेत. त्यांच्या नंतर त्यांची जागा अमिताभ बच्चन यांनी घेतली.

राजेश खन्ना यांचे दो रस्ते, दाग, आप कि कसम,सौतन, अवतार, अमृत, रोटी हे चित्रपट मी अनेकदा पाहिले आहेत. ते मला खूप आवडतात. विटा (सांगली) येथील भैरवनाथ थेटर मध्ये फळीवर बसून पाहिलेला दो रस्ते मला चांगला आठवतो. या या चित्रपटातील 'छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गई' हे गाणे मला खूप आवडते. कराडच्या प्रभात मध्ये सौतन हा चित्रपट पाहिलेला अजूनही डोळ्यासमोर आहे. आपकी कसम हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकान' हे गाणं मला खूप आवडते. या चित्रपटात राजेश खन्नाच्या मुलीचे नाव एकता आहे, हे नाव मला त्यावेळी खूप आवडलं होतं. अवतार मधील 'दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगो का गम देखा तो, मैं अपना गम भूल गया' हे गाणे आणि राजेश खन्ना यांचा दमदार अभिनय मला खूप आवडला आहे. कदाचित डिस्को डान्सर या चित्रपटातील 'गोरो की ना कालोंकी, दुनिया है दिलवालोकी' हे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित गाणे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी आनंद या चित्रपटात एकत्र काम केले तर पूर्वी त्यांनी नमक हराम या चित्रपटातही काम केले होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे ऑल टाइम आवडते कलाकार. राजेश खन्ना यांचा  ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बावर्ची हा चित्रपट मी पाहिलेला नव्हता. बुधवारी रात्री युट्युबवर लावून टिव्ही वर हा पूर्ण चित्रपट पाहिला. या चित्रपटात सुद्धा अमिताभ बच्चन आहेत हे मला आज पहिल्यांदाच कळलं. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा अभिनय कुठेही नाही किंवा त्यांच्यावर कुठेही चित्रिकरण नाही. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे.

चित्रपटाच्या नावाच्या पाट्या (टाईटल) आपण नेहमीच पाहतो. मात्र बावर्ची या चित्रपटाला हा अपवाद आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला नावाच्या पाट्या दाखवलेल्या नाहीत तर पिक्चरचे निर्माते,दिग्दर्शक, संकलक, संगीतकार,गायक या सर्वांची नावे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजात ऐकवली आहेत. त्याला हिंदीमध्ये कथा वाचक असे म्हणतात. (हा प्रयोग नाटकात राबवला जातो) अशा प्रकारे चित्रपटाची सुरुवात मी पहिल्यांदाच पाहिली. 

'बावर्ची' हा चित्रपट मला खूप आवडला. हा चित्रपट पाहताना अधून मधून आनंद पिक्चरची आठवण येत होती. स्वतःसाठी स्वतःचे काम कोणीही करतात पण दुसऱ्यासाठी काम केलं तर त्यात खरा आनंद असतो. आनंद वाटत राहा, छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळतो. मात्र तो लुटायचा सोडून मनुष्य मोठ्या आनंदाच्या मागे लागतो. त्याऐवजी छोटा छोटा आनंद घेतला पाहिजे. छोटा छोटा आनंद दिवसभरात अनेक वेळा मिळतो, लुटता येतो. तो घेता आला पाहिजे. मोठा आनंद वर्षातून चार-पाच वेळा मिळतो मात्र तेवढ्यासाठी आपण छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो,  असा संदेश ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाद्वारे दिला आहे. (७ जुलै १९७२ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता त्यानंतर चार महिन्याने माझा जन्म झाला आहे)

ऋषिकेश मुखर्जी यांची दिग्दर्शनाची एक वेगळी शैली याही चित्रपटात मला पाहायला मिळाली. चित्रपट कुठेही बोअर झालेला नाही किंवा या चित्रपटात घेतलेले कलाकार चुकीचे आहेत असं कुठेही वाटलं नाही. सहज फुलत जाणारं कथानक, राजेश खन्ना यांचा सहज अभिनय आणि शेवटपर्यंत उत्सुकता ताणलेला क्लायमॅक्स हे ही या चित्रपटाचे यश आहे. हा चित्रपट मला खुप आवडला, तुम्ही पाहिला असेल तर छानच. नसला पहिला तर अवश्य पहा.

जाता जाता.. या चित्रपटात जया भादुरी आहे. या चित्रपटात राजेश खन्नाला कोणतीही हीरोइन नाही. (आनंद प्रमाणे याही चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्नाला हीरोइन नाही) जया भादुरीने राजेश खन्नाच्या मानलेल्या बहिणीची भूमिका केली आहे. खूप सुंदर,अल्लड जया या चित्रपटात मला पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

...सतीश मोरे सतिताभ
    ०८.०९.२०२२
    वेळ रात्री साडे बारा.

२६ ऑगस्ट २०२२

Amitabh Bachchan 6 th meeting

*

कराड सातारचे आम्ही ५८ बच्चनप्रेमी आज केबीसीत दिसणार* .

कराड येथील आम्ही ५८ बच्चन प्रेमी सोनी टीव्हीवर "कौन बनेगा करोडपती"च्या आजच्या शुक्रवारच्या शोमध्ये दिसणार आहोत. कराडच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप वतीने ही संधी आम्हाला साधून आली.

आजचा शो अतिशय महत्त्वाचा आहे. या शोसाठी या वर्षी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची आतापर्यंतची पाचवी बॅच १७ आॅगस्ट २०२२ रोजी मुंबईला गेली होती.  गेल्या तीन वर्षात २०० जणांना *अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने* अमिताभ बच्चन यांचे केबीसी दर्शन घडवले आहे. 

आम्ही सर्वजण १७ तारखेला सकाळी १२ वाजता सेटवर पोहोचलो. भेटीची एक्साइटमेंट फार मोठी होती. आत गेल्यानंतरचे सेटवरचे विद्युलोशित  वातावरण पाहून आम्हाला खूप आनंद झाला. साडे तीन ते सात असे साडे तीन तास आमच्या समोर साक्षात अभिनयाचे देव अमिताभ बच्चन साहेब होते. 'ना तु रुकेगा कभी' या ओळी अमिताभ बच्चन यांना तंतोतंत लागू पडतात. चार तासांमध्ये ते कुठेही थकलेले पाहायला मिळाले नाहीत. उलट सेटवर येताना आणि जाताना त्यांच्यामध्ये फार मोठा जोश आम्हाला पाहायला मिळाला. 

शो दरम्यान १५० दर्शक सेटवर होते त्यापैकी तब्बल ५८ जण कराड सातारचे होते. आम्ही खूप दंगामस्ती केली. अमिताभ बच्चन यांच्या समवेत गप्पा मारल्या. पुन्हा एकदा त्यांना कराडला येण्याचे निमंत्रण दिले. 

अमिताभ यांनी अनेकदा माझ्यासहीत अनेकांकडे पाहून केलेला नमस्कार अविस्मरणीय क्षण होता. हा आनंदाचा क्षण आज आपण केबीसीत या भागांमध्ये पाहणार आहोत. 

केबीसीची शूटिंग झाल्यानंतर आम्ही अमिताभ बच्चन यांच्या सोबत अनेक फोटो काढले. हे फोटो आम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळणार आहेत. मात्र आज तुम्ही आम्हाला केबीसीमध्ये अमिताभ बच्चन पाठीमागे पुढे कुठे तरी दिसणार आहोत.तर मग आपण आजचा केबीसी भाग नक्की पहा. आम्ही दिसलो की टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. टिव्हीचा फोटो काढून आम्हाला पाठवा.

 *सतीश वसंतराव मोरे.* 
सतिताभ

२६ ऑगस्ट २०२२

#kbc
#kaunbanegacrorepati
#amitabhbachchanpremikarad
#abpk
#sonytv
#kbc14

११ जुलै २०२२

पंढरीची वारी 10 जुलै

🚩 *माझी पंढरीची वारी* 🚩
   पंढरपूर,१० जुलै २०२२
 *_सतीश मोरे _* 

याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दीनु गोड व्हावा !

आज आषाढी एकादशी. पांडुरंगाला भेटण्यासाठी राज्यभरातून सुमारे दहा लाख भाविक आणि वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. पांडुरंगाच्या कृपेने आमची वारी सफल झाली. काल रात्री पांडुरंगाचे दर्शन झाले होते. 'याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिनू गोड व्हावा' अशी मनाची स्थिती झाली होती. पावसाने थोडीशी आमच्यावर कृपा केली, त्यामुळे गर्दी थोडीफार कमी होती, त्याचा फायदा आम्हाला झाला आणि विठ्ठलाचे दर्शन लवकर झाले. पंढरीची वारी मी या अगोदर सहा वेळा केली आहे. यापैकी यापूर्वी मला फक्त एकदा पांडुरंगाचे दर्शन झाले आहे. यावेळी सातव्या वारीच्या दरम्यान पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाचे दर्शन झाले, हे मी माझे भाग्य समजतो.


आज आषाढी एकादशी, वारकऱ्याला एकादशी उपवास करावीच लागतो. जो एकादशी करतो, जो रोज हरिपाठ करतो, जो आषाढी, कार्तिकी माघु आणि चैत्री या चारी वाऱ्या करतो त्याला खरा वारकरी म्हणतात. आम्हाला फक्त एकच वारी करता येते. मात्र हेही नसे थोडके. आषाढी एकादशी असल्यामुळे आज पंढरीत जिकडे तिकडे माऊलीमय वातावरण होते. विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास मधून तयार होऊन बाहेर पडलो, चेकआउट केले आणि थेट आम्ही आमच्या मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या मठापर्यंत जाईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांचा महापूर वाहत होता. आमच्याकडे चार चाकी वाहनाचा पास असल्यामुळे आम्हाला जाणे शक्य झाले अन्यथा वाहनांना परवानगीच नव्हती. सुदैवाने आज सकाळी पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. वातावरण पावसाळी होते मात्र पाऊस पूर्ण थांबला होता. मारुती बुवा मठात गेल्यानंतर अनेक वारकरी भेटले, सर्वांना वारकरी नमस्कार केला. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत नगरप्रदक्षिणासाठी आमची बारा नंबर दिंडी पुढे गेलेली होती, त्यामुळे आम्ही तात्काळ या दिंडीच्या पाठोपाठ जायचा निर्णय घेतला. एकादशी दिवशी नगरप्रलचना झाल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही. मारुती बुवा कराडकर मठ झेंडे गल्लीत आहे इथून पुढे चौकात पंढरपूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्यालय आहे. तेथून आम्ही नगरप्रदक्षिणा सुरुवात केली. पंढरीच्या वारीला येणारा वारकरी एकादशी दिवशी संपूर्ण पंढरी नगरीला प्रदर्शना घालतो, चंद्रभागेला जाऊन नमस्कार करतो, तत्पूर्वी चंद्रभागेत स्नान करतो. 

आम्ही प्रदक्षिणा सुरू केली, एक एक रस्ता, चौक, गल्ली करत पुढे जात राहिलो. पुढे आल्यानंतर चंद्रभागा काठावर आलो. चंद्रभागा काठावर वारकऱ्यांचा आणि वैष्णवांचा मेळावा भरलेला होता. जिकडे पाहील तिकडे फक्त वारकरी दिसत होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीमध्ये जाऊन स्नान करणे पसंत केले. चंद्रभागा नदीवरील पुलापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील घाटापर्यंत सगळीकडे फक्त वारकरीच दिसत होते. चंद्रभागा नदीमध्ये अनेक बोटी मधून वारकरी पलीकडच्या बाजूला जात होते. इस्कॉनने चंद्रभागाच्या पलीकडच्या बाजूला मोठा घाट आणि मठ बांधलेला आहे. हा घाट अतिशय सुंदर दिसत होता. आम्ही चंद्रभागेमध्ये जाऊन पाणी डोक्यावर घेऊन नदीला नमस्कार केला. यावर्षी चंद्रभागा नदीचे पाणी अतिशय स्वच्छ होते, याचे कारण दोन दिवसापासून पडणारा पाऊस. चंद्रभागाला नमस्कार करून पुन्हा आम्ही नगरप्रदक्षिणा सुरू केली. अनेक दिंड्या या ठिकाणी आम्हाला भेटल्या. पंढरीच्या वारीला आलेल्या सर्व सोहळ्यातील दिंड्या नगरप्रदक्षणा घालतात. छोट्या-मोठ्या अनेक दिंड्या मला या ठिकाणी भेटल्या. या दिंड्यातील वारकरी चंद्रभागा काठी भजन करत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद भरून वाहत होता. सर्वांची वारी पूर्ण झाली होती. आज एकादशी होती यापैकी काहीजणांचं पांडुरंगाचे दर्शन झाले होते तर काहीजणांनी फक्त कळसाचे दर्शन घेतले होते. तरीही या सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. सर्वांचं स्वप्न साकार झाले होते.

या दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली पालखी या ठिकाणी दाखल झाली. नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी माऊलींची पालखी प्रमुख दिंड्यासोबत या ठिकाणी आली होती. या पालखी समोरील दोन्ही अश्वाना नमस्कार केला, फोटो काढले. आमचे खरंच नशीब चांगले होते.  मी माऊली सोबत चाललो, माऊलींचे दर्शन आम्हाला पुन्हा एकदा चंद्रभागा काठी झाले होते. माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे चालायला लागलो. चंद्रभागा  घाट आला, नदी काठावरील जुन्या धर्मशाळा, मठ, होळकर, शिंदे , छत्रपतींच्या काळातील बांधकामे पंढरपूरचे महात्म्य साक्ष देत होती.  

चंद्रभागा घाटातून आम्ही वरती आलो. या ठिकाणी दर्शनाची भली मोठी लाईन होती.पांडुरंगाच्या दर्शनासाठी 14 ते 18 तास लाईन होती तर मुखदर्शनासाठी सहा ते सात तास लाईन होती. या लाईन मधील सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली होती. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर काय आनंद होतो याची अनुभूती आम्ही कालच घेतलेली होती. 14 ते 18 तास लाईन मध्ये उभं राहण्याची ताकद या वारकऱ्यांना पांडुरंग देतो. एवढा वेळ लाईन मध्ये उभा राहून शेवटी पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर सारा कंटाळा निघून जातो. या लाईन मध्ये कोणी घुसू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तिथून पुढे आम्ही गोपाळपूर येथे आलो. रस्त्यावर सर्व बाजूला भाविक उभे होते तर अनेक दिंड्या संपूर्ण रस्त्यावरून पांडुरंगा माऊलीच्या नावाचा जयघोष करत होत्या.आम्ही प्रत्येक दिंडीचे दर्शन घेऊन शेवटी चौकातील श्रीकृष्ण मंदिरात आलो. येथून विठ्ठल मंदिराला नमस्कार केला, पुन्हा एकदा शिखराचे दर्शन घेतले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील चौकात येऊन शेवट झेंडे चौकात नगरप्रदक्षिणा मी सांगता केली. 

त्यानंतर मारुतीबुवा कराडकर मठाकडे जाताना संपतराव चव्हाण कुंभारगावकर वकील यांच्या निवासस्थानी थांबलो. त्यांच्या घराचे नाव त्यांच्या वारकरी संप्रदायात मानाने घेतले जाते. पूर्वसंचित असे नाव असणाऱ्या वकीलांच्या घरामध्ये अनेक वारकरी उतरले होते. एडवोकेट संपतराव चव्हाण यांच्याकडून अतिशय महत्त्वाची माहिती घेतली, याबाबत मी लवकरच वेगळे लिखाण करणार आहे. त्यांच्या घरी फराळ करून पुन्हा आम्ही मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची भेट घेतली, सर्वाना नमस्कार केला. मठातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. अनेक वारकऱ्यांना पुढच्या वर्षी भेटू असे सांगून निरोप घेतला. त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. बारा वाजता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसून कराड कडे निघालो. येताना म्हसवड गोंदवले या तीर्थक्षेत्राला भेट झाली.सहा वाजता कराडला पोहचलो.

कराडकडे येताना पंढरीची वारी पूर्ण झाल्याचा आनंद तर होताच मात्र आमच्या सारे लक्ष, ध्यान पंढरपुरात होतं. गेल्या तीन दोन दिवसात पंढरपुरातील गर्दी, पाऊस, या पावसामध्ये चिंब होऊन नाचलेले वारकरी, माऊली पालखी सोहळा, मंदीरासमोरील गर्दी, विद्युत रोषणाई डोळ्यासमोर येत होती. गेल्या 21 दिवसात पंढरीची वारी करताना भेटलेले अनेक माऊली, छोट्या मोठ्या मदतीला धावून आलेले अनेक लोक, ऊन वारा पावसात चालणारे वारकरी, वारकऱ्यांच्या पडलेल्या पंगती, दिवेघाटात झालेला पाऊस, सासवड मध्ये झालेला पाहुणचार, वाल्याच्या डोंगरावरून पाहिलेला वारकऱ्यांचा मेळावा या गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या. आमचे नशीब चांगले म्हणून आम्ही पंढरी वारीत सहभागी होत आहे. पंढरीची वारी नशिबवान लोकांच्या नशीबातच असते, असे म्हणतात. पंढरीची वारी पुन्हा पुन्हा करण्याचे भाग्य आम्हाला मिळो, अशी माऊली चरणी प्रार्थना!

धन्य झालो हो संसारी । आम्ही देखीली पंढरी ।                                     चंद्रभागे करुनी स्नान । घेतले पुंडलीकाचे दर्शन ।                                          केली क्षेत्र प्रदक्षिणा। भेटलो संत ,सज्जना ।                                      उभे राहुनि गरूडपारी । डोळे भरुनी पाहीला पांडुरंग । 



राम कृष्ण हरी..

 *_सतीश मोरे सतीताभ_*
  ९८८११९१३०२

३१ मे २०२२

पण तु येत नाहीस


तुझी खुप आठवण येते, 
तुझं हास्य डोळ्यासमोर तरळते,
तुझे आवाज कानात घुमत राहतात,
.
.
.
पण, तू येत नाहीस  !


तुझी छबी समोर दिसते,
तुझे सतत भास होत राहतात,
तुझ्या गोड आठवणीत मी हरवून जातो,
.
.
.
पण तु येत नाहीस !

तु मला बोलवतेस,
तुझे पावलांचे आवाजही ऐकू येतात,
तुझ्या आवाजाच्या दिशेने मी धावतो,
.
.
.
पण तु येत नाहीस !


30/05/2022

२० मे २०२२

तु, मी आणि पाऊस


तु, मी आणि पाऊस 

१.
पाऊस तुझ्यासारखा असतो,
खोडकर, अवखळ आणि नखरेल!


२.
पाऊस सरकन येतो अन् जातो,
अगदी तुझ्या सारखाच !
तु येतेस क्षणभर
बेभान करतेस मनभर !

तु करतेस मला बेभान
तु नसताना पाऊस करतो मला बैचेन !

४.
तु जवळ असलीस
की पाऊस आनंददायी असतो!
मनातील अनेक वादळे
तो शांत करत असतो !

५.
चिंब पावसात भिजून
सखी मला बिलगली!
श्वासाचा वेग मंदावला,
पण हृदयाची धडधड वाढली !

@सतिताभ
२०.०५.२०२२

माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला


गणेश शंकर चव्हाण... कामगार ते दिग्दर्शक
माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला 

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं खुप जिव्हाळ्याचं असतं हे आपल्याला माहीत आहेच.आपल्याकडे शिकलेला एखादा विद्यार्थी गरीब असो वा श्रीमंत असो तो भेटल्यानंतर किंवा तो मोठा झाला आहे हे पाहून जो आनंद होतो, तो आनंद केवळ शिक्षकच जाणतो.1990 ते 2001 या दहा अकरा वर्षाच्या कालावधीत मी यादव मोरे क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी जोडलेला होतो. 

करवडी,ओगलेवाडी,बनवडी, विद्यानगर या ठिकाणी आमचे क्लासेस होते. ओगलेवाडी परिसरातील बाबरमाची, राजमाची, वनवासमाची,हजारमाची,करवडी, टेंभू, गोवारे, सुर्ली,कामथी तसेच शामगाव, वडोली निळेश्वर, पार्ले, बनवडी या गावातील अनेक विद्यार्थ्यांसाठी आमचा क्लास यशाची खात्री देणारा होता. आमच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे शंभर टक्के पास होण्याची खात्री अशी आमची एक प्रतिमा झालेली होती. ज्या मुलांना इंग्लिश विषयामध्ये कधीच पास होता आले नाही, कधीही इंग्रजीमध्ये दहावीस पेक्षा जास्त मार्क पडले नाहीत, त्या मुलाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 35 ते 40 मार्क मिळवून देण्याची हमी  मोरे सरांनी म्हणजे मी दिली होती. तीच परिस्थिती होती गणित विषयाची. 52 मार्क पडण्यासाठी लागणारी प्रमेय, सूत्रे याचा मेळ कसा लावायचा आणि पास कसे व्हायचे याचा एक शिस्तबद्ध फाॅर्मुला इथं यादव सर शिकवायचे. फक्त पास होणेच नव्हे तर इंग्लिशमध्ये 80 तर गणितात पैकीच्या पैकी 150 मार्कस मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आमच्या यादव मोरे क्लासेसने घडवले आहेत.दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये आमच्या क्लासचे दोन विद्यार्थी झळकले होते. आज यादव मोरे क्लासेस माध्यमातून आम्ही घडवलेल्या एका विद्यार्थ्याविषयी मला बोलायचे आहे. हा विद्यार्थी खरंच असाधारण,असामान्य अवलिया आहे. ज्याचं नाव आहे गणेश शंकर चव्हाण !

आमच्या करवडी गावच्या शेजारीच आमच्या गावच्या हद्दीत  पाटबंधारे विभागाची आरफळ वसाहत 1980 च्या दरम्यान उभी राहिली. त्याचं आरफळ वसाहत आणि पुढे करवडी कॉलनी असं नामकरण झाले. काॅलनीमध्ये त्या काळात फार मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये अधिकाऱ्यांची रेलचेल होती. आरफळ आणि धोम या कालव्याची कामे सुरू असल्यामुळे याठिकाणी कामाचा मोठा व्याप होता. करवडी कॉलनीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसाठी  निवासस्थाने होती. मध्यभागी दत्त मंदिर, दुकानगाळे, सांस्कृतिक हाॅल,भव्य क्रिडांगण होते. शनिवार रविवारी याच मैदानावर आम्ही क्रिकेट खेळायला जात असू. याठिकाणी आमचे सद्गुरू किराणा दुकान होते. या कॉलनी मुळेच आमच्या करवडी गावचे अर्थकारण उभारी लागले होते.

करवडी कॉलनीमध्ये माझे अनेक मित्र आहेत, होते. किराणा दुकान माध्यमातून आमच्या कुटुंबाचे कॉलनीमधील अनेक कुटुंबाशी जवळचे नाते होते, घरी येणं जाणं होतं. कॉलनीच्या पूर्व बाजूला शंकर चव्हाण हे वाई तालुक्यातील एक गृहस्थ तिथे राहत होते तर त्यांच्या शेजारी मदनेकाका हे दुसरे वाई तालुक्यातील नोकरदार राहत होते. शंकरराव चव्हाण यांच्या यांना संतोष आणि गणेश ही दोन मुले. ही दोन्ही मुले क्लाससाठी सुरुवातीला करवडी गावात तर त्यानंतर ओगलेवाडी येथे माझ्याकडे येत होती. सायकलवरुन डबल सीट येणारी ही दोन्ही मुले मला आजही आठवतात.अवखळ,खोडकर मात्र तितकीच आज्ञाधारक. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आमच्या यादव क्लासेस मध्ये शिक्षण घेऊन दोघेही 1996 साली दहावी पास झाले. पुढील दोन वर्षानंतर आयटीआय कोर्स करून २००० च्या दरम्यान गणेश चव्हाण ऑस्ट्रेलिया येथे नोकरीनिमित्त गेला.

दरम्यानच्या काळात करवडी कॉलनीमधील शासकीय काम संपत आल्यानंतर या कॉलनीतील अनेक कुटुंबे कॉलनी सोडून त्यांच्या मूळ गावी किंवा कराड विद्यानगर मलकापूर अशा ठिकाणी स्थलांतरित झाली. हळूहळू कॉलनी ओस पडू लागली. आज तर हि कॉलनी पूर्णपणे भकास आहे.या कॉलनीची आणखी एक आठवण मला सांगायची तर या कॉलनीत प्रत्येक वर्षी साजरा होणारा भव्य गणपती उत्सव. ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्या काळात हा गणपती उत्सव साजरा केला जायचा. उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असे. सलग चार पाच दिवस मोठ्या पडद्यावर हिंदी मराठी चित्रपट दाखवले जात, नाटकेही होत. चित्रपट, ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी करवडी परिसरातील अनेक स्त्रिया आणि पुरुष दीड दोन किलोमीटर पायपिट करून जात. याठिकाणी पाहिलेले तीसरी मंजिल, मोहरा आणि दोस्ताना हे तीन चित्रपट तरी मला चांगलेच आठवतात. याशिवाय सुशीला, अष्टविनायक हे मराठी चित्रपट सुद्धा मी या ठिकाणी पाहिलेले आहेत. कॉलनी ओस पडल्यानंतर कॉलनीमधील माझे मित्र आणि नोकरदारांचे संबंध तुटले. मात्र रवि सुतार, महेश सटवे तसेच गणेश, विजय सुतार सारखे काही विद्यार्थी संपर्कात होते.रवींद्र सुतार, महेश सटवे यांच्यासारखे निवडक मित्रच आजही संपर्कात आहेत. 

गणेश शंकरराव चव्हाण या विषयाकडे मी पुन्हा येतो. ऑस्ट्रेलियामधील नोकरी करून चार-पाच वर्षांपूर्वी गणेश पुण्याला आला. पुढे वाईला आला आणि याच काळात त्याच्या डोक्यात चित्रपट काढण्याचे खूळ आले. चित्रपट सृष्टीचा कसलाही अनुभव नाही, चित्रपट शूटिंग कसं होतं माहीत नाही, कॅमेरा कसा धरतात माहीत नाही, कोणत्याही नाटकात काम केले नाही, चित्रपटाचं समीक्षण केले नाही, चित्रपटगृहांमध्ये जाऊन फार चित्रपट पाहिलेले नाहीत, लेखक काय असतो? दिग्दर्शक काय असतो? निर्माता काय असतो ?याचं कसलंच ज्ञान नाही. पटकथा, छाया, मेकअप याची कसलीही माहिती नाही. टीव्हीवर किंवा कधीतरी थेटर मध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा एवढंच काय या गणेशला चित्रपटाविषयी असलेलं ज्ञान. मात्र तरीही त्याने चित्रपट निर्मिती करायची ठरवली. 

नागराज पोपटराव मंजुळे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गणेशने चित्रपट निर्मिती करण्याचा निश्चय केला. गणेशचं करवडी कॉलनीवर इतकं प्रेम आहे की त्याने निर्मिती संस्थेला 'काॅलनी फिल्मस' असे नाव दिले. काॅलनीमधील दत्त मंदिरात जाऊन शुभारंभ केला. त्याच्या डोक्यात जी कथा होती, ती कथा हळू स्फुरत गेली. त्या कथेची पटकथा तयार झाली आणि "जिव्हारी" चित्रपट पुढे सरकू लागला. 

चित्रपट तयार करण्याची जिद्द गणेशने मनाशी खुणगाठ बांधली खरी पण चित्रपट काढणे म्हणजे लहान मुलांचा खेळ नसतो. त्यासाठी पैसा लागतो. हा पैसा आणायचा कोठून ? कुणाकडून कर्ज काढायचे? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये आले. मग कुणाकडे पैसे मागण्याची मागण्याऐवजी आपणचं पैसे गोळा करू या असा विचार त्याच्या मनामध्ये आला. घरात असलेलं सर्व सोने-नाणे दागिने, घर-दार, पुण्यामध्ये विकत घेतलेला फ्लॅट, सर्व संपत्ती त्याने विकून टाकली. या माध्यमातून कसेबसे एक कोटी रुपये गोळा झाले आणि जिव्हारीच्या शूटिंगला सुरुवात झाली. 

गेल्या दोन-तीन वर्षांत फेसबुकच्या माध्यमातून त्याचा माझा संपर्क वाढला आहे.फेसबुक वरील त्याचे कोव्हिड कालावधीतील त्याचे लिखाण पाहून गणेश आता प्रगल्भ झाला आहे हे जाणवले. याच काळात त्यांने चित्रपट निर्मिती विषयी सांगितले होते. त्यावेळी मला त्याचं खूप आश्चर्य आणि अप्रुप वाटलं होतं. गणेश चव्हाण आणि थेट पिक्चर काढणार! पण माझा एक विद्यार्थी थेट चित्रपट क्षेत्रात उतरतो, निर्माता लेखक दिग्दर्शक होतो, ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची होती. गणेशचा चित्रपट सृष्टीतला प्रवास आत्ता सुरू झाला. खरं तर चित्रपट सृष्टीमध्ये पैशांची गुंतवणूक करणे हे फार अवघड काम आहे. कसल्याही प्रकारे यशाची खात्री नसते. आजच्या काळात वेगवेगळे अधिकार, गाणी तसे चित्रपटाचे अधिकार वाहिन्यांना विकून पैसे गोळा होतात खरे. मात्र घरदार विकून चित्रपट काढण्याचं धाडस करणारा गणेश शंकर चव्हाण यांच्या सारखा वेडा एखादाच असतो. 

मला आणखी एका कारणासाठी गणेशचा अभिमान वाटतो. लहानपणी आपणास कोणी नाव विचारल्यानंतर आपण पूर्ण नाव सांगत असतो. अजूनही गणेशला नाव विचारलं तर तो आपले पूर्ण नाव सांगतो. फेसबुक अकाउंटवर गणेश शंकरराव चव्हाण अशी नोंद आहे. मलाही वडलांचं नाव सांगायला खूप आवडते. पितृप्रेमी गणेशच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे थोडे आहे. चित्रपटाचे शुटींग दरम्यान त्याने अनेकदा आपल्या वडिलांना सेटवर नेले होते.

मध्यंतरी क्रांती नावाचा एक मल्टीस्टार हिंदी चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी निर्माता मनोज कुमार यांनी संपूर्ण घरदार बँकेला तारण ठेवले होते, असे मी ऐकले होते. गणेश चव्हाण यांनी बँकेला संपत्ती प्रॉपर्टी गहाण ठेवण्याऐवजी ती विकून पैसे गोळा केले आहेत. चित्रपट निर्माण करताना येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून गणेशने हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट सातारा व कराड येथे  20 मेला रिलीज होणार आहे. 

सातारा कराड येथील मुलं चित्रपट तयार करतात, दिग्दर्शक बनतात हा खरंच आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. माझी सुद्धा खूप वर्षापासून दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. पण मला आयुष्यात कधीही ती संधी मिळाली नाही किंवा मी त्यावर जास्त विचारही केला नाही. मनातली ती एक अतृप्त इच्छा अनेक वेळा माझ्या मित्रांना बोलून दाखवली होती. मला हे शक्य झालं नाही, मात्र माझ्या विद्यार्थ्याने गणेशने हे शिवधनुष्य पेलले आहे. गणेश दिग्दर्शक झाला आहे. आज सोनियाचा दिनू आहे. गणेशला खुप खुप शुभेच्छा.

...सतीश वसंतराव मोरे
 २० मे २०२२

२८ एप्रिल २०२२

अगोदर मला सावरं मग तुझं आवरं



एकदा ती म्हणाली,
ऐ वेड्या,
बस की आता, 
आवरू दे मला !

मग मी सहज बोललो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

न्हाहून प्रेमरसात नीव,
तुझ्यात गुंतलाय जीव 
बेफाम भावनेचा गुंत्ता , 
तो अगोदर सोडवं , 
मग तुझं आवरं !

न झालेल्या भेटीची उत्कंठा , 
साक्षात भेटीपेक्षा झालीय उत्कंठ,
प्रेमरसात डुबलेल्या 
माझ्या मनाला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

वार्‍याहून वेगवान विजेहून जलद, 
तुझ्यापर्यंत पोहचणाऱ्या 
माझ्या प्रेमलहरीला 
अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

कवेत तुझ्या विरघळून जाण्याची , 
ओढ अजुनच वाढलीय मिलनाची, 
ओढीने त्या व्याकुळ 
या जीवाला अगोदर सावरं,
मग तुझं आवरं !

भावनिक गुंफण अन् कोमलता  
नात्यात बहरली आहे आता मणभर, 
हळव्या मनाला 
तु अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

तुझे भास होताना, 
घड्याळाचे काटेही थांबतात क्षणभर , 
मग मात्र मीही होतो स्वैरभर,
अगं वेडे 
म्हणून तर म्हणतो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

 *सतिताभ
२७.०४.२०२२

२२ मार्च २०२२

कवितेचा जन्म

कवितेचा जन्म
आठवणीतून होतो !
कवितेचा जन्म
जाणिवेतून होतो !
कवितेचा जन्म
प्रेमरसातून होतो !
कवितेचा जन्म
प्रेमभंगातून होतो !
कवितेचा जन्म
त्यागातून होतो !
कवितेचा जन्म
त्राग्यातून होतो !
कवितेचा जन्म
विरहातून होतो !
कवितेचा जन्म
मैत्रीतून होतो !
कवितेचा जन्म
नातेबंधातून होतो !
कवितेचा जन्म
विश्वासातून होतो !
कवितेचा जन्म
गद्दारीतून होतो !
कवितेचा जन्म
आनंदातून होतो !
कवितेचा जन्म
दुःखातून होतो !
कवितेचा जन्म
सौंदर्यांतून होतो !
कवितेचा जन्म
प्रतिभेतून होतो !
कवितेचा जन्म
प्रतिक्षेतून होतो !
कवितेचा जन्म
कवितेतून होतो !

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...