फॉलोअर

सौ. वेणुताई चव्हाण हाॅल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सौ. वेणुताई चव्हाण हाॅल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०७ एप्रिल २०१६

लेखक आणि मनुष्यप्रिय अधिकारी






काल संध्याकाळी कराड येथील निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला. शासकीय  अधिकारी येतात, जातात, पुन्हा नवीन  अधिकारी येतो,  कार्यकाल संपला की त्याची पण बदली होते. बदली झाली की लोक त्यांना विसरून जातात. बदली होते तेव्हा त्याना निरोप दिला जातो, कार्यक्रम होतो. गोड गोड बोलले जाते,  कारण तो अधिकारी पुन्हा कुठे तरी उपयोगी पडणार  असतो.

नवीन अधिकारी येतो परत त्याचे स्वागत होते, पुन्हा तेच. ही परंपरा मी गेल्या वीस वर्षांत पहात  आलो आहे. पण
शासकीय अधिकारी सेवानिवृत्त होतो आणि त्याचा मोठ्ठा कार्यक्रम होतो, त्याला कलेक्टर येतात, तालुक्यातील सर्व स्तरावरील लोक येतात, तलाठी, सर्कल, कोतवाल, पोलीस पाटील,  चळवळीवाले, आंदोलनवाले, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, पत्रकार सारे जण येतात, हे पहील्यादाच  पहायला मिळाले.


बी. एम. गायकवाड हे काय फार मोठ्ठे अधिकारी नाहीत, नायब तहसीलदार पद फार  उंचीचे नाही तरी पण लोक का आले याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांची काम करण्याची पद्धत हे उत्तर द्यावे लागेल. तहसीलदाराकडे जाण्यापुर्वी काम घेऊन नायब तहसीलदार कडे जातात.  तिथे काम झाले नाही, समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मग पुढे जातात.  पण कराडात गायकवाड साहेब  आल्या पासून असे झालेच नाही. आलेल्या प्रत्येक माणसाला बोला काय सेवा करू आपली, असे म्हणणारा नायब तहसीलदार बहुधा हे एकमेव असावेत . आता  हे वाक्य  कानावर पडल्यावर काम घेऊन आलेला सामान्य माणूस निम्मा थंड व्हायचा. मग त्याचे काम काय आहे,  येथे होणार आहे का, नसेल तर काय करावे लागेल, कोणाकडे जावे लागेल, कागदपत्रे कोणती अपुरी आहेत, ती कुठे मिळतील, किती दिवस लागतात,  आदी सर्व माहिती त्याला देऊन खुश करण्याची हातोटी गायकवाड यांच्या कडे होती.

तलाठी,  सर्कल किंवा गावपातळीवर अन्याय झालेला, रागाने लालबुंद माणुस इथे आल्यावर या बसा असे म्हणून पाणी प्यायला द्यायचे, वर चहा सांगायचा, ही माणसे थंड करण्याची त्याची पद्धत खरंच सर्व ऑफीसमध्ये काम करणारांसाठी अनुकरणीय आहे .

एखाद्या शासकीय अधिकारी बाबत कौतुकास्पद लिहायला मिळतंय हा पण सुखद अनुभव आहे. या कार्यक्रमात गायकवाड यांच्या पत्नीची एक समर्पित बाजू पहायला मिळाली आणि याच कारणामुळे मी आज हा ब्लॉग लिहायला घेतला.

एक वर्षापुर्वी बी एम गायकवाड यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याच्या वर  उपचार सुरू झाले. एक किडनी असेल तर मनुष्य जगू शकतो मात्र दोन्ही फेल झाल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. किडनी दात्यांचा शोध सुरू झाला. एकच रक्तगट  आणि इतर अनेक बाबी जुळायला लागतात. तपासणी दरम्यान त्याच्या पत्नीची किडनी मॅच होत असल्याचे लक्षात आले. पत्नीने तात्काळ होकार दिला,उगीच नाही तिला अर्धांगिनी म्हटलं जातं.  ऑपरेशन झालं, किडनी प्रत्यारोपण झालं. अतिशय किचकट ऑपरेशन असल्याने डाॅक्टरांनी त्यांना सहा महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

महीनाभर त्यांनी आराम केला. रोज सकाळी दहा ते रात्री दहा दरम्यान माणसे पहायचा,  त्याच्यासोबत बोलायचे, वादविवाद सोडवायचे , गोरगरीब निराधार लोकांना मदत करायची , त्याचे प्रश्न सोडवायचे या आणि याच कामात, लोकसेवेत 35 वर्षे कार्यरत असलेल्या  गायकवाड यांना आता घरात बसु वाटेना, करमेना. त्याना ऑफिसला जाण्याचे वेध लागले. दिड महिन्यानंतर गायकवाड साहेब पुन्हा कराड तहसीलदार कार्यालयात हजर झाले. कामाला सुरूवात केली. हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली, ते ठणठणीत बरे झाले. काम करणार्‍या माणसाला कामात व्यस्त असले तरच बरे वाटते. त्या वातावरणातच, छंदात, कामात असेल तर  तो प्रत्येक गोष्टीवर, संकटावर, अडचणीवर मात करू शकतो. हेच यातून सिद्ध होते.



या कार्यक्रमात मला बोलायची संधी मिळाली .
गायकवाड यांचा वरील अनुभवाला जोडून एक गोष्ट सांगितली.
ही गोष्ट मी महाविद्यालयीन काळात वाचली होती.



गोष्ट आहे एका लेखकाची

एक खुप मोठ्ठे प्रतिभावंत लेखक होते.  साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. मुंबईतील  एका चाळीत ते रहात होते. लोकसंपर्क आणि संवाद ही त्या लेखकाची जमेची बाजू होती.  त्याच्या नावावर चार पाच पुस्तके प्रसिद्ध झाली.  हळूहळू परिस्थिती पण सुधारली.  साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला.  पुरस्काराची मोठ्ठी रक्कम त्यांनी पत्नीकडे सुपुर्त केली. तुला जे हवं ते कर, तु साथ दिलीस म्हणुनच हे दिवस आले असे त्यांनी कृतज्ञतापुर्वक सांगितले.  पत्नीचे पतीवर खुप प्रेम होते.  आपल्या नवर्‍याने घेतलेले कष्ट, गाजवलेल्या रात्री याची तिला जाणीव होती.  चाळीतल्या घरात नवर्‍याला  एकांत मिळत नाही , दंगा असतो हे तिने पाहिले होते. त् एकांतपणा मिळाला तर नवरा आणखी लिहू शकेल, या उद्देशाने तिने उपनगराबाहेर एक जागा घेतली, टुमदार बंगला बांधला.  एक वर्षानंतर नवर्‍याच्या वाढदिनी तो बंगला त्याला गिफ्ट म्हणून दिला.

आता आपण या बंगल्यात राहू. तुम्ही निवांत बसून लिहा, पत्नीने लाडात येऊन सांगितले.
कुटुंब तिकडे रहायला गेले. महिना आनंदात गेला. पण त्या लेखकाला काही लिखाण करणे शक्‍य झाले नाही, तो कागद घेऊन बसायचा पण शब्द काय कागदावर  उतरत नव्हते. एकांत होता पण वातावरण नव्हते,  बुद्धीमत्ता होती मात्र बाहेर पडत नव्हती.  प्रतिभा खुप सारी होती पण  व्यक्त होत नव्हती.  त्या लेखकाला वेड लागण्याची वेळ आली.

त्याने पत्नीला विनंती केली,  आपण जुन्या घरात रहायला जाऊ या.  येथे एकांत  आहे पण त्याचा मला काही उपयोग नाही.  माझी पात्रे चाळीत राहणाऱ्या लोकांमध्ये  आहेत, लोकल ट्रेन मध्ये  आहेत, रस्त्यावर आहेत.
मी तिथेच राहीलो तर लिहू शकतो, असे त्यांनी पत्नीला सांगितले. पुन्हा ते जोडपे चाळीत रहायला गेलं.
या गोष्टीचा मतीतार्थ आणि शासकीय सेवेत काम करत असलेल्या गायकवाड यांच्या सारख्या  कार्यक्षम  अधिकारी, कर्मचारीचा अनुभव सारखा आहे . माणूस हा मनुष्य प्रिय प्राणी आहे,  असं म्हणतात. माणसात राहीला तरच त्याला माणुसकी पहायला, शिकायला आणि अनुभवायला मिळेल. बरोबर आहे ना !

सुज्ञ अर्धागिनींने बंगला दिला, आराम दिला. 
किडणी दिली , आयुष्य दिले
तरीही जीव वाचवला, 
खुलवला, वाढवला.......मनुष्य सोबतीनेच !


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...