*माझी व्हर्चुअल वारी*
*सतीश वसंतराव मोरे
*
कराड सुरली घाट ते जानाई मंदीर
दि. 16 जुन 2020
राम कृष्ण हरी माऊली
पंढरीच्या वारीतील आजचा दिवस हा अतिशय खडतर प्रवासाचा, थोडासा वेदनांचा मात्र तितकाच आनंदाचा असतो. पुणे शहरात दोन दिवस मुक्काम केल्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे एकादशी दिवशी माऊलीचा सोहळा पुण्यनगरी ला भावपूर्ण निरोप देऊन संत सोपान महाराजांच्या सासवड नगरी पुढे मार्गक्रमण करतो. पुणे ते सासवड हे अंतर 32 किलोमीटर आहे. नाना पेठेत माऊलींची पालखी विसावलेले असते आणि पालखी समोरील 27 आणि पालखीच्या पाठीमागे असणाऱ्या अडीचशेहून अधिक दिंड्या आणि त्यामधील असणारे सुमारे अडीच लाख वारकरी दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी असतात. मात्र सकाळी सात वाजता माऊलींची पालखी मार्गक्रमण करते. पुणे शहरातून बाहेर पडून हडपसरला सकाळी दहाच्या दरम्यान ही पालखी पोहोचते. ज्यांना दोन दिवस पुणे शहरात दर्शन घेता आले नाही ते पुणेकर हडपसर मध्ये पालखीचे दर्शन घेण्यासाठी येतात. दोन दिवस अतिशय प्रेमाने पुणेकर वारकऱ्यांची सेवा करतात आणि त्यांना निरोप देण्यासाठी हडपसर पर्यंत येतात.काही पुणेकर वारकरी तर दिवे घाटापर्यंत माऊलींच्या पालखी ला निरोप देण्यासाठी येतात. देवाची उरुळी येथे माऊलीचा दुपारचा विसावा संपल्यानंतर पालखी सोहळा पुन्हा सासवड कडे मार्गक्रमण होतो आणि सुरु होतो अवघड असा दिवे घाट.
या घाटात जणु वैष्णवांचा मेळा भरतो. पूर्ण घाटाचा रस्ता, वळणाचा चढाचा आणि अवघड असा आहे. मात्र या अवघड वाटेतुन वारकरी माऊली नामाचा जयघोष करत आनंदाने पुढे मार्गक्रमण करतात. माझ्या पाच वर्षाच्या वारीच्या अनुभवातील दिवे घाटातील अनुभव हा अतिशय सुखद आहे. या घाटात पालखीचे मार्गक्रमण होत असताना अनेकदा रिमझिम पाऊस सुरू होतो मात्र वारकरी थांबत नाहीत. खरंतर दमलेल्या, थकलेल्या वारकऱ्यांना गारवा देण्यासाठी या घाटात हमखास पाऊस येतोच. गेल्या वर्षी मात्र वरूणराजांचे प्रेम वारकऱ्यांच्या जास्तच बरसले होते. माऊलींचा पालखी सोहळा या घाटातून मार्गक्रमण करत असताना तुफान पाऊस सुरू झाला होता. वारकरी या पावसात भिजून चिंब झाले होते. मात्र मृदंग आणि टाळांच्या गजरात वारकरी चालतच राहिले होते, चालतच राहिले होते, चालतच राहिले होते. दिवे घाटातील हा अविस्मरणीय असा अनुभव वारकरी आयुष्यात कधी विसरत नाहीत. घाटाचा अवघड रस्ता संपल्यानंतर पुढे सपाट रस्ता सुरु होतो. घाटाचा अवघड रस्ता म्हणजे संसाराचा रस्ता आणि त्यानंतर असणारा रस्ता म्हणजे माऊली विठ्ठलाकडे जाण्याचा सुखद असा मार्ग असतो. घाट पार करून आल्यानंतर वारकरी सेवेसाठी अनेक सेवेकरी कार्यरत असतात. दिवेघाटाच्या टोकावर किंवा घाटमाथ्यावर अनेक सेवाभावी संस्था वारकरी सेवा देत असतात. यातील एक महत्त्वाची सेवा असते ते म्हणजे थकलेल्या, दमलेल्या वारकऱ्यांचे हात पाय तेलाने मालिश करायचे. या सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या प्रेरणेने अनेक सेवा देणाऱ्या संस्था मी पाहिलेले आहेत. या सेवांचा आम्ही लाभ घेतलेला आहे. दिवेघाटात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसानंतर पुढील प्रवासात कोणी आजारी पडल्याचे कधी घडलेले नाही. कारण या वारकऱ्यांच्या पाठीशी सखाहरी विठ्ठलाची, माऊली ज्ञानेश्वरांची कृपा असते. तसेच पुणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग हा सुद्धा या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतो.
घाटातून वर आल्यानंतर भुकेलेल्या वारकऱ्यांसाठी चहापाणी नाश्ता सोय केली जातेच. घाटमाथ्यावर उभा केलेली विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सारा थकवा निघून जातो. सुमारे 20 फुटाची विठ्ठलाची मूर्ती मी घाटमाथ्यावर असणाऱ्या त्या गावात दिवे गावात आहे.
दिवे घाटातील वारकऱ्यांच्या आनंदाविषयी आणि अनुभवाविषयी लिहिल तेवढे कमीच आहे. यावर्षी मात्र वारी नाही त्यामुळे हा आनंद नाही. मग आपण हा आनंद कसा लुटायचा असा विचार कालच माझ्या मनात आला होता. त्यामुळे आज माझ्या् वारीमध्ये मी कराड ते सुरली घाट असा मार्ग निवडला होता.
सुरली घाट माझ्यासाठी दिवेघाट होता. मी हा मार्ग निवडून आम्ही मंगळवारी म्हणजे आज सकाळी सव्वा पाच वाजताच कृष्णा नाक्यावर जमलो. सकाळी पावसाने थोडी उघडीप दिली होती. विजय वाटेगावकर, सुर्वे आप्पा आणि मी कृष्णा पुलावरून सैदापूर हद्दीत आलो. मात्र तिथे गेल्यानंतर रिमझिम पावसाची सुरुवात झाली. गेली दोन दिवस आमच्याकडून वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा असणारा हरिपाठ करावयाचा राहून गेला होता. मी माझ्या मोबाईलवर बाबा महाराज यांनी गायलेला संत नामदेव महाराज रचित हरिपाठ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी प्ले केला. आम्ही तिघेजण हळूहळू ओगलेवाडी दिशेने मार्गक्रमण करू लागलो. गजानन सोसायटी कधी आली हे कळले नाही. पुढे मळावार्ड ,डुबल मळा मागे टाकत 45 मिनिटातच आम्ही रेल्वे पुलावर पोचलो. रेल्वे पुलावरून सदाशिव गडाच अतिशय सुंदर अशी दृश्य पाहून आमचा सर्व थकवा पळून गेला. थोडासा पाऊस पडत असल्यामुळे पुलावर थोडीशी चिकचिक झाली होती. रेल्वे पुलावर वाढलेले झुडपे काढण्याची बांधकाम विभाग करून अपेक्षा आहे. रेल्वे सिग्नलचे दिवे या रिमझिम पावसात अतिशय सुंदर दिसत होते.
रेल्वे पुलावर व्यायामासाठी आलेल्या अनेक ओळखीच्या लोकांना आम्ही नमस्कार केला. पुलाच्या डाव्या बाजूला असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर हजारमाचीचे माजी सरपंच कल्याण डबल आणि माझ्या एका विद्यार्थ्याचे वडील माने मला भेटले. त्यांच्यासोबत इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. पुढे रेल्वे पुलावर ही माझे क्लासचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक दिसले. एवढ्या सकाळी इकडे कुठे चाललात असा प्रश्न गेल्या चार दिवसापासून मला सतत ऐकायला येत आहे. थोडक्या शब्दात ही पंढरीची वारी सांगणे मला क्रमप्राप्त असते. आमच्या वेगळ्या वारीचे कौतुक मला भेटलेल्या सर्वांनीच केले आहे आणि त्यांच्या कौतुकाची थाप पाठीवर घेऊन आम्ही पुढे ओगलेवाडी गावात पोहोचलो.
माझ्या ओगलेवाडी येथील यादव मोरे क्लासेसचे विद्यार्थ्यांचे पालक भेटल्यामुळे मी काही क्षण का होईना माझ्या क्लासच्या आठवणीत रमून गेलो होतो. ओगलेवाडीगच्या मुख्य चौकात आल्यानंतर माझ्यासोबतच्या दोन्ही वारकरी मित्रांना माझ्या क्लासेसची इमारत दाखवली. प्रसिद्ध उद्योगपती व्यापारी गोट्या पाटील तसेच व्श दीपक राजमाने आणि धनंजय राजमाने तसेच जयवंत उर्फ पिंट्या राजमाने यांच्या मालकीच्या तीन मोठ्या हॉलमध्ये माझे क्लासेस घेतले जात होते. हा काळ 1994 ते 2001 आहे. 94 च्या पूर्वी मी माझ्या करवडी गावात मोरे क्लासेस या नावाने शिकवण्या घेत होतो. 94 95 मध्ये यादव सरांच्या आग्रहाखातर मी ओगलेवाडीमध्ये त्यांना जॉईन झालो. अजित यादव सर हे गणिताचे अतिशय हुशार आणि हाडाचे शिक्षक होते. गणिताची शिकवणी घेत असताना त्यांना इंग्लिश शिकवण्यासाठी कोणीतरी सहकार्याची गरज होती आणि 95 च्या दरम्यान आमच्या दोघांची मैत्री जमली. आम्ही एकत्र यादव मोरे क्लासेस सुरू केला. ओगलेवाडीमध्ये आमच्या क्लासचे फार मोठे नाव त्या काळात होते, आजही आहे. इयत्ता पाचवी ते दहावी इंग्लिश गणित आणि बारावी इंग्लिश असे आमचे क्लास होते.नववी दहावीच्या वर्गात पन्नास ते शंभर विद्यार्थी असायचे. खचाखच भरलेल्या क्लासमध्ये या परिसरातील प्रत्येक गावातले विद्यार्थी होते. हे विद्यार्थी आमचे लाडके होते, त्यांच्या कुटुंबीयांची आमचे स्नेहाचे संबंध होते या पाल्यांचे या विद्यार्थ्यांचे आई-वडील आम्हाला बसल्यानंतर बिनधास्तपणे आमच्या मुलाला पाहिजे तेवढे मारा पण त्याला गणित इंग्लिशमध्ये पास करा असे सांगायचे. पुढे आम्ही बनवडी कॉलनी येथेही एक शाखा सुरू केली. या शाखेत आम्ही संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत शिकवणी घेत असो तर सकाळी पावणे सात ते साडे अकरा या वेळेत ओगलेवाडी मध्ये क्लासेस घेत होतो. माझ्या क्लास च्या आठवणी विषयी व क्लासेस करिअर विषयी सविस्तर नंतर लिहिणार आहे.
ओगलेवाडी गावातून सकाळी साडे सातच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. करवडी फाट्यावर आलो आणि सुरलीच्या घाटाकडे आम्ही चालायला सुरुवात केली. त्यानंतर दीपाच्या ओढ्या पासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते.दीपाच्या ओढ्यावर मोठा पूल बांधायचा असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली होती. तिथे खूप चिखल झाला होता. या चिखलातून वाट काढत आम्ही पुढे निघालो. आज पहाटे या भागात मोठा पाऊस झाला होता, त्यामुळे खूप चिखल झाला होता. मात्र तरीही पुढे रस्ता चांगला आहे, फारसा चिखल नसेल असा मनाला समजवलं.
चिखलाच्या रबडीतून वाट काढत पुढे जाऊ लागलो. मात्र सर्वच रस्ता चिखलमय झाला होता. आंतरराष्ट्रीय भूकंपकेंद्रासमोर रस्ता इतका घसरटा झाला होता की आमच्या समोर अनेक टु व्हिलर याठिकाणी घसरल्या. चिखलाचा रस्ता आमचा मार्ग थोडंच थांबवू शकत होता. हा चिखलाचा रस्ता पुढे थोडाच आहे अशी मनाची समजूत घालत होतो. त्या रस्त्यावरून चालताना आमचे शूज चिखलात रुतले, पॅंटला गुडघ्यापर्यंत चिखल उडला. महानुभाव श्रीकृष्ण मंदिराजवळ आलो, नंतर शूज रस्त्यावर आपटून स्वच्छ केले. समोरून पोलिसांची गाडी येताना दिसला यामधून राज्यमंत्री विश्वजीत कदम गेल्याचे पाहिले.पुढे वनवासमाचीच्या विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले. वनवासमाची मध्ये आमच्या आत्यांच्या घरी चहा प्यायचा आमचा बेत होता. मात्र येताना घेऊ असा विचार करून आम्ही पुढे चालायला लागलो. राजमाची गावामध्ये रस्त्यालगतच असलेले गणेश मंदिर व त्या पाठीमागे असणाऱा सदाशिवगड धुक्यामध्ये झाकून गेले होते. हा अविस्मरणीय सुंदरसा देखावा पाहून आम्ही पुढे चालू लागलो. जरा पुढे गेल्यावर रस्ता चांगला आहे असे वाटले होते, मात्र रस्ता अधिकच खराब होत गेला होता. संपूर्ण चिखलमय रस्त्यातून कसेबसे वाट काढत आम्ही चालत होतो. मोकळं चालणे खूप सोपं आणि आनंददायी असतं. मात्र चिखलामध्ये खूप अवघड. बाहेर चिखलाचा लगदा बुटाला चिकट होत होता आणि त्यामुळे बुटाचे वजन वाढते होते. प्रत्येक वेळी बुट स्वच्छ करणे किंवा झाडणे करणे शक्य नव्हते. माऊली आमची परीक्षा घेत होते. मात्र कुणाच्याही मनात परत करण्याचा विचार आला नाही. काही झालं तर सुरली घाट पार करायचाच असा मनाचा निश्चय केला होता. जरा पुढे आलो, लांबूनच सुरलीच्या घाटातील हिरवळ आणि सदाशिवगड मागचा भागातील झाडी खूप सुंदर होती.डाव्या बाजूला दादासाहेब मोकाशी कॉलेजची भव्य इमारत डोकावून आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे चालत होतो. साडेपाचला चालावयास सुरुवात केल्यापासून आम्ही अजिबात थांबलेलं नव्हतो. सव्वा आठ वाजले होते. आता चहा किंवा काहीतरी नाश्ता केल्याशिवाय पर्याय नाही,थोडे विश्रांती घेतली पाहिजे असा विचार करून सुरलीच्या घाटाच्या अलीकडे असणाऱ्या जानुबाई मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला.
जानुबाई मंदिराचे परंपरागत पुजारी दत्ता खोचरे हे माझे अतिशय जवळचे मित्र आणि बंधू आहेत. मंदिरात बाहेर असणाऱ्या कठड्यावर बसून चिखलाने भरलेले शूज काढले काढले आणि त्यानंतर तिथे असणार्या बोअर खाली जाऊन चिखलाने भरलेले कपडे धुवून काढले. दरम्यान दत्ता महाराज माऊली यांना फोन केला. आम्ही मंदिरात आलो आहे या, येताना, चहाचे साहित्य घेऊन या असा त्यांना फोन केला .मात्र तोपर्यंत ते मंदिराच्या दारात पोचले होते. आमचा पाहुणचार करायचा म्हणून ते पुन्हा चहा साहित्य आणण्यासाठी राजमाचीत गेले आणि आम्ही मंदिरात आराम केला.
पंधरा मिनिटांनी दत्ता माऊली आले,त्यांनी चूल पेटवली. चुलीवर ठेवायचे चहाचे भांडे त्यांच्या वहिनीने मातीने लिपून दिले.चहाचा सुगंध येत होता चहा उकळत होता आणि आम्ही इकडे मंदिरात जानाई देवीचे दर्शन घेत होतो. याच दरम्यान कराडचे उद्योजक व खाण व्यावसायिक विकास पाटील त्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी चहा बिस्किटे खाऊन मंदिरातून पावणे नऊच्या सुमारास बाहेर पडतो.
आता पुढे जाऊन सुरली घाट चढायचा होता. चिखलात चाललेल्या रस्त्यापेक्षा सुरली घाट आता आम्हाला काहीच वाटत नव्हता. घाटातील रस्ता स्वच्छ होता. घाटामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले नसल्यामुळे रस्ता मोकळा होता. या रस्त्यावरून आम्ही चालायला सुरुवात केली. मला पुन्हा एकदा दिवे घाटाची आठवण झाली. दिवेघाटात माऊलींची पालखी आल्यानंतर पावसाला सुरुवात होते ही आठवण काढल्यानंतर सुर्ली घाटात सुद्धा बारीक पाऊस सुरु झाला. रिमझिम पावसात आम्ही घाट चढू लागलो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा जयघोष सुरू होता. माऊलींच्या नावाचा महिमा फार मोठा आहे. माऊलीचे नाम मुखी घेतल्यानंतर सर्व संकटे दूर होतात, हे अनेकदा मी अनुभवले आहे. पाय खूप दुखत असतानाही आणि सुरलीच्या घाटाचा चढाचा रस्ता असतानाही आम्हाला कुठून ताकद आली हेच कळले नाही. एका सुरात कुठेही न थांबता आनंदाने सुरलीचा घाट पार करून आम्ही घाट माथ्यावर पोहोचलो.
सकाळपासून 12 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले होते. अजून दोन किलोमीटर बाकी होते. सुरलीच्या घाटातून पुढे जाण्याऐवजी घाट पुन्हा खाली उतरावा असा आम्ही विचार केला. तत्पूर्वी घाट माथ्यावर असलेल्या पोलिस चौकीमध्ये जाऊन कराड तालुका पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नमस्कार केला. रात्रीची ड्युटी करून हे दोघे कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत होते. कोरोणामुळे सातारा जिल्हा हद्दीवर पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. सुरलीच्या छोटेखानी एसटी पिकप स्टॅन्डचे रूपांतर चेक पोलिस चौकीत करण्यात आले आहे. गेली दोन महिने या एसटी स्टँडमध्ये हे कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहेत. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांना पावसाचा आणि वाऱ्याचा त्रास होत आहे, हे आम्हाला दिसले. सुरली ग्रामस्थानी किंवा स्वयंसेवी संस्थांनी सुरली घाटातील या पोलीस चौकीसाठी ताडपत्री किंवा प्लास्टिकच्या कागदाची व्यवस्था करण्याची गरज आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत आम्ही परतीचा रस्ता सुरू केला.
ओगलेवाडी दीपाचा ओढा पासून सुरली घाटा पर्यंतचा रस्ता चढाचा होता आणि या रस्त्यात सर्व चिखल होता. आता घाटातून खाली उतरण्याचा रस्ता उतरणीचा होता त्यामुळे पायावर थोडासा ताण येत होता. मात्र आम्ही माऊलींचे नाम घेत चालत राहिलो. साडे नऊच्या सुमारास सुरली घाट उतरून खाली जानाई मंदीरासमोर आलो.
14 किलोमीटर अंतर पूर्ण झाले होते.त्याठिकाणी मंदिराचे पुजारी दत्ता खोचरे त्यांची कमांडर घेऊन थांबले होते. खरं तरं आमची आजची वारी पूर्ण झाल्यानंतर मंदिरापर्यंत आम्ही वाटेगावकर यांची कार मागून घेणार होतो. मात्र या चिखलाच्या रस्त्यात कार चालणार नव्हती. त्यामुळे दत्ता खोचरे यांना आम्ही विनंती केली त्यांनी त्यांच्या कमांडर 1612 मधून आम्हाला करवडी फाट्यापर्यंत लिफ्ट दिली. माऊली दत्ता यांच्यामुळे आज आम्हाला चहाची व्यवस्था झाली. परतीचा प्रवास पण त्यांच्यामुळे सुखद झाला होता. दत्ता अतिशय उमदा असा युवक आहे. अतिशय कष्टाने त्याने 1990 पासून कराड विटा वडाप व्यवसाय करून कुटुंब संभाळते आहे.हे करत असताना त्यांची आई मंदिरात देवीची सेवा करत होती. आईच्या निधनानंतर दत्ता यांचे बंधू देवीची सेवा करत असत. दरम्यान दत्ता यांचे बंधूंचे निधन झाल्यानंतर आता दत्ता माऊली व त्यांचे कुटुंब आणि वहिनी हे या मंदिरात सेवा करतात. दत्ता माऊली यांच्याशी बोलताना या वर्षी श्रावण महिन्यात देवीचा भंडारा होईल का नाही याबाबत चर्चा झाली. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी या मंदिरात फार मोठा यात्रा असते. परिसरातील 8,9 गावातील भाविक याठिकाणी येतात. गेल्यावर्षी 285 पायली इतका गव्हाची खीर याठिकाणी प्रसाद केली होती , असे दत्ता माऊली यांनी मला सांगितले.
करवडी फाट्यावर आल्यानंतर उमेश वाटेगावकर आम्हाला न्यावयास आले होते. लोगन कारमधून आम्ही कराडमध्ये आलो. एरम हॉस्पिटल समोर आमच्या टुविलर लावल्या होत्या. त्या घेण्यासाठी आम्ही गाडीतून उतरलो असता समोरून आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुभाष एरम येताना दिसले. डॉ.सुभाष एरम हे अतिशय नम्र आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा अनुभव या अगोदर मी अनेक वेळा घेतला आहे. आम्हाला पाहिल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला शारदा क्लिनिकमध्ये येण्याचा आग्रह केला. क्लिनिकच्या दारात गेल्यानंतर आम्ही आज कुठे गेलो होतो हे त्यांना सांगितले. पंढरीची वारी करणारे तुम्ही वारकरी आहात, तुमचे दर्शन घेतले पाहिजे म्हणून माऊली डॉक्टर स्वत: खाली आले आणि त्यांनी आम्हाला नमस्कार केला, आम्हीही त्यांना नमस्कार केला. त्यांचे चरण दर्शन घेतले. खरंच माऊलींच्या नामामुळे,माऊलींच्या सहवासामुळे, कितीही मोठा माणूस असो, तो नम्र होऊन जातो, हे आज पुन्हा पाहायला मिळाले. डॉक्टर सुभाष एरम हे किती मोठे आहेत,त्याची संपत्ती किती आहे, ते किती मोठ्या बँकेचे चेअरमन आहेत यापेक्षा ते किती नम्र आहेत हे आज पुन्हा अनुभवलं. दरम्यान डॉ. चिन्मय त्याठिकाणी आले. आम्ही पायी वारी करत आहोत हे त्यांना समजल्यानंतर चिन्मय सरांनी सुद्धा आमच्यातील माऊलींना नमस्कार केला. कराड मधील एक सेवाभावी व्यक्तिमत्व सलीम मुजावर आणि उद्योजक विजय चव्हाण हे त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते. सलीम मुजावर मला पाहून खूप खुश झाले. मोरे साहेब तुम्हाला भेटायचं होते, तुम्ही इथे भेटला बरे झाले असे म्हणत ते खाली आले. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असणारे आपण अनेकजण पाहिले असतील पण सलीम मुजावर सारखा सच्चा माणूस,सच्चा मुसलमान मी क्वचितच पाहिला आहे. सलीम मुजावर हे आधुनिक काळातील कर्ण आहेत, हे मी थोडेसे धाडसा आणि जबाबदारीने म्हणतो. राम कृष्ण हरी नामाचा जयघोष करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.
आजचा दिवस खुप छान गेला. माऊलीच्या जयघोषात अवघड घाट आणि चिखलमय वाट कधी पार केली हे आम्हाला कळलेच नाही.
राम कृष्ण हरी.
karawadikarad.blogspot.com