फॉलोअर

२५ एप्रिल २०१६

उन्हाळी सुट्टी आमची आणि आजची



   
                                     झुक झुक आगीनगाडी
                                         धुराच्या रेषा हवेत सोडी
                                              पळती झाडे पाहु या
                                                   मामाच्या गावाला जाऊया !!




हे बालगीत आठवतंय 
लहानपणी केलेला, दंगा, गोंधळ, मजा, धाबडधिंगा 
सगळे डोळ्यासमोर उभे राहिले ना !
मामाच्या गावाला जाण्यासाठी 
आई बाबाकडे केलेला हट्ट पण आठवतोय, होय ना ! 
एसटीत, रेल्वेत बसायला मिळणार असल्याने 
वाढणारी  उत्सुकता पण  आठवतेय ना! 

1990- 1995 च्या अगोदर शाळेत असणाऱ्या  आपल्या पिढीला मामा,  मामी,  आजी आजोबा, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, मामाचं गाव,  मामाचे दोस्त, मामाच्या गावातील गल्ली बोळ,  रस्ता,  विहिर,  मैदान,  घरगुती बैठे खेळ,  पत्ते ,चलस , सूर, आठ्या पाट्या आणि खुप खुप काही पहायला मिळाले आहे. 
आजच्या घडीला  आपल्या मुलांना हे काही पहायला मिळू शकत नाही. 


सोशल मिडिया वर मे महिन्यातील सुट्टी 20 वर्षापुर्वीची आणि आजची असे दोन फोटो फिरत आहेत.  हे फोटो पाहून माझ्या मुलीने पप्पा तुम्ही झाडावर खेळत होता? असे आश्चर्याने विचारले.  मला पण का पाठवत नाही, असा प्रश्‍न केला. पुढे जाऊन तिने तुम्ही आणखी काय काय करत होता, कसे जायचा, पारंब्या म्हणजे काय, कुठले खेळ खेळायचा,  कुठे लपून बसायचा, असे एकावर एक प्रश्नाची सरबत्ती केली. खरंच किती रम्य काळहोता तो,  किती सुंदर  आठवणी  आहेत, बालपणीच्या!


शाळेत जायचे होते, पण शाळेचे टेन्शन नव्हते, आभ्यास होता पण टारगेट नव्हते, गुरूजीचा धाक, भिती होती मात्र एक्स्ट्रा क्लासचा दबाव नव्हता. पास होण्यासाठी धडपड होती, 90 % चे ध्येय नव्हते . पण या सर्व शिक्षणात प्रचंड आनंद मिळत होता.  घरची कामे करून शाळेला जायचे,  खाकी चड्डी, पांढरा शर्ट मुलांसाठी आणि निळा पांढरा ड्रेस मुलीसाठी, हा ऑल  ओव्हर मराठी शाळेचा ड्रेस कोड.  हायस्कूलला पण तोच ड्रेस.

शाळेत जायला ना स्कूल बस ना व्हॅन, ना रिक्षा. जीवन जगण्यासाठीचं खरं शिक्षण मिळत होतं या शाळेत. मे महिना आणि दिवाळीची सुट्टी कधी लागते इकडे  सगळ्यांचेच लक्ष असायचे. सुट्टीचे प्लॅनिंग एकच मामाच्या गावाला जायचे. मामाचं गाव हा सार्‍या भाच्चा भाच्चीसाठी जगातील सर्वात आनंददायी ठिकाण असायचे. बहीण भाऊ नाते खूप पवित्र,  निरागस,  समर्पण , सेवा,  त्याग  आणि काळजीचं आहे आणि होतं. आज समानता आणि आई वडिलांच्या संपत्तीमधील वाटा यामुळे काही ठिकाणी  हे नाती ताणले गेले आहे. तरीही मामा हा प्रत्येकाचा जवळचा होता व आजही आहे.



सुट्टीची तारीख पोस्ट कार्ड ने मामाला कळवली जायची, त्या दिवशी मामा कुठल्याही परिस्थितीत बहीण च्या घरात हजर! भाच्चे मंडळीना सायकल, एसटी, रेल्वे , बैलगाडी तर जवळपास गाव  असेल तर चालत घेऊन मामा जायचा. मामाची मामी वाट पाहत  असायची.  भाच्याला, भाच्चीला आदराने हाक मारली जायची. ती नावे पण गमतीशीर असायची. राणीसाहेब, राजसाहेब. मामी खुप जपायची या नात्याला. 

सुट्टीत खुप मज्जा करायचो आम्ही पोरं.  नदीकाठी आजोळ असेल तर नदी, नाहीतर विहिरीत पोहायला जाणे हे हमखास  असायचे.  पोहायची, पाण्याची भिती मामा अशी घालवायचा की पोहणे चार  आठ दिवसांत शिकत होतो. सकाळपासून संध्याकाळ ते रात्री झोपेपर्यंत दंगा, मस्ती, खेळ याशिवाय काही नव्हते. मामी खुप छान स्वयंपाक करायची, प्रेमाने भरवायचीही. मामाची मुलगी किंवा मुलगा हा विक पॉइंट होता.  मामी चेष्टा करायची, जावई म्हणून चिडवायची. मामा पोरांना घेऊन रानात जायचा,  शेतावर विहिरीच्या पाटात धम्माल खेळ. झाडावर चढून खेळायचे, सावलीत बसून मस्त पैकी कांदा चटणी , पिठलं खायचं. कुळवावर बसायचा जो आनंद होता तो आज  ऑडीत बसण्यातही नाही.
 दुपारी पत्ते किंवा चलस खेळ, कंटाळा आला की गाण्याच्या, गावांच्या, शब्दांच्या भेंड्या.

चिंचेचे चिचोके आडवे फोडायचे, त्या आमच्या सोंगट्या. पांढरी बाजू आणि काळी बाजू हे परिणाम. जमीनीवर, पाटावर  उभ्या आडव्या रेषा आखून खेळ भलताच रंगायचा, चलसचा.





मी तर मे महिन्यात आणि दिवाळीत रेठरे बु गावाला आजोळी जायचोच. चैनीच्या रेठर्यात टुरिंग टाॅकीज होती. तिथे पिक्चर पहायला जाणे हा माझा आवडता छंद. मामाकडून गोड बोलून पैसे काढायचे, अनं रात्री पिक्चर बघायला जायचे.  मामा नाही म्हणला तर मामी जवळ गुळुगुळु करायचे. मामी पैसे द्यायची, रात्री उशीरा हळूच येऊन पत्र्यावर झोपायचे, असा क्रम असायचा.


अनेकांच्या  मामाच्या गावची  जत्रा मे महिन्यात असायची. मग आणखी मजा. पाळणा, गोल रिंगण,  खेळणी, पिपाणी, चिरमुरं, बत्तासू काय काय!  सुट्टी संपत आली की मामा छान ड्रेस घ्यायचा. परत घरी सोडायला यायचा.  मामी आग्रहानं म्हणायची , जावई बापू या पुढच्या सुट्टीत.  खुप छान आठवणी आहेत मामाच्या गावाच्या,  मे महिन्यातील सुट्टीच्या. पुन्हा एकदा लहान होऊन मामाच्या गावाला जावंसं वाटतंय.




आज काळ बदलला आहे. मामा मामी नोकरी करतात. भाच्चा-भाच्चीसाठी मामाला वेळ नाही. अपवादात्मक कुटुंबे सोडली तर मामाचं गाव आता खुप दूर झालं आहे.  मनोरंजनाचे निकष बदलले आहेत.  तेव्हा टिव्ही, मोबाईल नव्हते.  घराबाहेर  असणाऱ्या मोठ्या जगात मनोरंजन शोधलं जायचं. आजची पोरं  4 जी आहेत. सुट्टीत मोबाईल वर तुटून पडलेली आहेत.  खेळायला म्हणून  जमतात पण येताना मोबाईल खिशातून आणतात.  मग व्हिडिओ, फोटो, पिक्चर,  फाईल अपलोड  अॅड ट्रान्स्फर आणि चॅटिंग यातच यांची सुट्टी जात आहे. यापेक्षा अधिक लिहलं तर राग येईल आजच्या पिढीला.


आजच्या या परिस्थितीवर
आधुनिक मामाचा गाव  ही
कविता वाचून समाधान आणखी काही सांगायची गरज नाही.

झुक झुक झुक आगीनगाडी 
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे डबे बुक करूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव हाय मोठा
मॉल बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया
मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा पगारदार
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईवला जाऊया
फोर व्हिलर शिकूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको शिकलेली
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
तिला जोक पाठवूया
रूसलेली मामी हसवूया 
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको चटपट 
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा बर्गर खाऊया 
मामाच्या गावाला जाऊया

...........सतीश मोरे




२३ एप्रिल २०१६

जागतिक पुस्तक दिन विशेष

आठ दिवसांत लातूर दौरा आणि किरकोळ आजारपण यामुळे लिहता आले नाही.
आज जागतिक पुस्तक दिनी पुन्हा एकदा नव्याने सुरू करत आहे.

लोभ आहेच तो यापुढेही कायम रहावा. 




☑२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन

〰〰〰〰〰〰〰〰〰
२३ या अंकाला अंकशास्रामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे....
२३ अंक हा बुद्धिमत्ता कारक मानला जातो....
आज शेक्सपियर चा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस हि.....

🔲🔲🔲

🔺मरगळलेल्या, अस्वस्थ मनाला शांत करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे पुस्तकांनी भरलेली जागा “वाचनालय”. चाफ्याच्या फुलांनी मन जसं प्रफुल्लित होतं अगदी तसंच नवीन कोऱ्या पुस्तकाचं असतं. नवीन पुस्तकं हातात आलं की त्याचं नाव न पाहता त्याची किंमत न पाहता पहिला त्या पुस्तकाचा गंध मनात भरून घ्यावा हीच खऱ्या वाचकाची सवय. आज असं पुस्तकं आणि त्याचा सुगंध आठवण्याचा खास दिवस म्हणजे आजचा ‘जागतिक पुस्तक दिन’.
#२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

🔲🔲🔲

जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! विल्यम शेक्सपियरचा जन्म २३ एप्रिल, इ.स.१५६४ आणि मृत्यू देखील २३ एप्रिल, इ.स. १६१६. शेक्सपिअर हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपियरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.

वाचकांना प्रेरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ साली पॅरिस येथे झालेल्या परिषदेत युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

🔲🔲🔲

भरपूर आर्थिक संपत्ती नसताना देखील या जगातील एक व्यक्ती खूप श्रीमंत असते असे म्हटले जाते, आणि ती व्यक्ती म्हणजे ‘पुस्तक प्रेमी’. ज्याच्याकडे पुस्तकांचा खजिना असतो, त्याच्याकडे ज्ञानाचे भंडार असते.

🔲🔲🔲

चांगल्या पुस्तकांमुळे आपल्या संपूर्ण जिवनाला एक वेगळे वळण मिळते. कधीकधी न वाचलेल्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात वाचतो आणि आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल घडतो. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.

🔲🔲🔲

कुणाला वाचनालयात जायला वेळ नाही लायब्ररीमध्ये उपलब्ध होणारी पुस्तकं फिरत्या वाचनालयातून घरपोच फिरू लागली.आता या वाचनालयांबरोबरच इंटरनेट आणि ‘ई-बुक’ देखील आहेत. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय असतो. पूर्वी केवळ ‘वाचनालय’ हे पुस्तके वाचण्याचे आणि मिळण्याचे एकमेव ठिकाण होते. लोक आवडीने वाचनालयास भेट द्यायचे. आज पुस्तके वाचण्याचे आणि खरेदी करण्याचे मोठो स्त्रोत निर्माण झाले आहे. तंत्रज्ञानामुळे चांगल्या पुस्तांचा आणि लेखकांचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे.


📚📖📚📖🌎📖📚📖📚



आज शनिवार कविता डे

विल्यम शेक्सपिअर यांच्या प्रेम कविता अजरामर आहेत .

प्रेम वेड्या
त्या दोघांच्या भेटीचा हळुवार संवाद ,

माझ्या नजरेतून तुमच्या साठी !



तो आणि ती 

1

ती

कालची संध्याकाळ वेगळी होती
तुझ्या आठवणींची त्यात गर्दी होती

शोधत होते त्यामध्ये मीच मला
त्या गर्दीत मला दिसत होते
अफाट वाळवंट आणि बेफाम वारा!

त्याक्षणी
माझ्यासाठी आला एक ढग
तो आला एका क्षणासाठी पण

मी तृप्त झाले मणभर
ज्याची मी वाट बघत होते जीवनभर!


2

तो

मी माझा कधीकधी असतो
अनेकदा तुझ्याच विचारात असतो
मणभर आणि काकणंनर
जीवनभर आणि क्षणभर
नातं आपलं जपुया हर पल


3

ती

कधी कातरवेळी तुझी आठवण
मनी माझ्या दाटून येते
दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे
मग मन उगाच पहात राहते
तुझ्या स्पर्शाची जादू
मनाला हळूच हलवून जाते
तु नसतानाही असे का होते
माझे मलाच उमजत नाही
जवळ नसतानाही तुझा भास होतो
तुझ्या आठवणींत चिंब भिजवून जातो

4

तो

तुझी आठवण मला कधीच येत नाही
तुझी काळजी मात्र सतत लागून राहते
कुठेही रहा, सुखी रहा,
स्वच्छंद , सुमधूर, सुमंगल
पण
तुझ्यावरचा माझा अधिकार मात्र राखीव ठेव

तुझ्या सुखातच माझा आनंद आहे
तु उभी राहण्यातचं माझा स्वर्ग आहे.


5

ती

मी कुठेही असेन
तुझ्यासाठी तुझ्यातच असेन
साद दे कधीपण जीवलगा
येईन परतुन सख्या साजना

आठवतोय तुला तो पाऊस
नाही? असं का करतोस

काल पुन्हा पाऊस आला 
पाऊस पडून गेला अन
तुझ्या आठवणीने पुन्हा गर्दी केली

हुरहुर लावतात तुझ्या या आठवणी
पण सुखद स्पर्शाचा थंडावाही देतात

जायचं असतं परतून तर येतोसच का? 
वेड या जीवा लावतोस का ?    
                            
यायच्या आगोदर तुला परतुनी जायचं असत
मला मात्र सतत तुझ्याजवळ राहायचं असतं


6

तो

मला परत जायचंच नसतं
तुझ्या जवळ रहायचे असतं..

मी आल्यावर तुझ्याजवळ असतो
गेल्यानंतर तर तुझ्यामध्येच असतो


                   ..........सतीश मोरे


१६ एप्रिल २०१६

आयुष्य म्हणजे काय


आयुष्य म्हणजे
जीवन-मरण, स्मरण विस्मरण
येणे-जाणं, देणे आणि घेणं
वाटणं आणि लुटणं
दिसणं आणि असणं
कष्ट करणं, संघर्ष करणं, उभं राहणं




आयुष्य म्हणजे
मजा आणि मस्करी करणं
मित्र जोडणं आणि मैत्री टिकवणं
आनंद घेत घेत आनंद लुटणं
सेवा करणं, कर्तव्य करणं
जमवणे, गोळा करणं आणि सर्वाना देणं


आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे.
आयुष्य एक रंगमंच आहे..
इथ प्रत्येकाला नाटक करावेच लागते
कितीही नाही बोलाल तर हसावच लागत..


आयुष्य म्हणजे 
इतरांसाठी काही तरी करणं
आयुष्य म्हणजे इतरांना त्रास न देणं
दुसर्‍यासाठी चांगले करता आले नाही तर
किमान वाईट तरी न करणं
आपण सुखी होणं
आणि इतरांनाही सुखी करणं


               .......सतीश मोरे 

१५ एप्रिल २०१६

शिक्षकांवर जोक म्हणजे कृतघ्नपणा



मित्रहो जरा सर्वांनी इकडे लक्ष द्या,
     
सध्या social media वर शिक्षक विद्यार्थी संवादाचे अनेक जोक येत आहेत.
या जोकचा शेवट खालीलपैकी एखाद्या वाक्याने केलेला आढळतो.

मास्तर बेशुद्ध पडले!
मास्तर सैरावैरा पळत आहेत!
मास्तर जागेवर कोसळले!
मास्तरांनी राजीनामा दिला!
मास्तरांनी जागेवर प्राण  सोडले!
मास्तर कोमात-------- जोमात!


आपण जास्त विचार न करता हे जोक forward करतो.
मात्र शिक्षकांची बदनामी करण्याचे हे एक मोठे षड्यंत्र आहे
ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
असे जोक forward करू नयेत ही विनंती. कारण कोणत्यातरी गुरुजींनी, मॅडमनी  आपल्यावर चांगले संस्कार केले आहेत हे आपण कधीही विसरू नये .
आपल्या गुरुंचा काही कुसंस्कारी व्यक्तींकडुन होत असलेला अपमान सहन करू नका.




गुरूजी, शिक्षक, सर, बाई, मॅडम
कोणत्याही नावाने हाक मारली तरी एक आदरयुक्त भिती निर्माण होते. 
सर असोत वा गुरूजी , बाई असोत वा मॅडम
या आदरणीय आहेत , कारण ते आपले देव आहेत,  तुम्ही म्हणाल कसे?

सदगुरू वामनराव पै यांनी देवाची
अतिशय सुंदर व सोपी व्याख्या सांगीतली आहे,
देतो तो देव.

सदगुरूंनी आई, वडील, शिक्षक, गूरू आणि आत्गुमरू
असे पाच जिवंत देव सांगितले आहेत.

आपले शिक्षक म्हणजे आपले देवच आहेत. ते आपल्याला ज्ञान देतात.
जगात कसे रहायचे, वागायचे, काय करायचे, काय नाही करावे ते शिकवतात.

आई आणि वडीलानंतर पहीली ओळख होते ती शिक्षकांची.
लहान गट, बालवाडी,  नर्सरी, केजी, पीजी म्हणा नाहीतर अंगणवाडी असो.
सुरुवातीला तिथे जायला नको वाटते, पण नंतर गोडी लागते. बाई छान छान कविता शिकवतात,
गोष्टी सांगतात, खेळायला देतात .
शब्द शिकवतात, कोडी घालतात. मग गोडी निर्माण होते. जरा मोठ्ठे होतो, 
मग पहीलीत प्रवेश होतो. नवीन पुस्तके, वह्या, नवीन मॅडम,  गुरूजी, सर.
रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते,  शिस्त लागते,  गुरूजी विषयी  आपुलकी,  प्रेम, भीतियुक्त आदर निर्माण होतो.
पहीली पासून पदवी संपादन करेपर्यंत अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते.
प्रत्येक दिवशी नवनवीन शिकायला मिळते ते फक्त त्यांच्या मुळेच!



गुरूजींनी दिलेली शिकवण , केलेली शिक्षा यातुन मिळालेले धडे कधी आपण विसरू शकत नाही.

 मला आठवतंय करवडी गावातील जीवन शिक्षण विद्या मंदिर म्हणजे आजची प्राथमिक शाळा.  शाळा माझ्या घरासमोर होती.  शाळेत गेल्या गेल्या एकच काम  असायचे,  स्वच्छता. वर्गाची,  व्हरांड्याची, मैदानाची. गुरूजींनी अतिशय सुंदर व्यवस्था बसवली होती. कोणत्या दिवशी कोणत्या वर्गाने मैदान झाडायचे, व्हरांड्याची स्वच्छता करायची. स्वच्छता अभियान तेव्हा सुरू होते असे म्हणा.

माझ्या आवडत्या सुर्यवंशी बाई होत्या.  मी वर्गात पहिल्या एक दोन मध्ये होतो. आजच्या तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांचा थोरला मुलगा अनिल माझा वर्ग मित्र.  त्याची व माझी पहील्या नंबर साठी स्पर्धा असायची. घरातील कलेचे वातावरण आणि परिस्थिती मुळे त्याने चौथी पास झाल्यावर शाळा सोडली . या शाळेत प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम केलेल्या माझ्या गुरूंजणांच्या ऋणात रहाणे मी आयुष्यभर पसंत करेन.

या शिक्षकांवर ,गुरूजीवर फालतु जोक करणे तर दूरच त्याचे फक्त नाव आठवले तरी कृतज्ञतेने मान झुकते.

गुरूजी,  सर,  मॅडम, बाई या आदरणीय व्यक्ती आहेत .
त्याच्यावर फालतू जोक, कमेंट करून स्वतःची लायकी घालवून घेऊ नका.
असे जोक कोणी पाठवले तर त्याला सडेतोड उत्तर द्या.  हे मेसेज पुढे पाठवू नका. 
आपल्याला जगात कसे वागायचे हे शिकवणारे हे प्रत्यक्ष देव  आहेत. देवावर जोक तुम्ही सहन करता का? 

मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो,  देतो तो देव.  फोटोतला, चार हाताचा देव तुम्हाला काय देतो की नाही हे मला माहित नाही पण शिक्षक आपल्याला खुप काही देतात,  दिले आहे,  देणार आहेत .

या  जिवंत देवाची चेष्टा करणे म्हणजे कृतघ्नपणा आहे. 
तो आपण करणार नाही,  अशी शपथ आज घेऊ या चला.

मला ज्ञान देणार्‍या सर्व शिक्षकांचा मी ऋणी आहे.

                ............  सतीश मोरे


१४ एप्रिल २०१६

जागृत कराडकर बाबासाहेबांना भावले


डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष  

2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात  आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या दिवशी मानपत्र प्रदान करण्याचे निश्चित केले होते. त्यादिवशी बाबासाहेब सातारा येथील निवासस्थानाहून तीन वाजण्याच्या सुमारास मोटारीने निघाले.
सातारपासून 13 मैलावर  म्हणजे अतित गावच्या  आसपास त्याची गाडी नादुरुस्त झाली. सर्वजण खाली उतरून दुसऱ्या वाहनांची व्यवस्था होते काय हे पहात होते. दरम्यान  मुंबई येथील परळ  भागातील तंबाखू व्यापारी लक्ष्मणराव शेटे त्याच्या मोटारीने निघाले होते, त्यांनी बाबासाहेबांना कराडपर्यंत नेण्याचे आनंदाने कबुल केले. या मोटारीत बसून सारे कराडला यायला निघाले. 
दुर्दैवाने या मोटारीला कराडजवळ मोठा अपघात झाला. सुदैवाने सारे जण मरणाच्या दारातून वाचले. सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने  सर्व जखमींना सरकारी दवाखान्यात दाखल केले.  जखमींवर उपचार केले, पट्‌ट्या बांधण्यात आल्या. दवाखान्यात थोडी विश्रांती घेऊन सहाच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर कराडात मानपत्र स्वीकारण्यासाठी पोहचले.

या ठिकाणी कराडात बाबासाहेबांचा मानपत्र प्रदान करण्यात आले 

अतिशय सुंदर, शानदार समारंभ झाला. पाण्याच्या टाकी शेजारी मुन्सिपाल्टी कचेरी होती. मुन्सिपाल्टी हॉल आतून व बाहेरून सजवण्यात आला होता. कार्यक्रमास सर्व 17 सभासद, नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला विद्यार्थीनीनी स्वागतपर गीत सादर केले. त्यानंतर प्रसिद्ध वकील सदाशिव कृष्ण  बहुलेकर यांनी मानपत्र वाचन केले. पालिकेचे अध्यक्ष राऊ बाळा कदम यांनी मानपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला.

या नंतर बाबासाहेब यांनी केलेले भाषण जसेच्या तसेे पुढील प्रमाणे....

अध्यक्ष महाराज, सभासद, भगिनी व बंधुजनहो,

आपण मला जे मानपत्र दिले आहे त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. स्थानिक प्रश्नाबाबत मी काही कामगिरी केलेली नाही. मी कऱ्हाडचा रहिवाशी नाही. माझी  कामगिरी राजकीय स्वरूपाची आहे. अशा परिस्थितीत आपण मला मानपत्र अर्पन करून माझा जो गौरव केला आहे  यातून आपला उदारपणा मात्र व्यक्त होतो. आज या समारंभास मला हजार राहता आले ही इष्टापत्तीच होय.

हिन्दुस्थानच्या आजच्या परिस्थितीत जागृती व जबाबदारीची फार आवश्यकता आहे. युध्दोत्तर हिंदुस्थानापुढे मोठ मोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत. स्वराज्य सर्वासच हवे यात शंका नाही पण एकाचे स्वराज्य दुसऱ्यास गुलामगिरीत डांबण्यास कारणीभूत होणार नाही, अशी आपण सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे.

अल्पसंख्यांकांच्या मागण्या या वरील भीतीच्या निदर्शकच आहेत. ही भीती नाहिशी करण्यासाठी आपणापुढील प्रश्न सोडविण्यासाठी अल्पसंख्य व बहुसंख्य या दोन्ही लोकात आपण जागृती जबाबदारीची जाणीव उत्पन्न केली पाहिजे असे माझे सांगणे आहे.

आज हिन्दी राजकारणात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विचित्रपणा लक्षात येण्यासाठी आपण गेल्या पिढीचे राजकारण व या पिढीतील राजकारण यातील तुलना करू.
गेल्या पिढीतील गोखले, टिळकांचे राजकारण व आजचे गांधी राजकारण यामध्ये एक मोठा फरक आहे. गेल्या पिढीतील राजकारणास विद्वतेची जरुरी भासत असे. आजच्या राजकारणात बोटवाती, काडवाती करणारांची जरुरी भासत आहे. विद्वानांची यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत आहे.
 
आजचे राजकरण हे आंधळ्याच्या माळेच्या हाती गेली आहे. हि अत्यंत अनिष्ट गोष्ट झालेली आहे. देशाची प्रगती होत राहण्यास विविध विचार व वादविवादांचे निरनिराळे प्रवाह आवश्यक आहेत. अशा भिन्न विचारांच्या प्रवाहातून हमेशा प्रगती होत असते. आंधळ्याच्या माळेमागून एकाच मार्गाने देश जात राहिला तर तो खळग्यात पडल्याशिवाय राहणार नाही, हे खास.

राजकाणात एकच पंथ निर्माण करणे हा चालू राजकारणातील हेतू आहे. जागृती, नाना तऱ्हेचे विचार व साधक बाधक प्रमाणे यांचे या राजकीय पंथास वावडे आहे. त्याच त्या गोष्टींची री ओढीत राहण्यात फायदा काहीच नाही. आज लोक गांधीवेडे झाले आहेत. गांधीवाक्य हे ब्रम्हवाक्य होऊ पाहत आहे. या गांधी वेडाबरोबरच ढोंगबाजीही खूप वाढू लागली आहे. केवळ स्वार्थासाठी कॉंग्रेसला चार आणे देऊन व्यभिचार करणारे अनेक हरीचे लाल आज पैदा होत आहेत. जागृती व जबाबदारी नाही तेथे तशी बिकट स्थिती होणारच.

आपल्या कराड म्युनिसीपालिटीत भिन्न मतांचे व भिन्न पक्षाचे सभासद आहेत.यावरून स्थानिक मतदार विचारी असावेत असे मला वाटते. आपल्यात विचार जागृत आहेत म्हणून मी आपले अभिनंदन करतो. आपण दिलेल्या मानपत्राबद्दल पुन: एकदा आपले आभार मानून मी आपले भाषण पुरे करतो.

अतिशय प्रभावी व मुद्देसुद अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भाषणाला, मानपत्र कार्यक्रमाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज बाबासाहेबांची 125 वी जयंती आहे, हा योग आहे.


बाबासाहेबांचे कराडातील ते  प्रभावी भाषण अनेक मुद्दयाला स्पर्शून गेले आहे.  तत्कालीन हिंदुस्थानची  परिस्थिती, आंधळ्यांच्या हातात गेलेले राजकारण, गांधीवेडातून वाढलेली ढोंगबाजी, स्वार्थासाठी व्यभिचार करणारे हरिचे लाल तसेच देशाच्या विकासासाठी आवश्यक विविध विचार प्रवाह यावर त्यांनी कडक शब्दांत मते व्यक्त केली होती.
कराड गावात भिन्न मताचे, भिन्न पक्षाचे मुन्सिपाल्टी सभासद  असणे म्हणजे गावातील लोक विचारी आहेत, असे कौतुक करताना त्यांनी कराडकर जनतेचे अभिनंदन केले होते, कृतज्ञता पूर्वक आभार मानले होते. जागृत विचारांचे कराडकर बाबासाहेबांना भावले. बाबासाहेबांचे ते भाषण उपस्थितांना प्रेरणा देऊन गेले होते.

बाबासाहेबांचे कराडवर प्रेम होते म्हणूनच त्यांनी हे मानपत्र स्वीकारले, कराडचे गोडवे गायले,  कराडच्या जनतेला आजही बाबासाहेबांविषयी आपुलकी वाटते. 1974 साली तत्कालिन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांच्या पुढाकाराने पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला गेला.  याही घटनेला 43 वर्षे पूर्ण होत आहेत. 
आज 125 व्या जयंतीच्या निमित्ताने या भाषणाचा, भेटीच्या स्मृती जपण्यासाठी कराडात  प्रेरणा स्तंभ उभारणी संकल्पना पुढे आली आहे. शहरातील  आंबेडकर प्रेमी जनतेने याबाबत पुढाकार घेतला तर सर्व समाज त्याला पाठिंबा देईल. बाबासाहेब सर्व समाजातील  उपेक्षित, दुर्बल, दलित, शोषित घटकांचे नेते होते. त्यांच्या मुळेच या घटकांना न्याय मिळाला आहे. कराडात यावर्षी या सर्व घटकांना बरोबर घेवून 125 वी जयंती साजरी होत आहे, हे कौतुकास्पद आहे.
1940 साली बाबासाहेबांना कराडकरांमध्ये दिसलेली ती वैचारिकता, जागृकता कराडकरांनी जपून ठेवावी, वाढवावी हीच बाबासाहेबांना आदरांजली.  


                       जय भिम, जय भारत.


१२ एप्रिल २०१६

सेल्फी. ...मी कसा दिसतो



आकरावी बारावी शिक्षण सदगुरू गाडगे महाराज काॅलेज SGM मध्ये झाले. सगळे मित्र ग्रामीण भागातून आलेले. स्टाईल मारणारे काहीजण होते. एक दोघे दुचाकी वाहने घेऊन यायचे.  पण बहुतांशी जण सायकल आणायचे. टिबल सीट सायकल जोरात चालवणे,  हात सोडून सायकल चालवणे, ही आमची स्टाईल.

आम्ही बाहेर गावावरून येणारे कृष्णा कॅनाल वर उतरायचो, तेथून चालत काॅलेज मध्ये.  कराड शहरातील पोरं तशी आमच्या काॅलेजात कमीच. कारण SGM म्हणजे डाऊन मार्केट, खेड्यातल्या पोरांचे काॅलेज. सगळे  आमच्या काॅलेजला मठ म्हणून  हिनवायचे.

सदगुरू गाडगे महाराज काॅलेज म्हणजे आमचं विश्व होतं. त्यावेळी काॅलेजात एक कॅन्टीन होतं,  पण तिथं आम्ही कमी जायचो. बाहेर एक चहाचे खोके होते. तिथं आम्ही मित्र चहा प्यायला जात होतो.  खिशात  पाच दहा रूपये  असायचे. पण ते असणं पण मोठ्ठं होते.  कधी कधी पैज लागायची, हरेल त्याने चहा क्रिमरोल द्यायचा. काय सांगू त्या चहा आणि क्रिमरोलला कसली भन्नाट  टेस्ट यायची. 

चांगले मित्र होते,  टीचर तर एकदम बेस्ट.आम्ही अॅडमिशन घेतले तेव्हा पासूनच ओळख, कारण कोणते विषय ठेवायचे ते तेच सांगायचे. सर आणि विद्यार्थी याच्यामध्ये आदराचे नाते होते, घरी येणेजाणे व्हायचे. खेड्यातल्या पोरांना शिकवायला खेड्यातून आलेले शिक्षकच होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे हे काॅलेज असल्याने एक वेगळीच शिस्त होती.

आमचा मित्र परिवार वाढत होता कारण आमचा बोलण्याचा स्वभाव आणि ओळख काढण्याचा नाद. अशातूनच मित्राचा मित्र असलेला एक नवीन मित्र  तयार झाला, विटा भागातला होता. त्याचे पुर्ण नाव आठवत नाही, पण निकम फक्त आठवतंय. तो मिलिटरी होस्टेल मध्ये रहायचा.  होस्टेलची शिस्त कडक असलेने तिथे बाहेरच्या मुलांना क्वचित प्रसंगी प्रवेश मिळायचा. 



एकदा दुपारी मी त्याच्या सोबत तिकडे गेलो होतो. आत प्रवेश केला, समोर मोठ्ठा  आरसा होता. आठरावं वरीस आणि समोर आरसा दिसल्यावर काय होतं, हे सर्वश्रुत आहे. हे वय असं असतं की सारखं आरशात बघून मी कसा दिसतो,  हे पाहण्याची उत्सुकता असते. थोडं मिसरूड फुटलेलं,  त्यामुळे मी मोठ्ठा झालो असे वाटू लागते. सारखा कंगवा आणि आरसा. एकडून तिकडून  आलं की आरसा बघायचा, तोंड धुवायचे, पावडर लावायची, भाग पाडायचा, हे TEEN AGE काॅलेजकुमाराचे आवडते काम.



मिलिटरी होस्टेल मधील तो आरसा पाहून खिशात हात घातला, कंगवा काढला आणि स्टाईल मध्ये भाग पाडू लागलो.  तेवढ्यात सिक्युरिटी गार्डचा आवाज आला, 
अ काॅलेजकुमार, जरा  दमानं,  आरसा फुटंल. भांग पाडा आणि मग आरशावर काय लिहलंय ते ही वाचा,
त्यानी दम भरला. 
इतक्या वेळ फक्त आरशात बघत होतो, आता आरशाकडे पाहीले,
वरच्या बाजूला सुंदर अक्षरात लिहिले होते,
' तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे आहात याचा विचार करा.'

थोडं डोकं हललं. विचार केला, विचार करण्याचं वय होते ते. एक छोटं वाक्य होतं ते.  पण  अर्थ खुप मोठा होता. सुंदर दिसण्यासाठी सगळेच आटापिटा करतात,  पण आतून सुंदर दिसावे, खुलावे,आंतरिक सौंदर्य वाढवावे, यासाठी कोण प्रयत्न करते का? तो प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे , किती सोप्या शब्दात सांगितले होते.

सेल्फी अशी प्रसन्न असावी

आज हे आठवायचे कारण म्हणजे आजकाल वाढलेले सेल्फीचे वेड. माझा मुलगा सोळा वर्षाचा आहे,  तो पण सारखा सेल्फी काढत  असतो. त्याला पाहून मला मिलिटरी होस्टेल वरचा तो आरसा डोळ्यासमोर उभा राहिला. सध्या  बहुतेक जणांकडे ANDROID मोबाईल आहे.  पाच ते बारा पिक्सल कॅमेरा त्यामध्ये आहे. दिवसभर एक सेल्फी काढत नाही , असा काॅलेजकुमार आढळणे अवघड आहे. काढला सेल्फी, टाकला ग्रुपवर. मित्रमंडळीना केला शेअर फेसबुकवर, व्हाॅटस अपवर, हाईकवर !


आता तर सेल्फी स्टीकपण आली आहे. इतके फोटो काढतात, शेअर करतात,
पण कुणीतरी मी कसा दिसतो त्यापेक्षा मी कसा आहे, हा विचार केला आहे का?
त्यांना  असा विचार करा म्हणून सांगणारे भेटतात का ?

दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ? कुणावर ओरडलो ? कुणाकुणाला आनंद दिला ? किती गोष्टी मनासारख्या केल्या?  किती मनापासून केल्या? मनाविरुद्ध केल्या? कोणाकोणाच्या चेह-यावर हसू आणले ? काय नको तसे वागलो, काय हवे तसे वागलो, वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी.! 
आपण हा सेल्फी टीपतो का ?



थोर तत्त्ववेत्ते राॅबीन सिंग म्हणतात,
आपण रोज किमान एकातरी अनोळखी व्यक्ती कडे पाहून हसले पाहिजे .

अनोळखी व्यक्तीकडे पाहून हसल्यावर वेगळा आनंद मिळतो. आपण आपल्या ओळखीच्या व्यक्ती कडे तरी बघून हसतो का कधी? खोटं हास्य आणून सेल्फी काढतो तेव्हा आपणास आनंद मिळतो का? मिळाला तर तो आनंद किती काळ टिकतो?  स्वतः आनंदी होण्यासाठी दुसराही आनंदी असायला हवा, असा आपण का विचार करत नाही. सेल्फी मुळे आनंद मिळतो, जर तो मिळाला नाही तर काय होईल, काहीच नाही !

स्वतःचा चेहरा जपतो, मग विचार का जपत नाही ?
सेल्फी म्हणजे आपलं प्रतिबिंब आहे आपले खरे रूप नव्हे.
आपलं खरं रूप,  अंतरंग  आपल्या  इतकं कुणालाही माहीत नाही.
आपण आपल्या आतील मनाला विचारले तर आपल्या इतके वाईट कोणी नाही ,
मी हे चुकीचे केले आहे, असं करायला नको होतं,
हे आपल्या लक्षात येईल .

संत कबीर म्हणतात,

बुरा जो देखन मैं चला
बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना
मुझसे बुरा न कोई  !

सेल्फी हे आपले अंतरंग व्हायला हवे. आपल्या चेहर्‍याकडे पहिल्यावर आपल्याला आनंद झाला पाहिजे .
रात्री झोपताना या सर्वांचा विचार करायला हवा.
आज दिवसभरात जे चुकले ते उद्या सुधारण्याचा मी  प्रयत्न करेन आणि
आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करेन.
चेहर्‍याच्या सेल्फी पेक्षा अंतरंगाचा आनंद महत्वाचा , होय ना ?
               



११ एप्रिल २०१६

वेळ काढून वाचा, दोन महापुरुषांची जयंती आहे



' वेळ काढुन वाचा कारण 125 जयंती आहे '

असे शिर्षक असलेली नालंदा सामाजिक संघ महाराष्ट्र या ग्रुप अॅडमीननी व्हाॅटसअपवर शेअर केलेली एक पोस्ट सर्वत्र फिरत  आहे. मला ती खुप आवडली. गेली अनेक वर्षेपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मी पहात  आलो आहे. ही जयंती साजरी करताना माझ्या मनात याच प्रकारचे विचार उमटले होते, बहुतांशी तेच विचार या पोस्ट मध्ये आहेत. त्यामधील काही भडक शब्द वगळून , एडिटींग करून अॅडमीन लेखकाच्या परवानगीने ती पोस्ट जशीच्या तशी पुढे सादर करत आहे .

मी लहान असतानाचे काही प्रसंग मला आजही आठवतात . त्यापैकी एक प्रसंग सांगावासा वाटतो. सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागात पावसाळी लागण केलेल्या पिकांची कापणी सुरु होते. त्याच दिवसात सकाळी सकाळी बहुरूपी,पिंगळा,अस्वलवाला,वासुदेव तशीच ढोलगं व चाबकाचा आसुड ओढत कडकलक्ष्मी मरीआई दारादारावर यायचे.  आम्ही डोळे चोळतच अंथरूणातून उठून बाहेर यायचो. तेव्हा आई सुपातुन या लोकांना धान्य, घेवडं ज्वारी घालायची. कपाळी टिळा लाऊन ते लोक निघून यायचे. यांचा उद्देश पोट भरण्याचा होता हे आज ध्यानात येतंय. पण हे लोक याच दिवसात का येतात याचं उत्तर मला चळवळीत आल्यावर मिळाले.कारण या काळात सुगी असते.



तशीच काही दिवसांनी बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती येणार आहे. त्यानंतर काही दिवसानंतर शिवजयंती येणार आहे. भक्त मंडळी जागे होण्याची चाहुल लागली आहे.म्हणूनच हा लेखन प्रपंच.

काही दिवसांवरच क्रांतीसुर्य विश्वरत्न बाबासाहेब डाॅ.भिमराव आंबेडकर यांची व त्यानंतर अन्य महापुरूषांची जयंती आल्या आहेत. ज्या महापुरुषांनी आपली सारी हयात बहुजन समाजाला स्वातंत्र्य हक्क मिळवून देण्यासाठी घालवली . प्रसंगी स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केले. त्या महापुरूषांचा जो उद्देश होता आमच्या संपूर्ण स्वातंञ्याचा. आज त्याच महापुरुषांचं दुर्देवं त्यांची जयंती साजरी करण्याचा आमचा उद्देश काय असतो ?

समाजातून पट्टी गोळा करणे , जेवणं घालणे आणि सगळ्यात महत्त्वाचे हजारो-लाखो रुपये खर्च करुन डाॅल्बी सिस्टिम सांगणे, मिरवणूक काढणे आणि दारु पिऊन मिरवणुकीत धाबड धिंगाणा, नंगा नाच करणे इतकाच असतो. गांधी,नेहरू,टिळक,आगरकर,गोखले,सावरकर  यांच्या जयंत्या साज-या करताना डाॅल्बी लावून,दारु पिऊन नंगा नाच करत धिंगाणा घालतात का ?  जेवनावळ्या घालतात का ? आणि आम्ही !

आम्ही आमच्या समाजातून हजारो रूपये गोळा करतो,आणि दंगा,नाच, दारु,जेवण, मिरवणूक काढून उधळून टाकतो. आमचा तरुण ज्योत आणायला जातो पण ज्योत घेऊन पळताना त्याला एक क्वाटर मारल्याशिवाय पळता येत नाही २०० मिलि टाकून ५० कि.मी पळण्याची तयारी दाखवणारा आमचा तरुण अर्धा किलो मेंदूचा वापर करताना दिसत नाही हे दुर्देव आहे.

गावातून,गल्लीतून मिरवणूक काढताना बाबासाहेबांच्या पुढे नाचताना स्प्राइड आणि थम्स अप मध्ये मिसळून दारु प्यावी लागते कारण नाचताना कुठे बाजूला जाऊन चालत नाही., तग धरला पाहिजे.  गाणी तर त्याहून भारी, कोणती ????
पोरी जरा जपून दांडा धर.....शांताबाई .....

नशेत धुंद होऊन नाचणारा तरुण आमच्याच आया बहिणींची,आमच्याच महापुरुषांची आब्रु वेशीवर टांगत असतो आणि दुस-या दिवशी बाहेर काही झाले तरी पण हा अंथरूणात घोरत पडलेला असतो. वर्षभरात एकच दिवस काम ते हि चुकीचे !

काही बुद्धीवादी लोक आमच्या महापुरुषांची चरिञ आणि चारिञ्य बदनाम करुन आम्हाला संपवु इच्छितोय आणि आम्ही माञ गुंगीचं औषध घेउन आरामात झोपुन राहतो. षड्यंञ पुर्वक एखाद्याने जातियवाद वाढण्यासाठी पुतळा विटंबना,डिजिटल बोर्ड फाडला तर आपण जागे होतो अन आमच्याच बांधवाच्या विरोधात उभे राहतो.
गुलाम लोक स्वताच्या मेंदुने चालत नाहीत तर शत्रूच्या इशार्यावर चालतात त्यामुळे त्यांचा सत्यानाश हा अटळ असतो, हे कधी आम्हाला कळणार?

आजपर्यंत आपण आमच्या महापुरुषांच्या जयंत्या साज-या केल्या त्या शञुच्या, व्यवस्थेच्या सोईनुसारच केल्या.आणि त्याचा फायदा त्याच्या व्यवस्थेला भरभरून झाला. त्यामुळे आमच्या समाजाला आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास समजलाच नाही. पण दंगली, जातीयवादाला माञ प्रेरणा मिळाली व आमची पिढी व्यवस्थेच्या गुंगीत गुंगुन राहिली.
बांधवानो, एक दिवस नाचून किंवा जयंती साजरी करुन आम्हाला आमचा इतिहास ,आमचे महापुरूष समजणार नाहीत. त्यासाठी आम्हाला सातत्याने समाजाला जागृत करावं लागेल. आमचे महापुरूष हे आमची प्रेरणा आहेत व त्यांचा इतिहास हीच आमची विरासत आहे.आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास जर आम्ही आमच्या समाजाला समजाऊन सांगू शकलो नाही तर आमच्यासारखे षंढ आम्हीच असू .आम्हाला आजपर्यंत धर्माची,जातीची दारु देऊन उच्च  व्यवस्थेने आमच्याकडुन नागड्यानेच माकडनाच करुन घेतला . पण यातुन आम्ही आमची आब्रु , स्वाभिमान त्यांच्या वेशीला कधी बांधून ठेवला कळलच नाही.

येणारा काळ हा भयानक आहे आणि आम्ही जर त्यांच्या व्यवस्थेच्या सोईनं आमच्या महापुरुषांच्या जयंत्या सवडीनुसार , पाहिजे तशा करु लागलो तर ही व्यवस्था आम्हाला हिजडे करुन भिक मागायला लावल्याशिवाय राहणार नाहीत. क्रांतीचा एक सिंद्धात आहे, हिजडे क्रांती कधीच करत नाहीत.

गल्लोगल्लीत, बहुजन दुकानदार, शेतकरी,नोकरदार या आपल्याच लोकांना धमकी दाखवून खंडणी गोळा केल्यासारखे जयंतीसाठी आमची पोरं पट्टीं गोळा करतात व तोच पैसा चुकीच्या मार्गाला लावुन येणा-या पिढिला मातीत घालण्याचा डाव रचत आहेत. यासाठी मिञहो,आपण समाजाच्या पैशाचा योग्य सदुपयोग करायला हवा. अन्यथा आपण समाजाची दिशाभूल केल्यासारखे होईल. समाजाच्या पैशातून समाजाला सक्षम विचारधारा द्यायला हवी.  खरा इतिहास व वर्तमान व्यवस्थेचे षड् यंञ सांगून जागे केले पाहीजे . कारण तुमचं स्वातंत्र्य अज्ञानात दडलं आहे आणि समाज जागा झाला, जागृत झाला तरच त्या मंडळींच्या कारस्थानाना चाफ बसेल आणि बहुजनांच्या गळ्याभोवती आवळलेला फास आपोआप तुटेल. यासाठी समाजानेही जे लोक खरोखर बहुजनांना जागृत करत आहेत त्यांनाच पैसा, वेळ, बुद्धी, श्रम,कौशल्य द्यावे. अन्यथा चुकीची जयंती साजरी करणार्यांना खुशाल विरोध करावा. नाहीतर तुमच्याच पैशात तुम्ही तुमचा सत्यानाश करत आहात हे सिध्द होईल.

भक्त आणि अनुयायी यामध्ये फरक आहे. तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस जागे होणारा भक्त आणि वर्षभर, आयुष्यभर महापुरूषांच्या विचारावर चालणारे अनुयायी असतात. भक्त एक दिवस जयंती साजरी करतात तेही चुकीच्या पद्धतीने . पण अनुयायी हे तीनशे पासष्ट दिवस निरंतर समाजाला जाग्रुत करतात. भक्त भक्ति करतात व अनुयायी समाजाला स्वातंत्र्य देऊ इच्छितात. समाजाने भक्तानां साथ द्यायची असेल तर गुलामी ही तुमच्या पाचवीला पुजलेली असेल. पण जर समाजाने अनुयायांना साथ दिली तर अनुयायी समाजाला स्वातंञ्याच्या उबंरठ्यावर नेहतील.
तेव्हा जागे व्हा,सतर्क व्हा.आणि भक्ताना अनुयायी होण्यास जागृत करा व तुम्हीही जागृत व्हा.......

नालंदा सामाजिक संघ महाराष्ट्र.



अशी ही पोस्ट आहे. खुप छान विचार मांडले आहेत.


या निमित्ताने मला काही जुन्या गोष्टी आठवल्या. 1982 - 83 साली करवडी गावात आम्ही शिवप्रेमी मंडळ स्थापन केले होते. आम्ही महापुरुषांच्या जयंती साजरी करत. सदाशिवगड, वसंतगड, आगाशिवगडावरून शिवज्योत आणायला जात होतो. कराड तालुक्यात सुद्धा अनेक मंडळे लांब अंतरावरून ज्योत आणायला जायचे. शिवप्रेम जागृत व्हायचे. फलटणच्या शिवाजीराव भोसले यांचे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित केले जात होते. ते व्याख्यान  ऐकून विचाराचे स्फुल्लिंग पेटायचे.

पुढे पुढे जयंतीचे स्वरूप पालटू लागले. समृद्धी आल्यामुळे पैसा हातात खेळू लागला. वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी हळूहळू होत राहिल्या. जयंती साजरी करताना महापुरुषांचे स्मरण कमी जल्लोष वाढत गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा खरं तर राजांच्या कतृत्वाला सलाम करण्यासाठी आहे. मात्र कराड सारख्या अनेक शहरात मशिदी जवळून मिरवणूक जाताना खुन्नस देण्यासाठी ही घोषणा आज दिली जाते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे तर सर्व समाजाचे नेते आहेत पण त्यांना  एका चौकटीत नेऊन ठेवण्याचे काम केले जात आहे. यामध्ये बदल झाला पाहिजे अशी सततची मागणी काही पत्रकार, समाजकारणी करत आहेत . याचापरिणाम म्हणून कराडात यावर्षी सर्वाना बरोबर घेऊन 125 वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे, हे कौतुकास्पद आहे.

सोशल मीडिया हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. महापुरुषांचे विचार या माध्यमातून तरूण पीढीपर्यंत पोहचू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनेक ग्रुप व्हाॅटसअप , फेसबुकवर आहेत. मात्र दुर्दैवाने या ग्रुपमध्ये फक्त डोकी भडकावणारे विचार टाकले जातात. महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले जात आहे.

वैचारिक बैठक असणारे अॅडमीन असणारे नालंदा, शिवम सारखे काही ग्रुप सुद्धा  आहेत. डाॅ. शिरीष काटकर अॅडमीन असलेल्या शिवम ग्रुपमध्ये रोज नऊ ते साडे दहा दरम्यान एका सामाजिक, ऐतिहासिक विषयावर चर्चा होते. या ग्रुपचे अनुकरण करण्याची गरज आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचा एक तेजस्वी विचार आहे.  वाचा, शिका आणि संघर्ष करा. हा विचार पुर्ण न वाचता केवळ संघर्ष करण्यावर जोर दिला जातो. या जगात ज्ञानाइतकी ताकद कशातच नाही, हे बाबासाहेबांनी सुद्धा ओळखले होते. बाबासाहेबांनी मिळवलेल्या पदव्याची माहिती घेतली तर हे लक्षात येईल.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले म्हणजे आपले काम संपत नाही. बाबासाहेबांच्या, महाराजांची जयंती साजरी केली, पुतळ्याभोवती लायटींग केली म्हणजे चांगली जयंती झाली असे नाही तर त्यांचे विचार किती डोक्यात शिरले, किती जण शिकले, किती जण एमपीएससी, युपीएससी परिक्षेत चमकले हे महत्वाचे आहे.
शिवजयंतीला किती लांबून ज्योत आणली यापेक्षा राजांचे विचार किती लांब पोहचवले, हे ध्यानात घेतले पाहिजे. वाहनांवर, मोबाईलवर, हातावर शिवाजी महाराजांचे चित्र लावून मिरवताना छत्रपतीचे आचरण किती करतो, हे ही पहायला हवे.

शिवचरित्र अभ्यासक संतोष तोत्रे यांनी जे महिलांचा सन्मान करत नाहीत त्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे प्रखर मत मांडले आहे, ते योग्यच आहे. महापुरुषांच्या जयंती साजरी करताना त्या निमित्ताने गोळा केलेल्या वर्गणीतून घरोघरी शिवचरित्र, भीमचरित्र, बाबासाहेबाचे विचार, संविधान प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे.
आंबेडकर जयंती दिनी ड्राय डे असावा अशी चळवळीतील विचारवंताची मागणी रास्त आहे. पण फक्त हे करून मुळ प्रश्न संपणार नाही. त्यासाठी वैचारिक क्रांती हाच पर्याय आहे आणि ही क्रांती होण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही
.
मारूल हवेली ( पाटण ) येथील एका दलित कुटुंबातील विनोद मस्के नावाचा मुलगा अमेरिकेत मायक्रोसाॅफ्ट कंपनीमध्ये उच्च पदावर काम करीत आहे. परवा संगणक तज्ज्ञ सारंग पाटील यांनी या मुलांच्या खडतर प्रवासाची कहाणी सांगितली. केवळ अभ्यासाच्या जोरावर हा मुलगा तिथं पोहचला आहे, बिल गेट्स सोबत बैठकीला बसतो, वर्षाला एक कोटी रूपये पगार घेतो. आपल्यातीलच अशा एका मुलाचा आदर्श घेऊन आपणही शिकलेच पाहिजे असा संकल्प आपण 125 व्या जयंती दिनी घेऊ या.


महत्त्वाचे. ..कराड सारख्या शहरात  अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि  भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मिरवणूक काढण्यात येते.  कराड मधील शिवप्रेमी आणि भिमप्रेमी जनतेचा मला अभिमान आहे.  कराडचे अनुकरण इतरांनीही करावे , ही अपेक्षा.

जय शिवराय, जय भिम !

.               ....सतीश मोरे
  

१० एप्रिल २०१६

सखीचं वेगळपणं



सखी कोण आहे,
सखी काय आहे ,
ती कुठून आली,
कुठे आहे ?
हे मी या अगोदरच एका ब्लॉगवर लिहिले आहे.

सखीला काय आवडतं, 
तिचं काय आवडते,
काय वेगळे आहे तिच्याकडे !
हे पण सांगीतले पाहीजेच ना !!!!



                                               शनिवार कविता डे




      सखी,

             तुझं वेगळेपण
                  तुझ्या नावात आहे
                     तुझ्या स्वभावात आहे
                         तुझ्या स्पष्ट बोलण्यात आहे
                              तुझ्या प्रेमाबाबतच्या दृष्टिकोनात आहे.




 
                  तुझं वेगळेपण
                      तुझ्या हास्यात आहे,
                          तुझ्या गोड लाजण्यात आहे,
                             तुझ्या हळुवार वावरण्यात आहे,
                                  तुझ्या दिलखेचक कटाक्षात आहे.


              तुझं वेगळेपण 
                  तुझ्या नजरेत आहे ,
                     तुझ्या आवडीनिवडीत आहे,
                         तुझ्या हव्याहव्याशा स्पर्शात आहे,
                            तुझ्या मला शोधणाऱ्या बैचेनीत आहे.


                                      तुझं वेगळेपण ,  
                                           तुझ्या सजण्यात आहे ,
                                               तुझ्या कस्तुरी गंधात आहे ,
                                                   तुझ्या नशीली नयनात आहे ,
                                                             तुझ्या माझ्या नात्यातील दृष्टीकोनात आहे .
         
                                         तुझं वेगळेपण, तुझ्यातच आहे 





                             

                                    ......सतीश मोरे





०८ एप्रिल २०१६

मराठमोळी गुढी सिक्कीम मध्ये




स्व. यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी, खा. शरद पवार यांचे विद्यार्थी दशेपासूनचे विश्वासू सहकारी, कराड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे मराठमोळ्या मराठी, संस्कृती जपणारे नेतृत्व आहे, नव्हे खानदानी वाघ   असे म्हटले तर  वावगे ठरणार नाही. ऐवढ्या मोठ्ठ्या पदावर जाऊन पण त्यांनी मातीची नाळ काय सोडलेली नाही. आज सकाळी सकाळी मह्रामहीम राज्यपाल महोदयांनी राजभवन निवासस्थाना समोर गुढी उभारली. पत्नी सोबत छान फोटो काढून मला पाठवून दिला. नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या , काय म्हणायचे या विभुतीला !



राज्यपाल साहेबांविषयी खुप लिहता येईल,  लिहिले आहे, नुकताच त्याचा अमृतमहोत्सवी वाढदिवस 11 फेब्रुवारी रोजी साजरा झाला. कराड लोकसभा मतदारसंघाचे कर्तृत्व संपन्न खासदार, खासदार काय करू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण ही राजकीय ओळख . साधेपणा, उच्च शिक्षण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व,  सर्व गटातील लहान थोर व्यक्तीसोबत असलेले जिव्हाळ्याचे नाते,  बोलण्याची पद्धत, जबरदस्त व्यक्तीगत आणि पिळदार मिशा या सर्वासहीत रांगडे नेतृत्व म्हणजे श्रीनिवासपाटील.



कराड पाटण तालुक्याने विविध क्षेत्रात अनेक रत्ने जन्माला घातली.स्व. यशवंतराव चव्हाण  लोकनेते बाळासाहेब देसाई, ज्येष्ठ नेते पी डी पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले या दिवंगत नेत्याबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर आणि राज्यपाल साहेब या नेतृत्वानी कराड पाटणचे  नाव राज्यपातळीवर, देशपातळीवर नेऊन ठेवले. शिक्षण, प्रशासन, राजकारण, समाजकारण यासह प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळविलेले व राज्यपाल म्हणून सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर तेवढ्याच ताकदीने सेवा बजावणारे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत.  

मारूल हवेली सारख्या एका छोट्याशा गावातून येऊन सुद्धा आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी विद्येची उच्च शिखरे गाठली. गावातील मारूतीच्या देवळातील शाळेतून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांनी मॅट्रीकला कराड केंद्रात गुणवत्ता यादीत झळकले. पुढे पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून 1 जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. श्रीनिवास पाटील यांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे लहानपणापासूनच मार्गदर्शन लाभले. तर शरद पवार यांच्याबरोबर युवक कॉंग्रेसमधील निकटचे सहकारी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. हे दोघेही चव्हाण साहेबांचे लाडके तरूण  कार्यकर्ते म्हणून नावारूपास आले. अर्थशास्त्र विषयात एम.ए. व मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. पदवी मिळविली. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून 1965 साली उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. चव्हाण साहेबांच्याच सल्यानुसार राजकीय कारर्कीद सोडून प्रशासकीय सेवेत रूजू झाले.



कोल्हापूर जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. प्रशासकीय सेवेतील त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने अनेकदा अडचणीत असलेल्या विविध संस्थावर त्यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली. यामध्ये संगमनेर साखर कारखाना, भारत सरकारच्या पिंपरी येथील हिंदुस्तान ऍटीबायोटिक्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, 1992 साली पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त व 1995 साली नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली नियुक्ती तसेच अडचणीत असलेल्या या संस्थांचा केलेला कायापालट यामुळे एक संकटमोचक अधिकारी अशी ख्याती महाराष्ट्रभर झाली.
सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडलेला व त्यांच्या प्रश्नांची जाण असणारा एक लोकाभिमुख जिल्हाधिकारी, साखर उद्योगाचे सखोल ज्ञान असणारा संचालक म्हणून त्यांनी केलेले काम आज लोकांच्या स्मरणात आहे. प्रशासकीय कारकिर्दीच्या शिखरावर असताना शरद पवार यांच्या एका हाकेवर भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली.

1999 साली स्थापन  झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या राजकीय पक्षाला अवघड असलेल्या कराड लोकसभेची निवडणूक लढवून उच्चांकी मताधिक्याने विजय मिळविला. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघात विकासकामांचा जणू डोंगरच  उभा केला. खेड्या पाड्यासह मतदारसंघातील त्यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली विकासकामे आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देताना कर्तबगार लोकप्रतिनिधी काय करू शकतो याचे ते उदाहरण आहेत.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणाऱ्या सिक्कीम राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर तेथेही त्यांनी आपला वेगळा ठसा उमठविला आहे. 

सिक्कीमच्या दुर्गम भागाचा दौरा करणारे व सिक्कीमच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी राजभवनाचे द्वार कायम खुले ठेवणारे राज्यपाल म्हणून त्यांची नवीन ओळख निर्माण झाली आहे.
मिशीवाला साहब अशी त्यांची राज्यात  ओळख झाली आहे.  सिक्कीमच्या राजभवनात  गेल्या दोन वर्षांत अनेक लहान मोठे कार्यक्रम  झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या सहीत अनेक देशी विदेशी पाहुणे येऊन गेले. जे आले ते सिक्कीमच्या आणि श्रीनिवास पाटील यांच्या प्रेमात पडले. याचे कारण म्हणजे  सिक्कीमच्या संस्कृतीशी एकरूप होत असताना महाराष्ट्रीयन ढप त्यांनी जपली आहे.


आज गुढीपाडवा. राज्यपाल साहेबांनी सिक्कीम मध्ये गुढी उभारली. कुठेही गेला तरी मराठी माणूस आपली संस्कृती विसरत नाही. पाटील साहेबांनी आज हे सिद्ध करून दाखवले आहे. दोन वर्षे ते राज्यपाल आहेत, खुप मोठ्या पदावर  आहेत, पण आजही पुढारी मध्ये  एखादी त्यांची बातमी आली तरी तेथून फोन करतात, आभार मानतात. अमृतसर सुवर्ण मंदिर भेटीची बातमी पुढारीत प्रसिद्ध झाली तेव्हा तर सकाळी सहा वाजता त्यांचा फोन आला होता. 

वाढदिवसाला सुद्धा न विसरता माझ्या सारख्या वार्ताहराला फोन करतात, हे खरंच वेगळंच गणित आहे.  भेटले की काय सतीश, बरं आहे ना,  या एकदा सिक्कीमला, असे निमंत्रण त्यानी अनेकदा मला दिले आहे. 


प्रगल्भता म्हणजे काय,

फार मोठ्ठे बोलणे, उच्च पदावर पोहचणे म्हणजे प्रगल्भता नव्हे !
छोट्या छोट्या गोष्टी मध्ये बारकावे पाहणे, अनुकरण करणे आणि जपणे म्हणजे प्रगल्भता.

राज्यपाल साहेबांना पाहून आणखी काय बोलायचे प्रगल्भता विषयी!

       ..........सतीश मोरे

०७ एप्रिल २०१६

लेखक आणि मनुष्यप्रिय अधिकारी






काल संध्याकाळी कराड येथील निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला. शासकीय  अधिकारी येतात, जातात, पुन्हा नवीन  अधिकारी येतो,  कार्यकाल संपला की त्याची पण बदली होते. बदली झाली की लोक त्यांना विसरून जातात. बदली होते तेव्हा त्याना निरोप दिला जातो, कार्यक्रम होतो. गोड गोड बोलले जाते,  कारण तो अधिकारी पुन्हा कुठे तरी उपयोगी पडणार  असतो.

नवीन अधिकारी येतो परत त्याचे स्वागत होते, पुन्हा तेच. ही परंपरा मी गेल्या वीस वर्षांत पहात  आलो आहे. पण
शासकीय अधिकारी सेवानिवृत्त होतो आणि त्याचा मोठ्ठा कार्यक्रम होतो, त्याला कलेक्टर येतात, तालुक्यातील सर्व स्तरावरील लोक येतात, तलाठी, सर्कल, कोतवाल, पोलीस पाटील,  चळवळीवाले, आंदोलनवाले, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, पत्रकार सारे जण येतात, हे पहील्यादाच  पहायला मिळाले.


बी. एम. गायकवाड हे काय फार मोठ्ठे अधिकारी नाहीत, नायब तहसीलदार पद फार  उंचीचे नाही तरी पण लोक का आले याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांची काम करण्याची पद्धत हे उत्तर द्यावे लागेल. तहसीलदाराकडे जाण्यापुर्वी काम घेऊन नायब तहसीलदार कडे जातात.  तिथे काम झाले नाही, समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मग पुढे जातात.  पण कराडात गायकवाड साहेब  आल्या पासून असे झालेच नाही. आलेल्या प्रत्येक माणसाला बोला काय सेवा करू आपली, असे म्हणणारा नायब तहसीलदार बहुधा हे एकमेव असावेत . आता  हे वाक्य  कानावर पडल्यावर काम घेऊन आलेला सामान्य माणूस निम्मा थंड व्हायचा. मग त्याचे काम काय आहे,  येथे होणार आहे का, नसेल तर काय करावे लागेल, कोणाकडे जावे लागेल, कागदपत्रे कोणती अपुरी आहेत, ती कुठे मिळतील, किती दिवस लागतात,  आदी सर्व माहिती त्याला देऊन खुश करण्याची हातोटी गायकवाड यांच्या कडे होती.

तलाठी,  सर्कल किंवा गावपातळीवर अन्याय झालेला, रागाने लालबुंद माणुस इथे आल्यावर या बसा असे म्हणून पाणी प्यायला द्यायचे, वर चहा सांगायचा, ही माणसे थंड करण्याची त्याची पद्धत खरंच सर्व ऑफीसमध्ये काम करणारांसाठी अनुकरणीय आहे .

एखाद्या शासकीय अधिकारी बाबत कौतुकास्पद लिहायला मिळतंय हा पण सुखद अनुभव आहे. या कार्यक्रमात गायकवाड यांच्या पत्नीची एक समर्पित बाजू पहायला मिळाली आणि याच कारणामुळे मी आज हा ब्लॉग लिहायला घेतला.

एक वर्षापुर्वी बी एम गायकवाड यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याच्या वर  उपचार सुरू झाले. एक किडनी असेल तर मनुष्य जगू शकतो मात्र दोन्ही फेल झाल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. किडनी दात्यांचा शोध सुरू झाला. एकच रक्तगट  आणि इतर अनेक बाबी जुळायला लागतात. तपासणी दरम्यान त्याच्या पत्नीची किडनी मॅच होत असल्याचे लक्षात आले. पत्नीने तात्काळ होकार दिला,उगीच नाही तिला अर्धांगिनी म्हटलं जातं.  ऑपरेशन झालं, किडनी प्रत्यारोपण झालं. अतिशय किचकट ऑपरेशन असल्याने डाॅक्टरांनी त्यांना सहा महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

महीनाभर त्यांनी आराम केला. रोज सकाळी दहा ते रात्री दहा दरम्यान माणसे पहायचा,  त्याच्यासोबत बोलायचे, वादविवाद सोडवायचे , गोरगरीब निराधार लोकांना मदत करायची , त्याचे प्रश्न सोडवायचे या आणि याच कामात, लोकसेवेत 35 वर्षे कार्यरत असलेल्या  गायकवाड यांना आता घरात बसु वाटेना, करमेना. त्याना ऑफिसला जाण्याचे वेध लागले. दिड महिन्यानंतर गायकवाड साहेब पुन्हा कराड तहसीलदार कार्यालयात हजर झाले. कामाला सुरूवात केली. हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली, ते ठणठणीत बरे झाले. काम करणार्‍या माणसाला कामात व्यस्त असले तरच बरे वाटते. त्या वातावरणातच, छंदात, कामात असेल तर  तो प्रत्येक गोष्टीवर, संकटावर, अडचणीवर मात करू शकतो. हेच यातून सिद्ध होते.



या कार्यक्रमात मला बोलायची संधी मिळाली .
गायकवाड यांचा वरील अनुभवाला जोडून एक गोष्ट सांगितली.
ही गोष्ट मी महाविद्यालयीन काळात वाचली होती.



गोष्ट आहे एका लेखकाची

एक खुप मोठ्ठे प्रतिभावंत लेखक होते.  साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. मुंबईतील  एका चाळीत ते रहात होते. लोकसंपर्क आणि संवाद ही त्या लेखकाची जमेची बाजू होती.  त्याच्या नावावर चार पाच पुस्तके प्रसिद्ध झाली.  हळूहळू परिस्थिती पण सुधारली.  साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला.  पुरस्काराची मोठ्ठी रक्कम त्यांनी पत्नीकडे सुपुर्त केली. तुला जे हवं ते कर, तु साथ दिलीस म्हणुनच हे दिवस आले असे त्यांनी कृतज्ञतापुर्वक सांगितले.  पत्नीचे पतीवर खुप प्रेम होते.  आपल्या नवर्‍याने घेतलेले कष्ट, गाजवलेल्या रात्री याची तिला जाणीव होती.  चाळीतल्या घरात नवर्‍याला  एकांत मिळत नाही , दंगा असतो हे तिने पाहिले होते. त् एकांतपणा मिळाला तर नवरा आणखी लिहू शकेल, या उद्देशाने तिने उपनगराबाहेर एक जागा घेतली, टुमदार बंगला बांधला.  एक वर्षानंतर नवर्‍याच्या वाढदिनी तो बंगला त्याला गिफ्ट म्हणून दिला.

आता आपण या बंगल्यात राहू. तुम्ही निवांत बसून लिहा, पत्नीने लाडात येऊन सांगितले.
कुटुंब तिकडे रहायला गेले. महिना आनंदात गेला. पण त्या लेखकाला काही लिखाण करणे शक्‍य झाले नाही, तो कागद घेऊन बसायचा पण शब्द काय कागदावर  उतरत नव्हते. एकांत होता पण वातावरण नव्हते,  बुद्धीमत्ता होती मात्र बाहेर पडत नव्हती.  प्रतिभा खुप सारी होती पण  व्यक्त होत नव्हती.  त्या लेखकाला वेड लागण्याची वेळ आली.

त्याने पत्नीला विनंती केली,  आपण जुन्या घरात रहायला जाऊ या.  येथे एकांत  आहे पण त्याचा मला काही उपयोग नाही.  माझी पात्रे चाळीत राहणाऱ्या लोकांमध्ये  आहेत, लोकल ट्रेन मध्ये  आहेत, रस्त्यावर आहेत.
मी तिथेच राहीलो तर लिहू शकतो, असे त्यांनी पत्नीला सांगितले. पुन्हा ते जोडपे चाळीत रहायला गेलं.
या गोष्टीचा मतीतार्थ आणि शासकीय सेवेत काम करत असलेल्या गायकवाड यांच्या सारख्या  कार्यक्षम  अधिकारी, कर्मचारीचा अनुभव सारखा आहे . माणूस हा मनुष्य प्रिय प्राणी आहे,  असं म्हणतात. माणसात राहीला तरच त्याला माणुसकी पहायला, शिकायला आणि अनुभवायला मिळेल. बरोबर आहे ना !

सुज्ञ अर्धागिनींने बंगला दिला, आराम दिला. 
किडणी दिली , आयुष्य दिले
तरीही जीव वाचवला, 
खुलवला, वाढवला.......मनुष्य सोबतीनेच !


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...