फॉलोअर

मृदुला दाढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मृदुला दाढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८ जून २०२६

गाणे फक्त ऐकायचे नसते... ते गायकाच्या हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे फक्त ऐकायचे नसते... 
ते हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे ऐकणे म्हणजे केवळ सुरांचा आनंद घेणे नव्हे. त्या गाण्यामागचा संगीतकार कोण, गीतकार कोण, गायक-गायिका कोण, ते कोणत्या चित्रपटातील आहे, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा माझ्यामध्ये अगदी लहानपणापासून होती. याच इच्छेतून गाण्यांचे रसग्रहण करण्याचा छंद जडला.

महाविद्यालयीन काळात, अकरावी-बारावीमध्ये आम्ही मित्रमंडळी चित्रपट पाहायला जात असू. चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर चर्चा केवळ कथानकावर नसायची. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण, निर्माता कोण, संगीतकार कोण, गीतकार कोण, संपादक कोण, गायक-गायिका कोण, यावर आमच्या गप्पा रंगायच्या. चित्रपटातील सर्व गाणी पाठ करणे, त्यांच्या कॅसेट्स विकत आणणे आणि त्यावरील प्रत्येक माहिती वाचून काढणे हा आमचा छंदच बनला होता.
आमच्या पाच-सहा मित्रांच्या ग्रुपमध्ये गाण्यांच्या अशा मैफिली रंगायच्या. एकजण निर्माता सांगायचा, दुसरा संगीतकार, तिसरा गायक, चौथा गीतकार... अशा खेळकर पद्धतीने आमचे चित्रपट आणि संगीताविषयीचे ज्ञान वाढत गेले. गाण्यांतील भाव, वेदना, आनंद, चाली आणि शब्द यांचा नकळत अभ्यास होत गेला.

गाण्याची आवड वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षापासून मनात रुजत गेली आणि कालांतराने ती अधिक प्रगल्भ होत गेली. मात्र, गाणे नेमके कसे ऐकावे? प्रत्येक शब्दाचा भाव गायक कसा पोहोचवतो? संगीतकार त्या शब्दांना सूरांचे कोंदण कसे चढवतो? एखादा शब्द फेकताना त्यामागील भावना कशा जिवंत होतात? एखादा कणस्वर हृदयातून उमटून श्रोत्यांच्या मनापर्यंत कसा पोहोचतो? याची खरी जाणीव मात्र मला नव्हती.ही उणीव भरून काढण्याचे काम प्रसिद्ध गायिका आणि गीतविश्लेषक मृदुला दाढे यांनी केले. त्यांच्या 'अमर लता' या कार्यक्रमाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास तीन तास चाललेला हा कार्यक्रम म्हणजे स्वर, शब्द आणि भावनांचा अद्भुत संगम होता. यापूर्वी अनेक उत्कृष्ट गायक, वादक आणि संगीतकारांचे कार्यक्रम ऐकले होते. पण गाण्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून सांगत, त्या शब्दातील भाव स्वतःच्या आवाजातून जिवंत करण्याची कला प्रथमच इतक्या जवळून अनुभवायला मिळाली.
लता मंगेशकर या केवळ महान गायिका नव्हत्या, तर प्रत्येक शब्दाला आत्मा देणाऱ्या कलाकार होत्या. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर यांसारख्या महान गायकांनी शब्दांना जी उंची दिली, ती कशी निर्माण होते, हे मृदुला दाढे यांनी अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले.

माझा आवडता कलाकार अमिताभ बच्चन यांच्या 'त्रिशूल' चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले "मेरी बर्बादियों का अगर तू ज़िम्मेदार न हो..." हे गीत मी यापूर्वी अनेकदा ऐकले होते. त्याचा अर्थही माहिती होता. पण हेच गीत सादर करताना लतादीदींच्या कोमल आवाजात दडलेली आर्तता, संताप आणि वेदना मृदुला दाढे यांनी ज्या पद्धतीने उलगडून दाखवली, त्यामुळे त्या गाण्याचा नवा अर्थ माझ्यासमोर उभा राहिला.

आर. डी. बर्मन, मदन मोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या संगीतकारांनी आणि शैलेंद्र, आनंद बक्षी, साहिर लुधियानवी यांसारख्या गीतकारांनी शब्दांना दिलेले संगीत आणि त्या शब्दांना लता मंगेशकर यांनी दिलेला आत्मा याचा अप्रतिम प्रवास या कार्यक्रमातून अनुभवता आला.

मृदुला दाढे यांचा आवाज ही ईश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व जितके आकर्षक, त्याहून अधिक सुंदर त्यांचा स्वर आहे. सौंदर्य आणि स्वरसौंदर्य यांचा विलक्षण संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. त्यांच्या गायकीत केवळ सूर नाहीत, तर अभ्यास, संवेदनशीलता आणि गीताविषयीची अपार श्रद्धा आहे.

तीन तासांचा हा कार्यक्रम कधी संपला हेच कळले नाही. उलट, स्वरांचा हा प्रवास आणखी काही काळ सुरू राहावा, अशीच मनापासून इच्छा होत होती. कार्यक्रमातील एकही क्षण असा नव्हता की, मन दुसरीकडे भटकले. प्रत्येक गाणे, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विश्लेषण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडत होते.

कराडमध्ये गेली काही वर्षे अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी हे दाम्पत्य गीत स्वर संस्कार या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार संगीत कार्यक्रमांची अखंड परंपरा जपत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक भव्य आणि उत्कृष्ट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र यंदाचा अमृता दाढे यांचा 'अमर लता' हा कार्यक्रम सर्वार्थाने सर्वोत्तम ठरला.

हा कार्यक्रम केवळ गाण्यांचा नव्हता; तो संगीत समजून घेण्याचा, शब्दांच्या भावविश्वात डोकावण्याचा आणि लता मंगेशकर यांच्या गायकीचा आत्मा अनुभवण्याचा एक अद्वितीय प्रवास होता. या कार्यक्रमाने कराडच्या संगीतप्रेमींना एका वेगळ्याच सांगीतिक उंचीवर नेऊन ठेवले.

आजच्या धकाधकीच्या काळात अशी दर्जेदार सांगीतिक पर्वणी रसिकांसाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरते. कराडमध्ये अशा दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा जपणाऱ्या अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी या दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांनी उभारलेली स्वर संस्कार ही संस्था केवळ कार्यक्रमांचे आयोजन करत नाही, तर संगीत समजून घेणारे आणि त्यावर प्रेम करणारे रसिक घडवत आहे. अशीच स्वरांची अविस्मरणीय मैफल भविष्यातही कराडकरांना अनुभवायला मिळो, हीच मनापासून इच्छा.

सतीश मोरे सतिताभ 

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...