फॉलोअर

०९ जुलै २०२१

विजयनगर येथील गोशाळेत.

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
९ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज निसर्गवारी थोडी उशिरा सुरू झाली,याचं कारण आमचं वाहन हायवेजवळ आल्यानंतर पंक्चर झाले. मात्र पाच मिनिटात माउलींनी व्यवस्था केली. हायवेवरच्या एका पंपाशेजारी पंक्चर काढून त्यानंतर साडेसहाच्या दरम्यान आम्ही वारुंजी फाटा येथे पोहोचलो. तेथे वाहन ईसुझी एका हॉटेलसमोर उभे केले. आमच्या विसाव्याच्या ठिकाणी वाहन पोहोच करण्यासाठीची व्यवस्था करुन आम्ही तिथून चालावयास सुरुवात केली.
आमची वारी होती विजयनगर येथील गोशाळेत.वारुंजी फाट्यावरून आम्ही चालायला सुरुवात केल्यानंतर नुकताच तयार झालेला राष्ट्रीय महामार्ग १६९ ई आमच्यासाठी खुला होता, मोकळा होता. वाहनांची संख्या कमी होती. हरिपाठ करत करत आम्ही शासकीय शेती महाविद्यालयासाठी पोहचलो. या ठिकाणी आमच्या आठवणीसाठी एक फोटो काढताना जणूकाही आम्ही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत काय असा फिल आमच्यातल्या काही जणांना आला. पुढे विजयनगर गाव जवळच होते गावात प्रवेश केला. प्रवेशद्वाराजवळच सुनील पाटील आमची वाट पाहत होते. त्यांचे जवळचा एक सहकारी आज कोव्हिडमुळे मरण पावल्यामुळे ते आमच्यासोबत सहभागी होणार नव्हते त्यांची भेट घेऊन आम्ही पुढे चालू लागलो.
विजयनगर या गावाविषयी आजच्या या वारीमध्ये मी आपणास सविस्तर माहिती सांगणार आहे. या गावात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही महाकाली मंदिराचे जाऊन देवीचे दर्शन घेतले. या गावात अनेकदा आलो मात्र मंदिरात जाण्याचा योग आला नव्हता.बाहेरूनच या मंदिराची भव्यता नेत्र सुखावत होती. आज प्रत्यक्ष आम्ही सर्वजण या मंदिरात प्रवेश केल्यानंतर खुप आनंद झाला. कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेले हे गाव स्थलांतरित होऊन दोन-तीन ठिकाणी विस्थापित झाले. यापैकी महत्त्वाचा भाग म्हणजे विजयनगर. १९५९ साली कोयना धरणाच्या कामासाठी गोजेगाव सहित कोयनानगर खोऱ्यातील अनेक गावे शासनाने ताब्यात घेतली. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक अनेक गावे होती. धरणासाठी हे सर्व क्षेत्र संपादित केल्यानंतर ही गावे इथून बाहेर काढण्यात आली. पुनर्वसनाच्या कायद्यानुसार त्यांचे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन झाले. गोजेगाव हे गाव कराड जवळील मुंडे गावाजवळ तसेच चिंचणी अंबक, राममळा आणि नवी मुंबईतील काही परिसरात विस्थापित करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांना या विस्थापित झालेल्या नवीन गावात जमिनी देण्यात आल्या.
१९५९ मध्ये गोजेगाव कराड तालुक्यात आल्यानंतर १९८५ अखेर मुंडे ग्रामपंचायत अधिपत्याखाली या गावाचे कामकाज सुरू होते. गोजेगावसह सहा गावाची मुलकी पाटीलकी असणारे जमीनदार राघोजी बहिरू पाटील यांनी कराड जवळील मुंडे या गावात येण्याचा निर्णय घेतला. (स्व. राघोजी पाटील हे माजी आमदार आनंदराव पाटील यांचे वडील आहेत) राघोजी पाटील यांना रामचंद्र, जयराम, आनंदराव, विश्वासराव, वसंतराव आणि दिलिप ही सहा मुले आणि दोन मुली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राघोजी पाटील यांची ३६५ एकर जमीन गेली. एवढी जमीन कोयना धरणाच्या निर्मितीसाठी देणारे राघोजी पाटील यांच्या कार्याला खरंच सलाम करावासा वाटतो.
राघोजी पाटील यांचा लाकडाचा व्यवसाय होता. मालकीचे दोन ट्रक होते. या निमित्ताने कराडचा संबंध आणि येणेजाणे होतेच. कराडात मुंडे येथे आल्यानंतर नवीन गाव व ग्रामस्थासोबत जुळवून घेतले. गोजेगावच्या शेतकऱ्यांना मुंडे गायरान तसेच वन विभागाची जमीन देण्यात आली. कोयना विभागाच्या अगदी वेगळी नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊन कामाला सुरुवात केली. अगोदरच विस्थापित झालेल्या या गोजेगावाला पुन्हा एकदा १९८० मध्ये विस्थापित होण्याची वेळ आली. वीज कंपनीच्या (MSEB) ४०० केव्ही आणि २२० केव्ही अशा दोन वेगवेगळ्या भव्य सबस्टेशनसाठी या गावातील जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय सरकारने घेतला.कोयना धरणासाठी जमीन सोडून या गावाकडे आलो, मात्र येथील जमीन पुन्हा वीज कंपनीसाठी जाणार हे कळल्यावर ग्रामस्थ नाराज झाले. मात्र त्या वेळचे जिल्हाधिकारी व्ही.पी. राजा यांनी ग्रामस्थांची बाजू घेतली. ( त्याकाळात धरणग्रस्तांची बाजू घेणारे जिल्हाधिकारी होते हे किती मोठे भाग्य !) युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व इंटक वीज या कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पाटील आणि तत्कालीन जिल्हा परिषद शेती सभापती जगन्नाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभी राहिली. या संघटनेने बाजू मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विस्थापित गावाची जमीन तुम्ही पुन्हा घेऊ शकत नाही, असे वीज कंपनीला ठणकाऊन सांगितले. शेवटी तडजोडीचा मार्ग निघाला आणि मुंडे आणि विजयनगर या दोन्ही गावातील ज्या लोकांची जमीन या वीज केंद्रासाठी जात आहे त्या कुटुंबांतील एकाला एमएसईबी मध्ये नोकरीला घ्यायचा अटीवर ही जमीन सबस्टेशनला देण्यात आली. मात्र एकत्र कुटुंबातील प्रत्येक भावाच्या एका मुलाला वीज कंपनीमध्ये कामावर घ्यावेच लागेल असा आग्रह आनंदराव पाटील यांच्यासह सर्वानी धरला. वीज कंपनीने ही मागणी मान्य केली. सरासरी घरटी एक जण नोकरीला लागला आणि त्या ठिकाणी वीज केंद्र उभे राहिले. या सब स्टेशन मध्ये कोयनानगर होऊन आलेले वीज आणली जाते आणि ही वीज महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यात पुरवली जाते.
मुंडे ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असलेल्या गोजेगाव या ग्रामस्थांनी 1985 झाली स्वतंत्र ग्रामपंचायत मागितली. राघोजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली याला मंजुरी मिळाली. स्वतंत्र झालेल्या गावाला विजयनगर हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज कंपनीच्या शेजारी कोयना धरणातील विस्थापित गाव म्हणून विजयनगर हे नामकरण करण्यात आले. १९८६ ते १९९६ दहा वर्षे या गावाचे सरपंच म्हणून आनंदराव पाटील यांनी काम पाहिले. त्यानंतरच्या काळात त्यांचे बंधू वसंतराव पाटील,पुतणे सुनील पाटील या गावचे सरपंच होते. या गावाने अनेक शासकीय पातळीवरील अभियानात भाग घेऊन पुरस्कार मिळालेले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात स्वच्छता अभियान, निर्मल ग्रामसहित अनेक उपक्रम राबवले गेले. नियोजनबद्ध असलेल्या गावात आपण कधीही भेट दिली तर स्वच्छता स्वच्छता दिसते.
स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने आनंदराव पाटील यांनी लोकवर्गणीतून ग्रामदैवत महाकाली मंदिर उभे केले आहे. या मंदिरात महाकालीसह जानाईदेवी, चंडीकादेवी, केदारनाथ, तुळाईदेवी, झोळाईदेवी मुर्ती स्थापित करण्यातआल्या आहेत. मंदिरासमोर तत्कालीन खासदार प्रेमलाताई चव्हाण यांच्या फंडातून 1987 झाली अतिशय भव्यदिव्य सभामंडप उभारला आहे. तर सभागृहातील सुशोभीकरण आणि परिसर पेविंग ब्लॉक आदी कामे आ. आनंदराव पाटील यांनी यांच्या फंडातून पूर्ण झाली आहेत. या हॉलमधे एकाच वेळी पाचशे लोक बसू शकतात इतकी चांगली सोय आहे. प्रत्येक वर्षी या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा या महाकाली मंदिरात आम्ही काही काळ विसावा घेतला देवीचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो.
*विजयनगर या गावाविषयी अलीकडच्या पिढीला खूप कमी माहिती आहे, या गावात जाण्याचा योग निसर्गवारीच्या निमित्ताने आल्यानंतर मुद्दामहून या गावाची माहिती आणि या ग्रामस्थांचा त्याग जनतेला कळावा म्हणून ही सर्व माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे.*
कोयना धरणाच्या निर्मितीसाठी अनेकांनी योगदान दिलेले आहे, अनेकजण आपली घरे जशीच्या तशी आहे तिथे सोडून ते दुसर्या गावात विस्थापित झाले आहेत. राघोजी पाटील यांच्यासारखी महान दानशूर व्यक्ती ३६५ एकर जमीन देतात, बदल्यात तुटपुंजा मोबदला आणि १६ एकर जमीन घेतात, त्याग करतात तेव्हाच कोयना धरणासारखा महान प्रकल्प उभा राहू शकतो. राज्यभरात अनेक प्रकल्प उभे राहत आहेत मात्र त्या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जातात त्यांचे पुनर्वसन करणे आज देखील शासनाला जमलेले नाही, हे दुर्दैव आहे. कोयना धरण पुनर्वसन धरणग्रस्तांच्या समस्या आजही तशाच आहेत.
विजयनगर सारख्या गावाने मिळेल तेवढी शासकीय मदत घेऊन कराडजवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्या काळात जमिनी कमी मिळाल्या. मात्र शहराजवळ राहून हे गाव आहे अतिशय प्रगत झाले आहे. या गावातील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित आहेत. मोठ्या पदावर काम करत आहेत.
या गावातून बाहेर पडत आम्ही आमच्या विसाव्याच्या ठिकाणी गोशाळेकडे निघालो. आनंदराव पाटील यांचे धाकटे बंधू वसंतराव पाटील (भाऊदा) यांनी काही वर्षांपूर्वी स्वतःच्या जागेत सामाजिक बांधिलकीतून गोशाळा सुरू केली आहे. डोंगराच्या पायथ्याशी सहा एकर क्षेत्रात गोशाळा आहे. सुरुवातीचे काही काळात 50 हून अधिक गाई होत्या,गोप्रेमीकडून या शाळेला मदत केली जात होती. भाऊदा या गोशाळेसाठी पूर्णवेळ काम करत असतात. वनौषधी करणे, गोमुत्रापासून वेगवेगळे घटक तयार करण्यापासून शेणाच्या वस्तू तयार करण्यासाठी तेथे कार्यरत असतात. आनंदराव पाटील यांचे थोरले बंधू रामचंद्र पाटील (दादा) हे जुन्या काळातील आयुर्वेद तज्ञ होते. कोयना भागात त्यांनी अनेक वर्षे रुग्णसेवा केली, नाडी परीक्षणामध्ये त्यांचा हातखंडा होता. कोणत्याही प्रकारच्या जर्जर आजारावर ते आयुर्वेदिक औषध देत. आयुष्यभर त्यांनी विनामोबदला रुग्णांची सेवा केली.अतिशय त्यागाने त्यांनी हे व्रत जपले होते. गोशाळेमध्ये त्यांचा हा वारसा आता वसंतराव पाटील चालवत आहेत.
गोशाळेत एक ध्यान मंदिर तयार करण्यात आले आहे. या परिसरात मी यापूर्वी तीन वेळा जाऊन आलो आहे. मध्यंतरी दोन दिवस या गोशाळेत मुक्काम केला आहे. गोशाळेपासून जवळच डोंगरावर पांडवकालीन लेणी आहेत तसेच जवळच डोंगरावर जानाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परिसरातील अनेक गावांचे श्रद्धास्थान आहे. गोशाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. सध्या सहा गाई असून गाईंच्या सेवेसाठी वसंतराव पाटील व त्यांचा स्टाफ कार्यरत असतो.
कराडपासून जवळच एक छोटीशी ट्रीप करण्यासाठी हे अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. गोशाळा परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उंच डोंगरावरील घनदाट वृक्षारोपण आणि मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या. घनदाट अशा झाडीतूनच आपण ह्या गोशाळेकडे आपल्याला जावे लागते. डोंगरावर असलेले वृक्षसंपदा आणि अन्न असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर पक्षी आहेत. मध्यंतरी मी येथे ५० हून अधिक मोर एकाच वेळी पाहिले होते. दिवसभर या परिसरात मोरांचा आवाज ऐकू येत असतो.मोरांना या गोशाळेत खुला प्रवेश असतो. मोरांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी खोल भांडे ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. मोरांच्या सान्निध्यात गोशाळा, पांडवकालीन लेणी आणि जानाईदेवी मंदिर अशी एक छोटीशी एक दिवशी ट्रिप येथे होऊ शकते.
या ही जागा याअगोदर पाहिल्यानंतरच या ठिकाणी निसर्ग वारीत झाडे लावावीत असा संकल्प केला होता आणि आज तर प्रत्यक्षात उतरला. वसंतराव पाटील भाऊदा यांच्या हस्ते निसर्ग वारकर्यांनी याठिकाणी पाच झाडे लावली. याकामी वैभव जाधव आणि मेजर या दोन सहकार्याने खूप कष्ट घेतले. आमचे या ठिकाणी स्वागत झाले ते औषधी काढा पिऊन. या ठिकाणी तयार होत असलेल्या औषधे वनस्पती बरोबरच चहाचा काढा खूप प्रसिद्ध आहे. चहा पिल्यानंतर आम्ही ताजेतवाने झालो. निरोप घेतला आणि आम्ही या निसर्गरम्य वातावरणातून घराकडे परतलो.
आजच्या निसर्गरम्य वारीमध्ये निसर्गरम्य वातावरण तर होतेच शिवाय पुनर्वसित गावाचा इतिहास ऐकायला मिळाला. गोशाळेत जाऊन झाडे लावण्याचा आनंद मिळाला. त्यामुळे आजची वारी खूप आनंददायी झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...