फॉलोअर

घाटमाथा कोयना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घाटमाथा कोयना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०६ जुलै २०२६

कोयना घाटमाथा पावसातल्या साम्राज्यातील अविस्मरणीय प्रवास


कराड ते घाटमाथा... पावसाच्या साम्राज्यातला एक अविस्मरणीय प्रवास
पावसाळा सुरू झाला की माझे पाय आपसूकच कोयनानगरकडे वळतात. प्रत्येक वर्षी किमान एक-दोन वेळा तरी कोयनानगरला जाणे हा माझ्यासाठी एक आनंदसोहळाच असतो. कधी पुढारीच्या बातमीच्या निमित्ताने, कधी निसर्ग अनुभवण्यासाठी, तर कधी मनावरील ताण झटकण्यासाठी. कारण कोयना धरण आणि त्याचा परिसर म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण. येथे घालवलेला एक दिवस मनाला नवसंजीवनी देऊन जातो.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला होता. रविवारी सकाळी अचानक मित्रांसोबत कोयनानगरला जाण्याचा बेत ठरला. माझे मित्र सतीश पाटील, जितेंद्र डुबल आणि मी असा आमचा छोटासा प्रवासाचा चमू तयार झाला. मात्र सगळ्यांच्या वेळा जुळवता जुळवता कराडमधून निघायला दुपारचा एक वाजला.

गाडी चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. कराड सोडताना पाऊस हलकासा होता; पण तांबव्याच्या पुढे गेल्यावर त्याने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. मुसळधार पाऊस, कारच्या काचांवरून झरझर वाहणारे थेंब आणि आवडीची गाणी... अशा वातावरणात गाडी चालवण्याचा आनंद शब्दांत मांडता येत नाही. मला पावसात ड्राइव्ह करायला नेहमीच आवडते. बाहेर कोसळणारा पाऊस आणि आत सुरू असलेली गाणी... यापेक्षा सुंदर संगत दुसरी कोणती असू शकते?

विहेघाट, मळ्हारपेठ, नव्या रस्त्याने आम्ही पाटणला पोहोचलो. पाटणची बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती. नव्या सिमेंट रस्त्यामुळे पूर्वीसारखी वाहतूक कोंडी जाणवत नव्हती. तेथे गाडी बाजूला लावून आम्ही मंडईत गेलो आणि ताजे मासे विकत घेतले. हे मासे कोयनानगरमध्ये एका हॉटेलमध्ये शिजवण्यासाठी देण्याचा आमचा आधीच बेत होता.

पाटण ते कोयनानगरचा रस्ता आता अतिशय चांगला झाला आहे. मध्ये दोन-तीन ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने थोडा वेळ लागतो; पण जेसीबी, सुरक्षा कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी सतत कार्यरत असल्याने फारशी अडचण जाणवत नाही. हा कालचा अनुभव होता.

कोयनानगरमध्ये पोहोचल्यावर एसटी स्टँडजवळील एका हॉटेलमध्ये मासे शिजवण्यासाठी दिले आणि आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. कोयना एसटी स्टँड परिसरात प्रचंड गर्दी होती. धुवांधार पावसात पुलावर उभे राहून धरणातून बाहेर पडणाऱ्या कोयना नदीचे विशाल पात्र पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन बराच वेळ आम्ही त्या दृश्यात हरवून गेलो.

यावेळी नेहमीप्रमाणे नवजा धबधबा किंवा कोयना गार्डनला न जाता घाटमाथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोयनानगर ते घाटमाथा हा पूर्वी खराब असलेला रस्ता आता अतिशय उत्तम झाला आहे. नागमोडी वळणे, धुक्याची चादर आणि मुसळधार पाऊस... प्रत्येक वळण नवा निसर्गदृश्यांचा देखावा उलगडत होते.

घाटमाथ्याच्या अलीकडे असलेल्या छोट्या धबधब्यांजवळ आम्ही थांबलो. गरमागरम कणीस खात धबधब्यांचा आवाज ऐकण्यातही एक वेगळीच मजा असते. पुढे घाटमाथ्यावर पोहोचलो. सातारा जिल्हा संपून रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते त्या ठिकाणी पूर्वी असलेले हॉटेल आता बंद झाले आहे. तेथे तैनात असलेल्या पोलिसांशी काही गप्पा मारल्या आणि मग कुंभारली घाटाच्या दिशेने पुढे निघालो.

हा निर्णय त्या दिवसातील सर्वात सुंदर निर्णय ठरला. घाट उतरताना अवघ्या दोन-तीन किलोमीटरच्या अंतरात असंख्य धबधबे रस्त्याच्या कडेला कोसळताना दिसत होते. काही धबधबे तर इतके जवळ होते की हात पुढे केला तरी त्यांचे पाणी अंगावर उडत होते. सुरक्षित जागी गाडी थांबवून आम्ही एका धबधब्याजवळ गेलो. मनसोक्त भिजलो, त्या निर्मळ पाण्याचा आस्वाद घेतला, भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. त्या क्षणी वेळ, काम, जबाबदाऱ्या... सगळे काही विसरून गेलो होतो.

परत घाटमाथ्यावर येऊन 'हनुमान हॉटेल'मध्ये थांबलो. एका मावशींना गरमागरम कांद्याच्या भजींची ऑर्डर दिली. बाहेर मुसळधार पाऊस, समोर धुक्यात हरवलेला कुंभारली घाट आणि हातात गरमागरम चहा व भजी... अशा क्षणांसाठीच माणूस पुन्हा पुन्हा निसर्गाकडे धावत असतो.

त्या धुक्यात हरवलेल्या घाटाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. काही क्षण मन इतके भरून आले की नकळत काही कविता जन्माला आल्या. काही भावना शब्दांत उतरल्या.

सायंकाळी पुन्हा कोयनानगरला परतलो. हॉटेलमध्ये आमचे मासे आणि जेवण तयार होते. दिवसभराच्या भटकंतीनंतर त्या ताज्या माशांच्या जेवणाची चव अविस्मरणीय होती. रात्री आठच्या सुमारास कोयनानगरमधून परतीचा प्रवास सुरू केला आणि सावधपणे, पावसातून मार्ग काढत साडेनऊच्या सुमारास कराडला पोहोचलो.

कोयना धरण, नवजा धबधबा, कोयना गार्डन आणि विश्रामगृह या ठिकाणी मी अनेकदा गेलो आहे. पण यावेळी कराड ते घाटमाथा हा अवघा सत्तर किलोमीटरचा प्रवास मनात कायमचा घर करून गेला. घाटमाथ्यावरून पाहिलेला मुसळधार पाऊस, धुक्यात हरवलेले डोंगर, धबधब्यांची अखंड गाणी आणि मित्रांसोबत घालवलेले काही तास... आयुष्यभर आठवणीत राहतील.

या संपूर्ण प्रवासात निसर्गाइतकाच आनंद आमच्या गप्पांमध्येही होता. आमच्या तिघांच्या सहलीचा एक अलिखित नियम आहे. आम्ही तिघेही करवडी गावचे असल्यामुळे गावातील विषय काढायचा नाही, राजकारणावर बोलायचे नाही, कोणाची टीका-टिप्पणी करायची नाही. प्रवास हा केवळ आनंदासाठी असतो, हीच आमची भूमिका.
म्हणून आमच्या गप्पांचा विषय असतो तो आयुष्य, मैत्री, जुन्या आठवणी, आवडती गाणी, चित्रपट, नवीन पाहिलेली ठिकाणे, वाचलेली पुस्तके, कधी एखादा विनोद, तर कधी एखादा जीवनानुभव. या गप्पांमधून मन मोकळं होतं, हसू उमलतं आणि प्रवास आणखी सुंदर बनतो.

खरं तर प्रत्येक सहलीत आम्ही निसर्गाइतकाच आनंद एकमेकांच्या सहवासात शोधत असतो. मोबाईल, राजकारण आणि दैनंदिन ताणतणाव यापासून काही तास दूर राहून फक्त त्या क्षणात जगायचं... हीच आमच्या मैत्रीची खरी ताकद आहे. म्हणूनच प्रत्येक कोयनानगरची सहल आमच्यासाठी केवळ पर्यटन राहत नाही, तर ती आयुष्याला नव्याने जगण्याची ऊर्जा देणारी एक सुंदर आठवण बनून जाते.

काही प्रवास हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात; ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी असतात. कराड ते घाटमाथा हा प्रवास माझ्यासाठी तसाच ठरला.

सतीश मोरे सतिताभ 

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...