फॉलोअर

०६ जुलै २०२१

अंधारवाडीला

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
6 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
आज आमची निसर्ग वारी निघाली अंधारवाडीला. नाव जरी नकारात्मक असलं तरी या गावात खूप सकारात्मक आहे, गावकरी खुप प्रेमळ आहेत.गावाला मोठा इतिहास आहे. त्या गावात जाण्यासाठी कराडला सगळे जमलो. सव्वा सहा वाजता उंब्रज येथे पोहचलो.निसर्ग वारीचे खास शिलेदार रणजीत पाटील यांना थोडेसे तब्येत बरं नसल्यामुळे ते येऊ शकले नव्हते. मात्र त्यांनी गाडी घेऊन अभिजित सूर्यवंशी यांना आमच्या सोबत पाठवले होते.
सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आम्ही अंधारवाडीच्या दिशेने उंब्रज येथून चालायला सुरुवात केली. उंब्रज ते अंधारवाडी हे अंतर तीन किलोमीटर आहे,सकाळच्या प्रसन्न वेळेत उंब्रजचे अनेक नागरिक, युवक पुरुष माॅर्निंग वाॅकसाठी या रस्त्यावर होते. रस्त्यावरून चालणारांची संख्या खूप होती.या रस्त्यावरून अंधारवाडी पर्यंत रोज चालत जाणारे खूप लोक आहेत. या लोकांना आम्ही नवीन दिसत होते, त्यामुळे लोक आमच्याकडे उत्सुकतेने पाहत होते.आमचा हरिपाठ सुरू होता. साडेसहा वाजता आम्ही अंधारवाडीत पोहोचलो फक्त तीन किलोमीटर अंतर चालून झाले होते. त्यामुळे आम्ही आणखीन गावाच्या पुढे जाण्याचा निर्णय घेतला. गावाच्या बाहेर एक वाघजाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात आपण नक्कीच जायचे असा आम्ही निर्णय घेतला.
अंधारवाडीच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर आनंदपुर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे असा मोठा फलक पाहिला. या गावाने काही वर्षापूर्वी आनंदपुर असे नामकरण केले आहे. या कमानीतून आम्ही आत आलो, या गावात आम्ही सकाळ सकाळी पोहोचल्यामुळे या गावातील सुखद चित्र आम्हाला पाहावयला मिळाले. खेडेगावातील अनेक पद्धती,रुढी, सवयी अजूनही संपलेल्या नाहीत. गावागावात बंगले उभे राहिले तरीपण ग्रामीण जीवन हे अजूनही ग्रामीण आहे.आम्ही गावातून पुढे जात होतो तेव्हा हे सर्व ग्रामीण चित्र पाहावयास मिळाले. घराबाहेर चुलीवर पाणी तापवण्यासाठी महिला मंडळी बसल्या होत्या. चौकात काहीजण हातावर तंबाखू मिसरी घेऊन दात घासत होते, गोठ्यामध्ये कोणी शेण काढत होते तर काढलेले शेण टाकण्यासाठी कुणी डोक्यावर पाटी घेतली होती. गोठ्यात धार काढायची लगबग सुरू होती. शेतातून वैरण घेणारे काही लोक पाहायला मिळाले तर काहीजण शेतात जाताना आम्हाला भेटले. गावातील हनुमान मंदिर चौक पाठीमागे सोडून आम्ही पुढे आलो. महालक्ष्मी मंदिरा शेजारीच एक वडाचे प्राचीन झाड आहे. या झाडा विषयी पुढे सांगेन.
खेडेगावातील लाइफ खरच वेगळ असतं, आम्ही या गावातून पुढे जात होतो तेव्हा मला माझ्या करवडी गावातील काही गोष्टी सहज आठवल्या. सकाळी उठल्यानंतर चुलीवर पाणी तापवायचे, त्यासाठी आदल्या दिवशी पालापाचोळा आणून ठेवायचा.विहिरीवरून पाणी आणायचे, पुढे गावात नळ आल्यानंतर नळाला नंबर लावण्यासाठी घागरी ठेवायच्या, असा तो नित्यक्रम असायचा. अंधारवाडीत सुद्धा हे दृष्य पाहिल्यानंतर करवडीची आठवण नाही आली तर नवल !
गावाच्या बाहेर शेताच्या रस्त्याने निघालो. येथून पुढे वाघजाईदेवी मंदीराकडे जाणारा रस्ता होता. या रस्त्यावर पुन्हा ग्रामीण शेती दर्शन पाहून खूप आनंद झाला.ग्रामीण अशा जुन्या पद्धतीची घरे, दारात असलेला गोठा,पडवी ! घरासमोर बांधलेली पशु संपत्ती, शेतात खळखळणारे पाणी हे सर्व आनंदी दृष्य खुप दिवसानंतर पाहायला मिळाले. यादरम्यान पंडित भीमसेन जोशी यांचे भक्ती संगीत ऐकत होतो, सुरुवातीला ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्व कृपा करी त्यानंतर तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल आणि पुढे याचसाठी केला होता अट्टाहास, ही तीन भक्तीगीते ऐकत ऐकत आम्ही वाघजाई मंदिराजवळ आलो.
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले वाघजाई मंदिर अतिशय सुंदर आहे.हे मंदिर पाहून आमचा थकवा निघून गेला. मंदिराला चारी बाजूने तटबंदी आहे,झाडी आहे .बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ जाऊन हात पाय धुतले आणि मंदिरात प्रवेश केला. आत पुजाऱ्यांची गडबड सुरू होती पूजेचे साहित्य जुळवाजुळव सुरू होती.आम्ही मंदिरात गेल्यानंतर आज मंगळवार आहे आणि आणि देवीच्या वारा दिवशी आम्ही आज मंदिरात आलो, याचा आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या सोबत असलेल्या ग्रामस्थांनी आम्हाला या मंदिराची माहिती सांगितली. खूप जुने असे हे मंदिर असून ही नवसाला पावणारी देवी आहे, या देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते अशी माहिती आम्हाला मिळाली. देवीची पूजा होईपर्यंत आम्ही मंदिरात बसलो. त्यानंतर मनोभावे दर्शन घेऊन बाहेर पडलो.
यादरम्यान सागर बर्वे आणि जगन पुरोहित, भुषण पाटील, बंडा भस्मे अंधारवाडी गावात पोचले आहेत, असा फोन आला.आम्ही परत गावाकडे निघालो. गावाच्या वेशीच्या अलीकडेच सागर बर्गे मित्रांसमवेत आले होते. आज सागर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी आमच्या वारीमध्ये एक दिवस सहभागी होण्याचा, त्याच्या वतीने एक झाड देण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व मित्रमंडळी समवेत आम्ही आम्ही गावात येऊ लागलो.
मगाशी आमच्या नजरेतून सुटलेला एक भाग म्हणजे या गावाच्या बाहेर असणारा आड. खूप वर्षापासून नंतर कार्यरत असलेला एक आड पहिला. अनेक गावात आजही आड आहेत पण ते बंद पडलेले आहेत. अनेक ठिकाणी तर या आडांमध्ये कचरा टाकण्यात येतो, काही ठिकाणी आड म्हणजे अडगळीची जागा झाली आहे. अंधारवाडीच्या या आडातून एक व्यक्ती पाणी बाहेर काढत होता. आडातून पाणी बाहेर काढण्याचा प्रसंग आजच्या पिढीला खरच माहीत नसेल, माहीत नसणार. प्रत्येक गावागावात अशा प्रकारचे आड आहेत पूर्वी अशा आडातून पाणी काढायचे, डोक्यावर कळशी घेऊन पाणी घरी न्यायची पद्धत होती. या आडातून पाणी काढताना व्यायाम होत असे आणि पाण्याची कळशी घरी नेईपर्यंत जे कष्ट व्हायचे तो एक वेगळा व्यायाम व्हायचा. त्या आडा जवळ जाण्याचा मोह मला आवरला नाही आणि सर्वांनी आडातून पाणी काढले. हात पाय धुतले आणि पुढे आलो.
प्राथमिक शाळेमध्ये गावचे सरपंच धोंडीराम बर्गे आणि त्याचे सर्व सहकारी आमची वाट पहात होते. पुढारीचे उंब्रजचे प्रतिनिधी सुरेश सूर्यवंशी सकाळीच आम्हाला येऊन मिळाले होते, त्यांनी पुढे जाऊन या शाळेजवळ झाडे लावण्या साठीची सर्व तयारी सरपंचांच्या मदतीने केली होती. अंधारवाडी प्राथमिक शाळेची स्थापना 1938 सालची आहे, या शाळेच्या समोर मैदानावर काढलेल्या एका खड्ड्यात सागर बर्गे यांच्या हस्ते आणि सरपंच बर्गे यांच्या उपस्थितीत एक झाड लावण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच आणि ग्रामस्थांनी आम्हा सर्व जणांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
सरपंचाशी गप्पा मारताना मिळालेल्या माहितीनुसार या गावाचा इतिहास फार जुना आहे. वाघजाई मंदिरापासून खंडोबाची पाली येथे जाण्यासाठी शिवकालीन जुना रस्ता आहे. या रस्त्यावरून संताजी धनाजी यांची फौज आणि संताजी-धनाजी गेलेले आहेत. संताजी धनाजी यांनी या गावात मुक्काम केला आहे आणि त्यांच्या नावाने गावात इनाम जमीन आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. अंधारवाडी हे नाव का पडले असे असा प्रश्न आम्हास पडला याबाबतची आख्यायिका गावातून आम्हाला ऐकायला मिळाली. गावाच्या बाहेर अनेक वडाची झाडे होती. ही वडाची झाडे अतिशय महाकाय अशी होती. या झाडाच्या पारंब्या लांबपर्यंत पोहोचलेल्या होत्या. अशा या झाडांची दाट गडद सावली पडत असे. ही सावली पडल्यानंतर दिवसासुद्धा या परिसरात अंधार व्हायचा आणि त्यामुळे या भागात जायला लोक घाबरायचे. अंधार आणि वड त्यावरून पुढे या गावाचे नाव अंधारवाडी पडले, अशी माहिती आम्हाला मिळाली. या महाकाय वडापैकी आता फक्त एकच वडाचे झाड शिल्लक आहे. त्या झाडाचा फोटो काढून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
दोन दिवसापूर्वी वडोली निळेश्वर येथे आम्ही एक झाड लावले होते, या गावातील निळेश्वर माध्यमिक विद्यालयांमध्ये वडाची पाच झाडे लावावीत असा आम्ही संकल्प केला होता. त्यानुसार आम्ही मुख्याध्यापक सचिन नलावडे आणि शिक्षक सुधीर पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यादिवशी ते शक्य न झाल्यामुळे आज पुन्हा एकदा वडोली निळेश्वर गावी आम्ही पोहचलो. निळेश्वर माध्यमिक विद्यालय तथा ज्ञानप्रसारक शिक्षण मंडळाचे संस्थापक सुनिल संकपाळ नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. संकपाळ भाऊ यानी नवी मुंबई ऐरोली येथे 1998 साली शिक्षण संस्थेची स्थापना केली, नवी मुंबई येथे त्यांचे फार मोठे हायस्कूल आहे. यास हायस्कूलमध्ये ते नोकरीला होते त्यांचे मूळ गाव म्होप्रे आहे. साकुर्डी आणि नावडी या दोन ठिकाणी या अगोदर माध्यमिक विद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता मात्र राजकीय कारणांमुळे त्या ठिकाणी हायस्कूल सुरू होऊ शकले नाही. मात्र संकपाळ यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांना वडोलि निळेश्वर येथे हायस्कूल करण्यासाठी सुरु करण्यासाठी योग्य दिशा मिळाली आणि 1999 मध्ये हे हायस्कूल सुरू झाले. सुरुवातीला हायस्कूल छोट्याशा जागेत खाजगी जागेत होते मात्र सकपाळ भाऊ यांचे प्रयत्न, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी निळेश्वर माध्यमिक विद्यालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. ही इमारत आणि या शाळेचा परिसर निसर्गरम्य आहे, ही शाळा पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शाळाचे मुख्याध्यापक येथे येतात.
संकपाळ सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला होता. माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांना पन्हाळा टेकडीवर ही शाळा आहे, असा भास झाला, इतकं सुंदर वातावरण या शाळेच्या परिसरात आहे. टेकडीवरील या शाळेतून समोर भव्य सदाशिवगड अतिशय सुंदर दिसतो. करवडी, पार्ले, बनवली, विरवडे हजारमाची, कोपर्डे हवेली ही गावे पण दिसतात. शाळेच्या प्रांगणात संकपाळ सरांच्या उपस्थितीत आम्ही वडाची झाडे लावली.
संकपाळ सरांनी आमच्या निसर्ग वारीची सविस्तर माहिती घेतली आणि निसर्गवारीसाठी पाच हजार रुपये किमतीची वडाची झाडे दान करण्याचा इरादा बोलून दाखवला , त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्याध्यापक सचिन नलवडे यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या. आम्ही धन्य झालो आमचा संकल्प 221 झाडे लावण्याचा आहे. गेल्या पाच-सहा दिवसात आमच्याकडे 100 झाडे जमा झाली आहेत.आम्हाला अजून एकशे एकवीस झाडांची गरज होती, आम्ही कुणालाही कळवले नव्हते किंवा कुणालाही झाडे मागितली नव्हती. मात्र आज वडोलि निळेश्वर मध्ये सकपाळ सरांच्या रूपाने माउलींनी आम्हाला काही झाडे मिळतील अशी तरतूद करून ठेवली होती. खरंच माउलीचा महिमा फार महान आहे.
ईश्वर चराचरामध्ये बसलेला आहे, प्रत्येक झाडांमध्ये एक विठ्ठल आहे. आळंदी ते पंढरपूर या 221 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण एका किलोमीटर मागे एक झाड लावले तर पंढरीच्या वारीला गेल्याचा आनंद मिळेल आणि या कल्पनेतूनच मी आणि रणजीत पाटील यांनी ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला आमच्या वारी ग्रुपचे विजय वाटेगावकर यांनी पाठिंबा दिला होता. आपल्याला काही कमी पडणार नाही कमी पडेल तिथं आपण आहोतच, असे रणजीत पाटील आणि वाटेगावकर मला बोलले होते. माऊलींनी आमच्यासाठी, आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला हवे असलेली झाडे मिळण्याची व्यवस्था केलेली आहे . परवा खळे येथील एका व्यक्तीने दोन झाडे आमच्या पुढारी ऑफिसमध्ये आणून दिली आहेत, सोमवार पेठेतील एका व्यक्तीने एक झाड देण्याचे मान्य केले आहे. डॉक्टर डी जे जोशी यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 75 झाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणालाही काहीही न मागता माउलींनी आमच्या वृक्ष लागवड चळवळीसाठी शेकडो हात पाठवून दिले आहेत. खरंच माउलीचा महिमा फार मोठा आहे
आज आमच्या निसर्ग वारीने आम्हाला माणसातील विठ्ठलाचे दर्शन घडवले, विठ्ठलरूपी अनेक लोक भेटले,यापेक्षा अधिक काय हवं आणि लिहिणे!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
Ashok Mohane, Mahesh Patil and 73 others
7 comments
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...