निसर्गवारी*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
आनंदाचे डोही आनंद तरंग
१९ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज आम्ही धन्य झालो.आज पंढरपूरला पोहोचलो.आमची निसर्ग वारी आज पूर्ण झाली. आज आमच्यासाठी पंढरपूर होतं कराड वाखान.या रस्त्याला असणारे शिंदे बंधूनी बांधलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे आमचे पंढरी होती.आमच्यासाठी हा दिवस अतिशय आनंदाचा असा होता. गेली 18 दिवस आम्ही पायी वारी केली, त्याचा आज समारोप होणार होता.
सकाळीच साडेसहा वाजता चालावयास सुरुवात करून जरा पुढे आल्यानंतर वाकाण रस्त्याला रस्त्याकडेला विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. सव्वा सातच्या दरम्यान टेंभू धरणाच्या अलीकडे असणाऱ्या अंबाबाई मंदिर मध्ये जाऊन पोहचलो. पावसाची रिमझिम चालू होती.अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर संदीप सूर्यवंशी यांनी आमच्यासाठी नाश्त्याची सोय केली होती, उपीट आणले होते. याचा नैवेद्य देवीला दाखवला. त्यातला काही भाग देवीच्या समोर दारातच ठेवला आणि काय काय आश्चर्य पाचच मिनिटात तिथे चिमण्या आल्या. त्यांनी तो प्रसाद खाल्ला मंदिरासमोर असलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्ल्यांना आम्ही थोडा प्रसाद खाऊ घातला. हे दोन प्राणीमात्र जणू काही विठ्ठल रुक्मिणीच्या रुपात प्रसाद खाण्यासाठी आले होते ,अशी आमची भावना झाली. आम्ही धन्य धन्य झालो आणि परत निघालो येताना गुरुप्रसाद पाटील यांच्या हॉटेल समोर पुढे जाऊन नदी काठाला असणाऱ्या सागर मोहन पाटील यांच्या शेतात तीन झाडे लावली आणि रणजित पाटील यांच्या घरी परत आलो.
रणजीत पाटील यांच्या माऊली आईनीं आणि दोन्ही वाहिनींनी आमचे औक्षण करून स्वागत केले. हे स्वागत आमच्यातील वारकऱ्याचे होते. पंढरपूरला आमची वारी झाली नाही मात्र कराड तालुका परिसरात गेली 18 दिवस आम्ही वारी केली,या वारकऱ्यांचे स्वागत होते. या स्वागतानंतर रणजीत पाटील यांच्या घरात जाऊन आम्ही निसर्ग वारी परिवारावतीने त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.
अकरा वाजता पोलीस संकुल परिसरात परिसरात पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी आर पाटील, साहेब पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या उपस्थितीत अकरा झाडे लावली. ही सर्व 11 झाडे 22 पोलीस कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतली आहेत. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील यांच्या निवासस्थानी दोन झाडे लावली. ही झाडे लावताना रणजीत पाटील यांचे वडील आणि दोन वर्षाचा छोटा मुलगा युवराज आणि छोटी कन्याही उपस्थित होती. तीन पिढ्यांच्या उपस्थितीत उपाधिक्षक रणजीत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेलं वृक्षारोपण आमच्या तरी आठवणीत राहीलच पण त्यांच्या घरातील सर्वांच्या लक्षात नक्की राहील. वारकरी संप्रदायाचा वारसा असणारे बी. आर.पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्हा वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या या कार्यक्रमानंतर गोडावून परिसरात कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत आम्ही सहा झाडे लावली. गोडावून परिसरातील सर्व हमाल माऊलींनी या झाडांची जबाबदारी घेतली असून ही झाडे आम्ही जगवणारच असा संकल्प तहसिलदारांच्या उपस्थित केला. त्यानंतर गोळेश्वर गावच्या गोळोबा मंदिरा परिसरात मी तीन वडाची झाडे लावली. या सर्व कार्यक्रमास लोकशाही आघाडीचे युवा नेते सौरभ पाटील उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता कराड नगरपालिका कचरा डेपो परिसरात (खरं तर याला आता बाग म्हटली पाहिजे) मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी रिचर्ड यानथन, ह. भ. प. दादा महाराज तुळसणकर यांच्या उपस्थितीत 50 वडाची झाडे लावली.निसर्गवारी उपक्रम अंतर्गत आज आम्ही 75 झाडे लावली.
या उपक्रमा बरोबरच रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रणजीत पाटील यांच्या वतीने आज जखिनवाडी येथे 40 तर मैदान परिसरात 50 झाडे लावण्यात आली.आज दिवसभरात कार्यक्रम इतका बिझी शेड्युल मध्ये झाला की आज मी जास्त लिहू शकत नाही. मात्र गेल्या 18 दिवसात निसर्ग वारी उपक्रमांतर्गत आम्ही केलेला संकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे. उद्या आषाढी एकादशीनिमित्त उर्वरित 100 झाडे लावण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.
आळंदी ते पंढरपूर वारी अंतर 221 किलोमीटर आणि या वारीला जाता आले नाही म्हणून 221 वडाची व इतर झाडे लावायचे केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी तुम्हा सर्व माऊलींचे आशीर्वाद फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे हीच माऊली चरणी प्रार्थना.
आज सकाळी वारी प्रवास करताना संत तुकाराम महाराजांचा एक अभंग मला आठवणीत आला, हा अभंग माझ्या अतिशय आवडीचा आहे. अकरावीच्या पुस्तकात हा अभंग आम्हाला होता त्यावेळी प्राध्यापिका लता पाटील यांनी हा अभंग आम्हाला वारकरी संप्रदायाचे सरळ,सोप्या भाषेत शिकवला होता 'भेटी लागे जीवा लागलीसी आस' हा अभंग ब्लूटूथ स्पीकरवर मोठ्या आवाजात ऐकताना या संपूर्ण अभंगाचे निरुपण करायची माझी इच्छा झाली. खरंच विठ्ठल दर्शनाची आस आम्हाला लागलेली आहे, हे दर्शन दोनशे एकवीस वडाच्या झाडाच्या रूपातून आम्हाला होत आहे, होणार आहे!
राम कृष्ण हरी!
जय जय विठ्ठल !
जय हरी विठ्ठल !
*सतीश मोरे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा