भक्तीमार्गातून समाज घडतो : अॅड. उदयसिंह पाटील
वारकरी सांप्रदाय आपल्या संस्कृतीचे वैभव: सौरभ पाटील
समाजाच्या जडणघडणीत वारकरी सांप्रदायाचे योगदान खूप मोठे आहे. भक्तीमार्गातून समाज घडतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले.
दै. पुढारी कराड कार्यालयाचे प्रमुख सतीश मोरे यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करून वारीचे उत्कृष्ठ लेखण केल्याबद्दल कराड कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अॅड. पाटील बोलत होते.
कार्यक्रमास आदरणीय पी. डी. पाटील सह्याद्री बॅकेचे युवा नेते सौरभ पाटील, कराड बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील पोतलेकर, प्रा. संभाजी शेवाळे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव थोरात, राजू जाधव, अजिंक्य पतसंस्थेचे संचालक अशोक माने, खरात माऊली, लोहार माऊली, संदीप पाटील, जॉन्टी थोरात यांच्यासह कराड कार्यालयातील अमोल चव्हाण, प्रतिभा राजे, चंद्रजित पाटील, महेश पाटील, अर्जुन काटवटे, ,गणेश पाटील, विशाल देशमुख, धनाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस या प्रमाणे वारकरी सांप्रदायात अनेक संतांनी विचारांचे कळस रचण्याचे काम केले आहे. वारीत अमुलाग्र बदल झाले आहेत. वारीत सहभागी वारकऱ्यांची संख्याही प्रतिवर्षी वाढत आहे. यामधील युवकांचा सहभाग आत्मिक समाधान देणारा आहे. सतीश मोरे यांनी वारीचे केलेले वृतांकन समाजासाठी अत्यंत महत्वाचे असून वारीचे अनुभव पुस्तकरूपात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सौरभ पाटील म्हणाले, वारकरी सांप्रदाय हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. संत तुकाराम, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्र , संत नामदेव यांचे समाजासाठीचे योगदान खूप मोठे आहे. या संतांनी उच्च शिक्षण घेतले नाही पण त्यांच्या विचारापुढे नतमस्तक व्हावे असे त्यांचे विचार महान आहेत. सर्व जाती- धर्माला सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय आहे. कर्मकांडाला संतांनी नेहमीच विरोध केला म्हणून त्यांचे छळही झाले पण आज त्यांच्याच विचारांची गावोगावी पारायणे होत आहेत. सतीश मोरे यांनी वारी लिखानातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. हे लिखान समाजातील तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी ते पुस्तकरूपात प्रकाशीत व्हावे.
अशोकराव पाटील- पोतलेकर म्हणाले, सतीश मोरे यांचे अनेक पैलू मी पाहिले आहेत. आज ते ज्या पदावर आहेत त्यामागे त्यांनी केलेले प्रामाणिक काम आणि घेतलेले कष्ट महत्वाचे आहेत. भविष्यातही त्यांच्या हातून समाजाप्रति याच पध्दतीने काम व्हावे, अशी अपेक्षा आहे.
प्रा. संभाजी शेवाळे म्हणाले, वारीत वारकऱ्यांबरोबर उन्हा, पावसात चालत राहून वारीचे वृतांकन करणे खूप कठीण काम आहे, पण सतीश मोरे यांनी ते लिलया पेलले आहे. त्यांच्या "माझी वारी' या वारी वृतांकनामुळे प्रत्यक्ष वारी अनुभवता आली.
यावेळी सतीश मोरे यांनी वारीतील अनुभव विस्ताराने सांगितले. वारीत पावला पावलावर वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांमध्ये मला विठ्ठलाचे दर्शन झाले. वारी ही माणसाला सकारात्मक उर्जा देते याची प्रचिती वारीत भर पावसात चालताना आल्याचे त्यांनी सांगितले.
वैभव पाटील, बालीश थोरात, दिलीप धर्मे, अर्जुन काटवटे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक मोहने यांनी सूत्रसंचालन केले.
विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजू पाटील यांनी आभार मानले.