निर्मल माऊली सोहळा शक्य आहे !
अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी, जगाला वेड लावणारी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारी तरीही कोणालाही जात न विचारणारी , कोणालाही निमंत्रण न देता लाखोंच्या संख्येने एकत्र येणाऱ्या वारकर्याची पंढरीची वारी आणि ज्ञानेश्रर महाराज पालखी सोहळा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी काही निवडक हात पुढे आले आहेत. या हाताच्या सकारात्मक प्रयत्नाला फार मोठ्ठे यश आले आहे. वारी निर्मल होऊ शकते, अवघड काही नाही. गरज आहे फक्त माऊलीवर प्रेम करणार्या हातांची ! तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात वारकर्य्च्या सेवेवेसाठी खुप काही करता, आता फक्त निर्मल वारी साठी आपले हात रिकामे करा. स्वच्छ भारत सुंदर भारतचाच एक भाग म्हणून आपली वारी सुंदर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्था, दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले तर हे शक्य आहे, होय 2018 चा निर्मल सोहळा शक्य आहे.
माऊली पालखी सोहळा किती मोठ्ठा, भव्य, अप्रतिम, शिस्तबद्ध असतो याविषयी लिहील तेवढं थोडंच आहे. माऊली प्रेमी वाचक, वारकरी, भाविक हे सर्व जाणतातच ! माऊली सोहळ्याचे वेड अवघ्या महाराष्ट्राला तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भागाला शेकडो वर्षापासून लागलेले आहेच. गेल्या 1990 पर्यंत सोहळ्यात सहभागी काही हजारची संख्या 2000 मध्ये लाखावर पोहोचली. त्यानंतर काळात 2 लाख पुढे 3 , 4 ,5 लाखावर वारकरी यामध्ये सहभागी होऊ लागले. पुर्वी फार कमी प्रमाणात दखल घेणारे विचारवंत, प्रसिद्धी माध्यमे तसेच सरकारी यंत्रणा आता माऊली सोहळ्यात पुर्ण वेळ सहभागी होत आहेत. माऊलीच्या प्रेमाने सर्वांना वेड लावलेले असताना अवघ्या जगाचं लक्ष या सोहळ्याचे लागलेले आहे. परदेशी पर्यटक सुद्धा वारीत सहभागी होत आहेत. अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलीनी शेकडो वर्षे पुर्वी मांडली होती. ती आज सत्यात येताना दिसत आहे.
जगात वारकरी हा एकमेव संप्रदाय असेल जिथे कोणालाही जात विचारली जात नाही. ज्ञानाची कवाडे सर्वाना खुले करणारा हा एकमेव संप्रदाय असेल. त्यामुळेच केवळ याच संप्रदायात सर्व जाती धर्माचे संत होऊन गेले. तरीही त्याना कोणत्याही चौकटीत अडकवून ठेवले गेले नाही. यामुळेच निवृत्ती ज्ञानदेव , सोपान ,मुक्ताबाई एकनाथ नामदेव , तुकाराम यांच्या वारकरी संप्रदायाचे सार्याला वेड लागले आहे. सोहळा फार मोठ्ठा होत आहे. एकाच वेळी, एकाच दिशेने, एकाच देवाच्या विठ्ठलाच्या ध्यासाने, येवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन , सलग सतरा आठरा दिवस चालणारा हा जगातील एकमेव धार्मिक कार्यक्रम आहे. ही भारतीयाच्या दृष्टीने अअभिमानाची गोष्ट आहे. या सोहळ्याची दखल घ्यायला महाराष्ट्र आणि भारत सरकारने खुप वेळ घेतला आहे. म्हणूनच देहू आळंदी ते पंढरपूर मार्गाचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी मार्ग असे नामकरण करून हा मार्ग चौपदरीकरण करणे सुरू आहे. ही जमेची बाजू आहेच शिवाय वारी मार्ग स्वच्छ, सुंदर आणि निर्मल होण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षांत सकारात्मक पाऊले उचलली गेली आहेत.
वारीत सहभागी होणाऱ्या 4 ते 5 लाख वारकरी माऊलीसाठी सर्वात मोठा प्रश्न शौचालयाला कुठे जायचे हा असतो. माऊली सोहळ्यात वारकरी सुमारे 240 किमी अंतर चालत पार पाडतात. पहाटे तीन वाजता त्याचा दिवस सुरू होतो. उठल्यावर नैसर्गिक विधी अत्यावश्यक व न टाळता येणारा असतो. एकवेळ जेवण नाही मिळाले तर वारकरी सांभाळून घेतात मात्र नैसर्गिक विधीचा प्रश्न गंभीर असतो. पालखी तळावर , परिसरात एक लाखभर लोक राहतात. मुक्काम ठिकाणाहून पुढे तीन ते सहा किलोमीटर अंतरावर रस्त्याकडेला तंबू उभारून किंवा मिळेल त्या जागेवर सुमारे तीन लाख वारकरी मुक्कामी असतात. या सर्व लोकांची उठण्याची वेळ पहाटे 2 ते 4 अशी आहे. सुमारे चार लाख लोकांसाठी शौचालयांची सोय करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. मात्र तरीही पहाटे ऊठून लगेच मार्गक्रमण करणारे वारकरी साठी गावाबाहेर शौचालय युनिट उभारणे शक्य आहे. गेल्या दोन वर्षांत विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय सवयंसेवक संघ तसेच राज्य सरकारच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुमारे दहा हजार फिरते युनिट उभे करण्यात आले आहेत. त्याला वारकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. स्वयंसेवक, कार्यकर्ते पहाटे रस्त्यावर उभे राहून वारकरीना अडवतात, हात जोडतात. माऊली, सर्व सोय आहे, पाणी पण भरपूर आहे, बादली पण आहे, अशी विनंती करून शौचालय युनिट मध्येच जा असा आग्रह धरत आहेत. खरंच या कार्याला सलाम केला पाहिजे,
पंढरपूर, वाखरी येथे तर कायमस्वरूपी अनेक शौचालय उभी करण्यात आली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागा नदी परिसरात उघड्यावर शौचालयास बसणे गुन्हा दाखल केला जातो.
केवळ दहा हजार फिरते शौचालय युनिट बसवून निर्मल वारी साठी काहीनी पाऊल उचलले आहे. अजून किमान 30000 हजार युनिटची गरज आहे. या कामासाठी मोठ्या निधीची गरज लागणार आहे. वारकरी सेवेसाठी हजारो हात पुढे येतात, हे लोक गरज नसेल तिथेही फार खर्च करतात. मोफत वस्तू वाटप करतात. चांगल्या हेतूने कलेले दान योग्य कामी लागत नाही, अनेक ठिकाणी अन्नाची नासाडी झालेले वारीत सर्रास दिसून येते. पालखी तळ परिसर तसेच रस्त्यावर शिळे अन्न, भाजी, चपाती पडलेल्या दिसतात. फक्त अन्नदान केले तरच फार मोठे पुण्य मिळते असा (गैर) समज झाल्याने सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच मंडळे, ग्रामस्थ यावर खर्च करतात. त्याऐवजी या लोकांनी वारी मार्गावरील गावांना शौचालय युनिट दान केली तर मोठ्या परिणाम होणार आहे, वारकरी माऊलीची सोय होऊन वारकरी आशिर्वाद देतील, पुण्य पदरी पडू शकेल. निर्मल वारी, निर्मल पालखी मार्ग करणे अवघड, अशक्य नाही. यासाठी सहकार्याची गरज आहे. कोणाही वारकर्याची उघड्यावर शौचालयास बसण्याची इच्छा नसते, पण सोय नसती आणि ही गोष्ट टाळणे अशक्य असल्याने तो दुसरा मार्ग स्वीकारतो. पालखी सोहळा गावातून गेल्यावर त्या गावात साथीचे रोग पसरतात, अनेक लोक आजारी पडतात. हे आपण थांबवू शकतो.
चौकट
सोहळा भारतातच का?
एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मिक सोहळा भारताबाहेर एखाद्या प्रगत देशात का होत नाही? याचे कारण आणि उत्तर कधी आपण शोधले आहे का ? हे विश्वचि माझे घर, आता विश्वात्मके देवे असा विचार करणारा भारत हा एकमेव देश आहे. शेकडो वर्षे पुर्वी माऊलीनी हे पसायदान मागीतले आहे. त्यामुळे हा सोहळा भारतातच होऊ शकतो याचा विचार करून स्वच्छ आणि सुंदर वारी संकल्पना सत्यात उतरण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे इतर देशात हा सोहळा असता तर त्या देशाने 230 किमी अंतराचा महामार्ग कधीच विकसित केला असता. कायमस्वरूपी स्वच्छता सुविधा देऊन ही वारी जगाच्या नकाशावर नेऊन ठेवली असती, आता हे काम आपण करू शकतो. सरकारची जबाबदारी सरकार पुर्ण करेल आपण शौचालय युनिट साठी सढळ हाताने मदत केली पाहिजे.