या माऊली आवाजाच्या दिशेने या !
वारकर्आयाला कर्षित करण्यासाठी अनेक क्लुप्त्या
नातेपुते : सतीश मोरे
माऊलींच्या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. रोज सकाळी तीन वाजता वारकरी बाहेर पडतात. काही सकाळी सात वाजता पालखी सोबत निघतात. सायंकाळी सात पर्यंत वारकरी मुक्कामाला पोहचतात. या दरम्यान कुणाला काही कमी पडत नाही. सारे काही मिळत राहते. आणखी काही हवे असेल तर त्यासाठी सुमारे पन्नास सेवा पैसे देऊन उपलब्ध आहेत. लाखो वारक्याना कॅच करण्यासाठी रस्त्याकडेला असणाऱ्या दुकानदारानी अनेक फंडे काढले आहेत. या माऊली आवाजाच्या दिशेने या ही कॅसेट पुर्ण वारीत काही क्षण का होईना थांबायला, ऐकायला भाग पाडत आहे.
वारीत गेल्या काही वर्षांत वारकरी संख्या वाढत आहे. पंधरा वर्षे पुर्वी एक लाख असणारा वारकरी चार पाच लाखावर जाऊन पोहचला आहे. वारीत सर्व प्रकारचे लोक सहभागी होतात. येथे गर्भ श्रीमंत पण आहेत,सामान्य माणूस आहे, गरीब आहे, अतिगरीब पण आहे.
वारीत सर्वाना समान वागणूक दिली जाते, कोणी लहान मोठा असत नाही. वारीतील प्रत्येकजण येताना घरातून साहित्य आणतो . बाडबिस्तारा सोबत असतोच . तरीही त्याला अनेक अत्यावश्यक सेवेची, वस्तूची, खाद्य पदार्थाची गरज असतेच . लाखो वारकर्यांची गरज ओळखून अनेक व्यावसायिक, दुकानदार, कंपन्या मार्केटिंग साठी वारीत उतरल्या आहेत.
वारकरी माऊलींना आवश्यक असलेली पन्नास एक प्रकारची छोटी मोठी दुकाने, हातगाडे, स्टाॅल, पालखी सोहळा मार्गावर थाटली आहेत. चहा, रस, वजन, खेळणी, टोपी, प्लॅस्टीक कागद, पाकीट, तंबाखू पान बिडी , छत्री, तुळशी माळा, जडीबुटी, मलम, ज्युस, शेगा, पाणी बाटली, वडा पाव , कपडे, बिल्ला,फळे, चपला, केस दाढी, इस्त्री, पायाचे मिडकॅप, बॅटरी, बॅग, सोडा पाणी, आईस्क्रीम, धार्मिक पुस्तके, अडकित्ता, चपला तसेच बॅग दुरूस्ती , मोबाईल चार्ज सेंटर अशी दुकाने रस्त्याकडेला, मुक्काम ठिकाणी थाटली आहेत. या सर्व गोष्टींची गरज लागतेच. पण ती घ्यायला प्रवृत्त करण्यासाठी नव नवीन क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत.
चालणारा वारकरी चहा प्यायला दिवसात दोन तीन वेळा थांबतोच. वारीत चहा पान ससेवा देणारी सागर, विठाई हे स्टाॅल दहा ते पंधरा वर्षे येत आहेत. माऊली या, दमला असाल, बसा कडक चहा, अशा गोड भाषेत चहाबाले बोलवतात. रस प्यायला वारकरी आलाच पाहिजे अशी दमदार जाहीरात ज्ञानाई, विठाई, शिवशंकर, शिवयोगी या रसवंती गृह मालकांनी केली आहे. इकडे कुपन घ्या, तिकडे रस घ्या. आलं बघ, आलं बघ थंडगार रस. ताजा उस हाय. आलं, बर्फ लिंबू पण हाय, अशी जाहिरात दिवसभर कानावर पडत राहते. दर दोन तीन किलोमीटर अंतरावर ही दुकाने आहेतच.
वारकर्रायाचा दिवस अंधारात सुरू होतो. अंधारात शौचाला जायला त्याला प्रकाश हवा असतो असतो. त्यासाठी कमी पैशात बॅटरी उपलब्ध आहे. या माऊली, आवाजाच्या दिशेने या. कंपनीचा माल आहे. 30,50 आणि 100 रूपयात बॅटरी आहे. आणि ती बी सेल टाकून, अशी जाहिरात बॅटरी घ्यायला भाग पाडतेच. खिशात ठेवायचे पाकीट खरं तर सामान्य वारकरीला गरजेचे नसते. मात्र दहा रूपयात पाकीट, त्यात आठ प्रकारची कार्ड बसतात. अहो काय येतेय दहा रूपयात. या पाकीटात पाणी जात नाही, या आवाजाच्या दिशेने या, अशी भुलवणारी ऑडीओ जाहिरात दहा रूपये बाहेर काढायला लावते.
महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. तीन वडे, दोन पाव फक्त दहा रूपये, असा आवाज ऐकून वारकरी तिकडे जातोच. खोकला येतो, पाय दुखतोय, अपचन झालंय, या आवाजाच्या दिशेने, आम्ही तपासूनच औषध देतो, औषध टाकून प्रत्यक्ष अनुभव दिला जातो, अशी जडी बुटी वैद्याची टिपिकल आवाजातील जाहीरात आकर्षित करते. जाहीरात कौशल्यामुळे ग्राहक येतो, चौकशी करतो, लगेच नाही घेतले तर पुढच्या मुक्कामाला घेतोच, त्यामुळे वारीत धंदा बक्कळ होतोच, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा