दिनांक 12 जुलै
भंडीशेगाव सतीश मोरे
पंढरीची पायी वारी सुरू होऊन आज 15 दिवस झाले, वारीचा आता अंतिम टप्प्या आहे. पंढरी 32 किलोमीटर अंतरावर आहे. विठ्ठल दर्शन तीन दिवसावर आलं आहे. आज 16 किलोमीटर चालायच, उद्या 8 आणि परवा 6 किलोमीटर, आली पंढरी. ही चर्चा सुरू असतानाच काल झोप लागली होती. पहाटे दिड वाजता बापूंनी उठवले. मी म्हणालो, अहो दिड वाजले आहेत, आज जवळचा टप्पा आहे, झोपा. सारे पुन्हा झोपले. अडीच वाजता काही जण जागे झाले, सर्वाना उठवले. वळकटी ट्रकात नेऊन ठेवल्या. ब्रश केला. सारे बाहेर पडलो. गेली चार दिवस पालखी तळावर भाजपायुमो, प्रशासन, संघाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी वारकरी लोकांना शौचालय युनिट उपलब्ध करून दिले आहेत. उघड्यावर जाऊ नका, पालखी तळावर अमुक ठिकाणी युनिट ठेवले आहेत, मोफत उपलब्ध आहे, भरपूर पाणी आहे असे आवाहन स्पिकर वर केले जात होते. गत वर्षीचा अनुभव आणि यंदाचा विचार करता काही प्रमाणात का होईना निर्मल वारीने एक पाऊल पुढे पडले आहे. सकाळी या अतिशय अत्यावश्यक कामासाठी केलेल्या सुविधांचा लाभ वारकरी घेत होते, हा बदल स्वागतार्ह आहे.
सव्वा तीन वाजता चालायला सुरुवात केली. नेहमी प्रमाणे खुप गर्दी होती. पहाटे अंधारात चालताना फक्त पुढे बघायचे, पुढच्याचे चालणे अनुकरण करत पुढे चला, माऊली, माऊली म्हणा, चालत रहा, येवढेच करायचे असते. ज्याला पुढे जायचे त्यानी उजव्या बाजूने माऊली माऊली म्हणत जायचे, वाहनाची लाईन त्याच बाजूला असते, थोडी रिस्क असते, पण काही अडचण येत नाही. वारी हे पुर्व संचित आहे, असे म्हणतात, आम्ही खरंच नशीबवान आहे, वारी करायला मिळाली, त्यामुळे या सर्व अडचणी, अडथळे वर मात करत चालत आहे. आजपर्यंत कोणतीही अडचण आली नाही. खुप आनंद लुटत आम्ही चालत राहिलो.
तोंडले आणि बोंडले अशी दोन गावे रस्त्याचे विरूद्ध बाजुला आहेत. इथेच माऊली पालखी दुपारचा भोजन विसावा असतो, येथेच तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखी जवळून जातात. या ठिकाणी सकाळी सहा वाजता पोहचलो. खुप कंटाळलो होतो, त्यात बारीक पाऊस झाल्याने रस्ता घसरट झाला होता, एक माऊली पडली होती. थोडे थांबायचे ठरवले.
बोंडले गावातील एका दुकानासमोर कागद अंथरले. पडलो. सात वाजता जागे झाले सारे. ईपुढारी ओपन केला, सारे जण माझेजवळ आले. पाऊस आणि पुराच्या बातम्या पाहिल्या. कोयना धरण भरेल यंदा नक्की, कराड पुलावरून पाणी जाणार. .... हे होणार, ते होणार सुरू झाले. चहा घेऊन पुढे चालू लागलो.
खरं तर आज आमच्या दिंडीत चकुल्या मेनू होता. पण त्यासाठी आकरा वाजेपर्यंत थांबायला लागले असते. अजून चार तास होते. सर्व संमतीने पुढे चालत रहायचा निर्णय घेतला. एक दोन किलोमीटर चाललो, कडेला कुठे पाणी दिसते काय याचा सारेच शोध घेत होते, पाणी असायचे पण गर्दी खुप असायची, किंवा गर्दी कमी होती पण पाणी कमी होते. पंढरपूर तालुक्याचे या भागात पाणी दुर्भिक्ष होते. कुठेही पाणी व्यवस्था नव्हती. ज्याची विहीर आहे, तिथे खुप कमी पाणी होते. पुढे सोय होईल , माऊली करतील काहीतरी, असा विश्वास होता, चालत राहिलो. चढाला महाराष्ट्र शासन पीडब्लुडी विभागाचे चार टॅकर ओळीत उभे होते. एकातले पाणी कमी होते, तर तीन जागी महिलाची स्नान करण्यासाठी गर्दी होती. चला पुढे म्हणालो, एव्हाना साडे आठ वाजले होते, भुकेची जाणीव झाली. पुण्यातील आमदार श्रीमती
माधुरीताई मिसाळ यांच्या वतीने पिठलं भात जेवणाचीसोय केली होती. पळसाच्या पानाच्या पत्रावळी वर गरमागरम भात पिठलं घेऊन मस्त नाश्ता केला. पोट भरलं. आमचे काही मित्रांनी पेठ वडगावच्या माऊली अन्नछत्र मंडळाने तुपातला शिरा पण घेतला. पुढे निघालो. चालत राहिलो. रस्त्याकडेला आंघोळीसाठी गर्दी दिसली. आता काही झाले तरी तिथे जायचेच, असे म्हणून उतरलो खाली. खुप गर्दी होती, तरीही घुसलो, उंच पाईप लावली होती, बोअर होती. पाणी कमी जास्त होत होते, गडबडीत स्नान केले, तयार झालो, गंध लावला, निघालो.
बारा वाजता भंडीशेगाव येथे पोहचलो. कपडे वाळत टाकली. लिंबाच्या झाडाखाली पडलो . तीन पर्यंत आराम केला. झाडाखालच्या राष्ट्रीय गप्पा मारत बसलो. चार वाजता आमची वाहने आली, तंबू उभारणे सुरू झाले. दरम्यान टॅबवर काम केले . मोबाईल बॅटरी उतरली होती, चार्ज करण्यासाठी बाहेर पडलो. मोबाईल चार्ज सेंटर वारीत उपलब्ध आहेत. पुढे पानपट्टी मागे चार्ज सेंटर होते, सोबत काही सहकारी पण होते. मोबाईल लावून तिथेच बसायला लागते, त्यामुळे तिथेच ठाण मांडले. दरम्यान त्याची माहिती घेतली, टॅबवर वारी सुरू केली. परत जाताना एका आवाजाकडे लक्ष वेधले.
तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत सोलापूर पोलीसाचे किर्तन कलापथक होते. सहाय्यक फौजदार विठ्ठल माने यांचे ऑन ड्युटी किर्तन झाले. खुप लोक जमले होते. अतिशय सुंदर विवेचन करताना बायकोवर दादागिरी नको, व्यसने करू नका,गुरू नाही त्याचे जीवन गुरासारखे, पण गुरू करताना काळजी घ्या, असे आवाहन केले. भिंतीवरचा विषारी विंचू पाल खाते, तीच अतिविषारी पाल जमीनीवर आली की कोंबडी खाते मग त्या कोंबडींचे तगडे ओढून खाणारा माणुस किती विषारी ? असा प्रश्न उपस्थित केला. 7350014801 हा मोबाईल नंबर देताना मी किर्तनकार पोलीस आहे, पाकीटमार महाराज नाही, तुमच्या गावात बोलवा , प्रवास खर्च दिला तरी चालेल ,नाही दिला तर चालेल, असे सांगून वाढदिवस, पुण्यतिथी दिनी एक झाड लावा , असे आवाहन त्यांनी केले. पोलीस काॅन्स्टेबल रमेश ठोंबरे ,रविकिरण माने,सुरेश कांबळे ,रमेश सुरनर यांनी त्यांना साथ दिली.
सात वाजता पालखी आली. आज पुन्हा समाज आरती अनुभवली.
उद्या पुढारीत समाज आरती याविषयी वाचा.
आरती नंतर तळावर सेना कराड तालुका प्रमुख माझे गाववाले विनायक भोसले आणि नितिश जाधव नाना सैदापूरकर यांची भेट झाली. सोबत प्रमोद खंडागळे आणि अमित पवार होते. दुपारी फोन करून त्यानी कळवले होते. तळावर फोन लागत नाही, पण फोन लावायला काढला आणि विनायक समोर! दोघांना भेटून खुप आनंद झाला. त्याना आमच्या तंबूत नेले, सर्व दाखवले. गप्पा मारल्या. जाधव यांनी माझी वारी रोज वाचतो असे मला आवर्जून सांगितले. आज बंडा तात्याचा मुक्काम इथेच होता. आठ वाजता तात्या जेवताना दिसले ,पुन्हा जाऊन भेटू म्हटले तर सव्वा नऊ वाजता ते एका छोट्या झाडाच्या बुंध्याला झोपले होते. खरंच तात्या फार मोठी विभुती आहेत, वारीत पदोपदी याचा अनुभव आला.
नऊ वाजता जेवलो. आजची वारी पूर्ण केली.
दिवसभर खुप आनंद मिळाला.
- सतीश मोरे 9881191302
माऊली माऊली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा