पाऊस वाढला अन् वारकर्याचा उत्साह पण
जेजुरी : सतीश मोरे
पंढरीच्या वारीत रविवारी वारकरी भक्ती रसासोबत पावसात पण न्हाऊन निघाले. सासवड ते जेजुरी दरम्यान सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. मोकळ्या समाजातील लाखो वारकरी पुढच्या टप्प्यावर पोहचण्यासाठी सकाळी लवकर निघतात. वारकरी आणि पाऊस यांच्यात जणू वेगाची स्पर्धा लागली होती. दिवसभर हा खेळ सुरू होता. दोघेही जोशात होते. माऊलींच्या नामाचा महीमा आणि राम कृष्ण हरी या मंत्राच्या ताकदीसमोर अखेर पर्जन्यराजा हरला, माऊली जिंकली.
सासवडला दोन दिवस मुक्काम करून सुखावलेले वारकरी रविवारी सकाळी लवकर उठून जेजुरीला जायला निघाले. सासवड जेजुरी अंतर 19 किलोमीटर आहे. अंतर कमी असल्याने माऊली पालखी सोहळ्यात सहभागी सुमारे 250 दिंड्या उशिरा निघणार होत्या . सोहळ्यात सहभागी नेहमी दिंड्यातील वारकर्यापेक्षा मोकळ्या समाजात खुप वारकरी असतात. त्यांचे कसलेही वेळापत्रक नसते. केव्हाही निघा, कुठेही थांबा. हे वारकरी सकाळी लवकर उठून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघतात. पहाटे चार तीन पासूनच वारकरी बाहेर पडले होते. चार वाजता तर रस्त्यावर वारकर्याचा मोठा प्रवाह होता.
अंधारात पुढच्याचा अंदाज घेत तसेच उजव्या बाजूला असलेल्या वाहनांच्या प्रकाशात वारकरी चालले होते. सासवड शहर सोडून एक किलोमीटर अंतर गेल्यावर पावसाला सुरुवात झाली . या अगोदर आळंदी ते पुणे ते दिवे घाट दरम्यान वारकरी रिमझिम पावसात आनंदले होते, हा पाऊस फार थोडा वेळ होता. पण आता पावसाचा जोर जास्त होता. सगळी कडे आभाळ गच्च भरलेले होते. त्यामुळे माऊलींनी लगेच प्लॅस्टिक खोळ बाहेर काढली. काहींनी रेनकोट, छत्र्या बाहेर काढले.
आता पावसाने आणखी वेग वाढवला. जोरदार पाऊस सुरू होता. रस्त्यावर पाणी साचले. चालणे अवघड होत होते. पण वारकरी थांबले नाहीत. मार्ग काढत पुढे जात राहिले. सोबतीला होते माऊली आणि तुकाराम महाराजाचा जयघोष. या नामाने त्यांना ताकद मिळत होती. डोक्यावर घेतलेली खोळ दोन्ही हातांनी पकडत, थोडी तोंडावर घेऊन ते चालत होते . दोन तास झाले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. गटागटाने चालणारे वारकरी कोणी चुकू नये म्हणून काळजी घेत होते. माऊली माऊली म्हणून उजवीकडे असणारे वाहनाचे क्लिनर वारकर्याना साईड मागत होते. पोलीस व्यवस्थापन बेपत्ता होते. वाहतूक शिस्तीचे काम वारकर्यानी हाती घेतले.
सहा वाजले, उजाडू लागले, पाऊस सुरूच होता. वाराही जोराने वाहू लागला , वारकर्याचा उत्साह जराही कमी झाला नाही. मध्ये कोणी चहा घ्यायला थांबत, काही जण नाश्ता करून पुन्हा चालणे सुरू करत. पावसाचे पाणी पायावर पडत होते, मधूनच खोळ वार्याने उडून जायची, सारे अंग थंडीने शहारत होते. पाऊस मी म्हणत होता आणि वारकरी माऊली म्हणत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत हा खेळ सुरू होता. आता जेजुरी जवळ आले आणि पाऊस दमला. चिंब चिंब भिजून गेलेले वारकरी जेजुरीला पोहचलो. पावसाने बारा पर्यंत विश्रांती घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. दिवसभर हा खेळ सुरु होता, वारकरी जेजुरीला येत होते.
सायंकाळी माऊली पालखीचे आगमन झाले. या दिंड्यातील वारकरी, टाळकरी, विणेकरी सारे पावसात भिजले होते, त्याचे कपडे पाऊस थांबला की सुकत होते. पावसाची तमा न करता वारकरी चालत राहिले. बर्याच दिवसांनी पालखी सोहळ्यात असा पाऊस पडला, अशी प्रतिक्रिया वारकर्यानी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा