फुकटखाऊ वृत्तीच्या लोकांमुळे
वारी मार्गावर अन्न
सोहळ्याची उंची वाढविण्यासाठी दानशुराच्या सहकार्याची गरज
माळशिरस : सतीश मोरे
पालखी सोहळ्यात सर्वात पुढे मानाचा नगारा, त्या मागे दिंडी नंबर 27 आणि त्या पाठोपाठ माऊलींचा अश्व असतो. नंतर 26 ते 1 अशा मानाच्या दिंड्या असतात. त्यानंतर रथात ठेवलेली माऊली पालखी असते. त्या पाठोपाठ 1 ते 201 या मानाच्या दिंड्या असतात. गेल्या काही वर्षांत या मागोमाग 200 दिड्या नव्याने आलेल्या आहेत. रथासमोरील 27, रथ, मागील 201 आणि इतर 200 दिंड्या, यामध्ये सहभागी टाळकरी, झेंडेकरी, वारकरी, तुलसी आणि पाणी वाटणारी महिला, चोपदार याला पालखी सोहळा म्हणत्यात. या सर्वाची संख्या दिड ते दोन लाख असते. शिस्तबद्धता, अचुकता,वक्तशीरपणा, नियमबद्धता, कडकपणा पहावा तर या सोहळ्यातच. याचेवर पुर्ण नियंत्रण सोहळ्याचे चोपदाराकडे असते. अंतरानुसार सकाळी सहा सात वाजता निघणे, नऊच्या सुमारास पहिला विसावा, दुपारी बारा वाजता जेवण विसावा, साडे चार दरम्यान आणखी एक विसावा, त्यानंतर सहा वाजता मुक्काम ठिकाणी पोहचणे, असा यांचा नित्यक्रम असतो. नैसर्गिक परिस्थिती अपवाद वगळता यात कधीच बदल होत नाही. यांचे विसावा ठिकाण, मुक्काम ठिकाण निश्चित आहे. यामध्ये सहभागी वारकरी मध्येच कुठे थांबत नाहीत, दिंडी बाहेर जात नाहीत, काहीही मोफत वाटप असले तर तिकडे ढुंकूनही पाहात नाहीत .
या सोहळ्याच्या पुढे, कुणाचेच नियंत्रण नसलेला वारकरी असतो. यामध्ये पण दिंड्या असतात, दहा वीस जणांचा समुह असतो, स्वतंत्र चालणारे एक दोघेही असतात . याला मोकळा समाज असे वारी भाषेत म्हटले जाते. हे लोक कधीही चालायला सुरुवात करतात, कुठेही थांबतात, परत चालतात, कुठेही निवारा शोधतात, कुठेही झोपतात, मुक्काम करतात. कुणाचेच न ऐकणारा हा समाज दोन ते तीन लाख इतका असतो. हे ही पंढरीचे वारकरीच आहेत, ते भजन करतात, माऊली जयघोष करतात, त्यानाही पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घ्यायचे असते. पण त्याच्यात शिस्त नावाचा प्रकार क्वचितच पहायला मिळतो. रहायची जागा निश्चित नाही, जेवण व्यवस्था नाही किंवा वेळापत्रक नाही, असा हा समाज रस्त्यावर कोणीही काय वाटत असेल तर लगेच तिकडे धावतो. मोफत वस्तू घेण्यासाठी तुटून पडतो. पाणी बाटली, चहा, बिस्किटे, स्नॅक्स पुढे, राजगिरा लाडू, टोप्या, छत्री काहीही असो, हा समाज त्या मागे धावतो, वस्तू घेताना गडबड, धक्काबुक्की . मस्ती करतो. अनेक जण तर फक्त याच कामासाठी वारीला आलेले असतात.
अलिकडे पंढरीच्या वारीत दान करणार्या अन्नदात्याची संख्या अचानक वाढली आहे. वारीत वस्तू किंवा खाद्य पदार्थ वाटले की सेवा होते, अशी भावना वाढली आहे. शिरा, उपीट, लाडू, पोहे, पुरी भाजी, जेवण , चहा, पाणी बाटली, बिस्किटे वाटणारे अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, वारकरी सेवा मंडळे, गणेश मंडळे गावागावात आहेत. पहाटे तीन पासून रात्री उशिरा पर्यंत ही सेवा सुरू असते. या संस्थाचा उद्देश चांगला आहे, उपक्रम स्तुत्यआहे. पण घेणांराची मानसिकता कृतज्ञताशील नसते. फक्त फुकट मिळाले म्हणून धाव धाव करणे, वस्तू घेणे, आवडले तर खाणे, पोट भरले की उरलेले रस्त्यावर फेकून देणे, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. असे खाद्य पदार्थ रस्त्यावर फेकल्यावर तुडवले जातात, रस्याकडेला प्लेटचा ढीग लागलेला असतो. पाणी पिशव्य तुडवल्या जातात . अन्न व पाण्याची नासाडी केली जाते,हे सर्व पाहवत नाही.
मोकळ्या समाजातील या सैराट वारकर्यांमुळे चांगल्या लोकांचा वारीबाबत दृष्टिकोन बदलतआहे. लोक यालाच पालखी सोहळा म्हणतात. वास्तविक या लोकांचा पालखी सोहळ्याशी काही संबंध नसतो. फुकट खाऊ प्रवृत्तीच्या या लोकांना आवरणे कठीण आहे. त्यासाठी मोफत वस्तू, खाद्य पदार्थ वाटणार्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. वाया जाणारे दान करून पुण्य राहीले बाजूला, दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे रोगराई होऊन शापच मिळू शकतो. चोपदार फौडेशनने गेल्या वर्षी याबाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी अन्नदान न करता पालखी दिंड्या साठी 5 लाख रुपये खर्च करून 1000 ताडपत्रया दिल्या होत्या. सोहळ्यास ज्याची गरज आहे, ते द्यायला हवे. जेवण देण्यासाठी दिंडी कटीबद्ध असते. काही खाजगी दिंड्या 2 ते 4 हजार रुपये भिसी गोळा करून चालवल्या जातात, याचाही विचार दानशुरानी केला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा