फॉलोअर

१५ मार्च २०१६

सातारची पारशी विहीर आणि उंची चपला

सातारची पारशी विहीर आणि उंची चपला


आठवी नववीत असताना 1987 - 88 मध्ये सातारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबीरात सहभागी होण्याचा योग आला होता. नवनवीन शिकायचे, गावाला जायचे, तिथे काहीतरी वेगळे पहायचे, नवे मित्र जोडायचे, असे ते दिवस होते. शिबिरात तंबूत रहायचा वेगळा आनंद होता. हे शिबिर सातारच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी जिथे होते त्या डोंगरावर उंचावर पारशी लोकांची दफनभूमी विहीर आहे. ती विहीर पहायला आम्ही सवंगडी गेलो.

पारशी समाजाची व्यक्ती मृत्यू पावल्यावर या विहिरीत त्याचा मृतदेह टाकला जातो. तो देह प्राणी, किडे, मुंगी यांना भोजन म्हणून कामी यावा , मृत्यूनंतर आपला देह कुणाच्या तरी कामी यावा , अशी या समाजाची भावना, मानसिकता आहे. आम्ही त्या विहिरीजवळ पोहचलो.  ती विहीर पाहून भिती वाटली होती. त्या परिसरात घारी, घुबड फिरत होती. खुप दुर्गंधी होती. मृत्यू नंतर शरिर  असे फेकले जाते,  या कल्पनेनेच अंगाला घाम फुटला.

दरम्यान आमच्यातल्या एका सिनिअरने त्याला वेगळा संदर्भ देत जीवो जीवस्य जीवनम् , शरीर नाशवंत असते, इतरांसाठी काही तरी करतो तोच खरा माणुस वगैरे लेक्चर दिले,असे सांगून वेळ मारून नेली. मृत्यूबाबत मनात उमटलेल्या भावना भिती काही काळ दूर झाली. आम्ही परत खाली शिबिरात  आलो.

शिबिरात सहभागी काही जणांना आम्ही हा प्रकार सांगितला. काही जण कशाला तिकडे गेला होता म्हणून रागावले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो तेव्हा पुन्हा त्या लांबवर असलेल्या विहिरी कडे माझे पुन्हा लक्ष गेले. बरोबर असणार्‍या मुलांनी कशाला तिकडे बघतोस, चल असे म्हणत शिबिर प्रमुखांच्या मुख्य  तंबूकडे नेले. त्याठिकाणी बाहेर उंचावर टेबलावर एक फळा लावला होता. त्यावर सुवाच्य अक्षरात खडूने एक सुविचार लिहला होता. तो सुविचार मोठ्याने वाचा दाखवा असे प्रमुखांनी सांगितले.

' माझ्या पायात उंची चपला नव्हत्या 
म्हणून मी माझ्या बाबांकडे तक्रार करत होतो,
पण एकदा मी रस्त्यावर पायच नसलेला माणूस पाहीला 
आणि माझी तक्रार पळून गेली '

दोन तीन वेळा हा सुविचार वाचला तेव्हा थोडाफार समजला. तिथे उपस्थित सरांनी आम्हाला त्याचा अर्थ विचारला. आम्ही आमच्या परीने काही तरी सांगीतले. सर म्हणाले,' खरंच आपण खुप  सुखी आहे. आपल्याला हात पाय आहेत, पाय भाजू नये म्हणून घालायला चप्पल पण आहे. तरीही आपण तक्रार करतो, मला हे नाही, ते नाही. जगात आपल्या पेक्षा कितीतरी लोक आहेत, ज्यांना पाय नाहीत.  तरीही ते जगत आहेत, काम करत आहेत, प्रयत्न करत आहेत, जीवन संघर्ष करत आहेत. आपण  सारे असूनही तक्रार करत आहे. हे सर्व पाहून मी काय करू शकतो? मला तर हात पाय आहेत, मग मी का रडत बसू ? चला  उठा कामाला लागा. '



सातारच्या शिबिरात अनुभवलेल्या या दोन्ही घटना माझ्या आयुष्यात आजपर्यंत  कोरलेल्या आहेत. स्वतः साठी काही करता येईल तेवढे मनुष्य करतोच , दुसर्‍यासाठी काय करता येईल ते करता आले पाहिजे. आपल्याकडे देण्यासारखे जे काही आहे ते दिले पाहिजे, देण्यात आनंद आहे, देणार्‍याने देत रहावे. काही देता येत नसेल तर शरीर रूपी सेवा देता येते. इतरांसाठी काहीतरी करता येत तेवढं करायचं असतं, हे मला पहिल्या प्रसंगाने सांगितले.

आपण आपली सद्य परिस्थिती स्वीकारली पाहीजे. परिस्थिती बदलण्याची तयारी केली पाहिजे. आपल्या कडे जे काही त्या सामग्रीचा फायदा, वापर करून परिस्थिती बदलली पाहिजे. रडत बसायचे नाही, जे आहे ते स्वीकारून पुढे जायचे. रडायचे नाही, लढायचे. आपल्याला दु:ख जास्त आहे असे वाटले तर आपल्यापेक्षा जास्त दु:खी व्यक्ती कडे पहा,
हे मला त्या सुविचाराने शिकवले.

दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है 
लोगो का गम देखा तो मै अपना गम भुल गया

अमृत चित्रपटातील हे गाणे सुद्धा बरंच काही सांगून जाते.

 ' चला हवा येऊ द्या ' कार्यक्रमात लातूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महीलेची कहाणी ऐकली.
तिने व्यक्त केलेल्या अडचणी, दु:ख ऐकून मला जाणवलं की आपण खरंच आपण खुप सुखी आहोत. त्या महिलेने पतीच्या निधनानंतर स्वतः ला सावरलेच, दुसर्‍याना पण आधार दिला. तिला असणारे दुःख पाहीले, ऐकले तेव्हा मला सहज सुचलं.

सहन होत नाही 
सांगता पण येत नाही 
दु:ख व्यक्त तरी कुणाकडं करायचं
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत !

दोन टाईम खातुया चार टाईम पितुया
खाल्ल्यालं पचवायचं की पचवायला खायचं
पोट भरतंय पण मन भरत नाही 
पण सांगायचं तरी कुणाला 
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत  !

बसायला एसी अन फिरायला कार
जिथं जाईल तिथं होते माझी सोय 
तरी पण समाधान काय होत नाही
पण करायचं काय, बोलायचं कुणाला
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत  !

दिवसभर काम करतोय, रात्रीबी राबतो
पैसा कमवला पण सुख काय मिळना
सारं मिळतंय, पण भोगायला वेळ मिळना
सारं सांगायचं आहे ,पण कुणापुढे सांगु
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत !

                    ...............सतीश मोरे.














३ टिप्पण्या:

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...