फॉलोअर

२१ जुलै २०२६

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी  

– सतीश मोरे
सौंदर्य अनुभवण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे नाही. कराडपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर पाटण तालुक्यात निसर्गाने असा एक स्वर्ग निर्माण केला आहे की, तो पाहिल्यानंतर आपण नकळत त्याच्या प्रेमात पडतो. या ठिकाणाचे नाव आहे – काठी टेक.

जुलै महिना सुरू झाला की काठी टेकचे रूपच पालटते. डोंगररांगा दाट धुक्याच्या चादरीत हरवून जातात. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पाऊस... त्यात अंगाला सुखावणारी गुलाबी थंडी... आणि चहूबाजूंनी पसरलेला हिरवागार निसर्ग. या सगळ्याचा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे; तो प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच अनुभवता येतो.
काठी टेकवर उभे राहिल्यावर निसर्गाने जणू हिरवाईचा गालिचाच अंथरला आहे, असे वाटते. डोंगरांच्या कुशीतून वाहणारे धुक्याचे लोट, पावसाच्या सरींनी नटलेली झाडे, वाऱ्याच्या झुळुकीबरोबर नाचणारे गवत आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट... प्रत्येक क्षण मनाला शांत करणारा असतो

निसर्गाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यावर अक्षरशः सौंदर्याची उधळण केली आहे. या तालुक्यातील प्रत्येक डोंगर, प्रत्येक दरी, प्रत्येक घाट आणि प्रत्येक जलाशय एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारल्यासारखा भासतो. मात्र हे सौंदर्य अनुभवण्यासाठी त्याचा शोध घेण्याची दृष्टी आणि मनाची ओढ असावी लागते. ज्याला हा शोध घेता येतो, तोच खऱ्या अर्थाने नशीबवान.
पाटण तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणांची अक्षरशः खाण आहे. यापैकी अनेक ठिकाणे पाहण्याचे भाग्य मला लाभले, तर अजूनही अनेक ठिकाणे मला खुणावत आहेत. घाटमाथा, ढेबेवाडी, तारळे, कोयनानगर, नवजा, दिवशी घाट, तारळे, विहे घाट, सडा वाघापूर घाट, वाल्मिकी पठार, मराठवाडी धरण... कुठेही जा, निसर्ग आपले रूप नव्याने उलगडत राहतो.

या सर्व ठिकाणांमध्ये जर एखाद्या ठिकाणाला 'निसर्गाचा मुकुटमणी' म्हणायचे असेल, तर तो म्हणजे कोयनानगर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे विशाल कोयना धरण, त्याचा तब्बल १०५ टीएमसी क्षमतेचा शिवसागर जलाशय आणि चारही बाजूंनी हिरवाईने नटलेले डोंगर – हे दृश्य शब्दांत मांडणे कठीण आहे. कोयनानगरपासून तापोळ्यापर्यंत पसरलेला हा जलाशय जणू निसर्गाने रंगवलेले एक भव्य चित्रच.

या जलाशयाच्या काठावर अनेक छोटी-छोटी गावे वसली आहेत. प्रत्येक गावाचे स्वतःचे वेगळे सौंदर्य आहे. त्यापैकी माझ्या मनात कायमचे घर करून राहिलेले गाव म्हणजे काठी-अवसरी.

काठी-अवसरी हे केवळ एक गाव नाही; तो निसर्गाने घडवलेला स्वर्गाचा एक कोपरा आहे. कोयनानगरचे उद्यान, धबधबे किंवा घाटमाथा अनेकांनी पाहिला असेल; पण शिवसागर जलाशयाच्या कुशीत विसावलेल्या काठी-अवसरीचे अप्रतिम सौंदर्य अनुभवण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते.

पाटणहून काठीकडे जाणारा रस्ता सुरू झाला की प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंद देऊ लागतो. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भव्य पवनचक्क्या, हिरवाईने नटलेले डोंगर आणि वळणावळणाचा रस्ता मनाला भुरळ घालतो. गावात पोहोचून डोंगर उतरताना समोर अचानक उलगडणारा शिवसागर जलाशयाचा निळाशार विस्तार पाहून क्षणभर आपण स्वर्गात आल्याचा भास होतो.
मी यापूर्वी अनेकदा काठीला गेलो होतो; धैर्यशील पाटणकर यांच्या काठी हिल्स मध्ये उतरलो होतो. मात्र तो अनुभव प्रामुख्याने उन्हाळ्यातला होता. यंदा प्रथमच पावसाळ्यात तेथील निसर्ग अनुभवण्याचा योग आला आणि काठीचे खरे रूप माझ्यासमोर उलगडले. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा – कोणताही ऋतू असो, काठीचे सौंदर्य प्रत्येक वेळी वेगळ्या रंगात खुलत राहते.

डोंगराच्या कड्यावर उभे राहून खाली दिसणारा अथांग जलाशय, त्यामध्ये तयार झालेली असंख्य छोटी बेटे आणि हिरव्या पर्वतरांगांच्या सान्निध्यात पसरलेले शांत पाणी... हे दृश्य डोळ्यांत साठवत राहावे असेच वाटते. कॅमेरा कितीही फोटो काढो, तरी त्या सौंदर्याचा पूर्ण आविष्कार त्यात टिपता येत नाही.
काठी-अवसरीच्या पर्यटन विकासामागे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली. 'नवीन महाबळेश्वर' ही संकल्पना मांडताना त्यांनी या परिसरातील निसर्गसंपदेची क्षमता ओळखली. दुर्गम गावांपर्यंत रस्ते पोहोचवण्याचे प्रयत्न केले आणि या भागाकडे पर्यटकांचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांमुळे काठी-अवसरी आज अनेक निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

काठीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त. विशेषतः संध्याकाळी मावळणारा सूर्य शिवसागराच्या पाण्यावर सोनेरी रंगांची उधळण करतो. त्या क्षणी जणू सूर्य स्वतः आपल्या भेटीला आला आहे, अशी भावना मनात दाटून येते.

महाबळेश्वरचे सौंदर्य जगप्रसिद्ध आहे; मात्र निसर्गाच्या अस्सल रूपाचा अनुभव घ्यायचा असेल, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरीला एकदा तरी जरूर भेट द्या. तिथे पोहोचल्यानंतर निसर्ग म्हणजे काय, शांतता म्हणजे काय आणि स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय याचा खरा अर्थ उमगतो.

काठी-अवसरी... हा केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाच्या कुशीत स्वतःला हरवून पुन्हा नव्याने सापडण्याचा एक अविस्मरणीय अनुभव आहे.

हिवाळ्यातील काठी... धुक्याच्या दुलईतील स्वर्ग

मध्यंतरी हिवाळ्यात  एकदा काठी-उसरीला जाण्याचा योग आला होता. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला हा परिसर पाहिला होता; पण हिवाळ्यातील काठी म्हणजे निसर्गाने धुक्याची शुभ्र शाल पांघरलेला एक वेगळाच स्वर्ग.

पहाटेच्या वेळी संपूर्ण परिसर दाट धुक्याने वेढलेला होता. डोंगरांची शिखरे धुक्याआड लपाछपी खेळत होती. सूर्य उगवू लागला आणि त्याची कोवळी किरणे धुक्याला भेदून बाहेर पडू लागली, तसा संपूर्ण परिसर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. त्या क्षणी शब्द हरवून जातात आणि डोळे फक्त ते सौंदर्य साठवत राहतात.

डोंगरकड्यावर उभे राहून खाली दिसणारा शिवसागर जलाशय आरशासारखा शांत होता. त्यात पडलेले डोंगरांचे प्रतिबिंब इतके सुंदर दिसत होते की, क्षणभर वास्तव आणि प्रतिबिंब यातील फरकच कळेनासा झाला. जलाशयातील छोटी-छोटी बेटे धुक्यातून हळूहळू समोर येत होती. प्रत्येक क्षण नवा आणि प्रत्येक दृश्य वेगळे.

काठीमध्ये वेळ कसा जातो हे कळतही नाही. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी आणि जीवनातील धावपळीपासून काही क्षण दूर जाण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. येथे आल्यावर मोबाईलपेक्षा डोळ्यांनी आणि कॅमेऱ्यापेक्षा मनाने निसर्ग टिपण्याचा मोह होतो.

आज पर्यटनासाठी अनेक जण दूरवरच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र आपल्या सातारा जिल्ह्यात, पाटण तालुक्यात असा हा स्वर्ग दडलेला आहे. त्याचे सौंदर्य एकदा अनुभवले की पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटते.

काठी-अवसरी म्हणजे फक्त एक गाव नाही; ती निसर्गाची जपून ठेवलेली एक अमूल्य भेट आहे. ती प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवायलाच हवी

पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती¢

✓काठी-अवसरीला जायचे कसे?

कराडहून :
कराड–पाटण मार्गाने पाटण शहरात पोहोचावे. पाटण एसटी स्थानक ओलांडल्यानंतर लगेच उजवीकडे वळा . पाटण चाळकेवाडी रोड वरून सरळ पुढे जा. पुढे दातेगडाकडे जाणारा फाटा येतो. तिकडे न जाता सरळ पुढे जावे. हा परिसर पार केल्यानंतर वळणावळणाचा घाट सुरू होतो. पुढे विशाल पवनचक्क्यांचे साम्राज्य दिसू लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या शेकडो पवनचक्क्या पाहताना जणू एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. पुढे 'काठी टेक' या फाट्यावर डावीकडे वळल्यानंतर काही अंतरावर काठी गाव गाठता येते.

https://maps.app.goo.gl/RRaWQ6A1xPRE7nNE6

साताराहून :
साताराहून येणाऱ्या पर्यटकांनी ठोसेघर धबधबा परिसर पार करून चाळकेवाडी कडे यावे. सातारा ते काठी हे अंतर सुमारे ५० किलोमीटर असून, कराडहूनही जवळपास तेवढेच अंतर आहे. दोन्ही बाजूंनी चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध आहेत.

https://maps.app.goo.gl/V76ncKktktSWTVg96?g_st=ac

✓राहण्याची सोय

गेल्या काही वर्षांत काठी मध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक सुंदर रिसॉर्ट आणि होमस्टे सुरू झाले आहेत. धैर्यशील पाटणकर यांचे काठी हिल्स रिसॉर्ट सर्वात जुने आणि प्रसिद्ध आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे बॅक वाॅटर केबिन रिसॉर्ट, तसेच स्थानिकांनी सुरू केलेली अनेक घरगुती निवासस्थाने पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. पर्यटन हंगामात गर्दी असल्याने आगाऊ ऑनलाइन किंवा फोनद्वारे बुकिंग करणे अधिक सोयीचे ठरते.

Windy Hill's agro tourism 
दिलीप जोगळेकर 9421252222

Kathi Hill's 
Dhairyashil Patankar 
8975764243

Nature Next
Satish Pawar 
7798933940

Back Water Cabin
विक्रम जाधवराव
9822110141

मानस agri tourism 
अमर जाधवराव
901152742

✓खाण्याची सोय

येथे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र अचानक पोहोचण्यापेक्षा आगाऊ फोन करून आपल्या जेवणाची ऑर्डर दिल्यास आपल्या आवडीप्रमाणे ताजे जेवण तयार करून ठेवले जाते.

✓भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

काठीला वर्षातील कोणत्याही ऋतूत भेट देता येते. मात्र पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू या परिसराचे खरे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. पावसाळ्यात धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईचा गालिचा आणि कोसळणारा पाऊस, तर हिवाळ्यातील बोचरी थंडी, स्वच्छ हवा आणि मन मोहून टाकणारे सूर्योदय-सूर्यास्त हे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात.

वाहतुकीची सुविधा

काठी-अवसरीपर्यंत नियमित एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतःची दुचाकी, चारचाकी किंवा मित्र-परिवारासोबत खासगी वाहनाने जाणे अधिक सोयीचे ठरते. संपूर्ण मार्गावर चांगल्या दर्जाचे रस्ते असल्याने प्रवास सुखकर आणि आनंददायी होतो.

निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरी हा नक्कीच एकदा अनुभवावा असा स्वर्गीय पर्यटनस्थळ आहे.

महत्त्वाच्या सूचना

काठी टेकला जाण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करूनच निघा. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होईल.

- रेनकोट किंवा पावसाळी कपडे सोबत अवश्य ठेवा. काठी टेक परिसरात पावसाचा जोर कधीही वाढू शकतो. फक्त छत्रीवर अवलंबून राहू नका. छोटी छत्री सोबत असली तरी उत्तम; मात्र रेनकोट अधिक उपयोगी ठरतो.

- उबदार कपडे सोबत घ्या. जुलै असो, हिवाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू, काठी टेकवर नेहमीच गारवा जाणवतो. कोयना धरणाच्या परिसरातून येणारे थंड वारे अंगावर काटा आणतात. त्यामुळे स्वेटर, जॅकेट किंवा उबदार शाल सोबत ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.

- चांगली पकड असलेले बूट किंवा शूज वापरा. पावसामुळे रस्ते व माती घसरडी होऊ शकते.

- निसर्गाचा आनंद घ्या, पण त्याचे जतनही करा. प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या किंवा इतर कचरा परिसरात टाकू नका. स्वच्छता राखणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे.

काठी टेक हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाने मनमुराद उधळलेले सौंदर्य आहे. त्याचा आनंद घ्या आणि ते सौंदर्य पुढील पिढ्यांसाठीही जपून ठेवा.

सतीश मोरे सतिताभ 
9881191302

#kathihills
#koynanagar  
#naturelovers

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...