फॉलोअर

गोल रिंगण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोल रिंगण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३१ ऑगस्ट २०२६

वारीची ओढ... आणि बाजीराव विहीर येथील अविस्मरणीय गोल रिंगण

वारीची ओढ... आणि बाजीराव विहीर येथील अविस्मरणीय गोल रिंगण


– सतीश मोरे

सन २०१४ मध्ये प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला आणि तेव्हापासून पंढरीच्या वारीची लागलेली ओढ आजही तितकीच कायम आहे. २०१४ नंतर सलग आठ वर्षे आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करण्याचे भाग्य लाभले. कोरोनाकाळात प्रत्यक्ष वारी शक्य नव्हती. त्या काळात कराड परिसरात आम्ही स्वतंत्र "निसर्ग वारी" काढली, तर दुसऱ्या वर्षी "व्हर्च्युअल वारी"चा अनोखा उपक्रम राबविला. त्यानंतरही वारीला जाता आले नाही, तरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला किंवा शेवटच्या टप्प्यात बंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर येथे जाऊन माऊलींचे दर्शन घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला.


यंदा अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे आळंदीला जाणे शक्य झाले नाही. आळंदीतील वारकरी मित्रांनीही परिस्थिती गंभीर असल्याने येऊ नकोस, असा सल्ला दिला. त्यामुळे यंदा थेट वाखरी येथे माऊलींच्या दर्शनाचा संकल्प केला.

माऊलींचा पालखी सोहळा सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, बरड, माळशिरस, वेळापूर असा प्रवास करत भंडीशेगाव येथे मुक्कामी आला होता. दुसऱ्या दिवशी वाखरीकडे प्रस्थान होणार असल्याने मी आणि माझे पाहुणे माझे मार्गदर्शक सुभाष होसले सावकार व त्यांच्या मंडळीसमवेत सकाळी नऊ वाजता पंढरपूरकडे निघालो.


महुदपर्यंत प्रवास सुरळीत झाला. मात्र पुढे लहान  पालख्यांची आणि वाहनांची गर्दी वाढू लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जवळपास दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पंढरपूरला पोहोचलो. खोडशीकर मठात सामान ठेवून वाहन पार्क केले आणि रिक्षाने वाखरीकडे प्रयाण केले.


वाखरीत पाऊल ठेवताच वातावरण भक्तिमय झाले होते. "संत ज्ञानेश्वर महाराज की जय", "संत तुकाराम महाराज की जय", "माऊली... माऊली..." या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने चालत होते. दुपारचे ऊन असले तरी भक्तांच्या उत्साहावर त्याचा किंचितही परिणाम नव्हता.


वाखरीपासून पुढे बाजीराव विहीर येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वात मोठे आणि भव्य गोल रिंगण होणार होते. त्यामुळे आम्ही उलट्या दिशेने चालत त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. कराड नाका, सातारा फाटा ओलांडत पुढे जात असताना रस्त्यांवर वारकऱ्यांची अखंड मानवसाखळी दिसत होती. सर्वत्र वाहतूक कोंडी होती; मात्र कोणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नव्हती. प्रत्येकाच्या ओठांवर नाम आणि मनात माऊली होती.


बाजीराव विहीर परिसरात पोहोचलो तेव्हा जणू भक्तीचा महासागरच लोटला होता. पुणे–सोलापूर महामार्गावर वारकऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पुलावर, रस्त्याच्या दुतर्फा आणि विशाल मैदानात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या, पालख्या आणि वारकऱ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.


याच ठिकाणी एक अनपेक्षित आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण सुरू होणार होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वारकरी उभे राहिले होते. महिलांच्या फुगड्या, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "माऊली... माऊली..."चा अखंड जयघोष वातावरण भारावून टाकत होता. पोलिस कर्मचारीही या भक्तिमय वातावरणात रममाण झाले होते.क्षणभरात उभे रिंगण सुरू झाले. माऊलींचे अश्व वेगाने पुढे धावले आणि उपस्थित लाखो वारकऱ्यांनी एकाच स्वरात "माऊली... माऊली..."चा गजर केला. तो क्षण शब्दांत मांडणे अशक्य आहे.


त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात भव्य गोल रिंगणाची तयारी सुरू झाली. पालखी मैदानात आणण्यात आली. रथातून माऊलींच्या पादुका अत्यंत भक्तिभावाने खाली उतरविण्यात आल्या. नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी रिंगणाच्या मध्यभागी विराजमान झाली. "संत ज्ञानेश्वर महाराज की जय", "संत तुकाराम महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


आणि मग टाळकऱ्यांनी गोल रिंगणाभोवती फेर धरला. 


माऊली धावा... माऊली धावा...! आणि भक्तीच्या महासागरात हरवलेला क्षण


"धावा... धावा... धावा..." या आरोळ्यांनी संपूर्ण बाजीराव भीर परिसर दणाणून गेला. हजारो टाळकरी एकाच लयीत गोल रिंगणाभोवती धावत होते. टाळांचा निनाद, मृदंगाचा गजर, वीणेचे सूर आणि लाखो कंठातून उमटणारा "माऊली... माऊली..."चा अखंड जयघोष वातावरणाला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन गेला.


रिंगणाच्या मध्यभागी माऊलींच्या पादुका विराजमान होत्या. प्रत्येक वारकऱ्याच्या नजरेत भक्तिभाव, चेहऱ्यावर आनंद आणि मनात माऊलींच्या चरणी पोहोचल्याचे समाधान दिसत होते. या क्षणी जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, पद-प्रतिष्ठा यांचा लवलेशही नव्हता. लाखो लोक असूनही सर्वत्र शिस्त, संयम आणि एकमेकांबद्दलचा आदर अनुभवायला मिळत होता.


क्षणात चोपदारांनी संकेत दिला आणि माऊलींचे अश्व रिंगणात उतरले. काही क्षणांतच ते भरधाव वेगाने रिंगण पूर्ण करू लागले. अश्वांच्या टापांचा आवाज आणि त्याचवेळी उसळलेला "ज्ञानोबा-तुकोबा"चा जयघोष अंगावर अक्षरशः रोमांच उभे करणारा होता. वारकरी नम्रपणे मस्तक झुकवून त्या पवित्र क्षणाचा आशीर्वाद घेत होते.


रिंगण पूर्ण झाल्यानंतर अनेक वारकरी त्या पवित्र मातीचा स्पर्श करून कपाळी लावत होते. काही जण ती माती ओंजळीत भरून जपून ठेवत होते. त्यांच्यासाठी ती साधी माती नव्हती; ती माऊलींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली प्रसादरूपी धूळ होती.


मीही काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. अनेक वर्षे वारी केली, असंख्य सोहळे पाहिले; पण प्रत्येक वेळी हा अनुभव नवा वाटतो. रिंगणातील भक्ती, वारकऱ्यांची शिस्त, निःस्वार्थ सेवा आणि माऊलींवरील अपार श्रद्धा मनाला पुन्हा पुन्हा पंढरीकडे खेचत राहते.


यंदा संपूर्ण वारी करता आली नाही, याची खंत मनात होती. मात्र वाखरी बाजीराव विहीर येथे अनुभवलेले हे अविस्मरणीय क्षण त्या खंतीवर फुंकर घालणारे ठरले. माऊलींच्या दर्शनाने मन तृप्त झाले आणि पुन्हा एकदा जाणवले—वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही; ती मन शुद्ध करणारी, माणसाला माणसाशी जोडणारी आणि भक्ती, समता, सेवा व प्रेम यांचे जीवनमूल्य शिकवणारी जीवनशाळा आहे.


भव्य गोल रिंगणाचा सोहळा अनुभवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पुढचा टप्पा होता वाखरी येथील पालखी तळ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक पालख्या वाखरीत मुक्कामी येतात. मात्र प्रमुख आठ-दहा पालख्यांना पालखी तळावर मानाचे स्थान असते.


रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही पालखी तळावर पोहोचलो. आमचे लक्ष्य होते कराडकरांच्या बारा नंबर दिंडीचा तंबू. पालखीसमोरच पाण्याच्या टाकीजवळ या दिंडीचा मुक्काम असतो. अनेक तंबूंच्या गर्दीतही आपल्या दिंडीचा तंबू क्षणात सापडला आणि मन भरून आले.


गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सोबत असलेले माझे सहकारी तेथे भेटले. रणजित नाना पाटील,खरात माऊली, सावकार माऊली, बाजीराव माऊली आणि इतर अनेक वारकरी मित्रांना भेटलो. एकमेकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. अनेक वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळाला. क्षणभर तंबूत निवांत बसलो आणि दिवसभराचा सर्व शीण कुठल्या कुठे पळून गेला.


दिवसभरात जवळपास नऊ किलोमीटर चालल्यामुळे पाय दुखत होते, अंग थकले होते. पण मित्रांच्या सहवासात, माऊलीच्या दिंडीत बसल्यानंतर शरीराचा थकवा आणि मनाचा कंटाळा क्षणात नाहीसा झाला. हीच तर वारीची खरी ताकद आहे.


दरम्यान, माऊलींचा पालखी सोहळा वाखरीतील पालखी तळावर दाखल झाला. सायंआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आरतीनंतर बारा नंबर दिंडीतील टाळकरी आणि वारकरी परतले आणि रात्री दहाच्या सुमारास भव्य पंगत बसली.


वारकऱ्यांसोबत एका पंगतीत बसून प्रसादाचे भोजन करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सर्वांना वाढप सुरू होईपर्यंत "श्रीराम जय राम जय जय राम" या मंत्राचा अखंड जप सुरू होता. सर्वांना भोजन वाढून झाल्यानंतर "बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!" असा जयघोष झाला आणि मग प्रसाद ग्रहण करण्यास सुरुवात झाली.


त्या साध्या पण प्रेमाने वाढलेल्या भोजनात समाधानाचा अमृतरस होता. तिथे श्रीमंत-गरीब असा भेद नव्हता; सर्वजण माऊलीची लेकरं म्हणून एका पंगतीत बसले होते. हीच वारीची समतेची शिकवण आहे.


रात्री जवळपास बारा वाजता सर्व वारकरी मित्रांचा निरोप घेऊन आम्ही पंढरपूरकडे निघालो. दिवसभराचा प्रवास, गोल रिंगणाचा अलौकिक अनुभव, वारकरी मित्रांची भेट, दिंडीतील मुक्काम आणि पंगतीतील प्रसाद… या प्रत्येक क्षणाने मन समृद्ध केलं.


"ज्ञानोबा... तुकाराम...! माऊली... माऊली...!"


माऊली सतीश वसंतराव मोरे 

९८८११९१३०२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...