फॉलोअर

१४ जुलै २०२६

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​सतीश मोरे 
संपादक,दैनिक पुढारी कराड 

​सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा काही नावे सुवर्णाक्षरांनी रेखाटावी लागतील. त्यामध्ये स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर (विलास काका) यांचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर माणसे जिंकली; सत्ता केवळ उपभोगली नाही, तर तिचा उपयोग समाजाच्या तळागाळातील विकासासाठी केला. आजच्या राजकारणात पक्ष बदलणे आणि तत्त्वांशी तडजोड करणे सामान्य झाले असताना, आयुष्यभर निष्ठा, शब्द आणि विचार यांवर ठाम राहणारे विलास काका त्या दुर्मिळ परंपरेतील शेवटच्या पिढीतील नेते होते.

​उंडाळे ते विधानभवन : एका लोकनेत्याचा जन्म

​उंडाळे या छोट्याशा गावात स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पोटी विलास काकांचा जन्म झाला. घरातूनच लाभलेले स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार, समाजकारणाची प्रेरणा आणि जनतेसाठी झटण्याची वृत्ती यामुळे राजकारण हे त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचे साधन नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे माध्यम होते. लहानपणापासूनच गावागावातील लोकांशी मिसळण्याची आणि प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची वृत्ती पुढे त्यांच्या राजकीय यशाचा सर्वात मोठा पाया ठरली.

​सार्वजनिक जीवनाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून करणाऱ्या काकांना आबासाहेब वीर यांचे राजकीय मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या बदलामुळे काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. एखाद्या लाटेत एकदा-दोनदा निवडून येणे सोपे असते, पण सलग सात वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येणे ही केवळ राजकीय कामगिरी नसते; ती जनतेने त्यांच्या विकासाभिमुख राजकारणाला दिलेली सर्वोच्च मान्यता असते. यामागे कोणताही पैशाचा खेळ किंवा जातीय समीकरणे नव्हती, तर होता त्यांचा प्रचंड लोकसंपर्क!

​कराड दक्षिणचा विकास आणि सहकारातील आदर्श

​विलास काका आमदार झाले, तेव्हा कराड दक्षिण मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे होता. काकांनी हा प्रश्न केवळ निवडणुकीचा मुद्दा न बनवता आयुष्याचे ध्येय बनवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गावागावांत डांबरी रस्ते, समाजमंदिरे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सिंचनासाठी पाझर तलाव, बंधारे उभे राहिले. उंडाळे परिसर आणि डोंगरपट्टीतील एकेकाळी दुष्काळी असलेला भाग शेतकऱ्यांच्या कष्टाने आणि काकांच्या प्रयत्नाने हिरवागार झाला.

​मंत्रालयात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा वापर त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कधीच केला नाही, तर मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणण्यासाठी केला. राजकारणासोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग अनेक वर्षे नेतृत्व करताना त्यांनी आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा एक आदर्श निर्माण केला. सहकार क्षेत्रावर अनेकदा आरोप होतात, पण काकांच्या कारकीर्दीवर असा डाग कधीच लागला नाही.

​स्मरणातील विलासकाका : माणूस म्हणून अधिक मोठे

​विलास काकांच्या राजकीय कारकिर्दीचे विश्लेषण अनेकांनी केले असेल, पण मला लाभलेले त्यांचे सान्निध्य हे एका पत्रकाराच्या नात्याने नव्हे, तर एका माणसाच्या नात्याने अधिक समृद्ध करणारे ठरले. खरे सांगायचे तर, आमच्या संबंधांची सुरुवात फारशी गोड नव्हती. काही गैरसमजांमुळे सुरुवातीला माझ्यात आणि काकांमध्ये एक अंतर होते. पण काळ पुढे सरकला, गैरसमज विरघळले आणि त्यातून निर्माण झालेले नाते आयुष्यभर स्मरणात राहील असे बनले.

​"मोरेना बोलवा..."
एकदा अलंकार हॉटेलमधील एका गर्दीच्या कार्यक्रमात काकांनी सहज विचारले, "मोरे आले नाहीत का? मोरेना बोलवा..." तो क्षण माझ्यासाठी अनपेक्षित होता. त्यानंतर आमच्यातील अंतर पूर्णपणे संपले. कराडच्या बंगल्यावर ते आले की अनेकदा निरोप यायचा आणि मग चहाच्या कपावर राजकारण, सहकार, पत्रकारिता ते दिल्लीतील घडामोडींपर्यंत मनमोकळ्या गप्पा रंगायच्या.
​"मायलेज वाढवा..." – पत्रकारांसाठी गुरुमंत्र

काका पत्रकारांना केवळ बातमी देणारे लोक मानत नसत, तर समाजाचे अभ्यासक मानत. मला त्यांनी दिलेला सल्ला आजही तंतोतंत आठवतो:
​"मोरे, फक्त कराडमध्ये अडकून राहू नका. मायलेज वाढवा, पुस्तके वाचा, अभ्यास करा. पत्रकाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आल्या पाहिजेत. उद्या राहुल गांधी किंवा इतर राज्याचे मोठे नेते आले, तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधणार? अभ्यासाशिवाय दर्जेदार पत्रकारिता होत नाही." असे त्यांचे मत होते. मला प्रत्येक महिन्याला चांगली पेन्शन येते.‌ कराडचे पत्रकार येऊन जर अभ्यासासाठी ग्रंथालय काढणार असतील तर या पेन्शन मधून पत्रकारांसाठी वाटेल तेवढी पुस्तके मी तुम्हाला द्यायला तयार आहे, असं त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं.

​कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि पियूषचा प्रसंग

काकांच्या भाषेत राग असायचा, पण मनात अपार माया होती. कार्यकर्ता सामने आला की "अरे मूर्ख... कशाला आलास?" अशी प्रेमाची शिवी हासडण्याची त्यांची वेगळीच शैली होती. एकदा मी माझा मुलगा पियूषला त्यांना भेटायला घेऊन गेलो. त्याची कृश तब्येत पाहून काका मला हक्काने रागावले, "हा तुमचा मुलगा एवढा बारीक का? मोरे हे अजिबात बरोबर नाही.मुलाच्या तब्येतीकडेही लक्ष द्या." त्यांच्या या प्रेमळ रागामुळे पियूषने व्यायाम सुरू केला. वर्ष-दीड वर्षाने जेव्हा आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा त्याच्या सुधारलेल्या तब्येतीवर काकांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप त्यांच्यातील संवेदनशील पालकाची साक्ष देणारी होती.


​कोरोनाचा काळ आणि 'वडीलकीचा' फोन

कोरोनाचा तो भीषण कालखंड आपल्या सर्वांसाठीच अत्यंत वाईट होता. अहोरात्र जनतेच्या गराड्यात राहणाऱ्या विलास काकांसाठी हा काळ सर्वात मोठा आघात होता. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क तुटला आणि त्यांना घरात राहावे लागले. लोकांना भेटता न आल्यामुळे त्यांचे जणू 'टॉनिक' किंवा 'ऑक्सिजनच' कमी झाला होता. मीही त्या काळात त्यांना भेटू शकलो नाही.
​मात्र, या विलगतेच्या काळात मला काकांचा एक थक्क करणारा अनुभव आला. त्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात काकांचे मला जवळजवळ ६ ते ७ वेळा फोन आले! फोन आला की त्यांचा पहिला प्रश्न असायचा— "मोरे, कुठे आहात? तब्येतीची काळजी घ्या. कुठेही विनाकारण फिरू नका. पत्रकारिता नक्की करा, पण कोरोनाची काळजी घ्या, आजारी पडू नका."

​त्या संकटाच्या काळात कदाचित माझ्या सख्ख्या नातेवाईकांनीही मला इतक्या वेळा फोन करून माझी चौकशी केली नसेल, जेवढी काळजी काकांनी घेतली. काकांना घरात बसून जगातील सर्व बातम्या मिळत होत्या; पण या बातम्या गोळा करण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या पत्रकाराला कोणाची तरी साथ हवी, त्याची काळजी घेणारे कोणीतरी हवे, या भावनेतून एका हक्काच्या 'वडीलकीच्या नात्याने' ते मला फोन करायचे. हा प्रसंग माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा आहे.

​'भगीरथ' आणि शेवटची मुलाखत

​विलास काकांचे आयुष्य लोकांसमोर आणणाऱ्या 'भगीरथ' या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने मला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलाखती घेण्याची आणि काकांचा राज्यव्यापी प्रभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. यादरम्यान काका किती मोठे आहेत हे मोठ्या विभूतींच्या तोंडून ऐकावयास मिळाले.

​मी सातारा येथे त्यांच्या निवासस्थानी घेतलेली त्यांची सविस्तर मुलाखत 'दैनिक पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाली आणि ती प्रचंड गाजली. दुर्दैवाने, त्यानंतर काहीच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि ते आपल्यातून निघून गेले. ती मुलाखत त्यांच्या आयुष्यातील शेवटची प्रमुख मुलाखत ठरेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. ही जाणीव आजही मनाला अस्वस्थ करते.

​आजच्या राजकारणासाठी एक आदर्श
​२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपसह अनेक पक्षांनी त्यांना ऑफर्स दिल्या. पण काकांनी स्पष्ट सांगितले, "ज्या काँग्रेसमुळे मी मोठा झालो, तो पक्ष सोडणार नाही." त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण निष्ठा ढळू दिली नाही.

​आज सत्ता, पैसा आणि पदे असणारे अनेक नेते मिळतील; पण प्रत्येक गावात स्वतःचे हक्काचे माणूस उभे करणारा, कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा आणि पक्षापेक्षा तत्त्वांना मोठे मानणारा विलासराव पाटील उंडाळकर  यांच्यासारखा अजातशत्रू नेता पुन्हा होणे कठीण आहे. ते केवळ एक राजकारणी नव्हते, तर सातारा जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचे एक पर्व होते.

विलासकाकांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाची धुरा त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सांभाळली आहे. आज ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेची सेवा करत आहेत, काकांनी स्थापन केलेल्या, वाढवलेल्या संस्था सांभाळत आहेत. आजचे राजकारण हे विलास काकांच्या काळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, स्पर्धात्मक आणि बदलत्या समीकरणांचे झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीत आपल्या वडिलांचा आणि स्वातंत्र्यसैनिक आजोबा दादासाहेब उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा जपणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही.तरीही उदयसिंह पाटील-उंडाळकर हे आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या लोकसंपर्क, विकासाभिमुखता, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि पक्षनिष्ठेच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. 

काळ बदलला, राजकारण बदलले, काम करण्याच्या पद्धती बदलल्या; तरीही आपल्या घराण्याचा सामाजिक आणि राजकीय वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विलास काकांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे कठीण असले, तरी त्यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे,हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...