फॉलोअर

०२ डिसेंबर २०१७

Amitabh 6

१९८२ मधली ही गोष्ट .  मुंबई दूरदर्शनला असताना वरळी  ते माहीम  प्रवास करताना  प्रभादेवी -कॅडेल रोड ला एक फलक लक्ष वेधून घ्यायचा . त्यावर याचं छायाचित्र आणि गेट वेल सून या अर्थाच्या ओळी लिहिलेल्या असत . दिवस बदलला  की आज १५ वा दिवस ,३२ वा दिवस... धावणारी मुंबई  हा बोर्ड वाचून  थबकत असे  आणि मनातल्या  मनात तो लवकर बरा व्हावा  अशी प्रार्थना ही करत होती,अर्थात मी ही त्याला अपवाद नव्हतो .. माझ्या आयुष्यातल्या अनेक संध्याकाळी या अभिनेत्यानं हसीना केल्या आहेत आणि अजूनही  करत आहे मृत्यूशी झगडून हा बाहेर पडला आणि बघता बघता एक दंतकथा बनला ..   

एखादी व्यक्ती फेनॉमिना का होते हे शोधणं  हे नेहेमीच आव्हानात्मक असतं 
कारण यात त्या व्यक्तीचे गुण ,अवगुण ,सामर्थ्यस्थळं ,व्यक्तिमत्व आणि मुख्य म्हणजे त्या व्यक्तीच्या  व्यक्त होण्याच्या अनेक  छटांना समाज कसा आणि किती प्रतिसाद देतो;तो प्रतिक्रयात्मक असतो की तो सातत्यपूर्ण आणि सकारात्मक असतो, असे करताना त्या व्यक्तीला देवत्वाचे गूण चिकटवले जातात, का माणूस म्हणूनच त्याचं मूल्यमापन  झालेलं असत ,होत राहातं  अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेतला तर कदाचित आपण यांच्या उत्तराच्या आसपास पोहोचू शकू.
हो याचं मंदिर झालं आहे ,याच्या मूर्तीची नियमित पूजा करणारी भक्तमंडळी आहेत , हा बरा व्हावा म्हणून सिद्दीविनायक मंदिर,मुंबई  ते बडोदा असे  पायी अंतर उलटे चालत जात काटणारे अरविंद पंड्या सारखे भक्त  त्याला लाभले आहेत.  तरीही त्याच्यातला उमदा माणूस ,संवेदनशील नागरिक हा त्याला बहाल केल्या गेलेल्या देवत्वांपेक्षा किती तरी उंच आहे .
त्याला पडद्यावर  पाहिल्यावर पिटातले प्रेक्षक हर्षभरित होतात   आणि बाल्कनीत बसलेले रसिक ही सुखावतात ही सिनेसृष्टीतील क्वचितच घडणारी घटना त्याच्या बाबतीत खूप वेळा घडते.  पण दुसरीकडे हे ही सत्य नाकारता येत नाही की त्याच्या पडेल सिनेमाची संख्या ही लोकप्रिय चित्रपटांपेक्षाही जास्त आहे मग याचा ताळमेळ कसा लावायचा ... ?

काय आहे त्याच्यात जे दुसऱ्यात नाही ? आवाज ... राजकुमार पासून नाना पाटेकर पर्यंत आणि बलराज सहानी पासून अमरीश पुरी पर्यंत  अशी मोठी  यादी देता येईल ज्यांच्याकडे एक आकर्षित करणारा आवाज होता ..
हिरो मटेरियल ला लागणारं देखणेपण ही त्याच्याकडे नाही .....
उंची .. ही त्याची असेट कधीच नव्हती आणि नसेल किंबहुना अनेक व्यक्तिरेखा सादर करताना ती थोडी अडसरच बनली...
त्याच्याकडे आहे एक आत्मविश्वास .. जो त्यांनी कठोर परिश्रमांनी आणि अफाट स्वाध्याय करून कणाकणाने गोळा केला आहे .. तो इतका सूक्ष्म होता की तो आपल्याला चटकन जाणवला नाही पण पाहता पाहता त्या आत्मविश्वासाने त्याला अशा उंचीवर नेवून ठेवले की तिथपर्यंत आपली नजर पोहोचते आहे हे ही समाधान  थोडं नाही असंच आपल्याला वाटत राहतं .

त्याचा  अभिनय पाहणे हा एक देखणा उत्सव असतो .  खरं म्हणजे तो अभिनय करत नाहीच  पडद्यवरची व्यक्तिरेखा  तो  आपल्याला पटेल ,भावेल ,रुचेल अशीच आपल्या पुढ्यात आणून ठेवतो  मग तेव्हा तो त्याच्या आवाजाचे  भांडवल करत नाही, की भूमिका उत्तम समजली आहे अशी वेगळी चमक ही आपल्या डोळ्यातून दाखवत नाही आणि हे त्याचे न दाखवणे हेच त्याला त्या कथासूत्रात त्या भूमिकेच्या गौरीशंकर शिखरावर घेऊन  जाते .
एक इंडस्ट्री  मधला मित्र सांगत असे  हा  सर्वात कमी वेळात डबिंग पूर्ण करणारा हा  कलाकार आहे. (सिनेमात चित्रीकरणाचं वेळेला बोललेले संवाद ओठांच्या हालचाली पाहत पुन्हा ध्वनी मुद्रित करतात आणि हे करताना मूळ ढाच्यात , अवधीत एका फ्रेमचा ही बदल चालत नाही )
मी म्हणलो  अरे  'हे का ते असा संभ्रम नसलेला हा कलाकार आहे',   याला एकच भाषा येते आणि ती आहे सातत्याची भाषा ...

शिवाय याच्या अभिनयात त्याचं वाचन डोकावतं  ,त्याची जगाबद्दलची  असलेली उत्सुकता दिसते ,घरातील बाबूजींचे साहित्यिक  संस्कार , तेजी सारख्या बुद्धिमान आई कडून आलेली एक अश्वस्त करणारी जगण्याची शैली , अपयशाशी अनेकवेळा झालेली गळाभेट ,समोरच्याला गृहीत न धरण्याची एक आदबशीर अभिव्यक्ती आणि त्यातून  खऱ्या आत्मसन्मानाची झालेली जिवलग जवळीक या सगळ्याचा मिळून तयार झालेला अर्क तो गेली ४  तपे आपल्या भूमिकांवर शिंपडत आहे .
अस्तित्वासाठी धडपड ,सुलतानी संकटं ,जीवघेणी आजारपणं,दिवाळखोरी , अब्रू वेशीवर टांगणारे आरोप   यातून ही तो सुखरूप बाहेर पडला  का ,कसा याला ठोस उत्तर नाही पण   यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर .. मग हा थांबला नाही पुढे जात राहिला जिंकत  राहिला... आणि हे  त्याचं लढणं आजही त्याच जिगरीनं सुरु आहे. 
सटवाईनं त्याच्या कपाळावर हे कधीच लिहिलं नव्हतं ते त्यांनी स्वतः कोरलं , ते आता इतक्यात कुणाला या फिल्म इंडस्ट्रीत पुसता  येईल असं वाटत  नाही 'हम जहाँ खडे होते है वहासे  लाईन  शुरु  होती है ' असं  ज्याला कधी सांगावं  लागलं नाही तो हा या फिल्म जगताचा बेताब बादशहा .शहेनशहा अमिताभ ...
'अमृत' या शब्दाला आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानं   .. एक वेगळी  झळाळी  देणारा ...
बहुत सारी शुभकामनाए अमितजी ! - माझे मित्र श्री उल्हास साठे , फलटण ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...