फॉलोअर

१५ सप्टेंबर २०२६

माझे दादा...९५ वर्षाचा संघर्ष प्रवास

माझे दादा : ९५ वर्षांचा न संपणारा संघर्ष

वसंतराव सखाराम मोरे... म्हणजे माझे दादा.

१५ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले माझे दादा आज वयाच्या ९५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या आयुष्याचा हा प्रदीर्घ प्रवास मी यापूर्वी अनेकदा माझ्या ब्लॉगवर लिहिला आहे. तरीही दादांबद्दल लिहायला बसलो की शब्द अपुरे पडतात. कारण दादांचे आयुष्य म्हणजे केवळ ९५ वर्षांचा काळ नाही; तो आहे संघर्ष, कष्ट, जिद्द आणि जगण्याच्या अदम्य इच्छेचा प्रवास.

या प्रवासात त्यांनी यश पाहिले, अपयश अनुभवले, अपमान सहन केले, अनेक चढ-उतार पाहिले. पण परिस्थितीसमोर कधी शरणागती पत्करली नाही. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत त्यांनी आम्हा पाच मुलांना वाढवले, शिकवले आणि चांगले संस्कार दिले.

उपजीविकेसाठी त्यांनी आयुष्यात अनेक कामे केली. ओगले ग्लासमध्ये फोरमन म्हणून काम केले. त्याचबरोबर प्रिंटिंग प्रेस, किराणा व स्टेशनरीचे दुकान, पेपर एजन्सी, रेडिओ-स्पीकरचा व्यवसाय, मंडपाचा व्यवसाय असे अनेक उद्योग केले. काम कोणतेही असो, कष्ट करण्यात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. नव्वदाव्या वर्षापर्यंत त्यांनी दुकान चालवले, हे त्यांच्या कामावरील प्रेमाचेच उदाहरण.

त्यांच्या जगण्याच्या पद्धतीतही एक वेगळी शिस्त होती. तंबाखू नाही, व्यसन नाही, मांसाहार नाही. गेली ५५ वर्षे मी त्यांना जवळून पाहतो आहे. राग आला तरी त्यांच्या तोंडून ‘मूर्ख’ किंवा ‘गाढव’ यापलीकडे फारसे काही ऐकायला मिळाले नाही. करवडीच्या वातावरणात राहूनही शिवराळ भाषा त्यांच्या स्वभावाचा कधी भाग झाली नाही. चांगला मित्रपरिवार, साधी जीवनशैली आणि सकारात्मक विचार यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.

पाच वर्षांपूर्वी दादांचा ९०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याआधीच त्यांना हृदयविकाराचा गंभीर त्रास झाला होता. अँजिओप्लास्टी झाली होती. त्यामुळे त्या वेळी त्यांनाही आपल्या आयुष्याबद्दल शंका वाटत होती. वाढदिवसाच्या दिवशी ते सहज म्हणाले होते, “आता माझं काय? बहुतेक माझं आयुष्य संपलंय.”

पण दादांचा स्वभावच वेगळा.

मृत्यूचा विचार करण्यापेक्षा त्यांनी पुन्हा जगण्याचा विचार केला.

गेल्या पाच वर्षांत त्यांनी नव्या जिद्दीने स्वतःला सावरले. फिरणे, लोकांना भेटणे, गप्पा मारणे आणि सतत काही ना काही करण्याची इच्छा त्यांनी कायम ठेवली.

वयाच्या ९०व्या वर्षी झालेल्या अँजिओप्लास्टीच्या वेळी डॉक्टर प्रशांत पवार यांनी एक सुंदर निरीक्षण केले होते—“शरीर जरी ९० वर्षांचे असले, तरी मन मात्र ६० वर्षांचे आहे.”

दादांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. डॉक्टरांचा तो आत्मविश्वास मला आजही आठवतो. कदाचित त्यामागे दादांची जगण्याची जिद्दच होती. ज्याने आयुष्यभर हार मानली नाही, त्याला शरीरानेही साथ दिली असावी.

अलीकडेच वडगाव हवेली येथे मोरे भावकीतील एक लग्नाचा मोठा कार्यक्रम झाला. दादांनी यावे, अशी गावातील अनेकांची इच्छा होती. मात्र त्यांना प्रवास आणि पायऱ्या झेपतील का, याची घरच्यांना काळजी होती. पण दादांनी जायचे ठरवले आणि ते ट्रॅव्हल्सने लग्नाला गेले. मंगल कार्यालयातील पायऱ्या त्यांनी दोनदा चढल्या-उतरल्या.

९५ वर्षांचा माणूस पँट-शर्ट घालून स्वतः गाडीत बसतो, उतरतो, प्रवास करतो आणि लग्नसमारंभाला जाऊन लोकांमध्ये मिसळतो—हे दृश्य पाहताना त्यांच्या आयुष्याची ताकद जाणवते.

आजही दादांना घरात बसून राहणे आवडत नाही. सकाळी उठून ते एसटी स्टँडकडे जातात. कधी इस्री दुकानाच्या खोक्यात बसतात. आमच्या घरासमोरच्या मेडिकल दुकानासमोरही त्यांची नेहमीची जागा आहे.

तिथे लोक येतात. दादांशी गप्पा मारतात. जुने अनुभव सांगतात. एखादी घटना आठवतात. विशेष म्हणजे तरुण मुलेसुद्धा कधी कधी दादांकडे आशिर्वाद मागायला येतात.

९५व्या वर्षीही एखाद्याला आपल्या अनुभवातून दिशा देता येणे, हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे.

दादांची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांची शिकण्याची वृत्ती. आजही ते मोबाईलवर यूट्यूब पाहतात. सदगुरू वामनराव पै यांची व्याख्याने आणि विविध प्रेरणादायी विचार ऐकतात. मन अजूनही काहीतरी नवीन करण्यासाठी धडपडते. एखादा व्यवसाय करावा, उद्योग करावा, अशी इच्छा आजही व्यक्त करतात. आम्ही मात्र आता त्यांना सांगतो—“आता आराम करा.”

पण मनाला वय नसते, हे दादा रोज सिद्ध करतात.

माझ्या आयुष्यात जेव्हा काही अडचण येते, काही गोष्ट मनासारखी घडत नाही किंवा मन खट्टू होते, तेव्हा मी दादांना भेटायला जातो. त्यांच्याकडे पाहिले की माझ्या मनातील अनेक प्रश्न आपोआप छोटे वाटू लागतात.

माझा मुलगा आज न्यूझीलंडमध्ये आहे. तोही आपल्या आयुष्यातील संघर्षातून जात आहे. त्याच्याशी बोलताना मी अनेकदा दादांचे उदाहरण देतो.

“तुझे आजोबा ९५ वर्षांचे आहेत. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि आजही जगण्याची जिद्द सोडलेली नाही. मग तू का हार मानतोस?”

हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील “जितनी जिंदगी है, उतना संघर्ष है” हा विचार मला कायम प्रेरणा देतो. दादांचे आयुष्य म्हणजे त्या विचाराचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

दादांवर माझा जीव आहे आणि दादांचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. आमचे नाते आजही तितकेच घट्ट आहे. माझा थोरला भाऊ हनुमंत (आण्णा) करवडीमध्ये दादांची खूप सेवा करतो. वहिनी,आई आणि  सुन, माझे चुलते नाना, महादेव (भाऊ) घरातील सर्वजण त्यांची काळजी घेतात. मीही आठवड्यातून दोन-तीन वेळा दादांना भेटायला जातो. आम्हा पाचही मुलांच्या मनात दादांविषयी कृतज्ञता आणि आदर आहे.

कारण त्यांनी आमच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले.

त्यांनी आम्हाला केवळ वाढवले नाही, तर जगण्याची पद्धत शिकवली.

अपयश आले तर खचायचे नाही.
परिस्थिती कठीण झाली तर थांबायचे नाही.
आणि आयुष्याने कितीही परीक्षा घेतल्या तरी जगण्याची उमेद सोडायची नाही.

आज करवडीमध्ये दादांच्या वयाचे फारच मोजके लोक आहेत. पण त्यांची खरी ओळख त्यांच्या वयात नाही; ती त्यांनी आयुष्यभर जोडलेल्या माणसांमध्ये आहे. आजही लोक त्यांना आवर्जून भेटतात, त्यांच्याशी बोलतात, सल्ला घेतात. माणसांच्या मनात मिळवलेली ही जागा हीच दादांची सर्वात मोठी संपत्ती आहे.

दादांनी आयुष्यात खूप काही सहन केले. पण ते कधी झुकले नाहीत, वाकले नाहीत. संकटांनी त्यांना थकवले असेल, पण मोडले नाही.

म्हणूनच माझ्यासाठी दादा केवळ माझे वडील नाहीत; ते माझे प्रेरणास्थान आहेत.

आज त्यांच्या ९५व्या वाढदिवशी माझ्या मनात एकच भावना आहे—

असा दमदार योद्धा बाबा मला जन्मोजन्मी मिळो!

दादा असेच ठणठणीत राहोत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम राहो. त्यांची जगण्याची जिद्द अशीच अखंड राहो.

दादांना उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.

दादा, ९५व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

तुमचा मुलगा असल्याचा मला सदैव अभिमान आहे.

सतीश मोरे करवडी

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...