🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩
*सतीश मोरे*
karawadikarad.blogspot.com
*लोणंद*
*०२/०७/२०१९*
राम कृष्ण हरी,
Also available at
👇karawadikarad.blogspot.com
नीरा नदीच्या काठी निरा गावात राहण्याचा
अनुभव खरच वेगळा होता. सकाळी सर्व विधी आटोपले.
माऊलीं नीरास्नान ज्या ठिकाणी होणार आहे त्या नीरा नदी काठी पुलावर आलो .नीरा
पुल पुणे जिल्ह्याच्या हद्दीत तर पुल संपल्यानंतर
सातारा जिल्हा लागणार होता. सात दिवसानंतर आपल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार होतो.
समोरच पुलाच्या शेवटी सातारा जिल्ह्यात आपले स्वागत करत आहे असा बोर्ड लावला होता.
सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी नदी पुलावरून पात्राचे दर्शन घेतले.
निरेच्या पात्रांमध्ये वारकरी स्नान घेत
होते .वरुन धो धो पाऊस पडत होता. निरा पुलावर वारकऱ्यांची गर्दी होती. हे सर्व मोकळ्या
समाजातील वारकरी पुढे येऊन आपल्या सकाळच्या सर्व विधी करण्यासाठी निवारा शोधत होते.
काल रात्री नीरा पुलावर पाहणी करायला
आलो तेव्हा पुलाच्या फुटपाथवर असणारा चिखल व घाण याबाबत सातारच्या कलेक्टर श्वेता सिंघल
यांना फोन करून कल्पना दिली होती. सिंगल मॅडम याची तात्काळ दखल घेत स्वच्छता करण्याचे
आदेश संबंधितांना दिल्याचे पूल स्वच्छ झालेला पाहून लक्षात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी
सातारा जिल्हा प्रशासन असो वा पुणे-सोलापुर
प्रशासन असो कायमच कार्य करत असते. माऊलींचा सोहळा सुसह्य होण्यासाठी प्रशासनाचे
मिळणारे सहकार्य खरच उल्लेखनीय असते. जिल्हा परिषद पंचायत समिती पोलीस यंत्रणा महसूल
विभाग आरोग्य विभाग शेती विभाग या सर्व विभाग वारकऱ्यांच्या सोयीसाठी सदैव कार्यक्रम
असतात वारकऱ्यांना काही कमी पडू देत नाहीत. नीरा नदीकाठी वैष्णवांचा भरलेला मेळा पाहून
खूप आनंद झाला.
पुढे येऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.
आलो आपल्या जिल्ह्यात असे म्हणत सर्व मित्रांनी आनंद व्यक्त केला. लोणंद मध्ये येत
असताना रस्त्याकडेला नेहमीप्रमाणे अनेक ओळखीचे पोलीस कर्मचारी भेटत गेले. अधिकारीही
दिसले. दुपारी लोणंद मध्ये पोहोचल्यानंतर गजानन प्लॅनेट्सचे विवेक राव यांच्या घरी
जाऊन चहा पाणी घेतले. माऊलीची पालखी यावेळी निरा स्नानासाठी नदीपात्रात नदीकाठाला होती,
अतिशय भावपूर्ण वातावरणात माऊलींना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले.सहाच्या सुमारास
माऊलींची पालखी लोणंद मध्ये पोहोचली. लोणंदकरानी माऊलींचे भक्तिभावात स्वागत केले.
नेहमीप्रमाणे लोणंदमध्ये ही माऊली पोहोचल्यानंतर थोडा पाऊस पडला.
लोणंदच्या पुढे असणाऱ्या चांदोबाचा लिंब
येथे आमचे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पुढे चालत चार किलोमीटर अंतरावर
डॉक्टर काकडे यांच्या आत्मश्री आयुर्वेदिक केंद्रामध्ये आलो.
माऊलीच्या नामघोषात गेल्या सात दिवसांपासून
पंढरीच्या वाटेचे अंतर कसे कमी होत आहे हेच कळत नाही. तरीपण सातारा जिल्हा आल्यानंतर
आपल्या गावात आल्याचा आनंद खूप होत आहे. लोणंदला आल्यानंतर वारकरी आज दीड दिवस थांबणार
आहेत. इथे लोणंदच्या पाठीमागे आणि पुढे अनेक गावात वारकरी मुक्काम करत आहेत. वारकऱ्यांच्या
सेवेसाठी स्थानिकांनी मोफत चहा पाणी पिण्याचे पाणी याची व्यवस्था केली आहे. लोणंद मध्ये
अनेक ठिकाणी प्रशासनाने पाण्याचे टँकर उभे केले आहेत.
एकंदरीत आजचा दिवस खुप छान .
माऊलीची कृपा दुसरे काय !
🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा