फॉलोअर

३० जून २०१६




🚩🚩🚩  माझी वारी 🚩🚩🚩
पुणे सतीश मोरे
मंगळवारी  माऊली पालखी प्रस्थान सोहळा डोळे भरून पाहिला  आणि मठात येऊन निवांत बसलो. दुपारी हेवी जेवण झाल्यामुळे आणि सोहळा पाहून पोट भरले असल्याने भुक लागली नव्हती.  तरीही तारूखच्या कुलकर्णी काकानी आग्रह धरला, नव्हे द्रोण पत्रावळी,  भात आणि भाजी घेऊन आले.  थोडा भात खाल्ला आणि झोपण्याची तयारी केली. दहा वाजताच्या सुमारास पडलो,  झोप लागत नव्हती,  डोळ्यासमोर फक्त माऊलीची पालखी आणि वारकरी दिसत होते.

सकाळी  उठून लवकर निघायचे होते.  रात्री दोन तीन वेळा जाग आली,  फक्त घड्याळात पाहिले पुन झोपलो. साडे तीन वाजता शेजारी गजर झाला,  पटकन जागा झालो. अंगात थोडी कणकणी होती,  जाणवले. इंन्दायणी मध्ये  स्नान करायला जायचे रद्द करून फ्रेश होऊन तयार झालो.  साडेचार वाजता सहकारी सोबत बाहेर पडलो.  माऊली मंदिर शिखराचे दर्शन घेतले,  नदीमध्ये अनेक जण स्नानासाठी उतरले होते.  नदीचा पुल पार करून पुणे रस्ता पकडला.
पालखी  सकाळी सात वाजता  आळंदीतून निघणार होता.  पहिल्या दिवशी यामध्ये जायचे नव्हते.  मी मोकळा समाजातून जायचे ठरवले होते.  रस्त्याला लागलो.


नुकताच जोरदार पाऊस पडला होता, आळंदीमधील सर्व रस्ते चिखलमय झाले होते. पहाटे  अंतर उरकते म्हणून बाहेर पडलेले वारकरी  रस्त्यावर , नदीत स्नान करण्यासाठी निघालेले वारकरी , स्नान करून बाहेर पडणारे वारकरी या सर्वाची रस्त्यावर लगबग सुरू होती. पाठीवर सॅक , डोक्यावर टोपी घालून मी चालायला लागलो. रस्त्यावर एका बाजूला पुण्याकडे जाणारे वारकरी यांचा प्रवाह तर  डावीकडे दिंड्याचे साहित्य घेऊन जाणारी अवजड वाहने,  ट्रक याची लाईन लागली होती .
झानेश्वर माऊली,  तुकोबा महाराज यांच्या नावाचा जयघोष,  राम कृष्ण हरी चे स्मरण, हाताने टाळी वाजवत वारकरी चालत होते.  रस्त्यावर खुप चिखल होता,  काही ठिकाणी पाणी पण साठले होते.  यातून मार्ग क्रमण करत वारकरी चालले होते.  एकमेकांना दाटून, आपला ग्रुप धरून जात होते,  दिंडीचे चोपदार कोणालाही रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊ देत नव्हते. अंधारात कोणी चुकून जाऊ नये,  हरवू नये म्हणून काही दिंड्यानी एल ईडी दिव्याची माळ काठीला बांधली होती. 

 अंतर उरकत होते, वारकरी चालत होते. पायात साधे चप्पल, स्लिपर किंवा साधा सॅन्डल . या चपल्यामुळे अनेकांच्या कपड्यावर, साडीवर,  धोतरावर चिखलाची रांगोळी झाली होती.  रस्त्यावर झालेल्या रबडीमुळे पाय घसरत होता,  गती कमी होत होती,  पण थांबता येत नव्हते.  एक तर बाजूला व्हा, पण तसे केले तर ग्रुप पुढे जातो,  त्यामुळे  आहे त्या परिस्थितीत वारकरी चालत होते , अंतर जवळ करत होते. 
आता साडे पाच वाजले होते, थोडं दिसायला लागले होते,  थोडं दमलो होतो , शुजचे लेस पण लुज झाले. थांबायची इच्छा झाली,  बाजूला आलो.  चहाची टपरी बघितली, खुर्ची वर जाऊन बसलो.  कटींग चहा मागितला.   आय टी दिंडीतील पाचपन्नास युवक युवती तिथे आले.  त्याची माहिती घेतली गप्पा मारल्या.  वास्तविक  या दिंडीच्या  एका व्हाॅटसअप  ग्रुपमध्ये मी वर्षभर मी आहे.  खुप चांगले लोक आहेत.
पुन्हा चालायला लागलो.  दिघी गाव आणि मिलिटरी एरिया सुरू झाला,  रस्त्याकडेला सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक  नेत्यांनी मोफत चहा, नाश्ता उपलब्ध केला होता.  काही वारकरी तेथे जात होते,  आंघोळी साठी शाॅवर पण सोय होती.  मिलिटरी  एरियातून जाताना दोन्ही बाजूला सैनिक, त्याची वाहने, त्याचा ड्रेस रूबाब पाहून खूप हेवा आणि आनंद झाला. 

 
चालत चालत अंतर बरंच कापलं होतं, अजुनही पुणे 12 किलोमीटर अंतरावर होते.  माऊलीमय वातावरण, संताची सोबत आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ लागली होती . त्यामुळे अंतर कसे पार पडले कळलं नाही. उंच  इमारती दिसू लागल्या, गर्दी झालेली होती.  रस्त्यावर बॅरीकेटस लावून वाहतूक बंद करण्यात आली होती,  वारकरी सुरक्षित जावा,  दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी खुप सुंदर नियोजन केले होते.
नऊ वाजले होते. साडे चार तास चालत होतो. बरंच अंतर पार पडले होते, आवाक्यात  आले होते. पालखी जिथे मुक्काम करते ते ठिकाण भवानी पेठ पाच सहा किलोमीटर अंतरावर होते.  मला मुक्कामाला कात्रज कोंढवाला जायचे होते,  बसची चौकशी केली.  पोलिसांनी पुढे दोन किलोमीटर खडकी जवळ बस मिळेल असे सांगितले.
येरवडा हद्दीत प्रवेश करण्या पुर्वी आंबेडकर उडान पुल,  अनेक रस्ते  एकत्र येऊन झालेला चौक लागतो,  तेथे पोहचलो.  एका छोट्या हाॅटेलात जाऊन नाश्ता केला. पुन्हा चालू लागलो.  इन्द्र धनुष्य बस सेवा सुरू होती.  बस पकडली. बारा वाजता सासुरवाडी मुक्कामी पोहचलो.

पाच तास सुमारे 27 किलोमीटर चाललो होतो,  थोडा थकलो होतो.  बातमी  लिखाण करायचे काम सुरू केले.  दिड वाजता बातमी मेल केली. जेवण झाल्यावर निवांत पडलो.
आज, उद्या गुरुवार पुण्यातच मुक्काम.









- सतीश मोरे,कराड 
  9881191302
     माऊली माऊली





 

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
सतीश मोरे
Read my blog
http//karawadikarad.blogspot.in/  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...