फॉलोअर

०१ जून २०१६

सिक्कीम राज्य निर्माण : चौघा महाराष्ट्रीयन दिग्गजाचे योगदान

गगंगटोक

पश्चिम महाराष्ट्रातील कोकण प्रवेशद्वार म्हणजे पाटण तालुका. या तालुक्यातील मारुल हवेली गावातील शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती सिक्किम राज्याच्या उच्च पदावर राज्यपालपदी विराजमान झाली आहे . श्रीनिवास पाटील राज्यपाल झाले आणि आपणा सर्वांना  सिक्किम राज्य आपलं वाटू लागलं. यापूर्वी सिक्किम हे भारतातील एका राज्यापैकी एक अशी आपली ओळख होती. घटनात्मकदृष्टया राज्यपालपद फार मोठे आहे. राजकारणातून निवृत्त झालेल्या व्यक्ति राजकीय सोय करण्यासाठी राज्यपाल पदावर नेमणूक केली जाते. हा या पदाचा आजपर्यंतचा इतिहास आहे, यात तथ्यही आहे. मात्र सिक्किमसारख्या संवेदनशील राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक करताना आतपर्यंतचा इतिहास पाहिला तर केवळ उच्च विद्याविभूषित व्यक्तिंनाच संधी मिळाली आहे.
आयएएस ऑफिसर, इंग्लिशवर प्रभूत्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सखोल अभ्यास याचा विचार करूनच सिक्किमचे राज्यपाल नियुक्त झाले आहेत. श्रीनिवास पाटील यांची नियुक्ती याच निकषावर झाली आहे. महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यामुळेच महाराष्ट्रीयन पर्यटकांचा ओढा तिकडे वाढला आहे.  राजभवनामधील शाही पाहुणचार हे ही त्यामागचे गोड कारण आहे.




औंध पंतप्रतिनिधी

श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेतून राजीनामा देवून बाहेर पडले आणि थेट कराड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उतरले. 1999 आणि  त्यानंतर 2004 असे सलग दोनदा ते मताधिक्याने निवडून गेले. या कालावधीत त्यांनी खासदार फंड काय असतो आणि खासदार फंडाशिवायसुद्धा इतर निधी किती प्रमाणात आणता येतो हे दाखवून दिले. विकासकामांबरोबरच श्रीनिवास पाटील यांनी खासदार झाल्यांनतर वेगळ्या शैलीमुळे जनसंपर्क वाढविला, ओळखी वाढविल्या, प्रत्येक गावात खुमासदार शैलीत भाषण करून अनेकांना आपलंसं केलं.

बोलणारा, काम करणारा, सहज उपलब्ध असणारा खासदार कराड मतदारसंघाला लाभला. 2009 साली लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये कराड मतदारसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले. वास्तविक मतदारसंघ पुनर्रचना कमिटीमध्ये स्वत:  श्रीनिवास पाटील होते. कराड मतदारसंघ वाचवायचा असेल तर कराडला कोकणचा काही  भाग जोडावा लागला असता आणि कराड-सातारा जवळीकता कमी झाली असती आणि हे होऊ नये म्हणून श्रीनिवास पाटील यांनी त्यात बदल सुचवले.  सातारा आणि माढा असे दोन लोकसभा मतदासंघात जिल्हा विभागला गेला.

कराड मतदारसंघाचे अस्तित्व संपल्यानंतर अभ्यासू  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संधी देण्यासाठी  राजकीय ताकद पणाला लावून त्यांना सिक्किमच्या राज्यपालपदी सन्मानित  केले. ओळखीने, शिफारसीने, दबाव टाकून अथवा इतर मार्गाने कोणतेही पद, नोकरी मिळविता येते. मात्र ते टिकविण्याचे, वाढविण्याचे, समृद्ध करण्याचे आणि त्या पदाची उंची वाढविण्याचे काम त्या व्यक्तिलाच करावे लागते.उच्च विद्याविभूषित श्रीनिवास पाटील यांनी तेच केले.



सिक्किम राज्याला विशेष दर्जा आहे. 1975 साली हे राज्य भारतात सहभागी झाले. वास्तविक या भूभागावर पहिल्यापासूनच चीनचा डोळा होता. सिक्किमच्या राजाच्या ऐशोआराम कार्यपद्धतीला कंटाळून  या राज्यातील नागरीक भारतात सहभागी झाले. नेपाळ, चीनव्याप्त तिबेट या देशांनी सिक्किमला वेढले आहे. चीनचा धोका आणि घुसखोरी याचा विचार करून सिक्किममध्ये भारताने मोठा लष्करी तळ उभारला आहे. संरक्षक विषयक गुप्त माहिती, ज्ञान आणि अवलोकन असणारा राज्यपालच या राज्यात नेमला जातो.
राज्यातील जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले सरकार असते. मात्र संवेदनक्षम अशा सिक्किमसारख्या सर्व पूर्वोत्तर राज्यांत राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. या राज्यपालांचा सतत थेट राष्ट्रपतींशी संपर्क आणि संवाद असतो. राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असल्यामुळे या राज्यपालांकडून संरक्षक विषयक  मिळालेल्या माहितीवरून देशाचे संरक्षणात्मक धोरण व उपाययोजना राबविल्या जातात. अशा उच्च पदावर श्रीनिवास पाटील यांचे नेमणूक होणे हा खरंच मराठी माणसाचा सन्मान आहे. सिक्किमच्या निर्मितीपासून आजअखेर 4 दिग्गज मराठी व्यक्तिंनी या राज्याच्या विकासासाठी आणि वाटचालीसाठी योगदान दिले आहे.


सिक्कीम हा स्वतंत्र देश होता. या देशावरही भारताप्रमाणे इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारचे भारताचे राजकिय राजदुत म्हणून 1952 ते 1958  दरम्यान  महाराष्ट्रातील औंध संस्थानचे आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी काम पाहिले आहे.  1952 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम देशाला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रतिनिधी त्याचेसमवेत होते. दरम्यान 1957 मध्ये पंडित नेहरू कन्या  इंदिरा यांना घेऊन सिक्कीमला आले होते.  येथून पुढे ते ल्हासा (तिबेट ) येथे गेले होते.  तत्कालीन सरंक्षण मंत्री व्हि. के.  कृष्णन मेनन त्याच्या समवेत होते. पंतप्रतिनिधी यांच्या रूपाने मराठी माणसाने सिक्कीम देशात कारभार पाहिला होता.



1975 साली सिक्किमच्या जनतेने भारतात सामिल होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सार्वमत चाचणी घेण्यात आली. 98 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्याला पाठींबा दिला. सिक्किम राज्याचा सार्वमताचा हा ठराव त्यावेळचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत मांडला. सिक्किमच्या जनतेची मागणी यशवंतराव चव्हाण यांनी या ठरावाद्वारे सभागृहासमोर मांडली. लोकसभेने बहुमताने यास मान्यता दिल्यानंतर 16 मे 1975 साली सिक्किम भारतात सहभागी झाले. त्यामुळे सिक्किम राज्य निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.



 महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या होमी तल्यार खान यांनी 1981 ते 1984  सिक्किम राज्यपाल म्हणून काम पाहिले .अभ्यासू खान यांनी त्या काळात चांगले कार्य केले होते. 20 जुलै 2013 पासून श्रीनिवास पाटील सिक्किम राज्यपाल  आहेत. सिक्किम देश  आणि राज्याशी राजकिय आणि घटनात्मकदृष्टया संबंध असलेले हे चौथे मराठी व्यक्ति आहेत.
दोन वर्षे 10 महिन्यांपूर्वी श्रीनिवास पाटील सिक्किमचे राज्यपाल झाले. त्यानंतर त्यांनी  लोकनियुक्त पवनकुमार चामलिंग यांच्या सरकारमधील मंत्री, स्थानिक लोक, विरोधी पक्ष आदी सर्वांना विश्वासात घेवून आपलेसं केलं आहे. "मिशीवाला बडा साहब' अशी त्यांची राज्यभर ओळख झाली आहे. सिक्किमची संस्कृती जपण्याबरोबरच वाढविण्यासाठी स्थानिक जनतेत मिसळून काम करणारा आपला राज्यपाल असे त्यांचे काम आहे.

रराज्यपाल तल्यार खान



श्रीनिवास पाटील सिक्किम राजभवनामध्ये राहतात. वास्तविक राजभवनात स्थानिक जनतेचे काही काम नसते, किंवा खुप कमी असते. तरीही राजभवन सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय श्रीनिवास पाटील यांनी घेतला आणि त्यामुळेच  रोज किमान 50 लोकांना राज्यपाल भेटतात. महाराष्ट्रातील लोकांना तर राजभवनाचे खुले आमंत्रण असते.
"पुढारी'च्या माध्यमातून गेली 20 वर्षे सातारा जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांशी माझे जवळचे संबंध राहिले आहेत. खासदार पदाच्या कालावधीत श्रीनिवास पाटील अनेकदा "पुढारी' वर्धापन दिनासाठी उपस्थित राहिले होते. पुढारी परिवारातील सर्व सदस्यांना ते नावाने ओळखतात. सिक्किमला अवश्य या! असे त्यांचे अनेक दिवसापासून आग्रहाचे निमंत्रण होते. गेल्या दोन वर्षांत कराड, पाटण तालुक्यातील सुमारे 2000 लोक सिक्किमला जाऊन आले आहेत. आपण पण गेलेच पाहिजे  अशी मनापासून इच्छा होती.  ती पुर्ण झाली.


3 हजार मिलोमीटर अंतर पार करून आपल्या  इकडचा माणूस जेव्हा सिक्किमला जातो तेव्हा त्याची पहिली इच्छा असते, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना भेटायची. एवढ्या लांबून आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, राज्यभर फिरण्यासाठी मार्गदर्शन करणे हे करण्यासाठी राजभवनमधील स्टाफ आनंदाने तयार असतो. इस्टेट मॅनेजर तारासिंग तसेच किचन स्टाफ काही कमी पडू देत नाहीत.  नवीन राजभवन सर्कीट हाऊस इमारत देखणी आहे.  या इमारतीच्या टेरेस वरून कांचनगंगा पर्वत रांगांचे दर्शन होते.  अतिशय सुंदर नजारा आहे तो!  या ठिकाणी पन्नासएक वातानुकूलीत सुट आहेत . राजेशाही थाटात इथे राहण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच म्हणायचे. येथे अतिशय उत्तम जेवणाची सोय आहे. अतिशय प्रशस्त दिवानखाना , हाॅल आहेत.  इमारतीचे बांधकाम अलीकडेच झाले आहे, लुक जुन्या पद्धतीचा आहे. खुप छान सोय केली जाते, सर्व पाहुण्यांची !



इथं येणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी राज्यपाल  श्रीनिवास पाटील स्वत:  बोलतात , वेळ देतात. लहान-मोठ्या सर्वांची आपुलकीने चौकशी करतात. हा आजपर्यंत जाऊन आलेल्या सर्वांचा अनुभव आहे. पुढारी पत्रकार म्हणून त्यांनी मला खूप प्रेम दिले. राजभवनमध्ये आयोजित न्यायमुर्ती शपथविधी कार्यक्रमाचे मला विशेष निमंत्रण होते. हा माझा आणि "पुढारी'चा सन्मानच आहे, असे मी समजतो.
नियोजित सुचनेनुसार दुपारी 1 वाजता  सहकुटुंब मी राजभवनवर पोहोचलो.
सोबत साडू दिलिप आणि मेहुणी पिंकी होती. वेळेत पेाहोचा... वेळ पाळा.. तुम्ही फार मोठे व्हाल! हा फार मोठा मंत्र श्रीनिवास पाटील यांनी अनेकदा दिला आहे.
ते स्वत: वेळ पाळण्यात सुरूवातीपासूनच दक्ष असतात. आम्ही वेळेत पोहोचलो. राजभवनाबाहेरील सुरक्षा रक्षकांनी तपासणी केल्यानंतर आम्ही पाहुणे कक्षामध्ये जाऊन बसलो.  अतिशय सुंदर सजविलेल्या या कक्षात भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांचे सुंदर तैलचित्र लावलेले होते. पाचच मिनीटांत शाही थाटातील चहा-पान झाले.



थोड्याच वेळात रुबाबदार शैलीत राज्यपालांचे या कक्षात आगमन झाले. आल्या-आल्या सर्वांना नमस्कार केला. आम्ही सर्वजण या वडिलधारी दिग्गजासमोर नतमस्तक झालो. एका सहाय्यकाला त्यांनी हळदी-कुंकू करंडा द्यायला सांगितला. माझी पत्नी आणि मेहुणीने एकीमेकीला हळदी-कुंकू लावले. मी चाटच पडलो. एवढ्या लांब आल्यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम तोही राजभवनात पहायला मिळेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
भगवान गौतम बुद्धांची आकर्षक मुर्ती, पांढरं उपरणं देवून आम्हा दोन्ही कुटुंबियांचा त्यांनी सत्कार केला. माझ्यासाठी खास वेगळी भेट म्हणून ड्रॅगनचे सुंदर शिल्प असलेनं टेबल पेन होल्डर  दिला. कुटुंबातील सर्वांची आपुलकीने चौकशी केली.कसलीही राजकीय चर्चा न करता केवळ जुन्या आठवणींमध्येच आमच्या गप्पा रंगल्या. पुढारीकार ग. गो. जाधव यांच्या आठवणी जागवल्या. संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी पुढारी खुप  मोठ्ठा केला आहे,  कष्ट घेतले  आहे,  असे  साहेबांनी सांगितले. माझा मुलगा पियुष आणि देवयानी यांची चौकशी केली, पुढे काय होणार हे विचारले. सौ विद्या यांच्या शाळेची माहिती घेतली.




रिलायन्स आणि एल ऍन्ड टी मध्ये  काम करणारे माझी मेहुणी आणि साडू यांच्या कंपनीतील दिग्गज अधिकाऱ्यांची नावे, अनुभव, किस्से सांगितले. धिरुभाई अंबानी यांच्यासोबत झालेली भेट सविस्तर कथन केली. त्यानंतर राज्यपालसाहेब आम्हाला त्यांच्या मुख्य कार्यालयीन केबिनमध्ये घेवून गेले.
दोन्ही बाजूला तिरंगे, भिंतीवर राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे फोटो, त्यासमोरील टेबलावर सिक्किमचा नकाशा असा आगळा-वेगळा रूबाब पहायला मिळाला. श्रीनिवास पाटील यांच्या ऑफिस टेबलवर यशवंतराव चव्हाण यांचा  फोटो होता. त्याचबरोबर आई-वडील, जवळचे नातेवाईक यांचे फोटोही एका बाजूला काचेच्या खाली ठेवलेले होते. साहेबांच्या उजव्या बाजूला भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय दुर्मिळ फोटो असणारे तैलचित्र लावले होते. तर डाव्या बाजूला भिंतीवर पंढरीच्या विठ्ठलाची सुंदर फोटो फ्रेम होती. साहेबांनी आमच्याशी इथेपण गप्पा मारताना केवळ सिक्किम हाच विषय घेतला होता. एलईडी पॉईंटर लाईट नकाशावर  दाखवून त्यांनी सिक्किमच्या प्रत्येक भागाची माहिती दिली. सिक्किम राज्यपाल म्हणून असणारे विशेष अधिकार, कलम समजावून सांगितले. येथेही  फोटोसेशन केले.

त्यानंतर ग्रंथालय, अभ्यासिका, चिंतन कक्ष, व्यायाम कक्ष आदी सर्व खोल्या त्यांनी स्वत: पुढे होवून दाखविल्या. राजभवनात एक विशेष तिब्बत भवन नावाचा कक्ष आहे. येथे राज्यपालांचे विशेष पाहुणे मुक्काम करतात. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी  याच कक्षात उतरले होते, असे साहेबांनी सांगितले. या कक्षामध्ये जाऊन आम्ही फोटोसेशन केले. राजभवनला लागुनच तिश्ता रेसिडन्सी मध्ये राज्यपाल राहतात.  साहेबांच्या घरात सुद्धा संपुर्ण मराठीमय वातावरण आहे.   साडेतीन तास राजभवनावर केवळ गप्पा सुरू होत्या आणि आमच्या ज्ञानात भर पडत होती.
खूप सांगण्यासारखं आहे. लिहीण्यासारखं आहे. पण लेखन मर्यादा आहेत.



"आप मेरे साथ इधर आओ'
श्रीनिवास पाटील राज्यपाल होऊन राजभवनावर मुक्कामास आल्यापासून राजभवनाचे विजेचे बिल निम्म्यावर आले आहे. वास्तविक राजभवन खूप उंचावर आहे. येथे प्रकाश भरपूर पडतो. रात्री सजावटीचे दिवे लावले जातात. येथे 4.30 वाजता  उजाडते. सायंकाळी 6 वाजता लावलेले दिवे सकाळी 4.30 वाजता बंद झालेच पाहिजेत, असा साहेबांनी दंडक केला. यापूर्वी निवांत 7 वाजता दिवे बंद करण्याची सवय असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने सुरूवातीला याकडे थोडे दुर्लक्ष केले मात्र सज्जड दम दिल्यानंतर शिस्त लागली. आता तो कर्मचारी साहेबांचा लाडका झाला आहे.
साहेबांच्या केबिनमधून दुसऱ्या केबिनमध्ये आम्ही जात असताना मी एक खूप वेगळी गोष्ट अनुभवली  थोड्या वेळापूर्वी आम्हाला चहा घेऊन आलेल्या कर्मचाऱ्याला साहेबांनी "आप मेरे साथ इधर आओ' असे सांगितले. एवढे मोठे राज्यपाल आपल्या कार्यालयातील "क' वर्ग कर्मचाऱ्याला अहो-जाहो बोलवतात,  याचं खूप आश्चर्य वाटलं. न रहावून मी साहेबांना विचारलं? मला लहानपणापासून ही सवय आहे. आमच्यात ती पद्धतच आहे. रहिला प्रश्न सिक्किम राज्यपाल म्हणून तर या राज्यात अरे-तुरे बोलविणे ही शिवी समजली जाते, असे त्यांनी मला सांगितले. राज्यपाल साहेबांच्या त्या उत्तराने मी थक्क झालो.









Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...