फॉलोअर

१३ जून २०१६

सिक्किम सफर भाग 2



                  स्वयंशिस्त, वाहतूक नियमांचे काटेकोर अंमलबजावणी

समुद्र सपाटीपासून 5,700 फुटांवर वसलेले गंगटोक शहर असो किंवा 14, 500 फुटांवर असलेली भारत-चीन सीमारेषेवरील नथुलापास असो. सिक्किम राज्यात कोठेही जा. उंच पहाड, वेडीवाकडी वळणे, अंगावर थरकाप येईल अशा दऱ्या. उंच झाडे, घनदाट जंगल, नैसर्गिक सौंदर्याची खाण पहावयास मिळते. येथे सपाट भाग पहावयास मिळत नाही. काही ठिकाणी सपाट भाग तयार करून तेथे स्टेडियम, क्रीडांगण किंवा मोठ्या शासकीय इमारती उभारलेल्या पहावयास मिळाल्या. दऱ्या-खोऱ्यांच्या या राज्यात वाहतूक व्यवस्था अतिशय अवघड आहे. मात्र "पहले आप..!' असा मंत्र असणारी वाहतुकीची शिस्त वाखाणण्यासारखी आहे.

      रस्ते विकासक BRO बाॅर्डर रोड ऑरगनायझेशन

पश्चिम बंगालमधील बाघडोग्रा हे छोटेसे शहर. वास्तविक बाघडोग्रा हे मिलिटरी कॅम्प आहे. बाघडोग्रा विमानतळ मिलिटरीच्या ताब्यात आहे. सिक्किमचे प्रवेशद्वार म्हणून बाघडोग्राला ओळखले जाते. बाघडोग्रा सोडल्यानंतर सुमारे वीस किलोमीटर सपाट रस्ता आहे. त्यानंतर तिश्ता नदीच्या काठावरील वळणाचा रस्ता सुरू होतो. सुमारे 70 किलोमीटर नंतर रंगपो येथे सिक्किमची हद्द सुरू होते. संपूर्ण सिक्कीम राज्यात सगळीकडे नागमोडी, वेडीवाकडी वळणे असलेला घाटरस्ता आहे. हा बहुतांश रस्ता सेना दलाच्या ताब्यात आणि नियंत्रणाखाली आहे. नेपाळ, भुतान आणि चीन या देशांची सरहद्द सिक्किमला लागून आहे. चीनचा धोका ओळखून सिक्किममध्ये लष्करी तळ मोठ्या प्रमाणात वसविलेला आहे. सीमारेषेकडे जाणारे गंगटोक ते नथुलापास, गंगटोक ते नामची, गंगटोक ते लाचंग (उत्तर) हे सर्व रस्ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) अर्थात मिलिटरीच्या नियंत्रणाखाली आहेत. या रस्त्यांची  डागडुजी, पुलांचे बांधकाम- दुरूस्ती सर्व मिलिटरी करते. "देशाला जोडणारा रस्ता, बीआरओतर्फे आपले स्वागत' असे फलक वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास मिळतात.  हे सर्व रस्ते कायम खुले रहावेत यासाठी मिलिटरी इंजिनिअरिंग विभाग, सिव्हील विभाग सतत कार्यरत असतो.



                  नो चक्का जाम Always open

राज्यात बहुतांश रस्ते 6 ते 7 मीटरचे आहेत. हे रस्ते म्हणजे सिक्किमच्या विकासाच्या धमण्या आहेत. रस्ते कायम खुले रहावेत, वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून वेगळे कायदे, कडक नियम काहीही नाहीत. मात्र तरीही नैसर्गिक अचानक ओढवलेल्या परिस्थितीचा अपवाद वगळता वाहतूक कधीही ठप्प होत नाही. पर्यटनाच्या हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर असतात. मात्र तरीही रस्ता बंद नसतो. वाहतूक सतत चालूच राहते. याचे प्रमुख कारण आहे सिक्किममधील वाहन चालक-मालकांमध्ये असणारी स्वयंशिस्त.
गंगटोक शहरामध्ये खूप लहान अनेक रस्ते आहेत. वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. वाहतूक पोलिसांची संख्याही कमी आहे. तरीही कुठेच चक्का जाम पहायला मिळाला नाही. उपलब्ध पोलिसांच्या बळावर आणि चालकांमध्ये असलेल्या स्वयंशिस्तिमुळे  कधीच वाहनचालकांमध्ये, मालकांमध्ये वाद, भांडणे पहायला मिळत नाहीत.  खूप छोटा रस्ता आहे. सर्वांनाच जायचे आहे. गडबड सर्वांनाच आहे मात्र शिस्त नाही पाळली तर सर्व ठप्प होईल आणि आपल्याबरोबरच पर्यटकांचेही मोठे नुकसान होईल. राज्याचे नुकसान होईल, रोजी-रोटीवर परिणाम होईल हा छोटासा मात्र परिणामकारक मंत्र सर्वांनीच स्विकारला आहे.

    पहले आप 

अरुंद रस्त्यावर समोरून वाहन आले तर समोरचा चालक स्वत:हून थांबतो. डिप्पर मारून मलाच जायचे आहे, तूच थांब असे चुकूनही करीत नाही. अरुंद धोकादायक घाट रस्त्यावर वेग नियंत्रण आपोआप येते. मात्र तरीही मोकळा रस्ता दिसला म्हणून वेग वाढविला, असे होत नाही. ड्रायव्हरमध्ये वादावादी होत नाहीत. उलट परस्पर सन्मान ठेवला जातो. वास्तविक सिक्किममध्ये अरे-तुरे बोलणे म्हणजे शिवी समजली जाते. ओळखीचा असो वा नवखा सर्वांशी "आप..' अशा सुरात नम्रतेने बोलले जाते. सिक्किममधील पोलिस  ठाण्यात अपघाताच्या खूप कमी घटना नोंद आहेत.


    सजलेली वाहने, नियमबद्ध नंबरप्लेट 

प्रत्येक प्रवासी वाहतूक किंवा पर्यटक परवानाधारक कार, टॅक्सीमध्ये बुद्ध प्रतिमा हमखास असते. सजावट केलेली टॅक्सी म्हणजे नटून-थटून आलेली दुल्हनच वाटते. मात्र कोणत्याही गाडीवर आक्रमक भाषेतील वाक्ये, डिझाईन केलेल्या नंबर प्लेट, "बघतोस काय रागानं...' या प्रकारचे रेडियम आर्ट पहायला मिळाले नाहीत. रिझर्व्ह, टुरिस्ट या दोनच पाट्या पहावयास मिळाल्या.

सिक्किमवासियांचे फुटबॉलप्रेम जगावेगळे आहे. टॅक्सीमध्ये फुटबॉल संघाचे लोगो असणारे स्टिकर्स, झेंडे हमखास लावलेले असतात. "ओम माने पे मी हू' हा बौद्ध धर्माचा मंत्र असलेल्या पताका गाडीमध्ये बांधलेल्या आढळतात. टॅक्सीचालक  कोणालाच फसवत नाहीत. चुकीचा मार्ग दाखवित नाहीत. सांगितलेल्या वेळेत टॅक्सी हॉटेलच्या दारात हजर असते. ड्रायव्हरकडून पर्यटकांची लूट झाली, असा एकही गुन्हा गंगटोकमधील पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे आढळले नाही. उलट टॅक्सीमध्ये  पॉवर बँक विसरला तर चालकाने तो परत आणून दिल्याचा सुखद अनुभव मला स्वत:ला आला.
  
  टुरिस्ट वाहने मोठ्या प्रमाणात   
  
या राज्यात बेरोजगार युवकांकडे ड्रायव्हिंग करणे  हा सर्वांत सोपा आणि जवळचा मार्ग आहे. दहावी, बारावी शिक्षण झाल्यानंतर कोणच्या तरी हाताखाली जाऊन युवक ड्रायव्हिंग शिकतात. अनेक राष्ट्रीय बॅँकांच्या शाखा येथे आहेत. वाहन कर्जाचे प्रमाण खूप आहे. पर्यटक हंगाम काळात यांना चांगला रोजगार मिळतो. लोकल पर्यटन केंद्रे पाहण्याचे सरासरी भाडे प्रति दिवस  2000 रुपये तर 50 ते 60 कि.मी. दरम्यान 4 ते 4500 हजार इतके भाडे आहे. अनेकजण दुसऱ्यांच्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. प्रामाणिकपणा या चालकांच्या रक्तातच आहे. कोणताही मोबदला न घेता ते पर्यटकांना गाईड करीत असतात. या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व कडक नियमांचे पालन पाहता बाहेरील राज्यातील चालकांचे या रस्त्यावर वाहन चालविण्याचे धाडस क्वचितच होईल.

     राज्यात केवळ  सिक्किमच्या वाहनांनाच परवानगी

सिक्किममध्ये एस.के. 01, 02, 03 आणि 04 या चार पासिंगचीच वाहने पर्यटक नेऊ शकतात. इतर राज्यांतील परमिट वाहने येथे येऊ दिली जात नाहीत. पश्चिम बंगालची वाहने गंगटोकमध्ये पर्यटकांना हॉटेलपर्यंत सोडून जातात. फक्त स्थानिक लोकांनाच रोजगार मिळावा. हा त्यामागचा हेतू आहे. कार टाईपच्या वाहनांत चारपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात नाहीत. तर इनोव्हा, सुमो या जड प्रवासी वाहनांत 7 प्रवासी बसू शकतात. या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते.
                       (क्रमश:)


राजभवन समोर सतीश मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...