फॉलोअर

२५ ऑगस्ट २०२१

केबीसी सेटवर अमिताभ बच्चन यांची मुलाखत

*अमिताभ बच्चन यांची मुलाखत* 
*आयुष्यातील अविस्मरणीय क्षण* 


3 ऑक्टोबर 2018 रोजी अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या भेटीची जी उत्सुकता होती, तीच उत्सुकता किंबहुना त्याहून अधिक उत्सुकता 4 सप्टेंबर रोजी 2019 रोजी होती. आपल्या आवडत्या हिरोला,आदर्श व्यक्तीला भेटण्याचा,त्याच्या सोबत फोटो काढण्याचं,त्याला जवळून पाहण्याचं स्वप्न या अगोदर दोन वेळा साकार झाले आहे. सोनी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या शोमधील काही मान्यवरांशी, अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या लोकांशी गेल्या दोन वर्षात झालेली जवळीक तसेच त्यांनी आम्हा 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप'चे पाहिलेले उपक्रम आणि आमचे अमिताभ बच्चन यांच्यावर असलेले प्रेम पाहून याही वर्षी त्यांनी पुन्हा एकदा मला 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर तिसर्‍यांदा यायची संधी दिली. 


2019 साली आम्ही 50 अमिताभ बच्चन प्रेमी एकाच दिवशी अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो होतो, यावर्षी आम्ही पंचवीस अमिताभ बच्चन प्रेमी मुंबईला निघालो.15 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही मुंबईला अंधेरी येथे पोहोचलो. तेथे मुक्काम करून 16 ऑगस्टला सकाळी सात वाजता 'कौन बनेगा करोडपती'च्या फिल्म सिटी गोरेगाव येथील सोळा नंबर स्टुडिओमध्ये पोहोचलो.

'कौन बनेगा करोडपती' 21 व्या सीजनचे शूटींग 12 ऑगस्टला सुरू झाले होते. 12, 13 आणि 14 ऑगस्ट तीन दिवस शूटिंग झाले. आज 16 तारखेला सोळा शूटिंगचा तिसरा दिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला आम्हा 25 जणांची ऑंटीजन टेस्ट करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला भरपेट नाश्ता देण्यात आला. मोबाईल,पर्स यासह इतर सर्व साहित्य लॉकरमध्ये जमा करून कडक तपासणी झाल्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास आम्हाला सेटवर प्रवेश देण्यात आला.सेटवरील भव्यता, लाईट, झगमगाट पाहून आमच्या सर्वांचे डोळे दिपून गेले. 

आम्हा सर्व जणांना एकत्रित जवळजवळ बसवण्यात आले. अमिताभजी ज्या सीटवर बसणार होते त्यांच्या पाठी बाजूस आम्ही बसलो होतो. अमिताभ बच्चन पुढे बसल्यानंतर मला त्यांची पाठ आम्हाला दिसणार होती. पण शूटिंगमध्ये कॅमेरा फ्रेममध्ये आम्ही जास्त येणार आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. साडेनऊच्या सुमारास सर्वांना जागेवर बसवल्यानंतर लाईट कॅमेरा ॲक्शन 1 2 3 टेस्टिंग करण्यात आले.शुटिंग दरम्यान आम्ही कसे वागायचे, वैद्यकीय अडचण आली तर काय करायचे, याची माहिती आम्हाला देण्यात आली. 

अचानक गडबड सुरू झाली. 'सर आ गये' आणि सेटवर शांतता पसरली. बरोबर पावणे दहा वाजता अचानकपणे सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन यांची सेटवर इंट्री झाली. ज्यांना पाहण्यासाठी आयुष्यभर वाट पाहीली होती, त्यांना पहिल्यांदाच  प्रत्यक्ष पाहून  अनेकांची हृदयाची धडधड वाढू लागली. सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात अमिताभजींना सलामी दिली. अमिताभ यांनी तेवढ्याच नम्रतेने सर्वांना नमस्कार करून विनम्रपणे खाली बसण्याची सूचना केली. पुन्हा अमिताभजी बाहेर गेले, काही वेळाने पुन्हा सेटवर आल्यानंतर सेट वरील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात  स्वागत केले.

पन्नास वर्षे पडद्यावर पाहणाऱ्या अमिताभला आज प्रत्यक्ष पाहण्याची अनेकांची ही पहिलीच संधी आली होती. माझ्यासाठी ही तिसरी संधी असली तरी अमिताभ माझ्यासाठी आदर्श असल्यामुळे त्यांना कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. त्यांच्या पहिल्या भेटी वेळची उत्सुकता आणि आज तिसऱ्या भेटीतील उत्सुकता यामध्ये काहीच फरक नव्हता. हृदय धडधडत होतं ,पुढे उभे राहून ते नमस्कार करत होते, आम्ही टाळ्या वाजवत होतो. एक दोनदा त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मग मी आनंदाने उड्या मारू लागलो. 

पुढील साडेतीन तास सेटवर फक्त अमिताभ आणि अमिताभ आणि अमिताभ यांचीच जादू होती. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांना अमिताभ बच्चन प्रश्न विचारत होते, आधार देत होते, त्यांच्यातील कलागुणांची माहिती घेत होते, त्यांना हसवत होते, मधूनच त्यांना गोड धक्का देत होते, पुन्हा त्याला सावरत होते. पुढे बसलेला स्पर्धक आपले सर्व टेंन्शन सोडून अमिताभ बच्चन यांच्या पुढे बसून प्रश्नांची उत्तरे देत होते. खरंतर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळणे हे फार मोठे नशिब असते, सात करोड रुपये बक्षीस मिळवणे हे स्वप्न जरी असले तरी अनेकांचे स्वप्न हॉट सीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारणे हेच असते, हे आजही आम्हाला जाणवले. समोर बसलेला स्पर्धक अमिताभजींना पाहून बेभान होऊन जात होते, प्रश्नाचे उत्तर देत होते, आपल्या आयुष्यात आलेले क्षण अमिताभ यांच्यासमोर उलगडत होते, स्पर्धेचा आनंद घेत होते आणि आपले स्वप्न साकारत होते. 

कौन बनेगा करोडपती च्या 21 व्या सीझनचच्या शूटिंगचा हा चौथा दिवस होता. अजूनही सेटवरील मंडळी सेट झालेली नव्हती,अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र अमिताभजी या सर्वांना सांभाळून घेत शांतपणे सेटवर बसून होते. अमिताभ बच्चन यांचा विनोदी स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. तांत्रिक अडचणी आल्यानंतर जेव्हा सेटवर शांतता पसरत होती तेव्हा अमिताभजी समयसुचक विनोद करून सर्वांना हसवत होते. 

तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या 'ब्रेक'चा आम्हाला फार मोठा फायदा झाला. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर आम्ही अमितजीनीं आमच्याकडे पाठीमागे वळून पाहिले. 'क्षमा करे मै आपकी तरफ पीठ करके बैठा हूं' असे म्हणत त्यांनी आमच्याशी संवाद सुरू केला. सागर बर्गे यांनी अमिताभ यांच्याशी बोलताना 'सर  आप हमारे लिए भगवान हो, भगवानका दर्शन किधरसे भी लिया तो कोई प्रॉब्लेम नही' असे म्हणून सिक्सर टाकला. 'अरे मै भगवान नही' असे विनम्रपणे बोलत अमिताभजी यांनी गप्पा सुरू केल्या. एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर गप्प बसू ते कराडकर कसले? आलेल्या, मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा  घेत आम्ही आमच्या 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची,कराड शहराची सारी माहिती त्यांना सांगितली. त्यांनीही ती शांतपणे ऐकून घेतली. आमच्या गप्पा फुलल्या.

या अगोदर दोन वेळा मी अमिताभ बच्चन यांना भेटलो तेव्हा मी त्यांच्याशी मोजकेच शब्द बोललो होतो. पहिल्या भेटीत अमिताभजी यांना आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे माहिती पत्रक देऊन आमच्या ग्रुपची माहिती सांगितली होती. त्या माहिती पत्रकावर अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ आणला होता. दुसऱ्या भेटीवेळी आमच्या बच्चन ग्रुप सोबत अमिताभजीनी ग्रुप फोटो दिला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांनी माझ्या हातात हात देऊन माझ्या मांडीवर हात ठेवला होता. या दोन्ही भेटी माझ्या स्मरणात आहेतच. मात्र आजच्या या तिसऱ्या भेटीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत सेटवर मला खूप बोलता आले. याबाबतची बातमी 'पुढारी'मध्ये 17  आँगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती. अमिताभ बच्चन यांचा तो एक इंटरव्ह्यू होता. अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आलेला योग हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे.


दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी जशीच्या तशी पुढीलप्रमाणे 


... ......  

 *चाहत्यांचे प्रेम हीच माझी ताकद: अमिताभ बच्चन* 

मुंबई  (विशेष प्रतिनिधी ) 

माझे चाहते हीच माझी ताकद आहे, माझ्या चाहत्यांचं प्रेम आहे म्हणूनच मी जिवंत आहे, असे भावनाविवश उद्गार सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केबीसी सेटवर चाहत्यांशी बोलताना काढले. 

'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय मालिकेच्या 21व्या सिझनचे चित्रीकरण मुंबई येथे सुरू झाले आहे. 23 ऑगस्ट पासून ही मालिका सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेत प्रेक्षक म्हणून भाग घेण्यासाठी कराड येथील अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या 25 सदस्यांची निवड झाली होती. या सदस्यांनी अमिताभ बच्चन यांच्या समवेत केबीसी चित्रीकरणामुळे भाग घेतला. शेवटच्या टप्प्यात चित्रीकरण संपल्यानंतर सर्व उपस्थित प्रेक्षकांनी 'सर आमच्या सोबत फोटो काढा' अशी विनंती केल्यावर नंतर  'मुझे इतके साथ मुझे फोटो लेना है, उसके प्यार के कारण ही तो मै जिंदा हू' असे म्हणून काही अंतरावरून अमिताभ बच्चन यांनी चाहत्या सोबत फोटो काढले. 

चित्रीकरणादरम्यान मधल्या काळात अमिताभ बच्चन यांनी अतिशय नम्रपणे  चौकशी करत मीपण तुमच्यातलाच एक आहे असे नम्र पूर्वक सांगितले.

 या दरम्यान या एबीपी सदस्यांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी सातारा जिल्हा आणि कराड शहराची माहिती जाणून घेतली. सातारा जिल्हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा आहे तर कराड शहर देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे गाव आहे. या गावात ज्येष्ठ नेते पी डी पाटील हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले 41 वर्षे नगराध्यक्ष असणारे नगराध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या सुनबाई सुवर्णा पाटील आज या चित्रीकरणात सहभागी आहेत. कराडात कृष्णा कोयना प्रितिसंगंम आहे. भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत सलग दोन वर्षे कराड शहराने देशात पहिल्या क्रमांक मिळवला आहे अशी माहिती देत आपण एकदा कराड शहराला यावे असे निमंत्रण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोरे यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांना दिले.


बच्चन प्रेमी ग्रुप सदस्य या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांचा लोगो असणारे मास्क तोंडावर बांधून सहभागी झाले होते.अक्षरगुरु जगन पुरोहित यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा मास्क तोंडावर लावला होता. सर्व सदस्यांनी एकाच प्रकारचे बांधलेले हे मास्क पाहून अमिताभ बच्चन यांनीही या ग्रुपची माहिती घेतली.माझा फेस मास्क लोक बनवून आणतात. तुम्ही माऊथ मास्क मास्क बनवला आहे, तो कुठे बनवला याबाबत माहिती घेऊन हा मास्क आवडला, माझ्यासाठी एक ठेऊन जा,असे गोड मागणी त्यांनी यावेळी केली. चित्रिकरण झाल्यानंतर एबीपी ग्रुपच्या वतीने अमिताभ बच्चन यांचे सोबत दोन वर्षांपूर्वी केबीसी सेटवर काढलेला फोटो भेट देण्यात आला. या चित्रीकरणात दीपक अरबुणे, डॉ. नितीन जाधव, सागर बर्गे, विनायक उर्फ बंडा पाटील,सुधाकर बेडके, संजय शिंदे, दिपक रैनाक,राजेश शहा, प्रकाश सोनवणे,गौरव परदेशी मिलिंद रैनाक, डॉ.डी जे जोशी आदी सहकुटुंब सहभागी झाले होते.

.....     .....   

साडेतीन तास केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना आम्ही पाहत होतो, त्यांना डोळ्यात सामावून घेत होतो. 79 वर्षाच्या या तरुणाचा उत्साह खरंच आम्हाला प्रेरणा देणारा होता. न थांबता अखंड हा माणूस कसा काम करत राहतो,हे एक न उलगडणारं कोडं आहे. सलग एकवीस वर्षे टीव्हीवर एखादा शो करणे आणि त्या शो ची लोकप्रियता टिकवून ठेवणे, हे काम फक्त अमिताभ बच्चन हे एकटेच करू शकतात. अमिताभनां उगाच महानायक म्हणत नाहीत. 'ना तू रुकेगा कभी, ना तू थमेगा कभी' हे अग्निपथ या कवितेतील वाक्य अमिताभ बच्चन यांना तंतोतंत लागू पडते. 


अमिताभ बच्चन यांची ही तिसरी भेट खरंच हृदयात साठवून ठेवण्यासारखी आहे. बच्चन प्रेमी पत्रकार म्हणून अमिताभ बच्चन यांची सेटवर हसत-खेळत घेतलेली मुलाखत आणि त्यांच्याशी साधलेला संवाद मला आणि कराडच्या अवधूत कुलबर्गी फोटो लॅबमध्ये  तयार केलेला, अमिताभ बच्चन यांना भेट दिलेला ABP मास्क  लक्षात राहील.


आज 9 वाजता प्रक्षेपण 

 *26 तारखेला म्हणजे आज या भागाचे प्रक्षेपण सोनी चैनल वरती होणार आहे. आज आपण आम्हाला या शो मध्ये अवश पहा.*

१४ ऑगस्ट २०२१

कायम...

सखी सख्याची !

परवा सखी अचानक आली.
थोडीशी घाबरलेली,
थोडीशी विस्कळीत,
थोडीशी हरवलेली !
डोळ्यात अश्रू दाटलेले !

जवळ आली अन बिलगली.
आज तिच्या डोळ्यात
वेगळाच भाव होता !
मनात विचाराचे काहूर होते ,
खूप काही सांगायचे होते ,
स्वतःला सावरायचे होते.

बिलगलेल्या सखीला
मी सावरायचा प्रयत्न केला.
बिलगलेल्या सखीला,
मी सावरायचा प्रयत्न केला.
मग ती अधिकच बिलगली.

अन् म्हणाली ,
आजपासून आपण थांबू या,
एकमेकापासून थोडे दूर राहु या ,
फार जवळ यायचं नाही ,
थोडंसं अंतर ठेऊ या !

सखीचं हे अजब रूप 
मी पहिल्यांदाच पहात होतो.
तिच्या मनात खोल काहूर होतं,
ज्यानं मला निशब्ध केलं होतं !

डबडबलेले ते डोळे
मला प्रश्नावत होते !
माझ्या डोळ्यात
तिला शोधत होतो !

मग मीही सावरलो,
मग मीही सावरलो.
तिलाही सावरलं .
अन् मग तिला सुनावलं.

सखी आपलं नातं वेगळ आहे ,
सखी आपलं नातं वेगळ आहे !
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे,
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे !

कुठेही राहिलीस
तरी तु माझी आहे,
माझ्या जवळ नसली
तरीही तु माझी सावली आहे !

तुझ्या सुखात मी अद्ष्य आहे,
दुःखात तर मी हाजीर आहे !
तू सुखी राहा,
यापेक्षा मला काही नको आहे.

जिथे जाशील,
तिथे तू माझ्यातच आहे !
मी तर तुझ्या
रोमारोमात आहे !

आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
चार हात दूर राहिलो,
म्हणून वेगळे होणारच नव्हतो !

तुझ्या प्रत्येक श्वासात
मी असणार आहे.
माझा श्वास तर
तर तुझ्याविना गुदमरला आहे!

तू जिथे असशील
तिथे मी आहे .
तू जिथे स्मरशील
तिथे मी उमटणार आहे.

फक्त भेटणं म्हणजे
प्रेम आहे का?
भेटलो नाही म्हणून,
तुझे स्मरण होणार नाही का ?

माझ्या अखेरच्या
क्षणापर्यंत तू असणार आहेस !
तुझ्या रोमारोमात
मीच वास करणार आहे !

तू आणि मी एकच आहोत,
एकच राहणार आहोत !
पुढच्या जन्मात तर आपण,
एकच होऊन येणार आहोत !

०५ ऑगस्ट २०२१

मी आणि योगेश ३३ वर्षानंतर एका टेबलावर

 मी आणि योगेश ३३ वर्षानंतर

एका टेबलावर
योगेश सुभाष शहा,कमलवाडी शनिवार पेठ कराड. माझा टिळक हायस्कूलचा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा क्लासमेट. पाचवी ते सातवी माझा आवडता वर्ग म्हणजे तुकडी क. पाचवी क मध्ये प्रवेश घेतल्यानंतर दीपक तडक, दीपक काकडे, योगेश शहा,सागर जोशी,मिलिंद नवाळे, हिरा भंडारी, सुनील पाटील, डायालाल खंडेलवाल ,शेख, इनामदार, विनायक गरूड, राजेश कुंभार, निलेश काणे, हेमंत जाधव, प्रशांत पाटील आदी माझे क्लासमेट होते.
योगेश शहा आणि माझी 1982 पासूनची मैत्री आहे.मी करवडी येथून रोज कराडला एसटीने शाळेला येत होतो. वर्गात आमच्या असणारे बहुतांश मुले ग्रामीण भागातली होती, योगेश सारखी काही शहरातलीही होती. योगेश आणि मी मधल्या सुट्टीत एकत्र जेवायला बसत होतो. खेड्यातून आणलेला डबा योगेशला खूप आवडायचा तर त्याने आणलेले जैन पद्धतीचे जेवण, खाकरा, ढोकळा मला खूप आवडायचे. एका डब्यात एका बेंचवर आम्ही अनेकदा जेवलो आहे. कधीकधी दुपारच्या वेळेला डबा घेऊन दीपक काकडेच्या घरातही आम्ही जात असू. एका डब्यात मित्रांसमवेत बसून जेवण्याचा आनंद फार मोठा आहे, हे भाग्य मित्रासोबतच लाभते.
आज हे सांगायचं कारण आज खुप दिवसानंतर योगेश आणि मी एकत्र एका टेबलावर बसून जेवलो. शाळा सोडल्यानंतर योगेश आणि माझी कराड शहरात अनेकदा भेट झालेली आहे, होत राहते. गणपती मंदिरा समोरील त्याच्या दुकानात मी अधूनमधून जातो. दुकानात गेल्यानंतर योगेश काजू, बदाम, पिस्ता, खारीकच्या भरण्यांची टोपण उघडतो आणि एका प्लेट मध्ये सर्व ड्रायफूट समोर ठेवतो. मला खायला लावतो,स्वत खातो. त्याच्या दुकानात गेलो आणि ड्रायफूट खाल्ले नाही असा एकही दिवस गेला नाही. दुकानात गप्पा मारताना योगेश समोर असलेल्या लोकांना 'हा सतीश माझा शाळेतला मित्र, वर्गातील हुशार विद्यार्थी. आमच्या वर्गाचा सेक्रेटरी'अशी ओळख करून देतो.
शाळा सोडल्यानंतर आम्ही पुन्हा कधीच एकत्र जेवले नव्हतो, तसा योगच आलेला नव्हता. आज ऑफिस मधून परत येताना योगेश मला भेटला. चल माझ्यासोबत, आज खानावळीमध्ये जेवायला जायचं आहे, असे म्हणून त्याने मला बळजबरीने आत नेले. दिवेकर बेकरीसमोरच्या ओंकार लंच होममध्ये आम्ही दोघं एकत्र बसून जेवलो.
1988 साली मी दहावी पास आऊट झालो आहे. हा कालावधी विचारात घेतला तर 33 वर्षानंतर मी आणि योगेश आज एकत्र एका टेबलावर जेवलो. शाळेत एका डब्यात बेंचवर बसून जेवल्याच्या आठवणी आज जाग्या झाल्या. वर्गमित्र वर्गशिक्षक, शाळेतील गंमती जमती याविषयी आम्ही खूप गप्पा मारल्या. शाळेतील मित्र आणि शाळेतील आठवणी या खरंच रम्य असतात. पुन्हा असं वाटतं की लहान व्हावं आणि शाळेत जाऊन त्याच बेंचवर बसावं आणि पुन्हा तेच मित्र भेटावेत. असा योग लवकरच येवो.
*सतीश वसंतराव मोरे*
०४.०८.२०२१
May be an image of 2 people, including Satish More Satitabh and food
You, Dhanaji Chavan, Ashok Mohane and 251 others
34 comments
Like
Comment
Share

२९ जुलै २०२१

लय भारी कारभारी



बाळासाहेब पाटील आज नामदार आहेत. कराडसह सातारा जिल्ह्याची शान आहेत.  ते आमदार नव्हते, तेव्हापासूनचा त्यांचा माझा परिचय आहे. या व्यक्तीमध्ये एवढी सहनशीलता आणि ताकद कुठून येते ? हेच खरं कळत नाही. स्व. यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे विचार जोपासत नामदार बाळासाहेब पाटील हे जिल्ह्याचा कारभार पहात असून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतातच. मात्र ते करतानाच ‘साहेबां’च्या नावाला कुठेही डाग लागता कामा नये, यासाठी सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे सर्व कुटूंबियांकडून नेहमीच काटेकोरपणे योग्य ती दक्षता घेतली जाते.


1997 साली करवडी येथे माझ्या लग्नाला आलेले बाळासाहेब पाटील मला आठवतात. सफारी घालून आलेले बाळासाहेब पाटील तेव्हा सह्याद्रि कारखान्याचे नुकतेच चेअरमन झाले होते. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने मुलांना बाहेर काढण्याचे कौशल्य किंवा दूरद़ृष्टी फक्त पी. डी. पाटील साहेब यांच्याकडेच असावी. 1996 साली सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्यापूर्वी साहेबांनी आपल्या सर्व मुलांना योग्य जागी संधी दिली आणि त्यांच्या सर्व मुलानींही अतिशय योग्य पद्धतीने कार्यभार सांभाळत सर्वच पातळीवर साहेबांची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.


बाळासाहेब पाटील यांच्याकडे पी. डी. पाटील साहेब यांनी सर्वात मोठी जबाबदारी का दिली?  याचा जेव्हा माझ्यासह सर्वजण विचार करतात, तेव्हा उत्तर येते त्यांच्यामध्ये असणारा संयम आणि सहनशीलता. बाळासाहेबांमध्ये असणारे गुणही त्यांनी परखले असतील. पी. डी. पाटील साहेब यांचे सर्व सुपूत्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रयत्न करत असतात. मुलांना योग्य जबाबदारी योग्य दिल्यामुळेच सहकारी संस्था, शिक्षण संस्था, शेती, बँक, समाजकारण, कराड नगरपालिका, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारणणात पी. डी. पाटील साहेब यांच्या नावाचा अजूनही दबदबा कायम आहे.

सह्याद्री साखर कारखान्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी गेल्या 25 वर्षात सह्याद्रि कारखान्याला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. स्व. पी. डी. पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना योग्य नियोजन, अभ्यास, काटकसर या त्रिसूत्रीवर नामदार बाळासाहेब पाटील हे पुढे नेत आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून साकार झालेला हा कारखाना फक्त सभासदांचा आहे, याचे भान ठेवूनच या संचालक मंडळाचा कारभार चालतो. या कारखान्यात संचालकांना भत्ता किंवा गाडी देण्याची, संचालक मंडळाच्या घरच्या कार्यक्रमाला कारखान्याची यंत्रणा देण्याची पद्धत नाही.

गेल्या 25 वर्षापासून नामदार बाळासाहेब पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत. ही वास्तू सभासदांची आहे. या कारखान्याची स्थापना झाल्यानंतर पी. डी. पाटील साहेबांनी हा कारखाना मुलाप्रमाणे जपला आहे, याचे भान ठेवून काम करणारा नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासारखा चेअरमन सभासदांनी  अनेकदा अनुभवला आहे. नामदार बाळासाहेब कोणत्याही दौर्‍यावरून परत येत असताना रात्रीच्या दोन वाजले तरी ते कारखान्यांमध्ये जातात. कधी कराडमध्ये लवकर पोहोचले किंवा नियोजित कार्यक्रम रद्द झाला, तर अचानकपणे कितीही वाजता कारखान्यात जातात. वेगवेगळ्या युनिटला भेट देतात. कुठे कचरा पडला आहे का? कुठे एखादे मशीन बंद आहे का? एखाद्या युनिटमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली आहे का ? कामगारांच्या काही अडचणी आहेत का? याची माहिती घेतात. कारखान्यातल्या प्रत्येक विभागाची मशिनरीची त्यांना इतंभूत माहिती आहे. अगदी छोट्या मोठ्या मशिनरींची किंमत सुद्धा माहिती आहे. एखाद्या मशीनमध्ये वेगळा आवाज येत असला तरी ओळखतात, तिथे उपस्थित तंत्रज्ञाला सांगतात. उसाचे टिपरे जरी खाली पडलेले असले किंवा कुठे साखर खाली पडत असली, तर उपस्थित लोकांना नजरेखाली आणून देतात.
सह्याद्री कारखान्याचा वार्षिक सर्वसाधारण सभा पॅटर्न राज्यभर आदर्श का  मानला जातो ? याचे कारण म्हणजे इथे सभासदांना बोलू दिले जाते, कुणावरही अन्याय केला जात नाही. कारखान्याच्या सभांमध्ये विरोधकांना बोलण्यासाठी खाली स्वतंत्र माईक ठेवण्याची सह्याद्रीमध्ये अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. ज्याला बोलायचे आहे, त्यांनी त्या माईक जवळ बसायचे, त्यांचे प्रश्न मांडायचे आणि संचालक मंडळाने त्याची उत्तरे द्यायची अशी एक पद्धत आहे. मी स्वतः सह्याद्री कारखानाचा सभासद असून पत्रकार म्हणून अनेक वार्षिक सभांना उपस्थित राहिलो आहे. मागील वीस वर्षात सभेच्या वेळी तात्विक मुद्यावर जोरदार विरोध करणारे विरोधक नामदार बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीमुळे बाळासाहेबांच्या जवळचे झालेले आहेत. या लोकांना किंवा लोकांचा विरोध नामदार बाळासाहेबांनी मोडून काढला नाही, तर या विरोधकांचे म्हणणे विचारात घेतले. त्यांच्यामध्ये जे चांगले आहे, त्याचे अनुकरण करत कारखान्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा जरूर प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या हितासाठी जे करता येईल, ते करत असतात. म्हणून विरोधक सुद्धा नामदार बाळासाहेब पाटील यांच्या जवळचे होतात.

यापूर्वीच्या 11 पंचवार्षिक निवडणुकांपैकी तब्बल 8 निवडणुका बिनविरोध अथवा अशंतः बिनविरोध झाल्या आहेत. प्रति हंगाम 1 हजार 500 कोटीची उलाढाल असणारा हा सहकारी कारखाना बिनविरोध होतो, हीच चेअरमन म्हणून नामदार बाळासाहेब पाटील यांच्या कामाची पोहचपावती आहे.

नामदार बाळासाहेब पाटील 1999 साली पहिल्यांदा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. तेव्हापासून त्यांचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधील जनसंपर्क सतत वाढतच गेला. 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्यासमोर आनंदराव पाटील यांचे काँग्रेस पक्षामधून आव्हान होते. त्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचा नावाचा दबदबा शहर आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळे बाळासाहेबांना ही निवडणूक सोपी होती. त्यानंतर सन 2004 साली विरोधक कराड शहरातील अरुण जाधव हे विरोधात निवडणूक लढवत होते. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पी. डी. पाटील साहेबांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी केलेला जोरदार प्रयत्न यामुळे बाळासाहेब पाटील हे विजयी झाले होते.

त्यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नामदार बाळासाहेब पाटील यांना पक्षाने डावलून अतुल भोसले यांना तिकिट दिले होते. अशा वेळी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बाळासाहेब पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले आणि जनतेने त्यांना विक्रमी 41 हजारांच्या मताधिक्याने विजयी केले होते. नामदार बाळासाहेब पाटील यांचा लोकसंपर्क, मतदारसंघाचा चौफेर विकास यावर या विजयामुळे मोहोर उठली होती. त्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील यांनी अधिक गतीने मतदारसंघाचा विकास केला आहे.
परिणामी 2014 साली नामदार बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे अशी तिरंगी निवडणूक झाली होती. या निवडणुकीतही नामदार बाळासाहेब पाटील यांनीच बाजी मारली. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी त्याच दोन्ही विरोधकांना 40 हजारांहून अधिक मताधिक्याने पाणी पाजून ते सलग पाचव्यांदा विजयी होऊन विधानसभेत गेले. बाळासाहेब पाटील यांचा पाच विधानसभा निवडणुकीतील कामाचा आणि विजयाचा चढता क्रम पाहिला, तर याचे श्रेय त्यांच्यामधील अभ्यासू नेतृत्वाला आणि गावागावातील जनसंपर्काला जाते. 

जुना उत्तर मतदारसंघ असो वा नवीन असो, या सर्व गावात सह्याद्री कारखान्याचे फार मोठे नेटवर्क आहे. पैशाने किंवा जेवणावळीने नव्हे तर विकासकामांच्या आणि नियोजनाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याची त्यांची खास पद्धत आहे. पक्षातील अनेकांना त्यांची काम करण्याची पद्धत आवडत नाही किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे आश्चर्य वाटते. सर्वसामान्य हिताला प्राधान्य देत मतदारसंघाचा कायापालट करत नामदार बाळासाहेब पाटील यांनी एक वेगळा पॅटर्न तयार करणार्‍या नामदार बाळासाहेबांना त्यांच्या सहकारातील आणि विशेषतः साखर कारखान्यातील मोठ्या अभ्यासाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदी काम करण्याची संधी दिली. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही, असं म्हणतात. मात्र त्याला नामदार बाळासाहेबासारखा एखादा अपवादही असतो. पी. डी. पाटील यांचे कार्य आभाळाएवढे आहे, यात वादच नाही. त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची कधी संधी मिळाली नाही. कराडचे नगराध्यक्ष म्हणून पी. डी. पाटील यांची कारकीर्द विश्वविक्रमी आहे. मात्र पी. डी. पाटील यांचे मन कराड शहर आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाशिवाय अन्य कुठे रमले नाही. मात्र त्यांच्या पुढे एक पाऊल जाऊन चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांनी दबदबा निर्माण केला आहे. कारखाना उच्च पातळीवर नेऊन ठेवला असून राज्यात सर्वाधिक ऊस दर सभासदांना दिला. विधानसभेत सलग पाचव्यांदा जाऊन मंत्रीपदी निवड झाली. आज ते संपूर्ण जिल्ह्याचा, राज्याचा कारभार पहात आहेत. ‘बाप से बेटा सवाई’ हे राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी करून दाखवले आहे.

मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नामदार बाळासाहेबांनी आपल्या कामाची पद्धत व सवय बदललेली नाही. ‘काम जास्त अन् बोलणे कमी’ या उक्तीप्रमाणे सह्याद्रि कारखान्यात निर्माण केलेला पॅटर्न त्यांनी सातारा जिल्ह्यात सुरू केला आहे. त्यामुळेच कोरोनामुळे निर्माण झालेली अतिशय भयावह परिस्थिती, त्यानंतर या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नामदार बाळासाहेब यांच्या संयमी नेतृत्वाचा नक्कीच जिल्ह्याला फायदा झाला आहे. योग्य नियोजनामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाबरोबरच दोन ते तीन वेळा आलेल्या पूरपरिस्थितीला नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने चांगली पद्धतीने तोंड दिले आहे.

बाळासाहेब पाटील यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना जिल्ह्यात एक वेगळा आदर मिळतो. कॅबिनेट मंत्री असूनही गाजावाजा न करणारा केवळ निवडक लोकांना आणि प्रशासनाला घेऊन आंबेघर सारख्या दुर्गम गावाला प्रतिकूल परिस्थितीतही भेट दिली. अगोदरच गावागावची नाडी ओळखणारा, सर्वसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा मंत्री म्हणून त्यांची ओळख होती आणि आता ती अधिक घट्ट झाली आहे. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात नामदार बाळासाहेब पाटील यांना पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पक्षातील ज्येष्ठ, समवयस्क तसेच युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील दीड वर्ष पक्ष वाढीसोबत पक्षीय, राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वसामान्यांसह जिल्ह्याच्या हिताला नामदार बाळासाहेब पाटील यांनी प्राधान्य दिले आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट ओढवले. त्या अगोदर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. पक्ष वाढीबरोबरच विकासकामांवर भर देऊन आपले स्थान मजबूत केले आहे. मंत्रिमंडळात बाळासाहेब पाटील यांच्याकडे अतिशय आदराने पाहिले जाते. त्यांच्याकडे पक्षाने सहकार खात्यातील खात्याची जबाबदारी देताना हे खात्याचा कारभार पारदर्शकपणे होईल, याची खात्री असल्यामुळेच ही जबाबदारी दिली होती. गेल्या दीड वर्षात सहकार खात्यातील अनेक बदल, हे याचेच द्योतक आहे. स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. पी. डी. पाटील यांचे विचार व आदर्शानुसार मार्गाक्रमण करणार्‍या नामदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आजवर जिल्ह्याला सदैव पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्याही संकटाला खंबीरपणे तोंड देण्याचा नामदार बाळासाहेब पाटील यांचा गुण अनेकांनी पाहिला आहे. मात्र हळवे नामदार बाळासाहेब खूप कमी जणांनी अनुभवले आहेत. वैयक्तिक किंवा घरगुती कोणत्याही संकटाला कणखरपणे तोंड देणारे बाळासाहेब पाटील, पी. डी. पाटील यांच्यानंतर त्यांच्या घराचे नेतृत्व करणारे बाळासाहेब पाटील, कुटूंब प्रमुख म्हणून घरातील सर्वांना विचारात घेऊन त्यांच्यावर हृदयापासून प्रेम करणार्‍या बाळासाहेब पाटील यांना मी पाहिले आहे. माझ्या भाऊजींमुळे त्यांच्या कुटुंबाशी निर्माण झालेल्या जवळच्या संबंधांमुळे बाळासाहेबांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यासोबत असणारा स्नेह मला जवळून अनुभवता आला आहे.

काटेकोरपणा आणि अचूकता बाळासाहेबांनी पी. डी. पाटील यांच्याकडून घेतलेला आहे. त्यांचे अनेक उदाहरणे देता येतील. दोन दिवसापूर्वी कोयनानगर येथे पत्रकारपरिषदेवेळी नामदार बाळासाहेब पाटील यांच्याशी माझी भेट झाली. पत्रकार हॉलमध्ये कोपर्‍यावर एका खुर्चीवर बसलो होतो, त्या खुर्चीच्या खाली असणारे पायदानी खुर्चीखाली अडकली होती. नामदार बाळासाहेब पाटील यांचा या हॉलमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांनी हात खांद्यावर ठेवून सतीश जरा उठा, असे सांगितले. मला वाटले माझ्याकडे काही तरी काम असेल, तर त्यांनी मला उठून ती खुर्ची बाजूला करत पायाने पायदानी सरळ केली. एक कॅबिनेट मंत्री हे करू शकतो, याचे माझ्यासह उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटले.
गेल्या आठवड्यात पावसाने कोयनानगर विभागासह सातारा जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक गाडले गेले होते. आंबेघरसारख्या दुर्गम भागात जाणे, खरं म्हणजे दिव्य होते. या ठिकाणी मंत्री जाऊ शकेल, हे तेथे गेल्यावर कोणालाही पटणार नाही. मात्र नामदार बाळासाहेब पाटील सुमारे दोन तास चिखलातून, दगडातून आणि निसरड्या पायवाटेने पायपीट करत आंबेघरमध्ये पोहचले होते. त्यांच्या या कामाचे फार मोठे कौतुक झाले आहे. मात्र कौतुकाने हुरळून जाणारे नामदार बाळासाहेब पाटील नाहीत. या गावावरून खाली आल्यानंतर अनेक जण कंटाळले असतील, मात्र त्यानंतरही पुढचे चार तास त्यांनी पाटण तालुक्यातील अनेक गावात जाऊन पाहणी केली.

नामदार बाळासाहेब पाटील जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जातात, तेव्हा कुटूंबातील सदस्याची आपुलकीने चौकशी करतात. विद्यार्थी असेल तर त्याला पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन तर करतात. याशिवाय त्यांच्या घरात ज्या गोष्टी नवीन पहायला मिळतात, त्याचे कौतुक करतात. एखाद्या शेतकर्‍याच्या बांधावर जातात, तेव्हा ते ऊस लागणीपासून कोणती खते वापरली ? किती तारखेला ऊस लावला ? याचे संपूर्ण माहिती माहिती ते एक शेतकरी म्हणून घेतात. नवीन पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍याला ते सतत पाठबळ तर देतातच, मात्र स्वतःच्या शेतामध्ये त्याचे अनुकरण करत असतात. सह्याद्रि कारखान्याचा शेती विभागातील अधिकार्‍यांना जेवढी माहिती नसेल, तेवढी शेतीची माहिती बाळासाहेब पाटील यांना आहे आणि असे चेअरमन राज्यात खूप कमी असतील. नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हातून भविष्यात अजून फार मोठे काम होणार आहे. कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, विकासकामे पूर्ण करण्यासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांना पुढील काळात शक्ती मिळो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !!!

२० जुलै २०२१

*याचसाठी केला होता अट्टहास* *शेवटचा दीनु गोड व्हावा!*

 *निसर्गवारी*

*याचसाठी केला होता अट्टहास*
*शेवटचा दीनु गोड व्हावा!*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
२० जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
नमस्कार माऊलींनो,
आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा!
आज आम्ही पंढरीत पोहोचलो, निसर्ग वारी पूर्ण झाली.ज्या उद्देशाने आम्ही ही वारी सुरू केली होती तो उद्देश आणि 221 वृक्षलागवडीचा संकल्प माऊलींच्या कृपेने पूर्ण झाला. आजच्या दिवसाचे एका वाक्यात वर्णन करायचं म्हणलं तर, 'याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा'
गेली दोन वर्षे पंढरीची वारी होऊ न शकल्यामुळे वारी चुकते की काय अशी भावना मनामध्ये आली होती. याचाच विचार करून गेल्या वर्षी आम्ही पंढरीच्या दिशेने चालत आहोत असा मनात विचार आणून मनमंदिर वारी केली होती. या वर्षी निसर्गवारी करण्याचा निश्चय केला, ही वारी करताना यामध्ये काय असावं यावर आम्ही चर्चा केली. झाडे लावावीत, वृक्ष लागवडीचे महत्व लोकांना समजून द्यावे असा विचार आला आणि तो फलद्रुप झाला.
गेल्या 19 दिवसांमध्ये आमची सव्वाशे झाडे लावून पूर्ण झालेली आहेत. आज एका दिवसात डिचोली धोंडेवाडी येथे 104 झाडे लावली आणि 221 झाडे लावण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला. या कार्यक्रमास सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आणि माझे गेल्या वर्षभरात कोरोणाच्या अपडेट वरून अतिशय जवळचे संबंध झालेले आहेत. हरिष पाटणे यांनी जिल्हाधिकारी यांची ओळख करून दिली आणि तेथून पुढे फक्त मोबाईल मेसेज वरुन आम्ही संवाद साधत आहोत. एक दोन वेळा ओझरती भेट झाली आमची. या भेटीनंतर झालेल्या ओळखीतून परवा मी त्यांना आमच्या निसर्ग वारीच्या समारोपाला येण्याचं निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण त्यांनी एका सेकंदात स्वीकारलं.फक्त सामाजिक डिस्टन्स ठेवून 25 ते 30 लोकांचा कार्यक्रम व्हावा कमीत कमी लोकांचा कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आम्ही आज सकाळी धोंडेवाडी डिचोली येथे वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास आमच्या निसर्ग वारीतील सात सदस्य, वीस ग्रामस्थ एवढेच लोक उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांचे वेळेनुसार म्हणजे बरोबर नऊ वाजता त्यांचे डिचोली येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही डिचोली ग्रामपंचायत समोरील जागेत आज एकादशी असल्यामुळे 11 वड वृक्ष लावले. ही झाडे लावल्यानंतर त्या ठिकाणी उभे राहूनच ग्रामस्थ समवेत एक बैठक संपन्न झाली.
तीन ठिकाणी पुनर्वसन झालेल्या डिचोली गावातील ग्रामस्थांनी सुविधा,समस्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मागणी केली.या सर्व मागण्या काळजीपूर्वक ऐकून मला जे शक्य आहे तेवढेच मी बोलतो आणि ते मी नक्की तुम्हाला देईन, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात डिचोली गावाचे पुनर्वसन या एकाच विषयावर आपण बैठक आयोजित असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपस्थितांना दिले.
खरंतर डिचोली या छोट्या पुनर्वसित गावात जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येणार आहे हेच या गावकऱ्यांसाठी फार मोठं अपूर्व होतं. काल दुपारनंतर या गावात ही तयारी सुरू झाली होती. आज प्रत्यक्ष जिल्हाधिकारी गावात आल्यामुळे या या लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि पुनर्वसन प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे लोक खूप खुश झाले. ग्रामस्थांनी निसर्ग वारी ग्रुपमधील सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. माऊलींच्या कृपेमुळेच आम्हाला डिचोली गावात झाडे लावायची इच्छा झाली आणि त्यामुळे येथे जिल्हाधिकारी आले,माऊलींची इच्छा आहे म्हणूनच हे सर्व शक्य झाले आहे, अशी कृतज्ञता आम्ही सर्वांनी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केली.
या कार्यक्रमाची सविस्तर बातमी, प्रेस नोट या खाली मी आपणास देत आहे.
निसर्गवारीचे वृक्षलागवडीचे काम सर्वश्रेष्ठ :जिल्हाधिकारी शेखर सिंह;
निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण
संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे. निसर्गवारी ग्रुप वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
पुनर्वसीत डिचोली (धोंडेवाडी) (ता. कराड) येथे निसर्गवारी 2021 अंतर्गत आयोजित 'संकल्प 221 वृक्ष लागवडीचा' या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील. सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, डॉ. अमित खाडे तसेच जि.प. सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर सिंह म्हणाले, निसर्ग वारीच्या माध्यमातून हाती घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. झाडे म्हणजे देवआहहेत. झाडांमधील देवाला ओळखून निसर्ग वारीच्या माध्यमातून काम झाले आहे. निसर्गवारी ग्रुप जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे.
जर्मनीमध्ये अतिवृष्टी होऊन पूर आला. त्यामध्ये 180 ते 200 लोकांचे मृत्यू झाले. अरबी समुद्रात कधी सायक्लॉन येत नव्हते परंतु 2001 पासून ते येऊ लागले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये 50 डिग्री सेल्सीअस होते. याला कुठे न कुठे माणूसच जबाबदार आहे. वृक्षतोड कारणीभूत आहे. या परिस्थितीत निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल.
पहिला पाऊस जून-जुलै, ऑगस्ट मध्ये पडत होता. मात्र गेली 10 ते 15 वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे. यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे लावण्यामध्ये मोठा वाटा शेतकरी बांधवांचा वाटा असला पाहिजे. आपण आषाढी वारी निमित्त झाडे लावतो आहे. आपण विठ्ठलाचे रुप म्हणून त्याचे संगोपन करा. डिचोली ग्रामस्थ झाडांची काळजी घेतील. सयाजी शिंदे सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना राबवित असतात. सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीबाबत चळवळ उभी रहात आहे, याचे समाधान आहे.
सतीश मोरे म्हणाले, 2015 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे. मागील वर्षी मनमंदिर वारी केली. यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता. ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून 221 वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला. आळंदी ते पंढरपूर अंतर 221 कि.मी.असल्यामुळे येवढी झाडे लावली. प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे. डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला. येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे. आज वारी सार्थकी लागली आहे. 'याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा', याची प्रतिची आली.
बाळासाहेब कोळेकर म्हणाले, तीन ठिकाणी पुनर्वसीत झालेल्या डिचोली गावाच्या काही अडचणी आहेत. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत. निसर्ग वारीमुळे येथील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले.आभार सुरेश चौघुले यांनी मानले.यावेळी डिचोली येथे 104 वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारु परिवाराच्या वतीने करण्यात आले.
पुनर्वसीत डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी परिवाराने घेतला आहे. आज येथे 104 झाडे लावण्यात आली आहेत. यातील 75 झाडे वडाची आहेत. येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल,असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आमच्या समवेत फराळ केला. गेल्या अनेक दिवसांपासून वारी सुरू असताना आमच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला या असा आग्रह धरणारे संतोष शेट्टी यांच्या गंधर्व हॉटेलच्या वतीने आज सर्व पाहुणे आणि ग्रामस्थांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रजत शेट्टी यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार केला आणि कृतज्ञता व्यक्त केले. दरम्यान आम्हाला कमी दरामध्ये वडाची व इतर रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल नर्सरीचे शैलेश पाटील यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार केला.
तत्पूर्वी या कार्यक्रमात डिचोली ग्रामस्थांच्या वतीने
सर्व निसर्गवारी सदस्यांचा तुळशीचे वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला तर आमच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना वडाचे एक झाड देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी सातारा येथे महत्त्वाची बैठक असल्यामुळे तिकडे रवाना झाले.
त्यानंतर डिचोली ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे चार तास श्रमदान करून आम्ही सर्व सदस्यांनी या गावाच्या परिसरात 104 झाडे लावली. माउलीनीं कोणतीही अडचण येऊ दिली नाही. गावातील सुमारे २० ग्रामस्थ, युवक या कामी शेवटपर्यंत आमच्यासोबत झटत होते. या सर्व माऊलींच्या कष्टाला, चिकाटीला खरंच सलाम! लागवडीनंतर बाळासाहेब कोळेकर यांच्या निवासस्थानासमोर दुपारी दोन वाजता आम्ही चहा पाणी केले. सर्व माऊलींना धन्यवाद दिले आणि फुल रिचार्ज होऊन होऊन आम्ही कराडला परत आलो.
*कृतज्ञता*
गेल्या वीस दिवसात मी पाठवलेले सर्व मेसेज आपण वाचले, आम्हाला प्रतिक्रिया दिल्या,आशीर्वाद दिले,आमच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तुमच्या सहकार्यामुळेच,तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच आमची ही निसर्गवारी अतिशय आनंदात संपन्न झाली.आपले मार्गदर्शन आशीर्वाद आणि कृपादृष्टी अशीच राहू द्या ओ माऊली!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
२०.०७.२०२१

१९ जुलै २०२१

आनंदाचे डोही आनंद तरंग

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
आनंदाचे डोही आनंद तरंग
१९ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज आम्ही धन्य झालो.आज पंढरपूरला पोहोचलो.आमची निसर्ग वारी आज पूर्ण झाली. आज आमच्यासाठी पंढरपूर होतं कराड वाखान.या रस्त्याला असणारे शिंदे बंधूनी बांधलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे आमचे पंढरी होती.आमच्यासाठी हा दिवस अतिशय आनंदाचा असा होता. गेली 18 दिवस आम्ही पायी वारी केली, त्याचा आज समारोप होणार होता.
सकाळीच साडेसहा वाजता चालावयास सुरुवात करून जरा पुढे आल्यानंतर वाकाण रस्त्याला रस्त्याकडेला विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. सव्वा सातच्या दरम्यान टेंभू धरणाच्या अलीकडे असणाऱ्या अंबाबाई मंदिर मध्ये जाऊन पोहचलो. पावसाची रिमझिम चालू होती.अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर संदीप सूर्यवंशी यांनी आमच्यासाठी नाश्त्याची सोय केली होती, उपीट आणले होते. याचा नैवेद्य देवीला दाखवला. त्यातला काही भाग देवीच्या समोर दारातच ठेवला आणि काय काय आश्चर्य पाचच मिनिटात तिथे चिमण्या आल्या. त्यांनी तो प्रसाद खाल्ला मंदिरासमोर असलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्ल्यांना आम्ही थोडा प्रसाद खाऊ घातला. हे दोन प्राणीमात्र जणू काही विठ्ठल रुक्मिणीच्या रुपात प्रसाद खाण्यासाठी आले होते ,अशी आमची भावना झाली. आम्ही धन्य धन्य झालो आणि परत निघालो येताना गुरुप्रसाद पाटील यांच्या हॉटेल समोर पुढे जाऊन नदी काठाला असणाऱ्या सागर मोहन पाटील यांच्या शेतात तीन झाडे लावली आणि रणजित पाटील यांच्या घरी परत आलो.
रणजीत पाटील यांच्या माऊली आईनीं आणि दोन्ही वाहिनींनी आमचे औक्षण करून स्वागत केले. हे स्वागत आमच्यातील वारकऱ्याचे होते. पंढरपूरला आमची वारी झाली नाही मात्र कराड तालुका परिसरात गेली 18 दिवस आम्ही वारी केली,या वारकऱ्यांचे स्वागत होते. या स्वागतानंतर रणजीत पाटील यांच्या घरात जाऊन आम्ही निसर्ग वारी परिवारावतीने त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.
अकरा वाजता पोलीस संकुल परिसरात परिसरात पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी आर पाटील, साहेब पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या उपस्थितीत अकरा झाडे लावली. ही सर्व 11 झाडे 22 पोलीस कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतली आहेत. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील यांच्या निवासस्थानी दोन झाडे लावली. ही झाडे लावताना रणजीत पाटील यांचे वडील आणि दोन वर्षाचा छोटा मुलगा युवराज आणि छोटी कन्याही उपस्थित होती. तीन पिढ्यांच्या उपस्थितीत उपाधिक्षक रणजीत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेलं वृक्षारोपण आमच्या तरी आठवणीत राहीलच पण त्यांच्या घरातील सर्वांच्या लक्षात नक्की राहील. वारकरी संप्रदायाचा वारसा असणारे बी. आर.पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्हा वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या या कार्यक्रमानंतर गोडावून परिसरात कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत आम्ही सहा झाडे लावली. गोडावून परिसरातील सर्व हमाल माऊलींनी या झाडांची जबाबदारी घेतली असून ही झाडे आम्ही जगवणारच असा संकल्प तहसिलदारांच्या उपस्थित केला. त्यानंतर गोळेश्वर गावच्या गोळोबा मंदिरा परिसरात मी तीन वडाची झाडे लावली. या सर्व कार्यक्रमास लोकशाही आघाडीचे युवा नेते सौरभ पाटील उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता कराड नगरपालिका कचरा डेपो परिसरात (खरं तर याला आता बाग म्हटली पाहिजे) मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी रिचर्ड यानथन, ह. भ. प. दादा महाराज तुळसणकर यांच्या उपस्थितीत 50 वडाची झाडे लावली.निसर्गवारी उपक्रम अंतर्गत आज आम्ही 75 झाडे लावली.
या उपक्रमा बरोबरच रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रणजीत पाटील यांच्या वतीने आज जखिनवाडी येथे 40 तर मैदान परिसरात 50 झाडे लावण्यात आली.आज दिवसभरात कार्यक्रम इतका बिझी शेड्युल मध्ये झाला की आज मी जास्त लिहू शकत नाही. मात्र गेल्या 18 दिवसात निसर्ग वारी उपक्रमांतर्गत आम्ही केलेला संकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे. उद्या आषाढी एकादशीनिमित्त उर्वरित 100 झाडे लावण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.
आळंदी ते पंढरपूर वारी अंतर 221 किलोमीटर आणि या वारीला जाता आले नाही म्हणून 221 वडाची व इतर झाडे लावायचे केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी तुम्हा सर्व माऊलींचे आशीर्वाद फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे हीच माऊली चरणी प्रार्थना.
आज सकाळी वारी प्रवास करताना संत तुकाराम महाराजांचा एक अभंग मला आठवणीत आला, हा अभंग माझ्या अतिशय आवडीचा आहे. अकरावीच्या पुस्तकात हा अभंग आम्हाला होता त्यावेळी प्राध्यापिका लता पाटील यांनी हा अभंग आम्हाला वारकरी संप्रदायाचे सरळ,सोप्या भाषेत शिकवला होता 'भेटी लागे जीवा लागलीसी आस' हा अभंग ब्लूटूथ स्पीकरवर मोठ्या आवाजात ऐकताना या संपूर्ण अभंगाचे निरुपण करायची माझी इच्छा झाली. खरंच विठ्ठल दर्शनाची आस आम्हाला लागलेली आहे, हे दर्शन दोनशे एकवीस वडाच्या झाडाच्या रूपातून आम्हाला होत आहे, होणार आहे!
राम कृष्ण हरी!
जय जय विठ्ठल !
जय हरी विठ्ठल !
*सतीश मोरे*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...