घामाचा सुगंध
मुलांना त्यांच्या आवडीचं काम करू द्यावं, त्यांचे छंद जोपासू द्यावेत, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांना मोकळं आकाश द्यावं, अशी आजच्या काळातील प्रत्येक बापाची इच्छा असते.
पूर्वीचा काळ वेगळा होता. वडिलांनी ठरवलं की मुलगा डॉक्टर व्हायचा, इंजिनिअर व्हायचा किंवा शिक्षक व्हायचा, तर मुलंही त्याच मार्गाने चालायची. त्या मुलाची स्वतःची इच्छा काय आहे, त्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे, याचा फारसा विचार होत नसे. मुलं वडिलांची स्वप्नं पूर्ण करायची.
पण काळ बदलला आहे. आता प्रत्येक पालकाला वाटतं की मुलांनी स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडावं आणि त्यात यशस्वी व्हावं.
माझ्याबाबतीत मात्र तसं झालं नाही. मी आर्ट्सचा विद्यार्थी होतो. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मला उत्तम गुण मिळायचे. भाषेवर माझं चांगलं प्रभुत्व होतं. पण नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या सल्ल्यामुळे मी सायन्सला गेलो. बी.एस्सी. बॉटनी पूर्ण केलं. आज मागे वळून पाहताना वाटतं, त्या शिक्षणाचा माझ्या आयुष्यात फारसा उपयोग झाला नाही. मी जे क्षेत्र मनापासून निवडलं असतं, कदाचित त्यात अधिक समाधान मिळालं असतं.
म्हणूनच माझ्या मुलाबाबत मी वेगळा निर्णय घेतला.
पियुषला जगभर फिरायचं होतं. वेगवेगळे देश पाहायचे होते. त्यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र निवडलं. बारावीनंतर तो पुण्यात हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी गेला. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुट्टीत कराडला आला.
मी त्याला सांगितलं, "पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभवही महत्त्वाचा असतो. एखाद्या हॉटेलमध्ये काम कर."माझे मित्र आशीष पाटील यांच्या ग्रीनलँड हॉटेलमध्ये तो कामाला जाऊ लागला.
एक दिवस घरी आल्यावर त्याने मला एक प्रसंग सांगितला.हॉटेलमध्ये काही तरुण जेवायला आले होते. ऑर्डर देण्यात थोडा उशीर झाला आणि त्यांनी पियुषवर राग काढला. त्याला सुनावलं. पण हॉटेल व्यवसायाचं एक तत्त्व असतं – ग्राहकावर रागवायचं नाही.पियुष शांतपणे सगळं ऐकत राहिला.
रात्री हॉटेल बंद झाल्यावर तो बाहेर आला. त्याच्या बुलेटजवळ गेला. त्या तरुणांनी त्याला ओळखलं."अरे, ही तर सतीश मोरेंची गाडी आहे!"पियुष म्हणाला, "हो, सतीश मोरे माझे पप्पा आहेत."हे ऐकताच त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी पियुषची माफी मागितली.
त्यावर पियुषचं उत्तर मला आजही आठवतं –"माझे पप्पा मोठे असतील, पण हॉटेलमध्ये मी एक वेटर होतो. तुम्ही ग्राहक होतात. तुमचं बोलणं ऐकणं हे माझं काम होतं."त्या दिवशी मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटला.
आज पियुष न्यूझीलंडमध्ये आहे. तो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पुढील शिक्षण घेत आहे आणि त्याचबरोबर नोकरीही करतो आहे.
न्यूझीलंडला जाताना मी त्याला एकच गोष्ट सांगितली होती –"तू कोणतंही काम कर. पण कामाची कधी लाज बाळगू नकोस. कारण कोणतंच काम छोटं नसतं."
आज दुपारी मी त्याला फोन केला.
तो म्हणाला, "पप्पा, आज मी तीन ठिकाणी काम केलं. त्यापैकी एका ठिकाणी इतकं कष्टाचं काम होतं की मी खूप कंटाळलो आहे."हे ऐकताना माझ्या डोळ्यांत पाणी आलं.
मी त्याला फक्त एवढंच म्हणालो "बाळा, तू न्यूझीलंडमध्ये घाम गाळतोयस, पण त्या घामाचा सुगंध मला इथं कराडात बसूनही जाणवतो आहे. तुझ्या कष्टांचा मला अभिमान आहे."
मित्रांनो,
मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात, स्वतःच्या मेहनतीने आयुष्य घडवतात, तेव्हा बापाच्या आनंदाला पारावार राहत नाही.माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून स्वावलंबनाचे धडे दिले. स्वतःचं काम स्वतः करण्याची सवय लावली. आज पियुषही त्याच मार्गाने चालतो आहे.
वेलिंग्टनमध्ये गाळलेला त्याचा घाम आज हजारो किलोमीटर दूर माझ्या मनाला सुगंध देतो आहे.
पियुष, तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.कष्ट करत राहा. संघर्ष करत राहा.कारण कोणतंच काम वाईट नसतं.वाईट असतो तो फक्त संघर्षाला घाबरणारा दृष्टिकोन आणि लक्षात ठेव ,"कष्टाच्या घामाला नेहमी यशाचा सुगंध असतो."
@पप्पा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा