मी आणि योगेश ३३ वर्षानंतर
एका टेबलावर
योगेश सुभाष शहा,कमलवाडी शनिवार पेठ कराड. माझा टिळक हायस्कूलचा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा क्लासमेट. पाचवी ते सातवी माझा आवडता वर्ग म्हणजे तुकडी क. पाचवी क मध्ये प्रवेश घेतल्यानंतर दीपक तडक, दीपक काकडे, योगेश शहा,सागर जोशी,मिलिंद नवाळे, हिरा भंडारी, सुनील पाटील, डायालाल खंडेलवाल ,शेख, इनामदार, विनायक गरूड, राजेश कुंभार, निलेश काणे, हेमंत जाधव, प्रशांत पाटील आदी माझे क्लासमेट होते.
योगेश शहा आणि माझी 1982 पासूनची मैत्री आहे.मी करवडी येथून रोज कराडला एसटीने शाळेला येत होतो. वर्गात आमच्या असणारे बहुतांश मुले ग्रामीण भागातली होती, योगेश सारखी काही शहरातलीही होती. योगेश आणि मी मधल्या सुट्टीत एकत्र जेवायला बसत होतो. खेड्यातून आणलेला डबा योगेशला खूप आवडायचा तर त्याने आणलेले जैन पद्धतीचे जेवण, खाकरा, ढोकळा मला खूप आवडायचे. एका डब्यात एका बेंचवर आम्ही अनेकदा जेवलो आहे. कधीकधी दुपारच्या वेळेला डबा घेऊन दीपक काकडेच्या घरातही आम्ही जात असू. एका डब्यात मित्रांसमवेत बसून जेवण्याचा आनंद फार मोठा आहे, हे भाग्य मित्रासोबतच लाभते.
आज हे सांगायचं कारण आज खुप दिवसानंतर योगेश आणि मी एकत्र एका टेबलावर बसून जेवलो. शाळा सोडल्यानंतर योगेश आणि माझी कराड शहरात अनेकदा भेट झालेली आहे, होत राहते. गणपती मंदिरा समोरील त्याच्या दुकानात मी अधूनमधून जातो. दुकानात गेल्यानंतर योगेश काजू, बदाम, पिस्ता, खारीकच्या भरण्यांची टोपण उघडतो आणि एका प्लेट मध्ये सर्व ड्रायफूट समोर ठेवतो. मला खायला लावतो,स्वत खातो. त्याच्या दुकानात गेलो आणि ड्रायफूट खाल्ले नाही असा एकही दिवस गेला नाही. दुकानात गप्पा मारताना योगेश समोर असलेल्या लोकांना 'हा सतीश माझा शाळेतला मित्र, वर्गातील हुशार विद्यार्थी. आमच्या वर्गाचा सेक्रेटरी'अशी ओळख करून देतो.
शाळा सोडल्यानंतर आम्ही पुन्हा कधीच एकत्र जेवले नव्हतो, तसा योगच आलेला नव्हता. आज ऑफिस मधून परत येताना योगेश मला भेटला. चल माझ्यासोबत, आज खानावळीमध्ये जेवायला जायचं आहे, असे म्हणून त्याने मला बळजबरीने आत नेले. दिवेकर बेकरीसमोरच्या ओंकार लंच होममध्ये आम्ही दोघं एकत्र बसून जेवलो.
1988 साली मी दहावी पास आऊट झालो आहे. हा कालावधी विचारात घेतला तर 33 वर्षानंतर मी आणि योगेश आज एकत्र एका टेबलावर जेवलो. शाळेत एका डब्यात बेंचवर बसून जेवल्याच्या आठवणी आज जाग्या झाल्या. वर्गमित्र वर्गशिक्षक, शाळेतील गंमती जमती याविषयी आम्ही खूप गप्पा मारल्या. शाळेतील मित्र आणि शाळेतील आठवणी या खरंच रम्य असतात. पुन्हा असं वाटतं की लहान व्हावं आणि शाळेत जाऊन त्याच बेंचवर बसावं आणि पुन्हा तेच मित्र भेटावेत. असा योग लवकरच येवो.
*सतीश वसंतराव मोरे*
०४.०८.२०२१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा