फॉलोअर

२५ एप्रिल २०१६

उन्हाळी सुट्टी आमची आणि आजची



   
                                     झुक झुक आगीनगाडी
                                         धुराच्या रेषा हवेत सोडी
                                              पळती झाडे पाहु या
                                                   मामाच्या गावाला जाऊया !!




हे बालगीत आठवतंय 
लहानपणी केलेला, दंगा, गोंधळ, मजा, धाबडधिंगा 
सगळे डोळ्यासमोर उभे राहिले ना !
मामाच्या गावाला जाण्यासाठी 
आई बाबाकडे केलेला हट्ट पण आठवतोय, होय ना ! 
एसटीत, रेल्वेत बसायला मिळणार असल्याने 
वाढणारी  उत्सुकता पण  आठवतेय ना! 

1990- 1995 च्या अगोदर शाळेत असणाऱ्या  आपल्या पिढीला मामा,  मामी,  आजी आजोबा, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, मामाचं गाव,  मामाचे दोस्त, मामाच्या गावातील गल्ली बोळ,  रस्ता,  विहिर,  मैदान,  घरगुती बैठे खेळ,  पत्ते ,चलस , सूर, आठ्या पाट्या आणि खुप खुप काही पहायला मिळाले आहे. 
आजच्या घडीला  आपल्या मुलांना हे काही पहायला मिळू शकत नाही. 


सोशल मिडिया वर मे महिन्यातील सुट्टी 20 वर्षापुर्वीची आणि आजची असे दोन फोटो फिरत आहेत.  हे फोटो पाहून माझ्या मुलीने पप्पा तुम्ही झाडावर खेळत होता? असे आश्चर्याने विचारले.  मला पण का पाठवत नाही, असा प्रश्‍न केला. पुढे जाऊन तिने तुम्ही आणखी काय काय करत होता, कसे जायचा, पारंब्या म्हणजे काय, कुठले खेळ खेळायचा,  कुठे लपून बसायचा, असे एकावर एक प्रश्नाची सरबत्ती केली. खरंच किती रम्य काळहोता तो,  किती सुंदर  आठवणी  आहेत, बालपणीच्या!


शाळेत जायचे होते, पण शाळेचे टेन्शन नव्हते, आभ्यास होता पण टारगेट नव्हते, गुरूजीचा धाक, भिती होती मात्र एक्स्ट्रा क्लासचा दबाव नव्हता. पास होण्यासाठी धडपड होती, 90 % चे ध्येय नव्हते . पण या सर्व शिक्षणात प्रचंड आनंद मिळत होता.  घरची कामे करून शाळेला जायचे,  खाकी चड्डी, पांढरा शर्ट मुलांसाठी आणि निळा पांढरा ड्रेस मुलीसाठी, हा ऑल  ओव्हर मराठी शाळेचा ड्रेस कोड.  हायस्कूलला पण तोच ड्रेस.

शाळेत जायला ना स्कूल बस ना व्हॅन, ना रिक्षा. जीवन जगण्यासाठीचं खरं शिक्षण मिळत होतं या शाळेत. मे महिना आणि दिवाळीची सुट्टी कधी लागते इकडे  सगळ्यांचेच लक्ष असायचे. सुट्टीचे प्लॅनिंग एकच मामाच्या गावाला जायचे. मामाचं गाव हा सार्‍या भाच्चा भाच्चीसाठी जगातील सर्वात आनंददायी ठिकाण असायचे. बहीण भाऊ नाते खूप पवित्र,  निरागस,  समर्पण , सेवा,  त्याग  आणि काळजीचं आहे आणि होतं. आज समानता आणि आई वडिलांच्या संपत्तीमधील वाटा यामुळे काही ठिकाणी  हे नाती ताणले गेले आहे. तरीही मामा हा प्रत्येकाचा जवळचा होता व आजही आहे.



सुट्टीची तारीख पोस्ट कार्ड ने मामाला कळवली जायची, त्या दिवशी मामा कुठल्याही परिस्थितीत बहीण च्या घरात हजर! भाच्चे मंडळीना सायकल, एसटी, रेल्वे , बैलगाडी तर जवळपास गाव  असेल तर चालत घेऊन मामा जायचा. मामाची मामी वाट पाहत  असायची.  भाच्याला, भाच्चीला आदराने हाक मारली जायची. ती नावे पण गमतीशीर असायची. राणीसाहेब, राजसाहेब. मामी खुप जपायची या नात्याला. 

सुट्टीत खुप मज्जा करायचो आम्ही पोरं.  नदीकाठी आजोळ असेल तर नदी, नाहीतर विहिरीत पोहायला जाणे हे हमखास  असायचे.  पोहायची, पाण्याची भिती मामा अशी घालवायचा की पोहणे चार  आठ दिवसांत शिकत होतो. सकाळपासून संध्याकाळ ते रात्री झोपेपर्यंत दंगा, मस्ती, खेळ याशिवाय काही नव्हते. मामी खुप छान स्वयंपाक करायची, प्रेमाने भरवायचीही. मामाची मुलगी किंवा मुलगा हा विक पॉइंट होता.  मामी चेष्टा करायची, जावई म्हणून चिडवायची. मामा पोरांना घेऊन रानात जायचा,  शेतावर विहिरीच्या पाटात धम्माल खेळ. झाडावर चढून खेळायचे, सावलीत बसून मस्त पैकी कांदा चटणी , पिठलं खायचं. कुळवावर बसायचा जो आनंद होता तो आज  ऑडीत बसण्यातही नाही.
 दुपारी पत्ते किंवा चलस खेळ, कंटाळा आला की गाण्याच्या, गावांच्या, शब्दांच्या भेंड्या.

चिंचेचे चिचोके आडवे फोडायचे, त्या आमच्या सोंगट्या. पांढरी बाजू आणि काळी बाजू हे परिणाम. जमीनीवर, पाटावर  उभ्या आडव्या रेषा आखून खेळ भलताच रंगायचा, चलसचा.





मी तर मे महिन्यात आणि दिवाळीत रेठरे बु गावाला आजोळी जायचोच. चैनीच्या रेठर्यात टुरिंग टाॅकीज होती. तिथे पिक्चर पहायला जाणे हा माझा आवडता छंद. मामाकडून गोड बोलून पैसे काढायचे, अनं रात्री पिक्चर बघायला जायचे.  मामा नाही म्हणला तर मामी जवळ गुळुगुळु करायचे. मामी पैसे द्यायची, रात्री उशीरा हळूच येऊन पत्र्यावर झोपायचे, असा क्रम असायचा.


अनेकांच्या  मामाच्या गावची  जत्रा मे महिन्यात असायची. मग आणखी मजा. पाळणा, गोल रिंगण,  खेळणी, पिपाणी, चिरमुरं, बत्तासू काय काय!  सुट्टी संपत आली की मामा छान ड्रेस घ्यायचा. परत घरी सोडायला यायचा.  मामी आग्रहानं म्हणायची , जावई बापू या पुढच्या सुट्टीत.  खुप छान आठवणी आहेत मामाच्या गावाच्या,  मे महिन्यातील सुट्टीच्या. पुन्हा एकदा लहान होऊन मामाच्या गावाला जावंसं वाटतंय.




आज काळ बदलला आहे. मामा मामी नोकरी करतात. भाच्चा-भाच्चीसाठी मामाला वेळ नाही. अपवादात्मक कुटुंबे सोडली तर मामाचं गाव आता खुप दूर झालं आहे.  मनोरंजनाचे निकष बदलले आहेत.  तेव्हा टिव्ही, मोबाईल नव्हते.  घराबाहेर  असणाऱ्या मोठ्या जगात मनोरंजन शोधलं जायचं. आजची पोरं  4 जी आहेत. सुट्टीत मोबाईल वर तुटून पडलेली आहेत.  खेळायला म्हणून  जमतात पण येताना मोबाईल खिशातून आणतात.  मग व्हिडिओ, फोटो, पिक्चर,  फाईल अपलोड  अॅड ट्रान्स्फर आणि चॅटिंग यातच यांची सुट्टी जात आहे. यापेक्षा अधिक लिहलं तर राग येईल आजच्या पिढीला.


आजच्या या परिस्थितीवर
आधुनिक मामाचा गाव  ही
कविता वाचून समाधान आणखी काही सांगायची गरज नाही.

झुक झुक झुक आगीनगाडी 
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे डबे बुक करूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव हाय मोठा
मॉल बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया
मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा पगारदार
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईवला जाऊया
फोर व्हिलर शिकूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको शिकलेली
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
तिला जोक पाठवूया
रूसलेली मामी हसवूया 
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको चटपट 
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा बर्गर खाऊया 
मामाच्या गावाला जाऊया

...........सतीश मोरे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...