फॉलोअर

११ एप्रिल २०१६

वेळ काढून वाचा, दोन महापुरुषांची जयंती आहे



' वेळ काढुन वाचा कारण 125 जयंती आहे '

असे शिर्षक असलेली नालंदा सामाजिक संघ महाराष्ट्र या ग्रुप अॅडमीननी व्हाॅटसअपवर शेअर केलेली एक पोस्ट सर्वत्र फिरत  आहे. मला ती खुप आवडली. गेली अनेक वर्षेपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मी पहात  आलो आहे. ही जयंती साजरी करताना माझ्या मनात याच प्रकारचे विचार उमटले होते, बहुतांशी तेच विचार या पोस्ट मध्ये आहेत. त्यामधील काही भडक शब्द वगळून , एडिटींग करून अॅडमीन लेखकाच्या परवानगीने ती पोस्ट जशीच्या तशी पुढे सादर करत आहे .

मी लहान असतानाचे काही प्रसंग मला आजही आठवतात . त्यापैकी एक प्रसंग सांगावासा वाटतो. सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागात पावसाळी लागण केलेल्या पिकांची कापणी सुरु होते. त्याच दिवसात सकाळी सकाळी बहुरूपी,पिंगळा,अस्वलवाला,वासुदेव तशीच ढोलगं व चाबकाचा आसुड ओढत कडकलक्ष्मी मरीआई दारादारावर यायचे.  आम्ही डोळे चोळतच अंथरूणातून उठून बाहेर यायचो. तेव्हा आई सुपातुन या लोकांना धान्य, घेवडं ज्वारी घालायची. कपाळी टिळा लाऊन ते लोक निघून यायचे. यांचा उद्देश पोट भरण्याचा होता हे आज ध्यानात येतंय. पण हे लोक याच दिवसात का येतात याचं उत्तर मला चळवळीत आल्यावर मिळाले.कारण या काळात सुगी असते.



तशीच काही दिवसांनी बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती येणार आहे. त्यानंतर काही दिवसानंतर शिवजयंती येणार आहे. भक्त मंडळी जागे होण्याची चाहुल लागली आहे.म्हणूनच हा लेखन प्रपंच.

काही दिवसांवरच क्रांतीसुर्य विश्वरत्न बाबासाहेब डाॅ.भिमराव आंबेडकर यांची व त्यानंतर अन्य महापुरूषांची जयंती आल्या आहेत. ज्या महापुरुषांनी आपली सारी हयात बहुजन समाजाला स्वातंत्र्य हक्क मिळवून देण्यासाठी घालवली . प्रसंगी स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केले. त्या महापुरूषांचा जो उद्देश होता आमच्या संपूर्ण स्वातंञ्याचा. आज त्याच महापुरुषांचं दुर्देवं त्यांची जयंती साजरी करण्याचा आमचा उद्देश काय असतो ?

समाजातून पट्टी गोळा करणे , जेवणं घालणे आणि सगळ्यात महत्त्वाचे हजारो-लाखो रुपये खर्च करुन डाॅल्बी सिस्टिम सांगणे, मिरवणूक काढणे आणि दारु पिऊन मिरवणुकीत धाबड धिंगाणा, नंगा नाच करणे इतकाच असतो. गांधी,नेहरू,टिळक,आगरकर,गोखले,सावरकर  यांच्या जयंत्या साज-या करताना डाॅल्बी लावून,दारु पिऊन नंगा नाच करत धिंगाणा घालतात का ?  जेवनावळ्या घालतात का ? आणि आम्ही !

आम्ही आमच्या समाजातून हजारो रूपये गोळा करतो,आणि दंगा,नाच, दारु,जेवण, मिरवणूक काढून उधळून टाकतो. आमचा तरुण ज्योत आणायला जातो पण ज्योत घेऊन पळताना त्याला एक क्वाटर मारल्याशिवाय पळता येत नाही २०० मिलि टाकून ५० कि.मी पळण्याची तयारी दाखवणारा आमचा तरुण अर्धा किलो मेंदूचा वापर करताना दिसत नाही हे दुर्देव आहे.

गावातून,गल्लीतून मिरवणूक काढताना बाबासाहेबांच्या पुढे नाचताना स्प्राइड आणि थम्स अप मध्ये मिसळून दारु प्यावी लागते कारण नाचताना कुठे बाजूला जाऊन चालत नाही., तग धरला पाहिजे.  गाणी तर त्याहून भारी, कोणती ????
पोरी जरा जपून दांडा धर.....शांताबाई .....

नशेत धुंद होऊन नाचणारा तरुण आमच्याच आया बहिणींची,आमच्याच महापुरुषांची आब्रु वेशीवर टांगत असतो आणि दुस-या दिवशी बाहेर काही झाले तरी पण हा अंथरूणात घोरत पडलेला असतो. वर्षभरात एकच दिवस काम ते हि चुकीचे !

काही बुद्धीवादी लोक आमच्या महापुरुषांची चरिञ आणि चारिञ्य बदनाम करुन आम्हाला संपवु इच्छितोय आणि आम्ही माञ गुंगीचं औषध घेउन आरामात झोपुन राहतो. षड्यंञ पुर्वक एखाद्याने जातियवाद वाढण्यासाठी पुतळा विटंबना,डिजिटल बोर्ड फाडला तर आपण जागे होतो अन आमच्याच बांधवाच्या विरोधात उभे राहतो.
गुलाम लोक स्वताच्या मेंदुने चालत नाहीत तर शत्रूच्या इशार्यावर चालतात त्यामुळे त्यांचा सत्यानाश हा अटळ असतो, हे कधी आम्हाला कळणार?

आजपर्यंत आपण आमच्या महापुरुषांच्या जयंत्या साज-या केल्या त्या शञुच्या, व्यवस्थेच्या सोईनुसारच केल्या.आणि त्याचा फायदा त्याच्या व्यवस्थेला भरभरून झाला. त्यामुळे आमच्या समाजाला आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास समजलाच नाही. पण दंगली, जातीयवादाला माञ प्रेरणा मिळाली व आमची पिढी व्यवस्थेच्या गुंगीत गुंगुन राहिली.
बांधवानो, एक दिवस नाचून किंवा जयंती साजरी करुन आम्हाला आमचा इतिहास ,आमचे महापुरूष समजणार नाहीत. त्यासाठी आम्हाला सातत्याने समाजाला जागृत करावं लागेल. आमचे महापुरूष हे आमची प्रेरणा आहेत व त्यांचा इतिहास हीच आमची विरासत आहे.आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास जर आम्ही आमच्या समाजाला समजाऊन सांगू शकलो नाही तर आमच्यासारखे षंढ आम्हीच असू .आम्हाला आजपर्यंत धर्माची,जातीची दारु देऊन उच्च  व्यवस्थेने आमच्याकडुन नागड्यानेच माकडनाच करुन घेतला . पण यातुन आम्ही आमची आब्रु , स्वाभिमान त्यांच्या वेशीला कधी बांधून ठेवला कळलच नाही.

येणारा काळ हा भयानक आहे आणि आम्ही जर त्यांच्या व्यवस्थेच्या सोईनं आमच्या महापुरुषांच्या जयंत्या सवडीनुसार , पाहिजे तशा करु लागलो तर ही व्यवस्था आम्हाला हिजडे करुन भिक मागायला लावल्याशिवाय राहणार नाहीत. क्रांतीचा एक सिंद्धात आहे, हिजडे क्रांती कधीच करत नाहीत.

गल्लोगल्लीत, बहुजन दुकानदार, शेतकरी,नोकरदार या आपल्याच लोकांना धमकी दाखवून खंडणी गोळा केल्यासारखे जयंतीसाठी आमची पोरं पट्टीं गोळा करतात व तोच पैसा चुकीच्या मार्गाला लावुन येणा-या पिढिला मातीत घालण्याचा डाव रचत आहेत. यासाठी मिञहो,आपण समाजाच्या पैशाचा योग्य सदुपयोग करायला हवा. अन्यथा आपण समाजाची दिशाभूल केल्यासारखे होईल. समाजाच्या पैशातून समाजाला सक्षम विचारधारा द्यायला हवी.  खरा इतिहास व वर्तमान व्यवस्थेचे षड् यंञ सांगून जागे केले पाहीजे . कारण तुमचं स्वातंत्र्य अज्ञानात दडलं आहे आणि समाज जागा झाला, जागृत झाला तरच त्या मंडळींच्या कारस्थानाना चाफ बसेल आणि बहुजनांच्या गळ्याभोवती आवळलेला फास आपोआप तुटेल. यासाठी समाजानेही जे लोक खरोखर बहुजनांना जागृत करत आहेत त्यांनाच पैसा, वेळ, बुद्धी, श्रम,कौशल्य द्यावे. अन्यथा चुकीची जयंती साजरी करणार्यांना खुशाल विरोध करावा. नाहीतर तुमच्याच पैशात तुम्ही तुमचा सत्यानाश करत आहात हे सिध्द होईल.

भक्त आणि अनुयायी यामध्ये फरक आहे. तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस जागे होणारा भक्त आणि वर्षभर, आयुष्यभर महापुरूषांच्या विचारावर चालणारे अनुयायी असतात. भक्त एक दिवस जयंती साजरी करतात तेही चुकीच्या पद्धतीने . पण अनुयायी हे तीनशे पासष्ट दिवस निरंतर समाजाला जाग्रुत करतात. भक्त भक्ति करतात व अनुयायी समाजाला स्वातंत्र्य देऊ इच्छितात. समाजाने भक्तानां साथ द्यायची असेल तर गुलामी ही तुमच्या पाचवीला पुजलेली असेल. पण जर समाजाने अनुयायांना साथ दिली तर अनुयायी समाजाला स्वातंञ्याच्या उबंरठ्यावर नेहतील.
तेव्हा जागे व्हा,सतर्क व्हा.आणि भक्ताना अनुयायी होण्यास जागृत करा व तुम्हीही जागृत व्हा.......

नालंदा सामाजिक संघ महाराष्ट्र.



अशी ही पोस्ट आहे. खुप छान विचार मांडले आहेत.


या निमित्ताने मला काही जुन्या गोष्टी आठवल्या. 1982 - 83 साली करवडी गावात आम्ही शिवप्रेमी मंडळ स्थापन केले होते. आम्ही महापुरुषांच्या जयंती साजरी करत. सदाशिवगड, वसंतगड, आगाशिवगडावरून शिवज्योत आणायला जात होतो. कराड तालुक्यात सुद्धा अनेक मंडळे लांब अंतरावरून ज्योत आणायला जायचे. शिवप्रेम जागृत व्हायचे. फलटणच्या शिवाजीराव भोसले यांचे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित केले जात होते. ते व्याख्यान  ऐकून विचाराचे स्फुल्लिंग पेटायचे.

पुढे पुढे जयंतीचे स्वरूप पालटू लागले. समृद्धी आल्यामुळे पैसा हातात खेळू लागला. वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी हळूहळू होत राहिल्या. जयंती साजरी करताना महापुरुषांचे स्मरण कमी जल्लोष वाढत गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा खरं तर राजांच्या कतृत्वाला सलाम करण्यासाठी आहे. मात्र कराड सारख्या अनेक शहरात मशिदी जवळून मिरवणूक जाताना खुन्नस देण्यासाठी ही घोषणा आज दिली जाते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे तर सर्व समाजाचे नेते आहेत पण त्यांना  एका चौकटीत नेऊन ठेवण्याचे काम केले जात आहे. यामध्ये बदल झाला पाहिजे अशी सततची मागणी काही पत्रकार, समाजकारणी करत आहेत . याचापरिणाम म्हणून कराडात यावर्षी सर्वाना बरोबर घेऊन 125 वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे, हे कौतुकास्पद आहे.

सोशल मीडिया हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. महापुरुषांचे विचार या माध्यमातून तरूण पीढीपर्यंत पोहचू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनेक ग्रुप व्हाॅटसअप , फेसबुकवर आहेत. मात्र दुर्दैवाने या ग्रुपमध्ये फक्त डोकी भडकावणारे विचार टाकले जातात. महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले जात आहे.

वैचारिक बैठक असणारे अॅडमीन असणारे नालंदा, शिवम सारखे काही ग्रुप सुद्धा  आहेत. डाॅ. शिरीष काटकर अॅडमीन असलेल्या शिवम ग्रुपमध्ये रोज नऊ ते साडे दहा दरम्यान एका सामाजिक, ऐतिहासिक विषयावर चर्चा होते. या ग्रुपचे अनुकरण करण्याची गरज आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचा एक तेजस्वी विचार आहे.  वाचा, शिका आणि संघर्ष करा. हा विचार पुर्ण न वाचता केवळ संघर्ष करण्यावर जोर दिला जातो. या जगात ज्ञानाइतकी ताकद कशातच नाही, हे बाबासाहेबांनी सुद्धा ओळखले होते. बाबासाहेबांनी मिळवलेल्या पदव्याची माहिती घेतली तर हे लक्षात येईल.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले म्हणजे आपले काम संपत नाही. बाबासाहेबांच्या, महाराजांची जयंती साजरी केली, पुतळ्याभोवती लायटींग केली म्हणजे चांगली जयंती झाली असे नाही तर त्यांचे विचार किती डोक्यात शिरले, किती जण शिकले, किती जण एमपीएससी, युपीएससी परिक्षेत चमकले हे महत्वाचे आहे.
शिवजयंतीला किती लांबून ज्योत आणली यापेक्षा राजांचे विचार किती लांब पोहचवले, हे ध्यानात घेतले पाहिजे. वाहनांवर, मोबाईलवर, हातावर शिवाजी महाराजांचे चित्र लावून मिरवताना छत्रपतीचे आचरण किती करतो, हे ही पहायला हवे.

शिवचरित्र अभ्यासक संतोष तोत्रे यांनी जे महिलांचा सन्मान करत नाहीत त्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे प्रखर मत मांडले आहे, ते योग्यच आहे. महापुरुषांच्या जयंती साजरी करताना त्या निमित्ताने गोळा केलेल्या वर्गणीतून घरोघरी शिवचरित्र, भीमचरित्र, बाबासाहेबाचे विचार, संविधान प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे.
आंबेडकर जयंती दिनी ड्राय डे असावा अशी चळवळीतील विचारवंताची मागणी रास्त आहे. पण फक्त हे करून मुळ प्रश्न संपणार नाही. त्यासाठी वैचारिक क्रांती हाच पर्याय आहे आणि ही क्रांती होण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही
.
मारूल हवेली ( पाटण ) येथील एका दलित कुटुंबातील विनोद मस्के नावाचा मुलगा अमेरिकेत मायक्रोसाॅफ्ट कंपनीमध्ये उच्च पदावर काम करीत आहे. परवा संगणक तज्ज्ञ सारंग पाटील यांनी या मुलांच्या खडतर प्रवासाची कहाणी सांगितली. केवळ अभ्यासाच्या जोरावर हा मुलगा तिथं पोहचला आहे, बिल गेट्स सोबत बैठकीला बसतो, वर्षाला एक कोटी रूपये पगार घेतो. आपल्यातीलच अशा एका मुलाचा आदर्श घेऊन आपणही शिकलेच पाहिजे असा संकल्प आपण 125 व्या जयंती दिनी घेऊ या.


महत्त्वाचे. ..कराड सारख्या शहरात  अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि  भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मिरवणूक काढण्यात येते.  कराड मधील शिवप्रेमी आणि भिमप्रेमी जनतेचा मला अभिमान आहे.  कराडचे अनुकरण इतरांनीही करावे , ही अपेक्षा.

जय शिवराय, जय भिम !

.               ....सतीश मोरे
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...