फॉलोअर

१० जानेवारी २०१९

देत रहा

*अंतरंग*

कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये माझे शालेय सर्व शिक्षण झाले. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात आमच्या शाळेत उपक्रम राबवला जायचा , त्याचं नाव होतं विद्यार्थी दानकलश योजना !  गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी इतर सर्व विद्यार्थ्यांकडून किंवा दानशूर व्यक्तींच्या कडून देणगी गोळा करून गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या पुस्तके याचे वाटप केले जायचे .

हा कार्यक्रम आमचे कडक शिस्तीचे पण विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक रा.गो. प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असे. या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक वर्षी प्रभुणे सरांचे भाषण असायचे. स्पष्ट आणि कडक आवाजात त्याचे ऐकलेलं भाषण आजही कानात घुमतंय. ते म्हणत, आपल्या कडे जे काही देता येईल ते आपण द्यायला हवे. दान करण्याइतका जगात दुसरा कोणताही आनंद नाही. *देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे .*

भाषण संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वस्तू वाटल्या जायच्या. वस्तू वाटल्यानंतर त्या मुलांच्या चेहर्‍यावर जे समाधान दिसायचे ते समाधान फक्त आम्हाला त्यावेळी कळत, दिसत होते. मात्र प्रभूणे सरांनी जे वाक्य सलग सहा वर्षे आमच्या कानावर बिंबवले होते त्याचा खरा अर्थ आज समजू लागला आहे.

खरंच आपल्याजवळ आहे ते देण्यात जो आनंद आहे ,जी मजा आहे ती घेण्यात कधीच नसते. घेणाऱ्याचे हात नेहमी पसरलेले असतात, देणार्‍यांचे हात नेहमी आतुरलेले असतात. देताना हाताची पाच बोटे एकत्र असतात.

'कराग्रे वसते लक्ष्मी'
म्हणजे आपल्या बोटात, हातात लक्ष्मी असते. पाच बोटातील लक्ष्मी (पाच बोटे) आपण जेव्हा एखादी वस्तू देतो तेव्हा एकत्र येते, मात्र ही पाच बोटे दुसऱ्या कडून काहीही घेताना लांब जातात. (करून पहा)

एकत्र आलेली लक्ष्मीदेवी  तुम्हाला इतरांना द्या, समाजातील दीन दुबळ्या लोकांना दान करा, तुमच्या आयुष्यात आनंद आला आहे आता त्याच्या डोळ्यात आनंद आणा असे सांगत असते.

कालच यशवंत महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना अतुल शास्त्री भगरे गुरुजी म्हणाले , कोट्यवधी रुपयांची संपत्ती असणारे,अफाट श्रीमंत असणारे लोक पुन्हा रस्त्यावर आलेले तुम्ही पाहिले असतील. करोडपती रोडपती झालेला तुम्ही पाहिला असेल ! मात्र  दान केलेली व्यक्ती रस्त्यावर आली आहे, भीक मागत आहे असे तुम्हाला कधीच दिसणार नाही.  कारण *दान करणारा माणूस कधीही गरीब होत नाही उलट तो श्रीमंत आणि समृद्ध होतो. तो जेवढे देतो त्या दुपटीने, चौपटीने देण्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते.*

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१०.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...