फॉलोअर

१४ जून २०२०

माझी वर्चुअल भारी 13 आणि 14 जुन


*माझी व्हर्चुअल वारी*
*सतीश मोरे*


कराड करवडी कराड,कराड ते मसूर
दि.13आणि 14 जुन 2020
राम कृष्ण हरी
*माऊली यंदा पंढरीची वारी नाही, यंदा वारकऱ्यांचे दर्शन नाही, यंदा वारीचा आनंद नाही, यंदा वारीला जायला मिळणार नाही, यंदा पालखी निघणार नाही, यंदा राज्यभरातून कोठूनही वारकरी आळंदीवरून पंढरपूरला जाणार नाहीत. मात्र मनाने वारकरी वारीला जाणार आहेत. आज वारी असती तर काय झालं असतं? आज मी कुठे पोहचलो असतो, आज पालखी कुठल्या गावात मुक्कामाला गेलेल्या असत्या, आज कुठल्या गावात पंगत झाली असती, याची चर्चा गावागावातील वारकरी आता घरात बसून पुढचे काही दिवस करणार आहेत. यंदा वारी नाही म्हणून गप्प न बसता आपण काय करू शकतो असा प्रश्न माझ्या मनात आला आणि मी स्वतः ठरवले आपण वारीला जायचं. आपल्या सोबत वारकरी नसतील, काही हरकत नाही. पण आपण वारीला जायचं सकाळी उठून पंढरपूरच्या दिशेला तोंड करून विठ्ठलाला नमस्कार करायचा आणि वारीला जायला बाहेर पडायचं. आपल्या मनामध्ये माउलीला मन भरून साठवून ठेवायचं आणि चालत राहायचं. माऊलीचा जयघोष करायचा रोज किमान 14 किलोमीटर कराड परिसरात चालायचं आणि 18 दिवसात 240 किमी वारीचा हा टप्पा पूर्ण करायचा,असा मी मनोमन निश्चय केला आणि माझ्या निश्चयाला माझ्या जवळच्या मित्रांनी आणि कुटुंबानेही पाठिंबा दिला*.


काल १३ जुन शनिवारी ज्ञानेश्वर माऊलीं पालखी सोहळा सुरू झाला. संध्याकाळी पाच वाजता आळंदी मध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी, विठोबा रुक्माई या हरिनामाचा जयघोष झाला. केवळ 50 वारकऱ्यांच्या उपस्थित ही वारी सुरू झाली. हा सोहळा सुरू झाला. सोहळ्याचे मालक यांनी माऊलींच्या पादुका हातात घेतल्या, चोपदारांनी आवाज दिला. माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली त्यानंतर नगर प्रदक्षिणा करून माऊलींच्या पादुका त्यांच्या आजोळी वाड्यात मुक्कामाला आल्या. हा सर्व सोहळा पुढारी फेसबुक लाईव्ह मी पाहिला.


प्रत्येक वर्षी आळंदीमध्ये हा सोहळा पाहताना सुमारे तीन चार तास वारकरी बेफान होऊन नाचलेले मी  पाहिले आहेत. तो आनंद या वर्षी पाहायला मिळाला नसला तरी मनात ही चित्रे डोळ्यासमोर उभी राहिली होती. माऊलींच्या मंदिरात खचाखच गर्दी झाली होती, प्रमुख दिंडी मालक, टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी माळकरी, झेंडेकरी तसेच मृदंग वादक आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात नाचत होत्या. हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले, खरंच मी तो आनंद कराडात घरात बसून सुटला आणि मग ठरलं चला आपण आता जाऊ या वारीला!  खरंतर प्रत्येक वर्षी आळंदीच्या मंदीरातील हा सोहळा संपल्यानंतर माझ्या सोबत असणारे रणजीत नाना पाटील किंवा वेळोवेळी पुण्यापर्यंत पालखी सोबत चालायला आलेले माझे पुढारी चे सहकारी, प्रमोद पाटील आम्ही सारेजण माऊलीच्या पादुका आजोळ घरी विसावल्या नंतर आम्ही पुण्याला जायला निघतो. पुणे टू आळंदी हे अंतर 28 किलोमीटर आहे. पालखी कसबा पेठ पर्यंत पोहोचेपर्यंत हे अंतर तीस बत्तीस किलोमीटर पर्यंत पोहोचते. पहिल्याच दिवशी हे अंतर कापायचे असल्यामुळे खूप त्रास होतो म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी पालखीसोबत न  चालता  सात आठ वाजताच पुण्याला जायला निघतो.आजही जर मी आळंदीत असतो तर चालायला सुरुवात केली असती. खरं तर मी  मोबाईलवर माऊलीचा सोहळा पाहत होतो. हा सोहळा पाहिल्यानंतर मनाची तयारी केली आणि कराडला आळंदी समजले आम्ही पुण्याला जायला निघालो.


माझ्या आईवडिलांचे दर्शन घेऊन वारीचा आजचा पहिला दिवस सुरु करावा असा निश्चय करत मी घराबाहेर पडलो. सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी वारीची सर्व तयारी करत कुटुंबातील सर्वांनी एकमेकाचे दर्शन घेऊन सोमवार पेठतून निघालो आणि थेट एकटाच करवडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कानात हेडफोन लावले होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा संत अभंग लतादीदींच्या स्वरात ऐकण्यात जी मजा आहे तो स्वर्गीय आनंद जगात कुठेच नाही. लतादीदी यांनी गायलेला भेटी लागे जीवा हा तुकाराम महाराजांचा अभंग मला फार आवडतो. तो ऐकत तसेच भक्तीगीते ऐकत राम कृष्ण हरी नामाचा जयघोष करत आठच्या ओगलेवाडी रेल्वे पुलावर पोचलो. 

दिपक मेडिकल चे धनंजय राजमाने माझे मित्र आहेत त्यांना फोन करून दुकानासमोर पाणी घेउन यायला सांगितले. दरम्यान पेठेत आल्यानंतर सदा माऊली फोटोग्राफर यांना फोन करून घराच्या बाहेर बोलावले, त्यांचे दर्शन घेतले. त्यांना माझी वारी ची कल्पना खुप आवडली. पाणी पिऊन पुन्हा करवडीच्या दिशेने निघालो. नऊच्या सुमारास गावी पोहचलो, स्टॅंडवर बाळू तात्या आणि हनुमंत कुंभार यांची भेट झाली. घरात आई-वडील, वहिनी आणि अण्णा यांचे दर्शन घेऊन जेवण केले आणि पुन्हा 09:25 च्या सुमारास कराडला यायला निघालो.


खूप वेगळा आनंद झाला होता.दरम्यान करवडी ओगलेवाडी दरम्यान काही ठिकाणी अंधारअसल्यामुळे सागरला गाडी घेऊन मदनेवस्ती परत यायला सांगितले. राम कृष्ण हरी जयघोष करत चालत होतो. पुढे  पंडित भीमसेन जोशी यांची अभंगवाणी ऐकत एकटा रस्ताने कराडच्या दिशेने निघालो होतो. ज्याचा सखा हरी अवघे विश्व त्यावरी कृपा करी, हा संत जनाबाई यांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ऐकताना खूप गहिवरून आले. माझ्या सोबतही माझा हरी आहे, मला रस्त्याला काही अडचण येणार नाही, कुणी रस्त्यात माझ्या आडवे येणार नाही मी रात्रीच्या अंधारातही सुखरूप घरी पोहोचणार याची मनोमन खात्री पटली.  रस्त्यावर अनेक कुत्री होती मात्र एकही कुत्रं माझ्या मागे लागलं नाही. ज्याचा सखा हरी हा अभंग काल रात्री मी प्रत्यक्ष अनुभवला.
10.40 च्या सुमारास कृष्णा नाक्यावर पोहोचलो. धर्मवीर संभाजी चौकात कृष्णा सर्कलवर रणजीत पाटील आणि बापू डुबल  पाणी बाटली घेऊन आले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. सुमारे साडेचार तासात करवडी कराड ते करवडी ते असे पंधरा किलोमीटर अंतर माऊलींच्या कृपेमुळे पूर्ण झाले होते.


दरम्यान नामदार बाळासाहेब पाटील यांची गाडी आम्हाला क्रोस करून गेली. त्यामुळे त्यांना मी स्वतः फोन लावला आणि माझ्यावर  वारी विषयी थोडीशी माहिती दिली. नामदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील हे सुद्धा प्रत्येक वर्षी वारीला जातात, पायी वारी करतात. गत वर्षी त्यांची फलटण नजीक माझी भेट झाली होती. जशराज पाटील यांची मुलाखत घेतली होती. जशराज पाटील यांनाही फोन करून या आठवणींना उजाळा दिला. रात्री अकराच्या सुमारास माझ्या शेजारी विराग जांभळे यांच्यासोबत गप्पा मारत सोमवार पेठेत पोचलो.पाय खूप दुखत होते, सर्वांनी माझे स्वागत केले. बाराच्या दरम्यान झोपी गेलो झोपताना उद्या सकाळी पाच वाजता उठायचे आहे असा संकल्प करून अंतर्मनाला तशा सूचना दिल्या.

*१४ जुन २०२०*
सकाळी पाच वाजता जाग आली, खरंतर उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. काही क्षण राहुदे जायचं आज, असं वाटलं. आळंदी ते पुणे या दरम्यान कंटाळा आल्यानंतर आम्ही एखाद्या ठिकाणी रस्त्याकडेला, फुटपाथ वर कुठेतरी झोपत असतो. आज तिथे असतो तर आपल्याला उठावे लागले असते आणि आपण उठलोच असतो आणि पुण्याला सकाळ पर्यंत पोहोचलो असतो, असे मनात आले. त्यामुळे झोपेचा पराभव करून जागो झालो. फ्रेश होऊन तयार झालो. हॉटेल साईराजचे सुर्वे आप्पा आणि अशोक मोहने यांचे फोन झाले. आता आज मसूरला वारीला जायचं होतं. सव्वा पाच वाजता सुर्वे आप्पांचा फोन आला, पाऊस पडतोय काय करायचं. मात्र पाऊस आपल्याला काय करतोय, आपण वारकरी आहोत अशी त्यांना सांगितले, त्यांना घरापर्यंत द्यायला सांगितले.
साडेपाच वाजता आप्पा आणि मी चालायला सुरुवात केली. 

कानात अभंगवाणी सुरुवात होती.भर पावसात आम्ही चालत राहिलो, पाऊस आम्हाला काहीच करू शकत नव्हता. सोबत छत्री घेतली होती, मात्र तरीही पाऊस लागत होता. आम्ही चालत कृष्णा पुलावर आलो.आता उजाडलं होतं. रस्त्यावर चालणारांची संख्या खूप होती, व्यायाम करणारे सुद्धा काही लोक दिसले. पुढे आलो आमच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज समोर अतिशय सुंदर असा नजराणा होता. माझं कॉलेज अधिकच सुंदर दिसत होतं. वरून पाऊस पडत होता. कॉलेजसमोर फोटो काढला.


बनवडी फाट्यावर अशोक मोहने आमची वाट बघत होते.  त्यांना घेऊन पुढे मार्गक्रमण केले, कोपर्डे हवेलीमध्ये सातच्या दरम्यान आम्ही पोचलो होतो. पाऊस थांबला असल्यामुळे सोबत आणलेला रेनकोट आणि छत्र्या एका माऊलींच्या घरात ठेवल्या. सिद्धनाथ मंदिराचे दारात जाऊन दर्शन घेतले आणि पुढे चालत राहिलो. कोपर्डे गावातील अनेक लोक भेटले. रेल्वे लाईन च्या अलीकडे रस्त्याच्या डाव्या बाजूला निकम यांची एक फार जुनी विहीर आहे. ही विहीर अतिशय देखणी आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी बांधलेली ही विहीर पाहून तिथे जाण्याचा मोह आम्ही रोखू शकलो नाही. विहिरीचे पाणी वापरले जात नव्हते, उपसा बंद होता मात्र या विहिरीने एकेकाळी पंधरा एकर जमीन भिजवली होती, असे निकम यांनी मला सांगितले. त्यांचा निरोप घेऊन पुढे आलो. 

शिरवडे रेल्वे फाटकाजवळ पोचलो. मालगाडी येणार असल्यामुळे फाटक बंद होते. माणूस कितीही मोठा झाला तरी रेल्वे गाडी पाहिल्या नंतर जो आनंद त्याला मिळतो तो वेगळाच असतो. अगदी लहानपणापासून मी तो आनंद घेत आहे. करवंडी वरून कराडला शाळेत येताना आमचे साडेदहाची करवडी कराड एसटी बस पार्ले मार्गे जायची. ही बस विरवडे रेल्वे फाटकाजवळ आली की हमखास पावणे अकराच्या सुमारास कोयना एक्स्प्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांचे क्रॉसिंग व्हायचे आणि ते गेट अनेकदा बंद असायचे. एसटी रेल्वे गेट समोर थांबली की आम्हाला झुक झुक गाडी पाहण्याचा खूप आनंद होत असे. रेल्वे निघून झाल्यानंतर ते गेट उघडण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी गोल हात फिरवून ते गेट कसे उघडायचे हे आम्ही पाहत होतो. आज मला त्या क्षणाची पुन्हा आठवण झाली. आता शिरवडे रेल्वे गेट वर मालगाडी पाहून खूप आनंद झाला. 

पुढे निघालो साडेआठच्या सुमारास सह्याद्री कारखाना वर पोहचलो. कारखान्याच्या शेजारी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो. सुर्वे यांच्या ओळखीचे गजरे नावाचे एक वकील कारखान्याच्या पेट्रोल पंपाचे राहतात, त्यांच्या घरी चहासाठी थांबलो. त्यांनी स्वतःच चहा करून दिला. सकाळपासून पोटात काही नव्हते मात्र त्यामुळे चहा पिऊन खूप तरतरी आली.वकील साहेबांचा निरोप घेऊन मसूरच्या दिशेने चालू लागलो. साखर कारखाना पासून मसूर चार किलोमीटर अंतरावर राहिले होते. मात्र हे चार किलोमीटर आता खूप लांब वाटत होते. सलग दोन दिवस चालणे झाल्यामुळे पाय खूप दुखत होते. पाय वर उचलत नव्हता. मात्र माउली नामाचा गजर करत असल्यामुळे पुन्हा ताकद आली आणि नऊच्या सुमारास मसुरचे एसटी स्टँड दिसू लागले. आनंदाला पारावर उरला नाही.


आमचे मसूरचे पुढारीचे प्रतिनिधी दिलीप माने तिथे आमची वाटच पाहत होते. त्यांच्या घरी जाण्याचा नियोजन होते. दरम्यान रस्त्याकडेला घिसाडी समाजातील हे कुटुंब काम करताना पहावयास मिळाले. ऐरणीवर तापलेला लोखंडाचा गोळा ठेवून त्याला कुराडीचा आकार देण्याचे काम सुरू होते. एक भाऊ हातात सांडशी घेऊन दाराच्या आत ठेवलेल्या लोखंडाचा तुकडा बाहेर काढतो, तो ऐरणीवर ठेवतो.दुसरा भाऊ घनाने त्यावर जोरात धाव मारत होता. त्याच वेळेला त्यांची 60 ते 65 वर्षाचे आई त्यांच्या मदतीला आल्या आणि सर्वांनी मिळून हे काम सुरू ठेवले. या लोकांचे कष्ट पाहून मला खूप प्रेरणा मिळाली.कष्टाशिवाय यश नाही आणि कष्टाला पर्याय नाही हे ही जाणवले. आमच्याकडे करवडी मधील घराशेजारी मी दहावी अकरावीला असताना अशाच प्रकारचे एक कुटुंब झाडाखाली राहायला आले होते. दिवसभर हे कुटुंब काम करत असे. कुराडी, खुरपी अशी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे हत्यारे हे लोक करून देत असत. या कुटुंबात एक गर्भवती महिला होती. ती गर्भवती महिला पोटात बाळ असूनही दिवसभर लोखंडी घन उचलून तो मारत असे. ह्या महिलेला ती ताकद कशी मिळत असेल याची मला त्यावेळी सुद्धा अप्रूप वाटले होते. खरंतर गर्भवती महिलांनी काम करायचे नसते मात्र ही महिला अतिशय अवघड असे काम करत होती. दिवसभर त्या महिलेला काम करताना मी पाहिले होते दुसऱ्या दिवशी ही महिला बाळंतीन झाली होती. तिने एका बाळाला जन्म दिला होता. म्हणजेच मुलाला जन्म देण्याच्या आदल्या दिवसापर्यंत या माउलीने केलेले कष्ट मी स्वतः डोळ्याने पाहिले होते. तो क्षण मला आज आठवला.


माने सरांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे कुटुंबाने आमचे प्रेमाने स्वागत केले. माने सर यांच्या कुटुंबाशी माझा अतिशय जुना ऋणानुबंध आहे. सरांच्या लेकीने आमच्यासाठी अतिशय सुंदर असा व्हेज कटलेट ही डिश तयार केली होती तर माने वहिनी यानी नंतर साजूक तुपातला शिरा करून आम्हाला खायला घातला. मन तृप्त झाले आणि पोटही भरले. माने सरांच्या घरात पोहोचल्यानंतर खूप आनंद झाला. त्यांच्या घरी खूप वर्षानंतर पोहोचलो गेलो होतो, गप्पा मारल्या. सरांच्या दारात घराच्या दारात आंब्याचे एक झाड लावायचे होते, हे झाड माऊलींच्या हस्ते लावले लावावे अशी त्यांनी शेवटी केली. माने सरांनीअगोदरच काढून ठेवलेल्या खड्ड्यात मी वृक्षारोपण केले तर सूर्वेआप्पानी माती घातली आणि अशोक मोहने यांनी पाणी घातले. पंढरीच्या वारीच्या पहिल्या दिवशीची वृक्षारोपणाची ही आठवण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.
अन्नदाता सुखी भव असे मनातून भावना आले आणि त्यानंतर माने सरांच्या घरातून बाहेर पडलो.

 मसूर मधल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. परत यायला निघालो तर जिल्हा परिषद सभापती मानसिंगराव जगदाळे त्यांच्या ऑफिसात बसल्याचे पाहून पाहून थांबावे लागले. जगदाळे साहेबांचे आणि माझे संबंध प्रेमाचे आहेत. त्यांच्यासोबत चहा घेतला, गप्पा मारल्या. मसूर ते कराड हा प्रवास आमचा कार मधून होणार होता..माने सर आम्हाला कार मधून सोडायला कराडला आले.आज 14 किलोमीटर एवढे कराड ते मसूर अंतर चालून पूर्ण झाले होते. काल करवडी,कराड पंधरा किलोमीटर अंतर झाले होते. माऊलीच्या आळंदी ते पुणे असे तीस किलोमीटर अंतर दोन दिवसात पूर्ण झाले माझी वारी चा पहिला दिवस अशा पद्धतीने अतिशय आनंदात पार पडला.
*राम कृष्ण हरी.*
Karawadikarad.blogspot.com

१३ जून २०२०

Virtual Wari 1

इंद्रायणी काठी देवाची आळंदी



आळंदी ते पंढरपूर अशी पंढरीची वारी आणि पालखी सोहळा सुमारे पाऊणेतीनशे किलोमीटर अंतराचा आहे. याया वर्षी करण्याच्या पार्श्वभूमीवर पंढरीची वारी निघणार नाही मात्र वारी मधील अनुभव आणि वारी वारी च्या परंपरा याविषयी सलग अठरा दिवस आपण या ब्लॉगच्या माध्यमातून भेट देणार आहोत. भक्तीच्या या महासागरात ‘पुढारी’सुद्धा सहभागी होणार आहे.  आमच्या वाचकांसाठी ही भक्तीपर्वणीच आहे. आजपासून रोज पुढारीमध्ये ‘देव माझा विठू सावळा’ हे विशेष सदर वाचकांच्या भेटीला येत आहे.


वरुणा, अलका, कणिका,
आनंद, सिद्धक्षेत्र, अलंकापूरी आणि आळंदी
पंढरीची वारी म्हणजे आनंदाचा प्रवास. आनंद वाटत-वाटत माणसांमधील ईश्वराला भेटण्याचा प्रवास. शेकडो वर्षांपासून पंढरीची ही वारी अखंडपणे सुरू आहे.
महाराष्ट्र, कनार्टक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील 5 ते 6 लाख लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात. ‘माऊलीऽऽ... माऊलीऽऽ’ चा जयघोष करीत आनंद वाटत-वाटत लुटण्याचा हा प्रवास  13 जून ते 1 जुलैपर्यंत चालणार आहे.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवे डोळा पाहु ॥
होतील संतांच्या भेटी । सांगू सुखाच्या गोष्टी ॥
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर । सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक ॥
आळंदी म्हणजे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु. आळंदीचे नाव  ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्याने ओसंडून वहात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. अशा या अलंकापुरीत आजपासून पालखी सोहळा सुरुहोत आहे. 
आळंदी गावचा इतिहास फार जूना आहे. स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील पंढरीची वारी करीत, असा संदर्भ आहे. माऊलींनी ही वारी पुढे चालु ठेवली. आता या वारीला महाकाय स्वरुप प्राप्त झाले आहे. वारीची सुरूवात आळंदीतून होते. माऊलींचे वास्तव्य लाभलेल्या अलंकापुरीत वारकरी येतात आणि माऊलीमय होऊन जातात. शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. सुमारे 725 वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्री! त्यांच्या खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून इंद्रायणी हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव पूर्वी प्रचलित होते.
ज्ञानदेवांनंतर पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी राहिले. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाची इंद्रायणी’ असे आबालवृद्धांच्या तोंडी बसले. साधु हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे. आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64 व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे.
॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने, हे गाव अजरामर झाले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संतांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाऊलखुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे यांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले.

Virtual vari 1

इंद्रायणी काठी देवाची आळंदी



आळंदी ते पंढरपूर अशी पंढरीची वारी आणि पालखी सोहळा सुमारे पाऊणेतीनशे किलोमीटर अंतराचा आहे. याया वर्षी करण्याच्या पार्श्वभूमीवर पंढरीची वारी निघणार नाही मात्र वारी मधील अनुभव आणि वारी वारी च्या परंपरा याविषयी सलग अठरा दिवस आपण या ब्लॉगच्या माध्यमातून भेट देणार आहोत. भक्तीच्या या महासागरात ‘पुढारी’सुद्धा सहभागी होणार आहे.  आमच्या वाचकांसाठी ही भक्तीपर्वणीच आहे. आजपासून रोज पुढारीमध्ये ‘देव माझा विठू सावळा’ हे विशेष सदर वाचकांच्या भेटीला येत आहे.


वरुणा, अलका, कणिका,
आनंद, सिद्धक्षेत्र, अलंकापूरी आणि आळंदी
पंढरीची वारी म्हणजे आनंदाचा प्रवास. आनंद वाटत-वाटत माणसांमधील ईश्वराला भेटण्याचा प्रवास. शेकडो वर्षांपासून पंढरीची ही वारी अखंडपणे सुरू आहे.
महाराष्ट्र, कनार्टक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील 5 ते 6 लाख लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात. ‘माऊलीऽऽ... माऊलीऽऽ’ चा जयघोष करीत आनंद वाटत-वाटत लुटण्याचा हा प्रवास  13 जून ते 1 जुलैपर्यंत चालणार आहे.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवे डोळा पाहु ॥
होतील संतांच्या भेटी । सांगू सुखाच्या गोष्टी ॥
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर । सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक ॥
आळंदी म्हणजे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु. आळंदीचे नाव  ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्याने ओसंडून वहात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. अशा या अलंकापुरीत आजपासून पालखी सोहळा सुरुहोत आहे. 
आळंदी गावचा इतिहास फार जूना आहे. स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील पंढरीची वारी करीत, असा संदर्भ आहे. माऊलींनी ही वारी पुढे चालु ठेवली. आता या वारीला महाकाय स्वरुप प्राप्त झाले आहे. वारीची सुरूवात आळंदीतून होते. माऊलींचे वास्तव्य लाभलेल्या अलंकापुरीत वारकरी येतात आणि माऊलीमय होऊन जातात. शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. सुमारे 725 वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्री! त्यांच्या खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून इंद्रायणी हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव पूर्वी प्रचलित होते.
ज्ञानदेवांनंतर पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी राहिले. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाची इंद्रायणी’ असे आबालवृद्धांच्या तोंडी बसले. साधु हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे. आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64 व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे.
॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने, हे गाव अजरामर झाले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संतांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाऊलखुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे यांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले.

२५ मे २०२०

अनौपचारिक गोष्टी व्हायरल करणे कुठल्या तत्त्वात बसते?*








अनौपचारिक गोष्टी व्हायरल करणे कुठल्या तत्त्वात बसते?*

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत एका व्यक्तीचं फोन संभाषण आणि यादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या त्या तथाकथित वक्तव्यावरून दिवसभर चर्चा सुरू आहेत. मात्र अशा प्रकारच्या चर्चा आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या ऑडिओ मध्ये खाजगीत व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या अपरोक्ष रेकॉर्डिंग करणे आणि त्या व्हायरल करणे, या दोन्ही प्रवृत्तीचा निषेध करण्याची गरज आहे.


पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. वास्तविक राजकारणी म्हणून ते खूप कमी ओळखले जातात. एक अभ्यासू  प्रशासक म्हणून त्यांना ओळखले जाते. सर्वसामान्यांशी त्यांचे नाळ वाढली आहेच शिवाय देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यातील विद्वान मंडळीशी पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट संबंध आहे.मध्यंतरी ते केंद्रीय पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री होते. त्याकाळात पृथ्वीराज बाबा कराडला आल्यानंतर आम्ही पत्रकार त्यांना भेटायला जात होतो. या बैठकी दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांना कोणते प्रश्न विचारायचे याबाबत आम्ही प्रमुख पत्रकारांची रंगीत तालीम व्हायची.आम्ही कोणता राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारायचा याची तयारी करत होतो. तरीही स्थानिक प्रश्नावर इंटरेस्ट असलेले आमच्यापैकी काही पत्रकार पृथ्वीराज चव्हाण यांना विलासराव पाटील उंडाळकर, कराड दक्षिण, कराड शहराचे राजकारण यावर प्रश्न विचारायचे. लोकल विषयावर विचारलेल्या प्रश्नाला बगल देऊन पृथ्वीराजबाबा पुढे जायचे. एक दिवस पृथ्वीराज बाबांना खासगी मध्ये याबाबत मी विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी मला सल्ला दिला होता. पत्रकारांनी कोणाला कोणते प्रश्न विचारायचे याचे तारतम्य बाळगले पाहिजेच शिवाय अगोदर तयारी करून यायला हवे. जगातील सर्व देशांमध्ये असणाऱ्या समस्या आणि तसेच पंतप्रधानांची नावे, परराष्ट्र धोरण याबाबत मला तुम्ही विचारू शकता,कारण मी त्या खात्याचा मंत्री आहे,अभ्यास करत आहे किंवा त्यासंदर्भातील खाते माझ्याकडे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण मला बोलले होते. हा विषय सांगण्याचं किंवा आठवण्याचं कारण असे आहे की पृथ्वीराज चव्हाण हे कधीही खालच्या लेव्हलवर किंवा स्थानिक विषयावर बोलत नाहीत. हत्ती चले अपनी चाल या उक्तीप्रमाणे ते नेहमी मार्गग्रमण करतक असतात.

पृथ्वीराज चव्हाण यांना एका कार्यकर्त्यांनी  फोन करून त्यांना स्थानिक विषयावर किंवा राज्यातील एका विषयावर प्रश्न विचारून बोलतं करणे आणि तो कॉल रेकॉर्ड करणे हे कोणत्याही तत्वात बसत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे नेते आहेत. त्या संबंधित व्यक्ती सोबत बोलताना त्या व्यक्तीवर पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास होता किंवा संबंधित व्यक्ती त्या उंचीची विश्वासू व्यक्ती असेल म्हणून ते काही गोष्टी बोलून गेले असतील. खरंतर या गोष्टी खासगीमध्ये बोलायच्या असतात, खाजगी मध्येच बोलल्या जातात. समोरून बोलणारी व्यक्ती तितकी विश्वासार्ह असल्यामुळे पृथ्वीराजबाबा खाजगीमध्ये काही गोष्टी बोलून गेले असतील. राज्यातील सर्व पक्षाचे छोटे मोठे नेते अनेकदा खाजगीमध्ये बोलत असतात.एकनाथ खडसे तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांना खाजगीमध्ये सल्ले देत असतात. मात्र त्यांचा सल्ला किंवा त्यांचा संवाद कोणी रेकॉर्डिंग करून व्हायरल करत नाही. पृथ्वीराज चव्हाण हेही फोनवर बोलताना अनौपचारिकपणे काही गोष्टी बोलले असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा औपचारिकपणे खूप काही बोलून जातात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा अनौपचारिकपणे गप्पा मारताना अनेक गोष्टी बोलत असतात. मात्र समोर असणारा विश्वासू आहे,याची खात्री करूनच ते बोलत असतात. समोरची व्यक्ती विश्र्वासातील आहे म्हणून कोणीही नेता सहजपणे आपल्या मनातले बोलत असतो. पृथ्वीराज चव्हाण सुद्धा त्या पद्धतीने बोलले गेले असतील. मात्र ह्या बोलण्यावरून त्यांचा महाविकास आघाडीवरील नाराजी सिद्ध होत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. काँग्रेसचे दिल्लीमधील नेतृत्व आणि त्या नेतृत्वाला सल्ला देणारे ज्येष्ठ सल्लागार कोणीही महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काँग्रेसने जावे या विचाराचे नव्हते. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आले आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापाठीमागे पृथ्वीराज चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे चव्हाण हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलतील हे पटत नाही. खाजगीमध्ये किंवा अनौपचारिकपणे ते उद्धव ठाकरे यांना सल्ला देऊ शकतात आणि देतात. मात्र काही न पटणार्‍या गोष्टी खाजगीमध्ये बोलाव्या लागतात,बोलल्या जातात. ह्या गोष्टी व्हायरल करणे हे कुठल्याही तत्वात बसत नाही.

 उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. एक माजी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे यांना सर्व प्रकारचा सल्ला देत असतात. शरद पवार यांना उद्धव ठाकरे जितका मान देतात तेवढाच मान ते पृथ्वीराज चव्हाण यांनाही देतात. ज्येष्ठत्वाच्या नात्याने आणि माजी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेले सल्ले त्यांनी आचरणात आणले आहेत. मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाचा आर्थिक कणा मोडला आहे आणि तो व्यवस्थित करण्यासाठी निधीमध्ये कपात करण्यात आली आहे हे जगजाहीर आहे.आपल्या गावासाठी,भागासाठी निधी मागणाऱ्या त्या व्यक्तीने कोणाच्या तरी सांगण्यावरून हा फोन रेकॉर्ड केला असावा आणि त्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मधील संबंध ताणावेत आणि याचा फायदा कोणत्यातरी पक्षाला व्हावा असा,असा त्यांचा उद्देश असावा. मात्र अशा प्रकारामुळे पृथ्वीराज चव्हाण खचणारे नाहीतच. मात्र यापुढील काळात फोनवरून कुणाशी आणि काय बोलायचे? औपचारिक बोलायचे की अनौपचारिक बोलायचे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड तालुक्यातील अनेक पत्रकारांची जवळचे संबंध आहेत,माझेही आहेत. मात्र बाळासाहेब पाटील यांना कोणत्याही विषयावर फोनवरून प्रतिक्रिया विचारली तर ते प्रतिक्रिया देण्याचे टाळतात.समोर येऊन बोला तुम्हाला जे हवं आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणावर घेऊन जातो,असे बाळासाहेब पाटील नेहमी सांगतात. आजपर्यंत बाळासाहेब पाटील यांनी फोनवरून कोणाही पत्रकाराला प्रतिक्रिया दिलेली नाही.कारण फोनवरून दिलेल्या प्रतिक्रिया तोडमोड केली जाते असे त्यांचे म्हणणे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा रेकॉर्ड झालेला हा फोन आणि त्यामुळे निर्माण झालेला वाद,चर्चा याचा विचार केला तर बाळासाहेब पाटील हे फोनवरून प्रतिक्रिया देत नाहीत, कोणाशीही फोनवरून खाजगीमध्ये आणि अनौपचारिक सुद्धा बोलत नाहीत, हे किती योग्य आहे हे जाणवते.




माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनौपचारिक पणे बोललेल्या काही गोष्टी व्हायरल करुन त्यांची राजकिय बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे त्यांच्या पक्षातील किंवा विरोधी गटातील लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध बिघडवून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. 

*सतीश वसंतराव मोरे*
9881191302

०८ एप्रिल २०२०

'शक्ति' अमिताभ बच्चनची... बाप दिलिपकुमारची, आणि आई राखीची..!






'शक्ति' अमिताभ बच्चनची...
बाप दिलिपकुमारची, पत्नी स्मिताची
आणि आई राखीची..!




कोरोना लाॅकडाऊन कालावधीत गेल्या काही दिवसापासून वर्क फ्रॉम होम सुरू आहेच, शिवाय रोज सहा ते सात तास ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागत आहे. घरामध्ये जास्त वेळ राहण्याची संधी आता मिळाली आहे. या संधीचा फायदा घेत गेल्या काही दिवसापासून मी रोज कधीही न पाहायला मिळालेले सिनेमा टीव्हीवर पाहत आहे. याच दरम्यान रामायण मालिका सुरू झाल्यापासून आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सकाळी नऊ वाजता आणि रात्री नऊ वाजता रामायण पाहण्याचा तोही सहकुटुंब एक वेगळाच आनंद आम्ही चौघेजण लुटत आहोत. रामायण मालिकेविषयी वाटणारी ओढ, आनंद याविषयी वेगळे लिहिणारच आहेत पण आज मी एक वेगळ्या विषयावर लिहायचं किंवा प्रकट व्हायचे ठरवले आहे.


अमिताभ बच्चन हा माझा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आवडता विषय आहे,माझं पहिलं प्रेम आहे. अमिताभ बच्चन यांच्याविषयी काय बोलायचे आणि काय लिहायचे, किती लिहायचे हे समजत नाही, इतका वेगळा अनुभव आणि आत्मीयता माझी अमिताभ बच्चन यांच्याविषयी आहे. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट मी किती वेळा पाहिलेत याची गणती करता येणार नाही, मलाही ते आठवत नाही. मात्र अमिताभ बच्चन यांचा एक सिनेमा मी खूप कमी वेळा म्हणजे दहा पंधरा वेळा पाहिला असेल तो सिनेमा म्हणजे दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला शक्ती . हा सिनेमा पहिल्यांदा मी पाहिला कराडच्या कराडच्या रॉयल चित्रपटगृहात. तेव्हा मी सातवी किंवा आठवीत असेन. रॉयल चित्रपटगृह हे त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे चांगले चांगले दर्जेदार चित्रपट प्रदर्शनाचे एक केंद्र होते. अमिताभ बच्चन यांचे सर्व प्रमुख चित्रपट रॉयल चित्रपटगृहात लागत असत. शक्ती हा सिनेमा मी सुरुवातीला पाहिला होता तेव्हा मला सिनेमातलं फार काही कळत नव्हतं. एक मनोरंजन आणि अमिताभ बच्चन हेच आकर्षण असल्यामुळे असल्यामुळे मी हा सिनेमा पाहिला होता. मात्र नंतरच्या काळात कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर चित्रपट रसग्रहणाचा आनंद मी अनुभवत गेलो.



1990 च्या काळात टीव्ही आला व्हिडिओ आला, कॅसेट आले आणि त्या काळात व्हिडिओ आणि विसीआर घरात आणून चित्रपट पाहण्याचीएक क्रेझ होती. त्यावेळी मी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट कराडच्या प्रभात चित्रपटगृह शेजारी असलेल्या दोन व्हिडिओ सेंटर मध्ये तसेच नगरपालिके समोरील एका व्हिडिओ मिनी थिएटरमध्ये पाहिले होते.


परवा सोनी मॅक्स वर जेव्हा शक्ती हा सिनेमा लागला तेव्हा तो सिनेमा पूर्ण पाहिला पाहिजे अशी माझी इच्छा झाली आणि मी रिमोट हातात घेतला. आमच्या घरात अमिताभ बच्चन यांचा चित्रपट टीव्हीवर लागला की माझे राज्य असते, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अनेकदा तेच ते चित्रपट पाहून घरातले कंटाळतात हे मात्र तरीही माझ्यासाठी ते रिमोट हातात उपलब्ध करून देतात. रामायण संपल्यानंतर शक्ती सिनेमा लागला हा सिनेमा मी पाहायला लागलो.


शक्ती हा चित्रपट खरंच दर्जेदार आहे. अभिनयाचे सम्राट म्हणून ज्या दिलीप कुमार यांच्याकडे पाहिले जाते त्या दिलीप कुमार यांना अमिताभ बच्चन अभिनयातील गुरु मानतात. आज देखील अमिताभ बच्चन मी अभिनय करायला शिकतोय असं म्हणतात. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द जेव्हा टॉपवर होती तेव्हा दिलीप कुमार एवढे जोशात नव्हते. मात्र या दोन दिग्गजांना एकत्र येऊन चित्रपट काढण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक रमेश सिप्पि यांनी उचलले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दिलीपकुमार या बाप लेकाच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. मुलगा आणि बापातील सुप्त संघर्ष, प्रेम असूनही व्यक्त न होण्यामुळे दोघांच्या मध्ये वाढलेला दुरावा, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यामुळे कुटुंबाकडे किंबहुना मुलाकडे लक्ष द्यायला मिळालेला कमी वेळ, आदर्शवादाचा फार मोठा पगडा आणि असा दमदार बाप दिलीप कुमार यांनी अतिशय उंचीवर नेऊन निभावला आहे. दिलीप कुमार यांना त्याच तोडीत अभिनयाची टक्कर देण्यात अमिताभ बच्चन सुद्धा कुठेही कमी पडले नाहीत.


 या चित्रपटातील अनेक संवाद माझ्या पाठ आहेत. मेरे बाप ने दो शादी है, एक मेरी माँ के साथ और दुसरी अपनी नोकरी के साथ, मेरी माँ का बेटा मैं हु और मेरी दुसरी माॅंका यानी मेरी सौतेली माॅ का बेटा है कानून,  हा संवाद मला खूप आवडतो. हा संवाद पाहत असताना, ऐकत असताना मुलांमधील आणि बापा मधील दरी का वाढत जाते, याचा राहून राहून पुन्हा  अनुभव आला. किंबहुना यावर थोडेसे चिंतन चिंतन करावे वाटले. मुलगा आणि वडील यांनी खरे तर मित्राप्रमाणे राहायचे असते. बापाची चप्पल मुलगा घालायला लागला की बापाने मुलाशी एक वेगळ्या प्रकारे नाते निर्माण करायचे असते. काही गोष्टी शेअर करायच्या असतात. कर्तव्याची जाणीव करून द्यायची असते. त्याचबरोबर अधिकार म्हणजे काय हे समजून सांगताना कोणत्या स्टेजला कोणते अधिकार द्यावेत हेही बापाने मुलांना समजावून सांगायचे असते. शक्ती चित्रपट पाहताना हा एक वेगळा पैलू मला पाहायला मिळाला. अमिताभ बच्चन यांनी जी भूमिका निभावलेली आहे ते बालपणीचा अमिताभ जेव्हा एका संकटात सापडतात तेव्हा त्याला त्याचे वडील मदत करत नाहीत. मात्र एक अनोळखी माणूस मदत करतो आणि तोच मनुष्य तरुणपणी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना नोकरी देतो,अशी कथा आहे. आपणास ही कथा माहिती असेल.

लहानपणी किंवा अडचणीच्या वेळी वडिलांनी मदत केली नाही आणि मित्रांनी मदत केली किंवा इतरांनी केलेली मदत  मुलं चांगले लक्षात ठेवतात. काहीजण हे समजून घेतात तर काही मुलं माझा बाप माझ्यासाठी काहीच करत नाहीत असं समजतात आणि ही दरी वाढत जाते. आजच्या काळात बाप मुलांसाठी सर्व काय करतो, अनेक आपल्या गरजांना मुरड घालतो. काहीही करून, कष्ट करून चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने कशाही प्रकारे घरात पैसा आणतो. प्रसिद्धी आणि पैसा याच्यासाठी सर्व काही तत्त्वाला मुरड घालतो.

चाळीस वर्षांपूर्वीचा काळ पहिला तर एक आदर्शवादी बाप आणि आदर्शवादी मुलगा असे एक परिस्थिती होती. आज काळ बदलला असला तरी बाप मुलातील नातं अजूनही तसंच आहे. त्यांच्यातील दरी पैशामुळे किंवा उपलब्ध सुविधांमुळे थोडी कमी झालेली दिसली असली तरी बाप मुलातील संघर्ष अजूनही आहे. कारण आज ज्यांची मुले वीस ते तीस वर्षाची आहेत त्यांनी जो काळ पाहिला आहे, ज्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले आहे, दहावीला गेल्यानंतर ज्यांना फुल पॅन्ट मिळाली आहे, हॉटेलमध्ये जेवण काय असते हे ज्यांना नोकरी लागल्यानंतर कळले होते. तोच बाप परस्पर याच्या उलटं चित्र आपल्या मुलाकडून अनुभवत आहे.

 आजची मुलं ज्यांना हॉटेलमधे जायला किंवा ऑनलाइन वरून महिन्यातून तीन चार वेळा नवीन नवीन वस्तू ,कपडे मागायला काहीच वाटत नाही, या मुलांना आपल्या बापाची दुःखी कशी करणार ! मात्र तरीही आजची पिढी थोडी प्रगल्भ झालेली आहे. मुले बापाला समजू लागली आहेत. सहज उपलब्ध झालेला पैसा खोटा झाला आहे. पैशापुढे नाती काहीच राहिलेली नाहीत. बाप मुलातील संघर्ष घराघरांमध्ये आहेच. मात्र तो संघर्ष टोकाला जात नाही कारण बापाने स्वतःला मुरड घातली आहे.

माझ्या वैयक्तिक अनुभव बद्दल सांगायचे म्हटले तर माझ्या मुलाने डॉक्टर व्हावे असे माझी इच्छा होती. मात्र माझ्या मुलाला पियुषला यामध्ये कसलाही इंटरेस्ट नव्हता. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे करिअर स्वीकारले. सुरुवातीला मला ते पटले नाही मात्र बारावीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील हाॅबीज अॅण्ड इंटरेस्ट नावाचा एक धडा मी शिकवला होता, शिकलो होतो. ज्याला ज्याच्या आवडीचे काम मिळाले तो सर्वात सुखी असं एक वाक्य त्या धड्यांमध्ये होते. माझ्या मुलाला जर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट असेल त्याला जगातील सर्वात मोठा कुक व्हायची इच्छा असेल आणि या माध्यमातून त्याला जग पाहायची इच्छा असेल तर त्याने खूप मोठ्ठं व्हावे असे मी माझ्या मनाला समजावले आणि मी माझ्या मुलाला त्याचे करिअर करायला पूर्ण परवानगी दिली. वास्तविक इंजिनिअरिंग पेक्षा जास्त फी या कोर्ससाठी आहे. तरीही मी कर्जाचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे मुलाला हॉटेल मॅनेजमेंटला जाऊ दिले आणि तो आज त्या कॉलेजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे, मी आनंदी आहे. अनेकदा माझा आणि माझ्या मुलाचा संवाद होतो, काही गोष्टीवरून वाद होतो मात्र कुठे थांबावे कुठपर्यंत बोलावे याची जाणीव मला स्वतःला असल्यामुळे आमचं नातं भक्कम आहे. शक्ती चित्रपट पाहताना बाप मुलाचं नातं आणखी समृद्ध व्हावा यासाठी काय करता येईल याचाही मी विचार केला.


शक्ती या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची हीरोइन स्मिता पाटील आहे, स्मिता पाटील यांनी नमक हलाल, शक्ती या दोन चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. स्मिता पाटील ही बहुगुणी अशी मराठी कलाकार होती. स्मिता पाटील यांच्या अभिनयाचा मी पहिल्यापासून चाहता आहे. मराठीमधील जैत रे जैत पासून आखिर क्यू , डान्स डान्स आणि स्मिता पाटील यांचा शेवटचा चित्रपट असलेला वारीस हा चित्रपट मी अनेकदा पाहिला आहे. स्मिता पाटील यांचा अतिशय कमी वयात मृत्यू झाला. स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचे अतिशय जवळचे नाते होते. नमक हलाल हा चित्रपटाचे शूटिंग करताना एका पावसाच्या गाण्यावेळी स्मिता पाटील यांना थोडसं शरमल्यासारखे झालं होतं. शूटिंगच्या वेळेला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. मात्र यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना फार मोठा धीर दिला आणि त्या गाण्याचे शुटिंग पूर्ण झालं. अमिताभ बच्चन यांना 82 झाली कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अपघात झाला होता. या अपघाताच्या आदल्या दिवशी स्मिता पाटील यांना एक स्वप्न पडले होते आणि हे स्वप्न स्मिता पाटील यांनी अमिताभ बच्चन यांना फोन करून बोलून दाखवले होते. अमिताभ बच्चन यांच्याविषयी काही तरी विपरीत घडले अशा आशयाचं स्वप्न होतं. स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचं हे भावनिक नातं एक वेगळंच होतं.


अमिताभ बच्चन यांच्यासोबत शक्ती चित्रपटांमध्ये राखी यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका केली आहे. खरंतर मुकद्दर का सिकंदर, कसमे वादे, बेमिसाल, बरसात की एक रात, कभी कभी आदी चित्रपटात अमिताभ आणि राखी यांची जोडी फार गाजली होती. प्रेमाचं प्रतीक आणि प्रेमाची सुंदर जोडी म्हणून राखी आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिले जात होतं. बेमिसाल चित्रपटात राखी अमिताभ बच्चनची सखी होती. अमिताभ बच्चन आणि राखी यांनी अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सहज सुंदर अभिनयाचे दर्शन घडवत आपले वेगळेपण दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि राखी यांनी प्रियकर आणि प्रेमिका अशी भूमिका निभावली आहे. लावारिस नावाचा सुपरहिट चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है फिमेल आवाजातील गाणे राखी यांच्यावर चित्रित झाले होते. या चित्रपटात राखी अमिताभ बच्चन यांची आई झाली होती. मात्र आई आणि मुलगा असे कुठेही समोरासमोर आले नव्हते किंवा संवाद नव्हता.


राखी आणि अमिताभ यांच्याकडे पाहताना प्रेम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण दर्शकांना पाहायला मिळत होते. कभी कभी चित्रपटात राखी आणि अमिताभ यांची जोडी फार गाजली. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है हे लता दीदींच्या आवाजातील  राखीवर चित्रित झालेले गाणे सर्वांच्या स्मरणात आहे. अमिताभ बच्चन यांच्या दमदार आणि धीरगंभीर आवाजातील कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, हा संवाद अजूनही युवा पिढीला आकर्षित करतो. मुकद्दर का सिकंदर मधली अमिताभची मेमसाब राखी कोण बर विसरू शकेल. बरसात की एक रात मधील अमिताभ की अंध प्रेयसी राखी सर्वांच्या स्मरणात आहे. कसमे वादे मधील अमिताभ राखी ची जोडी प्रेमाची साक्ष देते. बेमीसाल  चित्रपटात किसी बात पर मै किसी से खफा हुं, असे म्हणत राखी कडे चोरून पाहणारा अमिताभ लाजबाबच होता. मात्र अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिरोईन म्हणून काम केलेल्या राखीला शक्ती चित्रपटात अमिताभ बच्चन यांची आई म्हणून पाहताना मला एक वेगळाच अनुभव होता.


या भूमिकेविषयी मी अनेकदा लिहिले आहे किंवा बोललो आहे. मात्र काल शक्ती चित्रपट पाहताना अमिताभ बच्चन आईला मम्मा म्हणून हाक मारतो, हे खरंच एक वेगळं दृश्य होतं. अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटात निरूपा रॉय यांनी अमिताभची आईची भूमिका निभावली आहे. मात्र शक्तीमध्ये राखीला अमिताभची आई म्हणून पाहताना मला कसतरी वाटत होतं. हा चित्रपट पाहताना शेवटच्या टप्प्यात आईच्या भेटीसाठी असलेला अमिताभ पाहिल्यानंतर दिवार मधल्या विजयची मला खुप आठवण झाली. अमिताभची आई म्हणून रोहिणी हट्टंगडी, निरुपा रॉय यांनी केलेल्या अनेक चित्रपटात शेवटी अमिताभ बच्चन मरतो, मात्र शक्ती या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची आई अगोदर मरते, नंतर अमिताब मरतो. आईच्या अंत्यदर्शनासाठी आलेला अमिताभ आईच्या पार्थिवासमोर समोर जाऊन काहीही बोलत नाही, फक्त रडतो. नंतर बापाला जाऊन भेटतो. हा प्रसंग पाहताना न बोलताही अभिनय कसा करतात, हे फक्त अमिताभ करू शकतो हे ठामपणे सांगावेसे वाटते. अनेक चित्रपटात अमिताभची आई निरुपा रॉय एक वेगळी भूमिका निभावते, निभावलेली आहे, मात्र शक्ती चित्रपटात राखीने अमिताभची आई निभावताना खरंच दमदार अभिनय केला आहे, असे म्हणावे लागेल.

शक्ती या चित्रपटातून अनिल कपूर यांनी पदार्पण केले. या चित्रपटात अनिल कपूर यांनी अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्या मुलाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाची सुरुवात आणि शेवट अनिल कुमार यांच्यावर होते. या चित्रपटात अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन कुठेही समोरासमोर दिसलेले नाहीत. मात्र अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा असलेला हा एकमेव चित्रपट आहे.

अमिताभ अमिताभ का आहे हे पाहायचा असेल तर राखी आणि अमिताभ अभिनित मुकंदर का सिकंदर पहावाच लागेल.पण शक्तीही पाहिला पाहिजे. बेमिसाल मध्ये सखी सखे म्हणून राखीच्या मागे धावणारा अमिताभ शक्तीमध्ये मम्मा म्हणून जेव्हा आई राखी समोर उभा राहतो तेव्हा तो प्रसंग आणि या प्रसंगात आई आणि मुलाने केलेला अभिनय मला खरंच खूप भावला. राखी एक प्रतिभावंत कलाकार आहे. प्रत्येक भूमिकेत तिने जीव ओतून काम केलेले आहे. राखी सोबत अमिताभने केलेल्या प्रत्येक चित्रपटात राखी कुठेच कमी पडलेली नाही. कभी कभी चित्रपटात शशिकपूर, ऋषी कपूर, अमिताभ हे दिग्गज कलाकार असूनही राखीने त्यांच्यासमोर केलेला अभिनय आणि जिवंत केलेली भूमिका खूप वेगळी आहे. शक्ती चित्रपट पाहताना राखी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील यांच्या चित्रपटातील हळुवार भूमिकांच्या मी प्रेमात का पडलो होतो याचे मला उत्तर मिळाले,म्हणून तर तुमच्यापुढे शेअर केले.


३० मार्च २०२०

रामायण का पाहु या!

नदी आणि साधू एका ठिकाणी राहू शकत नाही, त्यांनी एका ठिकाणी रहायचे नसते.




नदी आणि साधू एका ठिकाणी राहू शकत नाही, त्यांनी एका ठिकाणी रहायचे नसते.वशिष्ठ ऋषींनी अयोध्या नगरीत अजून काही दिवस राहा असा आग्रह विश्वामित्रांना केल्यानंतर विश्वामित्रांनी दिलेलं तर हे वेगळे उत्तर मला रामायण सिरीयल पाहताना ऐकायला मिळालं.

ही मालिका पाहत असताना मला माझी मुलगी देवयानी याने याचा अर्थ विचारला. मी पण तिला याचा अर्थ तुच समजावून सांग,असे देवयानीला सांगितले देवयानीने याचा अर्थ सांगण्याचा थोडा प्रयत्न केला, तो बरोबर होता. मग मी मला उमजलेल्या शब्दात तीला उत्तर दिले.

 नदी जर एका जागेवर थांबली तर नदीत झाडे,झुडपे उगवतील, शेवाळ वाढेल. नदीचे डबके तयार होईल आणि नदीमध्ये दुर्गंधी वाढेल व तिची पवित्रता नष्ट होईल. नदीने सतत वाहिले पाहिजे,वहात राहणे, सतत कार्यरत राहणे हा नदीचा उपजत गुण आहे. काठावरच्या सर्व लोकांना पाणी देऊन त्यांची तहान भागवणे, काठावरच्या जमिनीला पाणी देऊन ती जमीन समृद्ध करणे, लोकांची तहान भागवणे  हा नदीचा गुणधर्म असतो तो गुणधर्म. जर ती एकाच ठिकाणी थांबून राहिली तर तर नदीचे पावित्र्य संपेल, म्हणून नदीने सतत वाहत राहिले पाहिजे.

साधू असो किंवा ज्ञानी मनुष्य असो त्याचेही असेच असते. त्यानेही नदीप्रमाणे एका ठिकाणी थांबता कामा नये. साधू जर एका ठिकाणी राहिला तर तो त्या गावाच्या भागाच्या प्रेमात पडेल. त्याचा मोह वाढेल. एखाद्या गावात मिळत असणार्‍या वस्तू, अन्न,मान सन्मान, कौतुक, प्रतिष्ठा याच्या तो प्रेमात पडेल. असे झाले तर तो संन्यासीपणा सोडून देऊन प्रपंच करणारा मनुष्य होऊन जाईल. त्या गावचा होऊन जाईल. तो त्या गावातच थांबून राहिला  तर त्याला त्याची तपश्चर्या करण्यामध्ये मोहामुळे अडचणी निर्माण होतील. ज्ञानार्जन करणे, ज्ञानप्रसार करणे आणि तपश्चर्या करणे हे साधूचे कर्तव्य असते, त्याने हे काम केले पाहिजे आणि हे करण्यासाठी त्याला सतत नवीन ठिकाणी जावे लागते. त्यामुळे साधूने कधीही एका ठिकाणी राहू नये.

रामायण मालिकेतील एका वाक्यावर आपण जर विचार केला, चिंतन केले तर एका एका वाक्यात खुप अर्थ लपलेले आहेत आणि हे अर्थ आपल्या पिढीला आपल्या मुलांना समजावून सांगण्यासाठी रामायण ही मालिका रोज पाहिली पाहिजे.

 या मालिकेतील प्राचीन काळातील जे शब्द आहे ते शब्द सुद्धा आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजेत, त्याचा अर्थ समजावून सांगितले पाहिजे.

*धन्यवाद भारत सरकार*
आणि *धन्यवाद लाॅकडाऊन*

२६ मार्च २०२०

वेळ मिळाला आहे, कोरोनाने दिला आहे

प्रीतीसंगमावरून


दैनिक *पुढारी*
दिनांक २६ मार्च २०२०

*कुटुंबासाठी वेळ मिळत नव्हता आता मिळाला आहे, घरी बसून हे कराच !*
       

कराड *सतीश मोरे*

कोरोनाची भीती आता वाढू लागली आहे,आणि ही भीती मनात बसणे गरजेचेही आहे. उपचार करून हा आजार बरा करणे इतके सोपे नाही.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून बरा होईपर्यंतच्या प्रक्रिया खूप किचकट आहेत. या काळात कुटुंब, नातेवाईकांपासून दूर राहणे, घरातील कुटुंबातील लोकांना त्रास होणे, कुटुंबातील आणखी काही लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणे, मुला-बाळांना याचा त्रास होणे, गल्लीतील लोकांना त्रास होणे, आपल्या घरातील लोकांना समाजाने वाळीत टाकणे किंवा एकूणच कोरोनामुळे होणार्‍या सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जाण्याचे बळ, तयारी सामान्य माणसाकडे नाही. म्हणून कोरोनापासून दूर राहणे हा एकमेव पर्याय आज आपल्यासमोर आहे.


काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण राष्ट्राला संबोधित करताना संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. पंतप्रधानांचा हेतू अतिशय स्वच्छ आणि साफ आहे. कोरोना हे अखिल विश्वावर आलेले फार मोठे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी अवघे जग एकवटले असले तरी आजपर्यंत कोरोनावर उपचारासाठी एखादी लस तयार करण्यात कोणालाही यश आलेले नाही. जगात अनेक लोक या  विषाणूच्या प्रादुर्भावाने आजारी पडले आहेत. काही बरेही झाले आहेत. मात्र सोळा हजारांहून अधिक लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लस जेव्हा येईल तेव्हा येईल, मात्र कोरोनावर आजच्या घडीला नियंत्रण ठेवणे सर्व जगाला जिकिरीचे झाले आहे. प्रगत देशांनासुद्धा या रोगावर नियंत्रण करण्यासाठी तात्काळ उपाय योजना करता आल्या नाहीत. मात्र सुदैवाने भारतात हा विषाणू जरा उशिरा पोहोचल्यामुळे भारताला या लढ्याला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे.

 गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्र व निवडक काही राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र आता संपूर्ण देशभर बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचे बाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आता 600 च्या पुढे गेला आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे हा एकमेव आणि रामबाण उपाय असल्यामुळे पंतप्रधानांनी देश  बंद ठेवण्याचा निर्णय केला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क कमी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे आणि त्याचमुळे आपण घरात बसून राहणे हा सर्वात मोठा पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्हाला साद घालत  हृदयस्पर्शी आवाहन केले. जीव वाचवणे ही आज सर्वात मोठी प्राथमिकता आहे.

 भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कोरोना महाराक्षसाने जर विळखा घातला तर देशाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होईल, अनेक लोक मरण पावतील. या रोगातून जे काही वाचतील त्यांच्या हातात जाणारा देश पुन्हा मुळ पदावर आणण्यासाठी पुढची एकवीस वर्षे लागतील, अशी विद्वानांनी व्यक्त केलेली भीती आणि सुचवलेल्या उपायांचा  विचार करून नरेंद्र मोदी यांनी घरात बसूनच देशसेवा करावी असे केलेले आवाहन योग्य आहे.
अनेकांना असा प्रश्न पडला असेल घरात बसून काय करायचे? घरात बसून जर आपला जीव वाचत असेल, आपल्या कुटुंबाचे रोगापासून संरक्षण होत असेल तर आपण घरात बसणे हेच योग्य आहे.

नुकताच अभिनेत्री काजोल यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘आपण आपले आई-वडील, पती-पत्नी किंवा मुलांना नेहमी म्हणत असतो की, ‘माझ्याकडे वेळ नाही. मला नोकरी आहे, मला उद्योग आहे, पैसे कमवून मुलांना चांगले शिक्षण घ्यायचे आहे, त्यामुळे माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे वेळ असता तर मी निवांत तुम्हाला घेऊन फिरायला गेलो असतो, तुम्हाला वेळ दिला असता’ अशी भावना आपल्यापैकी अनेक जण आपल्या कुटुंबाकडे व्यक्त करत असतो. मात्र आज तुमच्याकडे वेळच वेळ आहे. पुढचे एकवीस दिवस तुम्हाला तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी खूप वेळ आहे. एकवीस दिवस तुम्ही तुमच्या आई-वडीलांसोबत लहानपणी अनेक गोष्टी शेअर करत होता, त्या गोष्टी शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांसोबत गप्पा मारू शकता, खेळ खेळू शकता. पूर्वी अनेक घरांमध्ये एकत्र जेवायला बसण्याची पद्धत होती ती पद्धत गेले काही दिवस बंद पडली होती. आता संपूर्ण कुटुंब एकाच वेळेला घरात जेवायला बसू शकते.

आपण आपल्या कुटुंबाला अनेक नवीन गोष्टी,अनुभव सांगू शकता. तुमची मुले पुढील वर्गात जाणार आहेत, त्या वर्गातील अभ्यासक्रम शिकवू शकता. आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या  विषयात पारंगत असतो. लहानपणी आपण ज्या विषयात पारंगत होतात त्या विषयाचे ज्ञान आपण आपल्या मुलांना देऊ शकता. आपल्या कुटुंबियांना जर अशा परिस्थितीत वेळ दिला तर कुटुंबासोबतचे तुमचे बंध अजून घट्ट होणार आहेत.

एकवीस दिवस कसे जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल मात्र 21 दिवसात रोज काय करायचे याचे नियोजन, वेळापत्रक तुम्ही स्वतःहून कुटुंबियांना विश्वासात घेऊन तयार करा. पुढचे 21 दिवसात प्रत्येक दिवशी कोणता बैठा खेळ खेळायचा, काय वेगळा उपक्रम राबवायचा याचं वेळापत्रक करा. भगवद्गगीता रामायण, ज्ञानेश्वरी, कुराण यासारखे धार्मिक ग्रंथ आपल्या घरामध्ये आहेत. अनेक वर्षे हे ग्रंथ देवघरात बाजूला पडले असतील. पूर्वी मंदिरामध्ये किंवा घराघरांमध्ये ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील एक पान रोज वाचण्याची पद्धत होती. ही पद्धत आपण पुन्हा सुरू करू शकतो. धार्मिक कार्यक्रम किंवा धार्मिक पुस्तकांत अलीकडच्या मुलांना फार रस नसतो. मात्र ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता किंवा कुराण हे ग्रंथ काय आहेत हे सांगण्याची आणि त्यातील ओव्या वाचण्याची, पसायदानाचा अर्थ समजून सांगण्याची हीच वेळ आहे.

जगासाठी ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान आपण जर आपल्या मुलांना शिकवले, तर एक वेगळी ऊर्जा घरांमध्ये निर्माण होऊन आपला दिवस सकारात्मकरीत्या सुरू होऊ शकतो.

 जुन्या काळातील ययाती, मृत्युंजय, छावा यांसारखे ग्रंथ आपल्या घरामध्ये असतील. त्या पुस्तकातील रोज चार पानांचे सामूहिक वाचन आपल्या घरात मुलांकडून झाले तर त्यांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. जर आपल्या घरात ही पुस्तके नसतील तर ऑनलाइन, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवर ही सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.  शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व. पु. काळे यांच्या कथाकथनाचे वेड एकेकाळी आपल्याला लागले होते. त्या गोष्टी आज ऑनलाईन उपलब्ध आहेत. ब्लुटूथ स्पिकर लाऊन घरात बसून या गोष्टी ऐका. बाबासाहेब पुरंदरे यांचे पोवाडेही मुलांना ऐकवा.


आजचा दिवस कसा गेला, आज दिवसभरात मी काय केले याची डायरी मुलांना लिहायला सांगा, आपण स्वतः लिहा. ‘कोरोना लढाईचे ते एकवीस दिवस’ हा एक वेगळा अनुभव तुमच्या घराघरात डायरीच्या रूपातून जतन करता येऊ शकेल. पुढील काळात जेव्हा आपण या लढ्यावर विजय मिळवू, पुन्हा एकवटू.. उभे राहू तेव्हा आपल्या या आठवणी एकमेकांना शेअर करू. आम्ही काय वेगळं केलं? हे आपण जगाला सांगू शकू.

सद्यस्थितीत घरात बसणे हा एकमेव पर्याय असल्यामुळे घरात बसूनच आपण निरोगी राहू शकतो. घरात बसूनच आपण जिवंत राहू शकतो, याचे भान राखा. असे कोणतेही जगातले काम नाही की जे काम आपल्या जिवापेक्षा मोठे आहे. बाहेर जाऊन चौका-चौकात टवाळक्या करण्यापेक्षा आपल्या घरात निवांत गप्पा मारा. मुलांसोबत वेळ घालवा. हे एकवीस दिवस असेच जाणार आहेत. 21 दिवसांत भारत फार मोठी क्रांती करणार आहे. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आपण विजयी होणार आहोत. आपल्या इमारतीमधील, आपल्या गल्लीतील लोकांना कमी-जास्त काय लागले तर त्यांना मदत करूया. घरात बसूनच देशप्रेम वाढवूया. चला आपण कोरोनाला हरवूया.


✒️ *सतीश वसंतराव मोरे*
      *पत्रकार दैनिक पुढारी

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...