फॉलोअर

०९ मार्च २०१७

आजचा नाष्टा आमदार साहेबांसोबत

आजचा नाष्टा आमदारांसमवेत 4 ऑक्टोबर 2015


अनंत चतुर्थीचा दिवस दैनिकाला सुट्टी असल्याने निवांत होतो. तरीपण कराडचा फेरफटका मारून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे का पहायला बाहेर पडलो. बापू डुबलांसोबत दत्त चौकात आलो. तिथे आमचे जवळचे फोटोग्राफर नितीन रांगोळे नवीन अल्टो कार मधून हात काढत कार घेतली असे आनंदाने सांगत, खुणावत  पुढे जाऊन थांबले. पेढे आता नाहीत, चला चहा पिऊया असा आग्रह करून त्यांनी गजानन हाॅटेलात बळजबरीने नेले. चहा पिऊन उठणार तेवढ्यात आपले आमदार बाळासाहेब पाटील हाॅटेलात आले. आमदारसाहेब आल्यावर हाॅटेलचे मालक, वेटर यांच्या बरोबरच नाष्टा करायला बसलेल्या सर्वाचीच लगबग सुरू झाली. 

सुरूवातीच्याच कक्षात टेबलावर नाष्टा करत दोन युवक बसले होते, त्याच्या समोर साहेब आणि गंगाधर जाधव बसले. काय देणार खायला असे विचारून साहेबांनी पोहे न टाकता मिसळची ऑर्डर दिली. दरम्यान समोर बसलेल्या दोघांची साहेबांनी चौकशी केली. त्यांनी ओळख करून दिली. वडुजच्या त्या दोघांना कळलेच नाही समोरची व्यक्ती कोण आहे. दरम्यान कराडचे आमदार आपल्या सोबत, चौकातील छोट्या छोट्या हाॅटेलात नाष्टा करायला बसलेत याचे त्यांना आश्चर्य वाटले. गप्पा मारत नाष्टा झाला. ते दोघे जायला निघाले तेव्हा त्यांना साहेबांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. वडूजला आमच्या घरी या असे निमंत्रण देऊन दोघे बाहेर पडले.

साहेबांसमवेत नाष्टा केला. दरम्यान इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झांज पथकाने पुजा सुरु केली. कराडात महारूद्रा नावाने झांज पथक स्थापन झाले आहे, त्याची माहिती माझ्याकडून घेतली. दोन दिवसापुर्वी डुबल गल्लीत राजीव डुबल यांच्या पुढाकाराने पुण्याचे शिवमुद्रा पथक आणले होते, कराडकरानी या पथकाला डोक्यावर घेतले, चांगला उपक्रम डुबल गल्लीत झाला, असे साहेबांनी सांगितले. त्याच दिवशी कराडात लोणावळ्याचेही पथक होते,  मात्र एक सुर एक ताल धरत आणि शिट्टी चा वापर न करता फक्त ताशाच्या तालावर,  इशाऱ्यावर पुण्याचे पथक सर्वाना ठेका धरायला लावते, असे आमदार साहेबानी सांगितले.  हे ऐकून या व्यक्तीची निरिक्षण शक्ती थोरल्या साहेबांप्रमाणे आहे, याचा प्रत्यय आला. नाष्टा झाल्यावर बील किती झाले याची माहिती घेऊन साहेब बील द्यायला उठले. गजाननच्या मालकांनी नम्रपणे बील घ्यायला नकार दिला. मग साहेबांनी हळूच शंभरच्या दोन नोटा वेटरच्या हातात ठेवल्या. सोबत आलेल्या कार्यकर्ताना बील द्यायला लावणारे लोकप्रतिनिधी मी खुप पाहिले आहेत. पण स्वतच्या खिशातून पैसे देणारे बाळासाहेब पाटील यांच्या सारखे लोकप्रतिनिधी क्वचितच असतात, हे पहायला मिळाले. मध्यंतरी मुंबई येथे साहेबांसोबत दोन तीन वेळा जेवलो होतो, तेव्हा सुद्धा मी हे अनुभवले होते.


नाष्टा करून बाहेर पडलो. येतो म्हणून साहेबांना नमस्कार केला, पण सतीश थांबा, काय गडबड आहे, असे म्हणत गंगाधर जाधव यांच्या खताच्या दुकानात मला घेऊन गेले. तिथे पण खते , बियाणे याची माहिती घेताना नवीन कुठला शाळू आला आहे असे विचारून बियाणे पिशवी हातात घेऊन पाहीली. दरम्यान दत्त चौकातील नंदकुमार गणेश मंडळांने तयारी झाली आहे, असा निरोप दिल्यानंतर आम्ही सारे जण उठलो. साहेबांच्या हस्ते मिरवणूक नारळ फोडण्यात आला. पालखी खांद्यावर घेऊन साहेब थोडे अंतर चालले. कराडच्या नवीन झांज पथकाने सुद्धा नारळ फोडण्याची विनंती केली. पथकातील युवकांची आस्थेने चौकशी केली, सर्वाना नमस्कार करून साहेब तेथून निघाले.

आजच्या दिवशी बाळासाहेब पाटील यांच्या लोकसंपकांचे पैलू पहायला मिळाले. पी डी पाटील साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून लोक त्यांना का मान देतात हे पहायला मिळालं.

गणपती बाप्पा मोरया.

4 /10/2015
सतीश मोरे,

०८ मार्च २०१७

पुनर्नवा

तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?



वादळ म्हणू की वादळवेल म्हणू
नारी म्हणू की दिव्यनारी म्हणू
वैदेही म्हणू की रामदुलारी म्हणू
राधा म्हणू की मीरा म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?



सखी म्हणू की हरिप्रिया म्हणू
अबला म्हणू की सहस्रबला म्हणू
स्रीशक्ती म्हणू की सहनशक्ती म्हणू
प्रज्योती म्हणू की आरती म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?



नदी म्हणू की प्रेमसागर म्हणू
साधना म्हणू की प्रेरणा म्हणू
देवी म्हणू की दिव्यशक्ती म्हणू
शांताई म्हणू की चंद्राई म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?



राधिका म्हणू की सेविका म्हणू
श्वास म्हणू की प्राणवायू म्हणू
गीत म्हणू की संगीत म्हणू
साद म्हणू की सुसंवाद म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?



विद्या म्हणू की सुधारणा म्हणू
साथी म्हणू की अस्मिता म्हणू
अर्पिता म्हणू की समर्पिता म्हणू
देवयानी म्हणू की शर्मिष्ठा म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?




ही आणि खूप काही नावे
घेऊनही तुझं वर्णन करता येईल.
रोज नव्याने जन्म घेणारी पुनर्नवा तू !



तुझा जन्म फक्त
देण्यासाठी,
इतरांसाठी ,
झगडण्यासाठी
वात्सल्यासाठी,
करूणेसाठी
त्यागासाठी,
शिकण्यासाठी ,रोज नवनवीन शिकवण्यासाठी !

आई,  ताई,  अर्धांगिनी, कन्याकुमारी
तुला लाख लाख सलाम 🙏🙏

                        ..........सतीश मोरे

Dedicated to all women
who know only to give, strive and love.
My wife, sister, daughter  and mother.






०५ मार्च २०१७

नवीन उशी का घेतली पाहीजे?

*☑जुनी उशी वेळेवर बदलणे का गरजेचे आहे? योग्य वेळी उशी न बदला आणि  आजारपणाला आमंत्रण देऊ नका.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
जर तुम्हाला अशी निवांत झोप येत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते.शांत व गाढ झोप न येण्यामागे अनेक कारणे असतात.निवांत झोप न लागण्याचे एक प्रमुख कारण तुमची खराब झालेली उशी देखील असू शकते.लक्षात ठेवा पिलो चेंज न केल्यास झोप न लागण्यासोबत तुम्हाला आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात.
🔲🔲🔲

_*🔺आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ? योग्य वेळी उशी न बदलल्यास काय होते-*_

*▪जुन्या उशीमध्ये धुळीचे कण व जिवाणू असतातात-*

तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की तुमच्या जुन्या उशीमध्ये धुळ व जंतू अाहेत.पण हे खरे आहे की अस्वच्छता,प्रदूषण,घरातील धूळ,स्वयंपाकघरातील काजळी,घरातील पाळीव प्राणांचा वावर या अशा अनेक गोष्टींमुळे तुमची जुनी उशी खराब होऊ शकते.जर तुम्हाला तुमच्या जुन्या उशीमुळे नीट झोप येत नसेल तर प्रथम तुमच्या उशी कव्हरला कोमट पाण्यामध्ये स्वच्छ धुवा.या पिलोच्या कव्हरमध्ये असलेल्या धुळीमुळे तुम्हाला  अॅलर्जी होऊ शकते.अश्या उशी कव्हरमधील धुळ श्वासावाटे नाकात गेल्यामुळे तुम्हाला अस्थमाचा देखील त्रास होऊ शकतो.

*▪तुम्हांंला मानदुखी अथवा पाठीचे दुखणे होण्याची शक्यता असते-*

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या मळक्या व आकार बदलेल्या जुन्या उशीवर झोपलात तर तुम्हाला पाठदुखी, मानदुखीसारख्या वेदनेला सामोरे जावे लागू शकते. अशा अस्वस्थ झोपेमुळे दैनंदिन जीवनात तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. झोपताना तुमच्या मानेला आधाराची गरज असते पण जर तुमच्या जुन्या उशीमुळे मानेला व्यवस्थित आधार मिळाला नाही तर तुमच्या मानेच्या दुखण्यात अधिक वाढ होते.जुनी पिलो तशीच वापरल्यामुळे पुढे  मणका व मानेमध्ये मुंग्या येणे किंवा हे अवयव बधीर होण्याची समस्या निर्माण होते. हे नक्की वाचा डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?

*▪जुनी उशी नेमकी कधी बदलावी?*

🔺१.तुम्ही विकत घेतली तशी ती उशी आता दिसते का?

🔺२.उशी मळली अथवा त्याच्यावर धुळ जमा झाली आहे का?

🔺३.उशी डोक्याखाली घेतल्यानंतर अस्वस्थ वाटते का?

🔺४.सकाळी उठल्यावर मान ,पाठ व गुडघे हे अवयव जखडतात का?

🔺५.उशीवरील धुळीमुळे कुबट वास येतो का?

या प्रश्नांची उत्तरे जर होय अशी असतील तर तुमची जुनी उशी बदण्याची वेळ झाली आहे असे समजा.

*▪योग्य उशी कशी निवडाल?*

तुमच्यासाठी योग्य उशी कोणती हे सांगणे तसे कठीण आहे.यासाठी निरानिराळ्या उशीचा वापर करा ज्यामुळे तुमच्या आवडीची व आरामदायक उशी तुम्हाला नक्कीच मिळेल.

यासाठी पहा हे काही उशीचे प्रकार-

*🔺पॉलिस्टर पिलो-*

बाजारात मायक्रोफायबर आणि क्लस्टरफील असलेल्या या पॉलिस्टर पिलो सहज उपलब्ध असतात.या पिलो स्वस्त असल्यानेे सर्वसामान्यांच्या खिशाला परवतात.या पिलो तुम्ही मशीनवॉश करु शकता.त्याचप्रमाणे या पिलो वर्षातून अथवा दोन वर्षातून एकदा बदलणे गरजेचे असते.

*🔺लेटेक्स पिलो-*

फोम कोर आणि ग्रॅन्युलेट फोम या दोन प्रकारात या पिलो उपलब्द असतात.या पिलो खुप आरामदायक असल्यामुळे त्यांच्या वापरामुळे झोप चांगली मिळते.त्याचप्रमाणे लेटेक्स पिलो किमान पंधरा ते वीस वर्ष टिकतात.या पिलो थोड्या महाग असतात मात्र त्यांच्या वापरामुळे डोके व मानेला चांगला आधार मिळू शकतो.

*🔺मेमरी फोम-*

या पिलो वर डोके ठेवल्यास डोके व मानेच्या आकारानुसार त्या पिलोचा आकार बदलतो.तीव्र मानदुुखी अथवा पाठदुखी असणा-या लोकांना या पिलो वापण्याचा सल्ला देण्यात येतो.गर्भवती महिलांनी या पिलोचा वापर करणे योग्य असते.या पिलो देखील पंधरा ते वीस वर्ष टिकतात.

*🔺फेदर पिलो-*

या पिलो महाग असतात.या पॉलिस्टर पिलोपेक्षा अधिक काळ टिकतात.मात्र या पिलोमुळे मानेला योग्य आधार मिळणे कठीण असते.

*🔺वॉटरफ्लो पिलो-*

वॉटरफ्लो पिलो हा पिलोचा एक आधुनिक प्रकार अाहे.या पिलो हायपोअॅलर्जीक असून त्या मऊ असतात.या पिलो मधील वॉटरपाऊचमुळे मानेला योग्य आधार व आराम मिळतो.

*🔺प्रतिबंधनात्मक उपाय-*

जर तुम्हाला तुमची पिलो त्वरीत बदलायची नसेल तर हे जरुर करा.

▪१.दर आठवड्याला उशी हॉट ड्रायर मध्ये ठेवा त्यामुळे त्यांच्यातील जीवजंतूचा नाश होईल

▪२.केस ओले घेऊन उशीवर झोपू नका.

▪३. शक्य असल्यास बेडरुमसाठी dehumidifier खरेदी करा.

▪४.चांगली स्वच्छ उशी निवडा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
😴😴😴😴😴😴😴😴😴

०४ मार्च २०१७

लष्कर / सेना नसलेले देश

_*🔺जगाच्या पाठीवर.....*_

*☑असे देश ज्यांच्याकडे....*
*स्वतःचे लष्कर/सेना नाही.......*
➖➖➖➖➖➖➖➖➖
जगाच्या अर्थकारणात आज प्रत्येक देशाचे रक्षा म्हणजे संरक्षण बजेट हा चर्चेचा विषय असतो. कोणत्या देशाने किती बजेट संरक्षणासाठी ठेवले आहे यावरही कांही आडाखे बांधले जात असतात. अमेरिकेचे रक्षा बजेट सर्वाधिक म्हणजे ६१० अब्ज डॉलर्सचे आहे. त्या खालोखाल चीनचे बजेट आहे तर भारताचे संरक्षणासाठीचे बजेट आहे ४१ अब्ज डॉलर्स. मात्र जगाच्या पाठीवर असेही कांही देश आहेत, जेथे लष्कर हा प्रकार नाही. गरज भासली तर हे देश भाड्याने दुसर्या देशांचे सैनिक बोलावतात. अशा देशांची संख्या २२ च्या वर आहे. त्यातील कांही देशांची ही माहिती

*🔺१) कोस्टा रिका....*
मध्य अमेरिकेतील या देशात १९४८ साली राष्ट्रपती निवडणूकीत गडबड होऊन बडखोरांनी हा देश ताब्यात घेतला व १९५३ साली सत्ता स्थापन केली. त्यानंतर येथे १४ वेळा राष्ट्रपती निवडणुका झाल्या मात्र त्या अतिशय शांततेत पार पडल्या. या देशात लष्कर नाही.1948 ला झालेल्या गृह-युद्धानंतर इथून सेना हटवली आहे.

*🔺२)लिंचेनस्टाईन....*
मध्य युरोपातील हा छोटासा देश. त्यानी १९६८ साली स्वतःची सेना भंग केली कारण लष्कराचा खर्च भागविण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती सबळ नव्हती. तेव्हापासून युद्ध होईल अशी शंका आली तर पुन्हा लष्कराची स्थापना करायची असा निर्णय त्यांनी घेतला मात्र अजून तरी तशी वेळ त्यांच्यावर आलेली नाही. हा देश काळ्या पैशांबाबतच्या चर्चेने नेहमीच प्रसिद्धीत असतो.

*🔺३) सामोआ.....*
१९६२ साली न्यूझीलंडच्या गुलामीतून मुक्त झालेल्या या देशाला स्वतःचे सैन्य नाही. मात्र स्वातंत्र्य देतेवेळी न्यूझीलंडने त्यांना गरज असेल तेव्हा सैन्य पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम सामोआ द्विपसमुह पोलेनेशियाचा भाग मानला जातो.

*🔺४)अंडोरा......*
युरोपतील या देशाची स्थापना १२७८ साली झाली आहे. ४६८ चौरस किलोमीटरचा परिसर असलेला हा देश स्की रिसॉर्ट आणि ड्यूटीफ्री दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. हे करचुकवेगिरी करणार्यांचे नंदनवन म्हटले जाते. स्पेन व फ्रान्सने या देशाला गरज असेल तेव्हा सैनिक पुरविण्याचे आश्वासन दिलेले आहे.

*🔺५)तुवालू.......*
भारत प्रशांत द्विप सहयोग संघटनेतील हा देश २०१४ साली स्थापन झाला आहे.२०१५ मध्ये जयपूर परिषदेत १४ देशांचे संमेलन झाले त्यात या देशाचा समावेश होता. अवघा २६ चौरस किलोमीटरचा हा चिमुकला देश. त्याची लोकसंख्या आहे १० हजार. या देशाला स्वतःचे लष्कर नाही. हा देश कॉमनवेल्थचा सदस्य आहे आणि ब्रिटन प्रमाणे त्यांचे संसदीय राजतंत्र आहे.

*🔺६)व्हेटिकन सिटी.....*
इटलीची राजधानी रोमच्या पोटातच असलेल्या हा स्वतंत्र देश. जगातील सर्वात छोटा देश असून त्याचे क्षेत्रफळ अवघे ०.४४ चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या आहे केवळ ८४०. कॅथॉलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हेटीकन सिटीमध्ये पोप आणि चर्चचे अन्य अधिकारी राहतात. येथे स्वतंत्र सेना नाही.

*🔺७)ग्रेनेडा.....*
मोठे बेट अन्य छोटी बेटे असा ३४४ किमीचा परिसर असलेला व १ लाख ५ हजार लोकसंख्येचा हा देश कॅरेबियन व अटलांटिक समुद्राच्या मध्यात आहे. मसाल्यांसाठी जगभर प्रसिद्धी असलेल्या या देशात १९८३ साली सैनिकांची बंडाळी झाली ती अमेरिकेच्या हस्तक्षेपाने विरली. मात्र तेव्हापासून या देशात नेहमीचे सैन्य नाही.

*🔺८) नाऊस.....*
पॅसिफिक महासागरातील एक बेट म्हणजे हा देश. त्याचे क्षेत्रफळ आहे २१.१० किमी व लोकसंख्या आहे १० हजार. हा देश मायक्रोनेशिया बेटाचा भाग असून करारानुसार या बेटाच्या सुरक्षेची जबाबदारी ऑस्ट्रेलियाकडे आहे.

*🔺९) मॉरिशस....*
भारताला जवळचा असलेला हा देश १९६८ पासून नो स्टँडींग आर्मी असलेला देश आहे. सर्व लष्करी, पोलिसी आणि सुरक्षा संबंधी जबाबदार्या पार पाडण्यासाठी १० हजार ड्यूटी पर्सनल येथे नेमले गेले आहेत. त्यातील ८ हजार नॅशनल पोलिस फोर्स मधले असून ते अंतर्गत सुरक्षा व कायदा सुव्यवस्था सांभाळतात. १५०० चा स्पेशल मोबाईल फोर्स व नॅशनल कोस्ट गार्डचे ५०० सदस्य अशी ही सुरक्षा व्यवस्था असून या दलांना अगदी छोटी शस्त्रेच दिली जातात.

*🔺१०) किरीबाटी.......*
या देशाच्या घटनेने फकत पोलिस दलासाठी परवानगी दिली आहे. हे पोलिस दल मेरीटाईम सर्वेलन्स वर लक्ष ठेवून असते. त्यांच्याकडे छोटी शस्त्रे व १ पेट्रोलिंग बोट इतकीच सामग्री आहे. देशाला सैन्य नाही मात्र गरजेनुसार ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशांकडून भाड्याने सैनिक पुरविण्याचा करार केला गेला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲◼🔲

०३ मार्च २०१७

मी आणि माझं, माझ्यासाठी

मी ,माझं, माझ्यासाठी!

नाऊ अफ्टर अॅन्ड देन
सारं पाहिजे फक्त मला
माझं ते मला आणि तुझं बी मला
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?

वाढत जाईल माझी संपत्ती
जमीन झुमला घरदार आणि इस्टेट
प्राॅपर्टी वाढविण्यातच मला इंट्रेस्ट
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?

सोने शेअर्स इमले गाडी न् स्टेटस
रोज वाढवत जाऊया फक्त असेटस
इंटरेस्ट मिळत जाईल मला कॅशलेस
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?

         .......सतीश मोरे

०१ मार्च २०१७

प्रेम हे

1
उगाचच्या रुसव्यांना
एकमेकांना  मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.
2
एकमेकाना आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.
3
न भेटता, न बोलता
एकमेकांना समजून घ्यायला
प्रेम म्हणायचं असतं
4
तो चुकतोय
माहित असूनही सावरायला
प्रेम म्हणायचं असतं
5
सख्या सजणाला
आहे तसा स्वीकारयला
प्रेम म्हणायचं असतं
6
अव्यक्त व्यक्त
न करताही समजायला
प्रेम म्हणायचं असतं
7
सोबत द्यायला
सोबतीला असायला
प्रेम म्हणायचं असतं
8
तु सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही...

आणि मिटिंग सुरू झाली

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...